तुझी घागर नळाला लाव...
छान झोप झाली. होणारच होती. सलग साडे तीन तास बाईक चालवून ताम्हीणी घाटातून कोकणात उतरल्याचा शीण होता. त्यातच संध्याकाळी एका कोंबडीला सद्गती देऊन तिचा मर्त्य देहही सत्कारणी लावल्यामुळे शरीर समाधी अवस्थेत जाणं स्वाभाविक होतं. जागे होताच एक छानसा आळस दिला. सुस्ती उडताच समोर घडयाळावर नजर टाकली. सकाळचे अकरा वाजले होते. छे ! खुपच लवकर जाग आली होती. आळोखेपिळोखे देत जाग का आली याचा विचार करू लागलो. आणि जाग येण्याचं कारण माझ्या खोलीत वाजणारं तुझी घागर नळाला लाव हे अप्रतिम गाणं आहे हे जाणवलं. माझ्या भाच्यानं डेस्कटॉपवर हे गाणं लावलं होतं. भाच्याचं वय वर्ष साडे चार. नुकतीच सिनियर केजी संपवून पहीलीत जायच्या तयारीत असलेला हा "नेक्स्ट जनरेशन" चा प्रतिनिधी. ज्युनियर आणि सिनियर दोन्ही केजी मराठीतून केल्या असल्यामुळे इंग्रजीचा गंध नाही. पठठया सिक्वेंस लक्षात ठेवतो. "इथे क्लिक केलं, इथे क्लिक केलं आणि मग हे गाणं मिळालं". त्याच्या दृष्टीने मशिनवर गाणं शोधणं इतकं सोपं आहे.
असो. ते गाणं. ते गाणं त्याचं आवडतं. कारण त्याची चित्रफ़ीत. मुख्य पात्राचे विदुषकासारखे चित्रविचित्र हावभाव पाहून तो अगदी खदखदून हसतो. ते गाणं माझ्याही आवडीचं आहे. पण मला ते गाणं आवडण्याचं कारण मात्र वेगळं आहे.
"काय थर्ड क्लास चॉईस आहे रे तुझा. कसं ऐकू शकतो तू ही अशी गाणी?" ईति माझा एक मित्र.
"जाऊ दे रे. तुला नाही कळणार. जशी दृष्टी तशी सृष्टी. तुम्ही स्वत:ला उच्चभ्रू म्हणवणारे लोक अशा गाण्यांकडे नेहमी पुर्वग्रहदुषित नजरेने पाहता. एखाद्या गाण्याला अगदी सहजपणे डबल मिनिंगवालं गाणं म्हणून लेबल लावून मोकळे होता. हे विसरता की अशी गाणी म्हणजे जनसामान्यांचे एक्स्प्रेस होणं असतं. तुम्ही ज्याला रीडींग बिटवीन दी लाईन्स म्हणता तसा त्यांच्यामध्ये खुप मोठा अर्थही दडलेला असतो. बास तशी दृष्टी हवी." मी एका दमात बोलून टाकलं.
"असं का महाराज? मग जरा या अज्ञानी बालकाला समजावून सांगाल का असा कोणता गहन अर्थ द्डला आहे या गाण्यात?" मित्रही आता माघार घ्यायला तयार नव्हता. मला बोलावंच लागलं...
हे केवळ एक लोकगीत नाही. समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा, खेड्यापाडयातल्या गोरगरीब कष्टकरी जनतेला, मोठया शहरांमधील श्रमजीवी जनतेला आपल्या आजूबाजूच्या सुशिक्षित जगात घडणार्या बदलांची जाणिव व्हावी म्हणून एका नवकवीने ही आपल्या जनसामान्य बांधवांना घातलेली एक साद आहे. मनापासून केलेली एक आर्त विनवणी आहे. आता या गीताच्या सुरुवातीच्याच ओळी पाहा.
जागं झालंय सारं गाव
तांबडं फुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव
पाणी सुटाया लागलं
एका सकाळचं वर्णन. किती सहज साधं व्यक्त होणं. नाही म्हणायला यमक आहे, परंतू तोही किती सहजपणाने जुळून आलेला. र ला र आणि ट ला ट जोडून आपल्या ब्लॉगांवर कवितांचा रतिब घालणार्या संगणक अभियंत्यांना यापासून नक्कीच बोध घेता येईल. असो. मुद्दा तो नाही. कवी म्हणतोय की पुर्वेला तांबडं फुटलं आहे. सार्या गावाला जाग आली आहे. एका लहानशा रम्य अशा खेडयाचं चित्र नजरेसमोर उभं राहतं की नाही? पुढच्या ओळींमध्ये कवी आपल्या शेजार्याला किंवा शेजारणीला घागर नळाला लावायला सांगतो. इथे शेजारी की शेजारीण अशी संदिग्धता असली तरी हा उल्लेख शेजारणीसंदर्भात आहे हे गीताच्या पुढील कडव्यांमध्ये कवी स्पष्ट करतो. आता तसा नळ आणि घागर यांचा संबंध नाही. नळ ही प्रामुख्याने शहरामध्ये उपलब्ध असणारी सुविधा आहे. आणि घागर खेडयातला फ़्रिज. काही गावांमध्ये हल्ली नळ दिसतात. नाही असं नाही. कुणीतरी नेता पुढारी नळ योजनेचं उद्घाटन करतो. दोनचार दिवस पाणी येतं. नंतर बंद. आणि समजा नळाला पाणी येणं चालू राहीलंच तरीही गावातल्या गोरगरीबांना पाणीपटटीचे पैसे न भरता आल्यामुळे पुढे मागे कधीतरी ते नळ कोरडे होतातच. अर्थात कवीला याची जाणिव आहे. परंतू तरीही खेडयातली घागर आणि शहरातला नळ या दोन गोष्टी एकत्र आणून कवी सामाजिक एकात्मकता साधतो. भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर या मुंबईच्या उपनगरातील झोपडपटट्यांमधील सर्वसामान्य जनता आजही पाण्यासाठी सार्वजनिक नळांवर अवलंबून आहे हे विदारक सत्यच कवी या ओळींतून मांडतो असं वाटतं. ईतकंच नव्हे तर पुण्याच्या कर्वेरोडवर असलेल्या नळ स्टॉपनेच कधी काळी डेक्कन जिमखाना, प्रभात रोड या सुखवस्तू वस्तीला कोथरुड या नव्याने विकसित होणार्या मध्यम वर्गियांच्या वस्तीला जोडलं होतं याचीही आठवण या निमित्ताने तो जुन्या पिढीला करुन देतो.
अर्थात हा झाला शब्दांचा वरवरचा अर्थ. शब्दांमागचा अर्थ मात्र खुप गहन आहे.
कालपरवापर्यंत हे जनसामान्य अज्ञानाच्या अंधारात चाचपडत होते. आता मात्र सार्यांना ज्ञानाची कवाडे खुली झाली आहेत. शिक्षणाची गंगा आता खेडोपाडी पोहोचली आहे. जणु काही या त्यांच्या आयुष्यात एक नवी पहाट झाली आहे. परंतू अजूनही काही जनता या परीवर्तनापासून अनभिद्ज्ञ आहे. कवीला ही ज्ञानाची गंगा समाजाच्या अगदी तळागाळापर्यंत पोहचवायची आहे. म्हणूनच कवी अशा अजुनही शिक्षणापासून, ज्ञानापासून वंचित असलेल्या आपल्या बांधवांना म्हणतो की हे माहितीचं युग आहे. हे ज्ञानाचे युग आहे. तुम्ही आता मागे राहू नका. लिहा, वाचा. आपलं जीवन समृद्ध करा. पहा बरे किती खोल अर्थ दडला आहे.
सार्या गावात जळला बोभाटा झाला
पाणी येणार न्हाय सार्वजनिक नळाला
लवकर उरकून घे, डोकं उठाया लागलं
तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं
कष्टकरी, श्रमजीवी जनता बिचारी साधी-भोळी असते. कुणी काहीही म्हटले तरी अगदी पटकन विश्वास ठेवते. शिक्षण घेणं ही गोरगरीबाच्या आवाक्यातली गोष्ट राहीलेली नाही, हा एक काहीही तथ्य नसलेला समज. हा समज कसा पसरला, कुणी पसरवला देवास ठाऊक. तसंच शिकण्याचं एक विशिष्ट वय असतं हा अजून एक गैरसमज. अर्थात यातली एकही गोष्ट खरी नाही. शालेय शिक्षण मोफत आहे. उच्च शिक्षणासाठी सरकारी बॅंका कर्ज देतात. परंतू हे या लोकांना माहितीच नसतं. आणि मुळातच शिक्षणाबद्दल अनास्था असल्यामुळे कुणी त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न केला तरीही फारसा उपयोग होत नाही. हे लहान मुलांच्या शिक्षणाबद्दल. हीच गोष्ट थोरामोठयांची. खेडयापाडयांमधील तसेच शहरांमधील श्रमजीवी जनतेसाठी शासन खुप सार्या योजना राबवत असतं. परंतू ज्यांच्यासाठी या योजना राबवल्या जातात त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहचतच नाही. आणि म्हणूनच या लोकांनी आता स्वत:च शहाणे होणे गरजेचं आहे. परंतू त्यांना शहाणं करणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. कवीला याचा अनुभव आहे. आणि आपल्या या खडतर अनुभवाचं वर्णन कवी "डोकं उठाया लागलं" या अगदी समर्पक शब्दांत करतो.
पाण्याच्या चिंतेनं झोप झाली का नाही
म्हणूनच ऊठवलं, जाग आली का नाही
अगं तरीही का गं तुझं, डोळं मिटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं
अर्थात शिक्षण अगदी जुजबी असलं, किंवा अजिबातच नसलं, आजूबाजूला घडणार्या सुधारणांची, सुखसुविधांची फारशी जाणिव नसली तरीही आपलं जीवन सुखी व्हावं या सर्वसामान्य जनतेला वाटते. किंबहूना आपल्याही मुलाबाळांना शिक्षण मिळावं, आपलंही जीवन सुखी व्हावी, घरात सुबत्ता नांदावी असं या कष्टकरी जनतेलाही वाटत असतं. ही चिंता कायम त्यांच्या मनात असते. हे सारं ध्यानात घेऊन कवी अगदी आत्मियतेने विचारतो, की भविष्याच्या काळजीने तुला झोप व्यवस्थित लागते का? कुणीतरी तुला हे शिक्षणाचं, ज्ञानाचं महत्व समजावून सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हे जनजागृतीचं कार्य मी हाती घेतलं आहे. मी ज्या काही तुझ्या भल्याच्या चार गोष्टी सांगत आहे, त्या तुला पटत आहेत ना? "जाग आली का नाही" असे अगदी नेमके शब्द योजून कवी आपली जनांच्या उद्धाराची तळमळ व्यक्त करतो. अर्थात समाजसुधारणेची चळवळ जेव्हा नुकतीच सुरु झालेली असते तेव्हा सुरुवातीला जनता तिच्याकडे दुर्लक्षच करते. आणि मग त्या चळवळीच्या प्रवर्तकांना असा प्रश्न पडतो की हे जे काही आम्ही करतोय ते लोकांच्या भल्यासाठीच करतोय पण तरीही लोक याकडे दुर्लक्ष का बरे करतात? कवीचा "अगं तरीही का गं तुझं, डोळं मिटाया लागलं" हा प्रश्नही हीच भावना व्यक्त करतो नाही का?
नको करू बाई लय सांडासांडी
अगं गर्दी झाल्यावर होईल भांडाभांडी
तुझ्या ओढाओढीने डोकं फुटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं
जेव्हा एखादी सामाजिक किंवा सांस्कृतिक चळवळ सुरू होते, तेव्हा त्या चळवळीची काही ध्येय धोरणं असतात. चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या आपली चळवळ कशी पुढे जावी याबद्दल काही अपेक्षा, काही आराखडे असतात. तशाच अपेक्षा कवीच्याही आहेत. सर्वसामान्य जनता आणि शिस्त (ज्याला उच्चभ्रू समाज डिसिप्लिन म्हणतो) यांचा नातं तसं फारसं सख्याचं नसतं. एखादी गोष्ट फारसे कष्ट न करता मिळाली की हेवेदावे सुरु होतात. अगदी गैरमार्गाने आपल्यालाच कसा फायदा होईल हे पाहीलं जातं. कवी या सार्या अनुभवांमधून बहुतेक गेला असावा. त्याला या सार्या गोष्टींनी क्लेश होतो. मन व्यथित होते. आपल्या मनाची ही व्यथा कवी "तुझ्या ओढाओढीने डोकं फुटाया लागलं" या जनसामान्यांच्या शब्दांतच व्यक्त करतो. तसेच जनसामान्यांसाठी राबवल्या जाणार्या विविध योजनांचा फायदा सर्वांनी शिस्तीने घ्यावा, वादविवाद टाळावेत अशी अपेक्षा करताना कवी पुन्हा एकदा "नको करू बाई लय सांडासांडी" असा बोली भाषेचा आधार घेतो.
शेजारधर्म म्हणून मी आलो जवळ
अगं नंतर जीवाची होईल तळमळ
या संदीपचं सांगणं आता पटाया लागलं
तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं
हे सारं कवी का बरे करत असावा? याचंही स्पष्टीकरण तो देतो. बहुधा कवीने परिस्थिती जवळून पाहिली असावी. आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या आजुबाजुच्या उपेक्षित जनतेला व्हावा असं त्याला कळकळीने वाटतं. ज्या समाजात आपण वाढलो, लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो याची जाणिव कवीला आहे. आपल्या मातीसाठी काही करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. वेळ निघून गेल्यावर "अरेरे, कुणी समजावून सांगितलं असतं तर आज ही वेळ आली नसती" असं म्हणायची वेळ या कष्टकर्यांवर, उपेक्षितांवर येऊ नये असं कवीला अगदी मनापासुन वाटतं. आज आपण लोकांना चार गोष्टी शिकवल्या, त्यांचं भलं झालं तर उद्या हेच लोक आपलं नाव आदराने घेतील याची त्याला पुर्ण खात्री आहे.
पाहीलंत? हे असं आहे. लोकगीते हे खेडयापाडयातील जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचे एक प्रभावी अस्त्र आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनामधल्या उपमांचा चपलख वापर करून लोकांना शहाणे करुन सोडण्याचे कार्य ही लोकगीते करतात. परंतू ग्रामिण जीवनाची ओळख नसलेली सुटाबुटातील शहरी संस्कृती मात्र अशा लोकगीतांना "डबल मिनिंग सॉंग" असं लेबल चिकटवून मोकळी होते. असो.
असेच शेजारधर्माची महती सांगणारे एक अतिशय सुंदर लोकगीत आहे. परंतू त्याविषयी पुन्हा कधीतरी...
गीताचा संदर्भ:
कवी: संदिप
संगितकार/गायक: आनंद शिंदे
ध्वनीफित/चित्रफित: कृणाल म्युझिक
प्रतिक्रिया
गीतविवेचन आवडले
+१
हा हा हा ....
हॅ हॅ हॅ
बाबूजी...
वेल्कम बॅक
'नेक्स्ट
ईतकंच
उगाचच ताणलंय ... असं वाटतं
वा...
सागर जी
मा. शाहीर विठ्ठल शिंदे ... हे सन्माननीय अपवाद
पुन्हा एकदा...
छान...!
वा!!
गाण्याचा
गाणं मलाही
झ्याक !!
हा हा हा मस्त पोस्ट्मार्टम
सध्या माझ्या अपार्टमेंटसमोर हे गाणं वाजतय.
अजुन काही गाण्यांचे असेच
सोज्वळ
गाण्याचे रसग्रहण आवडले
आपल्या भारतात अनेक समाज ,पंथ
झकास......
दादा कोंडकेंचं "ढगाला लागली कळ..."
वाचताना मजा आली. कसं काय लिहू
खरंय रे धन्या अगदी .
"तिकड"ची आठवण झाली एकदम
अगदी अगदी
नळ, घागर अन पाणी, "दमयंती", इ
(No subject)
प्राडॉंच रसग्रहण वाचून हा
खिक्क...
"काय थर्ड क्लास चॉईस आहे रे
हो आणि अशाच गाण्यासाठी