Skip to main content

शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 31/01/2013 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल. असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय (मराठा) वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता. ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.' खरी गोष्ट अशी आहे की तमाम रयतेला शिवरायांच्या विषयी अत्यंत आपुलकी होती. स्वराज्याची स्थापना सर्वांना आनंददायी गोष्ट होती. असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे. -------------------------------------------------------------------------- (राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल.) संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 43470
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

मला इतिहास तज्ज्ञ न म्हणता केवळ इतिहास संकलक म्हणा असेच श्री. अप्पा परब ह्यांचे म्हणणे आहे. मला त्यात विनयशीलता जाणवते.

शिवाजी महाराजांना कुणी विरोध केला, महाराजांनी कुणाला विरोध केला.. आता कोणं कुणाला विरोध करतय ह्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही.. मला महाराजांविषयी नितांत आदर आहे.. आणि माझ्या मुलाला एकवेळ "देव" म्हणजे काय हे माहिती नसेल पण महाराज नक्की माहिती असतील...

"सदर धाग्याउपरी याउप्परी आणिक बोभाट झालियाउपरी , नित्यवादांस कारण धागा आणिक प्रतिसाद ऐसे जाणोन वाचनमात्र नतीजा पावेल..." अशी शंका का बरे येत आहे?

ब्राह्मणांनी राज्यभिषेकाला विरोध केला होता. कारण ब्राह्मणी धर्मानुसार क्षत्रिय अस्तित्वात नाहित, अशी कंडी ब्राह्मण पिकवत होते .असाच विरोध शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणात केला गेला. परब सायेबांचा इतिहासाचा नको तेवढा जास्त अभ्यास झालेला असावा. :-P

In reply to by ग्रेटथिन्कर

वेदोक्त प्रकरणाला भक्कम पुरावा आहे तसा शिवाजी महाराजांना विरोध केल्याचा अस्सल पुरावा नाही.

बॅटमॅन, म्हणजे राज्याभिषेकाला विरोध केला हे सर्वश्रुत आहे, फक्त पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करावी असाच चर्चेचा सुर दिसतोय. चालुद्या

In reply to by ग्रेटथिन्कर

तुमची विधाने कुठल्या पुराव्यावर आधारित आहेत ते सांगा आधी. बाकी बकवास बाजूला राहूदे. कुठले तरी विधान वदवून घेण्याचा बालिश अट्टाहास स्पष्टच दिसतोय वरती.

शिवाजी महाराज महाराष्ट्रात होऊन गेले हीच महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. ते नसते तर आज आपण सगळे औरंगझेबाचे अनुयायी झालो असतो. महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही. ते आमचे महाराज आहेत!

In reply to by पैसा

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही. ते आमचे महाराज आहेत!
प्रचंड बाडीस!

In reply to by पैसा

महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही.
काही गोष्टी प्रतीकात्मक असतात आणि त्या घडणे ही काळाची गरज असते. महाराजांनी सोन्याच्या नांगराऐवजी लाकडी नांगर चालवला असता तरी 'काही फरक पडला' नसता पण जनमानसाला प्रेरित करण्यासाठी काही वेळा काही पावले उचलणे आवश्यक असते. स्वतः लिएँडर पेसने म्हटले आहे की एकदा हरत असताना त्याला एक प्रेक्षक तिरंगा फिरवताना दिसला आणि त्याचा आत्मविश्वास जागा झाला. असो. राजांना अभिषेक, सम्राट्पद मिळावे की नाही हा लेखाचा विषय नसून जातीद्वेष्ट्या खोडसाळ प्रचाराला उत्तर देणे हा मुख्य हेतु आहे.

In reply to by सृष्टीलावण्या

काही गोष्टी प्रतीकात्मक असतात आणि त्या घडणे ही काळाची गरज असते.
याच्याशी सहमत आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रयतेला आश्वस्त करण्यासाठी सोन्याचा नांगर वापरून जमीन नांगरली आणि राज्याभिषेक करवून घेतला. महाराजांच्या सैन्यात फक्त सर्व जातींचेच नव्हे तर मुस्लिम धर्माचे सरदार सुद्धा मोठ्या पदांवर होते. माणसे पारखताना महाराजांनी जातधर्म काही पाहिला नाही आणि कार्यसिद्धीसाठी कोणत्याही विरोधाची तमा बाळगली नाही. अशा जाणत्या राजावर कोणा एका जातीचा हक्क सांगणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. तसे तर भगवद्गीता सांगणार्‍या श्रीकृष्णालासुद्धा "गवळ्याचा पोर" म्हणून हिणवणारे लोक होतेच. महाराजांना तेव्हा कोणी जातीवरून विरोध केला असे म्हणून आता साडेतीनशे वर्षांनंतर कोणी वाद घालायला पुढे येत असतील तर त्यांना नेऊन बारा गडगड्यांच्या हिरीत घाला. त्याबद्दल चर्चा करण्याइतकीसुद्धा किंमत देणे हा वेळेचा अपव्यय आहे.

In reply to by पैसा

अशा जाणत्या राजावर कोणा एका जातीचा हक्क सांगणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. तसे तर भगवद्गीता सांगणार्‍या श्रीकृष्णालासुद्धा "गवळ्याचा पोर" म्हणून हिणवणारे लोक होतेच. महाराजांना तेव्हा कोणी जातीवरून विरोध केला असे म्हणून आता साडेतीनशे वर्षांनंतर कोणी वाद घालायला पुढे येत असतील तर त्यांना नेऊन बारा गडगड्यांच्या हिरीत घाला. त्याबद्दल चर्चा करण्याइतकीसुद्धा किंमत देणे हा वेळेचा अपव्यय आहे. +१०,०००... कारण लाखमोलाचा विचार ! इतिहासाचा उपयोग जुन्या गोष्टींचा केवळ रवंथ करण्यासाठी करण्यापेक्षा, फक्त आणि फक्त शहाणे होऊन भविष्याकाळात एकत्रितपणे योग्य निर्णय घेणासाठी करण्याची कुवत नागरिकांत (आणि पर्यायाने नेत्यांत) आली की राष्ट्र वयात येऊन प्रगत व्हायला सुरुवात होते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गडबडीत एक शुन्य कमी टंकले गेले ! कृपया वरील दोन्ही ठिकाणी "+१००,०००" असे वाचावे

In reply to by पैसा

शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रयतेला आश्वस्त करण्यासाठी सोन्याचा नांगर वापरून जमीन नांगरली आणि राज्याभिषेक करवून घेतला.
ही सोन्याच्या अथवा गाढवाच्या नांगराने जमीन नांगरायची प्रथा फार प्राचीन आहे आणि तिचा संबंध गधेगाळ आणि अश्वमेध ह्या दोन प्राचीन प्रथांशी आहे. कलिगाधिप खारवेलाच्या हाथीगुंफा शिलालेखात ' खारवेला हा दुष्ट राजाची बाजारपेठ गाढवाच्या 'पृथुल' नांगराने नांगरतो असे लिहिले आहे. हा सुमारे २२०० वर्षापूर्वीचा शिलालेख आहे. मेडे च अवराजनिवेसिंत पीथुड गदभनंगलेन कासयति! पृथ्वी हे मातेचे रूप आणि गधेगाळीतील गाढव हे गर्दभ नांगराचे रूप. एकंदरीत अमंगलाचे, अप्रतिष्ठतेचे आणि मानहानीचेही प्रतिक. याउलट सूर्य हे सोन्याचे प्रतिक. सूर्याला वेदांमध्ये हिरण्यगर्भ असे म्हणले गेले आहे. अश्वमेधात मृत अश्वाला सोन्याच्या चकतीवर ठेवले जाते. एकंदरीत सोने हे मांगल्यतेचे प्रतिक. तेव्हा गाढवाच्या नांगराने अपवित्र झालेली जमीन सोन्याच्या नांगराने नांगरणे म्हणजे तिचा अधम पुरुषाशी झालेला अपवित्र संयोगाचा परीणाम पुसून काढण्यासाठी तिचा पुन्हा दिव्यत्वाशी संबंध येऊ देणे पर्यायाने अपवित्र झालेल्या पृथ्वीला परत पवित्र करणे हा उद्देश. एकंदरीत आदीलशाही सरदार मुरार जगदेवाने पुणे उद्ध्वस्त करून गाढवाच्या नांगराने भूमी नांगरली होती. तीच जमीन सोन्याच्या नांगराने नांगरून शिवाजीराजांनी तिला पुन्हा आपलेसे करून घेतले.

In reply to by पैसा

महाराजांचा राज्याभिषेक झाला असता आणि नसता तरी आम्हाला काही फरक पडत नाही
असे आज म्हणता येते. पण तत्कालीन सामन्य जनतेसाठी आपल्या स्थावर मालमत्तेवर "अधिकृत" राजसत्तेची मोहोर असावी असे वाटणे स्वाभाविक होते. आणि महाराजांचा राज्याभिषेक त्या सामान्य जनतेला विश्वास देण्यासाठी होता. त्याची गरज होतीच.

In reply to by पैसा

ते नसते तर आज आपण सगळे औरंगझेबाचे अनुयायी झालो असतो.
कवी भूषण ची वाक्ये अशी आहेतः चारो वर्ण धर्म छोडि कलमा निवाज पढि । सिवाजी न हो तो सुनति होत सब की ॥

महाराज साहेब आणि विश्वेश्वरभट्ट (गागाभट्ट) यांचा स्नेह बराच जुना आहे.याला कारण महाराजा शहाजी महाराज असावेत, शहाजीराजेंचा बंगळुरात सुमारे ६० पंडितांचा दरबार भरत असे.त्यातील काही पंडित हे स्थायी तर काही निमंत्रित असत.वेदशास्त्र चर्चा, संस्कृत कोडी,पुराणावर उहापोह,वाद-विवाद हि या दरबारात होत असे.गागाभट्ट यांचे वडील दिनकरभट्ट आणि काका कमलाकर हि या दरबाराचे निमंत्रित, शहाजीराजे बंग्ळूरास असताना त्यांनी शिवाजी महाराजांना शिक्षणासाठी बंग्ळूरास बोलावून घेतले होते.हि ओळख कदाचित तेव्हाची असू शकते.

In reply to by मालोजीराव

मालोजीराजेंच्या माहितीला काही शेपूट जोडू इच्छितो. पूर्वी पैठणला दक्षिणकाशी असे म्हणत. पैठण आणि काशीतील सांस्कृतिक संबंध घट्ट होते. क्वचित पैठणच्या धर्मपीठाने अपुरा अर्थ काढल्याची भावना झाल्यास विद्वान काशी धर्मपीठाकडे दाद मागू शकत. हे थोडेसे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयासारखे होते. पैठण व काशीत लिंकिंग असण्याचे आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रातील अनेक विद्वान ब्राह्मण घराणी काशीत स्थाईक झाली होती. देवगिरीच्या यादव राजांची सत्ता संपल्यानंतर राजाश्रय गेला म्हणून असेल, नव्या मुसलमानी राजवटीकडून धर्मांतराची भीती असेल, किंवा वेद, ज्योतिष, व्याकरणाचा गाढा अभ्यास करायचा असेल, कारणे काहीही असली तरी मराठी ब्राह्मणांनी काशीत अत्यंत आदर आणि विद्वत्तेच्या दृष्टीने अग्रपूजेचा मान संपादन केला होता. यात भट्ट, शेष व मौनी ही देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची घराणी प्रख्यात होती. यातील भट्ट घराणे हे पैठणचे. या घराण्याचा लौकिक असा होता, की त्यात ओळीने ३० पुरुष नामांकित ग्रंथकार झाले. त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध व मान्यताप्राप्त झाले. या घराण्यातील रामेश्वर भट्ट यांनी काशीविश्वेश्वराचे पाडलेले देऊळ बादशहाकडून पुन्हा बांधून घेतले. (नंतर पुन्हा नासधूस झाल्यावर पुढे साध्वी अहल्याबाई होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केला) या रामेश्वरभट्टांचा नातू म्हणजे निर्णयसिंधुकार कमलाकर भट्ट. (हेच गागाभट्टांचे काका का?) देवगिरीच्या यादव राजांचा पराभव झाल्यानंतर हिंदू राजांनी मुसलमानी सत्तेपुढे सबुरी पत्करली. नंतर कुठल्याही राजाला हिंदू पद्धतीने अभिषेक झाला नाही. ही परंपरा जवळपास २०० वर्षे खंडित झाली होती. परकी सत्तेच्या दहशतीमुळे वैदिक पद्धतीने शास्त्रशुद्ध राज्याभिषेक कसा करावा, याची प्रक्रिया ब्राह्मणही विसरुन गेले होते. गागाभट्टांचे पणजोबा नारायणभट्ट यांनी राज्याभिषेक प्रयोगम् हा ग्रंथ लिहिला होता. त्याच्या आधारे गागा भट्टांनी उत्तरेकडील काही राजांना राज्याभिषेक केला असू शकेल. गागा भट्टांचा आणि शहाजी राजांचा जुना परिचय असू शकेल. शिवाजी महाराजांचे कुलोपाध्याय नाशिकचे अनंतभट्ट कावळे यांचा आणि गागाभट्टांचाही गाढ स्नेह होता. त्यामुळे शिवाजी राजांना गागाभट्ट फार पूर्वीपासून परिचित होते. त्यांचा संबंध नंतर आला.

In reply to by योगप्रभू

महाराष्ट्रातील अनेक विद्वान ब्राह्मण घराणी काशीत स्थाईक झाली होती.देवगिरीच्या यादव राजांची सत्ता संपल्यानंतर राजाश्रय गेला म्हणून असेल, नव्या मुसलमानी राजवटीकडून धर्मांतराची भीती असेल, किंवा वेद, ज्योतिष, व्याकरणाचा गाढा अभ्यास करायचा असेल, कारणे काहीही असली तरी मराठी ब्राह्मणांनी काशीत अत्यंत आदर आणि विद्वत्तेच्या दृष्टीने अग्रपूजेचा मान संपादन केला होता. राजाश्रय संपला आणि येथील विद्वान ब्राह्मण घराणी मुसलमान राजवटीच्या भीतीने काशीला पळून गेले, असे स्पष्ट लिहिलं असतं तर वाचायला आवडलं असतं. उगाच गाढा अभ्यास वगैरे जोड्ण्यात काही मतलब नाही. सामाजिक परिस्थितीच अशी होती की अनेक लोक पळून गेले, अनेकांनी धर्म बदलला, अनेकांनी आपले आडनावं बदलून घेतली. बाकी, आपण काहीही लिहिलं तरी इतिहासात जे आहे ते बदलू शकत नाही. फक्त चूकीचे लिहिल्याने लिहिणा-याबद्दल विश्वास कमी होतो. ओसाड गाव बंद दिसतं तिकडे डकवलेला प्रतिसाद इथे डकवायचा होता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतिहासात लिहिलेले आपण बदलू शकत नाही, तसेच कुणाचे घट्ट समज/गैरसमजही बदलू शकत नाही. मीही लिहिताना 'जे लिहीन ते ब्रह्मवाक्य (किंवा काळ्या दगडावरची रेघ') अशा आत्मविश्वासाने लिहीत नाही. त्यामुळे चुकीचे लिहिले असेल तर मी नम्रभावाने माफी मागतो आणि माझे लेखन फारशा गांभीर्याने घेऊ नये, असेही आवाहन करतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजाश्रय संपला आणि येथील विद्वान ब्राह्मण घराणी मुसलमान राजवटीच्या भीतीने काशीला पळून गेले, असे स्पष्ट लिहिलं असतं तर वाचायला आवडलं असतं. उगाच गाढा अभ्यास वगैरे जोड्ण्यात काही मतलब नाही.
पूर्वार्ध बरोबरच आहे, पण एक लहानसे डीटेल चुकलेय असे मला वाटते. इस्लामिक अत्याचार सगळीकडेच होते, फक्त त्यांची तीव्रता सगळीकडे सारखी नव्हती. गाढा अभ्यास किंवा आवडीच्या विषयाचे अध्ययन जवळपास न होणे हेही एक कारण आहे. १७-१८व्या शतकात भारतात संस्कृत विद्येची ४ महत्वाची केंद्रे मानली जातातः काशी, मिथिला, तंजावुर, वाई-सातारा. यांपैकी प्रत्येक केंद्र वेगवेगळ्या ब्रँचसाठी फेमस होते. पण काशीमध्ये सर्वच ब्रँचचे लोक बहुसंख्येने होते. त्यामुळे गेलेलेही बरेच लोक आहेत. निव्वळ अत्याचारामुळे पळाले असते तर सर्व संस्कृत पंडित पश्चिम महाराष्ट्रातच नसते का आले? काशी तर ऐन मुस्लिम पट्ट्यातच आहे तसे पाहिले तर. आणि हे अत्याचार वगैरे नेहमी एकाच रंगात रंगवायचे कारण दिसत नाही. काही राजांनी लै त्रास दिला संस्कृत विद्येला हे खरंय, पण अगदी मोगलाईतसुद्धा संस्कृत विद्येची केंद्रे चांगली फोफावती होती. अवांतरः एक मजा. बघा. गझनीच्या महमूदाची काही एका बाजूला अरबीफारसी तर दुसर्‍या बाजूला संस्कृत मजकूर असलेली नाणी मिळाली आहेत. sanskrit coin

In reply to by बॅटमॅन

महाराष्ट्रावर जेव्हा सुलतानी संकट यायला लागले अंदाजे १३०० पासून म्हणतो (चुभुदेघे) अल्लाद्दिन खिलजी, मलिक काफूर, महमद तुघलक वगैरेंच्या स्वार्‍यामुळे देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य संपूष्टात आले. हिंदू राज्य नष्ट होऊन मुसलमानी राजवट इथे नांदायला सुरुवात झाली तेव्हाच इथे भयंकर दुष्काळही सारखे पडत होते. सुल्तानी आणि नैसर्गिक संकटांनी सामान्य माणूस होरपळून गेला होता. तसाही देवगिरीच्या काळात धर्मग्रंथ, साहित्य संपदा यांना प्रोत्साहान मिळत असेलही परंतु सामान्य माणसांचे प्रचंड हाल होते. देवगिरीच्या राज्यात एक गरीब आणि एक श्रीमंत असे दोनच वर्ग होते. राजा कोणताही असूदे उच्च-निच्च अशा भेदभावामुळे सामान्य जनता वैतागून गेली होती, ही अवस्था अडीचशे तीनशे वर्ष होती. किरकोळ मवाळपणा मुस्लीम राजांमुळे आलाही असेल परंतु महाराष्ट्राच्या माणसाला वाचवायला राजे शिवाजीपर्यंत एकही थोर पुरुष जन्माला आला नाही, असे जे म्हटले जाते ते सत्यच आहे. इस्लामिक अत्याचार सर्वत्रच होते परंतु अत्याचारामुळे पळाले असे म्हणतो त्याचे कारण असे की हिंदु राजांच्या दप्तरी विद्वान ब्राह्मणांना स्थान होते परंतु मुस्लीम राजांच्या राजदरबारी विद्वान ब्राह्मणांना कोणतेही स्थान नव्हते त्याचे कारण असे की त्यांचा राजदरबार हा फारशी आणि उर्दू भाषेत चालणारा होता, तिथे संस्कृतचे काहीच काम नव्हते, म्हणून त्यांना काशी, प्रयाग, विजयनगर गाठावे लागले. एकतर मुसलमान राजवटीचा प्रचंड त्रास आणि पोटाचे कोणतेच साधन उपलब्द्ध नव्हते तेव्हा महाराष्ट्र सोडून जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. अर्थात हा त्रास काही फक्त ब्राह्मणांनाच नव्हता तो मुस्लीमेतर असा सर्वांनाच होता. बरेचशे शूद्र जे होते ते धर्मांतर करुन मोकळे झालेले होते. क्षत्रीयांनी नांगर धरायला सुरुवात केली. व्यापारी लुटले जात होते त्यांनी आपला धंदा सोडून दिला. एकूणच प्रचंड वाताहात झाली सर्वांनीच आपली अस्मिता गमावली होती. अर्थात अस्मिता टीकवण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असे काही नाही, विविध संप्रदायांनी हिंदूधर्म टीकवण्यासाठी प्रयत्न केले. तो वेगळा विषय. आपण दिलेल्या चित्रावरुन मला असे वाटते की समर्थ रामदासांच्या काळापर्यंत हिंदू समाज भ्रष्ट झालेला होता. आपला स्वाभिमान सर्वांनीच गमावला होता. आपले ब्राह्मण विद्वान मुस्लीम राजवटीत कोणा राजाच्या दरबारी किरकोळ कारकोळ काही तरी कारकुनी करु लागले होते आणि त्याचमुळे भाषा, कपडे, रितीरिवाज यांचे आदानप्रदान झाले त्यामुळे तो आलेला मजकूर असावा असे वाटते. (चुभुदेघे) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) =)) प्रा. डॉ. अहो एका मतावर ठाम रहा की. कितीवेळा स्वसंपादन वापरता आहात ? दोन मीनिटात तिसर्‍यांदा संपादन केलेत बघा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मतावर ठाम असतो पण, प्रतिसाद लिहिल्यावर तीनदा तरी दुरुस्त करावे लागते. :) वाक्य, शब्द, पुन्हा पुन्हा पाहावे लागते. [हल्कत] -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाक्य, शब्द, पुन्हा पुन्हा पाहावे लागते.
हे मिपावर कधीपासून सुरु झाले? :P

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इस्लामिक अत्याचार सर्वत्रच होते परंतु अत्याचारामुळे पळाले असे म्हणतो त्याचे कारण असे की हिंदु राजांच्या दप्तरी विद्वान ब्राह्मणांना स्थान होते परंतु मुस्लीम राजांच्या राजदरबारी विद्वान ब्राह्मणांना कोणतेही स्थान नव्हते त्याचे कारण असे की त्यांचा राजदरबार हा फारशी आणि उर्दू भाषेत चालणारा होता, तिथे संस्कृतचे काहीच काम नव्हते, म्हणून त्यांना काशी, प्रयाग, विजयनगर गाठावे लागले. एकतर मुसलमान राजवटीचा प्रचंड त्रास आणि पोटाचे कोणतेच साधन उपलब्द्ध नव्हते तेव्हा महाराष्ट्र सोडून जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.
नेमके हेच चित्र अलीकडच्या काही संशोधनातून जरा च्यालेंज केलेले आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अस्मानी- सुलतानीमुळे महाराष्ट्रच का, बाकीचा भारतही गांजून गेला होता बर्‍यापैकी हे सत्य आहे. पण विषय हा तत्कालीन एलीट ब्राह्मण घराण्यांचा स्थलांतराचा आहे. त्या जगाची डायनॅमिक्स ही सर्वसामान्य लोकांसारखी नव्हती. किंबहुना साहित्यिक, विद्वान , इ. चा आढळ आणि त्यांची पॉप्युलॅरिटी आणि विरुद्ध राज्यसत्ता असे अगदी बायनरी इक्वेशन कधीच नव्हते. अरबी-फारसी शिकून मग आधी कारकुनी मग दिवाणी करत करत ब्राह्मणांनी लै मुलकी कामांत चंचुप्रवेश केलेला होता. (अवांतरः दक्षिणेस अशी कामे करणारे बहुतेक ब्राह्मण, तर उत्तरेत कायस्थ होते.) पण एक मुद्दा रोचक ठरावा. निव्वळ अत्याचार हे कारण नसले तरी पैठणचा र्‍हास या स्थलांतरामागे असेल काय? त्याचा कसकसा परिणाम तिथे झाला? मुळात काशी हे महाराष्ट्रच नव्हे, तर सर्व भारतातील ब्राह्मणांसाठी "द प्लेस टु बी" होते, त्यामुळेच मराठी, बंगाली आणि तेलुगु या प्रदेशांतील ब्राह्मणांचा तरी पक्का एविडन्स दिसतो तिथे. म्हणून म्हणतो, की अन्य प्रदेशांतील उदाहरणे पाहता हे सिंपल लॉजिक लागू ठरावे का तिथे? बंगालमध्ये मिथिला हे महत्वाचे सेंटर असूनही तेथील ब्राह्मण काशीत येतजात. त्यामुळे, कदाचित काही अंशी स्थानिक संस्कृत केंद्रांचा र्‍हास, काही अंशी विद्वत्सभेचे आणि तदनुषंगिक अभ्युदयाचे आकर्षण हे काशीतल्या स्थलांतरामागे फॅक्टर्स असावेत. काशीतील फेमस ब्राह्मण घराण्यांत शेष हे एक घराणे या बाबतीत युनिक केस ठरावे. आदिलशाही दरबारात काही वर्षे घालवून मग या घराण्याचा मूळपुरुष नरसिंह शेष काशीत गेला. नीलकंठ चतुर्धर नामक समग्र महाभारतावर टीक लिहिलेला एकमेव दबंग पंडित तर चक्क शिवशाहीच्या वेळेस कोपरगावहून काशीला गेला. काशीकडे स्थलांतरामागचे हे फॅक्टर्स संमिश्र आहेत , इतकेच मला सांगायचे होते. असो. :) वरच्या विधानांना संदर्भ म्हंजे रोझालिंड ओ हॅनलॉन बाईंचा हा पेपर होय. http://journals.cambridge.org/action/displayAbstract?fromPage=online&ai… बाकीचा पेपर रिलेटेड असला तरी स्थलांतरामागची कारणे स्पष्टपणे डिस्कस करत नाही.

पयले ह्ये सांगा की परब कोन? ब्राह्मण की मरठा की अजुन कोन? ब्राह्मण असतील तर त्यांचे मत बाद. इतर कोणी असतील तरी बाद कारण ते ब्राह्मणाच्या बाजुने बोलताहेत. या ब्राह्मणांनी मस्तानीपाई पेशवाई बुडिवली हो. त्यांचे कसले लाड करताय.

In reply to by मृत्युन्जय

मस्तानीपाई पेशवाई बुडिवली हो
तरीही नफेखोर ज्यूस सेंटर्स आणि हॉटेलांच्या फायद्यासाठी आजही पुण्यात ठिकठिकाणी ही मस्तानी विकली जाते आणि भारताचे भविष्य असणारी तरुणाई ग्लासच्या ग्लास रिचवताना दिसते..सरकार कधी थांबवेल हा दुटप्पीपणा..?

In reply to by आनन्दिता

मस्तानी नावावर बंदी आणली गेलीच पाहिजे नाहीतर आम्ही मस्तानी पेयाची अवस्था वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यासारखी करू - भाजी बीग्रेड. :) :) :) :)

In reply to by मी-सौरभ

राहायचे ठरविले आहे. 'मी' तेवढा दीर्घ कर !!

मुळात अटकेपार भारतावर अंमल गाजवणार्‍या मराठा साम्राज्यात गागाभट्ट् हे बाहेरील कसे? आणि तत्कालिन भूगोल धरायचा तर औरंगाबादेतील ब्राह्मणही 'परकीय'च झाला नाही का?

गागाभट्ट् हेही ब्राम्हणच होते त्यांनी शिवराजाभिषेकाला विरोध कसा नाही केला तसेच महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी गागाभट्ट् यांना कसा काय विरोध नाही केला? या ब्राह्मणांनी मस्तानीपाई पेशवाई बुडिवली हो. त्यांचे कसले लाड करताय.> शिवाजीमहाराजांसाठी प्राणांची पर्वा न करणारे बाजीप्रभु देशपांडे हे ब्राम्हणच होते. शिवाजीमहाराजांची गादी का चालवता आली नाही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना. शिवाजीमहाराजांबद्द्ल नितांत आदर आहे. जातिवाचक विधानांचा निषेध आहे.

In reply to by विलासिनि

शिवाजीमहाराजांची गादी का चालवता आली नाही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना.
ऐतिहासिक अज्ञानाचा कळस...छत्रपती संभाजी,छत्रपति राजाराम,छत्रपती ताराराणी ,छत्रपती शाहू (थोरले) ...यांची चरित्रे वाचा ! आधुनिक काळातील राजर्षी शाहू महाराज, सरफोजीराजे ,प्रतापसिंहराजे, राजमाता सुमित्राराजे यांचीही माहिती घ्या

In reply to by विलासिनि

आता तुम्हीच जात काढली हाये म्हनून एक शंका इचारतो, बाजीप्रभु देशपांडे हे सी. के. पी. होते ना वो?

In reply to by अधिराज

व्हय व्हय. ते बाजीप्रभू देशपांडे नसून बाजी परभूदेशपांडे होते. परभू किंवा प्रभू हे कायस्थच. उदा. पाठारे-प्रभू

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पेशवे साहेब तुमच्या बोलन्याचा हेतु काय आपल्या ध्यानात येत नैये. दोनच गोष्टी बोलतो आता. पहिलि म्हणजे नावात परभू किंवा प्रभू म्हणून सी.के.पी. हे लॉजिक काय पटत नाही आपल्याला. नुस्त्या देशपांडे आडनावाची लोकंबी सी. के. पी असत्यात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हन्जे बाजिप्रभु कुठल्याही जातीचे असले तरिबि आमाला काय फरक पडत नाही. त्याना स्वराज्यासाठी वीरमरण पत्करणारा मावळा म्हणूनच आम्ही त्याना ओळखणार. पण वरती विलासिणी बाईंनी बाजीप्रभूंचीसुद्धा जात काढायचा जो खोडसाळपणा केलाय त्याला आम्ही ते उत्तर दिल होतं. (स्वगतः जिल्ब्या पाडायचा लाई सोस, पण चांगला इशय बी सुचत न्हाय मग काय करणार, शोधा अजुन असले इशय)

In reply to by अधिराज

शिवराजांच्या अभिषेकाला
राज्याभिषेक हा शब्द चुकीचा आहे कारण राज्याला अभिषेक होत नसतो तर राजाला होत असतो. अनेक पवित्र नद्यांचे पाणी आणून त्याचा अभिषेक राजाच्या मस्तकावर करतात. शिवराजांच्या अभिषेकाला म्हणजे शिवराजांवरच्या अभिषेकाला. व्याकरण दृष्ट्या मलाही राजाभिषेक हाच शब्द योग्य वाटतो.

In reply to by सृष्टीलावण्या

राज्याभिषेक हा शब्द चुकीचा आहे
ह्याला काहि आधार (आसल तर) द्या कि प्लिज.
अनेक पवित्र नद्यांचे पाणी आणून त्याचा अभिषेक राजाच्या मस्तकावर करतात.
म्हन्जे अभिषेक आनि राज्याभिषेक यात फरक नस्तो म्हनायचं का? पण तुमीच तर लेखात म्हणलय राज्याभिषेकाची प्रोसेस आवघड होती, कुणाला ठावक न्हवती म्हणून.

In reply to by सृष्टीलावण्या

राज्याभिषेक म्हणजे राज्यासाठी म्हणून केलेला अभिषेक, कुणाला अभिषेक तर राजाला म्हणून राजाभिषेक असा समासविग्रह नाहीये. राज्याभिषेक हाच शब्द बरोबर आहे. मी म्हणतोय त्याला संदर्भ? राजाभिषेक म्हणजे कुठलातरी एक पवित्र अभिषेक असा अर्थ दिलाय इथे या दुव्यावर. राज्याभिषेक म्हणजे करोनेशन असा अर्थ दिलाय याच दुव्यावर. तस्मात, राज्याभिषेक: = राज्यार्थे अभिषेकः | हाच अर्थ बरोबर आहे. पण त्यामुळे राजाभिषेक हा शब्द चूक कसा ठरतो? तर राजाला केलेला कुठलाही अभिषेक म्हणजे राजाभिषेक. मग तो पुत्रप्राप्तीसाठी असो नाहीतर राज्यासाठी असो. असे अनेक अभिषेक राजाला केले जातात, त्या सर्वांना एकत्रितपणे राजाभिषेक म्हणता येईल. या सर्व खंडीभर राजाभिषेकांमधील नेमका कुठला अभिषेक राज्यासाठीचा-म्हणजे सिंहासनारोहणासाठीचा आहे हे कळावे म्हणून त्या अभिषेकाला राज्याभिषेक असे नाव आहे. थोडक्यात, राजाभिषेक= म्हणजे राजाला केल्या जाणार्‍या अनेक अभिषेकांच्या जनरल कॅटॅगरीचे नाव. तर राज्याभिषेक = राजाला राज्यासाठी केलेला एक स्पेसिफिक अभिषेक. त्यामुळे, इथे या संदर्भात राज्याभिषेक हाच शब्द सर्वार्थाने योग्य आहे. कारण तो अधिक नेमका आणि अचूक आहे.

In reply to by बॅटमॅन

संमंला विनंती, दुवे प्लीज दुरुस्त करा. http://spokensanskrit.de/ या वेबसाईटवर जाऊन राजाभिषेक आणि राज्याभिषेक हे दोन्ही शब्द सर्चवले की अर्थ दिसतील.

In reply to by बॅटमॅन

खूप आभारी हाये बॅटमॅन सर माहितिबद्दल. तुम्ही दिलल्या दुव्यात "राज्याभिषेक" म्हंजे "कॉरनेशन" किंवा "इनोगरेशन ऑफ किंग्डम" असे जे अर्थ आहेत तेच सर्वमान्य हायेत. आता तरी लेखिका महोदयांनी लेखातले शब्द दुरुस्त करून घ्यावे ही नम्र इनंती. उगा कायत्री लिहायची खुंखुमी म्हनून महाराजांच्या राज्याभिषेका सारखा लोकांच्या जिव्हाळ्याचा आन् आस्मितेचा इशय निवडायचा, निवडला तर निवडला , पण त्यात बी "बी" ग्रेड(श्रेणी) छाप लिखाण करायचं, वर्कढी म्हंजे त्यात "राज्याभिषेक" हा शब्दच चुकीचा (चुकुन का मुद्दाम कोण जाणे) लिहायचा आन् प्रतिक्रियेत तेच बरोबर आसं ठोकून द्यायचं. अवघडे.

बाजीप्रभु ब्राह्मण नव्हते ,ते सीकेपी होते.पेशवाईत सीकेपींनाही भरपूर त्रास सहन करावा लागला. संशोधकसाहेब हे नक्कीच पुरंधरेंचे अनुयायी असणार.

In reply to by ग्रेटथिन्कर

बाजीप्रभू सीकेपी होते हे खरं. मग मोरोपंत कोण होते, कृष्णाजी भास्करच्या कथा रंगवल्या जातात.. तर मग पंताजी गोपीनाथ कोण होते. शोधायचे तर शोधता अनेक ब्राम्हण आणि इतर जातीय शोधता येतील. महाराज कर्तृत्व आणि निष्ठेवर माणसं पारखत होते त्यामुळे सर्व जातींचे लोक त्यांच्या बरोबर असणं स्वाभाविक आहे. असं असताना त्यांची जन्माने जी जात होती त्यांनी त्यांच्यावर हक्क दाखवणं केवळ मूर्खपणा आहे. प्रत्येक जातीमध्ये चांगले आणि वाईट लोक होते / असतात - संभाजीराजांना साथ देणारे हंबीरराव आणि दगा करणारे गणोजी शिर्के एकाच जातीचे होते. महाराजांनी नेमलेले सेनापती हंबीरराव, प्रतापराव, नेताजी, आणि इतर मोठे लढवय्ये कान्होजी जेधे, तानाजी हे कित्येकजण आणि जावळीचे मोरे, मोहितेमामा, घोरपडे असे स्वतःच्या फायद्यासाठी रयतेला नाडणारे आणि महाराजांशी वैर धरणारे एकाच जातीचे होते. असंख्य वेळा या चर्चा होतात. कावीळ झालेल्याला सगळं पिवळं दिसतं त्यामुळे सारासार विचार करता येत नाही. साडे तीनशे वर्षांपूर्वी कोणी एक व्यक्ती किंवा समूह एका पद्धतीने वागला म्हणून त्या कारणासाठी आज त्याच धर्तीने विचार करून वागणं याला नक्कीच मूर्खपणा म्हणावा लागेल किंवा राजकारण.

In reply to by मैत्र

अजून सदर लेखनाच्या लेखीकीची, त्यांना सहमती दर्शवणार्‍यांची, असहमती दर्शवणार्‍यांची जात कशी काय कोणी विचारलेली नाही?

शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषांना जातीपातीच्या बंधनात बध्द करणे चुकीचे आहे शेकडो वर्षांपासून पूजनीय महाराजांना असे जातीय करुन त्यांचे कार्य मर्यादीत करु नये असे प्रामाणिकपणे वाटते. आपल्या दैवतांचा आदर आपणच नाही करणार तर कोण करणार?

ब्रिगेडने अनेक मुद्दे मांडलेले आहेत, जर त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला असे महत्व देऊन एक एक धागा काढायचा ठरवला तर, शेकडो धागे मिपावर येतील. अशा निष्फळ चर्चा इथे करण्यात काय हशील?

महाराजांविषयी येवढी चर्चा बहूदा बादशाहाच्या दरबारात देखील कधी झाली नसेल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

खरंच आहे. आता उद्या महाराजांच्या अंगरख्याचा कलर केशरी की हिरवा की पांढरा यावरही लोक चर्चा करतील. पण इतकी चर्चा झाली ग्रँट डफपासून आत्तापर्यंत, म्हणून पुराव्यांचा कीस पाडल्या गेला तरी...नैतर इंग्रजी अधिकार्‍यांनी लिहिलेल्या इतिहासावर गुजराण करावे लागलेले प्रांतही आहेत, उदा. राजपुताना.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>महाराजांविषयी येवढी चर्चा बहूदा बादशाहाच्या दरबारात देखील कधी झाली नसेल. उगाच कायत्री इनोद, आव इथं महाराजांवर, त्यांच्या कार्यावर चर्चा कमी, आन् एकमेकांवर कुरघोड्याच जास्त चालल्यात.