✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लबाड सभ्य

स
सृष्टीलावण्या यांनी
Sat, 08/25/2012 - 06:30  ·  लेख
लेख
सध्या सत्तालोभी र्‍हस्व दृष्टि राजकारणी मंडळींनी काही स्वयंघोषित इतिहासकारांना हाताशी धरून जातीचे राजकारण चालवले आहे. विशेषकरून ब्राह्मणद्वेष हा त्या गलिच्छ खेळीचा पाया झालेला आहे. अफझलखानाला पिता मानणारी मंडळी सध्या कृष्णाजी भास्कर ह्या अफझलखानाच्या वकिलावर चिखलफेक करताना आढळतात. ह्यात त्यांनी आनंद मानायला कोणाची हरकत असायला काहीच कारण नाही. कारण कोणीतरी (बहुदा विनोबाजींनी) म्हटले आहे की श्रोते कीर्तनाचा लाभ घेत असताना पालीचा आनंद मात्र किडे मटकवण्यात असतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे ह्या सर्व स्वघोषित विद्वज्जनांना महाराजांचे वकील श्री. गोपीनाथपंत बोकील ह्यांचा अनायास विसर पडलेला दिसतो. हे तेच गोपीनाथपंत आहेत जे स्वराज्यावर अफझलखानासारखी विलक्षण धूर्त, कपटी आणि कावेबाज वावटळ आली असताना शिवाजी राजांना ओतप्रोत विश्वासाने म्हणतात, “महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. आपण हिंमत धरोन एकांगे करून खानास मारणे. त्याचे लष्कर साफ लुटणे. राज्य आपले करणे.“ शिवाजीराजे म्हणजे लखलखता हिरा तर त्यांचे सहायक मंत्रीगण म्हणजे जणू सोन्याचे कोंदण. पाहाण्यासारखी गोष्ट आहे की खान राजांच्या मुलुखात आल्यावर साम-दाम-दंड भेदाने राजांची माणसे फोडायचा प्रयत्न करतो. वतनाच्या लोभाने त्याला बळी पडणार्‍यांत मंबाजी भोसले (महाराजांचे चुलत काका), केदारजी व खंडोजी खोपडे, जाधवराव, रविराज ढोणे, शेडगे, धायगुडे, कोकरे, इंगळे, सुलतानजी जगदाळे ह्यांच्यासारखी माणसे आहेत पण गोपीनाथपंत बोकीलांसारखा सामान्य कुलकर्णी मात्र राजांशी एकनिष्ठ राहतो. आज गोपीनाथपंत बोकीलांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही पण सासवड जवळील हिवरे गावाचे जोशी-कुलकर्णीपद ह्यांच्याकडे पूर्वापार चालत आले होते. शिवाय सुपे परगणा आणि कर्यात बारामतिचे देशकुलकर्णी पदाचे वतनही त्यांच्याकडे चालत आलेले असावे. १६४० मध्ये ते पुण्याचे मुजुमदार होते आणि १६५६ पासून राजांचे चिटणीस. ह्या तालेवार, मातब्बर असामीला राजांच्या कुटुंबात एखाद्या ज्येष्ठ माणसाप्रमाणे मान होता. त्यांचा घरोबा होता इतका की सगळे त्यांना काकाच म्हणत, ‘पंताजी काका ह्यांचा मान तो इतका की त्यांनी आऊसाहेबांसोबत सोंगट्या खेळाव्या’ असा त्यांचा उल्लेख आढळतो. राजे पंताना म्हणतात की खानाने बोलणी करताना बेलभंडारा (क्रियाशपथ) मागीतला तरी खुशाल द्यावा. अनमान करू नये. त्या काळात शत्रुचाही ब्राह्मणांच्या सत्यकथनावर विश्वास होता. त्यामुळे शपथेवर खोटे बोलणे पंतांना किती कठीण असेल पण त्यांनी स्वराज्यासाठी तेही केले.खानाने पंताकडून जानव्याची शपथ घेतली. ह्याच कपटी खानाने श्रीरंगपट्टणचा राजा कस्तुरीरंगन ह्याला तहाच्या मिषे बोलावून त्याचा खून केलेला असतो. त्यामुळे अश्या धूर्त, चाणाक्ष व विजयासाठी कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध न बाळगणार्‍या ह्या खानाला आपल्या वाक्पटुतेने जावळी सारख्या कुबल जागी बोलवून आणणे ही पंतांच्या बुद्धिचातुर्याची कमालच म्हणायला हवी. आपल्याकडे विनोदाने म्हणतात की चीनशी भारताच्या वाटाघाटी म्हणजे वाटा त्यांना आणि घाटा आपल्याला. पण पंत इतकी सावध पण लाघवी बोलणी करतात की खानासारखा कसलेला मुत्सद्दी पण पाघळतो आणि सह्याद्री हे मृत्युमुख आहे हे माहित असताना सुद्धा राजांना अपेक्षित अटींवर जावळीत येतो. हे घडणे केवळ पंतांच्या कौटिल्याचे फळ आहे. पंत खानासोबत केवळ वाटाघाटीच करतात असे नाही तर खानाच्या छावणीत राहून खानाचे विचार, त्याचे सैन्य, प्रमुख सेनानी, सैन्यरचना, अश्वदळ, तोफखाना इ. बित्तंबातमी काढतात. म्हणूनच बाबासाहेब पुरंदरे गोपीनाथपंतांना सभ्य लबाड किंवा लबाड सभ्य म्हणतात, वकील असावा तर असाच. पण पंतांचे हे प्रसंगावधान, ही धूर्तता इथेच संपत नाही. खान व राजांच्या भेटीच्या दिवशी गोपीनाथपंत खानाला आणण्यासाठी खानाच्या छावणीत पोहोचले. पाहातात तो खानाने ठरलेल्या अटींना डावलून १५०० हशम सोबत घेतले होते. सुरूवातीला पंतांनी ह्या सैन्याला हरकत घेतली नाही. मात्र खानाचा हा लवाजमा जनीच्या टेंबाच्या पायथ्याशी “खाड्याच्या खोंडात“ आल्याबरोबर पंत काहीतरी अचानक जाणवल्यागत उभे राहिले आणि बोलले, “इतका जमाव घेऊन गेलियाने राजा धास्त खाईल. माघारा गडावरी जाईल. भेटी होणार नाही.... शिवाजी म्हणजे काय? त्यास इतका सामान काय करावा?“ खानाचा आता नाईलाज झाला. ह्या तुकडीचे येणे ठरलेल्या अटींच्या विरूद्ध होते हे खरेच आणि परत भेटीची वेळही पुढे पुढे सरकत होती. अश्या रीतीने पंतांनी खानाच्या खास तुकडीला खानापासून वेगळे केले व अडनिड्या जागी आणून ठेवले. परकी मुलुख आणि जावळीसारखे घनदाट, कीर्र जंगल. खानाच्या हत्येनंतर सर्वप्रथम ही तुकडी विनासायास कापली गेली. अजून एक अतिशय स्तुत्य गोष्ट म्हणजे वृद्ध पंतांना वारंवार खानाच्या भेटीला जावे लागते. थकलेले, वाकलेले काका प्रतापगड १६ कोस हे अंतर कधी पायी तर कधी पालखीतून तर कधी घोड्यावरून करतात. बरं हा मार्ग तरी साधा, सोपा, सरळ आहे का?... तर नाही.एकतर जावळीचे घनदाट जंगल त्यातून अर्ध्या कोसाचा प्रतापगड उतरायचा, दीड कोसाचा महाबळेश्वराचा डोंगर चढायचा, परत दीड कोसाचा पसरणीचा घाट उतरायचा. हे श्रम विलक्षणच म्हणायला हवेत. ह्यावरून कळते की अफजलखानाच्या ससैन्य विनाशात पंतांची कामगिरी किती महत्त्वाची आहे आणि हे जाणूनच राजांनी पंतांचा विशेष सत्कार केला. त्यांना एक लक्ष (आकडा पुन्हा वाचावा) होन इनाम दिले. त्यांचे राहते गाव मौजे हिरवे तर इनाम दिलेच पण सोबत शिरवळ परगण्यातील मौजे भोळी व मौजे मांडकी येथे प्रत्येकी १ चावर जमीन इनाम दिली. तसेच त्याच शिरवळ परगण्यातील मौजे घरवाडा व मौजे मांडकी येथे सेटेपणाचे वतन इनाम दिले. खरोखरच माणसे निवडून, वेचून, जोडून त्यांच्याकडून ईश्वरी कार्य घडवावे आणि त्या कार्याची दखल घ्यावी ती जाणत्या शिवाजी राजांनीच. असो. गोपीनाथपंतांच्या उत्तरायुष्याबाबत अधिक माहिती मिळत नाही पण वाईमध्ये सर्वात जुना वाडा गोपीनाथ पंत ह्यांचा आहे अशी माहिती महागणपतिवाई ह्या संकेतस्थळावर मिळते. अर्थातच गोपीनाथपंतांसारख्या अनमोल रत्नावर अजून संशोधन होण्याची आवश्यकता आहे आणि तेही मनात कोणतेही किल्मिष न ठेवता. कारण जोतिबा आपल्या फुले रचनावली २/७७ येथे म्हणतात – हरामखोर गोपीनाथपंतांच्या मदतीने शिवाजीने दगलबाजीने अफजलखानाची हत्या केली. सहाजिकच मनात प्रश्न येतात – १) शिवाजीराजांना “महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. आपण हिंमत धरोन एकांगे करून खानास मारणे. त्याचे लष्कर साफ लुटणे. राज्य आपले करणे.“ असे आत्मविश्वासाने सांगणारे स्वराज्याशी एकनिष्ठ आणि निबिड अरण्यातून १६ कोस अंतर कापून अनेकदा खानाच्या भेटीला जाणारे आणि हिंदवी स्वराज्यासाठी खानाच्या सैन्याविषयी बित्तंबातमी काढणारे गोपीनाथपंत हरामखोर कसे? 2) श्रीरंगपट्टणचा राजा कस्तुरीरंगन ह्याला आणाशपथा देऊन तहासाठी बोलावून त्याचा खून करणार्‍या अनैतिक, कपटी खानाचा जर शिवाजीराजांनी भेटीला बोलवल्यावर स्वसंरक्षणासाठी जर कोथळा बाहेर काढला तर ती दगलबाजी कशी काय? ३) (प्रेमात आणि) युद्धात सर्व काही क्षम्य असते. मानवाचा वैश्विक स्तरावरील राजकारण व युद्धेतिहास हा धोका, धूर्तता, दगलबाजी, विश्वासघात, गनिमी कावा ह्यांनीच भरलेला आहे. प्रश्न केवळ इतकाच असतो की हे सर्व करणार्‍याचा अंतर्हेतु काय आहे. शिवाजीराजांचे राज्य हे लोककल्याणासाठीच होते हे जोतिबांना ठाऊक नव्हते का? ४) केवळ विशिष्ट जमातीविषयी द्वेष मनात ठेऊन पूर्वग्रहदूषित, एकांगी इतिहासलेखन करणे म्हणजे सत्यशोधन होते का? संदर्भग्रंथ :– वेध महामानवाचा – लेखक - डॉ. श्रीनिवास सामंत राजा शिवछत्रपति - लेखक – ब. मो. पुरंदरे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
इतिहास
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
मत
आस्वाद
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
15228 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

परत नविन धागा? अरण्य रूदन

कापूसकोन्ड्या
Sat, 08/25/2012 - 07:42 नवीन
माहिती उपयुक्त आहेच, पण हे वाक्य खटकले
सध्या सत्तालोभी र्‍हस्व दृष्टि राजकारणी मंडळींनी काही स्वयंघोषित इतिहासकारांना हाताशी धरून जातीचे राजकारण चालवले आहे. विशेषकरून ब्राह्मणद्वेष हा त्या गलिच्छ खेळीचा पाया झालेला आहे.
तुम्ही कुणाबद्दल बोलता आहात? त्यांच्या नसानसातून द्वेष भरलेला आहे त्यांना इतिहासाशी काहीही देणे घेणे नाही. आणि मिपा वरील काही सदस्याना हा विषय वाहता हवा असतो. ते काडया सारतात आणि गमजा बघत बसतात. जे बाबासाहेब पुरंदरे यांच्या सारख्या माणसाचा ते एकेरी उल्लेख करतात यातच त्यांची संस्कृती दिसते. They say " The best way to attend is not to attend at all". अर्थात, हा विषय त्यावरील प्रतिक्रिया हे सगळे पुन्हःप्रत्यय म्हणून पहायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

हुं

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 10:28 नवीन
" The best way to attend is not to attend at all".
थोडक्यात म्हणजे उपेक्षेने मारणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

असो..

ऋषिकेश
Sat, 08/25/2012 - 07:46 नवीन
असो.. स्वगतः मालकांनी मागे मुखपृष्ठावर काही सुचना लालेलाल अक्षरात टाकली होती ती सगळ्यांपर्यंत पोचलेली दिसत नाहिये
  • Log in or register to post comments

कोणती बरे...

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 10:30 नवीन
मालक, मेहेरबानी करून ती अक्षरे पुन्हा एकदा टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

उत्तम लेख. छान. संपादक मंडळ

llपुण्याचे पेशवेll
Sat, 08/25/2012 - 09:06 नवीन
उत्तम लेख. छान. संपादक मंडळ काय करते ते बघूया. जोतिराव फुल्यांबद्दल माझे मत फार टोकाचे आहे . त्यामानाने आंबेडकरांबद्दल चांगले आहे.
  • Log in or register to post comments

कळले नाही...

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 10:33 नवीन
संपादक मंडळ काय करते ते बघूया.
ह्या लेखात कोणावरही व्यक्तिगत टीका नाही आणि दुसरे म्हणजे काहीही पदरचे घातलेले नाही. योग्य तिथे संदर्भ दिलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

सर्वप्रथम

इरसाल
Sat, 08/25/2012 - 09:19 नवीन
हत्या ही सज्जन, सामान्य किंवा निर्दोष प्राण्याची (उदा. कसायाने गायीची हत्या केली) वध हा दुष्ट, वाममार्गी प्राण्याची. (शिवाजीमहाराजांनी खानाचा वध केला.) ही माझी आजपर्यन्तची समजुत किंवा माहिती आहे. तर माझा प्रश्न असा आहे की वर तुम्ही खानाची हत्या असे का बरे लिहीले असावे.
  • Log in or register to post comments

हत्या

नितिन थत्ते
Sat, 08/25/2012 - 10:35 नवीन
>>तर माझा प्रश्न असा आहे की वर तुम्ही खानाची हत्या असे का बरे लिहीले असावे. त्यांच्यात हत्याच म्हणतात. "गांधीहत्या आणि मी" असे पुस्तकाचे नाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

ओह..

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 10:40 नवीन
त्यांच्यात हत्याच म्हणतात.
त्यांच्यात म्हणजे फुले आणि मंडळींच्यात का? ;) असो. लेख पुन्हा (डोळ्यांत तेल घालून) वाचावा ही तुम्हाला पण प्रेमळ आग्रहाची विनंती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कोणाच्यात

नितिन थत्ते
Sat, 08/25/2012 - 10:54 नवीन
त्यांच्यात म्हणजे कोणाच्यात हे मी पुस्तकाचे नांव उद्धृत करून स्पष्ट केले आहे. अवांतर: पहिला प्रतिसाद देऊन झाल्यावर लेखिकेचे आधीचे धागे पाहिले. आणि उगाच प्रतिसाद दिला असे वाटले. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

आपण

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 13:54 नवीन
मी पुस्तकाचे नांव उद्धृत करून स्पष्ट केले आहे.
लेख पुन्हा (डोळ्यांत तेल घालून) वाचावा हे पण मी स्पष्ट केलेच आहे. ;)
लेखिकेचे आधीचे धागे पाहिले. आणि उगाच प्रतिसाद दिला असे वाटले.
काही लोकांचे अस्तित्वच मुळामध्ये उगाच असते. चालायचे.... :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

गांधीहत्या आणि गोवध

मन१
Sat, 08/25/2012 - 11:25 नवीन
"गांधींची हत्या झाली " आणि "भारतात गोवध सर्रास होउ लागलेत" ह्या वाक्यांची तुलना आठवली. भगतसिम्गबद्दलच्या धाग्यावर होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थत्ते साहेब

इरसाल
Sat, 08/25/2012 - 11:47 नवीन
गांधीहत्येला जर कोणी गांधीवध म्हणत असेल तर ते चुकच आहे. किंवा असे जो म्हणत आहे त्याच्या मानसिकतेवर अवलंबुन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अहो

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 10:36 नवीन
तर माझा प्रश्न असा आहे की वर तुम्ही खानाची हत्या असे का बरे लिहीले असावे.
हे काही माझे शब्द नव्हेत. कृपया लेख पुन्हा वाचाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

असो.

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 10:55 नवीन
प्रिय संपादक मंडळ, लेख टाकताना काही शब्दांना वेगवेगळे रंग दिले होते. ते दिसत नाही आहेत. दुसरे म्हणजे लेखातील परिच्छेद २ ओळ ३ मधील पडणार्यांसत हा शब्द पडणार्‍यांत असा हवा आहे. तिसरे म्हणजे लेखातील परिच्छेद शेवटचा ओळ ५ मधील गोपीनाथपंत (संदर्भ - एकनिष्ठ आणि उतारवयातील गोपीनाथपंत निबिड) हा शब्द काढून टाकावा व उतारवयातील हा शब्द उतारवयात असा करावा ही विनंती. तसदीबद्दल क्षमा करावी, आपली व सदैव विनम्र, सृष्टिलावण्या.
  • Log in or register to post comments

असो.

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 11:40 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

१००+ येऊ शकतात जर लेख टिकला

अमोल खरे
Sat, 08/25/2012 - 11:05 नवीन
१००+ येऊ शकतात जर लेख टिकला तर. एक गोष्ट मान्य करावीच लागेल कि जोतिबा फुले ह्यांनी "हरामखोर गोपीनाथपंतांच्या मदतीने शिवाजीने दगलबाजीने अफजलखानाची हत्या केली" असे वाक्य लिहिले हे खरोखरीच शॉकिंग आहे. म्हणजे ब्राम्हणांबद्दल द्वेश तर पुर्वीपासुन आहे, त्यात काही नवल नाही, मलाही लोकांनी तोंडावर ब्राम्हण म्हणुन नावे ठेवली आहेत (मुंबईत), बाकी ठिकाणी काय होत असेल ह्याचा अंदाज यायला हरकत नाही. पण जोतिबा फुलेंचे शिवाजी महाराजांशी काय वाकडे होते हे अजुनही कळत नाहीये. असो, बाकी गोपीनाथ बोकिलांचे चित्रण खुप आवडले. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

त्रिवार

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 13:42 नवीन
बाकी गोपीनाथ बोकिलांचे चित्रण खुप आवडले.
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

माहीतीपूर्ण

शुचि
Sat, 08/25/2012 - 13:09 नवीन
सुरेख व्यक्तीचित्रण!!! ______________ अवांतर - सृष्टीलावण्या, आपण खूप सुंदर उदाहरण दिलेत -
कोणीतरी (बहुदा विनोबाजींनी) म्हटले आहे की श्रोते कीर्तनाचा लाभ घेत असताना पालीचा आनंद मात्र किडे मटकवण्यात असतो.
अशाच प्रकारचे २ दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये आहेत - (१) जवळीच दूध शुद्ध आणि गोड| पदराचे आड त्वचेचिया| परी तो गोचीड तया अव्हेरून|रक्तचि पिऊन राही जैसा|| (२) कमळाचा कंद तळ्यामाजी असे| तेथे चि वसे बेडूकही| परि मकरंद सेवावा भ्रमरे| बेडकासी ऊरे चिखल चि|| पही ला दृष्टांत - गाईच्या गोड दूधाचा अव्हेर करून , रक्त पीणार्‍या गोचीडीचा आहे तर दुसरा चिखल खाणार्‍या बेडकाचा. जेव्हा भुंगा मध पीत असतो तेव्हा तिथेच जवळपास असणारा बेडूक चिखल खात असतो.
  • Log in or register to post comments

छान

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 13:37 नवीन
दोन्ही दृष्टान्त संग्रही ठेवावे असे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

यापुढे

तिमा
Sat, 08/25/2012 - 12:06 नवीन
यापुढे तो जातिवाचक शब्द लिहिताना कृपया 'ब्रा x x' असे लिहावे. म्हणजे कोणाच्याच भावना दुखावणार नाहीत. नांवाबद्दल एक शंका : आपल्याला सृष्टीलावण्ण्य' असे नांव घ्यायचे होते का ?
  • Log in or register to post comments

सूचना

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 13:39 नवीन
कृपया 'ब्रा x x' असे लिहावे. म्हणजे कोणाच्याच भावना दुखावणार नाहीत.
स्वागतार्ह व स्वीकार्य. ब्रा... असे न लिहिता ३ धागेवाले असे लिहिले तर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

अफझल खान वधासंदर्भात नविन

किसन शिंदे
Sat, 08/25/2012 - 13:18 नवीन
अफझल खान वधासंदर्भात नविन माहिती कळाली. बाकी लेखातला वादग्रस्त भाग सोडल्यास लेख उत्तमच झालाय.
  • Log in or register to post comments

अच्छा

सृष्टीलावण्या
Sat, 08/25/2012 - 13:41 नवीन
बाकी लेखातला वादग्रस्त भाग सोडल्यास लेख उत्तमच झालाय.
म्हणजे वादग्रस्त भाग सर्वोत्तम झाला आहे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अजून काही नवीन माहिती.

सृष्टीलावण्या
Sun, 06/16/2013 - 07:22 नवीन
प्रस्तुत लेखात आपण या ऐतिहासिक घटनेचे अनेक समकालीन साहित्यात आलेले संदर्भ तपासून यात किती सत्य आहे याचा शोध घेणार आहोत ……………… जेधे करिना काय म्हणतो ? "भेटिचे समई अफजलखानाने राजश्री स्वामींची मान बगलेस धरिली. तेव्हा राजश्री स्वामींनी पंज्यास पोलादी वागनखे पंज्यास घातिली होती. त्याचा मारा करून आतडी बाहेर काढिली. तेव्हा मान अंसडून पटा राजश्री स्वामींनी हाती घेतला. अफजलखान पालखीत घालून पळू लागले. हेजीब व हुद्देकरी यांणी राजश्रींवर हतेर धरिले. पंताजी गोपीनाथ यांस जखम लागली. तेव्हा जीव माहाला व सर्जाराऊ व लोक येऊन हेजीब व हुद्देकरी मारिले आणि पुढे जाऊन पालखीच्या भोयांच्या पह्या मारिल्या. पालखी राहिली. राजश्री स्वामी आलियावरी अफजलखानाचे सीर कापविले." जेधे करिन्यात नेमक्या कोणत्या व्यक्तिमुळे महाराजांच्या डोक्यास जखम झाली हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. मुळात महाराजांना जखम झाली होती का नव्हती हे सुद्धा जेधे करिन्यावरून स्पष्ट होत नाही. मात्र महाराजांचे वकिल पंताजी गोपीनाथ हे मात्र जखमी झाले होते असा स्पष्ट उल्लेख जेधे करिन्यात आहे. दस्तुरखुद्द महाराज जखमी झालेले असताना सुद्धा जेधे करिना मात्र याबाबतीत मौन पाळून उलट महाराजांचे वकिलच जखमी झाले होते असे आवर्जून म्हणतो. असे का ? याचे कोडे उलगडत नाही. सभासद बखर काय सांगते? "राजियाने भेटि देतां खानाने राजियाची मुंडी कवटाळून खांकेखाली धरिली. आणि हातीची जमदाड होती, तिचे मेणे (म्यान) टाकून कुशीत राजियाचे चालविली. तो अंगात जरीची कुडती होती त्यावरी खरखरली. अंगात लागली नाही. हे देखोन राजियांनी डावे हाताचे वाघनख होते, तो हात पोटात चालविला. खानाने अंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करितांच खानाची चरबी बाहेर आली. दुसरा हात उजवे हातचे बिचवियाचा मारा चालविला. ऐसे दोन वार करून मुंडी आसडून चौथरियाखाले उडी घालोन निघोन गेले. खानाने गलबला केला की, "मारिले ! मारिले ! दगा दिधला ! बेगी धावा !" असे बोलताच भोयांनी पालखी आणिली आणि पालखीत घालून उचलून चालविला. इतकियात संभाजी कावजी महालदार याने भोयाचे पाय मारिले आणि पालखी खाले भोयास पाडिले. खानाचे डोचके कापिले. हाती घेऊन राजियाजवळ आला. इतक्यात सैदबंडा पटाईत धावला. त्याने राजे जवळ केले. पट्ट्याचे वार राजियावरी चालवले. तो राजियाने जिऊ महालियाजवळ आपला हुद्दीयाचा पट्टा घेऊन, पट्टा व बिचवा असे कातर करून सैदबंडा याने चार वार ओढिले, पांचवे हाताने राजियाने सैदबंडा मारावा, तो इतकियात जिऊ माहाला याणे फिरंगेने खांद्यावरी सैदबंडियासी वार केला. तो पट्टियाचा हात हत्यारासमेत तोडिला. आणी खानाचे शिर घेऊन राजे सिताब गडावरी जिऊ माहाला व संभाजी कावजी माहालदार असे गेले." इथेही महाराज प्रत्यक्षतः जखमी झाले असा पुसटसाही उल्लेख नाही. शिवभारत काय सांगते ? मात्र कविंद्र परमानंद यांनी 'शिवभारत' या ग्रंथात हा प्रसंग वर्णिलेला आहे. अशी घटना घडलेली होती हे केवळ आज कविंद्र परमानंदांमुळे समजत आहे. कविंद्र परमानंदांना काय ठाऊक की त्यांनीच लिहून ठेवलेल्या या अद्भूत घटनेचा पुढे कसा राजकिय स्टंट केला जाणार आहे ते? कविंद्र परमानंद हे ब्राह्मण होते हे या ठिकाणी लक्षांत घ्यावे लागेल !!! शिवभारत काय सांगते ? शाहराजात्मज शिशो विहाय स्वां विहस्तताम् ! स्पृश्य हस्तेन मे हस्तमेहि देह्यंकपालिकाम् !! ३३ !! "अरे शाहजीराजाच्या पुत्रा, पोरा, आपली घमेंड सोडून (आपला) हात माझ्या हातांत दे, ये, आलिंगन दे." (33) एवमुक्त्वा स तद्ग्रीवां धृत्वा वामेन पाणिना ! इतरेण च तत्कुक्षौ निचखान कटातिकाम् !! ३४ !! असे बोलून त्याने (अफजलखानाने) त्यांची (शिवरायांची) मान डाव्या हाताने धरून दुसर्‍या-उजव्या हाताने त्यांच्या (शिवरायांच्या) कुशीत कट्यार खुपसली. (३४) नियुद्धविच्छिवस्सद्यस्तद्धस्तोन्मुक्तकंधरः ! ध्वनिना धीरधीरेण प्रतिध्वानितकंदरः !!३५!! प्रविशंतीमात्मकुक्षिभागमभ्रांतमानसः ! किंचिदाकुंचितांगस्तां शिवः स्वयमवंचयत् !!३६!! बाहुयुद्धनिपुण शिवरायांनी लगेच त्याच्या हातांतून मान सोडवून घेऊल अत्यंत गंभीर ध्वनीने दरी दुमदुमवून टाकली आणि गोंधळून न जातां आपले अंग किंचित आकुंचित करून आपल्या पोटात घुसणारी ती कट्यार स्वतः चुकवली. *** इथे शिवरायांचे बाहुयुद्ध कौशल्य (नियुद्ध) अप्रतिमपणे सांगितलेले आहे.*** ददाम्येतं कृपाणं ते गृहाण निगृहाण माम् ! इदं विनिगदन्नेव धीरः सिंहसम्स्वरः !!३७!! सिंहयायी सिंहकायः सिंहद्दकू सिंह कंधरः ! स्वपाणिद्वितयोद्भूत्विकोशायुधसुंदरः !!३८!! तं निर्यातयितुं वैरं प्रवृत्तोसौ महाव्रतः ! शिवः कृपाणिकाग्रेण कुक्षावेव तमस्पृशत् !!३९!! "हा वार तुला करतो, तो घे, मल धर" असे म्हणतच, सिंहासारखा स्वर, सिंहासारखी गती, सिंहासारखे शरिर, सिंहासारखी दृष्टी, सिंहासारखी मान असलेला व आपल्या दोन्ही हातांनी फिरविलेल्या नागव्या तरवारीने शोभणारा तो धैर्यवान व कर्तृत्ववान् (करारी) शिवाजी राजा, त्या वैर्‍याचा सूड घेण्यास प्रवृत्त होऊन त्याने, आपल्या तरवारीचे टोक त्याच्या (अफजलखानाच्या) पोटातच खुपसले. ***इथे शिवरायांनी बिचव्या ऐवजी तरवार (कृपाण) वापरली असे म्हटले आहे.*** आपृष्ठं विद्विषत्कुक्षिं तूर्णं तेन प्रवेशिता ! आकृष्यान्त्राणि सर्वाणि सा कृपाणी विनिर्गता !!४०!! त्यांनी (शिवरायांनी) शत्रूच्या (अफजलखानाच्या) पोटांत पाठीपर्यंत झटकन् खुपसलेली ती तरवार सर्व आंतडी ओढून बाहेर काढली. (४०) कुंप्यतः कार्तिकेयस्य शक्तिः क्रौंचाचलं यथा ! व्यभादफजलं भित्वां शिवखङ्गलता तथा !! ४१ !! कृद्ध कार्तिकेयाची शक्ति क्रौंच पर्वतास विदीर्ण करून जशी शोभली, तशी शिवरायाची तरवार अफजलखानास भेदून शोभूं लागली. (४१) घूर्णमानेन शिरसा बभावफजलस्तदा ! ईदृशं शिवराजेन पौरूषं दर्शितं यदा !! ४२ !! असा पराक्रम शिवरायांनी जेव्हा दाखविला तेव्हा अफजलखानाचे डोके गरगर फिरू लागून तो शोभू लागला. (४२) शिवभारत अध्याय २१ वा ततो रूधिरधाराभिरार्दीकृतमहीतलः ! प्रमत्त इव मोहेन घूर्णमानोऽतिविह्वलः !!४३!! यथैव शिवशस्त्रेण निःसृतान्युदराद्वहिः ! तथैवान्त्राणि सर्वाणि बिभ्राणः स्वेन पाणिना !!४४!! अनेन निहतोऽस्मीह जह्येनमहितं जवात् ! इति वक्ति स तं यावत् तावत् तत्पार्श्ववर्तिना !!४५!! तमेवाफजलस्यासिं समुद्यम्याभिमानिना ! जिघांसयैव सहसा शिवराजोऽभ्यपद्यत !!४६!! नंतर आपल्या रक्ताच्या धारांनी भूमि भिजवून, झिंगलेल्या माणसाप्रमाणे मुर्छेने झोकांड्या खात खात अतिविव्हल होत्साता तो खान शिवरायांच्या शस्त्राच्या योगाने पोटांतून बाहेर पडलेली आंतडी जशीच्या तशीच सर्व आपल्या हाताने धरून "याने मला येथे ठार केले, या शत्रूस वेगाने ठार करा." असे जो आपल्या पार्श्ववर्ती सेवकास म्हणतो तोच तो अभिमानी सेवक तीच अफजलखानाची तरवार उगारून ठार मारण्याच्या इच्छेने एकदम शिवरायांवर चालून गेला. (४३ - ४६) नो हनिष्यत्यमुं राजा द्विजातिमिति जानता ! स्वामिनाफजलेनासौ योद्धा युद्धे निवेशितः !!४७!! "ब्राह्मणास शिवाजी ठार मारणार नाही" असे जाणून धनी अफजलखानाने त्या ब्राह्मण योद्ध्यास युद्धांत निविष्ट केले होते. (४७) द्विजातिरिति तं श्रुत्वा जानानः शिवभूमिपः ! अभ्येतमपि तो हन्तुमिच्छन्निजनयस्थितः !!४८!! तो ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतीने वागणार्‍या शिवाजी राजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही. (४८) अप्राप्ता एव यावत्ते तत्राफजलसैनिकाः ! तावत्स एव तं खङंग् शिवस्योपर्यपातयत् !!४९!! अफजलखानाचे ते सैनिक तेथे पोचले नाहीत तोच त्याने (वकिल/हेजिबाने-कृष्णाजी भास्करने) ती तरवार शिवरायांवर हाणली. (४९) शिवस्तत्पातितं खङ्ग् खङ्गेनादत्त वै तदा ! शिरस्तदाधिपस्यापि पट्टिशेन व्यधाद् द्विधा !!५०!! त्याने मारलेली ती तरवार त्या समयी शिवरायांनी आपल्या तरवारीने अडवली आणी पट्ट्याने त्याच्यासकट त्याच्या धन्याच्या खानाच्या डोक्याचेहि दोन तुकडे केले. ***( येथे देखील महाराज जखमी झाल्याचा उल्लेख नाही)*** सौजन्य - अँटी संभाजी ब्रिगेड फेसबुक पान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

उत्तम माहिती. पेस्टवल्याबद्दल

बॅटमॅन
Sun, 06/16/2013 - 13:42 नवीन
उत्तम माहिती. पेस्टवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

चांगला लेख

पैसा
Sat, 08/25/2012 - 15:53 नवीन
पंतांबद्दल चांगली माहिती लिहिली आहे. शिवाजीमहाराजांनी जातपात, धर्म न पाहता उत्तमोत्तम माणसांची पारख करून स्वराज्य स्थापन केले. यातील काही लोक नंतर संभाजी राजे, राजाराम, ताराबाई यांच्या काळापर्यंत स्वराज्यासाठी झटत राहिले. साध्या शेतकर्‍यांनी सुद्धा वेळप्रसंगी हाती शस्त्र धरून शत्रूचा मुकाबला केला. शिवराय जर असे नसते तर इथे गवताला भाले फुटलेच नसते! मग लोकांना काही बोलू द्या ना! जे घडलंय आणि ज्याची इतिहासात नोंद आहे ते काही पुसून टाकता येणार नाही.
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
Sat, 08/25/2012 - 16:18 नवीन
सहमत आहे. परंतु हेही खरे की फुले किंवा ब्रिगेडींच्या लेखनात जसा ब्राह्मण द्वेष दिसतो तसा वरच्या लेखात ब्राह्मण-दुरभिमान दिसतो. लेखातले वर्णन वाचून असे वाटावे की अफजलखानाला संपवण्यातला ९५% वाटा त्या पंतांचा आहे. (ऐडियापण पंतांचीच आणि त्यावरची कार्यवाहीपण पंतांचीच- शिवाजीने फक्त बिचवा चालवला इतकेच). ते एक टोक आणि हेही एक टोक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ते एक टोक आणि हेही एक टोक.

अत्रुप्त आत्मा
Sat, 08/25/2012 - 19:35 नवीन
ते एक टोक आणि हेही एक टोक. >>> +++++++१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

-११११

रामपुरी
Sat, 08/25/2012 - 20:00 नवीन
असहमत लेखात "ब्राह्मण-दुरभिमान" असा सूर काही दिसला नाही. "ऐडियापण पंतांचीच आणि त्यावरची कार्यवाहीपण पंतांचीच- शिवाजीने फक्त बिचवा चालवला इतकेच" हे पण कुठे जाणवलं नाही. "शिवाजीराजे म्हणजे लखलखता हिरा तर त्यांचे सहायक मंत्रीगण म्हणजे जणू सोन्याचे कोंदण गोपीनाथपंत बोकीलांसारखा सामान्य कुलकर्णी " इत्यादी वाक्ये नीट वाचली असती तर असं काही वाटलं नसतं कदाचित. असो... आजकाल (काँग्रेसच्या आणि दिग्विजयच्या राज्यात) काही गोष्टींची फ्याशन आहे म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

छे छे.

अर्धवटराव
Sat, 08/25/2012 - 21:42 नवीन
पंत गोपीनाथ वगैरे कोणि नाहि खरं तर नेहरुंनीच शिवजीला मदत केली. इंदीराजी तर जीजाऊंच्या खास सल्लागार. राजीवजी महाराजांच्या मंत्रीमंडळात अत्यंत महत्वाच्या पदावर होते. आणि छत्रपतींचा खरा वारसा राहुलबाबा चालवतोय. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पण

सृष्टीलावण्या
Tue, 08/28/2012 - 12:31 नवीन
नेहरुंनीच शिवाजीला मदत केली.
टग्या, बाबा आणि आबा हे तर उजवे हात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/26/2012 - 09:53 नवीन
लेखातले वर्णन वाचून असे वाटावे की अफजलखानाला संपवण्यातला ९५% वाटा त्या पंतांचा आहे. ऐडियापण पंतांचीच आणि त्यावरची कार्यवाहीपण पंतांचीच- शिवाजीने फक्त बिचवा चालवला इतकेच :) सहमत आहे. कृष्णाजी भास्कर आणि गोपीनाथ पंत यांच्यात डावपेचाबाबत या प्रकरणार वरचढ ठरले ते गोपीनाथ पंत इतकेच असेही वाटते. बाकी, गोपीनाथ बोकीलांबद्दल इतकी माहिती नव्हती. धन्स. बाकी, म.फुले आणि त्यांचे विचार आपापल्या जागी योग्य आहेत. म.फुल्यांनी राजे शिवाजींवर पोवाडा लिहिला आहे, तो जालावर कुठे उपलब्ध आहे काय ? मिपाकर काही मदत करतील अशी अपेक्षा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>बाकी, म.फुले आणि त्यांचे

अमोल खरे
Sun, 08/26/2012 - 11:17 नवीन
>>बाकी, म.फुले आणि त्यांचे विचार आपापल्या जागी योग्य आहेत. ??? त्यांना शिवाजी महाराजांबद्दल इतका द्वेष असण्याचे कारण ? नाही महाराजांनी दगलबाजी वगैरे करुन खानाला मारलाय असं लिहिलाय म्हणुन विचारतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडाँ ना बहुधा म.फुले यांचे

गणामास्तर
Sun, 08/26/2012 - 11:39 नवीन
प्राडाँ ना बहुधा म.फुले यांचे शिवाजी महाराज सोडून ईतरांबद्दलचे विचार आपापल्या जागी योग्य आहेत असे म्हणायचे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

-१

अमोल खरे
Sun, 08/26/2012 - 17:16 नवीन
प्रा डाँ चे वाक्य नीट वाचा. बाकी त्यांनी खुलासा देऊ दे / नको देऊ दे, काय फरक पडत नाही, पण इथे संभाजी ब्रिगेडचे जे चाहते आहेत त्यांनी संभाजी ब्रिगेडने आता सगळीकडुन ज्योतिबा फुलेंचे पुतळे हटवणार का ? ते देखील स्पष्ट करावे. जातीजातीत इतका द्वेष निर्माण करुन ठेवलाय ह्या लोकांनी, आताची पिढी उलटी जातीभेदात जास्त गुरफटली गेली आहे, सुरुवात माझ्या अंदाजाने १० वी पास होण्यापासुन होत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

एक्स्क्युज मी :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/26/2012 - 18:07 नवीन
>>>> पण इथे संभाजी ब्रिगेडचे जे चाहते आहेत मी कोणत्याही ब्रिगेडचा चाहता नाही. माझी बांधिलकी आधुनिक विचारांशी आहे, इतकेच. बाकी,जालावर कधी तरी म.फुले आणि त्याच्या समग्र विचारांवरही जातीपातीची पादत्राणं उंबराबाहेर ठेवुन उत्तम चर्चा झाली पाहिजे असेही वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

एक शंका

सृष्टीलावण्या
Wed, 08/29/2012 - 21:20 नवीन
म.फुल्यांनी राजे शिवाजींवर पोवाडा लिहिला आहे
फुल्यांनी त्यांच्या समग्र वाङ्मयात (पान २६६) शिवाजीराजांविषयी जी मौलिक विशेषणे वापरली आहेत ती ह्या पोवाड्यात सुद्धा वापरली आहेत का? असो. फुल्यांची कल्पनाशक्ति पाहून थक्क व्हायला होते. त्यांच्याकडे बहुदा कालयंत्र (Time machine) असावे किंवा त्यांना दिव्यदृष्टी असावी. कारण इतर कोणत्याही इतिहासकाराने तोपर्यंत शिवाजीराजे अक्षरशून्य व अज्ञानी असल्याचा शोध लावला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युगपुरुषांना टीकेला सामोरं जावं लागतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/30/2012 - 07:29 नवीन
फुल्यांनी त्यांच्या समग्र वाङ्मयात (पान २६६) शिवाजीराजांविषयी जी मौलिक विशेषणे वापरली आहेत ती ह्या पोवाड्यात सुद्धा वापरली आहेत का? नाही. फुल्यांची कल्पनाशक्ति पाहून थक्क व्हायला होते. उपरोध लक्षात येतोय. पण कसं आहे, समाजसुधारकांना, युगपुरुषांना वेगवेगळ्या आरोपांना आपापल्या आणि नंतरच्याही काळात सामोरं जावं लागत असतं. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती त्यामुळे आपापले काही साचे असतात ते सोडून आपल्याला दुसरं काही बघणं तसं जड जात असतं. म.फुल्यांच्या काळात प्रचंड अज्ञान, दुष्ट रुढी, दैव, प्रारब्ध या फेर्‍यामधे समाज अगदी गुरफटुन गेला होता. समाजातील धुरीदरांना चांगलं वाईट काही कळत नव्हतं मुठभर लोक स्वतःला देव समजत होते ते करतात ते बरोबर असावं असा अनेकांचा गैरसमज होता. या सर्व गोष्टींमुळे अन्यायाने कळस गाठला होता. अज्ञान आणि सोशीकपणा वाढलेला होता अशा कराळ काळात त्यांनी केलेलं कार्य व्यक्तिगत मला मोठं वाटतं. आपण शिकलेल्या लोकांनी सुधारकांना व्यवस्थित समजुनही घेतलं पाहिजे असे वाटतं. असो. आपण दुव्यावर दिलेलं पान हे 'शेतकर्‍याचा असूड' मधलं आहे. एका पानाचा संदर्भ देऊन कोणताही विचार स्पष्ट होणार नाही. शेतकर्‍याचं शोषण कसं होतंय त्यावरचे फटके शेतक-याचे असुडात उत्तम ओढले आहे. आपण जमेल तेव्हा तटस्थवृत्तीने म.फुल्यांचे समग्र वाडमय चाळावे-वाचावे असे वाटते. असो... धाग्यावरील चर्चेतील नुर पाहता संवाद योग्य दिशेने जाणार नाही, असे वाटल्यामुळे या धाग्यावर आपल्या विचारांचा आदर करुन थांबतो आणि रजाही घेतो आहे. बाकी, गैरसमज नसावा. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

+१

अर्धवटराव
गुरुवार, 08/30/2012 - 09:57 नवीन
>>आपण शिकलेल्या लोकांनी सुधारकांना व्यवस्थित समजुनही घेतलं पाहिजे असे वाटतं दादानु... फुल्यांचे वाडमय समीक्षारुपाने येऊ देत. आपल्याकडुन लेखमालेच्या प्रतिक्षेत... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरं

सृष्टीलावण्या
Mon, 08/27/2012 - 06:52 नवीन
वरच्या लेखात ब्राह्मण-दुरभिमान दिसतो.
आपण जर तपशीलवार उदा. परिच्छेद १ ओळ ४ उत्तरार्ध अशी उदाहरणे दिलीत तर मुद्देसुद वाक्यशः आपल्या वादाला प्रतिसंवाद करता येईल आणि मी आपल्याला विनंती केल्याप्रमाणे हा लेख आपलाही सावकाश वाचून होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

परंतु हेही खरे की फुले किंवा

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 08/27/2012 - 12:13 नवीन
परंतु हेही खरे की फुले किंवा ब्रिगेडींच्या लेखनात जसा ब्राह्मण द्वेष दिसतो तसा वरच्या लेखात ब्राह्मण-दुरभिमान दिसतो.
कुठल्या वाक्यात दिसला ते सांगता का? तुमच्याकडे दिव्यदृष्टी असावी. ती आमच्याकडे नाही. तेव्हा दुराभिमान नक्की कुठे दिसला हे दाखवून आम्हांस उपकृत करावे ही विनंती.
लेखातले वर्णन वाचून असे वाटावे की अफजलखानाला संपवण्यातला ९५% वाटा त्या पंतांचा आहे. (ऐडियापण पंतांचीच आणि त्यावरची कार्यवाहीपण पंतांचीच- शिवाजीने फक्त बिचवा चालवला इतकेच).
लेख परत वाचला. असे काही सापडले नाही. तुमच्या दिव्यदृष्टीचा हेवा वाटतो.
ते एक टोक आणि हेही एक टोक.
होय, आणि तुमचेही एक टोकच. पण ते तुमचे असल्याने चालत असावे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मलाच काय

सृष्टीलावण्या
Tue, 08/28/2012 - 12:47 नवीन
ऐडियापण पंतांचीच आणि त्यावरची कार्यवाहीपण पंतांचीच
पण दस्तुरखुद्द गोपीनाथपंतांनाही तसे काही वाटत नसावे. ते म्हणतात - “महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. आपण हिंमत धरोन एकांगे करून खानास मारणे. त्याचे लष्कर साफ लुटणे. राज्य आपले करणे.“ [म्हणजेच ४ पैकी केवळ एक काम मी करतो बाकीची ३ आपणच करू जाणे (मी केवळ श्रीगणेशा करतो, आपण बाकी सर्व कार्ये सिद्धीस न्यावीत).]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ब्राम्हण दूरभिमान

भुमन्यु
Sun, 06/16/2013 - 16:35 नवीन
मी केवळ श्रीगणेशा करतो,>>>>>>> हाही ब्राम्हण दूरभिमान... कारण नवीन इतिहास संशोधनानुसार गणपती हा फक्त ब्राम्हणांचा देव होता (म्हणून त्याच्या गळ्यात जाणावे).... :P अवांतर: मलाही आज-काल ब्राम्हण असल्याची जाणीव तीव्रतेने होऊ लागली आहे. रागा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

-११११

रामपुरी
Sat, 08/25/2012 - 20:21 नवीन
असहमत लेखात "ब्राह्मण-दुरभिमान" असा सूर काही दिसला नाही. "ऐडियापण पंतांचीच आणि त्यावरची कार्यवाहीपण पंतांचीच- शिवाजीने फक्त बिचवा चालवला इतकेच" हे पण कुठे जाणवलं नाही. "शिवाजीराजे म्हणजे लखलखता हिरा तर त्यांचे सहायक मंत्रीगण म्हणजे जणू सोन्याचे कोंदण गोपीनाथपंत बोकीलांसारखा सामान्य कुलकर्णी " इत्यादी वाक्ये नीट वाचली असती तर असं काही वाटलं नसतं कदाचित. असो... आजकाल (काँग्रेसच्या आणि दिग्विजयच्या राज्यात) काही गोष्टींची फ्याशन आहे म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मुत्सद्दी

रमेश आठवले
Sun, 08/26/2012 - 15:01 नवीन
आपण गोपीनाथ बोकील यांना त्यांनी केलेल्या कार्यावरून मुत्सद्दी असे म्हणू शकत नाही का ? त्यांचा लबाड सभ्य असा उल्लेख derogatory वाटतो. ज्या अफझलखानाच्या मनात कपट असल्याचा पुरावा मिळतो त्याला आपण मुत्सद्दी म्हणता. आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी बोकीलांचे वर्णन लबाड सभ्य असे केले आहे असेही आपण लिहिले आहे. या दोन्ही विधानात विसंगती आहे असे आपणास वाटत नाही का ? बाबासाहेबांच्या वर्णना बद्दल शंका व्यक्त करण्याचे धार्ष्ट्य करीत आहे. चूक असल्यास क्षमस्व.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद द्यावासा वाटला

आनन्दा
Mon, 08/27/2012 - 13:03 नवीन
बाबसाहेबांनी म्हटले आहे की.. "वकील" म्हणजे लबाड सभ्य" आणि मला हे पटते. स्वकीयांप्रति सभ्य. आणि परकीयांप्रति लबाड. नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

आवडले

शुचि
Mon, 08/27/2012 - 14:06 नवीन
फँटॅस्टिक!! फारच इनसाईटफुल इन्टरप्रिटेशन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

जालावर शोध घेतला असता

सृष्टीलावण्या
Tue, 08/28/2012 - 12:39 नवीन
ज्या अफझलखानाच्या मनात कपट असल्याचा पुरावा मिळतो त्याला आपण मुत्सद्दी म्हणता.
मुत्सद्दी शब्दाचा अर्थ adj. inv. diplomatic, m. statesman, diplomat असा मिळाला. ज्याचे भाषांतर कूटनीतिज्ञ, राजनीतिज्ञ असे होऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

अर्रर्र....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/28/2012 - 19:46 नवीन
अर्रर्र, गोपीनाथ पंतांना म. फुल्यांनी हरामखोर म्हटलेलं नाही. ’फितुर’ ’लोभी ब्राह्मण’ ’अधम ’ म्हटलं आहे. आणि हे तरी का म्हटलं असावं वगैरे. एक माहितीपूर्ण प्रतिसाद म.फुल्यांच्या समग्र वाङमयाचा आधार घेऊन शिवाजीचा पवाडा, पत्र, आणि य. दि. फडक्यांचं मत याबात सविस्तर प्रतिसाद लिहिण्यासाठी जागा राखून ठेवत आहे. सविस्तर प्रतिसाद सवड मिळेल तेव्हा (बहुतेक रविवारी) डकवल्या जाईल. करिता माहितीस्तव सादर. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा