✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३: अंतिम)

च
चित्रगुप्त यांनी
Wed, 08/07/2013 - 00:06  ·  लेख
लेख
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २) ७. अर्जुन उवाच : कृष्णाला शोधायला मी रथ हाकारून नगराकडे निघालो. जिकडे तिकडे शोकमग्न स्त्रियांचे जथे हिंडत होते. त्या सर्व स्त्रियांना एकत्र व्हायला मी सांगत गेलो. एके ठिकाणी बर्‍याचश्या बैलगाड्या दिसल्या. माझा रथ तिथे पोचताच तिथून काही स्त्रियांनी पोबारा केला. "अभीर स्त्रिया आहेत त्या" कुणीतरी म्हणाले. जवळ जाऊन बघतो, तो गाड्यांमधे मूल्यवान वस्त्राभूषणे, सोन्या-चांदीची भांडी वगैरे भरलेले होते. त्या अभीर स्त्रियांनी हे सर्व गोळा करून जमवलेले दिसत होते, याचा अर्थ आता ते नेण्यासाठी अभीरांची टोळी येणार. अर्थात माझ्यापुढे ते काय करू शकणार म्हणा… तरी मी माझ्या सैनिकांना त्या गाड्यांभोवती पहार्‍यासाठी ठेवून एकटाच नगरात शिरलो. आधी पुन्हा एकदा कृष्णाच्या प्रासादात जाऊन बघावे, असा विचार करून प्रासादात शिरलो, पण तिथे तो नव्हता. ... तेवढ्यात मला आठवले, की कृष्णाच्या शयनकक्षात एक गुप्त द्वार होते, आणि त्याची कळ दाबून द्वार उघडल्यावर आत आणखी एक कक्ष होते. त्या कक्षात त्याने अत्यंत मौल्यवान रत्ने, आभूषणे ठेवलेली होती. हे रहस्य फक्त आम्हा दोघांनाच ठाऊक होते. त्या गुप्त कक्षात तर नसेल तो बसलेला? मी लगेच ती गुप्त कळ दाबून कक्षात प्रवेश केला. तिथेच कुणीच नव्हते. तिथे ठेवलेली संपत्ती बघून माझे डोळे दिपले... कृष्ण जर परतला नाही, तर ही संपत्ती इथेच पडून वाया जाणार, त्यापेक्षा आपणच ती का नेऊ नये? द्वारकेचे आता काही खरे नाही, आणि आपल्याला हस्तिनापुरात एवढ्या विधवांची सोय लावण्यासाठी आहेच संपत्तीची निकड... ... मग मी तिथलेच एक वस्त्र घेऊन त्यात ती सर्व रत्ने, आभूषणे भरली, आणि बाहेर पडलो. बाहेर ते दोघे दूत उभे होते. "महाराज, आम्ही द्वारकेत उरलेल्या सर्व लोकांना त्या बैलगाड्यांजवळ एकत्र केलेले आहे, आणि ते सर्व तुमचीच वाट बघत आहेत". ते म्हणाले. बैलगाड्यांजवळ निरनिराळ्या वंशांच्या, वर्णांच्या, वयाच्या आणि रंगरुपांच्या हजारो स्त्रिया गोळा झालेल्या होत्या. काही धडधाकट, काही निर्बल, काही अगदी खचून गेलेल्या, तर काही उत्साहर्‍याणार्‍या. मी सर्वांना सांगितले, की आपण उद्या सकाळी हस्तिनापुराच्या दिशेने प्रवास सुरु करू. तोपर्यंत ज्याला जे जे सामान न्यायचे असेल, ते घेऊन सकाळी पुन्हा इथे एकत्र व्हावे. नगरातील मोठमोठ्या वाड्यातून जेवढी धन-संपत्ती हाती लागेल, ती गाड्यांमधे भरून घ्यावी. हे धन हस्तिनापुरात सर्वांची सोय लावायला कामास येईल. हे ऐकताच सर्व स्त्रिया पांगल्या. वाड्यांमधून संपत्ती काढतेवेळी तिथे भांडणे, हिसकाहिसकी होण्याची शक्यता माझ्या लक्षात आली, पण मला त्यावर काहीही करणे शक्यच नव्हते. ही सगळी जत्रा घेऊन पायी हस्तिनापुरास पोहोचायला सुमारे दोन महिने तरी लागले असते. एवढ्या लोकांसाठी भोजन, स्नानादिकाची सोय, औषध-पाणी, हे सर्व माझ्या कुवतीबाहेरचे होते. मी पूर्णपणे हतबल होतो. कृष्ण माझा प्रियसखा, गुरु खरा, पण एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकून तो स्वत परांगदा झाला होता, त्याबद्दल आता माझ्या मनात वारंवार संताप दाटून येत होता, आणि पुन: पुन: आपण कुठून इथे आलो, असे वाटत होते. सकाळी हळूहळू गाठोडी, बोचकी घेतलेल्या स्त्रिया जमू लागल्या. काहींनी दुभत्या गायी, शेळ्या, पोपट, कोंबड्या हेही बरोबर घेतले होते. गोळा केलेली संपत्ती मी गाड्यांमधे ठेवायला सांगितले, परंतु तिकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही. आम्ही निघालो. सर्वात पुढे माझा रथ, त्यामागे संपत्ती आणि अन्न-धान्य भरलेल्या, तसेच रुग्ण आणि अतिवृद्ध लोकांसाठीच्या बैलगाड्या, आणि त्यामागे हजारो स्त्रियांचा जथा. मी माझ्या दहा घोडेस्वार सैनिकांपैकी दोघांना पुढे जाऊन पाण्याची, मुक्कामाची जागा शोधायला, तर उरलेल्यांना जथ्याभोवती रक्षणासाठी नेमले. माझा रथ पुष्कळ पुढे होता, एवढे बरे, नाहीतर त्या हजारो स्त्रियांच्या अखंड वटवटीने, रडण्याने माझे मस्तक खचितच बधीर झाले असते. तिसर्‍या दिवशी सकाळी अचानक शहराच्या दिशेने अनेक कुत्री, मांजरे, आणि आजूबाजूच्या वनातून कोल्हे, लांडगे, हरिणे वगैरे वन्य प्राणी वेगात रैवतक पर्वताकडे धावू लागल्याचे दिसून आले. कुणाला कळेना काय झाले असावे ते. जथ्यातील एक वृद्ध म्हणाला, की ही सर्व 'तस्युनामी' नामक भयंकर प्रलयी वादळाची लक्षणे आहेत. 'तस्युनामी' नामक ऋषीने निरिक्षण करून असे सांगून ठेवलेले आहे… दुपारचे सुमारास खरोखरच समुद्राच्या दिशेने प्रचंड वेगात वारा येऊ लागला. मागोमाग जोराचा पाउसही कोसळू लागला. आम्ही सर्व भिजून चिंब झालो. रैवतक पर्वतावरून खळाळत येणार्‍या मातकट पाण्याचे लोट चुकवत चालणे कठीण होऊन बसले. कसेबसे आम्ही एका जरा उंच पठारावर थांबलो. खाली बघतो, तो समुद्रातून अति प्रचंड लाटा येऊन द्वारका नगरीला धडका देत होत्या. बघता बघता द्वारकेतील सर्व घरे, प्रासाद, मंदिरे जलमग्न झाली आणि घटकाभरात द्वारकेतील प्रचंड प्रासादांचे केवळ उध्वस्त अवशेष उरले. s d - f 'तस्युनामी' वादळानंतरची उध्वस्त द्वारका चित्रकार: Gustave Dore (1832-93) आम्ही सर्व भयाने, विस्मयाने सुन्न झालो. प्रवासाच्या सुरुवातीलाच अपशकुन झाला, या विचाराने स्त्रिया मोठमोठ्याअने रडू लागल्या. गाडक्या-मडक्यातून कसेबसे आणलेले पीठ, सत्तू, लाह्या आणि धान्याच्या गोण्या सर्व भिजून चिंब झाले. सर्वत्र एवढा चिखल माजला होता, की रात्री झोपायला, आणि प्रातर्विधीसाठी कोरडी जागासुद्धा मिळणे कठीण होते. कशीबशी रात्र पार पडली, आणि आम्ही पुन्हा वाटचालीला लागलो. पुढे अभीरांचा प्रदेश होता. एवढी संपत्ती आणि स्त्रिया बरोबर असता तिकडून जाणे सुरक्षित नसल्याने मी जरा दूरचा वळसा घेऊन जाण्याचे ठरवले. माझा रथ तिकडे वळताच स्त्रियांमधे खळबळ माजल्याचे दिसले. काय प्रकार आहे, हे बघण्यासाठी मी जातो, तो बर्‍याचश्या स्त्रिया तावातावाने अभीरांच्या भाषेत बोलत असलेल्या दिसल्या. त्या काय म्हणत आहेत, हे संदेश वाहकांना विचारले, तर ते म्हणाले की त्या सगळ्या अभिर स्त्रिया होत्या, आणि त्यांना त्यांच्या अभीर वस्तीत जायचे होते. हस्तिनापुरास जायला त्या मुळीच तयार नव्हत्या. "बरेच झाले, तेवढाच भार कमी" असा विचार करून त्यांना मी "तुम्ही खुशाल तुमच्या वस्तीत जा, माझी काही ना नाही" असे सांगितले. तरी त्यांचा गोंधळ कमी होइना. "महाराज, त्या म्हणत आहेत, की त्यांनी त्यांची संपत्ती ज्या गाड्यांमधे भरून ठेवली होती, त्या घेतल्याशिवाय त्या इथून हलणार नाहीत". हे ऐकून मी विलक्षण संतापलो. " कुलटांनो, दास्या-बटक्यांकडे कुठून आली संपत्ती ?? ही सर्व संपत्ती आता माझी आहे. त्यातील तुम्हाला काहीही मिळणार नाही. हा वीर अर्जुन स्त्रियांवर शस्त्र उगारणार नाही, पण उपासमारीने मरायचे नसेल, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता चालत्या व्हा इथून " असे निक्षून बजावताच त्यांनी आपसात काहीतरी विचार विनिमय केला, आणि त्या हळूहळू मुकाट्याने रानाकडे निघून गेल्या. आणखी दोन दिवस मार्गाक्रमण केल्यावर अचानकच चाळीस - पन्नास तरूण अभीर स्त्रिया रानातून माझ्या रथासमोर प्रकटल्या. त्या म्हणाल्या, "महाराज, आम्हाला आमच्या घरच्यांनी स्वीकारले नाही, सबब आम्हाला आता तुमच्याबरोबर हस्तिनापुरास येण्याशिवाय तरणोपाय नाही. आमच्यापुरते पीठ आम्ही आणले आहे, ते आमचे आम्ही रांधून खाऊ. तुम्हावर आमचा भार येणार नाही. हस्तिनापुरास आम्ही बटकी, दासी बनून तुमची सेवा करू, पण महाराज, आता आम्हाला अव्हेरू नका". ... मी बघितले, तो खरोखरच प्रत्येकीकडे एकेक गच्च भरलेले जड गाठोडे होते. त्या सर्व तरुणी सुस्वरूप, टवटवीत आणि घट्ट-मुट्ट होत्या. हस्तिनापुराचा व्यवस्थापक मीच असल्याने वाड्यावर नवीन तरूण दासी नियुक्त करणे, जुन्यांची रवानगी राज्याच्या सीमावर्ती भागातील शेतांवर कामासाठी करणे, हे काम माझेच होते. अनायासेच या सुंदर दासी आपणहून चालून आल्याचे बघून मला बरेच वाटले. भीम त्याच्या स्वार्‍यांमधून तगडे दास आणि तरूण दासी अधून मधून आणायचा खरा, पण या बाबतीत माझी कर्तबगारी शून्यच होती. आता द्वारकेतून मी एवढी संपत्ती आणि सुस्वरूप दासी आणल्याचे बघून युधिष्ठिराने नक्कीच माझी पाठ थोपटली असती. हा विचार करून मी त्या सर्व जणींना जथ्थ्यात सामावून घेतले. त्या रात्रीच्या मुक्कामात त्या अभीर तरुणींनी मोठी शेकोटी पेटवून त्याभोवती उत्तम नृत्य-गायन केलेले बघून तर मला माझा निर्णय अगदी योग्य असल्याची खात्रीच पटली. या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी अचानक समोरच्या रानातून अभीरांची एक मोठी टोळी आमच्यावर चालून आली. त्यांच्याकडे गोफ़णी आणि धनुष्यबाण होते खरे, पण या अजानबाहु पार्थासमोर ते काय टिकाव धरणार ? मी बाणांचा मारा सुरु करताच ते पळपुटे धीर सोडून रानाच्या दिशेने धावत सुटले. मला वीरश्री चढून मी त्यांच्यामागे माझा रथ भरधाव सोडून बाणांचा मारा अविरत चालूच ठेवला. मात्र ते सर्व अभीर दाट रानात अदृश्य झाल्याने त्यातले किती ठार झाले, हे कळले नाही. रथातील बाणांचा साठा पण संपलेला बघून मी माघारी फिरतो, तो समोर अभीर स्त्रियांचा घोळका. काल जथ्थ्यात सामील झालेल्या याच त्या स्त्रिया, हे मी ओळखले. "घाबरू नका, ते सगळे भित्रट मला घाबरून पळून गेले आहेत. आता कुणी तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही".… असे बोलतो, तोच त्या स्त्रियांनी आपापल्या गाठोड्यांमधून गोफ़णी काढून माझ्यावर दगडांचा मारा सुरु केला…. … माझ्या हातातून गांडीव गळून पडले, आणि मी खाली कोसळलो.… ---------------------------------------------------------------------------------- ८. अभीरमन्यु उवाच : f प्राचीन अभीरांचे पश्चिमेकडे गमन: चित्रकार :Cormon, Fernand १८८० फार पूर्वी आमचे पूर्वज त्यांच्या मूळ जागेपासून पश्चिमेकडे जात जात शेवटी समुद्रापर्यंत येऊन येऊन स्थायिक झाले होते, हे मला आठवले. .. आता समुद्रतीरी यादवांमधे मोठी हाणामारी होऊन जवळ जवळ सर्व यादव त्यात ठार झाले. आम्ही रानातून शेकडो सर्प पकडून समुद्रतीरी आणून सोडले होते, पुष्कळश्या यादवांना त्यांनी दंश करून मारले. j--k यादवी: (डावीकडील-)Titian 1542-44.(उजवीकडील-) Palma il Giovane इ. स. १६०३ b यादवांचा सर्पदंशाने मृत्यु: चित्रकार: Gustave Dore (1832-93) ... माझ्या प्रतिज्ञेचा एक भाग तर पूर्ण झाला, आता कृष्ण आणि अर्जुनांचा समाचार घेणेच काय ते राहिले होते. अर्जुनाला घेऊन माझे दोन विश्वासू हस्तक लवकरच पोहोचतील, याची मला खात्री होती, पण इथल्या गोंधळात कृष्ण कुठे गेला,कळले नाही. मग पंधरा-वीस बैलगाड्या तयार करून त्यात द्वारकेच्या मुख्य मुख्य धनी लोकांच्या वाड्यांमधील संपत्ती गोळा करून भरण्याचे काम काही स्त्री-पुरुषांवर सोपवून मी कृष्णाच्या शोधासाठी निघालो. दुसरे दिवशी खूप दूरच्या रानात कृष्ण एका वृक्षाखाली गुडघ्यावर पाउल टेकवून उदास बसलेला दिसला. त्याच्यावर बाण रोखून मी म्हणालो: " कृष्णा, ओळखलेस मला ? मी अभीरमन्यु. लहानपणी मी सुभद्रेबरोबर एकत्र खेळलो, वाढलो. माझे तिच्यावर प्रेम होते, आणि मी तिच्याशी विवाह करणार होतो. यात माझ्या प्रेमाचा तर भाग होताच, शिवाय त्यामुळे तुम्हा यादवांनी आम्हा अभीरांवर चालवलेल्या जुलुमातून सर्वांची सुटका मी करून घेईन, असे मला वाटत होते. परंतु तुला ते नको होते म्हणून की काय, तू त्या अर्जुनाला तिला पळवून न्यायला लावलेस. अरे, अर्जुन-सुभद्रा विवाहातून तू यादवांचे असे कोणते हित साधलेस ? … आणि तू एवढा महान तत्ववेत्ता, यादवांचा अग्रणी, कर्तबगार नरपुंगव. पण समुद्रातून मीठ काढण्याची विद्या ज्यांच्याकडून तुम्ही शिकलात, त्यांनाच परांगदा करून, त्यांनी मोठ्या कष्टाने निर्मिलेली मिठागारे बळकावून त्यांच्या सुंदर कुमारिकांच्या मोबदल्यातच फक्त त्यांना मीठ देण्याचे नीच कृत्य करण्यापासून यादवांना तू परावृत्त करू शकला नाहीस.… … कौरव-पांडव युद्धाचे वेळी तू मारे अर्जुनाला "युद्धात जिंकलास, तर पृथ्वीचे साम्राज्य उपभोगाशील, आणि धारातिर्थी पडलास, तर स्वर्गाचे राज्य भोगशील" असे आमिष दाखवून, "तू खुशाल गांडीव चालव, हत्येचे पाप तुला लागणार नाही" असे सांगून युद्धाला जुंपलेस.… परिणामी पांडवांना राज्य मिळाले खरे, पण त्यांची प्रजा कोण, तर वृद्ध, अपंग, रुग्ण पुरुष, लहान मुले आणि हजारो विधवा स्त्रिया. त्या सर्वांची जबाबदारी पांडवांवर टाकून तू मात्र नामानिराळा झालास. ... अरे, तू अगदी लहान असता मुष्टिक-चाणूरांस लोळवलेस, पुतनेचा वध केलास, कंसाला मारलेस, कालियामर्दन केलेस. एवढे तुझे सामर्थ्य असता, राजसूय यज्ञाचे वेळी तुझ्यापेक्षा अनेक वयोवृद्ध, थोर पुरुष उपस्थित असूनही अग्रपूजेचा मान मात्र तुला मिळावा, यावर शिशुपालाने हरकत घेतली म्हणून जसा तू तडकाफडकी त्याचा वध केलास, तसा तू दुर्योधन, दु:शासन, शकुनी वगैरे मुख्य कौरवांचा करतास, तर सर्व प्रश्न तिथेच संपला असता. एवढा नर-संहार झाला नसता, आणि पांडवांना राज्य करण्यास निदान धडधाकट प्रजा आणि सौभाग्यवती स्त्रियांनी, आनंदी मुला-बाळांनी गजबजलेली वैभवशाली नगरे तरी मिळाली असती... z कालियामर्दन: कांगडा शैली. c-v शिशुपाल वधः १. कंबोडियातील शिल्प. २. चाणूर-मुष्टिक वध (तपशील अनुपलब्ध) ... अर्जुनाला तू सांगितलेस, की एक दिवस हे सर्व मरणारच आहेत, तर तू आत्ताच त्यांना मार. अरे, मग त्यांच्या विधवांनी, मुलाबाळांनी काय करायचे ? त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची ? एका द्रौपदीचा सभेत अपमान झाला, म्हणून तू लाखो निरपराध स्त्रियांना वैधव्याच्या खाईत लोटलेस ? आणि खुद्द तुझ्या द्वारकेत हजारो स्त्रिया दासी-बटकींचे अपमानास्पद जीणे जगत असल्याचे तुला काहीच वाटले नाही ? कृष्णा, मी लहानपणी द्वारकेत असताना मला तुझ्याविषयी अतिशय आदर वाटत असे. परंतु नंतर तू त्या आदरास पात्र राहिलास का? बरे, ते असो. द्वारकेतील सर्व मिठागारांवर, संपत्तीवर, व्यापारावर काही मोजक्या पुंडांनी ताबा मिळवला, आणि बाकीचे यादव मात्र जास्त जास्त दरिद्री होत गेले, हे तुला कधीच दिसले नाही ? त्यावर आपण काही उपाय करावा, हे तुला कधी सुचलेच नाही ? जरासंधाचा वध करवून त्याच्या बंदीतल्या राजांची मुक्तता करणार्‍या, नरकासुराच्या तावडीतून हजारो स्त्रियांची सुटका करून त्यांना आश्रय देणार्‍या परमवीराला आपल्याच बांधवांचे दु:ख दिसू नये ? की तू सुद्धा त्या पुंडांपैकीच एक होतास ? दिवसभर काबाडकष्ट करणार्‍या बांधवांना निदान पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा मिळेल, अशी सोय केली असतीस, तर आज यादवांचा संपूर्ण विनाश झाला असता का ? ... आता जरी तुला आपल्या चुका उमगल्या, तरी त्याचा काय उपयोग ? कृष्णा, तुझे लाघवी, प्रेमळ, सुंदर रूप, तुझे चातुर्य, गोकुळातील तुझ्या बाळ-लीला, तू अर्जुनाला रणभूमीवर केलेला उपदेश, हे कदाचित पुढील शेकडो पिढ्या आठवतीलही. तुझ्यावर कवने रचण्यात महाकवि धन्यता मानतील... तुझ्या हजारो प्रतिमा घरा-घरातून देव म्हणून पूजल्याही जातील कदाचित, तू केलीस तशी रासक्रीडा, दहिहंडी लोक सण म्हणून करतील ... पण या सर्वात तुझी ही कर्तव्य-विन्मुखता कुणाच्या लक्षात तरी येईल की नाही, कुणास ठाऊक. 'संभवामि युगे युगे' असे तू सांगितलेस, ते कश्यासाठी ? जगाच्या कल्याणासाठी, की ती एक पोकळ वल्गनाच ? ... आता मी जातो, मला माझ्या बांधवांसाठी खूप काही करायचे आहे. तुझे ऐकून अर्जुनाने केलेल्या युद्धातून सर्वनाशच झाला, पण आता तू माझे ऐक. तू योगेश्वर म्हणवला जातोस, असे मी ऐकले आहे. आता अजूनही योग-सामर्थ्याने तुला जगाचे खरे कल्याण करता येत असेल, तर ते तू अवश्य करावेस.पण तू हे करू शकत नाहीस, हेही मला ठाऊक आहे, कारण तुझा अंतकाळ आता जवळ आलेला आहे... जाता जाता लहानपणी मला तुझ्याविषयी वाटणार्‍या प्रेमादरास स्मरून एक बाण मी तुझ्या पावलात मारून जात आहे. 'अश्मसर्प' नामक सापाची अगदी ताजी कात सत्तावीस दिवस अहोरात्र उकळत ठेऊन त्या द्रव्यापासून मिळणारी औषधी या बाणास लावलेली आहे, त्यामुळे तुला यापुढे कोणतीही वेदना जाणवणार नाही, उलट आनंदाच्या डोहातच जणु तू तरंगत आहेस, असे तुला वाटत राहील, आणि यथावकाश तुला वेदनारहित, आनंदमय मृत्यू लाभेल ". … एवढे बोलून मी बाण सोडला. क्षणभर कृष्णाच्या चर्येवर विस्मयाचा भाव दिसला, आणि त्यानंतर मात्र एक शाश्वत आनंद त्याच्या मुद्रेवर झळकू लागला. द्वारकेकडे जाताना संध्याकाळी मला माझे मित्र वाटेतच भेटले. त्यांच्याकडून मला अर्जुन माझ्या दूतांबरोबर द्वारकेस येऊन पहुचल्याचे, आणि तो द्वारकेत उरलेले सर्व वृद्ध, हजारो स्त्रिया, आणि हाती लागलेली संपत्ती घेऊन हस्तिनापुराच्या मार्गी लागला असल्याचे समजले. द्वारका नगरी समुद्रात बुडाली, पण तिथली संपत्ती मात्र अर्जुनाबरोबर हळूहळू आमच्या वस्तीच्या दिशेने येत होती. तो जथा वस्तीजवळ येताच आम्ही त्याच्यावर हल्ला करणार होतो, आणि आमच्या सर्व स्त्रियांना सोडवून आणणार होतो. मात्र अर्जुनाने आमच्या वस्तीला टाळून, वळसा घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, हे आमच्या पथ्यावरच पडले, कारण त्या बाजूला घनदाट अरण्य होते, शिवाय अर्जुनाने आमच्या अभीर स्त्रियांना पाठवून दिले होते. त्यातील निवडक पन्नास तरूण स्त्रियांना गोफ़णी आणि दगडांनी भरलेली गाठोडी बरोबर देऊन मी अर्जुनाकडे परत पाठवले. त्याने त्यांचा स्वीकार केल्याचेही मला समजले. आता माझ्या योजनेचा अंतिम टप्पा जवळ आलेला होता. योग्य ठिकाणी अर्जुनाचा काफ़ला येताच रानातून शंभर अभीर त्याच्यावर चालून गेले. अर्जुनाने लगेच बाणांचा वर्षाव सुरु केला. आमचा एकही माणूस आम्हाला गमवायचा नव्हता, मात्र अर्जुनाचे बाण संपवणे गरजेचे होते, त्यामुळे ते तरूण रानातून अर्जुनाला हुलकावण्या देत झाडाआडून धावत नुसता हल्लकल्लोळ तेवढा करत होते. अर्जुनाला चेव येऊन तो बाणावर बाण मारत सुटला, पण एकाही अभीर त्याच्या बाणाला बळी पडला नाही. अर्जुनाचे रथातील बाण संपले. पूर्वी अर्जुनाचा भाता 'अक्षय' असल्याचे सांगितले जायचे, कारण युद्धाचे वेळी शेकडो लोहार रात्रंदिवस काम करून बाणांचा सतत पुरवठा करत असायचे. आता मात्र त्याच्याकडे मोजकेच बाण होते. तसेच युद्धासंबंधी 'मंत्र' म्हणजे युद्धाचे नियम, जसे पदातिने पदातिशीच लढायचे, महारथीने महारथीशी, निशस्त्रावर शस्त्र चालवायचे नाही वगैरे, ते तर इथे कुचकामाचेच होते. शत्रू घाबरून पळाला, असे समजून मोठ्या ऐटीने अर्जुन मागे वळला. आमच्या स्त्रियांनी लगेचच गोफ़णीतून त्याच्यावर दगडांचा वर्षाव करून त्याला रथातून खाली पाडले. त्याच्या दहा घोडेस्वारांना पण दगड मारून जायबंदी करून त्यांचे घोडे आणि अर्जुनाचा रथ आम्ही ताब्यात घेतले. माझ्या माणसांनी अर्जुनाच्या मुसक्या बांधून त्याला माझ्यासमोर आणले. मी त्याला म्हणालो, "अरे, आजवर तू स्वत:ला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणवून घेत होतास, आज तू एका क्षुल्लक अभीरासमोर हात-पाय बांधलेल्या अवस्थेत दीनवाणा उभा आहेस. ज्या श्रीकृष्णाने तुला सुभद्रेला पळवून न्यायला सांगितले, त्याचीपण मी यथायोग्य सोय लावून आलो आहे. यादवही सर्व संपलेच. आता उरला तूच. प्राख्यात धनुर्धर, महापराक्रमी वीर अर्जुन". " पण तू कसला रे पराक्रमी वीर ? जिथे जाशील, तिथून कोवळ्या मुली हस्तगत करण्याएवढाच काय तो तुझा पराक्रम. उलूपी, चित्रांगदा, या तुझ्यापेक्षा अगदी लहान वयाच्या कुमारिकांशी तू जबरदस्तीने लग्न लावलेस, हे यावरूनच सिद्ध होते, की त्या तुझ्याबरोबर इंद्रप्रस्थास आल्या नाहीत. आणि सुभद्रा, तीही वनवासाचे वेळी माहेरी निघून आली". ... "अरे, तुझ्यापेक्षा तुझा तो महाबली भाऊ भीम, ज्याने तुमचे मुख्य शत्रू जे शंभर कौरव, त्या सर्वांना एकट्याने संपवले, तो खरा पराक्रमी वीर. आणि अर्जुना, त्या कर्णाच्या हातून तुझा वध होण्यापासून मीच तुला वाचवले, हे तुला ठाऊकही नसेल. त्या दिवशी कर्ण तुला निश्चितच ठार करणार होता. परंतु तू माझी शिकार होतास. तुझी शिकार करण्याचे स्वप्न जन्मभर उराशी बाळगूनच मी जगत आलो होतो, म्हणून कर्णाच्या रथाचे चाक ऐन वेळी मोडेल, याची सोय मीच त्या दिवशी करून ठेवली होती. आणि अधमा, तो रथातून उतरला, त्यावेळी तो निशस्त्र होता. अश्या स्थितीत तू त्याचा वध केलास, कारण तो सशस्त्र असता, तर तसे करणे तुला शक्य नव्हते, हे तुला आणि कृष्णाला चांगलेच ठाऊक होते". ... "आणि तू त्या कृष्णाचे ऐकून एवढे युद्ध केलेस, त्यातून तुम्हाला काय मिळाले, तर हजारो-लाखो विधवा, आणि मरणपंथाला लागलेल्या वृद्धांचे, मोडकळीला आलेले राज्य. आर्यांचे राज्य. तुम्ही आर्य स्वत:ला एवढे श्रेष्ठ समजता, पण जुगार , द्यूत, मद्यपान, एका स्त्रीचा पाच-पाच जणांनी उपभोग घेणे, संपत्तीला वा राज्याला वारस हवा म्हणून परपुरुषांकडून स्त्रियांना गर्भवती करवणे, मिठासारख्या सर्वांना आवश्यक असलेल्या वस्तूच्या मोबदल्यात अनार्यांच्या कोवळ्या तरुणी आणून त्यांना भोगदासी बनवणे, असले नीच उद्योग तुम्ही खुशाल करता.… त्यापेक्षा आम्ही अभीर बरे. सुभद्रेने तिला झालेल्या मुलाचे 'अभिमन्यु' असे विचित्र अनार्य नाव का ठेवले, याचे सर्वांना आश्चर्य वाटले होते ना ? त्याचे उत्तर 'अभीरमन्यु' म्हणजे 'अभीरांचा मुकुटमणि' या माझ्या नावात आहे. तो पर्यंत तरी माझी आठवण सुभद्रेला नित्य होत होती, याचा पुरावा. मला सुभद्रेशी लग्न करून आम्हाला होणार्‍या मुलाचे नाव अभिमन्यु असेच ठेवायचे होते. परंतु अभिर-भैरव देवाच्या मनात वेगळेच काही होते म्हणायचे. सुभद्रा मला मिळाली नाही, पण त्यामुळेच त्या मस्तवाल यादवांचा नायनाट होऊन आमची त्यांच्यापासून कायमची सुटका झाली". ..."मला वाटले, तर आता एका क्षणात मी तुझे मस्तक धडावेगळे करू शकतो, पण मी तसे करणार नाही. एकतर तू निशस्त्र आहेस. दुसरे म्हणजे मला सुभद्रेला विधवा करायचे नाही. त्याशिवाय आजवर तू स्वत:ला एक महायोद्धा, महान धनुर्धर समाजात आलास, पण आता मात्र यापुढले उर्वरित आयुष्य आजच्या अपमानाची खंत उरी बाळगत जगण्याची शिक्षा मी तुला देणार आहे, तुला आता इथून निशस्त्र, निर्वस्त्र अवस्थेत पायीच परत जावे लागेल. पण घाबरू नकोस. तुला सोबत असावी, आणि अनुभवाचे चार शब्द सांगणारे वडीलधारे कुणी बरोबर असावे, म्हणून या सर्व वृद्ध यादवांना तुझ्यासवे येऊ देत. तसेच अपंग, रुग्ण हेही तुझ्यासोबत असावेत. त्यांची सेवा करून काहीतरी पुण्य तुझ्या गाठीस लागेल. दोन मास पायी चालल्यावर तुम्ही हस्तिनापुरास पोहोचाल. वाटेत तुमच्यावर हल्ले होऊ शकतात, पण तुझ्यासारखा परमवीर बरोबर असताना कसले भय ? तरीसुद्धा या यादव स्त्रियांपैकी कुणाला आमच्याबरोबर इथे राहायचे असेल, तर त्या राहू शकतात. मात्र इथे त्यांना द्वारकेतल्याप्रमाणे सुखासीन जीवन लाभणार नाही. प्रत्येकाला काबाडकष्ट करूनच उपजीविका करावी लागेल. ... राहता राहिली तू द्वारकेतून आणलेली संपत्ती. मी तुला इथून जिवंत सोडत असलो, तरी यापुढील वाटेत भेटणार्‍या टोळ्या तसे करणार नाहीत. संपत्ती लुटण्यापूर्वी ते तुम्हा सर्वांना ठार करतील, त्यापेक्षा ती इथेच राहू दे. तुझ्यापेक्षा त्या संपत्तीवर आमचाच जास्त हक्क आहे. यादवांनी आम्हाला पिढ्यान पिढ्या नागवले, त्याची अंशत: तरी भरपाई त्यातून होईल. तुम्ही सर्वांनी हस्तिनापुरास जिवंत पोचावे, म्हणून मी शेळ्या-मेंढ्यांचा एक मोठा कळप तुझ्याबरोबर देत आहे. त्यातून तुमची दुधाची, अन्नाची सोय होइल. ...आणि हो, तू हस्तिनापुरास पोहोचल्यावर तुझ्या प्रजेला, आणि विशेषत: सुभद्रेला अभीर-भैरवाचे सतत स्मरण होत रहावे, म्हणून तुझ्या कपाळावर मी त्याचे निशाण कायमचे उमटवणार आहे" ...एवढे बोलून मी धारदार खड्गाने अर्जुनाचे पूर्ण मुंडण केले, आणि त्याच्या कपाळावर अभीर-भैरवाची तप्त लोहमुद्रा उमटवून त्याला वृद्ध-अपंगांच्या जथ्यासह हस्तिनापुराच्या दिशेने रवाना केले. k अर्जुनाचे मुंडण: (चित्रकार अज्ञात) १८५१ -१८६० मधील वुडकट छापा. -------------------------------------------------------- समाप्त ---------------------------------------------------------

Book traversal links for सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३: अंतिम)

  • ‹ सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
इतिहास
वाङ्मय
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
लेख
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
49878 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

बहुत बढीया!!

लॉरी टांगटूंगकर
Wed, 08/07/2013 - 21:41 नवीन
प्रचंड आवडलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद ....

राघवेंद्र
Wed, 08/07/2013 - 18:57 नवीन
चित्रगुप्त आणि सर्व मिपाकरांना या माहितीपुर्ण लेखामाल व प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments

कल्पनाविलास

पैसा
Wed, 08/07/2013 - 19:56 नवीन
चित्रगुप्तांचा कल्पनाविलास आवडला. आणि इतर माहितीपूर्ण चर्चा आणि वल्लीचा दुसरी बाजू दाखवणारा संवाद सगळंच आवडलं! एकूणात ज्ञान आणि मनोरंजन युक्त मस्त धागा!
  • Log in or register to post comments

__/\__

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 08/07/2013 - 20:13 नवीन
अत्यंत सुंदर मालिका... मनापासून आवडली.
  • Log in or register to post comments

वेगळ्या कोनातून महाभारताकडे

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/07/2013 - 21:10 नवीन
वेगळ्या कोनातून महाभारताकडे बघणारी चित्रमय कथा आवडली. व्यासांनी साधारणपणे "जसे घडले तसे" लिहून ठेवले आहे... प्रसंगाचे विश्लेशण अथवा मानसिकता उलगडायचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे चित्रगुप्तजी आणि वल्लीसाहेब दोघांचेही दृष्टीकोन किंवा दोघांच्या दृष्टीकोनांतले थोडेथोडे असे काहिही खरे असू शकते किंवा सत्य अजून काही वेगळे सुद्धा असू शकेल... आणि ह्याच गोष्टीने हजारो वर्षांनंतरसुद्धा महाभारताचे आकर्षण कायम आहे. मूळ लेख आणि प्रतिसाद वाचताना खूप मजा आली.
  • Log in or register to post comments

आवडलं बॉ ! चित्र अन गोष्ट

शिल्पा ब
Wed, 08/07/2013 - 21:58 नवीन
आवडलं बॉ ! चित्र अन गोष्ट दोन्ही छान.
  • Log in or register to post comments

शेवट काहि रुचला नाहि.

अर्धवटराव
गुरुवार, 08/08/2013 - 21:43 नवीन
महाभारत कथेची पार्श्वभूमी, पीडीतांचे क्रांतीकारी विचार, अत्योत्तम चित्रसंगती... हे सर्व मिळुन अफलातुन कलाकृती तयार झाली. एकदम झकास. पण शेवट फारसा रुचला नाहि. अभिरमन्यु चाचा नेहरु व्हायला हवा होता, तो विनाकरण बॅ. जीना झाला. यादवांचं आयुष्य एकुणच वादळी होतं. पहिले तर क्षत्रीय समाजात मान्यता मिळवायला संघर्ष. मग मिळवलेलं स्थान टिकवुन ठेवायला संघर्ष. अभिरमन्यु पहिल्या दोन भागात जितका बुद्धीमान रंगवला गेलाय, त्यातुन त्याला जंगली आदिवासी समाज व्यवस्था व (सो कॉल्ड) सुसंस्कृत शहरी राज्यव्यवस्था यातील भेद ठसठशीतपणे जाणवायला हवा होता. शहरी राज्यव्यवस्था अपरिहार्य आहे हे उमगायला हवं होतं. अभिरमन्यु शेवटी पोथीनिष्ठ कम्युनिझम व अरुंधती रॉय/मेधा पटकर या मायबापांचं कन्फ्युस्ड अपत्य ठरला. श्रीकृष्णाने कंसापासुन गोकुळाचे रक्षण केले. ते केवळ मानवाधिकार कॅटॅगरीचे नव्हते, तर सुदृढ ग्रामीण अर्थव्यवस्थेला मास बिझनेस टाईप शहरी अर्थव्यवस्था भारी पडत होती, ति ग्रामीण व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न कृष्णाने केला. कर्मकांडात अडकुन पडलेला भक्तीभाव त्याने निसर्गाकडे वळता केला (गोवर्धन पूजा). प्रसंगी पशुपालनाला बाधक ठरणारे नागवंशीय जीवन त्याने गोकुळापासुन दूर लोटले (कालिया मर्दन). पुढील काळात राजकारणाच्या प्रवाहाचा वापर करुन सामाजीक अभिसरण घडवुन आणाण्याचा प्रयत्न केला (जांबुवंताच्या मुलीशी लग्न करणे, १६००० बायका करणे). तत्कालीन जनसामान्यांच्या भल्यासाठी त्याने जे काहि प्रयोग केले चाणाक्ष्य अभिरमन्युला उमगायला हवे होते. हीच पायवाट पुढे अभिरांच्या उत्थानाचा राजमार्ग बनवणे त्याला शक्य होते/ते जास्त प्रॅक्टीकल होते. असो. शेवटी हा कल्पनाविलास आहे. कोणते पात्र मनाच्या कुठल्या दशेत काय करेल हे सर्वस्वी लेखक ठरवणार. वल्लीशेठचा "श्रीकृष्ण उवाच" लय भारी. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

ठीक

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/08/2013 - 21:48 नवीन
ठीक आहे पण बर्‍याचश्या वाक्यांवर हसु आवरता आले नाही उदा. राजसूय यज्ञाचे वेळी तुझ्यापेक्षा अनेक वयोवृद्ध, थोर पुरुष उपस्थित असूनही अग्रपूजेचा मान मात्र तुला मिळावा, यावर शिशुपालाने हरकत घेतली म्हणून जसा तू तडकाफडकी त्याचा वध केलास, या दिवशी कर्ण तुला निश्चितच ठार करणार होता. परंतु तू माझी शिकार होतास. मी धारदार खड्गाने अर्जुनाचे पूर्ण मुंडण केले, आणि त्याच्या कपाळावर अभीर-भैरवाची तप्त लोहमुद्रा उमटवून त्याला वृद्ध-अपंगांच्या जथ्यासह हस्तिनापुराच्या दिशेने रवाना केले. =)) =)) =))
  • Log in or register to post comments

+१११११११

स्पा
Sun, 08/11/2013 - 09:10 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ

आदिजोशी
Mon, 08/12/2013 - 19:07 नवीन
भयानक विनोदी लिखाण. लेखन स्वातंत्र्याच्या नावावर जी काय तोड फोड केली आहे ती भन्नाटच आहे. असे सुचते तरी कसे म्हणतो मी. श्रीकॄष्णाचा सर्व खजीना एका वस्त्रात भरणे काय, हजारो सैनीकांना कंठस्नान घालणार्‍या अर्जुनाला दगड मारून जायबंदी करणे काय, अर्जुनाचा चुकणारा नेम काय, कुठची कुठची चित्र शोधून बादरायण संबंध जोडणे काय... अशा भरपूर विनोदी घटनांनी हा भाग ठासून भरला आहे. इतिहास स्वतःच्या नजरेतून बघायच प्रयत्न सगळेच करतात. पण इतका विनोदी प्रयत्न दुसर्‍या कुणाला जमला नसता आणि जमणारही नाही. गोविंदाच्या सिनेमांसारखी भरदोल एंटरटेनमेंट :)
  • Log in or register to post comments

विनोद

चित्रगुप्त
Tue, 08/13/2013 - 19:15 नवीन
कृष्णाने सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी लग्न करणे, ऐन युद्धाचे वेळी तासन तास गीतेचे श्लोक ऐकवणे, 'पाच जणात भिक्षा वाटून घ्या' असे आईने सांगितले, म्हणून द्रौपदीला पाच जणांनी वाटून घेणे, परपुरुषांकडून 'नियोग' करवणे, बाण सोडून पाऊस पाडणे, मडक्यातून शंभर मुलांचा जन्म, दोन वर्षे गर्भात रहाणे, अश्या अनेक तुफान विनोदी गोष्टी महाभारतात आहेत, त्यात आमची थोडीशी भर. अर्जुन द्वारकेतील स्त्रिया व संपत्ती घेऊन निघाला होता, त्याला अभीरांनी हरवून स्त्रिया व संपत्ती लुटून नेली, त्यावेळी अर्जुनाचा 'अक्षय भाता' काम करेनासा झला, तो 'मंत्र' विसरला, कृष्णाला पारध्याने पावलात बाण मारल्याने त्याचा अंत झाला, वगैरे सर्व महाभारतात आहेच, ते कसे घडले असावे, याबद्दल कल्पना केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

नियोगात नेमके काय विनोदी आहे

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 08/17/2013 - 02:57 नवीन
नियोगात नेमके काय विनोदी आहे असे तुम्हाला वाटते? शिवाय सोळा हजार स्त्रियांशी लग्न करण्याची कथा तुम्हाला सविस्तर माहित आहे असे दुसर्या धाग्यातील प्रतिसादातून दिसते. मग त्याची संभावना इथे विनोदी म्हणून का केली ते ही सांगितलेत तर आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

रीकॄष्णाचा सर्व खजीना एका

स्पा
Mon, 08/12/2013 - 20:14 नवीन
रीकॄष्णाचा सर्व खजीना एका वस्त्रात भरणे काय, हजारो सैनीकांना कंठस्नान घालणार्‍या अर्जुनाला दगड मारून जायबंदी करणे काय, अर्जुनाचा चुकणारा नेम काय, कुठची कुठची चित्र शोधून बादरायण संबंध जोडणे काय... अशा भरपूर विनोदी घटनांनी हा भाग ठासून भरला आहे. इतिहास स्वतःच्या नजरेतून बघायच प्रयत्न सगळेच करतात. पण इतका विनोदी प्रयत्न दुसर्‍या कुणाला जमला नसता आणि जमणारही नाही. गोविंदाच्या सिनेमांसारखी भरदोल एंटरटेनमेंट
=)) =))
  • Log in or register to post comments

बेशर्त स्वीकृती.

चित्रगुप्त
Mon, 08/12/2013 - 23:47 नवीन
भरदोल एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट ... बेशर्त स्वीकृती. Image removed.
  • Log in or register to post comments

अतीशय सूदंर कल्पनाविस्तार

कंस
Tue, 08/13/2013 - 20:34 नवीन
अतीशय सूदंर कल्पनाविस्तार
  • Log in or register to post comments

नवीन मिपाकरांसाठी.

चित्रगुप्त
Sat, 01/04/2014 - 20:33 नवीन
नवीन मिपाकरांसाठी.
  • Log in or register to post comments

कल्पना विलास व सत्य घटनांची बेमालूम भन्नाट मिसळ

शशिकांत ओक
Sat, 01/04/2014 - 23:22 नवीन
चित्रगुप्त, अत्यंत कष्टपुर्वक महाभारत कालीन घटना चक्राच्या कचाट्यातील चक्रावून टाकणाऱ्या सूत्रांना लीलया गुंफून तयार केलेली लेखमाला वाचनीय व मननीय होती . त्यामुळे आपल्या कष्टांचे कौतुक व आभार! अनेक लोकांनी विविध प्रतिसादातून आपले कौतुक केले आहे. या लेखमालेला वल्ली यांच्या माहिती पुर्ण कलाबतूंनी मालेला हाराचा भारदस्त पणा आणला त्यांचे ही आभार
  • Log in or register to post comments

महाभारत एक महासागर आहे.

विवेकपटाईत
Mon, 01/06/2014 - 21:23 नवीन
महाभारत एक महासागर आहे. आपापल्या दृष्टीकोनातून प्रत्येक सर्जक मोती वेचतो. आतापर्यंत विभिन्न भाषेत हजारो लेखकांनी आपापल्या दृष्टीने महाभारतातील पात्रांना रंगविले आहे. चित्रगुप्त यांनी आपली कथा सुंदर रीतीने मांडली आहे. मला ही कथा आवडली.
  • Log in or register to post comments

अगदी जहबरदस्त लेख माला

महासंग्राम
Tue, 05/21/2019 - 16:29 नवीन
अगदी जहबरदस्त लेख माला महाभारताचा एक वेगळा पैलू कळाला
  • Log in or register to post comments

चलो एक बार फिर से..

चित्रगुप्त
Fri, 08/20/2021 - 08:07 नवीन
नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा...
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नीलस्वप्निल
Fri, 08/20/2021 - 17:37 नवीन
धन्यवाद धागा वर आण्ल्याबद्द्ल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा