Skip to main content

ठाण्याचे नवे मेतकूट हॉटेल - एक वाईट अनुभव

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 11/01/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली. दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्‍यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले. २.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्‍या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले. आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते" म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्‍हाइकच वाईट. एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला. बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड. मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 72662
प्रतिक्रिया 233

प्रतिक्रिया

In reply to by गवि

.स्वाद थाळी, खवय्या,पुरेपूर कोल्हापूर, पॉप टेट्स आणि महेश लंच होम येथील प्रचंड यशस्वी कट्ट्यांनंतर.. .पुढचा भव्य मिसळपाव मेंबरकट्टा मेतकूट इथे करण्याचा प्रस्ताव मांडत आहे.

In reply to by मुक्त विहारि

"मेतकूट" यांचे व्यक्त केलेले मनोगत आवडले. कधी तरी अचानक चक्कर टाकुन पहावयास हवे ! @ डॉक आमच्याकडे असेच रायते मिळते.मी शांतपणे विचारले कि आमचा दही पुरी वाला भैया मे मध्ये सुद्धा गोड दही घालूनच दही पुरी देतो. तो अमुलचे दही वापरतो तुमचे दही आंबट झाले तर तुम्ही त्या ऐवजी बाहेरून दही आणणे आवश्यक आहे. असांच एक अनुभव आम्हाला ठाण्याच्या हाटिलात आला होता, दहीवडा मागवल्यावर त्यांनी चक्क गोड ताकात बुडवलेल्या वड्यांची डिश आणुन समोर ठेवल्या होत्या,यात दही कुठे आहे ? असे विचारणा केल्यावर दही असेच असते असे उत्तर मिळाले, मग त्याला सांगितले की मी माझ्या आयुष्यातला पहिला दहिवडा तुझ्या हॉटेल मधे येउनच खातो आहे असे तुला वाटते काय ? असा तक्रारीचा सुर ऐकुन झाल्यावर आमच्याकडे दही असचं मिळत ! असे उत्तर मिळाल्यावर आम्ही तिथुन निघालो पण जाताना मी त्याला उत्तर दिले { जे आत बसलेल्या सर्व लोकांनाही व्यवस्थित ऐकु जाईल अशा आवाजात } जिथे ताकाला दही सांगितले जाते अश्या या हॉटेलात परत पाउल ठेवणार नाही, हे लोक एक नंबरचे गाढविचे आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

In reply to by मदनबाण

बाण साहेब ठाण्यातील "एक" हॉटेल पेक्षा नाव सांगितले असतेत तर जास्त आवडले असते. या लोकांनी माज दाखवायचा आणी आपण मात्र सभ्यपणे राहायचे हे मला पटत नाही. जर तुम्ही आमच्याकडे असेच असते म्हणून सांगता तर तुम्हाला तुमची जागा दाखवणे आवश्यकच आहे असे मी मानतो. एकदा वाईट अनुभव आल्यावर तुम्ही परत त्या डॉक्टर कडे पाऊल ठेवता का? मग जर दमड्या मोजल्या आहेत तर यांची भीड का बाळगायची? ते काही समाजसेवा करीत नाहीत. २०० ग्राम दही आणी अननसाचे चार तुकडे याला जर आपण १५० रुपये मोजत असू तर त्याचे मूल्य परत मिळावे हि अपेक्षा काय चूक आहे? लंगर मध्ये जेवत असाल आणी तेथील दाल अळणी असेल तर गोष्ट वेगळी. दमड्या मोजल्यावर तेथील आचार्याने पदार्थाची चवसुद्धा बघू नये? आणी बिघडली असेल तर सुधारू नये? आणी वर माज दाखवावा याचे कारण आपण ग्राहक असे बोटचेपे धोरण स्वीकारतो म्हणून. मी कमीत कमी पाच कंपन्यांना धडा शिकवलेला आहे सामजिक न्यासाकडे जाण्याची धमकी देऊन यात विमान कंपनी, जल शुद्धीकरण कंपनी, भ्रमणध्वनी, आणी दोन ग्राहक उपकरणे बनवणार्या कंपन्या यांचा समावेश आहे. या बद्दल केंव्हातरी धागा टाकायचा मानस होता पण आळशीपणामुळे ते केलेले नाही.

In reply to by सुबोध खरे

मी कमीत कमी पाच कंपन्यांना धडा शिकवलेला आहे सामजिक न्यासाकडे जाण्याची धमकी देऊन यात विमान कंपनी, जल शुद्धीकरण कंपनी, भ्रमणध्वनी, आणी दोन ग्राहक उपकरणे बनवणार्या कंपन्या यांचा समावेश आहे. या बद्दल केंव्हातरी धागा टाकायचा मानस होता पण आळशीपणामुळे ते केलेले नाही. लिहा की... आम्हालापण मार्गदर्शन होइल ! :) बाकी त्या हॉटेलचे नाव आठवले असते तर ते इथे नक्कीच लिहले असते.... हा किस्सा घडुन बराच काळ लोटला आणि नंतर त्या भागात जाणे झाले नाही,त्यामुळे नाव लक्षात येत नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने

In reply to by सुबोध खरे

मी कमीत कमी पाच कंपन्यांना धडा शिकवलेला आहे सामजिक न्यासाकडे जाण्याची धमकी देऊन यात विमान कंपनी, जल शुद्धीकरण कंपनी, भ्रमणध्वनी, आणी दोन ग्राहक उपकरणे बनवणार्या कंपन्या यांचा समावेश आहे वाचण्यास उत्सुक.

In reply to by सुबोध खरे

ते तुमच्यासाठी नव्हते हो सर
मोदक - Tue, 20/01/2015 - 15:19 वाचण्यास उत्सुक. उत्तर द्या
यात मोदकरावांनी त्यांच्या लेखाची लिंक देउन "झैरात" केलेली...मी फक्त काही अस्सल (कुजकट??) मिपाकरांच्या सवयीनुसार प्रतिसाद दिला आणि
बरं मग? Wink
हे लिहून मोदकरावांनी त्याला पोचपावती दिली =))

In reply to by मेतकूत

मेतकूट साहेब दोन वाजता आरक्षण करून २. ४५ ला जागा मिळाली हि गोष्ट साधी नव्हे "थाळी संपली आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले" एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला. हि नव्याची नवलाई चार दिवस असू शकते परंतु जर ग्राहकाचे समाधान हा जर आपला केंद्रबिंदू नसेल काळाच्या ओघात कठीण होत जाते. या ओळी पाहून कुणालाही असेच वाटेल कि जर वाट पाहून कोशिंबीर आणि फोडणीचा भातच खायचा असेल तर मराठी म्हणून अभिमानाने हाटेलात का जायचे? जर मी मराठी थाळी खायला आलो आणि कोशिंबीर आणि फोडणीचा भात खाऊन परत जावे लागले तर मी परत त्या हाटेलात पाय ठेवणार नाही हे नक्की. ठाण्यातीलच एक हाटेल रॉयल च्यालेंज मध्ये आम्ही नोव्हेंबर २०१३ मध्ये पाईन एपल रायते मागवले तेंव्हा त्यातील दही "करकरीत" आंबट होते. ( दही खाताना दात करकरले तर त्याला करकरीत आंबट म्हणतात). मी त्याबद्दल तक्रार केली असता त्यांनी गरमी मुळे दहि आंबट होते म्हणून सांगितले. आम्ही परत घेऊन जा आणि दुसरे आणा सांगितल्यावर त्यांनी त्यातच शुगर सिरप( साखरेचा पाक फ्रेश लाइम सोडा वाले ) घालून आणून दिले. आम्ही त्याबद्दलची तक्रार वरिष्ठ व्यवस्थापकाकडे केली असता त्यांनी आमच्याकडे असेच रायते मिळते.मी शांतपणे विचारले कि आमचा दही पुरी वाला भैया मे मध्ये सुद्धा गोड दही घालूनच दही पुरी देतो. तो अमुलचे दही वापरतो तुमचे दही आंबट झाले तर तुम्ही त्या ऐवजी बाहेरून दही आणणे आवश्यक आहे. त्यावर त्यांनी आमच्या कडे असेच आहे हे सांगितले ताबडतोब पुढच्या सर्व ऑर्डर आम्ही रद्द केल्या आणि तिथून बाहेर पडलो. zomato सारख्या जालावर त्याचा साद्यंत इतिहास लिहिला आणि आजतागायत तेथे पूल ठेवलेले नाही यात आम्ही कमीत कमी २५ मित्र आणि परिवार असू. असो आपला खुलासा वाचला गैरसमज झाला असेलहि परंतु ज्याअर्थी एखादा माणूस लिहितो त्याअर्थी त्यात थोडेतरी तथ्य नक्कीच आहे असे मी मानतो. आपल्या हॉटेलला जरूर भेट देऊ पण हाच अनुभव परत आला तर …। शेवटी माणूस हॉटेलात जातो ते एक दुपार किंवा संध्याकाळ मजेत घालविण्यासाठी त्यासाठी तो घरच्या पेक्षा तिप्पट( किंवा जास्त) किंमत मोजत असतो. त्यामुळे आपल्या पैश्याचे मुल्य मिळाले पाहिजे हि अपेक्षा असते त्याशिवाय एका संध्याकाळीवर विरजण घालणारा अनुभव जर आला तर तो सहजासहजी विसरता येत नाही जाता जाता --- मुलुंड मधील काही हॉटेल्स "नम्रपणे" फोनवर सांगतात, "साहेब, शनिवारी आणि रविवारी आम्ही आरक्षण ठेवत नाही. आणि हे पटण्यासारखे आहे. कारण एखादी व्यक्ती येउन बसली तर तिला विविक्षित वेळेत उठवणे शक्य नाही हे मान्य.

In reply to by मेतकूत

सकारात्मक प्रतिसाद, आवडला. चुका सगळेच करतात... मात्र त्या मान्य करून, समजावून घेऊन, सुधारणा करणारेच प्रगती करू शकतात. तुमचे यश उत्तरोत्तर वर्धित होत जावे हीच एक मराठी माणुस म्हणून सदिच्छा !!!

In reply to by मेतकूत

सर्वसाक्षी यांना आपल्या मेतकुट या नवीन उपक्रमात खूप वाट पाहिल्यावर जेवल्या शिवाय परत फिरावे लागले. या विषयावर बरीच आणि सविस्तर चर्चा झाली आहे. त्यातून एक निष्पन्न हे निघाले कि सध्या आपले हॉटेल अल्पावधीत खूप लोकप्रिय झाले आहे. या मुळे आमच्यासारख्या दूरस्ताना तेथे खास मिळणार्या पदार्था विषयी कुतूहल निर्माण झाले आहे. तरी तुमचा मेनू याच चर्चेत -अर्थात संपादकीय संमतीने -आपण टाकलात तर पुढे मागे त्याचा लाभ घेण्याचा विचार करता येईल . बराच उहापोह झाल्यांनतर आपण आवर्जून मिपा चे सदस्य झालात आणि आपली दिलगिरी व्यक्त केली या बद्दल आपले अभिनंदन.

आलेला अनुभव निराशाजनक होता ह्यात दुमत नसावे. व्यवस्थपनाचा प्रतिसादही योग्य वाटला. ह्या निमित्ताने जी चर्चा झाली त्या अनुषंगाने असे म्हणेन की कधी कधी काही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे अशक्य असते. उदा. पॅकेज टूर मध्ये निघालेल्या काही व्यक्ती टूर सुरु झाल्या पासुन फक्त भांडतच असतात. तुम्ही अमुक कबुल केले मग तमुक का दिले असे क्षुल्लक गोष्टींवरुन वाद घालत राहतात ते टूर संपेपर्यंत... जर काही major breach of commitment असेल तर गोष्ट वेगळी, पण सतत 'निट-पिकिंग' करत राहण्या-यांना संतुष्ट करणे फार कठीण असा ही एक अँगल आहे.

In reply to by vikramaditya

सेवा व्यवसाय यशस्वीपणे करायचा म्हणजे मोठ्या संख्येने अनेक प्रकारची माणसे येणे गृहीत आहे... आणि (काही अतिरेकी उदाहरणे सोडता) त्या सर्वांना यशस्वीपणे सेवा देणे हा त्या व्यवसायाचा आवश्यक अंगभूत भाग आहे. म्हणूनच सेवा व्यवसाय दीर्घकाळ व्यवस्थितपणे करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सहमत. या धाग्याच्या निमित्ताने मलाही चार गोष्टी शिकायला मिळाल्या. उपहारगृह व्यवसायात कष्ट असतात हे जाणून होते पण यानिमित्ताने ते किती असू शकतात व ग्राहकाचे समाधान कसे करावे, असमाधानी ग्राहकाशी वर्तन कसे असावे यासारख्या गोष्टींकडे बघता आले. मिपाकर पेठकरकाकांबद्दल आदर दुणावला. मेतकूट मालकांचा प्रतिसादही आवडला.

In reply to by रेवती

आताच एका दुसर्‍या धाग्यावर लीडर आणि मॅनेजर यांच्यावर चर्चा चालू आहे... सेवा व्यवसाय उत्तम चालण्यासाठी मालक उत्तम लीडर असणे आवश्यक आहे आणि व्यवसायात काम करणारा इतर प्रत्येक माणूस त्याला नेमून दिलेल्या कामाचा उत्तम मॅनेजर असणे आवश्यक असते... मॅनेजर नावाची व्यक्ती केवळ "सेकंड लेवल रिस्क मॅनेजमेंट" असायला हवी.

सहसा मिपावर सदस्यता मिळवायला महिनाभरापेक्षा जास्त वेळ लागतो. हा धागा सुरु होण्यापूर्वीच जर 'मेतकुत'चि सदस्यता रिक्वेस्ट आलि आहे का माहित नाहि, पण तसं नसल्यास हल्लि मिपावर सदस्यता लवकर मिळु लागली आहे हे बघुन बरं वाटलं.

maraathit type karane bhayankar watat aahe. kahi marathi akshare yetach nahit. koni madat karu shakel ka?

In reply to by पूनम खरे

मराठीत लिहिण्यासाठी मदत येथे आहे . क्रोम वापरू नये त्यात टायपिंग गंडते. बादवे तुम्ही इथल्या डॉ. खरेंच्या कोणी आहात काय ? :)

In reply to by हाडक्या

आमच्या चुलत बहिणीचे नाव पण पूनम ( पौर्णिमा) आहे. पण या "त्या नव्हेत". मी आमच्या पुनमला फोन करून विचारले तेंव्हा तिने मिसळपाव चे सदस्यत्व घेतलेले नाही असे सांगितले. या पुनम ताई महेश अशोक खरे यांच्याशी संबंधित आहेत काय ( किंवा डू आय डी) हे पाहिले पाहिजे.

सर्वसाक्षी यांचा अनुभव, त्यावरील साधक-बाधक चर्चा आणि त्यानंतर मेतकुट उपहारगृहाच्या चालकांचा सकारात्मक प्रतिसाद वाचल्यावर वाटलं की मिसळपाव डॉट कॉम हे केवळ एक भावना व्यक्त होण्याचं ठिकाण न राहता या संस्थळाची अनावृत्त ग्राहक व्यासपीठ म्हणून वाटचाल सुरू झाली आहे! एक ग्राहक-मंच म्हणून विभागच सुरू करायला हरकत नाही, जिथे ग्राहक म्हणून आलेल्या भल्या बुर्‍या अनुभवांची नोंद केली जाईल, आणि व्यावसायिकांना आपली बाजू मांडायला (आणि झाल्या असल्यास चुका सुधारायला :-) ) संधी दिली जाईल.

श्री. सर्वसाक्षी यांना मेतकूट हॉटेलमध्ये आलेल्या वाईट अनुभवानंतर मिसळपाववर झालेली खमंग (काहीवेळा जळजळीतही) चर्चा वाचली. थोडी गंमत, थोडी खंत वाटली. एकूणच समाजामध्ये संयम कमी झाला आहे याचा आणि तो अजिबात संपलेला नाही याचाही पुनःप्रत्यय आला. श्री. सर्वसाक्षी यांना आलेला अनुभव आणि त्यांचा संताप एकवेळ समजू शकतो पण त्यावर इतर काहींनी दिलेल्या प्रतिक्रियामात्र खटकल्या. सर्वसाक्षी यांना दोन ऐवजी पावणेतीन वाजेपर्यंत ताटकळावे लागले. त्यामुळे त्यांचे संतापणे स्वाभाविक आहे. थाळी मागितल्यावर ती संपली आहे असे उत्तर मिळाल्यावर आलेला रागही समजू शकतो. पण ‘जेवण संपलय असे का सांगता? असे विचारल्यावर आ ला कार्टे मागवा. असे मग्रुर उत्तर मिळाले.....’ या वेळचा राग कळू शकत नाही. आ ला कार्टे म्हणजे स्वतंत्रपणे पोळी किंवा भाकरी, मेनुतील हव्या त्या भाज्या, स्वीट डिश अशी ऑर्डर केल्यास त्यांना तेथे जेवण मिळू शकले असते असे वाटते. त्याहीनंतर पदार्थ, सेवा चांगली मिळाली नसती तर त्यांचे चिडणे १००% वाजवी ठरले असते असे मला वाटते. मला जेव्हा अशा प्रकारचा अनुभव येतो तेव्हा मी तेथे उपस्थित असलेल्या सर्वात मोठ्या पदावरील व्यक्तीला ताबडतोब भेटून माझे म्हणणे त्याच्या कानावर घालतो. योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर त्याच्यावर कायमची फुल्ली मारतो. खूपच संतापलो तर माझा अनुभव इतरांनाही सांगतो. मात्र तोही अशा स्वरूपात की अबक ठिकाणी मला असा अनुभव आला तुम्ही काय करायचं ते ठरवा. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे श्री. सर्वसाक्षी यांनी जास्त जळजळीतपणे इतरांना गैरसोय, अपमान, मनस्ताप सहन करण्यासाठी मेतकूटला जा असे सांगितले. असो. हा अनुभव वाचून आलेल्या इतर अनेक प्रतिक्रियामात्र पचण्यास कठीण होत्या. ‘हॉटेल मालकाची गुर्मी जिरवा...., चार दिवसात सुतासारखे सरळ येतील..., धडा शिकवलाच पाहिजे..., लवकर अक्कल येण्यासाठी रिव्ह्यु लिहायलाच पाहिजे...’’ काळा पहाड या सद्ग्रहस्थांनीतर सनी पावसकर या नावावरून हॉटेलमालकाचे व्यक्तिमत्त्वच गुंडपणाचे ठरवले. हा तर केवळ अविचारीपणा नाही का? म्हणजे यांना माहित असलेले तथाकथित सनी नावाचे आणि वेगळ्या आडनावाचे गुंड नगरसेवक पुण्यात असल्यामुळे जगातले सर्व सनी नावाचे लोक गुंड व्यक्तिमत्त्वाचे असल्याचा शिक्का ठोकून श्री. काळा पहाड मोकळे होणार. या न्यायाने दाऊद किंवा गवळी नाव असलेले सर्व डॉन आणि पांडुरंग किंवा धर्माधिकारी नाव असलेले सर्वजण संत होतील. त्यांचे स्वतःचे टोपणनावही गुप्तहेर सदृश असल्याने त्यांनी हे शोध लावले आहेत का? श्री. मदणबाण यांनी तर मेटकूटला स्वतः अनुभव न घेता रद्दडकूट ठरवून टाकलं. वर ‘ग्राहकांना सेवा देता येत नसेल तर हॉटेल बंद करा‘ अशी तंबी देण्याचा सल्लाही दिला. बर्‍याचवेळा आपण सर्वच जण उचलली ‘जिभ लावली टाळ्याला’ अशा स्वरुपात प्रतिक्रिया देऊन टाकतो. ’’या तेंडूलकरला ना रिटायर केलं पाहिजे...’’ असं एखादा, गल्ली क्रिकेटमध्येही बॅट हातात न धरलेला सहजपणे म्हणून जातो. ‘‘पाकिस्तानवर सरळ हल्लाच का करत नाहीत हे आर्मीवाले?’’ असं एखादा, लोकलमध्ये चढताना दोन गाड्या सोडाव्या लागणारा तावातावाने म्हणतो. एवढंच कशाला ’अमक्या तमक्याने घटस्फोट घ्यायला नको होता.’ असं त्या प्रकरणाची दोन्ही बाजूंची काहीही अथवा पूर्ण माहिती नसताना एखादा मत व्यक्त करतो. आपण काय बोलतोय? कुणाबद्दल बोलतोय? आपल्याला त्या विषयी थोडीतरी वस्तुस्थिती माहित आहे का? आपण आपल्याला आलेल्या लहानशा अनुभवाचे सार्वत्रीकरणतर करत नाही आहे ना? असा कोणताच विचार आपण मत देताना, प्रतिक्रिया व्यक्त करताना करत नाही का? सोशल नेटवर्कवर तर बर्‍याच वेळा याचा अतिरेक आणि काही जणांवर नक्कीच अन्याय होतो. ‘आलिया भट खरोखरच एवढी मठ्ठ आहे का? असा प्रश्‍न कुणाला कधी पडत नाही का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवेळी असा अनुभव प्रकाशित केल्यावर संबंधित व्यक्तीला खुलासा करण्याची संधीही मिळत नाही. जी सुदैवाने यावेळी मेतकूट मालकांना मिळाली. त्यांनी केलेला खुलासा व मागितलेली माफी आवडली. मात्र त्यांनी सेवा व दर्जाबाबत जास्त जागरूक राहणे आवश्यक आहे. चांगला प्रतिसाद व प्रसिद्धी या अपेक्षा निर्माण करतात आणि वाढलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास काय होते याचा अनुभव भारतीय क्रिकेटपटूंनी अनेकवेळा घेतला आहेच. तसे त्यांचे न होवो. या सर्व चर्चेत सर्वश्री धर्मराज मुटके, प्रभाकर पेठकर, वेल्लाभट, मृत्युंजय यांच्या प्रतिक्रिया समंजस व संतुलित होत्या. श्री. किसन शिंदे यांनी तर ‘हा सूर्य हा जयद्रथ’ करून पाहिले आणि स्वतःचा सकारात्मक अनुभव लिहिला याचे कौतुक वाटले. मिसळपाव वर पुढेही स्वतंत्र अनुभव लेखनाच्या स्वरुपात व्यक्त व्हायला आवडेल. महेश अशोक खरे

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मेतकूटची आलेली पोस्टः १८/०१/२०१५ २७/०१/२०१५ रोजी श्री. महेश अशोक खरे यांचा सदस्यकाळ : 1 week 2 hours श्री. महेश अशोक खरे यांच्या आत्तापर्यंतच्या बाकीच्या पोस्टसः 0 हा आयडी फक्त मेतकूटचं समर्थन करण्यासाठी तयार केला गेलेला आहे या बद्दल काही शंका?

In reply to by काळा पहाड

श्री. काळा पहाड यांची प्रतिक्रिया वाचून वाईट वाटले. त्यांच्या मताविरुद्ध लिहिले म्हणजे मी मेतकूटचे समर्थन करण्यासाठी आय.डी. बनवला आहे हे म्हणणे अन्यायकारक आहे. वादासाठी ते खरे आहे असे गृहीत धरले तरी त्यामुळे माझे मुद्दे चुकीचे ठरत नाहीत. मिसळपाव या छान साईटवर नवीन सदस्यांनी फक्त छान छान ! वा वा ! अशा प्रतिक्रिया द्याव्यात काय? हे म्हणजे कॉलेजमध्ये/ऑफिसमध्ये ज्युनिअर्सनी सिनिअर्सच्या हो ला हो केल्यासारखे होईल. असो. हा विषय मी माझ्याकडून थांबवतो. पुढे अन्य लेखांविषयी प्रतिक्रिया देताना किंवा स्वतंत्रपणे इतर विषयावर सुचेल तेव्हा लिहेन. माझा लोकशाहीवर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे श्री. काळा पहाड यांच्या मताचा मी आदर करतो आणि माझे वेगळे मत मी मांडतो.

In reply to by महेश अशोक खरे

(अवांतर : तुमच्या मुद्द्यांबद्दल काही म्हणणे नाही हे आधीच नमूद करतो.)
मिसळपाव या छान साईटवर नवीन सदस्यांनी फक्त छान छान ! वा वा ! अशा प्रतिक्रिया द्याव्यात काय?
ह्या ह्या ह्या.. हाय कंबख्त तुमने मिपा वाच्या ही नही .. :) सदस्यत्व घेण्याआधी मिपा वाचले असेल तर (तशी काही पूर्वअट नाही हो, तरी पण) तुमच्या लक्षात येईल की इथे कोणाच्याही धोतरास हात घातला जातो. उगी जास्त पत्रास ठेवली जात नाही.. दांभिकास दांभिक त्याच्या तोंडावर म्हणतात.. उगी "चान चान" म्हणण्याची कोणाकडून ही शक्यता तशी कमीच. इथले संपादक आमचेच असतात, आणि वर्गातल्या मॉनिटर झालेल्या पोरांना बाकीची पब्लिक जसा तरास देते तसाच इथे संपादकाना पण हक्काचा तरास दिला जातो. (त्यावर ते कितीपण तक्रार करु देत मग ;) ) मिपावर "चान चान" पणाचा आरोप केलात तर खरेसाहेब, तुमचे काही "खरे" नाही.. (नावावरच्या श्लेषाचा विनोदासाठी सपक प्रयोग.. हलके घ्या, नायतर घेऊ नका, तुमची मर्जी )

In reply to by हाडक्या

मा. हाडक्याभाऊ, तुमचं म्हणणं खरं आहे काही अंशी. मी नवा नवाच मिपाकर असल्याने मिपावर प्रकाशित काही मजकूराचाच आनंद घेऊ शकलोय. पण तुमची एक मात्र गल्लत झाली आहे असे वाटते. मी मिपाच्या संपादक मंडळावर किंवा मिपावर कोणताच आरोप केलेला नाही. मला हा सर्व परिवार आवडलाय. मी केवळ श्री. काळा पहाड यांच्या प्रतिक्रियेवर प्रतीप्रतिक्रिया दिली एवढंच. असो. सध्या खर्‍याची दुनिया नाही हा आमचा अनुभव आहेच. (ह्ये केवळ गंमतीने लिवले हाये. आमी आमच्याच नावावर कोटी करू शकतो. त्यामुळे तुम्ही केलीत तरी हरकत नाही. केवळ दैवगतीने खरेकुलात जन्मलो. खैरे किंवा खुरमांडीकर असतो तरी काय करणार होतो?)

In reply to by महेश अशोक खरे

ठिक .. आम्ही पण असे नाय म्हटले की तुम्ही संपादकांवर कसले आरोप करताव म्हणून. ती आगावू माहीती होती हो. लई झाले की "बाई मला हा मारतोय बगा" म्हणित जायचे संमंकडे, त्यासाठी सांगून ठेवलं. हाकानाका. ;)

In reply to by काळा पहाड

हा आयडी फक्त मेतकूटचं समर्थन करण्यासाठी तयार केला गेलेला आहे या बद्दल काही शंका?
ही शंका कदाचित खरी असावी असे मानण्यास भरपूर जागा आहे. या सदस्यनामाने सदर धाग्यावरील प्रतिसादाव्यतिरिक्त फक्त इतर तीन धाग्यांवर प्रतिसाद दिलेला आहे आणि एका हिंदी व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्डचे मराठी अनुवाद केलेला स्वतंत्र धागा काढला आहे.
मेतकूटची आलेली पोस्टः १८/०१/२०१५ २७/०१/२०१५ रोजी श्री. महेश अशोक खरे यांचा सदस्यकाळ : 1 week 2 hours
फेब्रुवारी २०१५ नंतर या सदस्यनामाने काहीच लेखन (स्वतंत्र अथवा प्रतिसादात्मक) केलेले नाही.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आता आइडी उडालाय लेखकाचा. धागा सध्या 'डाइबेटिस रिवर्स करतात' अशी जाहिरात रोज असते टीवी चानेलवर.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

आता आइडी उडालाय लेखकाचा. धागा सध्या 'डाइबेटिस रिवर्स करतात' अशी जाहिरात रोज असते टीवी चानेलवर.

कॅन्सस सिटी येथील एका उपहारगृहाबाबत एका व्यक्तिने खालील परिक्षण लिहिले. Yelp Review त्यावर उपहारगृह मालकाने लिहिलेला प्रतिसाद... Response 1 Response 2 संदर्भः ही बातमी

In reply to by श्रीरंग_जोशी

केवळ अप्रतिम ! काही मनाविरुद्ध झालं की ठोका त्याला सोशल नेटवर्कवर या प्रवृत्तीते हे उदाहरण हसवून गेले.

In reply to by श्रीरंग_जोशी

कहर म्हणजे कहर आहे हा रिप्लाय.. मानलं बॉस त्या रेस्टॉरंटवाल्याला..

In reply to by श्रीरंग_जोशी

सोनल? मराठी किंवा गेला बाजार भारतीय आहे का काय तक्रारकर्ती? ;-)

In reply to by चिगो

नाव व फोटोवरून ही व्यक्ती भारतीय वंशाची नक्कीच असावी. मराठी असण्याबाबत ख्रात्री वाटत नाही. येल्पवर ३३ परिक्षणे लिहून त्यांनी सदस्यत्व रद्द केलेले दिसत आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

भारी प्रतिसाद ! सज्जड शालजोडीतले मारलेत !! तक्रार करणारीचा नवरा वकील आहे हे माहित असून अमेरिकेतला व्यावसायीक असे लिहीतो म्हणजे त्याचा वकील तिच्या वकिलापेक्षा भारी असणार !

In reply to by आनंदी गोपाळ

मेतकूट सध्या जोरात सुरूये. जागा कमी पडायला लागली म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांनी तिथेच बाजुला मोठ्या जागेत हॉटेल शिफ्ट केलं. अगदी सोमवार ते शुक्रवारही संध्याकाळच्या वेळी वेटींग लिस्ट्मधे माणसं बाहेर उभी असतात.

In reply to by प्यारे१

लायनीत उभे राहून फोडणीचा भात कोण खाणार? जायचा यायचा वेळ, पेट्रोल, लायनीत उभे रहायचा वैताग आणि या सगळ्याला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात सगळा स्वयंपाक घरी करून होतो.

In reply to by पैसा

अहो पण स्टॅटिस्टिक्स वेगळं सांगतंय की. ;) तुम्ही नका जाऊ. हॉटेल चा धंदा वाढतोय ना? हल्लीच्या मुलांना किंवा मुलींनाही फोडणीचा भात विकतचा खाण्याची आवड, गरज, नाइलाज किंवा खाज यातलं काही एक असावं असं मानायचं. फ़क्त हल्लीचीच पिढी की पूर्वीचीही याबाबत विदा मिळाला तर विकी वर देखील टाकू.

In reply to by प्यारे१

कोणाला कमी पडू नये म्हणून जरासा जास्तच भात असतो रोज घरात. फोडणीचा भात करून मस्त प्याकिंग करून विकू १५० २००ला न काय! बाकी ते पिढ्या बिढ्या, विदा बिदा काय ते तुम्ही बघा आपलं. २५ वर्षांपूर्वी आम्ही आजची पिढी होतो. जी आजची पिढी आज आहे ती २५ वर्षांनंतर काय करील म्हैत नै!

In reply to by प्यारे१

ओरडून विकलंत तर माती पण विकेल. गप बसलात तर सोनं पण पडून राहील. प्याकिंग आणि प्रेझेंटेशन मस्ट. आत खरपूड का असेना! नवीन नाव देऊ कॅरॅमलाईज्ड राईस. हाकानाका! झैरात मंगताय!

In reply to by पैसा

ओरडून तर खोटं पण पटतं लोकांना. ते तात्कालिक असतं. एकदा 200 रुपयांचा तुमचा तो भात नेतील ओ लोक. नंतर पायरी तरी चढ़तील काय? असो. हॉटेल व्यवस्थित सुरु आहे. बाकी मेतकूट धागा 200 पार करणार तर

In reply to by प्यारे१

या निमित्ताने एक विचार सांगावासा वाटतो. आपण मराठी मंडळी नेहमीच असा सूर लावतो की... छ्या! मसालेभाताला ९५ रुपये मोजायचे? वांग्याची भाजी १२५ रुपये? पण आपण असं म्हणून आपल्याच पदार्थांची व्हॅल्यू कमी करतो, विशेषतः अमराठी लोकांमधे. कधी पंजाबी लोक तक्रार करतात का, की व्हेज माखनवाला १५० रुपये??? त्यामुळे आपण असा सूर लावायला नको असं मला वाटतं. ठासून सांगावं.. फिर! थालीपीठ डेलिकसी है हमारा... ६० रुपये इज स्टिल डिसेंट. दुसरं म्हणजे हे जे पैसे आहेत ते "वांग्याच्या भाजीत काय आहे एवढं? १२५ रुपये मोजायला?" असं म्हणून द्यायचे नाहीयेत तर ते तुम्हाला "आयतं" मिळतं त्याचे आहेत. एसीत बसून, कुणीतरी वाढणारं असताना आपण हे पदार्थ खातो त्याचेही पैसे त्यात असतात. त्यामुळे...अशी आपणच आपल्या पदार्थांची, हॉटेलांची कुप्रसिद्धी करणं टाळावं. असं माझं मत.

In reply to by मराठी_माणूस

नाही तर काय! त्यावरून एक एक जनरलायझेशन्स आठवतायत आणि राग येतोय. असो. वेगळा धागा काढायला हवा.

In reply to by वेल्लाभट

मसालेभात अन वांग्याच्या भाजीला व्हॅल्यु नाही कोण म्हणतो? खूप मेहनत आहे. माझा आक्षेप आहे तो फोडणीचा भात ग्लोरिफाय करून विकायला. मसालेभात पुलाव आणि फ्राईड राईसच्या बरोबरीने विकला गेलाच पाहिजे. खरे तर फ्राईड राईसमधे ते अजि नो मोटो वगैरे काहीही घालतात पुलावात तूप ओततात काही ठिकाणी, त्यापेक्षा मसालेभात हजार पटीने चांगला आणि हेल्दी म्हटला पाहिजे. थालिपिठासारखा पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ नाही. मराठी जेवण हे सगळ्या प्रकारात समतोल आणि हेल्दी असतं. त्यातले खास पदार्थ आहेत त्याचे मार्केटिंग करावेच. पण आपले लोक दळभद्री जिलेटिन घालून खरवस विकतात आणि आपलंच नाक कापून घेतात. त्या शिळ्या फोडणीच्या भातासाठी पैसे मोजायला तयार असलेल्या लोकांना तर साष्टांग दंडवत!

In reply to by पैसा

शिळा फोडणीचा भात हॉटेल/रेस्तरों मध्ये मिळत असला तर फोडणीची भाकरी(तुकडे) आणि पोळीचा मलीदा मिळालाच पाहिजे. अन्यथा आम्ही मोर्चा काढू. -सदस्यकाहीकारणनस्तानामोर्चाकाढूयेताजातानिषेधकरुचेजनकजेपीयांचीसंघटना

In reply to by वेल्लाभट

या! मसालेभाताला ९५ रुपये मोजायचे? वांग्याची भाजी १२५ रुपये? पण आपण असं म्हणून आपल्याच पदार्थांची व्हॅल्यू कमी करतो, विशेषतः अमराठी लोकांमधे. कधी पंजाबी लोक तक्रार करतात का, की व्हेज माखनवाला १५० रुपये???
दिल्ली (फेब्रुवारी २००२) बाथरुम फिटिंग्ज व्यावसायिकासोबत बिझिनेस लंच घेत असताना त्यांनी मला सांगितले की आता आपण व्यवसायाच्या जागी आहोत आणि वेळ कमी आहे अन्यथा यापेक्षा चविष्ट जेवण मी तुम्हाला घरी खाऊ घातले असते. आम्ही वेळ वाचविण्याकरिताच फक्त आणि तेही नाईलाजास्तव हॉटेलात जेवतो. अन्यथा स्वाद आणि असली घीचा चांगला माल घरी बनत असताना या सुमार जेवणाकरिता इतके पैसे खर्चणे जीवावर येते.