Skip to main content

टी एन शेषन , केजरीवाल अन भारत ....

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 08/12/2013 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
आजच चार विधानसभांचे निवडणूक परिणाम प्राप्त झालेले आहेत. व त्यात भाजप ची सरकारे चारही राज्यात येणार हे दिसते आहे. भाजपाला असलेला पाठिंबा वाढला आहे का ? याचे उत्तर हे निकाल देउ शकणार नाहीत त्यासाठी मतदानाची आकडेवारी अभ्यासावी लागेल. आम आदमी चा दिल्लीतील उदय हा एक ऐतिहासिक क्षण आहे. पूर्वी एक नोकरशहा ने असा इतिहास घडवलेला आहे. त्यांचे नाव श्री टी एन शेषन . पण शेषन साहेब काही निवडून येउ शकलेले नाहीत. केजरीवाल ना जे यश मिळालेले आहे त्याची दिलखुलास दाद देताना अण्णा हजारे यांची जीभ लटपटते आहे तर केजरीवाल यांची फजिती होणार आहे असे काही लिखित माध्यमाचे संपादक म्हणू लागले आहेत. केजरीवाल यानी एका अर्थाने असा इतिहास घडविला आहे ज्याची तुलना थोरले बाजीराव यांच्याशीच करावी लागेल. कारण लढाईत घुसून पलिकडच्या राजालाच अंबारीवरून खाली खेचण्याचे बाळासाहेब ठाकरे याना जमले नाही , ना उद्धवला ना राजला ! आता सुद्धा भाजपचे चौहान हे दोन ठिकाणी उभे होते. तसे केजरीवाल नी केले नसावे असे वाटते. बाकी एका वेळी दोन दोन मतदारसंघातून उभे राहण्याची चाल अनेक मान्यवर राजकारण्यानी खेळली होती असे इतिहास सांगतो. आम आदमी पक्षाचा विजय व १९८३ चा भारतीय संघाचा विजय यात एक साम्य आहे ."We could win the game because we had nothing to lose " असे वर्णन त्याच संघातील एका खेळाडूने केलेले होते. लालूप्रसाद ( तुरुंग फेम ) यानी व कपिल सिब्बल ( आज ते कोठे आहेत?) यानी हेळाळणीच्या स्वरांत निवडून या व कायदे बदला असे केजरीवालना बजावले होते. भारतीय जनतेची हेटाळणी करण्याची संवय जी उद्दाम राजकारण्याना त्यानी पोसलेल्या तथाकथित विश्लेषकाना झालेली आहे त्यांची थोडी तरी झोप केजरीवालनी उडविली आहे. पण खरे सांगायचे म्हटले तर अण्णा हजारे व फाळणीनंतर त्यांच्याकडे आलेल्या सैनिकाना हा धडा केजरीवालनी दिला आहे. मी इथे बर्‍याच वेळा भाजपा व कोंग्रेस ची एक कार्यकर्ता कल्चर आहे. त्यांचा लोकांशी थेट संबंध नाही याचा उल्लेख वारंवार केलेला होता. आज कुणी नाही तरी राहुल गांधीनी हा आपल्या राजकरणातील दोष ऑळखला आहे. सामान्य लोकांशी पाच वर्षे संपर्क ठेवला तर भेळभत्ता , पैसे, पदे मागणारा कार्यकर्ता नावाची पंगत मांडावीच लागणार नाही हा तो विचार आहे. राजकारणी लोकांचा हा सवता सुभा जमीनदोस्त केल्याखेरीज लोकांच्या आकांक्षापर्यंत पोचता येणार् नाही हे त्याना कळू लागले आहे तर. आज रॉबर्ट वद्रा यांच्या जमीनव्यवहाराचे खेळ उजेडात आणणार्‍या नोकरशहा वर आरोपपत्र तेथील सरकारने ठेवले आहे म्हणे! अरूण भाटियांची रवानगी कोणत्या एका नगण्य विभागात करण्यात आली होती हे सर्वाना आठवत असेलच. बेकायदेशीर बांधकामे नियमित करावीत म्हणून नगरसेवक , आमदार उपोषणाला बसणार म्हणजे कहर आहे. अशा माहोलात काम करणे केजरीवाल व त्यांचे साथीदार याना कठीण जाणार आहे. पण या जगात इमानदारी इतकी ताकद कशातच नसते ती त्यानी ठेवली तर आशेचा नवा किरण ते जनतेला दाखवू शकतील. आता तरी अण्णा हजारे यातून धडा घेउन आम आदमी पार्टीला निदान नैतिक आधार देण्याचे धैर्य दाखवतील का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7097
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

दिल्लीत केजरीवाल यांचा जनसंपर्क चांगला आहे याची माहिती होती. त्यांनी लोकांशी विचारविनिमय करत पक्षाची उभारणी करायचा प्रयत्न केला हेही माहिती आहे - (केजरीवाल यांच्याकडून नियमित इ-मेल येत असतात - मी 'जंतर-मंतर' कार्यक्रमात सामील झाले होते तेंव्हा मीच पत्ता दिला होता.) पण सध्या दिल्लीच्या बाहेर असल्याने केजरीवाल यांनी उभे केलेले उमेदवार कोण होते आणि त्यातले निवडून नेमके कोण आले आहेत याची माहिती नाही; ते जरा नीट पाहावं लागेल. दिल्लीतलं वातावरण पाहता केजरीवाल यांना आमदारांची मोट बांधून ठेवणं अवघड जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या पक्षाकडून ब-याच अपेक्षा असल्या तरी तूर्त काही काळ वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही!

केजरीवाल हा एक अत्यंत 'धूर्त' माणूस आहे असं वैयक्तिक मत आहे. (धूर्त ह्या शब्दाबरोबर येणारी करडी बाजू सुद्धा सामील.)

In reply to by प्यारे१

केजरीवाल हे शरद पवार यांच्या पेक्षाही धूर्त आहेत काय ? असले तर पवारना त्यांचा क्लास जॉईन करा असे सांगावे म्हण्तो !

In reply to by चौकटराजा

मुळात जातकुळी (पिंड) वेगळी आहे. त्यामुळे कुणा एका पेक्षा जास्त अथवा कमी असं म्हणण्यापेक्षा एकंदरित धूर्त असंच म्हणणं इष्ट वाटतं. काल 'आप' चे उमेदवार बघत होतो. दिल्लीच्या लोकांनी प्रस्थापितांच्या (काँग्रेस/ भाजपाच्या) विरोधात केलेलं मतदान हे ह्या नव्या उमेदवारांना विजयी करुन गेलंय असं वाटतं. उमेदवार अगदीच अननुभवी वाटले. ज्यांनी कधी सामाजिक काम केलेलं नाही अथवा फार कमी केलंय (मुळात २५-२८-३२ असं वय त्यामुळं मोठ्या कार्यक्षेत्रात/मोठ्या स्केलवर अनुभव कमी) अशांना थेट आमदार बघणं थोडं अवघड वाटतंय. एखाद्या कॉर्पोरेट मध्ये २८ व्या वर्षी एजीएम अथवा एव्हीपी होणं देखील अवघड आहे. ह्यातले टिकतात किती, टिकून दिले जातात किती नि त्यातून काम करणार किती हे पाहणं 'रोचक' ठरेल.

In reply to by प्यारे१

>>ह्यातले टिकतात किती, टिकून दिले जातात किती नि त्यातून काम करणार किती हे पाहणं 'रोचक' ठरेल>>>>

In reply to by यशोधरा

सध्या अनेकांना आम आदमीचे यश पचवायला जरा वेळ लागतोय.आजचे लोकसत्ताचे संपादकिय वाचलेत तर अंदाज येईल्.अगदी शुक्रवारी आम आदमी ४/५पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही असा काँग्रेस्,भाजपाच्या 'ज्येष्ठ' नेत्यांचा अंदाज होता.निवडणूका जिंकायच्या तर धर्म्,जात्,भाषा,ईतिहास खाजवावा लागतो असे अनेकांचे म्हणणे होते.आपने ते सध्या तरी खोटे ठरवलेय.

In reply to by चिरोटा

निवडणूका जिंकायच्या तर धर्म्,जात्,भाषा,ईतिहास खाजवावा लागतो असे अनेकांचे म्हणणे होते.आपने ते सध्या तरी खोटे ठरवलेय.
+१ सध्यातरी हा शब्द (नेहेमीच) महत्वाचा!

In reply to by सुनील

आपण हॉटेलात खायला जातो त्यावेळी मालकाची जात लक्षांत घेतो का ? २६ जाने १९५० पूर्वी ब्राह्मण माणूस मियाकडून सुतळी विकत घेत होता ना ? शिवाजी राजांकडे मुस्लीम शिपाई नव्हतेच का ? अकबराची बायको हिंदू होती का ? संघाची वा मुस्लीम लीगची स्थापना पाचव्या किंवा सातव्या शतकात झाली काय ? याची उत्तरे शीधा म्हणजे जातीचे राजकारण , धर्माचे राजकारण कोणी कसे सुरू केव ते कुनी स्वीकारले ते कळेल .

केजरीवालांच्या रुपाने एक आशेचा किरण दिसतो आहे. अमेरिकेत ओबामा जेव्हा पहिल्यांदा निवडून आला तेव्हाही असाच एक किरण दिसला होता (ओबामाने नंतर निराशा केली ती गोष्ट वेगळी!) आज सगळ्या राजकीय पक्षांची प्रतिमा वाईट आहे. भाजपा कदाचित दगडापेक्षा वीट मऊ इतपतच बरा असेल. पण सगळे लोक राजकीय पदे ही आपली वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता असल्यासारखे वागत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेही. भाजपाचे मुंढे खानदान पाहिले तर त्या पक्षाचीही परिस्थिती फार वेगळी नाही. अशा प्रकारे मुजोर झालेल्या पक्षांना आप च्या निमित्ताने एक सणसणीत चपराक मिळाली असेल अशी आशा. सिंचन, आदर्श, टोल आणि अशा अनेक प्रकरणात ज्यांचे हात बरबटलेले आहेत असे लोक जरा शुद्धीवर आले ह्या निमित्ताने तर ती एक इष्टापत्ती ठरेल. आपच्या यशाकडे बघून अगदी खुद्द आप पक्ष नाही आला तरी स्वच्छ चारित्र्याचे लोक छोट्या प्रमाणावर एकत्र येऊन निवडणुका लढवतील अशी एक आशा. उदा. पुण्यात अविनाश धर्माधिकारी वा भाटियांसारखे कुणी नव्या जोमाने पुढे आले आणि नेहमीच्या कलमाडी, मानकर, शिरोळे प्रभृतींना आवाहन देऊ लागले तर आता कदाचित लोक जास्त उत्साहाने त्यांच्या मागे उभे रहातील. फेसबुक, ट्विटर वापरणारे उच्चभ्रू समजले जाणारे लोकही असा बदल घडवून आणू शकतात हे आश्वासक वाटते आहे. अर्थात दिल्लीत सरकार कुणाचे असेल, ते कसे चालेल, लवकरच त्यांना मध्यावधी निवडणूकांना तोंड द्यावे लागले तर १९७७ ची पुनरावृत्ती होईल आणि ते घातक असेल.

आम्ही सामान्य लोक दर वेळी आशेने कोणाकडे तरी बघतो. हा माणूस परिस्थिती बदलेल म्हणून. तो सुरुवातही चांगली करतो, पण लढणारा हा माणूस प्रस्थापित झाला की त्याबरोबर अपरिहार्य असणारे सत्तेचे दलाल, अनैतिक तडजोडी, हौशे नवशे गवशे यांचे मेळावे हे सगळं ओघाने येतंच. जनता पार्टीचा प्रयोग पाहिला. जयप्रकाशांची समग्र क्रांती पाहिली. वाजपेयींसारखा सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा माणूस काहीतरी करील म्हणून लोक आशेने त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहिले. शेवट तेच ते आणि तेच ते. काँग्रेसच्या काळात केंद्रातले दिशाहीन नेतृत्त्व, भ्रष्टाचाराचे थैमान आणि काही केले तरी आटोक्यात न येणारी महागाई, संरक्षण दलांची निराशा हे सगळे अक्षरशः सहनशक्तीच्या मर्यादेच्या पलिकडे पोचले आहे. त्रस्त जनता दुसरा अधिक चांगला पर्याय शोधते आहे. पण एकूण आपल्या देशातील परिस्थिती बघता केजरीवाल किती प्रमाणात बदल घडवतील याची शंकाच वाटते आहे. खरे तर लोकशाहीवरचा विश्वास कधीच उडाला आहे.

आता आप आणि बीजेपी हे दोघेही "पहले आप पहले आप.." करुन "पास द पार्सल"चा गेम खेळत असल्याचा भास होतोय. दोघांनाही लार्जेस्ट अपोझिशन पार्टी बनायचेच आणि राज्य करण्याची जबाबदारी (बला?) घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत दोन्हीकडून नाहीत. म्हणजे दिल्लीचे राज्य प्रत्यक्ष करण्यास कठीण आणि विरोध नेहमीच सोपा असल्याने ती भूमिका सर्वांनाच हवी असं आहे की काय अशी शंका येते. आता नक्की काय होणार कळत नाही. "आप"ने "आम्ही दुसर्‍या क्रमांकावर (रनर अप) असल्याने सरकार बनवण्याचा दावा करण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हटलंय आणि वरुन कोणालाही पाठिंबा न देण्याचंही म्हटलंय. आता आली का पंचाईत.

In reply to by गवि

>> म्हणजे दिल्लीचे राज्य प्रत्यक्ष करण्यास कठीण आणि विरोध नेहमीच सोपा असल्याने ती भूमिका सर्वांनाच हवी असं आहे की काय अशी शंका येते. -- नाहि हो. दोन्हि नवरदेव मुडावळ्या बांधुनच मंडपात आले होते. सत्तेच्या वरमालेचा दोर कमि पडला दोघांसाठी. भाजपाला आप ची तोडातोडी करणं सोपं नाहि व नजीक भविष्यकालीन निवडणुकांसाठी ते व्यवहार्य देखील नाहि. आप ला हंडी शिजल्याचा वास आलाय पण ते निवायची वाट बघताहेत. शक्य असताना देखील राज्य करण्यापेक्षा विरोधी पक्षात बसण्याची अवदसा भाजपला २१व्या शतकात कधि आठवणार नाहि, व आप चे भविष्यच मुळी ते सत्ता सोपान किती लवकर चढतात यावर अवलंबुन आहे.

आम आदमी पक्षाचा विजय व १९८३ चा भारतीय संघाचा विजय यात एक साम्य आहे ."We could win the game because we had nothing to lose "
१०० % सहमत (आम आदमी ) अमोल केळकर

सगळ्यान मूर्ख बनविण्यात पटाईत ठरला, घोषणा पत्रातील दोन ठळक बाबी. १. ७०० लिटर पाणी दर रोज प्रत्येक व्यक्तीला मुफ्त (गेल्या पंधरा वर्षात दिल्लीची जनसंख्या ९५ लाखाहून २.२५ कोटी पर्यंत पोहोचली. पाण्याची आपूर्ती १०% नी ही वाढली नाही. तूर्त हरियाना किंवा उत्तर प्रदेश कडून अधिक पाणी मिळण्याची शक्यता नाही. मुनक नहर (दिल्ली सरकारच्या खर्चाने बांधलेली ) पासून अतिरिक्त ८० टी एम सी पाणी देण्यासाठी हरियाना उत्सुक नाही.लोक ही पाण्याचे बिल भरत नाही दिल्ली जल बोर्ड ला दरवर्षी ३ हजार कोटी पेक्षा जास्त नुकसान होते. बाह्य दिल्ली (जिथे दिल्लीची अधिकांश लोक राहतात,अधिकतर कोलोनीत पाण्याची पूर्ती टेन्कर द्वारे होते. आमच्या बिंदा पूर कॉलोनीत ही आढवड्यातून एक दिवस पिण्याचे पाणी टेंकर द्वारा मिळते. अर्थात ७०० लिटर पाणी रोज मुफ्त देणे कदापि शक्य नाही. २. विजेचे बिल अर्धे करणार - आधीच दिल्लीत ३०% वीज चोरी होते. केजरीवाल यांनी स्वत: विजेचे बिल न भरण्याचे आव्हान जनतेला करीत होते. कापलेली वीज स्वत: जोडण्याचे त्यांचे फोटो वर्तमान पत्रात आपण पहिले असतील. शक्यता विजेचे दर वाढण्याची आहे. आप पार्टी जर सत्ते वर येईल तर वीज चोरी वाढेलच केजरीवाल ती थांबवू शकणार नाही (त्यांचेच उदाहरण लोक देतील). दिल्ली अंधारात बुडण्याची शक्यता जास्त. असे लोक भ्रष्टाचार कसे मिटवतील हाही एक प्रश्न आहे. ३. फेस बुक बॉईज आंग्ल भाषेत शिकलेले, पित्झा खाणारे, सुखवस्तू घराण्याचे, लेपटोप धारण करणारे इतिहास आणि संस्कृती याचे ज्ञान नसलेले तथाकथिक शिक्षित तरुण सोशल मिडियाला सर्व माहित असते असे मानणारे त्यांच्या बाबतीत काही न बोलणे योग्य (याच माध्यमाने मिस्त्र मध्ये क्रांती घडवून आणली होती. आज तिथे काय परिस्थिति आहे आपल्याला माहित असेलच) ४. एका विवादास्पद धार्मिक नेत्या कडून त्यांनी 'धर्मनिरपेक्षतेची आणि पुरोगामी' असण्याची पावती ही घेतली. (सत्तापक्षाचे टेकन फोर ग्रांटेट वोट बेंक तोडण्यात ही यश मिळविले). ५. दिल्लीत केजरी आणि केंद्रात मोदी या नार्याचा प्रचार ही जोरात होता. भाजप चा वोट बँक ही या रीतीने तोडला. ५. अशा रीतीने शिक्षित,अशिक्षित, स्लम मध्ये राहणाऱ्या आणि अल्पसंख्यक सर्वाना मूर्ख बनविण्यात ते यशस्वी ठरले. ४. हिंदीत कहावत आहे 'काठ कि हंडी बार बार नहीं चढ़ती'.

आप पार्टी जर सत्ते वर येईल तर वीज चोरी वाढेलच केजरीवाल ती थांबवू शकणार नाही या भविष्य कथनाचा आधार द्याल तर पाया पडायला येईन म्हणतो.

In reply to by चौकटराजा

तर पाया पडायला येईन म्हणतो.
गेलातच तर माझ्या वतीनेहतरेक पाय पकडून घ्या! :) - ('आप'ला) सोकाजी

भारतीय मानसिकता जे जे फुकट ते ते पोष्टीक अशी असल्याने केजरीवाल काय स्वर्गातुन परमेश्वर जरी आला तरी भारतातील विजचोरी रोखु शकत नाही.

In reply to by बाबा पाटील

जे जे फुकट ते ते पोष्टीक
क्या बात पाटीलसाहेब! एकच नंबर, आवडल्या गेले आहे. ( फुकटप्रेमी ) बॅटमॅन.

लोकांना डॉक्टरचा सल्ला फुकट हवा असतो,औषधे फुकट हवी असतात. अजुन बरच काही ...असे अनुभव दररोजच,बर ही मंडळी दारिद्ररेषेखालची असतात का तर अजिबात नाही,कमीत कमी ४०-५० हजार महिना कमाइ असणारे देखिल ?????

In reply to by बाबा पाटील

डॉक्टरांना देखील औषधी कंपन्यांकडून फुकट पाहिजे असते-सिंगापूर सहल्,कुठल्यातरी परिषदेनिमित्त जावून येणे.प्रामाणिकपणे कर भरणारे डॉक्टर्स किती आहेत समाजात?

आयबीएन वर आलेल्या बातमी नुसार लोकसभेच्या मतदारसंघानुसार आत्ताच्या विधानसभा मतदारसंघातली मते एकत्रीत केली तर (आत्ताच्या निकालाप्रमाणे) एकूण ७ जागांपैकी भाजपाला ६, आप ला १ आणि काँग्रेसला ० जागा मिळतील.

केजरीवाल यांनी मिळवलेले यश हे देशातील लोक भ्रष्टाचाराने किती वैतागलेले आहेत याची पोहोच पावती आहे असे मला वाटते. हे फक्त एकट्या केजरीवाल यांचे यश आहे कारण "माझ्या नावाचा वापर निवडणुकीत करू नका" अस आण्णा हजारे यांनी इशारा दिला होता. त्यांची ती भूमिका पटण्यासारखी नव्हती कारण एकीकडे ते म्हणतात कि, सर्व राजकीय पक्ष हे भ्रष्ठ आहेत आणि त्यामध्ये (राजकारणामध्ये ) चांगली आणि प्रामाणिक व्यक्तींनी यायला पाहिजे आणि दुसरी कडे ज्यांना ते (आण्णा हजारे ) चांगले म्हणतात त्या केजारीवालांच्या पाठीमागे उभा राहत नाहीत. त्यांनी जर एक दोन सभा दिल्ली मध्ये घेतल्या असत्या तर आज दिल्लीतील चित्र वेगळे दिसले असते. देशातील जनतेच्या मनातील खदखद आण्णांनी फक्त (उपोषणातून ) व्यक्त केली. आणि केजरीवाल यांनी तीच गोष्ट कॅश केली .

In reply to by psajid

हे फक्त एकट्या केजरीवाल यांचे यश आहे
याच्याशी असहमत. अण्णांच्या आंदोलनातूनच केजरिवाल यांना प्रसिद्धि मिळाली.

अनुप यांच्याशी सहमत. अण्णांच्या पुढेमागे वावरल्याने केजरीवाल नावाला आजचे वलय आले. तोवर त्यांना किती लोक ओळखत होते? सध्यातरी काँग्रेस आणि भाजपच्या त्याच त्याच अदलाबदलीला लोक कंटाळले आहेत म्ह्णुन केजरीवालना एक चान्स मिळाला आहे असे वाटते. त्याचे फळ काय आणि किती मिळते हे येत्या काळात दिसून येईलच.