Skip to main content

अस्पृश्यता, आरक्षण आणि पुणे करार

लेखक सोत्रि
Published on शुक्रवार, 13/07/2012
मागच्या रविवारचा सत्यमेव जयतेचा भाग अस्पृश्यता ह्या सामाजिक विषयाला वाहिलेला होता. शहरी भागात राहणार्‍या बर्‍याच जणांसाठी त्यात दाखविलेल्या बर्‍याच गोष्टी कदाचित धक्कादायक असू शकतील. ह्या भागानंतर बर्‍याच मराठी संस्थळांवर ह्या अनुषंगाने चर्चा झडल्या. मिपावरही कोणाचा रे तू' ह्या शीर्षकाचा लेख आला आणि त्यावरच्या प्रतिसादांमधून एक चर्चासत्र झडले. त्या चर्चेत बहुतकरून सध्याच्या तरुण पिढीतले युवक युवती हिरीरीने सहभाग झाले होते. त्या गदारोळात चर्चा अपरिहार्यपणे 'आरक्षण' ह्या मुद्द्यावर येऊन थडकली. दोन्ही बाजूंकडून वेगवेगळ्या उदाहरणांचे दाखले दिले गेले. आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. काही जणांनी 'जात नाही ती जात' असे म्हणून ह्या चर्चेची बोळवण केली तर बर्‍याच जणांनी हा प्रश्न कसा सोडवता येईल हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्या सर्व गदारोळात ह्या प्रश्नाचे मूळ न समजून घेताच सद्य परिस्थितीला समस्यांचा उहापोह जास्त होता. अस्पृश्यता, तिच्या पर्यायाने आलेले जातिनिहाय आरक्षण आणि आजची सद्य परिस्थिती, ह्याची सुरुवात, पुण्यात, येरवडा कारागृहात, ज्या दिवशी (24 सप्टेंबर 1932) 'पुणे करार' ठरला आणि बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजीँनी त्यावर सह्या केल्या, त्या दिवसापासून झाली. जरी अस्पृश्यता त्याआधी हजारो वर्षाँपासून अस्तित्वात होती तरीही त्यामुळे होणारी समस्या ही पुणे करारापासूनच झाली. कारण त्या दिवसापर्यंत अस्पृश्यांचे 'मानवीय अस्तित्व' च कोणाच्या खिजगणतीत नव्हते. तेव्हा ती एक समस्या फक्त अस्पृश्यांपुरतीच मर्यादित होती आणि त्यांना काही समस्या असू शकतात हेच कोणाच्या गावी नव्हते. अस्पृश्यांच्या नशिबाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे वादळ त्यांच्या जीवनात आले आणि त्या महामानवाने त्यांना त्यांच्या समस्यांची जाणीव करून दिली. 'भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे, पण आमच्या अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याचे काय?' हा प्रश्न त्यांनी भारतीय स्पृश्य समाजाला विचारला. पण जरी ते विद्वान असले तरीही ते शेवटी अस्पृश्यच होते त्यामुळे त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आंदोलनाचा बडगाच उचलावा लागला. जर अस्पृश्यांना खर्‍या अर्थाने स्वतंत्र व्ह्यायचे असेल (जन्माने येणार्‍या अस्पृश्यतेच्या जोखडातून) तर त्यांना सत्तेत सहभागी व्हावेच लागेल, त्याशिवाय खर्‍या अर्थाने त्यांना स्वातंत्र्य मिळू शकणार नाही. त्याचबरोबर अस्पृश्यांना विद्यार्जनासाठी असलेली आडकाठी दूर केली जाऊन त्यांचा विद्यार्जनाचा मार्गही खुला व्हावा जेणेकरून ते सत्तेत सहभागी होण्यास समर्थ होतील येवढीच त्यांची प्रामाणिक आणि कळकळीची मागणी होती. पण रूढ अर्थाने त्या काळी स्पृश्यांच्या राज्यात असे होणे शक्यच नव्हते, म्हणून त्यांनी अस्पृश्य अल्पसंख्याक आहेत असे म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र (विभक्त) मतदार संघाची मागणी केली. पण त्यांची वेळ चुकली, कारण नेमका त्याचवेळी एक 'महात्मा' अस्पृश्यांना 'हरिजन' असे लेबल देऊन, त्यांचा उद्धार (?) करण्याचे आंदोलन करीत होता. आपल्या मार्गात आता एक 'पर्याय' निर्माण होऊन आंदोलनाचे आपले कार्य मातीमोल होऊन, त्याचे सर्व श्रेय त्या 'पर्याया' ला मिळणार असे दिसताच त्या महात्माच्या आत दडलेला 'बनिया राजकारणी' जागा झाला. त्याने लगेच स्वतंत्र (विभक्त) मतदार संघाची मागणी म्हणजे 'हिंदूंच्या अंतर्गत एकात्मकतेला' धोका असा बागूलबुबा उभा केला. पण आंबेडकर त्याने काही बधेनात हे लक्षात येताच त्या महात्म्याने आपले, ठेवणीतले, उपोषणाचे 'ब्रह्मास्त्र' बाहेर काढले. हा त्याने डॉ. आंबेडकरांना दिलेला शह चेकमेट ठरला आणि त्याची परिणिती 'पुणे करार' अशी झाली. त्या करारानुसार मग अस्पृश्यांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी आणि विद्यार्जनाचा मार्ग खुला होण्यासाठी काही जागा आरक्षित करण्याचे ठरले. अशा प्रकारे आरक्षणाची सुरुवात झाली. खुद्द आंबेडकरांनाही हे आरक्षण जन्म-जन्मांतराकरिता नको होते, त्यांनाही, एकदा का सत्तेत सहभागी होऊन आणि विद्या मिळवून अस्पृश्य मूळ प्रवाहात सामील (स्पृश्य) झाले की टप्प्या-टप्प्याने हे आरक्षण हटवले जाणेच अपेक्षित होते. 1947 साली 'भारत देश' ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला पण 'भारतीय जनता' पारतंत्र्यातच होती. त्यांचा नवीनं स्वामी होता सत्तेला चटावलेले राजकारणी. त्या काळी देश अनेक समस्यांनी गांजलेला होता पण सत्तालोलुप राजकारण्यांना कसलाही विधिनिषेध न बाळगता सत्ता हस्तगत करणे महत्त्वाचे वाटू लागले. त्यांतूनच मग व्होट बँकेचा शोध लागला. मग ती व्होट बँक जपण्याकरिता जातीय अस्मितेचा सहारा घेण्यात आला. त्यासाठी हे आरक्षण कळीचा मुद्दा बनले. बस्स! इथे खरी समस्या सुरू झाली. ज्याकरिता आंबेडकरांनी हा अट्टहास केला होता त्यालाच हरताळ फासला गेला आणि आरक्षण ही एक शिवी बनून, तिचा हा हा म्हणता एक अक्राळविक्राळ राक्षस तयार केला गेला, फक्त आणि फक्त राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी. आता समस्या माहिती आहे, समस्येचे मूळही माहिती झाले आहे मग त्या समस्येचे निराकरण का होत नाहीयेय किंबहुना होऊ शकत नाहीयेय? ह्याचे मूळ दडले आहे आपल्या भारतीयांच्या मानसिकतेत. हजारो वर्षाँची वर्णाधारित जातीय उतरंड आपल्या रक्तात भिनली आहे. त्या उतरंडीमुळे आपल्यात आलेली उच्च नीचतेची भावना निघून जाणे फार कठिण आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही. पण ते एका रात्रीत होणे शक्य नाही. त्यासाठी एका फार मोठ्या सामाजिक आणि मानसिक उत्क्रांतीची गरज आहे. त्याला वेळ लागेल. मी आशावादी आहे, कदाचित पुढच्या 2-3 पिढ्यांमध्ये ह्या समस्येचे निराकरण पूर्णपणे होईल असा मला विश्वास वाटतो. पशूचा माणूस व्हायला हजारोँ वर्षे लागली होती, पण इथे आपल्याला फक्त Human being वरून Being Human व्हायचे आहे त्यामुळे 2-3 पिढ्यांमध्ये ते शक्य व्हावे; आपण फक्त आपल्या मुलांना ह्या जातींच्या भिंतींपासून दूर ठेवले, त्यांना उच्च-नीच, जात-पात ह्या समजापासूनच मुक्त ठेवले की आपण आपला खारीचा वाटा उचलल्यासारखे आहे. तोच वारसा आपली मुलेही पुढे चालवतील. एवढे तर आपण खचितच करू शकतो. (चर्चा झोडण्यापेक्षा हे जास्त सोपे आहे, नाही?) मला हा विश्वास वाटण्याचे अजून कारण म्हणजे, सध्याचे युग हे 'ज्ञानाचे अधिष्ठान' असलेले, तंत्रज्ञानाचे, स्पर्धात्मक युग आहे. खुल्या अर्थव्यवस्थांमुळे जागतिक सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. 'हे विश्वची माझे घरं' हे देखिल खरे झालेले आहे. त्यामुळे ह्यापुढे, ह्या स्पर्धात्मक युगात फक्त आणि फक्त गुणवत्तेचा कस लागणार आहे. ही गुणवत्ता नैसर्गिक देणगी असते, ती निसर्गाकडून 'जात' हा निकष न लागता मिळालेली असते. माझा ह्या खुल्या अर्थव्यवस्थेवर आणि स्पर्धात्मक युगावर विश्वास आहे आणि त्यामुळेच, ह्या जातींच्या आणि पर्यायाने आरक्षणासारख्या समस्यांच्या विळख्यातून, आपण आपला खारीचा वाटा उचलला तर नक्कीच बाहेर पडू, ह्यावर माझा दृढ विश्वास आहे. माझी वाट बघायची तयारी आहे कारण माझ्या आजोबांनी लावलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे त्यांनी न खाता मी खाल्लेले आहेत ह्या सत्याची मला जाणीव आहे.

वाचन संख्या 8197
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

लेख वाचला. लेखाच्या पूर्वाधाशी सहमत नाही. उत्तरार्धातील आशावाद खरा ठरो (असा माझा आशावाद!) आंबेडकरांनी मागितलेल्या स्वतंत्र (विभक्त) मतदारसंघांपेक्षा पुणे करारांतर्गत निर्माण होणारे राखीव मतदारसंघ अधिक घातक कसे, हे लेखात स्पष्ट होत नाही. माझे मत याउलट आहे. शिवाय, विद्यार्जनाचा मार्ग खुला होण्यासाठी काही जागा आरक्षित करण्याचे ठरले हे तुम्ही दिलेल्या पुणे कराराविषयीच्या दुव्यात तरी दिलेले नाही. अन्यत्र स्त्रोत असल्यास द्यावा. अवांतर - लेखात स्वतंत्र (राखीव) असा शब्द वापरण्यात आला आहे. स्वतंत्र आणि राखीव मतदारसंघ ह्या दोन सर्वस्वी वेगळ्या संकल्पना आहेत. आंबेडकरांना हवे होते ते स्वतंत्र (विभक्त) मतदारसंघ. याउलट पुणे करारामुळे त्यांना मिळणार होते राखीव मतदारसंघ. पैकी राखीव मतदारसंघ ही संकल्पना अधिक योग्य आहे, असे माझे मत आहे.

In reply to by सोत्रि

राखीव आणि विभक्त मध्ये गडबड झाली होती. दुरुस्ती केली आहे दुरुस्ती केली हे ठीकच पण मूळ मुद्द्याला मात्र बगल दिली :) आंबेडकरांनी मागितलेल्या विभक्त मतदारसंघांपेक्षा पुणे करारान्वये मिळालेले राखीव मतदारसंघ हे अधिक घातक होते का? असतील तर त्याचे अधिक स्पष्टीकरण हवे. नसतील तर शीर्षकातील "पुणे करार" हे शब्द निरर्थक ठरतात!

In reply to by सुनील

आंबेडकरांनी मागितलेल्या विभक्त मतदारसंघांपेक्षा पुणे करारान्वये मिळालेले राखीव मतदारसंघ हे अधिक घातक होते का
जे घडलेच नाही त्या चर्चेचे गुर्हाळ लावण्यात काय हशील? मुळातच, चर्चा सोडून, वैयक्तिक पातळीवर जात-पात, उच्च-नीच ह्या भिंती पाडण्यासाठी आपल्या मनाची तयारी करणे आणी त्या भिंती पाडण्यासाठी काय करू शकतो ते शोधणे हा हेतू होता लेखाचा. म्हणूनच तुमच्या मूळ मुद्द्याला बगल दिली होती. - (पुरोगामी) सोकाजी

In reply to by सोत्रि

जे घडलेच नाही त्या चर्चेचे गुर्हाळ लावण्यात काय हशील? घडले होते. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ (१९१६ साली टिळकांनी मान्य केल्यामुळे) मिळाले होते. मुळातच, चर्चा सोडून, वैयक्तिक पातळीवर जात-पात, उच्च-नीच ह्या भिंती पाडण्यासाठी आपल्या मनाची तयारी करणे आणी त्या भिंती पाडण्यासाठी काय करू शकतो ते शोधणे हा हेतू होता लेखाचा. हेतू उदात्त. पण त्यासाठी शीर्षकात "पुणे करार" हे निरर्थक शब्द टाकायची आवश्यकता नव्हती! आणि आता तो टाकला आहेच तर, त्याअनुषंगाने झालेल्या चर्चेलाही उत्तर द्यावे, ही विनंती! शिवाय, विद्यार्जनाचा मार्ग खुला होण्यासाठी काही जागा आरक्षित करण्याचे ठरले हे तुम्ही दिलेल्या पुणे कराराविषयीच्या दुव्यात तरी दिलेले नाही. अन्यत्र स्त्रोत असल्यास द्यावा. ह्याचे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे.

आशावादी लेख!!! पण मला तरी हा आशावाद भोळा वाटतो. पण ज्या गोष्टींची जाणीव स्वातंत्र्यपुर्व काळातच झाली होती ती संपायला अजून दोन तीन पिढ्यांनी वाट पहाणे म्हणजे योग्य वाटते का? आपण कुणालाही जातीवरुन भेदभाव करायला शिकवणार नाही हे खरेच आहे, पण पावलोपावली जर घराबाहेर एखाद्याला जातीची जाणीव करुन देणार्‍या घटना घडत राहणार असतील तर मग कसं संपेल हे सगळं? जी गोष्ट माझ्या मते १०-२० वर्षात संपवणे सोपे आहे..(सत्ताधार्‍यांनी मनात आणले, एकच कणखर आणि निडर पार्टी बहुमतात निवडून आली) मग त्या गोष्टीला २-३ पिढ्या म्हणजे कमीत कमी १५० वर्ष वाट का पहायची? यापेक्षा पुढील १० वर्‍षात एखादा निडर आणि दिशा बदलणारा नेता/पार्टी/सरकार मिळेल असा आशावाद करणे जास्त सोयीस्कर वाटते. जर हा आशावाद चुकीचा वाटत असेल तर मग परीस्थिती फक्त आपण बदलल्याने १००-१५० वर्षात बदलेल हेही अशक्यच वाटते. (टर्मिनेटर सिनेमासारखी किंवा तत्सम परीस्थिती किंवा एलीयन लोकांनी पृथ्वीवर आक्रमण केले तर कदाचित सारे पृथ्वीवासी विश्वची माझे घर म्हणून जात्/धर्म्/भेद विसरून एकत्र येतील)

सत्ताधार्‍यांनी मनात आणले,
तीच तर गोम आहे ना ममो. ह्या सत्ताधार्‍यांनीच हा गुंता वाढवला आहे त्यांच्या आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी.
एकच कणखर आणि निडर पार्टी बहुमतात निवडून आली
अशी पार्टी अस्तित्वात आहे? High Hopes ममो :) - (पुरोगामी) सोकाजी

In reply to by सोत्रि

करेक्ट.. मी हेच तर म्हणतोय सोत्रि.. :) चांगली सरकार मिळणे हेच आपल्याला हाय होप्स असल्यासारखे वाटते (अर्थात इतकी वाइट परेस्थिती राजकारण्यांनी आणलीये की आपण आशा करणं देखील चूक समजू लागलोय) तर मग आणखीन १००-१५० वर्षांनी परीस्थिती बदलेल हेही हाय होप्सच :) अर्थात होप/आशा जीवंत राहिलीच पाहिजे.. (शॉशँक रिडेंप्शन सिनेमाची आठवन झाली) आंब्याच्या झाडाला आंबे लागायला २ पिढ्या लागणे हा निसर्गाचा नियम आहे, आपण यात काहीच करु शकत नाही ( पण तरीदेखील बॉन्साय/कलम प्रकार करुन आंबे मिळवता येतातच). कधी कधी काही झाडांना कितीही वर्ष झाली तरी ती मोहरतच नाहीत.. :(

महात्म्यावर चिखलफेक करायचा सोसही भागवून घेतलात... बाबा +महात्मा कॉक्टेल :D जून जुलै आला की आरक्षण कसे वाइट, कर्तूत्व कसे चांगले, वगैरे लेक्चर झोडायची मनूवाद्याना हौस येते. :)

लेखाशी पूर्णपणे सहमत... वाईट या गोष्टीचे वाटते कि नेते मंडळी जरी राजकीय फायद्यासाठी आरक्षण वापरत असले तरी बहुतांशी निम्नजातीयांची मानसिकता सुद्धा या "कुबड्या" वापरण्याचीच आहे. मान्य आहे कि ६०-७० वर्षांपूर्वी या समाजावर दुय्यम वागणूकीमुळे मागे रहाण्याची वेळ आली, पण सद्यस्थिती तशीच आहे असे मानून हा फायदा घेत रहाणे कितपत योग्य आहे? आरक्षण वापरणे हा अपमान समजला जाईल तो सुदिन...

In reply to by राजो

ते तुम्ही कोण सांगनार? उद्या तुम्हाला म्हटलं, बापाच्या घरात रहाणं म्हणजे कुबडी आहे. तुम्ही ते सोडून झाडाखाली राहून कर्तूत्व सिद्ध करा.. बापाच्या घराची कुबडी कशाला वापरता, तर ते चालेल काय?

In reply to by JAGOMOHANPYARE

बापाचा पाय अधू म्हणून दिल्या कुबड्या... चाल बाबा..!! पण मुलगा धडधाकट आहे ना?? का त्या कुबड्यांनाच अधिकार समजायला लागलाय?? स्वतःच्या पायावर कधी उभा रहाणार मग?? गेट वेल सून

In reply to by राजो

आता गेट वेल सून म्हणुन काय फायदा? :) तुमच्या वेल नंच सगळा प्रॉब्लेम जन्माला घातला... सगळ्यांच्यासाठी एकच विहिर ठेवली असती, तर हा प्रश्न आलाच नसता नै का? :)

माहितीपूर्ण लेख आहे. या विषयाबाबत लोक मनापासून चर्चा करत असले की मला दोन्ही किंवा सर्व बाजूंची मते पटत असल्यासारखं वाटायला लागतं. (धोंडो भिकाजी जोशी ऊर्फ बेंबट्या). म्हणजे महात्माजींविषयी लिहिलेलं खटकलं म्हणावं तर एकीकडे बाकीचे मुद्दे अभ्यासपूर्ण आणि फॅक्चुअल वाटतात. आशावाद शक्यही वाटतो आणि कोणी भोळा म्हटल्यावर भोळाही वाटायला लागतो. तस्मात मतप्रदर्शन सध्या शक्य नसल्याने चर्चेवर लक्ष ठेवून आहे. सोत्रीने चांगला विषय मांडला म्हणून धन्यवाद..

आर्थीक निकषांवर आरक्षण हा माझ्या मते योग्य मार्ग आहे. ६० वर्ष जातीवर आरक्षण दिल्यानंतरही त्यातले बहुतेक जण लाभांपासून अजून वंचीत असतील तर त्यांच्यापर्यंत पोचायचा वेगळा मार्ग शोधायलाच हवा. अन्यथा उपयोग शुन्य आहे. अपेक्षेप्रमाणे जामोप्यांनी स्वतःचे मत न देता लोकांच्या प्रतिसादावर त्यांच्या स्टायलीत प्रतिसाद देऊन काडी टाकायचा प्रयत्न केला आहेच.

लेख तर आवडलाच पण भूमिकेतला प्रामाणिकपणा अधिक भावला. लोकनेता या नात्याने आणि जबाबदारीने जर एकाच वेळी सर्वांच्या शक्य नसेल तर बहुसंख्यांकांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे हे 'महात्म्या'चे कर्तव्य होते आणि तो त्या कर्तव्यास जागला असे म्हणावेसे वाटते.

गांधी-आंबेडकर, गांधी-जीन्ना, गांधी-सावरकर, गांधी-नेहरु, म्हात्मा गांधी - गांधीपुत्र हरिलाल, टिळक -गांधी गांधी - सुभाषचंद्र बोस्/भगतसिंग हे सर्व evergreen (आणि सदावादग्रस्त) विषय आहेत. अक्षरशः शेकड्यानं पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत ह्यावर. बहुतांश सर्व म्हातार्‍या इतिहास अभ्यासकांचं ह्याबद्दल काहीएक मत असतच असतं. जे अभ्यासक नसतात, त्याचं मत अभ्यासकांहून ठाम असतं!!! गविंनी (आणि त्यापूर्वी चाळकरी केशवानं ) म्हटल्याप्रमाणं "ह्यबाबतीत दोघांचं किंवा सर्वांचच बरोबर वाटायला लागतं." फक्त एक गोष्ट निश्चित, "विभक्त" मतदारसंघापेक्षा "राखीव" मतदारसंघ लाखपट परवडले. विभक्त प्रकारामुळे देशाची अजून एक फाळणी झाल्यासरखेच होते.(भूमीवर नाही, मनोमन झालेली फाळणी.) हे माझं "ठाम " मत.

लेख टिकून राहिल्याबद्दल.

आरक्षण बंद करणे चुकीचे आहे. त्याला समांतर क्रीमी लेयरची संकल्पना राबवली पाहिजे.. म्हणजे आरक्षणाचा फायदा घेऊन एखादी व्यक्ती विषिष्ट पातळीला पोहोचली की त्याच्या घरवाल्याना आरक्षण बंद. त्यामुळे आरक्षणही सुरु राहील. क्रिमि लेयरही सुरु राहील... ज्यावेळी सगळे मागासवर्गीय क्रीमी लेयरला येतील आणि आरक्षणाला योग्य म्हणजे क्रिमि लेयर नसलेला कुणी शिल्लकच रहाणार नाही, तेंव्हा त्या जागा आपोआपच ओपन मेरिटला म्हणजे सर्वाना मिळतील आणिसमानता येईल. तेंव्हाही आरक्षण बंद करण्याची गरज नाही... कारण सगळे क्रीमी लेअरला पोहोचल्याने त्या जागा आपोआपच सर्वाना खुल्या राहतील. कागदोपत्री आरक्षण सुरुच राहील.. पूज्य बापूजींचे हेच तर स्वप्न होते.. की हिंदु समाज अखंड रहावा.

हिंदु तत्वज्ञान कर्म विपाक शिकविते.. म्हणजे आज जे काही घडते ते पूर्वज्ञ्मीचे फळ असते म्हणे! आता पूर्वीच्या जन्मात इतर जातीतल्याना पाणी, शिक्षण न देणे, मंत्र ऐकल्यास कानात शिशाचा रस घालणे, असले वेडे चाळे केले असल्यास या जन्मात त्याचे फळ भोगावेच लागेल ना? अकारण अ‍ॅट्रोसिटी मागे लागणे, नोकरीत प्रमोशन न मिळणे, एखाद्या मार्काने कॉलेजची अ‍ॅडमिशन हुकणे.. हे सर्व गतजन्मीच्या कर्मविपाकाचे फळ असते... आपल्याला त्रासदायक ठरलेल्या व्यक्ती केवळ निमित्तमात्र असतात. त्यामुळे कुणालाही दोष देऊ नये.. हिंदु धर्मातील कर्मविपाक आठवून स्वतःचेच सांत्वन करावे व गप्प बसावे. पाप नाशासाठी नामस्मरण करावे, यज्ञ करून इतर लोकाना अन्नदान, वस्त्रदान करावे. पूर्वीच्या जन्मातील पापांचा कर्मविपाक फिटावा या हेतूने परमेश्वराने हा कायदा जन्माला घातला आहे, हे स्मरुन परमेश्वरी लीलेचे कौतुक करावे आणि त्याच्या नित्य स्मरणात दंग रहावे. या जन्मी इतर जाती, धर्म यांची निंदा करुन पुन्हा आपला कर्मविपाक वाढवून ठेऊ नये.. न्हाई तर आणि पुढच्या जन्मी आणि काही तरी भोगावे लागेल. _________________ कर्मविपाक व आलेपाक मिळेल.

In reply to by JAGOMOHANPYARE

वा जामोप्या तुच हे लिहिलस ते बरे झाले.... आरे मग इतर जातीतल्याना पाणी, शिक्षण न देणे, मंत्र ऐकल्यास कानात शिशाचा रस घालणे वगैरे हे सर्व भोगलेल्यांचे गत जन्मीच्या कर्माची फळे होती म्हणायचे का?....मग अता त्यांचे २ जन्मा पुर्वीचे पाप मागच्या जन्मात भोगले...परत अता अताच्या लोकांच्या माथी कायदे करून आणि अहोरात्र बामणांना शिव्या घालून काय मिळणार? आणि कश्यासाठी? बादवे: दर जन्म मनुष्याचाच मिळतो आणि जातही तीच राहते याविषयी काही खात्रीशीर माहिती आहे का तुझ्याकडे? ते ८४ लक्ष योनी वगैरे वाचले होते कुठे तरी.... शिवाय आजच्या युगात ५ नये पैशे मिळवता येणार नाहीत असले वांझोटे ज्ञान दिले नाही हे चांगलेच झाले. असो. शेवटी काय तर बोंबलायचे हौस मोठी.... कोणी ना कोणी पाहिजे ज्याच्या नावाने बोंबलता येईल....

In reply to by JAGOMOHANPYARE

हिंदु तत्वज्ञान कर्म विपाक शिकविते.. म्हणजे आज जे काही घडते ते पूर्वज्ञ्मीचे फळ असते म्हणे! आता पूर्वीच्या जन्मात इतर जातीतल्याना पाणी, शिक्षण न देणे, मंत्र ऐकल्यास कानात शिशाचा रस घालणे, असले वेडे चाळे केले असल्यास या जन्मात त्याचे फळ भोगावेच लागेल ना? अकारण अ‍ॅट्रोसिटी मागे लागणे, नोकरीत प्रमोशन न मिळणे, एखाद्या मार्काने कॉलेजची अ‍ॅडमिशन हुकणे.. हे सर्व गतजन्मीच्या कर्मविपाकाचे फळ असते... आपल्याला त्रासदायक ठरलेल्या व्यक्ती केवळ निमित्तमात्र असतात. त्यामुळे कुणालाही दोष देऊ नये.. हिंदु धर्मातील कर्मविपाक आठवून स्वतःचेच सांत्वन करावे व गप्प बसावे. पाप नाशासाठी नामस्मरण करावे, यज्ञ करून इतर लोकाना अन्नदान, वस्त्रदान करावे. पूर्वीच्या जन्मातील पापांचा कर्मविपाक फिटावा या हेतूने परमेश्वराने हा कायदा जन्माला घातला आहे, हे स्मरुन परमेश्वरी लीलेचे कौतुक करावे आणि त्याच्या नित्य स्मरणात दंग रहावे. या जन्मी इतर जाती, धर्म यांची निंदा करुन पुन्हा आपला कर्मविपाक वाढवून ठेऊ नये.. न्हाई तर आणि पुढच्या जन्मी आणि काही तरी भोगावे लागेल.
हे तत्त्वज्ञान तुम्ही खैरलांजीत जौन ऐकवून दाखवाल काय ? जायचा यायचा खर्च मी देतो. :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मिष्टर परा / मिष्टर कवटी, असे पेचात टाकणारे खडे सवाल केले की जामोप्या पळून जातो किंवा तिसराच फाटा फोडतो हे तुमच्या टाळक्यात आजून किती दिवसांनी घुसणार आहे तेव्हढे फक्त सांगा.

In reply to by आंबोळी

यात पेचात टाकणारे अन खडे सवाल काय आहेत? खैरलांजीत जाऊन अमुक बोला, पाकिस्तानात जाऊन तमुक बोला, याचाच अर्थ इथे बोलू नका असा होतो. असल्या मुस्कटदाबी करणार्‍या बडबडीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पळून जाणे होते काय? "तुम्ही हे इथे समोर येउन बोला", असे मी म्हटलो, तर? ते व्यक्तीगत पातळीवर उतरणे होईल, जे मिपा संपादनाला मान्य नाही. काही सदस्य या नियमापासून 'इम्युन' अशा रा़खीव गटात येतात काय?

In reply to by आंबोळी

कवटि/ परा , यात पळूण जाण्यासारखे काय आहे? कर्मविपाकाचे तत्वज्ञान उच्च जातीच्या लोकानीच प्रसवले आणि वर्षनुवर्षे इतराना ऐकवले.... आता तुमचंच त्त्वज्ञान तुम्हालाच ऐकवलं तर मलाच गुन्हेगार ठरवताय... यालाच म्हणतात बा. कावा... आता पळ कोण काढणार? तुम्ही का मी? कर्मविपाकाचं तत्वज्ञान हरिजनानी/ बौद्धानी/ मुस्लमान/ ख्रिश्चन यानी तयार केले नाही... ते तुमचेच आहे. :)

ह्याचे मूळ दडले आहे आपल्या भारतीयांच्या मानसिकतेत. हजारो वर्षाँची वर्णाधारित जातीय उतरंड आपल्या रक्तात भिनली आहे. त्यामुळे भारताचे आणि भारतीयांचे काही होणे नाही. . . . . . . .

अस्पृश्य अल्पसंख्याक आहेत असे म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र (विभक्त) मतदार संघाची मागणी केली. .......................................................................................................... समजा जर असे झाले असते तर आज माळी..मुस्लिम..इसाइ..ओबीसी..भटके..शिख..जैन. यान्चे स्वतंत्र (विभक्त) मतदार संघ ची मागणी पुढे आली असति का?

आरक्षणामुळे माझं वैयक्तिक नुकसान कधीच झालं नाही. त्याचं कारण जामोप्या म्हणतायत त्याप्रमाणे गतजन्मीच पापपुण्यं कर्म असेल/ या जन्मीचं नशिब असेल किँवा माझ्या अपेक्षाच कमी असतील वा नुकसानाकडे त्याद्रुष्टिकोनातून पाहीले नसेल...कारणं काहीही असलं तरी end result is same... इंजिनिअरिँग च्या ज्या कॉलेजात जी शाखा हवी होती ती मला ३०% पहील्या राऊंड मधे मिळाली. n now here is twist in tale : - D ३०% ची लिस्ट जाहीर झालेली आणि बहुतेक माझी फी भरणे वगैरे ऐडमीशन प्रक्रियापण झाली होती आणि सुप्रिम कोर्टाने ते कॉलेज मायनॉरिटी करायला मान्यता दिली. ५०% जैन कोटा. जागाच निम्म्या झाल्याने आता सगळेच कटऑफ बदलणार होते. पण मग आधीच ऐडमिशन झालेल्या आमच्या सारख्यांच काय करायचं?? शेवटी मेनेजमेँटने ठरवलं कि जैन कोटा चं पहिलंच वर्ष आहे त्यामुळे ज्या ऐडमिशन आधीच झालेल्या आहेत त्या तशाच राहुदेत आणि उरलेल्या ७०% जागां नवीन ५०% कोटानुसार भरु : - )

समजा जर असे झाले असते तर आज माळी..मुस्लिम..इसाइ..ओबीसी..भटके..शिख..जैन. यान्चे स्वतंत्र (विभक्त) मतदार संघ ची मागणी पुढे आली असति का? अनावधाने बामण टंकायचे इसरलांत काय? कि सवयी प्रमाणे आहे? बामण महासभेच्या अधिवेशनात बामण हे अल्पसंख्यांक आहेत म्हणून आरक्षण द्यावे अशी एकमुखी मागणी केल्याचे आठवते, आरक्षण मागीतले आहेच स्वतंत्र मतदार संघांचीही मागणी करायला हरकत नसावी.

In reply to by अजातशत्रु

मागायला तर ते काहिही मागतील. सतत मागत रहायची सवय आहे ना. असा दिवस दिसावा ज्या दिवशी हे असं मागणं काहि कामाचं नाहि हे कळेल. त्या नंतर काय होईल... इंटरेस्टींग मॅटर. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

या प्रतिसादाची भाषा अपमानास्पद आहे. आणि ही मागण्याची सवय सर्वांनाच आहे हेही विसरू नये - विशेषतः " त्या" अन्य लोकांना.

In reply to by बॅटमॅन

>>या प्रतिसादाची भाषा अपमानास्पद आहे. -- वस्तुस्थिती जास्त अपमानास्पद आहे. >>आणि ही मागण्याची सवय सर्वांनाच आहे हेही विसरू नये -- ह्म्म्म... अरण्यरुदन नुकतच सुरू झालय. आता कुठे तंबोर्‍याचे तार जुळवणं चाललय. भैरवीपर्यंत वाट बघा. >>- विशेषतः " त्या" अन्य लोकांना. -- बीग डील. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

निव्वळ एका जातीला टार्गेट करणे हा छंदच दिसतोय आपला. असो. रा़ज्यकर्त्यांचा वरदहस्त असल्याने हा छंद खपून जाईलच म्हणा, चालूदे.

In reply to by बॅटमॅन

>>निव्वळ एका जातीला टार्गेट करणे हा छंदच दिसतोय आपला. -- आमचा? अहो आपला म्हणा. हा छंद भारतीयांना नवा आहे कि काय. >>रा़ज्यकर्त्यांचा वरदहस्त असल्याने हा छंद खपून जाईलच म्हणा, -- राज्यकर्त्यांचा वरदहस्त नेमका कुठे आहे हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे . >>चालूदे. -- बरं :) अर्धवटराव

In reply to by अजातशत्रु

अनावधाने बामण टंकायचे इसरलांत काय? जातिवाचक अपमानकारक उद्देशाने केलेला उच्चार. हीच र्ती रेव्हर्स अ‍ॅट्रोसिटी. या प्रतिसादावर तुम्हाला कोणी शिव्या दिल्या तर मी त्याला असभ्य म्हणणार नाही. तुम्ही तुमची लायकी अशी नेहमीच का दाखवुन देता हो?

In reply to by daredevils99

>>हा परशुराम कोण? -- अरे मित्रा डेव्हील... तु अबतक 99 ना... परशुराम तुझा 101 वा टार्गेट आहे. अर्धवटराव

आरक्षण वरुन हा धागा आठवला. अशा प्रकारे आरक्षणाची सुरुवात झाली. खुद्द आंबेडकरांनाही हे आरक्षण जन्म-जन्मांतराकरिता नको होते, त्यांनाही, एकदा का सत्तेत सहभागी होऊन आणि विद्या मिळवून अस्पृश्य मूळ प्रवाहात सामील (स्पृश्य) झाले की टप्प्या-टप्प्याने हे आरक्षण हटवले जाणेच अपेक्षित होते. बाबा साहेबांची ही अपेक्षा पुर्ण होईल असे वाटत नाही.