Skip to main content

आईची विटंबना

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 02/12/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईवर झालेली जखम आणि त्या जखमेच्या वेदनानी कण्हण्याच्या तिच्या किंकाळ्या ऐकून माझं मन सून्न झालं.काही लिहावसंच वाटत नाही.एक दोन लेखनं केली, पण मिपावरचा तो तिरंगा पाहून ती लेखनं सादर करायला मला मनंच होत नाही.आईने किती म्हणून जखमा सहन केल्या.कधीही तिने जर हात उचला तर आपल्या संरक्षणासाठीच उचलला. पण तिने कधीही हातात काठी घेऊन कुणाला मारायला आपल्या घराबाहेर पडली नाही.इतकी क्षमता असून तिने कधीही कुणाच्या घरात जाऊन कसली ही अभिलाषा केली नाही.आल्या- गेलेल्या पाहुण्याला आनंदाने सामाऊन घेतलं."आवो जावो तुम्हारा घर" अशी वृत्ति ठेवून ती राहिली.इतिहास साक्षी आहे.म्हणून ती आजतागायत जीवंत आहे. बाहेरच्या आगांतूकानी येऊन खूप तिची लुटालूट केली.कुणी तिचे दागिने लुटले,कुणी तिची देवघरं उद्व्हस्त केली.तिच्या गळ्यातला हिरा पळवून नेऊन आपल्या मुकूटात रोवून ठेवला.पण म्हणून ती कधीही दीन झाली नाही.यवनानी शेकडो वर्ष तर फिरंग्यानी दिडशे वर्ष तिच्याच घरात राहून धुमाकूळ घातला, लूट केली.पण तेच आगांतूक आपलं तोंड काळं करून निघून गेले. तिची बाराशे कोटी मुलं आपआपल्या परीने जगताहेत. तिची होत असलेली भरभराट शेजा‍र्‍यापाजार्‍यांच्या डोळ्यात खूपते.तिची प्रगती खूंटवण्यासाठी ते आपली पराकाष्टा करीत आहेत.पण अशी कुणाची प्रगती खूंटेल का? ती म्हणते, "असे खूप आघाद माझ्यावर झाले आहेत.खूप जण जखमा करून गेले आहेत.किती रक्त सांडलं गेलं आहे. वाईट वाटून तुम्ही दुःखी व्हाल.पण हे ही दिवस जातील. आघात करणारेच हरतील.भविष्यात काय लिहून ठेवलं आहे हे कुणालाच माहित नाही. पण एक गोष्ट खरी आहे की झालेल्या चूकातून शहाणं व्हायला हवंय.आणि माझा माझ्या बाराशे कोटी मुलांवर विश्वास आहे." मुंबईत असताना आमच्या लहानपणी घरात चाकू असलाच तर पेन्सिलीला टोक काढण्यासाठीच असायचा.मोठं धारदार हत्यार बाळगायला त्या काळात बंदी होती. जातीवादावरून किंवा अन्य कारणावरून दंगे किंवा भांडणं झालीच तर चाकूचे वार व्हायचे. किंवा लाठ्या काठ्याने डोकी फोडली जायची.हे चाकू मुंबईत तरी चोरबाजारात मिळायचे. हा चोरबाजार भेंडी बाजाराच्या आसपास भरायचा.ह्या चाकवाना रामपुरी म्हणायचे. रामपुरी चाकू म्हणजे मोठा चाकू समजायचा.आणि हे चाकूने भोसकाभोसकीचे प्रकार हाताच्या बोटावर मोजण्या इतके व्ह्यायचे आणि त्यातून एक दोन मरायचे. त्यानंतर जमावाकडे दुसरं अस्त्र म्हणजे दगड किंवा सोडावॉटरच्या बाटल्या असायच्या. त्या एकमेकावर फेकून मारायचे.त्याने पाच दहा डोकी फुटायची. त्यावेळच्या पोलिसाकडेपण दंडुके-बॅटन- असायचे.त्यावेळच्या पोलिसांचा ड्रेस गमतीदार असायचा. शिवाजीचे मावळे वापरायचे तसे डोक्यावर पगड्या असायच्या आणि त्याचा रंग पिवळा जर्द असायचा आणि पेहराव असायचा जांभळ्या रंगाचा बुशकोट आणि खाली शॉर्ट-हाफ प्यॅन्ट-असायची.पायात पठाणी चप्प्ल असायचं.पोलिस गमतीदार जोकर दिसायचा. आम्ही पोलिसाला लहानपणी "जांभळी बाटली पिवळा बूच" असं गमतीने म्हणायचो. पोलीसाच्या कमरेला हे पिवळ्या रंगाचे दंडुके-बॅटन लटकत असायचे.त्याचा वापर त्याला क्वचितच करावा लागायचा.आणि मोठ्या दंग्यात गाड्या भरून पोलीस आले की त्यांच्याकडे लांब काठ्या असायच्या.लाठीमार करून जमावाला पांगवायचे.त्याहून गंभीर जमाव झाल्यास रायफली घेऊन पोलिस यायचे. ह्या रायफलीतून एका वेळी एक गोळी झाडली जायची.बरेच वेळा गोळीबार पोलिस हवेतच करायचे.दंगे काबूत यायचे. त्यामुळे मनुष्य हानी कमीच व्ह्यायची. पोलिसांच्या साहेबाकडे मात्र पिस्तूल असायचं आणि कमरेला एका चामड्याच्या पिस्तुलाच्या आकाराच्या पाऊचमधे ठेवलेलं असायचं. पिस्तुल प्रत्यक्षात कसं दिसतं ते आम्हाला कधीच पाहायला मिळालं नाही.पण नाही म्हटलं तरी वांद्र्याच्या वांद्राटॉकीझमधे चार आण्याचं तिकिट काढून आम्ही इंग्लिश फिल्म बघायला जायचो. "झोरो इन टाऊन" किंवा "डेथ ऑफ गॅन्गस्टर" असले फायटिंगचे चित्रपट बघायला मजा यायची.त्यात पिस्तुलं म्हणजे काय ते पहायला मिळायचं.तेव्हड्या लहान वयात मोठ्या भावाबरोबर चित्रपट बघायला गेल्यावर इंग्रजी काही कळत नसायचं.मोठा भाऊ हंसायचा त्यावेळी आम्ही हंसायचं.एक मात्र खरं धावत्या घोड्यावर बसून बंदूकीच्या गोळ्या एकमेकावर झाडण्याच्या दृश्याने त्यांची मर्दूमकी बघायला मजा यायची.एक मात्र इंग्रजी शब्द अजून आठवतो" हेंज-जॉफ" म्हणजेच हॅन्डस अप" जशी मुंबईची वस्ती वाढू लागली तसे गुन्हेगारपण वाढायला लागले.जरा आधूनीक हत्यारं गुंडाना मिळायला लागली. अलीगढ वरून गांवठी पिस्तुलं मिळायला लागली.उत्तरप्रदेशच्या अलिगढमधे गावठी पिस्तुलं बनावायचे बेकायदा कारखाने बरेच होते. ही पिस्तुलं मुंबईत स्मगल व्हायची.कधी कधी मुंबईचे पोलिस अलिगढमधे जाऊन बेकायदा कारखान्यावर छापे टाकायचे. मुंबईत त्यावेळी नावाजलेली मराठी वर्तमानपत्रं म्हणजे लोकमान्य,नवशक्ति आणि केसरी.लोकसत्ता आणि सकाळ ही वर्तमानपत्रं आत्ता आत्ताची.परदेशातल्या बातम्या सोडाच एखाद दुसरा भोसकून मेल्याची एखादी बातमी दिसायची.अमेरिकन कॉटनबाजाराचे नंबर मात्र एका ठराविक जागेत दिसायचे.त्या नंबरावर काही लोक सट्टाबेटिंग खेळायचे. मुंबईची वस्ती आणखी वाढायला लागल्यावर,चोर्‍यामार्‍या दंगेधोपे जातीय दंगल वाढायला लागली.आता नवीन अस्त्र म्हणजे गांवठी बॉम्ब फुटायला लागले.नाहीतर बॉम्ब हा प्रकार फक्त लष्कराकडेच असायचा.ह्या गांवठी बॉम्बच्या वापराने एक्का दुक्का मेल्याची बातमी यायची.गांवठी बॉम्ब बनवायचे मुंबईतपण कारखाने निर्माण व्हायचे.धारावीत त्यांचं जास्त प्रमाण असायचं. हे बॉम्ब विझवण्यासाठी मुंबईपोलिसांच स्पेशल खातं असायचं.हळू हळू सर्रास पिस्तुलं मिळायला लागली.अर्थात बेकायदा वापर व्हायचा.आता पेपरात एकदोन ऐवजी चारपाच दुर्घटनाच्या बातम्या यायच्या.हवालदारपण आता थोडे स्मार्ट व्हायला लागले. पुर्वीचा गचाळ पेहराव जाऊन पोलीस आता जांभळी टोपी आणि खाकी कपडे वापरायला लागले. एके४७,बिके५७,सिके६७ ही पोलीसांच्या कमरेवरच्या बिल्ल्यावरची नंबरांची नांव असायची."अरे त्या एके४७ला बोलाव.किंवा बिके५७ला हांक मार" अशी भाषा बोलली जात होती. एके४७ ही मशीनगन असते हे त्यावेळी पोलिसानासुद्धा माहिती नसावी.मशिनगन्स फक्त लष्करात असतात हे ऐकलं होतं. पण आता गुंड जाऊन अतीरेकी आले.गावठी बॉम्ब जाऊन आरडीएक्सचे बॉम्ब आले.हात ग्रेनेड सर्रास वापरायला लागले. सुईसाईड बॉम्बचं नवीन टेकनीक आलं.आता पुढे रेडिओऍकटीव्ह बॉम्ब येतील.पुढे सेटलाईटवरून लेझर बिम वापरून संहार करण्यात येतील. कदाचीत पोरटेबल न्युकलीयर बॉम्ब येतील.डर्टीबॉम्ब येतील.काय कुणाष्टाऊक कुठे चालला आहे हा जग्नाथाचा रथ? कुणाचा आहे हा इशारा जात आहे पुढे पुढे ही धरती जात आहे पुढे पुढे हे गगन होत आहे काय ह्या जगताला कुणाचा आहे हा इशारा जात आहे पुढे पुढे ही जीवन नय्या कोण आहे हिचा नावाडी न कळे जात आहे कुठे हे जीवनचक्र कुणाचा आहे हा इशारा हे हंसणे हे रडणे ही आशा निराशा न कळे आहे काय हा तमाशा रात्रंदिनी जात आहे कुठे हा मेळावा कुणाचा आहे हा इशारा अजब आहे हा सोहळा अजब आहे ही कहाणी नाही कसले ठिकाण नाही कसले निशाण न कळे कुणासाठी जात आहे हा जगन्नाथाचा रथ कुणाचा आहे हा इशारा हे शहाणे हजारो झाले भटके गुपीत त्याचे कुणी न समजे ही साखळी जीवनाची करीते भ्रमंती कुणाचा आहे हा इशारा श्रीकृष्ण सामंत
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4412
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

असेच म्हनतो मी पन सांमत काका मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

काही खर नाही आईच्.बाळ मोठी झाली पण आईलाच आता नावे ठेवु लागली आहेत. वेताळ

छान लेख !! आवडेच !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आपला लेख आवडला उत्तम मान्डणी केली आहे. परन्तु एक वाक्य खटकले....... शिवाजीचे मावळे वापरायचे तसे डोक्यावर पगड्या असायच्या छ. शिवराय महाराष्ट्राची अस्मिता आहेत तरी छ. शिवराय यान्चा एकेरी उल्लेख क्रुपया करु नये. दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

In reply to by आम्हाघरीधन

आम्हाघरीधन, आपण चूक दाखवल्या बद्दल आभार. शिवाजी महाराजांबद्दल मला अत्यंत आदर आहे.ह्या लेखाच्या लेखनाच्या विचाराच्या गर्दीत महारज हे लिहायचं चुकून राहिलं.पण हे समर्थन करीत नाही. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सुंदर प्रकटन..!

चांगला लेख.. आवडला --(जगन्नाथाच्या रथयात्रेतला एक यात्रेकरू) लिखाळ.

सामंत काका, सुरेख लेख. किती सुंदर प्रकटन केलं आहे. खरंच आई रडते आहे...मला वाचवा म्हणून नव्हे तर माझ्या मुलांना वाचवा म्हणून. आणि मुलं अशी किड्यामुग्यांसारखी मारली जात आहेत.. तुमचा लेख खरंच खूप आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

खोट कशाला बोलु? तुमचे लेख कधीच आवडत नाहीत आज मात्र खुप भिडला.... किती बदलली दुनिया - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

In reply to by गणा मास्तर

गणा मास्तर, "खोट कशाला बोलु? तुमचे लेख कधीच आवडत नाहीत" हे वाचून मला खूप वाईट वाटलं. हे पण मी ही खोटं बोलत नाही. "आज मात्र खुप भिडला...." निदान हा लेख आपल्या मनाला भिडेल असा मी लिहू शकलो ह्याची कल्पना करून मला खूप आनंद झाला. मी आपल्याला आवडतील असे लेख लिहिण्याचा अवश्य प्रयत्न करीन.नव्हेतर आपल्या सकट माझ्या सर्व वाचकाना माझे लेख आवडावे म्हणून लिहिण्याच्या मी प्रयत्नात असतो. ह्यावर मला एक किस्सा आठवतो. मला माझ्या आईचं जेवण खूप आवडायचं.विषेश करून ती करायची ती तूरीच्या डाळीची आमटी. जेवताना मी तिला मुद्दाम म्हाणायचो. "आई तुझं जेवण मला आवडत नाही." असं बोलून मी तिच्या चेहर्‍याकडे बघायचो. बिचारी हिरमुसली व्हायची.मला म्हणायची, "अरे कुणाल आवडूं नये म्हणून का कुणी जेवण करतं?.तुला माझं जेवण आवडायला मी कसं करूं ते सांग." हे ऐकून मी तिला म्हणायचो, "ही तुझी डाळीची आमटी मला खूप आवडली" त्यावर ती म्हणायची, "चल, निदान मी केलेला एक तर पदार्थ आवडला ना?मला खूप आनंद झाला" हे ऐकून मी तिला म्हणायचो, "नाही गं आई! मी तुझी गंमत केली." गणा मास्तर, तसं तर तुम्ही करत नसाल ना? (गणा मास्तर, खोटं का असेना हो म्हणा.मला बरं वाटेल) मग ती मला म्हणायची "एक चीनी म्हण आहे,"खरं बोलावं खरं ओकू नये" By the way, "खरं बोलावं खरं ओकू नये म्हणजे रे काय...भाऊ?" ह्यावर मी एक लेख लिहिला आहे.लवकरच मिपावर पोस्ट करीन तो तरी निदान आपण अवश्य वाचावा ही विनंती. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

"खोट कशाला बोलु? तुमचे लेख कधीच आवडत नाहीत" हे वाचून मला खूप वाईट वाटलं. हे पण मी ही खोटं बोलत नाही. काका, मला असं वाटतं की आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं. प्रत्येक वाचकाला प्रत्येक लेख आवडेल हे थोडं कठीणच आहे. मला स्वतःला साहित्यिक भाषेत शब्दांचे मनोरे चढवले आणि आतमधे काहीच (मॅटर) नसलं की लेखन अजिबात आवडत नाही; (उदाहरण देण्याचा मोह आवरत आहे, नाहीतर पुन्हा एक भांडण सुरु व्हायचं.) पण काही लोकांना तसं आणि त्या प्रकारातलं लेखन वाचायला आवडतं. प्रत्येकाची आवडनिवड असं समजून सोडून द्यावंत अशी विनंती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१३_१३ सहमत !! -- सर्किट

दंगे धोपे ही कसे बदलत गेले ते पहा... रामपुरी चाकू म्हणजे मोठा चाकू समजायचा.आणि हे चाकूने भोसकाभोसकीचे प्रकार हाताच्या बोटावर मोजण्या इतके व्ह्यायचे आणि त्यातून एक दोन मरायचे. त्यानंतर जमावाकडे दुसरं अस्त्र म्हणजे दगड किंवा सोडावॉटरच्या बाटल्या असायच्या. त्या एकमेकावर फेकून मारायचे.त्याने पाच दहा डोकी फुटायची. >> आणि आता पहा एके ४७ शिवाय अतिरेकी कशाला हात म्हणून लावत नाहीत. सगळीकडे प्रगती झाली आणि आइ मात्र रडत राहिली. सामंत काका- सुंदर प्रकटन

हे असे मोठे मोठे अत्याचार आणि जखमा परके लोक येऊन करतात तेंव्हा आपल्याला संताप, चिड येते. आपल्याच देशात, आपले लोक काय काय करतात ते पहायला हवे. जातीय दंगे, भाईगिरी ( वा! काय शब्द आहे), धमक्या, दांडगाई हे तर मोठे प्रकार झाले. आपण हे असलं काही करत नाही, करणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी किती आहेत ते ही पहायला हवे. आपल्याला बरेच जण दिसतील धरणीमातेच्या अंगावर थुंकण्यात धन्यता मानणारे, कचरा रस्त्यावर फेकणारे, लाल ट्रॅफीक सिग्नल तोडून गाड्या दामटणारे. असच खूप काही करणारे. आपणच असे वागतो तर इतरांना काय बोलणार? याचा अर्थ परकीयांनी येऊन काहीही करावं असा मुळीच नव्हे, पण आपल्याच आईची काळजी अजून चांगल्या प्रकारे घेण्यास भरपूर वाव आहे. रेवती

सर्किट,घाशीराम कोतवाल,वेताळ,अनिल हटेला, तात्याराव, लिखाळ,प्राजु,कपिल काळे रेवती, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. आपल्या सर्वांना माझा लेख आवडला हे वाचून बरं वाटलं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

आवडला लेख. चांगला लिहिलाय.

खरच आपली आई किती सहनशील आहे......अजीबात भेदभाव नाही. आपला तो बाब्या असू वा दुसर्याच कार्ट असू... छान लिहीले आहे.