✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आम्हा घरी धन..

म
मोदक यांनी
Sun, 05/26/2013 - 12:53  ·  लेख
लेख
राम्राम मंडळी. खरडफळ्यावर गेले दोन दिवस अनेक जण आपापल्या आवडीच्या कविता देत आहेत.. त्यावरून या धाग्याची कल्पना सुचली. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया. लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या. मी सुरूवात करतो.. ******************************************************** गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन... ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत. आकाश आपल्यावर प्रसन्न असलं, कीं तिथून समुद्ररेखा दिसू शकते. सूर्य अस्ताला जात असावा, उतरता उतरता तो क्षितिजाशी टेकावा, त्या क्षणी थेट पश्चिम क्षितिजाशी सूर्यप्रकाशानं चकाकणारं सागरजळ दिसतं. अनेकदां ते पाहिलंही आहे. अर्थ असा, की थेट समुद्रापासून रायगडावेरी कशाचीही अटक नाही. समुद्रावर गर्दी करून जमलेला मेघांचा समूह पूर्वेच्या दिशेनं चालून येवू लागला, की त्याला आढळतो रायगड. एखाद्या प्रचण्ड चौरंगासारखा. अन् मग तो असा बरसू लागतो की सांगता पुरवत नाही. लोटावर लोट चालून येतात. ते थांबतच नाहीत. येतात आणि गडाच्या माथ्यावर कोसळतात. त्यांच्याबरोबरच येते धुई. ती सगळा डोंगर आपल्या कवेत घेते. हातावरचं कांही दिसत नाही. अगदीं आपल्या नाकाचा शेंडादेखील. त्या दिवसात धनगरं आपापल्या झापांमधून रानशेण्यांची शेकोटी करून तासन् तास तापत बसतात. इकडे पाऊस धुवांधार कोसळत असतो, तों तों धनगरं मात्र प्रसन्न होत असतात. कारण असा मोप पाऊस बरसला, की गड हिरवागार होणार असतो. त्याची म्हसरं अन् गावल्या भरपूर जोगावणार असतात. कासंड्या भरभरून दूध देणार असतात. तर त्या धनगरांशेजारी बसून एकीकडे शेकत, दुसरीकडे त्याच्या चौकश्या करीत बसणं इतकं सुखाचं असतं, म्हणून सांगू! त्यांच्यापास हवा तेवढा वेळ असतो. ती मोकळी झालेली असतात. भरंवसा निपजलेला असतो, कीं हा परदेशी पाहुणा आपला मित्र आहे. सखा सुहृद आहे. असं अंतर हरपलेलं असतं. मग ती नाना परींचं बोलत असतात. सुखाचं. दु:खाचं. प्रापंचिक चिंतांचं. गाईम्हशींचं. त्यांच्या वेतांचं. दुधाचं. तें सगळं ऐकून वाटू लागतं, की आपण आपल्या भोंतीचा प्रपंच म्हणजेच सगळं विश्व असं गृहीत धरतो, ते किती चूक आहे! मात्र हे ध्यानी येण्यासाठींही असं त्यांच्या पोटात शिरावं लागतं. त्यांच्या मनी भरंवसा निपजूं द्यावा लागतो. किंवा धर्मशाळेतल्या खोलींत चिप्प बसून असावं. नगारखान्याच्या ओवर्‍यात हात पाय पोटाशी घेवून बसावं. जगदीश्वराच्या देवळांत आसरा घेऊन पावसाचं चण्डनृत्य आनभवीत असावं. ध्यानी येवू लागतं, की पावसाच्या या धारानृत्यालाही एक ताल आहे. कधी तो धुमाळीचं बोट धरून बरसतो. कधी एकतालाच्या ठोक्यांत खाली उतरतो. कधी त्या धारांच्या त्रितालाचा ठेका सुरू असतो. चहुंकडून घेरून येणारं धुकट कुंद असतं. स्वत:वेगंळं काहीही दिसत नाही. कशाचंही भान नसतं. त्यात हा ताल असा कांही अंगी भरतो, की सांगता पुरवत नाही. हळूं हळूं पाऊसधारा उणावू लागतात. धुकट विरूं लागतं. कमींत कमी दिवसांतले कांही तास तरी मग बाहेर पडावं. पायांतळी वाहाणारे इवलाले वहाळ वलांडीत चहूं दिशा भटकावं. टकमकावर जावं. दिसली, तर तळातली शोभा पाहावी. काळ दुथडी भरून वाहात असते. पुन: धुकटं झाकोळून येतात. मग माघारे वळून, पायांतळी सांचलेल्या डबक्यांतलं पाणी उडवत गंगासागरावरून बालेकिल्ल्यात शिरावं. नगारखान्याबाहेर पडावं, बाजारपेठेत शिरावं. पावसधारांनी काय कवतिक केलं आहे, ते ध्यानी येवू लागतं. तें पाणी भुईचं कवच भेदून आत शिरलं. कड्यांची आवरणं भेदून आत घुसलं. त्या कवचा-आवरणाखाली गतवर्षी उन्हाळ्यांत वाळून कोळ झालेली तृणबीजं सुरक्षित असतात. तें पाणी त्यांच्या भंवताली गोळा होतं. त्यांना गुदगुल्या होतात. ती फुगतांत. टरारतात. अंग ठसठसू लागतं. मग तें वरील बाजूनं फुटतं. एक नाजूक लवलवता कोंब बाहेर येतो. पोपटी रंगाचा. तो भुई-कडा भेदून वर उठतो. मोठ्या नवलानं भंवताल न्यांहाळू लागतों. एक. दुसरा. तिसरा. सहावा. दहावा. शंभरावा. हजारावा. अन् पाहतां पाहतां अवघं धरतीमंडळ हिरव्या सौंदर्यानं बहरून येतं. सगळे डोंगर, दरे, कडे, दरकुटं, ओघळी, घळी, लवणं असं सगळं चिरतरूण होऊन जातं. महिन्या दीडमहिन्यात तृणपुष्पं आपले डोळे विस्मयानं उघडीत आकाश न्याहाळूं लागतात. सोनावळी धुमारते. तेरडा उंच उंच उठूं लागतो. त्याला कळे फुटतात. ती अनाम तृणपुष्पं, ती सोनावळी, ती तेरड्याची फुलं, असा काही विलक्षण रूपगौरव डोंगरभर दाटतो म्हणून सांगू! पायातळी असा वनपुष्पांचा गालिचा अंथरलेला असतो, आणि आपण विराण्या देशींच्या राजपुत्रासारखे त्या रूजाम्यावरून अवशेष धुंडाळीत हिंडत असतो... ********************************************************
  • आम्हां घरी धन... (२)
  • आम्हां घरी धन.....(३)

Book traversal links for आम्हा घरी धन..

  • आम्हां घरी धन... (२) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
वाङ्मय
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
87446 वाचन

💬 प्रतिसाद (172)

प्रतिक्रिया

गोनिदांच्या 'महाराष्ट्रदर्शन'मधुन ...

छोटा डॉन
Mon, 05/27/2013 - 13:37 नवीन
गोनीदांचे सगळेच लेखन छान आहे. अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला रात्रीच्या जेवणानंतर मागच्या अंगणात बसुन आजोबांकडुन ज्या गोष्टी सांगितल्या जातात तोच हळुवारपणा आणि तीच मंत्रमुग्धता गोनीदांच्या लेखनात आहे. त्यांच्या महाराष्ट्रदर्शन ह्या पुस्तकातली सुरवात मला फार रोमांचक वाटली, आता नक्की शब्द आठवत नाहीत पण काहीशी अशीच आहे. ------------------------------------- हा महाराष्ट्र-पुरुष अति प्राचिन आहे. कधी दक्षिणापथ, दक्षिणखंड, 'म्हराष्ट्र' देश, दंडकारण्य अशा अनेक नावांनी व साजांनी ओळखला जाणारा. अशा या वॄद्ध महाराष्ट्र-पुरुषाचे हे अस्फुट स्तोत्र आहे, हे रचण्यांतला हेतु काय ? एवढाच की तो महाराष्ट्र-पुरुष दॄष्टीसमोर उभा ठाकावा, त्याचं झांवळें झांवळें दर्शन घडावं, परिचितांना पुनर्प्रत्ययाच्या लाभ व्हावा, जाणत्यांना खुण पटावी, अबोधांना बोध व्हावा व त्यांचे बाहु फुरफुरावेत. आम्ही महाराष्ट्रिक कसें ? आमचे वैभव काय ? आमची महत्ता कशी ? आमचे गुण-दोष काय ? ह्या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळावीत हाच या स्तोत्र-रचनेचा हेतु आहे. महाराष्ट्राचा प्रत्येक धोंडा एकेका रोमहर्षक प्रसंगाचा साक्षी. त्याला जर कधी काळीं जिभा फुटल्या तर तो जे जे सांगेन ते ऐकुन प्रेते उठतील, कबंधे जिवंत होतील, षंढांच्याही अंगी वारे भरेल ! स्वातंत्रप्रियता ही तर महाराष्ट्राची अंगिक प्रवृत्ती. इंग्रजांना संपुर्ण भारत जिंकण्यापुर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या, काळसर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युद्धश्री, ती रग, तो आवेश अजुनही मावळला नाही, कधी मावळेल असे दिसतही नाही. हा गुण डोंगरावरुन वहात येणार्‍या भन्नाट वार्‍याचा आहे. कृष्णा, कोयना, पवना, भीमेच्या पाण्याचा आहे. महाराष्ट्र श्रीमंत आहे, स्वाभिमानी तर आहेच आहे, कणखर आहे, चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही, मित्रांसाठी जीव देणारा आहे, भक्तिभावाने गहिवरणारा आहे, लढताना प्राण तळहाताशी घेणारा आहे, थोडासा भांडखोरही आहे आन थोडीशी हिरवटपणाची झाकही आहे. पण किती ? अहो चंद्रावरल्या डागाएवढी हो ! ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता भोळा हा महाराष्ट्र आहे, आतिथ्यशील आहे. किंबहुना तो आहे त्या गिरिशिखरावरील दैवतासारखा, शंभुमहादेवासारखा ! संतापला तर ट्रिभुवने पेटवील आणि संतुष्ट झाला तर कारुण्याची गंगा वाहवील ... त्या महाराष्ट्राचे हे दर्शन ... !!! " ---------------------------------------------- - छोटा डॉन

पांढरे निशाण उभारण्याची

इनिगोय
Mon, 05/27/2013 - 14:58 नवीन
पांढरे निशाण उभारण्याची घाई करु नकोस मूठभर हृदया, प्रयत्न कर तगण्याचा, तरण्याचा. अवकाश भोवंडून टाकणा-या, या प्रलयंकारी वादळाचाही, एक अंत आहे. काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत लढत रहा तुझ्या नाजुक अस्तित्वानिशी. वादळे यासाठीच वापरायची असतात आपण काय आहोत ते तपासण्यासाठी नव्हे काय होऊ शकतो हे आजमावण्यासाठी.. - पद्मा गोळे. ------------------------ आणि हे ग्रेस.. स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने एकदा असाच बळजोरीने आपल्या अंगणात लावून घेतला जीवाला आलेलं पांगळेपण हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले सत्यभामेचा चडफङाट तर झालाच पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ मिळाले नाही ते नाहीच स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला आणि स्वत: मोकळा झाला प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी कृष्णाने हे पुरते ओळखले असणार म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले! राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ? तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार? कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले आणि अष्टनायिकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला राधेस जो मिळाला तो एकटाच उरला! - ग्रेस

साहित्याची श्रीमंती मिरवताना

इनिगोय
Mon, 05/27/2013 - 15:24 नवीन
साहित्याची श्रीमंती मिरवताना 'गदिमा' हे नाव घेतल्याशिवाय कसे राहता येईल? योगायोगाने सावळा आणि गोरा या रंगांवर लिहिलेल्या त्यांच्या दोन कविता लागोपाठच वाचायला मिळाल्या. दोन्ही कवितांमध्ये सावळ्या आणि धवल रंगासाठी त्यांनी इतक्या वेगवेगळ्या उपमा वापरल्या आहेत! त्यापैकी पहिलं गाणं हे माणिक वर्मांनी गायलेलं भावगीत.. सावळांच रंग तुझा, पावसाळी नभापरी आणि नजरेत तुझ्या, वीज खेळते नाचरी ॥ ध्रु ॥ सावळांच रंग तुझा, चंदनाच्या बनापरी आणि नजरेत तुझ्या, नाग खेळती विखारी ॥ १ ॥ सावळांच रंग तुझा, गोकुळीच्या कॄष्णापरी आणि नजरेत तुझ्या, नित्य नांदते पांवरी ॥ २ ॥ सावळांच रंग तुझा, माझ्या मनी झाकळतो आणि नजरेचा चंद्र, पाहू केव्हा उगवतो ॥ ३ ॥ सावळाच रंग तुझा, करी जीवा बेचैन आणि नजरेत तुझ्या, झालो गडे बंदिवान ॥ ४ ॥ आणि दुसरं बलरामाचं मनोगत.. बोबडा बलराम: दूद नको पाज्यू हलीला काल्या कपिलेचे काला या मनती आइ ग, पोल गुलाक्याचे तूच घेउनी पगलाखाली पाजत जा या शांज-शकाली तुजियाशम गोले, होउदे लूप शोनूल्याचे तूही गोली, मीही गोला काला का हा किशन् एकला? लावु नको तित्ती, नको ग बोत काजलाचे थेउ नको ग याच्यापाशी वाल्यामधल्या काल्या दाशी देउ नका याला, नहाया पानी यमुनेचे पालनयात तू याच्या घाली फुले गोजिली चाप्यवलली लावित जा अंगा, पांधले गंद चंदनाचे नकोश निजवू या अंधाली दिवे थेव ग उशास लात्ली दावु नको याला कधीही खेल शावल्यांचे नको दाखवू, नको बोलवू झालावलचे काले काउ हंश याश दावी, शाजिले धवल्या पंखांचे हंशाशंगे याश खेलुदे चांदाशंगे गोथ्थ बोलुदे ल्हाउ देत भवती, थवेही गौल-गौलनींचे मथुलेहुन तु आन चिताली गोली कल ही मूल्ती काली हशशी का बाई, कलेना कालन हशन्याचे ? ... धन्य ती प्रतिभा.

|| ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच

मोदक
Mon, 05/27/2013 - 20:51 नवीन
|| ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे || || माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे ||
गदिमांचे हे शब्द वाचून काय वाटले ते आजही सांगू शकणार नाही. __/\__
↩ प्रतिसाद: इनिगोय

+१११११११११११११११११११११

मैत्र
Mon, 05/27/2013 - 23:04 नवीन
+१११११११११११११११११११११ प्र चं ड स ह म त मोदका..
↩ प्रतिसाद: मोदक

गदिमा मोस्ट कन्सिस्टंट

चौकटराजा
Tue, 05/28/2013 - 08:12 नवीन
मोदक तसेच मैत्र, आपल्याला असे का वाटते याचे उत्तरच 'सावळाची रंग; तुझा यात आहे. त्यातील प्रत्येक पहिल्या ओळीतील मांडलेल्या कल्पनेचा संबंध दुसर्‍या ओळीतील कल्पनेशी आहे. गदिमा कधी ही आपले काव्य भरकटत नेत नसत. त्यांची प्रतिभाच त्याना तसे करू देत नसावी. नाविका चल तेथे दरवळते जेथे चांदणे अशी चुकीची कल्पना अण्णा माडगूळकर कशी करू शकतात . चांदण्याचा गुण रंग , शीतलता असे काही असेल त्याला गंध येईलच कसा ? असे वाटे. पण पूर्ण गीताची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर " अशा अलौकिक जगात नाविका मला घेउन चल " असे म्हणायवे आहे हे उलगडते.
↩ प्रतिसाद: मैत्र

वपुर्झा : व पु काळे …

अभ्य
Mon, 05/27/2013 - 16:54 नवीन
वपुर्झा : व पु काळे … मराठीतील समग्र लेखक … त्यांनी कायम सामान्य माणसाच्या नजरेतून लिहील… मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत. संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात ! कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असत कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे .... म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो पोरगी म्हणजे वाऱ्याची झुळूक. अंगावरून जाते, अमाप सुख देवून जाते पण धरून ठेवता येत नाही. जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा अपोआप विझते खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो. प्रॉब्लेम्स नसतात कुणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणस. या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो. आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणारयाची ऐपत नेहमीच कमी असते माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भीती वाटते. बोलायला कुणीच नसण यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण. अभिषेक कांदळगावकर

कवी अनिल/ ग्रेस /शांता शेळके / इंदिरा संत

यशोधरा
Mon, 05/27/2013 - 19:14 नवीन
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही गळून पडत असताना पान मुळी सळसळ करीत नाही सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत उगीच उसळी मारुन मासळी, मधूनच वर नसते येत पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते! -अनिल भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते हे झरे चंद्रसजणांचे ही धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगावाया त्या वेली नाजूक भोळ्या वारयाला हसवून पळती क्षितिजांचे तोरण घेऊन दारावर आली भरती तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला देऊळ पलिकडे तरीही तुज ओंजळ फुटला खांब थरथरत्या बुबुळापाशी मी उरला सुरला थेंब संध्येतील कमल फुलासम मी नटलो श्रृंगाराने देहाच्या भवती रिंगण घालती निळाईत राने स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे ते धुके अवेळी होते की परतायाची घाई मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई -कवि ग्रेस असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले तसेच काहिसे मनी तुला बघून वाटले तृणांत फूलपाखरू तसे बसेल गीत हे स्वये मनात जागते न सूर ताल मागते अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे कुणास काय ठाउके कसे कुठे उद्या असू ? निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे - शांता शेळके कसे केंव्हा कलंडते माझ्या मनाचे आभाळ आणि चंद्र चांदण्यांचा दूर पोचतो ओघळ उरे तुडुंब तयांत काळोखाचे मृगजळ रितेपणाच्या डोहाची आत ओढी उचंबळ मंत्रविद्ध मध्यरात्र उभी झुकून काठाशी जन्मोजन्मीच्या दु:खाचा राळ धरूनी उशाशी ओढ घेऊन पाण्याची सूर मारते सरल एक गाठायचा तळ आणि तळींचा अनळ पेट घेई मध्यरात्र पेटे काळोखाचे जळ दिवसाच्या राखेमध्ये उभी तुळस वेल्हाळ -इंदिरा संत

ज्ञानेश्वरांच्या समाधीचे अभंग

पैसा
Mon, 05/27/2013 - 21:05 नवीन
संत नामदेवांनी ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग लिहिले आहेत. त्यातला हा अभंग वाचताना अगदी कासावीस व्हायला झालं होतं. ------------ देव निवृत्ति यांनी धरिले दोन्‍ही कर । जातो ज्ञानेश्‍वर समाधीसी ॥१॥ नदीचिया माशा घातले माजवण । तैसे जनवन कालवले ॥२॥ दाहीदिशा धुंद उदयास्‍तविण । तैसेचि गगन कालवले ॥३॥ जाऊनि ज्ञानेश्‍वर बैसले आसनावरी । पुढा ज्ञानेश्‍वरी ठेवियेली ॥४॥ ज्ञानदेव म्‍हणे सुखी केले देवा । पादपद्मी ठेवानिरंतर ॥५॥ तीन वेळा जेव्‍हा जोडिले करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेव ॥६॥ भीममुद्रा डोळा निरंजनी लीन । जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥ नामा म्‍हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्‍वर समाधिस्‍थ ॥८॥ -------------

भाऊसाहेब पाटणकरांची आठवण कशी

मोदक
Mon, 05/27/2013 - 21:08 नवीन
भाऊसाहेब पाटणकरांची आठवण कशी काय निघाली नाही..?? ************************************ भ्रमरापरी सौंदर्यवेडे आहोत जरी ऐसे आम्ही... इश्कातही नाही कधी भिक्षुकी केली आम्ही... खेळलो इश्कात.. ऐसे बेधुंद आम्ही खेळलो.. लोळलो मस्तीत.. नाही पायी कोणाच्या लोळलो.. अस्मिता आमुच्या सार्‍या केंव्हा नव्हतो विसरलो.. आली तशीच वेळ तेंव्हा इश्क सारा विसरलो.. ************************************ Image removed. ************************************ दोस्तहो, दुनियेस धोका मेलो तरी आम्ही दिला येवूनही नरकात पत्ता कैलासचा आम्ही दिला हाय, हे वास्तव्य माझे, सर्वास कळले शेवटी सारेच हे सन्मित्र माझे येथेच आले शेवटी. :D ************************************ ( प्राडॉ. - वाचताय ना..? आम्ही ऐकले होते भाऊसाहेब तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे! :-) )

आणखी काही

चौकटराजा
Tue, 05/28/2013 - 08:19 नवीन
हसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये पाउल ना टाकू तिथे बाग जी आमची नव्हे सांग वा सांगू नको काल झाले काय ते सैल होण्या अम्बाडा काही और व्हावे लागते हे कवि तुझ्या कल्पनेची कीव करावी वाटते सांगितले कुणी प्रणयाला रात्र व्हावी लागते ...?
↩ प्रतिसाद: मोदक

हे कवि तुझ्या कल्पनेची कीव

मोदक
Tue, 05/28/2013 - 10:09 नवीन
हे कवि तुझ्या कल्पनेची कीव करावी वाटते सांगितले कुणी प्रणयाला रात्र व्हावी लागते ...? क्या बात है चौरा!!!! ************************************************ तुला न सांगता तुला, गीतात माझ्या गुंफतो, स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो असेच रोज न्हाऊनी, लपेट ऊन कोवळे, असेच चिंब केस तू, उन्हात सोड मोकळे तुझा सुगंध मात्र मी, हळुच येथे हुंगतो, स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो अशीच रोज अंगणी, लवून वेच तू फूले, असेच सांग लाजूनी, कळ्यांस गूज आपुले, तुझ्या कळ्या, तुझे फूले, येथे टिपून काढतो, स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो अजून तू अजाण ह्या, कुंवार कर्दळीपरी, गडे विचार जाणत्या, जुईस एकदा तरी, दुरुन कोण हा तुझा, मकरंद रोज चाखतो, स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो ...सुरेश भट
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अप्रतीम !!!!!!!!!!

लॉरी टांगटूंगकर
Wed, 05/29/2013 - 14:04 नवीन
लई झ्याक !!
↩ प्रतिसाद: मोदक

तुला न सांगता तुला, गीतात

तिरकीट
Wed, 05/29/2013 - 19:13 नवीन
तुला न सांगता तुला, गीतात माझ्या गुंफतो, स्वप्नी रोज मी तुला, मिठीत माझ्या पाहतो माझ्या वाचनात ध्रुवपद असे आले आहे: मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो....
↩ प्रतिसाद: मोदक

हो बरोबर.

इनिगोय
Wed, 05/29/2013 - 19:35 नवीन
हो बरोबर. जालावर एका ठिकाणी वर दिलेल्या ओळी सापडतायत. पण मूळ पूर्ण कविता अशी आहे. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो ! तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो! असेच रोज न्हाऊनी लपेट उन्ह कोवळे, असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे तुझा सुगंध मात्र मी इथे हळुच हुंगतो ! अशीच रोज अंगणी लवून वेच तु फुले, असेच सांग लाजुनी कळ्यांस गूज आपुले; तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे तिपुन काढतो! अजून तू अजाण त्या, कुवार कर्दळीपरि; गडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी : "दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो?" तसा न राहिला अता उदास एकटेपणा; तुझीच रूपपल्लवी जिथे तिथे करी खुणा; पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो ! मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो ! तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो!
↩ प्रतिसाद: तिरकीट

या धाग्याबद्दल मोदकाचे आभार

बॅटमॅन
गुरुवार, 05/30/2013 - 02:33 नवीन
या धाग्याबद्दल मोदकाचे आभार मानावे तितके थोडेच. वर दिलेली कविताही आवडली. वृत्तही चपखल वापरले आहे.
↩ प्रतिसाद: इनिगोय

बाकी धाग्याची संकल्पनेबद्दल

तिरकीट
Wed, 05/29/2013 - 19:15 नवीन
बाकी धाग्याची संकल्पनेबद्दल त्रिवार सलाम......
↩ प्रतिसाद: मोदक

घर परतीच्या वाटेवरती

सूड
Tue, 05/28/2013 - 01:02 नवीन
घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे घर परतीच्या वाटेवरती पडल्या-झडल्या शीण खुणा मावळतीच्या किरणांमधुनी क्षण झळझळुनि उठती पुन्हा घर परतीच्या वाटेवरती पायांवाचून पाय-ठसे अश्रूंत चाहूल येते कानी एक हुंदका, एक हसे घर परतीच्या वाटेवरती आभासांचे दाट धुके सावलीत सावली मिसळते अन्‌ पुटपुटती ओठ मुके घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हे कुरवाळीती मज स्‍नेहभराने विसरून माझे लाख गुन्हे - शांता शेळके

जग हे बंदीशाला

स्पंदना
Tue, 05/28/2013 - 05:36 नवीन
जग हे बंदीशाला कुणी न येथे भला चांगला जो तो पथ चुकलेला ! ज्याची त्याला प्यार कोठडी कोठडीतले सखे सौंगडी हातकडी की अवजड बेडी प्रिय हो ज्याची त्याला ! जो तो अपुल्या जागी जखडे नजर न धावे तटापलिकडे उंबरातले किडे-मकोडे उंबरि करिती लीला ! कुणा न माहीत सजा किती ते कोठुन आलो ते नच स्मरते सुटकेलागी मन घाबरते जो आला तो रमला ! ग.दि.मा

अभय आणि राणी बंग यांचे "अ

मोदक
Tue, 05/28/2013 - 05:58 नवीन
अभय आणि राणी बंग यांचे "अ‍कॅडमीक क्वालिफिकेशन" दर्शवणारा हा उतारा.. स्वत: अनिल अवचटांनी मान्य केले आहे की, "हे आणि इतकेच" त्यांना दीड वर्षांच्या गप्पा / चर्चांमधून समजले. पुस्तकाचे नाव - कार्यरत लेखक - अनिल अवचट लेखाचे नाव - "शोध" आरोग्याचा ************************************************************************* अभय, राणीला स्वतःविषयी बोलायला नको असायचं. विशेषतः राणीला काही विचारलं तर ती म्हणायची, "ते तू अभयला विचार." हळूहळू त्यांचं मागचं समजायला लागलं तेंव्हा लक्षात आलं, की ही दोघं म्हणजे भलतेच स्कॉलर लोक आहेत. आपल्याकडे मेडीकलला अ‍ॅडमिशन मिळणं हेच मुळात केवढं अवघड असतं. अ‍ॅडमिशन मिळाल्यावर मुलं तर चार बोटं वर चालायला लागतातच; पण त्यांचे पालकही तरंगू लागतात. इथं अभय आणि राणी MBBS काय MD काय सगळ्या विद्यापीठात पहिले तर आलेच, पण ते ही सुवर्णपदक मिळवून. अभयला MBBS ला तीन विषयांत सुवर्णपदकं होती. राणीला MD ला मिळालेलं सुवर्णपदक विद्यापीठात त्या आधी कितीतरी वर्षं कुणालाच मिळालेलं नव्हतं. MBBS नंतर अभय चंदीगडच्या, संपूर्ण भारतात अग्रगण्य असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल रिसर्च (PGI) मध्ये गेला. तिथे काही काळ काम करून नंतर प्रवेशपरीक्षा असते. तिथं तो रेकॉर्ड मार्क मिळवून पहिला आला, नंतर दोघंही अमेरिकेतल्या बाल्टिमोर येथील जॉन्स हाफकिन्स विद्यापीठात शिकायला गेले. 'पब्लीक हेल्थ' या क्षेत्रातला जगातला 'लास्ट वर्ड' समजली जाणारी ही संस्था. सर्व जगातून तिथं विद्यार्थी येतात. तिथल्या सगळ्या विद्यार्थांत तर अभय पहिला आलाच; पण त्याला ९९% मार्क पडले. त्या विद्यापीठाच्या इतिहासात कुणाला इतके मार्क पडले नव्हते आणि अजूनपर्यंत कुणाला पडले नाहीत. राणीची आई त्या काळात वारली. तिला थोडे दिवस इकडे यावं लागलं तरीही तिला ८०% मार्क पडले. हे सर्व मला तुकड्या तुकड्यानं दीड वर्षांच्या काळामध्ये समजलेले तपशील. याहून किती आहे, ते माहिती नाही. अभय नागपूर मेडिकल कॉलेजात गेला, तिथं तो खादीचे कपडे घालीत असे. राहणी अगदीच साधी असे. मी विचारलं, "तुला तिथं त्यामुळे बाजूला पडल्यासारखं नाही का झालं?" तो म्हणाला, "मी जरी शिकायला तिथं गेलो, तरी मनानं तिथल्या वैद्यकीय जगातला 'आऊट सायडर'च होतो. तिथं असताना पगारवाढीसाठी हाऊसमन रजिस्टर लोकांचा संप झाला. "मार्ड"नं आयोजीत केला होता. माझा वैचारिकदृष्ट्या विरोधच होता. कदाचित हे माझ्या गांधीवादी बॅकग्राऊंडमुळे असेल; पण मी एकटा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये काम करीत होतो आणि संपावर गेलेले उरलेले सगळे डॉक्टर्स माझ्यावर दातओठ खात होते!" अभयचा हा सामाजिक दृष्टीकोन त्याच्या प्रत्येक अवस्थेत उठून दिसतो. चंदीगडला गेला, तिथल्या, भारतातल्या हृदयरोगावरच्या सर्वोत्तम केंद्रात तो काम करत होता. तिथं वापरला जाणारा एकेक कॅथेटर (नळी) तीन तीन हजार रूपयांचा होता. याच्या मनात संघर्ष उभा राही. ग्रामीण आरोग्य केंद्रात औषधाला पैसे नाहीत, तर सरकारनं इतक्या महागड्या यंत्रणेवर अशा तर्‍हेचा खर्च करण्यात "सोशल रेलेव्हन्स" काय? तिथं होणार्‍या संशोधनाचे विषयही असेच असत - 'अमुक द्रव्याचं माकडाच्या हृदयाच्या स्नायूंवर होणारे परिणाम' भारतीय प्रश्नांचं आणि त्या सरकारी पैशातून चालणार्‍या संस्थेचं काहीही घेणं देणम नाही. तिथं MD झालेला विद्यार्थी दुसर्‍या दिवशी विमानानं अमेरीकेला पळतो. इथले ७०% विद्यार्थी अमेरिकेत स्थायीक झालेले आहेत. जे.पीं.चं आंदोलन चालू होतं त्यावेळी 'पोलिटीकल अकाऊंटिबिलटी' हा शब्द नव्यानं पुढं आला होता. अभयला वाटलं, तशीच 'सोशल आणि मेडिकल अकाऊंटिबिलटी' असली पाहिजे. तो म्हणाला, "त्या काळात मी इतका अस्वस्थ होतो, की जवळपास 'ऑन द व्हर्ज ऑफ डिप्रेशन' होतो. मला आठवतंय, २३ सप्टेंबर हा माझा जन्मदिवस. त्या रात्री मी निर्णय घेतला, मी इथं राहू शकत नाही. काय करायचं ते ठरलं नव्हतं; पण हे सोडायचं, एवढं मात्र ठरवलं. दुसर्‍या दिवशी मी कार्डिऑलॉजीच्या प्रोफेसरांना सांगितलं. त्यांना आश्चर्य वाटलं; पण कौतुकही वाटलं. त्यांनी सर्व प्रोफेसर्सचा ग्रूप बोलावला. माझं म्हणणं त्यांना ऐकायला लावलं. त्यांना त्यात तथ्य वाटलं. त्यांनी सांगितलं, की पण तरीही तू इथल्या प्रवेशपरिक्षेला बस आणि नंतर सोड. ती परिक्षा अखिल भारतीय पातळीवरची असते. तिला मी बसलो आणि पहिला आलो." तिथली एक परंपरा आहे. सगळेजण तिथल्या ऑडिटोरियम मध्ये जमतात. मेरीट लिस्टमधल्या एकेकाचं नाव पुकारलं जातं. तो स्टेजवर येतो. त्याला कुठल्या विषयात पोस्ट ग्रॅज्यूएट करायचं आहे हे विचारलं जातं. हा एकप्रकारचा सन्मानच असतो. आवडीच्या शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी सगळ्यांची मोठी धडपड असते. अभय पहिला आल्यानं त्याला पहिल्यांदा बोलावलं. कुठल्या शाखेत जायचंय, असं विचारल्यावर त्यानं, "आपण ही संस्था सोडतोय" असं सांगितल्यावर सगळ्यांना धक्काच बसला. त्यांनी नंतर सर्व स्टाफ, कौन्सील मेंबर्सची एक सभा घेतली... "व्हॉट इज राँग विथ पीजीआय?" त्या चर्चेतून एक बदल झाला, की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना तीन महिने ग्रामीण सेवा सक्तीची केली. अभयला परत येताना सांगितलं "तुझा विचार बदलला तर कधीही या संस्थेत परत ये, तुझ्यासाठी आम्ही एक पोस्ट रिकामी ठेवतो" *************************************************************************

असे भयानक हुशार अन बुद्धिमान

शिल्पा ब
Tue, 05/28/2013 - 10:42 नवीन
असे भयानक हुशार अन बुद्धिमान लोकं आहेत म्हणुन जग चाललंय.
↩ प्रतिसाद: मोदक

माझी एक अत्यंत आवडती

मराठीप्रेमी
Tue, 05/28/2013 - 08:38 नवीन
माझी एक अत्यंत आवडती चित्रदर्शी कविता. कितव्या इयत्तेत ते आठवत नाही, पण हि कविता मराठीच्या पुस्तकात होती. कोणाला कवी/कवयित्री माहित असतील तर कृपया सांगावेत. माथ्यावरती उन्हे चढावी, पावलात सावल्या विराव्या घाटावरती शुभ्र धुण्यांच्या, पाकोळ्या अन् मंद झुलाव्या डोंगर व्हावे पेंगुळलेले, पोफळबागा सुस्त निजाव्या अंगणातल्या हौदावरती, तहानलेल्या मैना याव्या लुकलुकणारे गोल कवडसे, निंबाच्या छायेत वसावे खारीचे बावरे जोडपे, बकुळीखाली क्षणिक दिसावे कुरणाच्या हिरवळीत ओल्या, ऊन हिरवे होऊन जावे कुठे कधीचे नांगरलेले, शेत पावसासाठी झुरावे

कवी सदानंद रेगे

कोमल
Tue, 05/28/2013 - 10:46 नवीन
कवी सदानंद रेगे कवितेचे नाव : दुपार
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

मार्गदर्शक

चौकटराजा
Fri, 05/31/2013 - 17:52 नवीन
येथील ज्याना ज्याना कविता करायची जाग. आग, आस खाज जे काही असेल त्यानी या कवितेचा फार लक्षपूर्वक अभ्यास करावा. म्हणजे कवीने वर्णन करताना कविकल्पना वापरायचे झाल्यास वास्तवाचे, परिसराचे, भान कसे व किती असले पाहिजे याचा धडाच इथे दिलेला आहे. क्या बात है !
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

व्वा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/28/2013 - 09:50 नवीन
मस्त वाचनीय धागा. धन्स. -दिलीप बिरुटे

भंगु दे काठिण्य माझे

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 05/28/2013 - 10:25 नवीन
भंगु दे काठिण्य माझे आम्ल जाउ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे धैर्य दे अन नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकू दे बुध्दीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे जाऊ दे ‘कार्पण्य’ ‘मी’ चे दे धरु सर्वांस पोटी भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी कवी – बा.सी.मर्ढेकर

कवी बी.

प्रभाकर पेठकर
Tue, 05/28/2013 - 10:33 नवीन
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या उभय पितरांच्या चित्तचोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला विभा विमला आपटे प्रधानांच्या अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या गौरचैत्रीची कशास जुनी येती रेशमाची पोलकी छीटे लेती तुला लंकेच्या पार्वतीसमान पाहुनीया होवोनी साभिमान काय त्यातील बोलली एक कोण "अहा, आली ही पहां भिकारीण" पंकसंपर्के का कमळ भिकारी? धुलीसंसर्गे रत्न का भिकारी? सूत्रसंगे सुमहार का भिकारी? कशी तुही मग मज मुळी भिकारी? लाट उसळोनी जळी खळे व्हावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे तसे गाली हासता तुझ्या व्हावे उचंबळूनी लावण्य बर वहावे नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध तोच बीजांकुर धरी तुझा हेतू विलासाची होशील मोगरी तू तुला घेईन पोलके मखमलीचे कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे हौस बाई पुरवीन तुझी सारी परी यांवरी हा प्रलय महाभारी प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे तदा बापाचे ह्र्दय कसे होते? न ये वदता अनुभवी जाणती ते देव देतो सद्गुणी बालकांना काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना? लांब त्याच्या गावास जाऊनीया गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया "गावी जातो" ऐकता त्याच गाली पार बदलूनी ती बालसृष्टी गेली गळा घालूनी करपाश रेशमाचा वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा" कवी - बी

बालकवी-

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 05/28/2013 - 10:38 नवीन
फुलराणी- हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे; त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात – अव्याज-मने होती डोलत; प्रणयचंचला त्या भ्रूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला, आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी; याहुनि ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला ? पुरा विनोदी संध्यावात – डोलडोलवी हिरवे शेत; तोच एकदा हासत आला – चुंबून म्हणे फुलराणीला- “छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती ? कोण बरे त्या संध्येतून – हळुच पाहते डोकावून ? तो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना ?” लाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी ! आन्दोली संध्येच्या बसुनी – झोके झोके घेते रजनी; त्या रजनीचे नेत्र विलोल – नभी चमकती ते ग्रहगोल ! जादूटोणा त्यांनी केला – चैन पडेना फुलराणीला; निजली शेते, निजले रान, – निजले प्राणी थोर लहान. अजून जागी फुलराणि ही – आज कशी ताळ्यावर नाही ? लागेना डोळ्याशी डोळा – काय जाहले फुलराणीला ? या कुंजातुन त्या कुंजातुन – इवल्याश्या या दिवट्या लावुन, मध्यरात्रिच्या निवान्त समयी – खेळ खेळते वनदेवी ही. त्या देवीला ओव्या सुंदर – निर्झर गातो; त्या तालावर - झुलुनि राहिले सगळे रान – स्वप्नसंगमी दंग होउन! प्रणयचिंतनी विलीनवृत्ति – कुमारिका ही डोलत होती; डुलता डुलता गुंग होउनी – स्वप्ने पाही मग फुलराणी - “कुणी कुणाला आकाशात – प्रणयगायने होते गात; हळुच मागुनी आले कोण – कुणी कुणा दे चुंबनदान !” प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति – विरहार्ता फुलराणी होती; तो व्योमीच्या प्रेमदेवता – वाऱ्यावरती फिरता फिरता - हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली. परस्परांना खुणवुनि नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी ! स्वर्गभूमीचा जुळ्वित हात – नाचनाचतो प्रभातवात; खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला – हळुहळु लागति लपावयाला आकाशीची गंभीर शान्ती – मंदमंद ये अवनीवरती; विरू लागले संशयजाल, – संपत ये विरहाचा काल. शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि – हर्षनिर्भरा नटली अवनी; स्वप्नसंगमी रंगत होती – तरीहि अजुनी फुलराणी ती! तेजोमय नव मंडप केला, – लख्ख पांढरा दहा दिशाला, जिकडे तिकडे उधळित मोती – दिव्य वर्हाडी गगनी येती; लाल सुवर्णी झगे घालुनी – हासत हासत आले कोणी; कुणी बांधिला गुलाबि फेटा – झकमणारा सुंदर मोठा! आकाशी चंडोल चालला – हा वाङनिश्चय करावयाला; हे थाटाचे लग्न कुणाचे – साध्या भोळ्या फुलराणीचे ! गाउ लागले मंगलपाठ – सृष्टीचे गाणारे भाट, वाजवि सनई मारुतराणा – कोकिळ घे तानावर ताना! नाचु लागले भारद्वाज, – वाजविती निर्झर पखवाज, नवरदेव सोनेरी रविकर – नवरी ही फुलराणी सुंदर ! लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे ! दवमय हा अंतपट फिटला – भेटे रविकर फुलराणीला ! वधूवरांना दिव्य रवांनी, – कुणी गाइली मंगल गाणी; त्यात कुणीसे गुंफित होते – परस्परांचे प्रेम ! अहा ते ! आणिक तेथिल वनदेवीही – दिव्य आपुल्या उच्छवासाही लिहीत होत्या वातावरणी – फुलराणीची गोड कहाणी ! गुंतत गुंतत कवि त्या ठायी – स्फुर्तीसह विहराया जाई; त्याने तर अभिषेकच केला – नवगीतांनी फुलराणीला ! श्रावण मासि श्रावण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ? तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो इकडे, तिकडे, चोहिकडे वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ? कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले इकडे, तिकडे, चोहिकडे स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला इकडे, तिकडे, चोहिकडे

वावावा..

कोमल
Tue, 05/28/2013 - 10:59 नवीन
मी "श्रावणमासी"चीच वाट पाहात होते.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
अप्रतिम...
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

माझ्या आवडीच्या दोन कविता आहेत

मी-सौरभ
Tue, 05/28/2013 - 23:41 नवीन
१. कणा: कुसुमाग्रज २. प्रेमाचा गुलकंदः केशवकुमार

अरे दाद्या.. तुला काठावर पण

मोदक
Tue, 05/28/2013 - 23:51 नवीन
अरे दाद्या.. तुला काठावर पण पास करणार नाही कोणी. ;-) आवडीच्या कविता गुगलून चिकटव की येथे!!!
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

कणा :- कुसुमाग्रज

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 05/29/2013 - 16:14 नवीन
'ओळखलत का सर मला' पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून: 'गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चुल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेवुन संगे सर, आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे. चिखल गाळ काढतो आहे' खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नही कणा पाठीवर हात ठेउन नुसते लढ म्हणा.
↩ प्रतिसाद: मोदक

प्रेमाचा गुलकंद - केशवकुमार

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 05/29/2013 - 17:03 नवीन
बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने गुलाबपुष्पे आणूनी द्यावीत तिजला नियमाने कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते? तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते! गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या! लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोट नुसत्या! प्रेमदेवता प्रसन्न हो या नैवेद्याने प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतराणे! कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा परी न सोडीला तिने आपुला कधीही मुग्धपणा या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल! अशा तर्‍हेने मास लोटले पुरेपूर सात खंडन पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात! अखेर थकला ढळली त्याची प्रेमतपश्र्चर्या रंग दिसे ना खुलावयाचा तिची शांत चर्या धडा मनाचा करुन शेवटी म्हणे तिला देवी दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी बांधीत आलो पुजा तुज मी आजवरी रोज! तरी न उमगशी अजून कसे तू भक्ताचे काज? गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले सांग सुंदरी फुकट का ते सगळे गेले? तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, 'आळ वॄथा हा की! एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्या पैकी' असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी क्षणात घेउनी ये बाहेर कसलीशी बरणी! म्हणे, 'पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद, आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद! का डोळे असे फिरवता का आली भोंड बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड क्षणीक दिसले तारांगण त्या, परी शांत झाला तसाच बरणी आणि घेउन खांद्यावरी आला! प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा! प्रेमलाभ नच,गुलकंद तरी कशास हा दवडा? याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला, ह्रदय थांबूनी कधीच ना तरी असता तो खपला! तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने प्रेमाचा गुलकंद तयानी चाखूनी हा बघणे!
↩ प्रतिसाद: मोदक

दाद्या

चौकटराजा
Fri, 05/31/2013 - 17:55 नवीन
दाद्या त्याबरोबर सतारीचे बोल, नव्या मनूतिल नव्या दमाचा या केशवसुतांच्या कविता ही जोड रे !
↩ प्रतिसाद: मोदक

प्रभा गणोरकर

बहुगुणी
Wed, 05/29/2013 - 07:55 नवीन
माणसाला माणूस दिसत नाही अशी गडद संध्याकाळ जवळपास रात्रच पण बोळांतून गल्ल्यांतून घराकडे वळत गेलेली पायाखालची वाट दिसत जाते रस्त्यावर दिवे नसतानाही पायांना सापडत जाते जुन्या घराचे सारवलेले अंगण वर्षानुवर्षे तेल पिऊन गुळगुळीत झालेल्या दरवाजाचा काळा मखमली स्पर्श वेचीत माझे हात दार ढकलतात साखळी वाजते आतून हळू आवाज येतो आलीस बाई, ये! - प्रभा गणोरकर

आरती प्रभू यांची अखेरची कविता

बहुगुणी
Wed, 05/29/2013 - 08:08 नवीन
शेवटच्या आजारात चिं. त्र्य. खानोलकर के. ई. एम. रुग्णालयात भरती झाले होते. भेटायला जयंत धर्माधिकारी नियमित येत. नवीन कवितेबद्दल त्यांनी खानोलकरांना पृच्छा केली तेव्हा त्यांनी खालील काव्य म्हटले, शेवटच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा एवढे म्हटल्यावर त्यांना धाप लागली. त्यांचे डॉ. देवल यांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगून उरलेली उद्या म्हणायला सांगितली. परंतु उद्या काही उजाडलाच नाही. तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.

मराठीतून उर्दू-हिंदीत घुसतो आहे, क्षमा करा, पण राहवत नाही

बहुगुणी
Wed, 05/29/2013 - 08:15 नवीन
धाग्याचा उद्देश पाहून 'आयुष्य समृद्ध करणार्‍या ओळी उधृत करणं' हा निकष पूर्ण करणार्‍या गुलजार यांच्या काही काव्यपंक्ति देतो आहे: किताबे झांकती है बंद अलमारी के शीशों से बड़ी हसरत से तकती है महीनों अब मुलाकाते नही होती जो शामें इनकी सोहबत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती है कंप्युटर के परदों पर बड़ी बेचैन रहती है किताबे .... इन्हे अब नींद में चलने की आदत हो गई है बड़ी हसरत से तकती है .. जो कदरें वो सुनाती थी की जिन के सैल कभी मरते थे वो कदरें अब नज़र आती नही घर में जो रिश्ते वो सुनाती थी वह सारे उधडे उधडे हैं कोई सफहा पलटता हूँ तो एक सिसकी निकलती है कई लफ्जों के माने गिर पड़े हैं बिना पत्तों के सूखे टुंडे लगते हैं वो सब अल्फाज़ जिन पर अब कोई माने नही उगते बहुत सी इसतलाहें हैं जो मिटटी के सिकूरों की तरह बिखरी पड़ी है गिलासों ने उन्हें मतरुक कर डाला जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है बहुत कुछ तह बा तह खुलता चला जाता है परदे पर किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है कभी सीने पर रख कर लेट जाते थे कभी गोदी में लेते थे कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बना कर नीम सजदे में पढ़ा करते थे ,छुते थे जबीं से वो सारा इल्म तो मिलता रहेगा बाद में भी मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुक्के किताबें मँगाने, गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे उनका क्या होगा वो शायद अब नही होंगे !! ******************** आणि या अटलजी वाजपेयींच्या ओळी: अटलजींची 'उंचाई ही कविता: ऊँचे पहाड़ पर, पेड़ नहीं लगते, पौधे नहीं उगते, न घास ही जमती है। जमती है सिर्फ बर्फ, जो, कफ़न की तरह सफ़ेद और, मौत की तरह ठंडी होती है। खेलती, खिलखिलाती नदी, जिसका रूप धारण कर, अपने भाग्य पर बूंद-बूंद रोती है। ऐसी ऊँचाई, जिसका परस पानी को पत्थर कर दे, ऐसी ऊँचाई जिसका दरस हीन भाव भर दे, अभिनंदन की अधिकारी है, आरोहियों के लिये आमंत्रण है, उस पर झंडे गाड़े जा सकते हैं, किन्तु कोई गौरैया, वहाँ नीड़ नहीं बना सकती, ना कोई थका-मांदा बटोही, उसकी छाँव में पलभर पलक ही झपका सकता है। सच्चाई यह है कि केवल ऊँचाई ही काफ़ी नहीं होती, सबसे अलग-थलग, परिवेश से पृथक, अपनों से कटा-बँटा, शून्य में अकेला खड़ा होना, पहाड़ की महानता नहीं, मजबूरी है। ऊँचाई और गहराई में आकाश-पाताल की दूरी है। जो जितना ऊँचा, उतना एकाकी होता है, हर भार को स्वयं ढोता है, चेहरे पर मुस्कानें चिपका, मन ही मन रोता है। ज़रूरी यह है कि ऊँचाई के साथ विस्तार भी हो, जिससे मनुष्य, ठूँठ सा खड़ा न रहे, औरों से घुले-मिले, किसी को साथ ले, किसी के संग चले। भीड़ में खो जाना, यादों में डूब जाना, स्वयं को भूल जाना, अस्तित्व को अर्थ, जीवन को सुगंध देता है। धरती को बौनों की नहीं, ऊँचे कद के इंसानों की जरूरत है। इतने ऊँचे कि आसमान छू लें, नये नक्षत्रों में प्रतिभा की बीज बो लें, किन्तु इतने ऊँचे भी नहीं, कि पाँव तले दूब ही न जमे, कोई काँटा न चुभे, कोई कली न खिले। न वसंत हो, न पतझड़, हो सिर्फ ऊँचाई का अंधड़, मात्र अकेलेपन का सन्नाटा। मेरे प्रभु! मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना, ग़ैरों को गले न लगा सकूँ, इतनी रुखाई कभी मत देना।

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी,

यशोधरा
Wed, 05/29/2013 - 10:00 नवीन
विश्रब्ध मनाच्या कातरवेळी, एखाद्या प्राणाची दिवेलागण सरल्या नभाची सूर्यास्तछाया, एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल, विलग पंखांचे मिटते मन एखाद्या प्राणाचे विजनपण, एखाद्या फुलाचे फेडीत ऋण गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां, प्राजक्तचुंबन एखादा प्राण तुडुंब जन्मांचे सावळेपण, एखाद्या प्राणाची मल्हार धून एखाद्या प्राणाचे सनईसूर, एखाद्या मनाचे कोवळे ऊन निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा एखाद्या सरणा अहेवपण. -आरती प्रभू

कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा अन्योक्ती !!

अक्षया
Wed, 05/29/2013 - 10:25 नवीन
अन्योक्ती - कृष्णशास्त्री चिपळूणकर सूर्यान्योक्ति (शार्दूलविक्रीडित) देखूनी उदया तुझ्या द्विजकुळे गाती अती हर्षुनी, शार्दूलादिक सर्व दुष्ट दडती गिर्यंतरीं जाउनी, देशी ताप परी जसा वरिवरी येशी नभीं, भास्करा, अत्त्युच्चीं पदिं थोरही बिधडतो हा बोल आहे खरा. ----------------------------------------------------------------- गजान्योक्ति (स्त्रग्धरा) ज्याची स्पर्धा कराया इतर गज कधीं शक्त नाहीच झाले सांगावे काय? ज्याच्या मृगपतिहि भयें रान सोडून गेले, तो पंकामाजिं आजी गजवर फसला, युक्ति नाहीं निघाया. अव्हेरिती, पहा, हे कलकल करुनी क्षुद्र कोल्हे तयाला. ----------------------------------------------------------------- हरिणान्योक्ति (शार्दूलविक्रीडित) जाळे तोडुनियां बळें हरिण तो टाळोनि दावाग्निला, व्याधाचे चुकवूनि बाणहि महावेगें पुढें चालिला, तों घाईंत उडी फसूनि पडला आडामधें बापडा; होती सर्वहि यत्न निष्फळ, जरी होई विधी वांकडा. ----------------------------------------------------------------- आंब्याविषयी (शार्दूलविक्रीडित) ज्याचे पल्लव मंगलप्रद, शिणा छाया जयाची हरी गंधें युक्ते फुलें, फळेंही असती ज्याचीं सुधेच्या परी, वाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखींचें, भला आम्रा त्या पिक सेवितां समसमां संयोग कीं जाहला! ----------------------------------------------------------------- बगळ्याविषयी (शिखरिणी) उभा राहे एके चरणिं धरणीतें धरुनियां तपश्चर्या वाटे करित जणुं डोळे मिटुनियां, बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती, परि ज्ञाते तूझें कपट लवलाहीं उमजती. ----------------------------------------------------------------- चंदनाविषयी (पृथ्वी) वनीं विलसती बहू विविध वृक्ष चोंहींकडे, तयांत मज चंदनासम न एकही सांपडे, जयास न दिली फळें न कुसुमेंहि दैवें जरी, शरीर झिजवूनि जो तरि परोपकारा करी. ----------------------------------------------------------------- कोकिलान्योक्ती येथे समस्त बहिरे बसतात लोक का मधुर भाषणे तू करिशी अनेक हे मूर्ख, यांस नसे किमपी विवेक रंगावरुन तुजला गमतील काक

झकास!

पांथस्थ
Wed, 05/29/2013 - 10:35 नवीन
मोदकराव धाग्याची संकल्पना मस्तच! आवडणार्‍या कविता/ललित लेख तस बरच आहे, जस आठवेल तसे इथे देतो!
"...एक म्हातारी आणि तिची छोटी नात - लच्छी - गांवाबाहेर दूर रानापाशीं राहत होतीं. एकदां म्हातारीच्या झोपडीपाशीं एक मोर आला. मोराला पाहून लच्छी नाचूं लागली. मोरही नाचूं लागला. लच्छीने हट्ट घेतला कीं मोराला अंगणांतच बांधून ठेवावं. म्हातारी म्हणाली, तें कसं होणार? आपल्यापाशीं त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठं आहे? दोघींचा निर्णय होईना. तेव्हां मोरच म्हणाला, मी इथंच जवळपास राहीन. मला दाणागोटा कांही नको. रान तर सारं भोवतालींच आहे. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हां लच्छीनं आधी नाचलं पाहीजे. ती जेव्हां नाचायची थांबेल तेव्हांपासून मीही येणार नाहीं. अट साधी होती. लच्छी कबूल झाली. म्हातारीचं काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं, तर मनही तसंच हवं. लच्छी तेव्हांपासून आनंदीच राहूं लागली. मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचही तिला भान राहत नसे..." "सावित्री" - पु.शि. रेगे

दुर्गा भागवत

पांथस्थ
Wed, 05/29/2013 - 10:47 नवीन
दुर्गा भागवत ह्यांनी त्यांच्या 'पैस' ह्या पुस्तकामधे दुःखावर खालील विचार व्यक्त केले आहेत. वाचुन धन्य झालो. दुःखाकडे बघायचा काय पर्स्पेक्टीव्ह आहे. कितीही वेळा वाचले तरी मन भरत नाही. 'पैस' हे फार थोर पुस्तक आहे. जरूर वाचा.
"...आलेल्या सुखाकडे, प्रेमाच्या पूर्तीकडे, जन्मोजन्मीच्या मोहाकडे विठोबा पाठ फिरवतो तो देवमाणुस म्हणून. देवमाणूस म्हणूनच तो चिरंतन दुःखाचे आवाहन करतो. ते आटू देत नाही. सुखाच्या वरदानाहून, कर्तव्याचा व सत्याच रंग असलेले दुःख अधिक सुफळ असते..." -- पंढरीचा विठोबा : पैस : दुर्गा भागवत
"...मी माझ्या भक्तांना सुख देत नाही. दुःख देतो. दारिद्र्य देतो. मुद्दामच करतो मी ते. पराभक्तीचे सुख मानवमात्राला मिळावे, मला भक्ताशी एकरूप होण्याचे भाग्य मिळावे, म्हणून मी तसे करतो. तिळभर आशा जरी माझ्या भक्ताला राहिली तरी मी ती मोडतो. त्याला निराश करणे मला आवडते. कारण, निराशेची शीग गाठल्याशिवाय, ऐहिक वासना मेल्याशिवाय परमसुखाचा कोंबही कुठे रुजत नाही. ऐहिक सुख हा मी आणि माझे भक्त यांच्यामधला अंतराय आहे; तो मी दूर करतो. माझ्या भक्तांना निर्वाणीच्या घडीला, आर्त झाल्यावर, माझ्याशिवाय अन्य सहारा राहू नये म्हणून मी फार जागरूक असतो. म्हणूनच दुःखांची पेरणी करून मी त्याला दुखवतो नि टोचून, तापवून माझ्याकडे वळवतो. एकदा माझ्याकडे आल्यावर नि माझ्याशी तद्रूप झाल्यावर ही दुःखे, ही दैन्ये, हे क्लेश मिटतात. कायमचे मिटतात. तिथून सुख फुटते..." -- व्दारकेचा राणा : पैस : दुर्गा भागवत
ता.क.: हे लेखन माझ्या ब्लॉग वर पुर्वप्रकाशीत आहे.

'पैस' हे फार थोर पुस्तक आहे.

यशोधरा
Wed, 05/29/2013 - 10:56 नवीन
'पैस' हे फार थोर पुस्तक आहे. >> + करोडो वेळ
↩ प्रतिसाद: पांथस्थ

खामोशी की नदी - अमृता प्रीतम

यशोधरा
Wed, 05/29/2013 - 10:53 नवीन
खामोशी की एक नदी बहती थी... उंचे पर्वतोंके साये उस नदी में खेलते और पेडोंकी छाती से जब फूल खिलते तो सारी सुगंधी वो हवाऑ को अरप देतें.. जब हवाएं नदी मे नहाने के लिए आती सूरज को अर्घ्य देतीं तो एक घडी नदी के किनारें वो पत्थरोंपर बैठ जातीं.. उस समय नदी की छाती से सूरज की रौशनी कुछ कहती थीं खामोशी की एक नदी बहती थीं... धरती आसमान की लीला उस नदी में खेलती बादल भी नदींमें तैरते सितारें भी नदीमें उतरते पंछी भी पानी परसने आतें और चांद का योगी .. कमंडल भरने के लिये आता था दो घूंट पानी लेकर वो अपनी चिलम धोता था और फिर एक घूंट पानी मुझपर छिडक देता था.. और मुझे लगता .. वो मेरी आग को भी चिलम की तरह पीता था.. वो मेरी एक कोयला आग थी मेरे माथेंमें रहती थीं और आँखोके सामने खामोशी की नदी बहती थीं... साईं! वो कौनसे पर्वत की घाटी और कौनसे काल की गाथा मैं नहीं जानती पर इतना जानती.. की इस किनारे की छातीमें उस दुसरे किनारे का इश्क धडकता तो हिज्र की गाथा मेरे होठोंपर सिसकतीं उस नदी की तरह लगती थी और मैं - कुछ उसी तरह सुनती और कहतीं थीं जिस तरह खामोशी की नदी बहती थीं... ओ मेरे शाह मुराद सांई! वो कौनसा काल था और कौनसी तिथी तू स्वयं नदीपर आया था और तूने हंसकर नदीपर अक्षरोंका सेतू बनाया था और मुझे सेतूपर ले जाकर दुसरा किनारा दिखाया था.. उस दिन नदी गुनगुनाईं थीं.. और मेरे कानोंमें उसने राज़की एक बात कहीं थीं... और सांई! यह हिज्र और वस्ल की गाथा तभी से चली आती हैं ना खुलकर होंठोंसे निकलती ना रगोंमें खामोश होती हैं... वो खामोशी की नदी मेरी यादमें बहती हैं और इस किनारे की छातींमें जब दुसरे किनारे का इश्क धडकता और बिरहा रगोंमें चलता मैं उठकर नदीपर जाती हूं अक्षरोंका सेतू बनाती हूं पर सेतूपर खडी होती हूं तो न कोई आर दिखता है न कोई पार दिखता हैं सिर्फ एक चिंगारी हैं जो एक लीला खेलती और अंधेरेकी छातीमें वो कभी बुझती, कभी जलती .. जाने खुदा वो क्या कहतीं हैं और खामोशी की वो नदी मेरी याद में बहती हैं...

धागा प्रचंड श्रीमंत होत चाललाय

लॉरी टांगटूंगकर
Wed, 05/29/2013 - 14:01 नवीन
धागा प्रचंड श्रीमंत होत चाललाय आता माझेपण थोडसे, मी जुन्या स्मृती चाळवू लागलो. त्या जुन्या आठवणींच्या विश्वात मी आश्रय घेतला. माझ्या मनाला त्या मध्ये स्वैर सोडून दिले. परंतु मला ज्या स्मृतींचा दर्शन होत होते, ती एक भूत काळाची तात्पुरती आणि वरवरची झलक होती काय ? भूतकाळात आकाशात विहार करताना कुठूनही कसेही स्मृतींचे अखंड तुकडे पुन्हा पुन्हा उगवत होते आणि मावळत होते. त्या अथांग अवकाशाच्या विस्ताराची कल्पना करता येत नव्हती तिथे जीवनाच्या प्रवाहाची सतत भर पडत होती. पण शेवटी तो जीवन प्रवाह आतून शुष्क बनून जातो म्हणजेच माणसाचा मृत्यू होतो. मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे. भूतकाळाच्या अवकाशातील एक कृष्णविवर आहे. एक शून्य आहे. मर्यादेची कसलीही सीमारेषा नसलेल्या त्या पोकळीमध्ये जिवंत अस्तित्वाचा पूर्ण आभाव असतो. त्यातल्या कृष्ण विवरात आपण एकदा शिरलो, कि तिथून परतीचे मार्ग कायमचे बंद होतात का ? जर आपण स्मृतींच्या अवकाशात भूतकाळात मनाने जाऊन प्रवास करतो तसा वर्तमान काळात पुढे जाऊन नाही का करता येणार ? लहान पाणी मी आईशेजार उघड्यावर झोपायचो. अवकाशात पसरलेले तारे तारकाविश्व पाहायचो. त्यावेळी माझ्या मनात माणसाचा जन्म, मृत्यू आणि हे अथांग अंतराळातले विश्व याबद्दल विचार उमटायचे. हे विचार मी नेमक्या कोणत्या शब्दात करायचो हे आता आठवत नाही. पण माझ्या सारखी लहान बालके हे विचार करतात हे नक्की. भाषेच्या आधी विचार निर्माण झालेले असतात. विचार हा भाषेला शब्दांचे रूप देतो. भाषा हि नेहमी विचारांची गुलाम असते. स्वच्छ चांदण्यारात्री वर पाहत पहुडलो असताना हळूहळू वरचे ते तारकाविश्व खाली येई. शेवटी ते इतके खाली येई, की हात लांब केला तर त्या चांदण्याला सहज स्पर्श करता यावा. त्यावेळी मला आढळे, की या कोट्यावधी चांदण्या, तारे किती जवळ जवळ ठासून भरलेले आहेत. असे यापूर्वी आपल्याला कधी दिसले नव्हते कि जाणवले नव्हते. त्यावेळी माझ्या मनात येई, ‘या आकाशाच्या घुमटामध्ये मी म्हणजे केवळ एक ठिपका तर नाही ना ?’ डोळे उघडे ठेवून आकाशाकडे पाहताना मी आश्चर्याने भारावून जायचो. शेजारी माझी आई झोपलेली असायची तिचा मंद श्वास मला ऐकू यायचा. वरचे आकाश अत्यंत सावकाश फिरत राहायचे. क्षितिजावर नवीन तारे उदयास येत. पण सप्तर्षी मात्रे नेहमी दिसत राहत. ते कधी अदृश्य व्हायचे नाहीत. त्यांचा आकार मला लांब दांड्याच्या फावड्यासारखा वाटायचा. हे फावडे रात्रभर आकाश नांगरत असे. कशासाठी ? पेरणी करण्यासाठी ? पण तो ध्रुव तारा मात्र अविचल असे. आपली जागा सोडायचा नाही असे का ? बाकीच्या चांदण्याप्रमाणे तो का हलत नाही ? असे त्यावेल माझ्या मनात असे प्रश्न निर्माण होत असत. हे प्रश्न कालच्या स्मृतीमध्ये राहिले आहेत, का माझ्या आजच्या विचारणा त्यावेळच्या प्रश्नांची एक नक्षीदार झालर लाभलेली आहे ? कदाचित दोन्हीही असेल. आजची भाषा हि नक्कीच कालची स्मृती असते. अन या कवितेबद्दल मी काय लिहिणार त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही नजरेत वासनेचा श्रृंगार पाहिला मी रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतु वस्तीतुनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो तो सूर्य ही जरासा लाचार पाहिला मी -अनिल कांबळे

वाह त्या कोवळ्या फुलांचा बाजार..

अक्षया
Wed, 05/29/2013 - 14:16 नवीन
ही कविता फार छान आहे. या कवितेचे गाणे ऐकले आहे.

लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच

सुहास..
Wed, 05/29/2013 - 16:27 नवीन
लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या. >>> अर्थातच ...काही मिपावरच्या लेखकांचे आवडलेले ऊतारे आणि ओळी चालतील का ? ..तुर्तास मला आवडलेले हे तीन मिपाकरांचे ... १) नान्या ने केलेले निरूपण... संत जनाबाई. महाराष्ट्राच्या भूमीत समाजसुधारणा, भक्तीमार्गदर्शन या हेतुन प्रेरीत होऊन जे अनेक संत होऊन गेले त्यातले एक अग्रणी नाव. नामयाची दासी, दासी जनी, जनी नामयाची यासारख्या अनेक नावांनी स्वतःला संबोधुन विठ्ठल भक्तीत अखंड रममाण झालेली एक स्त्री संत. कधी आवडीने विठ्ठलाचे नाम घेत तल्लीन होऊन भजणारी तर कधी त्याच्यावर संतापणारी जनी. एक ना अनेक अशी तिची रुपे आपल्याला तिच्या अभंगातुन पहायला मिळतात. कधी विठ्ठलाचे गुणगान करतांना जनी त्याला लेकुरवाळा म्हणते आणि सारे तिचे सखे सोबती हे जणू काही विठ्ठलाची लेकरे आहेत असे समजुन तल्लीनतेने म्हणते - विठु माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा अहाहा ! काय ही एकेक लेकरे ! प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा कौतुकाने यांना खेळवत असेल हे नि:संशयच. ती वयाने लहान असली तरी समज आणि जाणिवेने महान अशी चौघे दैवी लेकरे आणि त्यांचे सोबती विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर एखाद्या अल्लड नातवाने आपल्या आजोबाच्या अंगावर बागडावे अशाच प्रेमाने आणि आपुलकीने बागडत आहेत आणि जगाच्या दृष्टीने तो सर्वेसर्वा, परमेश्वर असला तरी या नातवांसाठी तो पोराहुन पोर झाला आहे. नातवांना खेळवणे हा खरोखर आजोबांच्या आयुष्यातील आनंदाचाच क्षण असतो. पण ही मंडळी जरी विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळत असली तरी जनी त्यांना विठ्ठलापासुन वेगळे समजत नाही. जनीच्या दृष्टीने विठ्ठलच विविध मानवी रुपांमधे आला असुन त्याची लीला दाखवत आहे. जनीला हे उमगले आहे की संत हेच देव आणि दगडाचा देव हा केवळ प्रतिकात्मक आहे. पण हे सांगतांना जनी एकापेक्षा एक सुंदर दाखले देते. पाणी, ढग समान आहेत, माती धुळ समान आहेत इत्यादी दा़खले देत जनी म्हणते असेच संत आणि देव समान आहेत. इतक्या सरळसोपेपणाने जनीने सांगितले आहे की अडाण्याहुन अडाण्याला सुद्धा ते चटकन कळावे. पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी । काय या दोन्हीपणीं वेगळीक माती तेचि धूळ धूळ तेचि माती । भेंडा आणि भिंती काय दोन साखरीं गोडी गोडी साखरेसी । थिजलें तुपासी काय दोन्ही डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा । शांति ज्ञानकळा काय भिन्न वदन ते ओंठ ओंठ तें वदन । क्षेमआलिंगन काय दोन जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ । आशा आणि लोभ काय दोन संत तेचि देव देव तेचि संत । म्हणे जनी मात गोष्‍टी भिन्न असे साक्षात देवस्वरुप असलेले संत जेव्हा एकत्र येतात तेव्हा विठ्ठल सुद्धा सर्व काम सोडुन त्यांच्यात येउन रहातो. नाम संकिर्तन चालले असतांना विठ्ठल स्वतः त्यात रंगुन जातो तर मानवाची काय कथा ! आणी मग जनी सांगते अशा विठ्ठलाला सुद्धा रंगात रंगवुन टाकणार्‍या संतानाच शरण जावे. अर्था ज्या संताला शरण जायचे त्याची परिक्षा करुनच मग शरण जावे केवळ भगवी वस्त्रे ल्यायलेल्या मनुष्याला नव्हे. २ ) चिगो ऊर्फ आमचे मित्रवर्य सुशीभक्तींत रमले होते तेव्हा .... स्साल्याने शेवटच्या वाक्याला फुल्ल सेन्टी केले होते. स्साला एवढी वर्सॅटॅलिटी जर कुण्या विंग्रजी लिवणार्‍याकडे असती ना तर लोकं डोक्यावर घेऊन नागडी नाचली अस्ती त्याला.. पण आम्ही साले कर्मदरीद्री.. अरे, नुस्त्या खटल्यांच्या भरवशावर पानं खरडणारे तुम्हाला संमेलनाध्यक्ष म्हणुन चालतात आनी आमच्या सुशिंना "नुस्ते लोकप्रिय" म्हणून अनुल्लेखानी मारणार तुम्ही, भडव्यो !? सुशिंना मी बर्‍याच आधी वाचलं. कॉलेजमध्ये असतांना पारयणं केली. नंतरच्या धबगड्यात हे वेड जरा मागे पडलं, पण कॉलेजात असतांना मी एका वहीत एकीकडे सुशिंची पुस्तकं (इश्यु केलेली) लिहित असे आणि बाकी सगळ्यांची दुसरीकडे, पण सुशिंचं परड्म नेहमीच जड होतं. एकदा मी लायब्ररीतून सुशिंच्या तीन कादंबर्‍या संध्याकाळी इश्यु करून नेल्या आणि रात्रभरात वाचून पुन्हा आणखी घ्यायला सक्काळी लायब्ररीत गेलो. तिथली बाई बोलली, "तू ह्या सगळ्या पुर्ण वाचल्या !?" मी बोललो," हो, पुर्ण वाचल्या." ती बोलली ,"झोपला नाहीस का?" मी बोललो ," झोपलो की थोडा." तिला विश्वासच बसेना. म्हणे "नक्की"?? मी पुन्हा हो म्हणालो.. शेवटी ती बोलली, "कमाल आहे !!" ........... त्या वेडीला काय ठाऊक, कुणाची आणि किती कमाल आहे ते?.. जाने दो, दिवाना ही जाने दिवाने की हालत....! ३ ) अरूंधती ताई दंगली चा अनुभव कथन करतात तेव्हा .... पुढचा अर्धा तास आम्ही कोणीही एकमेकांशी बोललो नाही. कधी नव्हे ते इतके जीव खाऊन पळाल्यामुळे पोटात प्रचंड दुखत होते..... छातीची धडधड अजून थांबली नव्हती.... पळताना उशीर झाला असता तर त्या संतप्त जमावाच्या हाती आपले काय झाले असते ही कल्पनाच करवत नव्हती..... त्या संकटाच्या तुलनेत त्यानंतर उभ्याने करायला लागलेला बसचा प्रवास कस्पटासमान होता. बसच्या खिडकीतून आत येणारी अस्पष्ट वाऱ्याची झुळूक घामट हवेतही शरीराला आणि मनाला आल्हाद देत होती. आपण सुरक्षित आहोत, हातीपायी धड आहोत आणि एका जीवघेण्या परिस्थितीतून सुटून आपल्या घरी परत चाललो आहोत ह्याचेच मनाला हायसे वाटत होते! दंगल, दंगल म्हणजे काय असते ह्याचा माझ्या आयुष्यातील तो एक अविस्मरणीय अनुभव होता! संतप्त, चिडलेला, आक्रमक जमाव इतक्या जवळून बघायला मिळेल, दगडफेकीचा -लाठीमारीचा असा अनुभव मिळेल असे आयुष्यात वाटले नव्हते! आणि हे सगळे अनुभवूनही आम्ही सर्वजण हातीपायी धड, सुरक्षित होतो हेच एक नवल होते! त्या विस्मयाला उराशी बाळगत आणि दंगलीच्या त्या जीवघेण्या आठवणीला मनातून दूर झटकतच आम्ही पुण्याला घरी परतलो गैर लागु असल्यास माफी, पण काही मिपाकर्स खरचं टची लिहुन जातात ...वेळ आणि परवानगी असल्यास अजुन टाकतो ..

वेळ आणि परवानगी असल्यास अजुन

मोदक
Wed, 05/29/2013 - 20:43 नवीन
वेळ आणि परवानगी असल्यास अजुन टाकतो चेष्टा करतो काय..?? बिन्धास्त टाक!!! :-)
↩ प्रतिसाद: सुहास..

सुहास उतार्‍यांबरोबर दुवे पण

आदूबाळ
गुरुवार, 05/30/2013 - 01:41 नवीन
सुहास उतार्‍यांबरोबर दुवे पण द्या की...
↩ प्रतिसाद: मोदक

मिपाकर चित्रा मॅडमनी एके

मोदक
Wed, 05/29/2013 - 20:52 नवीन
मिपाकर चित्रा मॅडमनी एके ठिकाणी लिहून ठेवले होते.. अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तीवर लोकांनी चुकीने, न समजता आरोप केलेले असतात असे आपल्याला वाटत असते. असे आरोप कधी खरे असतात, तर कधी नसतात, तर कधी गैरसमज असतात. कधी अशा व्यक्तींना शूर, किंवा उत्तम किंवा खुजे किंवा दुष्ट किंवा लबाड म्हणून सिद्ध करण्यासाठी म्हणून काहींनी त्यांच्याविषयी लंब्याचौड्या बाता मारलेल्या असतात. अशा आपल्याशी जोडलेल्या लोकांवरचे आरोप दूर करण्याची कधीकधी इच्छा होऊ शकते. जेव्हा ही व्यक्ती या काळात, जितीजागती, रक्ताच्या नात्याने जोडलेली अशी आपल्यासमोर असते किंवा आरोप दूर होण्याशी काहीतरी स्वार्थ जोडलेला असतो, तेव्हा असे आरोप दूर करणे एखाद्याच्या दृष्टीने निकडीचे असू शकते. मात्र जेव्हा अशी व्यक्ती ही अनेक पिढ्यांमागची, लांबची नातेवाईक असण्याची शक्यता असते, तेव्हा अशा काळाने, आहाराविचाराने दूरस्थ अशा व्यक्तीवरचे असे आरोप दूर झाले काय किंवा नाही झाले काय, आपल्या "खुद्द" स्वत:च्या सध्याच्या स्थितीत काहीही ढिम्म फरक पडणार नाही असे बहुदा दिसून येते. उगाच वेळ वाया का घालवा? भारतातल्या ऐतिहासिक गोष्टींत इतकी भेसळ झाली आहे की कशाचा कशाला पत्ता लागत नाही. या अशा कथांमधील भेसळीला दूर करून अशा कथेतील ऐतिहासिक सत्य काय असू शकते याचे थोडेफार अंदाज लावण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, पण तसा करण्याची गरज आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारावा. अमोल (जातीवंत भटका) चे एके काळचे गूगल स्टेटस. गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे ! आजच व्यनीमधून मिळालेले डोस.. ;-) Effort is very important. But, knowing 'when', 'where', and 'how' to apply it, gets the results 'you want' आणखी पेस्टवतो आहे..
↩ प्रतिसाद: सुहास..

रामदास काकांचा एक अशक्य

मोदक
Wed, 05/29/2013 - 21:21 नवीन
रामदास काकांचा एक अशक्य प्रतिसाद :-)) सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. याचा अर्थ बोका एकटा झोपत नाही.टाकीवर पुरेशी पकड (ग्रीप)न मिळाल्याने ओरखळे उठतात. काही दिवसानी ओरखळ्यांची नवलाई संपली की तो गपगुमान झोपून राहील. या बाबतीत दुय्यम स्वरुपाचे असे काही प्रश्न मनात येतात. तो झोपण्यापूर्वी वेगवेगळे आवाज काढतो का ? तसे असेल तर प्रकरण नविन आहे. आवाज नसेल तर भाटी जुनीच आहे असे समजा. सिटवर सकाळी केस मिळतात का ते बघा. कदाचीत भाटी येत नसेल पण बोका दाढी करत असेल .केस आढळले नाहीत तर तो बोका नसून भाटी आहे असे समजा .भाटी बोक्यापेक्षा वस्ताद असते आणि तिची नखे तिक्ष्ण असतात. नखांवरून भाटी आहे की बोका ते समजते. अंगपरीक्षा करावयाचा प्रयत्न करू नये.काहीवेळा गळ्यापर्यंत उडी मारून जुगुलर का काहीशा नावाची नस पकडते.जुगुलरचा आणि जुगण्याचा काही संबंध नाही.त्या नसा वेगळ्या . त्यांची नावे एखाद्या हुशार विद्यार्थ्याला विचारावी. पराचा अभ्यास बरा आहे असे म्हणतात बॉ. पूर्वी धम्याला पण मांजरी पाळण्याचा षौक होता म्हणे. पण त्याला नोकरी लागली .त्याखेरीज मिपावर एक कृष्णमार्जार प्रेमी नावाचा मुलग्या आहे. त्याला विचारा. तूर्तास त्या मार्जारावर लक्ष ठेवा . ते आत झोपले की वरून मच्छरदाणी घाला. नंतर सिटवर (गाडीच्या ) पाणी ओता. हे पाणी ओतण्यापूर्वी कोसला नावाची एक कादंबरी वाचा. त्यात मांजर हाकलण्या/पकडण्यासाठी एक आख्खा धडा आहे. ह्या धड्यामुळे ते लेखक अजूनही बोक्यासारखी मिशी ठेवतात. हां तर मी सांगत होतो ते पाणी ओतण्यासाठी .पाणी ओतले की कुत्र्याचा पण मूड जातो.पूर्वी असं काही आमच्या घराच्या समोर असं काही आलं की आमचा गडी पाणी ओतायचा ते आठवलं. हां तर मच्छरदाणी. काळ्या रंगाची नको. फार पूर्वी गिरणगावात एकाच रुम मध्ये दोन कुटुंब राहयची तेव्हा काळ्या मच्छरदाणीचा वापर केला जायचा. मांजराला संकोच नसतो. त्यामुळे पांढरी वापरली तरी चालेल. पाणे ओतल्यावर मार्जार बाहेर येईल .त्याची नखे मच्चारदाणीत अडकतील .मग मच्छरदाणीमें मांजर. त्यानंतर पुण्यात असाल तर लकडीपुलावर जा. लकडीपूल माहीती नसेल तर मिपावर एक लेख आला होता लकडीपूलाचा तो वाचा. तो वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की दुचाकी वाहनाला प्रवेश नाही. नो प्रॉब्लेम तुम्ही सरकारी नोकर आहात. तुम्हाला कोणीच प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला तर तर ....मिपावर पुढचा धागा टाका. :-)) :-)) :-))
↩ प्रतिसाद: मोदक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा