✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नथ...........भाग-६

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Mon, 10/13/2014 - 14:10  ·  लेख
लेख
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ.........भाग-३ नथ........भाग-४ नथ........भाग-५ नथ..........भाग-६ आर्य कँपबेल आजोबांचा आज अकरावा पार पाडला. आख्खे गाव जमा झाले होते. त्यांच्या समाधीचे कामही पूर्ण होत आले होते. आजोबांना बिचाऱ्यांना ते कागद वाचायला नाहीच मिळाले शेवटी. कशी त्यांच्या अत्म्याला शांती लाभणार कोणास ठाऊक ! असे आजी म्हणते. पुढच्या आठवड्यात इस्माईल व वलिखान येणार आहेत. त्यांना आणायला मुंबईला जावे लागेल. त्या अगोदर आईजानच्या घराण्याचा पत्ता लागला तर बरे होईल. त्या कार्लेकरांनाही भेटायचे आहे. ते इथे येणार होते असे आजी म्हणत होती. आज त्यांनी पाठविलेले कागद वाचायचेच असे मी आणि मानसीने ठरविलेच आहे. अगदी जवळचे भानू येणार आहेत. म्हणजे मानसीच वाचणार आहे...या कार्यक्रमाला श्री कार्लेकर आले तर किती बरे होईल ? पण असे ऐनवेळी सांगून ते कसे येणार? मानसी म्हणाली फोन तरी कर त्यांना.... मी फोन लावला. शेजारीच मानसी व आजी उभ्या होत्या. बराच वेळ फोन वाजत होता पण कोणी उचलला नाही. तेवढ्यात कोणीतरी उचलला. बहुदा त्यांनीच. मी फोन आईच्या हातात दिला. ‘‘नमस्कार ! मी इंदिरा बोलतीये !’’ आजी म्हणाली ‘कोण’? पलिकडून आवाज आला. ‘अग आजी जरा ओळख सांग ना त्यांना ! मानसी म्हणाली. ‘‘मी इंदिरा भानू. वेळासहून बोलते आहे !’’ ‘‘हं आल्ं लक्षात ! बोला काकू....’’ आजीला काय बोलावे सुचेना त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झाले. मी पटकन फोन घेऊन मानसीच्या हातात दिला. ‘‘काका, मी मानसी त्यांची नात. आजोबा गेले. दहा दिवस झाले.’’ पलिकडे पसरलेल्या शांततेने धक्का किती मोठा होता हे सहज समजत होते. ‘हॅलो...हॅलो...’’ ‘‘मानसी मी थोड्यावेळाने फोन करतो’’. मी समजलो....त्यांना त्या धक्क्यातून सावरायला थोडा वेळ पाहिजे होता. बरोबर पाचएक मिनिटात परत फोन खणखणला. ‘‘मी निनाद बोलतोय ! काय झाले असे अचानक ? त्यांना तर काहीच त्रास नव्हता. मागच्याच आठवड्यात आम्ही पुण्यात भेटलो होतो’’ ‘‘हार्ट ॲटॅक !’’ ‘‘हंऽऽऽऽऽऽऽऽ मी येणार होतो वेळासला. वरच्या गल्लीतील भानू आमचे नातेवाईकच आहेत....बरे ते एक बाड मी त्यांना दिले होते..... ‘‘मग या ना ! त्याबद्दलच मला तुमच्याशी बोलायचे आहे. आता ते वाचायची जबाबदारी भानूंकडे माझ्यावर येऊन पडली आहे. पुढच्या आठवड्यात इस्माईल व वलिखानही येणार. त्यांना ते इंग्रजीमधे समजाऊन सांगावे लागेल. ते मी करेन. पण त्यांना आईजान कोठे रहात होती, तिचे लहानपण कुठे गेले याच्यात जास्त रस आहे. ते कसे समजणार ते मला उमगत नाही.’’ ‘‘त्या हस्तलिखितात बरीच माहिती आहेच. मी उद्या पंढरपूरला त्याच कामासाठी चाललो आहे. तेथे एखाद्या ओळखीच्या ब्राह्मणाकडे भानूंच्या वंशावळी मिळतीलच. त्या नकलून आणतो मग बघू काही समजते आहे का ? प्रयत्न करणे आपल्या हातात. नाही का ?’’ तुमच्याकडे ज्या असतील त्याही शोधून ठेवा. मी गुरुवारी येतो. जरा आमच्या घरीही निरोप द्या.’’ ‘‘काका मी निरोप देते पण तुम्ही आमच्याकडेच रहायचे आहे हे लक्षात ठेवा.’’ ‘बरं बरं बघुया...ते काही एवढे महत्वाचे नाही’’ कार्लेकर म्हणाले. गुरुवारी संध्याकाळी निनादकाका, आम्ही सगळे, गावातील आमची चुलत मंडळी, खोत, देसाई असे सगळे जमलो. सगळी आजोबांची मित्रमंडळी असल्यामुळे थोडी रडारड झाली पण सगळे लवकरच सावरले. वातावरण गंभीर होते. ते कशासाठी जमले आहेत याचे त्यांना भान आल्यावरकाकांनी ते बाड उघडले....मी शेजारीच बसलो होतो. ‘आज माधवराव हवे होते ! परमेश्वराची इच्छा ! दुसरे काय !’’ पहिल्याच पानावर पाण्याच्या थेंबाने अक्षरे जरा फिसकटली होती. लिहितांना त्यांच्या डोळ्यातून दोन थेंब अश्रू ठिबकले असतील का ? माझ्या मनात विचार आला...... ‘‘यातील सगळ्या तारखा मी इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे बदलून घेतल्या आहेत म्हणजे सगळ्यांना समजण्यास सोपे जाईल. विशेषत: आपल्या अफगाणी पाहुण्यांना. शिवाय ती जूनी मराठी समजायला क्लिष्ट म्हणून आत्ताच्या मराठीत ते सगळे लिहून काढले आहे.’’ सिताबाई सदाशिव भानू........ मी हे का लिहिते आहे ? कल्पना नाही.... हे कोणी वाचणार आहे का...? माहीत नाही..बहुदा नाहीच.. येथे येऊन आता जवळ जवळ पाच वर्षे झाली. काही गोष्टी विसरायलाही झाल्या आहेत...पण माझ्या मुलाला, चिंतामणीला, ज्याला मी वेळासला सोडून आले त्याला मी कसे विसरु ..... यांचे काय.... त्याच्यासाठी तरी मला हे माझ्या आयुष्याचे पानिपत लिहायलाच पाहिजे. मी सुखी आहे का ? हा प्रश्न मी स्वत:लाच अनेक वेळा विचारते खरी...सूख म्हणजे काय.......पण त्या प्रश्नाचे उत्तर मलाच माहीत नाही. मला स्पष्ट आठवते आहे ते नानांच्या आईला त्यांनी ते फरफटवत नेले ते....त्या दिवशी आमचा मुक्काम भाऊंच्या शामियानापाशी होता. त्या सपाटीवर गवताचे एकही पाते उगवले नव्हते. होते ते फक्त एक भले मोठे, आंब्याचे झाड. त्या खाली भाऊंचा व इतरांचे शामियाने होते... मला आठवते....... वेळासला इथे येण्याआधी सहासात महिने धामधूम चालली होती. महादजी भानूंच्या वाड्यावर शिकलगारांची रांग लागली होती. गावातील प्रत्येकजण तलवारींना व बिचव्यांना धार लावून घेण्यात मग्न होता. नदीकाठी लाठ्याकाठ्यांनी वारांचा सराव मोठ्या जोरात चालला होता. गावातील बायका हंड्यातून कुजण्यासाठी तूप साठवीत होत्या त्यात टाकण्यासाठी संत्र्याच्या साली खास नागपूरहून मागविण्यात आल्या होत्या...काहीतरी मोठी भानगड होती....बरेच अनोळखी शब्द कानावर पडत होते...गिलचे, अब्दाल्ली, नजिबखान...बादशाहाचे कोणी म्हणे डोळे काढले.... रोज नवीन बातमी यऊन धडकायची आणि मग त्यावर गावभर वावड्या उठत. एक दिवस सकाळीच दरवाजावर स्वत: महादजी भानू उभे आले व त्यांनी यांना हाक मारली.. ‘सदाशिवा ऽऽऽ तुला यायचे आहे का दिल्ली बघायला ? तुला तलवार तर काही चालवता येत नाही. भाऊसाहेबांची मंडळी व इतर बऱ्याच तालेवार सरदारांची मंडळीही येणार आहेत. गोपीकाबाई स्वत: येणार आहेत...पूजेअर्चेत वेळ जायला नको म्हणून त्यासाठी एखादा भट बरोबर घ्यावा असे खुद्द रावसाहेबांनी सांगितले आहे. येणार असशील तर तुझेच नाव सुचवितो. पाहिजे तर सितेसही बरोबर घेऊन चल नानाच्या आईबरोबर राहील व तिची सेवा करेल...संध्याकाळपर्यंत मला सांग.’’ आख्ख्या वेळासमधे आम्ही सगळ्यात दळीद्री.. इकडेही त्याचा वीट आला होता. इकडून जायचे ठरले व त्यांच्याबरोबर मीही. चिंतामणीचे काय करायचे हा प्रश्न होता. खालच्या गल्लीतील अण्णांकडे त्याला ठेवण्याचे ठरविले. एक दोन महिन्याचा तर प्रश्न होता. ‘‘नाहीतर दिवसभर गावात उंडारत तर असतो. त्याला कुठे आईबापाची आठवण येते ? हे म्हणाले. ‘‘चल सिते जाऊया ! अशी संधी परत येणार नाही.’’ जवळ जवळ सहा महिन्यानी आम्ही पानिपतला तळ दिला....वाटेत मराठ्यांचा रुबाब व त्यांना मिळणारा आदर पाहून इकडची छाती फुलून येत होती...रोज नवीन जागा व भरपूर दक्षिणा... पुण्यावरून स्वार्‍या उदगीरला पोहोचल्या. तेथून पटदूर व थेथून सिंदखेड. तेथे कुठल्यातरी समाधीचे दर्शन घेण्यासाठी समस्त सरदार मंडळी गेली. तेथून बर्‍हाणपूरला. तेथे मात्र आम्ही बरेच दिवस होतो. येथे सर्व फौजा जमा झाल्या. तेथून हांडीया, सेहोर, सेरोंज, नरवर व तेथून ग्वाल्हेरला आमचा मुक्काम पडला. धोलपूर येथे चंबळ पार करताना अनेक जण वाहून गेले. एकंदरीत चंबळ पार करताना आमचे खूप हालच झाले. मुचकुंदला देवदर्शनाला जाण्यासाठी बाईसाहेब व आम्ही इतर बर्‍याच बायका गेलो होतो. दिल्लीला पोहोचल्यावर माझे तर डोळेच दिपून गेले......शेवटी आम्ही पानीपतजवळ तळ ठोकला. लढाई झाली तर येथून वीस/तीस किंवा चाळीस कोसावर होणार असा अंदाज असल्यामुळे आम्ही निवांत होतो. संक्रांतीच्या आदल्यादिवशी दुपारीच कापाकापी सुरु झाल्यावर सगळीकडे गोंधळ माजला. नानांच्या आईने जमेल तेवढे दागिने अंगावर घातले व उरलेले माझ्या अंगावर फेकले ‘सिते हे घाल पटकन रस्त्यात उपयोगी पडतील’’ पडत्या फळाची आज्ञा म्हणून मी जमतील तेवढे अंगावर घातले. तेवढ्यानेही मी वाकले. अचानक गर्दी उडाली. सगळीकडे रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या..पुढचे आठवते ते त्या विकट हसणार्‍या सैनिकांची धडावेगळी होणारी मस्तके...रक्ताच्या उडणाऱ्या चिळकांड्या व त्याचा माझ्यावर होणारा अभिषेक. ते रक्त पाहूनच मी बेशूद्ध पडले. डोळे उघडले तेव्हा मी एका तंबूत होते व माझ्या शेजारी माझा होणारा नवरा मोठ्या चिंतित चेहऱ्याने माझ्याकडे एकटक पहात होता. आम्ही इतके पाहिले होते, भोगले होते की मी कशाचाही धक्का बसण्यापलिकडे गेले होते. मी शांतपणे डोळे उघडून त्याच्याकडे बघत बसले. माझा चेहरा रिकामा होता.... थोडे अन्न पोटात गेल्यावर मला होश आले. ‘हे बघ ! मला तुझे नाव माहीत नाही. पण मी तुला काबूलला घेऊन जाणार आहे. मी अहमदशहाबाबाची परवानगी काढली आहे व तुझ्याशी निकाहपण लावणार आहे.’’ त्याच्या बरोबर असलेल्या एका बाईने मला मोडक्यातोडक्या मराठीत तो काय म्हणतोय ते सांगितले. ते ऐकून मी काहीच बोलले नाही. बोलण्यासारखे काही नव्हतेच. ‘‘तुझा मर्द लढाईत खुदाला प्यारा झाला आहे. जे झाले ते झाले. अहमदशहाबाबाने मराठ्यांशी तहाची बोलणी लावली आहेत. त्यांचा वकील येथे येतोपर्यंत आपण इथून हललेले असू. मला आता तुझी परवानगी पाहिजे आहे. तू नाही म्हटलेस तर मी तुला सोडून देतो पण तू तुझ्या देशात जिवंत परत जाशील असे मला वाटत नाही. माझा तुझ्यावर जीव जडला आहे बीबी !’’ माझ्या डोक्यात घणाचे घाव घातल्याचा मला भास झाला. हे या जगात नसतील तर वेळासला परत जाणे मला अर्थहीन वाटू लागले. पण मग चिंत्या ? पण मला घरी गेल्यावर कसे वागवतील ते ? मला चितेत ढकलतील का ते ? मला अचानक मृत्युची भीती वाटू लागली. त्या चितेच्या ज्वाळा माझ्या डोळ्यासमोर फेर धरुन नाचू लागल्या. माझ्या मेंदूत विचारांचे वादळ उठले. त्याने त्या ज्वाळा अधिकच भडकल्या. आठवणींची व भवितव्याच्या काळजीची चक्रीवादळे माझ्या डोक्यात भिरभिरु लागली. खरे तर सती जाण्याच्या कल्पनेने मी भानावर आले. माझ्या तोंडातून शब्द फुटेना. तुर्तास मी गप्प बसायचे ठरविले. माझ्याबद्दल आख्ख्या फौजेत बातमी पसरल्यावर मला बघण्यास गर्दी होवू लागली. त्यात स्वयंपाक करण्याऱ्या बायकाही होत्या. त्यांच्याकडून मी बरीच माहीती काढली व शेवटी आता परत जाण्यात अर्थ नाही असे ठरविले. ‘माझ्यासारख्या अजून किती जणी आहेत येथे ?’’ मी विचारले. ‘‘खूप बायका आहेत’’. मला ते ऐकून बरे वाटले. या प्रवासात मला कोणाची तरी सोबत होती तर !’’ पण तेही सूख माझ्या नशीबात नव्हते. त्या बायकांची नावे कळण्याआधीच आमच्या तळावर बिआस नदीच्या काठी हल्ला झाला. मोठीच दंगल उडाली. मी सरळ खुदादादखानासच विचारले की काय झाले ? ‘‘काही विशेष नाही बीबी. जस्सासिंगचा हल्ला झाला होता’’. नाव तर हिंदूस्थानी वाटत होते. ‘‘कोण जस्सासिंग ?’’ मी विचारले. ‘‘शिखांचा सरदार ! ’’ "मग काय झाले ? ’’काय होणार दोनएक हजार बायकांना घेऊन पळाला तो !’’ "म्हणजे त्यांची सुटका केली असेच ना ?’’ ’’हंऽऽऽ मला हे स्त्रियांवरचे अत्याचार बिलकूल आवडत नाही.’’ ते ऐकून त्याही परिस्थितीत मला हसू आले. ‘‘बीबी हसू नकोस. मी तुला आत्ताही सोडू शकतो. तू नुसते म्हण....’’ मी त्यावेळी तसे म्हटले नाही ते बरेच झाले कारण नंतर कळाले की त्या दोन हजार स्त्रियांपैकी दोन तीनच देशी पोहोचल्या. दरमजल करत आम्ही कंधहारमार्गे काबूलला पोहोचलो. कंधहारला आम्ही चांगला दोन महिने मुक्काम ठोकला. या प्रवासात मला खुदादादच्या स्वभावाची चांगलीच ओळख झाली. खोटे कशाला बोलू मी जी काही परिस्थिती आमच्यावर ओढविली होती त्यात मी सगळ्यात नशिबवानच म्हणायला हवी. कंदहारला माझी ओळख वलिखान व त्याच्या बेगमेशी करुन देण्यात आली. आम्ही त्यांच्याच हवेलीत उतरलो होतो. या बाईचे नाव होते खैरुनबेगम. बायकांच्या खोलीत मी या बाईच्या खांद्यावर डोके ठेऊन ढसाढसा रडले. त्यांनीही मला आपले मानले व हिताच्या चार गोष्टी सांगितल्या. का कोणास ठावूक या बाईंनी मला जवळ जवळ मुलगीच मानले व पुढेही मला आधार दिला. इथे अफगाणिस्थानमधे माझ्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची ताकद नाही व का ? हे समजावून सांगितले. बेटी, मी व वलिखान तुझा निकाह खुदादादशी लावून देणार आहोत. मला विचारायचा प्रश्नच नव्हता. अर्थात वेळासलाही मला कोणी विचारलेले आठवत नाही........ क्रमशः जयंत कुलकर्णी. या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

Book traversal links for नथ...........भाग-६

  • ‹ नथ...............भाग-५
  • Up
  • नथ..........भाग-७ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18849 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

अफाट. उत्सुकता खूपच ताणली

मधुरा देशपांडे
Mon, 10/13/2014 - 14:24 नवीन
अफाट. उत्सुकता खूपच ताणली गेली आहे. लवकर टाका पुढचा भाग काका.
  • Log in or register to post comments

हा तर हाॅलिवूड फिल्मचा ऐवज

बोका-ए-आझम
Mon, 10/13/2014 - 14:34 नवीन
हा तर हाॅलिवूड फिल्मचा ऐवज बनून राहिला ना बाप्पा!
  • Log in or register to post comments

वाह!! पुभाप्र

सूड
Mon, 10/13/2014 - 14:36 नवीन
वाह!! पुभाप्र
  • Log in or register to post comments

पुढच्या भागाची वाट पाहणे आले.

मदनबाण
Mon, 10/13/2014 - 14:48 नवीन
पुढच्या भागाची वाट पाहणे आले... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण
  • Log in or register to post comments

मस्त

सविता००१
Mon, 10/13/2014 - 14:51 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

लय भारी

टवाळ कार्टा
Mon, 10/13/2014 - 14:52 नवीन
लय भारी :) \m/
  • Log in or register to post comments

आता राहावत नाहीये. एकदमच टाका

सौंदाळा
Mon, 10/13/2014 - 14:54 नवीन
आता राहावत नाहीये. एकदमच टाका सगळे भाग. वाट बघतोय
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

साती
Mon, 10/13/2014 - 15:08 नवीन
दररोज नथीचा पुढचा भाग आला का ही उत्कंठा असते.
  • Log in or register to post comments

आर्य अँगस कँपबेलचा आर्य माधव

मृत्युन्जय
Mon, 10/13/2014 - 15:37 नवीन
आर्य अँगस कँपबेलचा आर्य माधव भानू कसा झाला म्हणे? की मी काही संगती चुकतो आहे? बाकी हाही भाग नाट्यपुर्ण आणि उत्सुकता वाढवणारा. पुभाप्र
  • Log in or register to post comments

धन्यवाद....

जयंत कुलकर्णी
Mon, 10/13/2014 - 16:25 नवीन
धन्यवाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जबरदस्त!

पैसा
Mon, 10/13/2014 - 15:56 नवीन
किती सुरेख लिहिताय!
  • Log in or register to post comments

नविन भाग आला की अधाश्यासारखा

शिद
Mon, 10/13/2014 - 16:21 नवीन
नविन भाग आला की अधाश्यासारखा वाचून मोकळा होतो. जबरदस्त खिळवून ठेवणारं लिखाण. क्रमशःचं लवकर काहीतरी करा राव. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

आधी मी ठरवलं होतं की सगळे भाग

पिलीयन रायडर
Mon, 10/13/2014 - 16:24 नवीन
आधी मी ठरवलं होतं की सगळे भाग येऊन "समाप्त" दिसलं की मगच वाचायची ही कथा... पण गेले २-३ दिवस वेड्यासारखी मोबाईल वर मिपा चेक करतेय.. बॅटरी संपली तर हॉटेलात चार्जिंगला लावुन "नथ - भाग ६" वाचतेय.. छे.. उगाच वाचलं मी... थांबायला हवं होतं... आणि काका तर निवांत एक एक भाग टाकताएत.. इकडे पब्लिक खुळ्यासारखी वाट बघत बसलीये..!!
  • Log in or register to post comments

+१

राजाभाउ
Mon, 10/13/2014 - 19:03 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

वाचतेय.

इनिगोय
Mon, 10/13/2014 - 16:26 नवीन
वाचतेय. ते हंड्यात तूप, आणि संत्र्याच्या साली कशासाठी वापरत असत?
  • Log in or register to post comments

तूप कुज्वायचे

अत्रन्गि पाउस
Mon, 10/13/2014 - 17:22 नवीन
कुजलेले तूप हे अत्यंत प्रभावी अन्तीसेप्तिक असते (असे वाचले आहे)... लढाईत होणार्या घावांवर अत्यंत उपयुक्त.. त्याकाळी प्रत्येक किल्ला गढी वाड्यावर असे साठे करून ठेवत असत ...किंबहुना कुजलेल्या तुपाच्या 'विहिरी' असत असे उल्लेख वाचलेले आहेत.... संत्र्याची साल कशाला वापरायचे म्हाईत नै ...पण जखमेवर कुजलेले तूप लावल्यास मूळ जखमेपेक्षा कित्येकपट दाह होत असे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

तूप कुजवायची पद्धत काय होती

सूड
Mon, 10/13/2014 - 17:46 नवीन
तूप कुजवायची पद्धत काय होती म्हणे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

कुजवलेले असे नाही ते

पैसा
Mon, 10/13/2014 - 22:16 नवीन
खूप जुन्या तुपाला अगदे विचित्र वास येतो बघ, तसे असावे. आपोआपच शिळे होऊन वास येणारे जुने तूप आयुर्वेदात जखमांसाठी वापरतात बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ओक्के!!

सूड
Tue, 10/14/2014 - 17:19 नवीन
ओक्के!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

संत्र्याच्या सालाला लगेच

जयंत कुलकर्णी
Tue, 10/14/2014 - 20:08 नवीन
संत्र्याच्या सालाला लगेच बुरशी येते. ही बुरशी मग तुपावर चढते. मग तुपाचा पूर्ण थर काढून एखाद्या बरणीत ठेवत व जखमा चिघळू नयेत म्हणून ते तूप त्यावर लावीत. एक थर काढून झाला की उरलेल्या तुपात ती बुरशी परत परत वाढते. कदाचित त्या तुपाला ते कुजलेले तूप म्हणत असावेत. Antibiotic....दुसरे काय असणार ? हे अर्थातच वाचलेले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हे पटतंय

पैसा
Tue, 10/14/2014 - 20:25 नवीन
कारण तूप कुजेल अशी शक्यता वाटत नाही. ते त्या बुरशीला प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करत असावे. बुरशी बद्दल बोलायचं तर, पेनिसिलिन पण मुळात बुरशीपासून मिळवलेले होते ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

थोडक्यात मलम...with

जयंत कुलकर्णी
Tue, 10/14/2014 - 20:37 नवीन
थोडक्यात मलम...with antibiotic...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

या प्रक्रियेला रॅन्सिडिफिकेशन

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/15/2014 - 01:30 नवीन
या प्रक्रियेला रॅन्सिडिफिकेशन (Rancidification) म्हणतात... Rancidification is the hydrolysis and/or autoxidation of fats into short-chain aldehydes and ketones which are objectionable in taste and odor. रॅन्सिड तुपाला कुजकट वास येतो त्यामुळे त्याला कुजलेले तूप म्हणत असत. असे तूप पूर्वीच्या काळी जखमांवर लावत असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

फारच वळणावळणाची कथा पण एकदम

प्यारे१
Mon, 10/13/2014 - 16:30 नवीन
फारच वळणावळणाची कथा पण एकदम भारी आहे. वेगवेगळ्या पात्रांच्या तोंडून कथन ऐकणं जरा अवघड जातंय. पुन्हा सुशेगात सलगपणं वाचणार आहे कथा संपली की.
  • Log in or register to post comments

भयानक वळण घेतले आहे कथेने.

एस
Mon, 10/13/2014 - 16:37 नवीन
भयानक वळण घेतले आहे कथेने. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

पुढच्या भागाची वाट बघतेय.लवकर

अजया
Mon, 10/13/2014 - 17:25 नवीन
पुढच्या भागाची वाट बघतेय.लवकर लवकर येऊ द्या.
  • Log in or register to post comments

वाचतीये, ग्रेट आहे.

रेवती
Mon, 10/13/2014 - 17:39 नवीन
वाचतीये, ग्रेट आहे.
  • Log in or register to post comments

वाचतेय...

इशा१२३
Mon, 10/13/2014 - 20:45 नवीन
सध्या या कथेने वेड लावलय.पुढचा भाग आला का हेच सारखे चेक करतीये.प्रचंड उत्सुकता लावलीये कथेन.लवकर टाका पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद ! सगळ्यांना

जयंत कुलकर्णी
Mon, 10/13/2014 - 20:57 नवीन
सर्वांना धन्यवाद ! सगळ्यांना पुढे काय याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो या कथेचा फक्त शेवट आणि त्याची वाट मला माहिती आहे...म्हणजे तो मी ठरवलाय. बाकी सगळे मी सुचेल तसे रोज लिहितोय आणि चार्/पाच पाने झाली की अपलोड करतोय.....:-) परत एकदा धन्यवाद !
  • Log in or register to post comments

असं लिहायला जमलं पाहिजे राव!

आदूबाळ
Tue, 10/14/2014 - 17:45 नवीन
असं लिहायला जमलं पाहिजे राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

जवाब नही!!!

पिवळा डांबिस
Mon, 10/13/2014 - 21:28 नवीन
अतिसुंदर आणि उत्कंठावर्धक!!! जियो!!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

श्रीरंग_जोशी
Mon, 10/13/2014 - 22:21 नवीन
पुढील भागांची उत्कंठा लागून राहिलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

....Shriman J. Kulkarni......!!!

विनोद१८
Mon, 10/13/2014 - 22:54 नवीन
Eka Kalpnik Kathela Ekaa Unchivar neun ti Vastvik Itihasaat Ghadleli aahe ase tiche Vachan kartanaa vatate. To khara Itihas naahi yacha Visar padato. Ya Kathamalikeche Mipala Khul lavalyabaddal Dhanyavad ani Tumchya Jabardast Pratibhela va Shaileela Daad dyavi thevadhi thodich.......!!
  • Log in or register to post comments

मस्त...

मुक्त विहारि
Mon, 10/13/2014 - 23:57 नवीन
उत्तम.... झक्कास...
  • Log in or register to post comments

वाचते आहे.

स्पंदना
Tue, 10/14/2014 - 05:50 नवीन
वाचते आहे.
  • Log in or register to post comments

अजुन नाही आला पुढचा भाग......

पिलीयन रायडर
Tue, 10/14/2014 - 11:36 नवीन
अजुन नाही आला पुढचा भाग...... वाट बघतेय काका...
  • Log in or register to post comments

उत्कंठा प्रचंड ताणली गेली आहे

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 10/14/2014 - 12:40 नवीन
उत्कंठा प्रचंड ताणली गेली आहे. पुढचा भाग लवकर येउद्या पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

दर भागागणिक उत्कंठा वाढतेय.

उमा @ मिपा
Tue, 10/14/2014 - 13:11 नवीन
दर भागागणिक उत्कंठा वाढतेय. सगळे भाग पूर्ण झाले की परत पहिल्यापासून वाचणार.
  • Log in or register to post comments

सगळे भाग पटापट वाचून काढले.

मोहनराव
Tue, 10/14/2014 - 16:23 नवीन
सगळे भाग पटापट वाचून काढले. अप्रतिम लेखन. तुमच्या लेखनशैलीला सलाम!!
  • Log in or register to post comments

उगवलात का

कपिलमुनी
Tue, 10/14/2014 - 18:32 नवीन
वलक्कम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

पुढचा भागासाठी सकाळी सकाली

पेरु
Wed, 10/15/2014 - 07:29 नवीन
पुढचा भागासाठी सकाळी सकाली पळत पळत आले पण निराशा झाली. पटकन टाका ना पुढचा भाग :(
  • Log in or register to post comments

खालच्या आळीतील यमी जे वृदावण

वगिश
Wed, 10/15/2014 - 14:05 नवीन
खालच्या आळीतील यमी जे वृदावण स्वच्छ ठेवते ते सिताबाई सदाशिव भानू यांच्या आठवणीत बांधले असावे.
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Wed, 10/15/2014 - 19:53 नवीन
सर्वांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा