Skip to main content

मेघा रे... मेघालय !

लेखक चिगो यांनी मंगळवार, 07/02/2012 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: धमु आणि माझी खवखव च्यायला, तू एक काम का नाही रे करत. ते लाईन आणि फोन वरुन आठवलं. इशान्य भारताबद्दल एकुणच लोकांचं अज्ञान अगाऽढ असतंय. तिथल्या पध्दती, जिवनमान, जगण्याची धडपड आणि सरकारी प्रयत्न ह्यावर का नाही लिहित काही? खूप चांगली आणि माहितीपुर्ण लेखमाला होईल...शिवाय पुर्णतः दुर्लक्षित म्हणवल्या जाणार्या भागाची माहितीही होईल लोकांना. ************************************************************** तर आमच्या ह्या दोस्ताच्या विनंतीवजा ऑर्डरीने मी हा लेख लिहतोय.. (विजुभाऊंनी पण सुचवलं होतं..) इशान्य भारताबद्दल एकुणच लोकांचं अज्ञान अगाऽढ असतंय. हे मान्य केलं तरी खरं हे आहे की इकडच्या लोकांचं आपल्या भागाबद्दलही अज्ञान तितकंच अगाऽढ असतं. मी महाराष्ट्रातला आहे म्हटल्यावर इकडची शिकली-सवरली लोकं म्हणतात, "बॉम्बे के ना, सर?" मी "नाही, नागपुरचा" म्हटले की "पास में ही तो है" म्हणतात.. (च्यायची, दुरांतोनी पण १० तास लागतात की, लेकहो..) So, Ignorance is a bliss universally.. असो.. मला प्रश्न हा पडला की लेखाची रचना कशी करावी? मग इचार केला की जरा अभ्यासपुर्ण-बिर्ण स्टायलीत वाटला पाहीजे, म्हणून हेडींग्स वगैरे टाकून लिहीतोय.. इतिहास : आता खरं तर मेघालयच्या ऐतिहासिक ज्ञानाबद्दल आपली बोंबच आहे.. अहोम काळात ह्याचा काही भाग त्यांच्या राज्यात येत असावा. मात्र इथे मुख्यत्वेकरुन वेगवेगळ्या जाती-जमातींचे अधिपत्य राहीले आहे. ब्रिटीश काळात शिलाँग ही आसामची राजधानी होती. (म्हणजे त्यावेळी जवळजवळ पुर्ण इशान्य भारत.. त्रिपुरा आणि मणीपुर ही राज्ये सोडली तर) स्वातंत्र्योत्तर काळातही आसामची सुत्रे इथूनच हालायची.. २१ जानेवारी, १९७१ मध्ये मेघालय ह्या वेगळ्या राज्याची स्थापना झाली. "मेघालय" हा शब्द ह्या भागासाठी गुरुदेव टागोरांनी वापरला होता.. भुगोल : मेघालय मुख्यत: तीन भागात विभागले आहे. गारो हील्स, खासी हील्स आणि जैंतिया हील्स. भौगोलिक दृष्ट्या हा भाग "छोटा नागपुर"चं एक्स्टेंशन आहे, हे वाचल्याचं आठवतंय.. असेलही, कारण की ह्या भागात कोळसा, चुनखडी इ. आढळतात.. काही भागात युरेनियमही सापडलेय. तसेच बहूतांश भाग हा लाल मातीचा आहे. गारो हील्सच्या भागात मुख्य पिक हे भाताचे आहे. तसेच हॉर्टीकल्चर (मराठी शब्द?) बर्‍यापैकी केल्या जाते. माझ्या सबडिव्हीजनमध्ये हॉर्टीकल्चर विभागाने हॉर्टी-हब स्थापिले आहे, जिथे अत्यंत चांगल्या प्रतीच्या ऑर्कीड्सची पैदास केल्या जाते. सध्या फक्त इनहाऊस प्रोडक्शन असलं तरी लवकरच ते शेतकर्‍यांमार्फत केल्या जाईल. गारो हील्सच्या भागात चांगल्या प्रतीचे अद्रक, तेजपान ह्यांचे उत्पादन होते. (माझ्या घराच्या कंपाऊंड मध्येच तेजपानची दोन झाडे आहेत.) तसेच काजुचीही चांगलीच पैदास होते. खासी हील्स तिथल्या अननसांसाठी प्रसिद्ध आहे. अगदी साखरेचा कणही वरतून न घालता रसाळ, गोड लागतात ही.. आणि मुख्य म्हणजे जवळजवळ सगळ्यात गोष्टी "ऑर्गॅनिक" असतात.. :-) मात्र, ह्या सगळ्या उत्पादनाला चांगल्या मार्केटींगची आणि लिंकेजेसची गरज आहे आणि इथेच घोडं पेंड खातयं. अजूनपर्यंत तरी गारो हील्स मधून शिलाँगकडे जायचं म्हटलं तर आसामातूनच जायला लागतं. रोड्स हळूहळू सुधारत असले तरी अजूनही मेघालय रेल्वेद्वारे जोडलेले नाही ! आता मात्र रेल्वे इकडे एक्स्टेंड होतेय.. सो, द फिंगर्स आर क्रॉस्ड.. समाज आणि संस्कृती : हा पार्ट लै इंट्रेस्टींग आहे.. मेघालयात गारो, खासी आणि जेंतिया ह्या तीन मुख्य आदिवासी जमाती. मी ज्या भागात आहे तो गारो हील्सचा भाग असल्याने इथे मुख्यतः गारोच आहेत. गारोंमध्ये गावाचा/ वस्तीचा प्रमुख "नोकमा" म्हणून ओळखल्या जातो, आणि त्याला बर्‍यापैकी मानही असतो. ह्या मुख्य जमातींमध्ये "मातृसत्ताक"पद्धती आहे. म्हणजे आईची इस्टेट मुलीला जाते, नवरा लग्न करुन बायकोच्या घरी जातो वगैरे.. ह्यापायी, माझ्यासारख्या बाहेरुन आलेल्या माणसाला थोडा त्रास होतो. म्हणजे मतदाता रजिस्ट्रेशनच्या वेळी सुरुवातीला फॉर्मवर वडीलांचे नाव लिहून सोबत एपिक आईचं किंवा सासुचं जोडायचं, तसेच पुरुषाने बायकोच्या पत्त्यावर नाव बदलून देण्यासाठी अर्ज करायचा, ह्याने गोंधळ उडायचा.. त्यातही गोम अशी, की माझ्या भागात कोच, हजाँग ह्या पितृसत्ताक जमातीही असल्याने सॉलिड खिचडा व्हायचा डोक्याचा ;-) गारो आणि खासी ह्या जमाती बहुतांश ( जवळपास १००%च) ख्रिश्चन आहेत. कोच, हजाँग ह्या जमाती हिंदु धर्म पाळतात. आणि जैंतिया जमातीत अजूनही "अॅनिमिझ्म"चे अंश आहेत. गारो लोकांचा "वंगाला" हा प्रमुख उत्सव आहे. हा नोव्हेंबर मध्ये असतो आणि त्यातील नृत्यात गारो जीवनातील वेगवेगळ्या समारंभाचे वगैरे प्रतिबिंब असते. तुरा (म्हणजे माझ्या जिल्ह्याचे शहर) ह्याच्या जवळ "असनांग" ह्या जागी वंगालाच्या वेळी "हंड्रेड ड्रम्स फेस्टीव्हल" असतो, ज्यात वेगवेगळ्या गावातील गारो एकत्र होऊन उत्सव साजरा करतात. लोकल दारु पाण्यासारखी वाहते.. दारु पिणे हा अजिबात टॅबू नाहीये, पण त्यामुळेच म्हातारपणी बर्याच लोकांना "लिव्हर सिरॉसिस" वगैरे त्रास होतो.. कोच लोकांच्या नृत्यावरुन ही जात लढवय्यी असावी, असा माझा अंदाज आहे. कारण की ह्यांचे नृत्य हातात ढाल-तलवारी घेऊन आक्रामक मुद्रांमधे होते. हजाँग नृत्यामधे मात्र शेतीशी निगडीत जीवन दाखवण्याकडे जास्त कल असतो.. ह्याव्यतिरीक्त गारो हील्समध्ये बंगाली आणि मुस्लिम लोकांची संख्याही बर्‍यापैकी आहे, खासकरुन सिमावर्ती भागांमधे. ह्यातील बहूतेकांचे संबंध आधीचा पुर्व बंगाल आणि आताचा बांग्लादेश ह्याच्याशी आहे.. जैतिया आणि खासी लोकांमध्ये पुर्वी पुर्वज-पूजेची प्रथा होती, कारण की ह्या भागामध्ये "मेगालिथ्स" सापडतात जे पुर्वजांच्या स्मृतीत उभारल्या जायचे. गारो हील्स मधल्या रेसिबुलपारा इथे "फॅलस वर्शिप" अर्थात लिंगपुजा होत असावी, असे तेथील काही फोटोज पाहून मला वाटले. हे म्हणजे शिवलिंगासारखे नसून पुरेपुर पुरुष व स्त्री जननांगाचे शिल्प आहेत. अर्थात, आता त्याला शेंदुर वगैरे फासल्या गेलाय.. :p राजकीय : मेघालय म्हटलं की लोकांना फक्त शिलाँग आणि चेरापुंजीच माहीत आहे.. त्यामुळे, त्याच्या व्यतिरीक्त असलेल्या मेघालयाबद्दल आणि तिथल्या राजकीय परिस्थितीबद्दल माहितीपण शुन्यच.. आणि हे सर्व थरांमध्ये आहे. माझे इतर काडर्समधले मित्र मला फोन करतात तेव्हा, "काय सुंदर ठीकाणी आहेस रे तू? टेंशन नाही काही.." इ. इ. सुरु असतं त्यांचं.. ह्याउलट, आसामात अजूनही "उल्फा/ अल्फा"चं थैमान सुरु आहे असंच त्यांना वाटतं.. मेघालयात स्टुडंट्स पॉलिटीक्स लै कडक आहे.. इथे विद्यार्थी युनियन हा एक ताकतवर प्रेशर ग्रुप आहे.. विसेक वर्षांआधी खासी हिल्समध्ये झालेल्या उलाढाली (मिलिटंट अ‍ॅक्टीव्हिटीज) मधे "खासी स्टुडंट्स युनियन" (के. एस. यु.) चा मोठा वाटा होता. मागच्या वर्षी इथे होऊ घातलेल्या मुन्सिपल इलेक्शन्सच्या विरोधात गोंधळ घालण्यामध्ये ह्या विद्यार्थी संघटना पुढेच होत्या.. (बादवे, वेगळं झाल्यापासून आजतायागत मेघालयमध्ये मुन्सिपल इलेक्शन झालेली नाहीत. म्हणजे, तीनवेळा प्रयत्न केला तसा सरकारने.. पण तिन्हीवेळा रद्द करावी लागली.) आमच्या एरीयात म्हणजे अख्ख्या गारो हील्समध्येच, जी. एन. एल. ए. (गारो नॅशनल लिबरेशन आर्मी) चे बर्‍यापैकी थैमान आहे. ही संघटना चॅम्पियन नावाच्या एका मेघालय पोलिसातील अधिकार्‍याने स्थापन केली. (ह्यामागे तो आणि त्याची संघटना जरी "गारो फ्युचर"च्या बढाया मारत असली तरी खरे कारण हे आहे की त्याच्या वागणूकीमुळे त्याचा पोलिसांतून काढून टाकण्यात येणार होते. त्यानी मग "हुतात्मा" होण्याचा चान्स घेतला.) बेसिकली, हा एक "एक्स्टॉर्शनिस्ट ग्रुप" आहे. ह्या भागात बेरोजगारी भरपुर असल्याने त्याला काडर पण मिळतंय.. दोन-अडीच महीन्यांआधी त्यांनी माझ्या बाजूच्या सब-डिव्हीजनमधून एका बीडीओला त्याच्या ऑफीसातून उचलून नेले. एका महीन्यानी (ख्रिसमसच्या पुर्वसंध्येला) त्याला सोडून दिल्या गेले.. तसेच १५ दिवसांआधी इलेक्ट्रीसिटी बोर्डच्या दोन इंजिनिअर्सला पळवले, ते अजून त्यांच्या ताब्यात आहेत.. आता मी "मेरा नंबर कब आयेगा" ह्याची वाट बघतोय झालं.. ;-) इथल्या समाजाचे आणि राजकारणाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे "प्रचंड मोकळेपणा".. इथे मुख्यमंत्र्याला भेटायला कुठलाही मतदार एकदम बिनधास्तपणे जाऊ शकतो. मुळातच इथल्या आमदाराचा मतदारसंघ हा आपल्याकडच्या मोठ्या ग्रामपंचायतीइतका किंवा नगरपरीषदेइतका असतो.. (२५००० मतदार म्हणजे अबब..) त्यामुळे बाहेरून आलेल्या अधिकार्‍याला त्याने पाहीलेल्या/ अनुभवलेल्या साहेबीपणामुळे सुरुवातीला लै जड जाते. लोक तुमच्या ऑफीसात येवून तुमच्या टेबलाला टेकून किंवा रेलून उभे राहत आरामात तुमच्याशी बोलताहेत, हे आपल्याकडे कुठल्याही "पटवारी साहेबांचा तोरा" पाहिलेल्या माणसाला कठीणच जाणार के हो.. ;-) भाषा : हा एक मोठा लोचा आहे.. मेघालयात तीन मुख्य भाषा पुन्हा त्याच.. गारो, खासी आणि जैंतिया.. आता मी प्रोबेशनमध्ये "अहोमिया" शिकलोय. पण गारो भाषा वेगळीच आहे. वरुन रोमन लिपी.. त्यामुळे ही वाचतांना इंग्रजीत मराठी वाचतांना जसं डोकं फिरतं तसं होतं.. आधी ह्या भाषेची लिपी बंगाली / अहोमिया सारखी होती, पण आता ख्रिश्चन प्रभावाने ती रोमन लिपी झालीय. मी गारो शिके-शिकेपर्यंत मला कदाचित खासी / जैंतिया भागात पाठवतील, म्हणजे तीही एक कटकट. आणि कोच आणि हजाँग आहेतच.. पण कोच आणि हजाँग लोकांना अहोमिया कळते. गारो लोकही (कमीत कमी ऑफीसातले वगैरे) हिंदी बर्‍यापैकी जाणतात.. ह्या प्रॉब्लेममुळेच मेघालयची आधिकारीक भाषा इंग्रजी आहे. भाषेचा प्रश्न हा इथल्या शिक्षणात एक मोठा अडसर आहे. महाराष्ट्रात जसं प्राथमिक शिक्षण मराठीत होतं, तसं इथे होऊ शकत नाही. कारण तीन मुख्य भाषा.. गारोत शिकवायचं म्हटलं, तर शिक्षक-निवडीचं क्क्षेत्र मर्यादीत होतं. इंग्रजीत शिकवायचं म्हटलं, तर मुलांना पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे घरी कोण देणार? आणि मुळात शिक्षकांनाही इंग्रजी चांगल्यानी येतंय कुठं? म्हणून मग मुलांचा शिक्षणातला रस हळू-हळू कमी होऊन ड्रॉप-आउटचं प्रमाण भरपुर आहे.. मी माझ्यापुरतं तरी शिक्षकांशी बोलतांना "गारो फ्युचर म्हणजे तुमची सशक्त, सुशिक्षीत मुले" हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो.. आता १५ फेब्रुवारी नंतर शाळा सुरु होतील, तेव्हा सगळ्यांना भेटून, मुलांच्या आई-वडीलांच्या आणि वडीलधार्‍या माणसांच्या मनात पाल्याच्या शिक्षणात जास्त रस घेण्यासाठी बोलायचा विचार आहे.. बघूया.. नाही नाही म्हणता म्हणता बराच मोठा लेख झालाय.. एक-दोन किस्से टाकतो आणि संपवतो. # माझ्या ऑफीसात "जन्म नोंदणी कोर्ट ऑर्डर" देण्याचं काम असतं.. आतापर्यंत मी तीन-चार "अशक्य" जन्मतारखा असलेल्या ऑर्डर्स फेटाळल्याहेत आणि "कारणे दाखवा" हाणल्याहेत.. तारखा अश्या : २९ फेब्रु. १९९८, ३० फेब्रु. १९८८ आणि ३१ फेब्रु. १९८३ # मतदार-नोंदणीच्या वेळी एकाजणाने फॉर्मवर वडीलांचे नाव अबक असे लिहीले. सोबत प्रमाण म्हणून इलेक्शन कार्ड मात्र "यरल" असे दुसर्‍याचेच होते.. मी त्याला विचारलं, " बाबा रे, तुझ्या वडीलांचे नाव काय?" ( आईने दुसरं लग्न केले असेल म्हणून) तो म्हणाला, "सर, फॉर्मवर लिहीलंय ना?" मी म्हटलं, "हो पण कार्ड दुसर्‍याचंच आहे म्हणून.." तो उद्गारला, " थांबा सर, विचारुन येतो." आणि बाहेर गेला.. मी गपकिनी वारलोच..:D भेटुयात पुन्हा...

वाचने 10213
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

शेवटचे २ स्टेडियमच्या बाहेर.

In reply to by इरसाल

शेवटचे २ स्टेडियमच्या बाहेर.
असेच म्हणतो. मस्त लेखन!

पुढचे भाग पटापट येऊंद्या साहेब (मामलेदार की कलेक्टर साहेब म्हनायचं?) ;-) लैच इंट्रेस्टिंग आहे. फटूचं तेवढं बघा राव. तुम्हाला हे लिहायला लावल्याबद्दल बंदा धमाल आणि विजुभौ काऊ‍न्सलिंगवाले यांचे विशेष आभार मानण्यात येत आहेत.

थोडं पर्यटनाविषयी पण लिहा ना :)

छान! भाषाशैली चांगली आहे. काही निरीक्षणेही बारकाईने केलेली आहेत. अजून वाचायला आवडेल. मात्र नुसतं वरवर न ठेवता तिथल्या सामाजिक, राजकिय, आर्थिक, (असलेच तर) फुटिरतावादी, चर्च आणि चर्चचा प्रभाव इत्यादी अंगांबद्दल सविस्तर आलं तर आवडेलच. कृपया मनावर घ्याच!
माझे इतर काडर्समधले मित्र मला फोन करतात तेव्हा, "काय सुंदर ठीकाणी आहेस रे तू? टेंशन नाही काही.." इ. इ. सुरु असतं त्यांचं.. ह्याउलट, आसामात अजूनही "उल्फा/ अल्फा"चं थैमान सुरु आहे असंच त्यांना वाटतं..
भारतिय प्रशासन सेवेबद्दल काळजी वाटली! :)

थोडं पोरीबाळींविषयी पन ल्याहा... त्यांचे ड्वले दिवसभर बारीक का असतात ते लिहा... मग झोपताना काय ड्वले उघडे ठेवतात का? त्यांचे नाक दबके का असते ते लिहा... कपाळ, नाक अन हनवटी सगळे एकाच प्रतलात का असते? लेख फक्कड... फक्त तुमचा नंबर कधीही न येवो म्हणजे झाले...

मेघालया बद्दल जाणुन घेण्याची इच्छा मनापासुन च आहे .. त्यामुळे पुढील भागाच्या प्रतिक्षेत .. एक विनंती : फोटो असावेतच असे वाटते आहे चिगो .. प्लीज बघ

आपल्याला इंग्लंड अमेरिकेची जितकी माहिती असते तितकी या उत्तरपूर्व भारताची नसते. सगळंच एकदम "अद्भुत" वाटतंय! किस्से तर अफलातूनच! पुढचं लिहा लवकर!

In reply to by पैसा

आता जर का माझी आज्जी आजोबासोबत आसाम/मेघालयातुन मिसळपाव वापरत असली असती तर मला नक्कीच ही म्हैती झाली असती... हो की नै... पण माझी आज्जी अन आजोबा दोघेही तिकडे उसात असतात ना...

जवळजवळ सगळ्यात गोष्टी "ऑर्गॅनिक" असतात छानच. मातृसत्ताक पद्धतीबद्दल वाचून आधी माझाही गोंधळ उडाला. मेघालयाची माहिती आवडली नाहीतर मीही "चेरापुंजी ना? मग सुंदर ठिकाणी आहेस तू!" असेच म्हणणार्‍यातली आहे.

मस्त आवडलं, बरेच दिवस तिकडं यायचं चालु आहे, पण काहीतरी लफडं होंतं अन रहित होतं, आता एकदा सरळ बँग उचलायची अन निघायचंय.

तसेच हॉर्टीकल्चर (मराठी शब्द?) हॉर्टीकल्चर = उपवनविज्ञान, उद्यानविज्ञान, बागविद्या, उद्यानविद्या बागपद्धती, उपवन वाटिका यातले जे नेमके असेल ते... बाकी लेख सुरेख आहे. भाषा ओघवती आणि सांगण्याची हातोटीही उत्तम. पुढील भागाची नक्की वाट पाहत आहे.

वपाडाव, बिका, इरसाल यांच्याशी सहमत. छान लेख. अजुन थोडे सविस्तर तपशील येउद्यात. @ निनाद, चपखल शब्दप्रयोग "उद्यानविद्या" हा वाटतो. कृषी महाविद्यालयांमधून हिच पाटी वाचल्याचे आठवतेय. हिंदीमध्ये "बागवानी" असे म्हणतात.

खुपच छान माहिती .... संपुर्ण "उत्तरपूर्व " भारताबद्दलच खुप आकर्षण आणि कुतुहल आहे .. तुमच्या ह्या लेखामुळे तिथल्या लोकांच्या रोजच्या जीवनाबद्दल समजले (प्रत्यक्ष 'आंखो देखा हाल')... अशी हि महिती सहसा कुठेही जालावर मिळत नाहि. त्याबद्दल विशेष धन्यवाद. जमल्यास कृपया सोबतीला 'फोटो' ही टाकावेत... म्हणजे कसं घरबसल्या अम्हाला 'उत्तरपूर्व ' भारताची सैर केल्यासारखं होईल :) कुतुहल पोटी मला अजुन काही प्रश्न आहेत, (तुम्ही पुढच्या लेखात आधिच ते टाकण्याचा विचार केला असेल तर उत्तमच ) १. तिथल्या खाद्यसंस्कृती बद्दल , म्हणजे अगदी खाद्यसंस्कृतीचा ईतिहास नसला तरी रोजच्या जेवणात(जीवनात :P) ते काय खातात? त्यांचा पारंपारीक खाद्य-पदार्थ कोणता? (त्याचं काय आहे आम्हि जन्माचे अधाशी आणि खादाड आहोत, म्हणुन कुठल्याहि नविन जागेबद्दल ऐकलं कि अम्हाला कुतुहल असतं ते तिथल्या खाण्याचं :D) २. त्यांच्या स्वतःच्या भाषेतलेच सिनेमे तिथे चालतात कि तिथे हि बॉलिवुड चे सिनेमे असतात? ३. तिथेही '१५ ऑगस्ट' आणि "२६ जानेवारी" लोक त्याच पद्धतीने साजरा करतात का जसा तो ईतर भारतात होतो (कमी कंमी शाळांमधे जसा होतो सजरा तसा) ? त्या लोकांनाहि आपल्या 'फ्रिडम फायटर्स' बद्दल माहिती आहे का? (हा प्रश्न विचारण्याच कारण म्हणजे माझ्या असं ऐकिवात होतं कि त्या भागातले लोक आपण भारतीय आहोत असं मानतच नाहित.. असं काहिसं ... तुम्ही प्रत्यक्ष तिथे अहात म्हणुन विचारव म्हटंल... उगिच अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा...) (आणि बाकि हि काहि प्रश्न आहेत पण नेमके अता आठवत नाहियेत ) आधिच धन्यवाद (Thanks in advance) :) !

लेख माहितीपूर्ण आहे. आवडला. तिथे, माझ्या समजूती प्रमाणे नशा करणेही सर्वसामान्य असावे. मग अफू असो, पान, तंबाखू किंवा इतर..... याविषयी काय म्हणता?

सगळ्यांचेच धन्यवाद.. @ यशवंत, शिव्या घाला एकदाच्या, पण ते साहेब-बिहेब बाहेर नको हो.. @गवि, तुम्ही माझ्या शैलीची तारीफ करणे म्हणजे.. देव पावला. :-) @बिका, भाप्रसेबद्दलची चिंता योग्य आहे हो.. पण त्यांचाही दोष नाही. मेघालयची ओळख म्हणजे "शिलाँग, चेरापुंजी" हीच असते बहुतेकांना.. आणि GNLAच्या कारवाया आम्ही नोकरीत चिकटल्यावर वाढल्याहेत. (चर्चेत आहे असं म्हणू शकत नाही) आणि स्वानुभावावरुन सांगतो, एकदा तुम्ही तुमच्या कॅडरमधे पोचलात की आपली सबडीव्हीजन, जिल्हा आणि राज्य ह्यातच गुंतून पडता.. वरताण म्हणजे, गारो हील्सची चिंता शिलाँगातही करत नाही कुणी फारशी. देशपातळीवर कुणाला पडलीय, च्यायला.. फोटोज टाकले असते पण मी जे लिहीलयं त्यावरचे फोटोज माझ्याजवळ नाहीत..आणि नेटावरुन फोटो उचलून डकवायला फारसं आवडत नाही. पर्यटनावरचे फोटोज आधीच टाकले होते, त्याचा लिंका डकवतोय.. http://www.misalpav.com/node/15366 http://www.misalpav.com/node/19795 प्रतिसादांमध्ये उल्लेखलेल्या मुद्द्यांवर पुढच्या लेखात लिहीन.. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद..

In reply to by चिगो

प्रामाणिक उत्तराबद्दल धन्यवाद! पण तरीही, भाप्रसेमधल्यांनी इतकं आकुंचित राहणं चूक वाटतंय. की माझ्याच भाप्रसेबद्दलच्या अपेक्षा चुकीच्या आहेत? ;) बाकीच्या ओळींवरून तर माझी काळाजी अजूनच व्यापक झाली! आता देशाचीच काळजी वाटायला लागली आहे. :ड

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नाही हो.. काही आकुंचित वगैरे नाहीत हो.. फक्त मेघालयची जी "रोमॅण्टीक" इमेज आहे, तीचं प्रतिबिंब आहे ते.. आणि त्या त्या लेव्हलवर/पोस्टवर असतांना तुमचं रेग्युलर कामच तुमचा वेळ घेतो. आणि ह्या भागाची माहिती पेपरात/मिडीयात तरी कितीशी असते हो? देशाची काळजी वाटतेय, हे चांगलंच आहे म्हणा. पण, चिल.. आल इझ वेल.. :-)

चिगो एक विचारायचे आहे. माझ्याबरोबर एक आसामी होता त्याला एकदा विचारले कि मला तुझ्याबरोबर तिकडे यायचे आहे सुट्टीत, म्हणे बाहेरचे म्हणजे अदर द्यान आसमीना दिल्लीतील आसाम भवन मधून परवाना घ्यावा लागतो तसेच मिलिटरी कार्यालयाचा परवाना आवश्यक असतो.कृपया प्रकाश टाकावा.

In reply to by इरसाल

चुकीची माहिती आहे ही.. आसामात आणि मेघालयात जायला कुठलाच परवाना लागत नाही. हां, नागालँड, मणिपुर आणि अरुणाचलला जायला लागतो, (त्याला "इनर लाईन प्रमिट" म्हणतात) पण तेही सहज मिळतात. तसातर मला हा वायझेडपणा सरकारने अजून का सुरु ठेवलाय हेच कळत नाही..

धन्यवाद हा लेख लिहिल्याबद्द्ल. पूर्वोत्तर राज्यांची माहिती खुप कमी मिळते. डोंगर द-यांचा प्रदेश असल्याने इथला खुप कमी विकास झाला आहे.:smile: ठळक मथळे टाकून लिहिल्यामुळे माहिती खरच अभ्यासपूर्ण झाली. शेवट्चे दोन किस्से आम्हीसुद्धा वारल्या गेलो आहे. 0:) :innocent:

सुरुवात उत्तमच झाली आहे. प्रश्नच नाही. त्यात पुन्हा तिथलं रोजचं कामकाज नजरेखालूनच जात असल्यानं अधिक विश्वासार्ह माहिती मिळण्याची खात्री आहेच. मातृसत्ताक संस्कृतीमुळं उडणार गोंधळ लैच्च भारी. सुरुवातीला ही गडबड झेपलीच नसेल ना ? :)
गारो हील्स मधल्या रेसिबुलपारा इथे "फॅलस वर्शिप" अर्थात लिंगपुजा होत असावी, असे तेथील काही फोटोज पाहून मला वाटले. हे म्हणजे शिवलिंगासारखे नसून पुरेपुर पुरुष व स्त्री जननांगाचे शिल्प आहेत.
आजच्या बहुतांश इशान्य भारतामध्ये पुर्वी शाक्तपंथीयांचा पगडा होता. (कामाख्यादेवीच्या मंदीरात अजूनही विशिष्ट काळी ५ दिवस शाक्तपंथी उपासना चालते, त्याकाळी हे मंदीर इतरांसाठी बंद असते अशी माहिती कळाली आहे.) त्यामुळे लिंगपुजेबद्दलचं मत योग्य असू शकते असं मला वाटतं. मातृसत्ताक पध्दती ही देखील शाक्तपंथीयांची देणगी असे ऐकले आहे.
गारो आणि खासी ह्या जमाती बहुतांश ( जवळपास १००%च) ख्रिश्चन आहेत आधी ह्या भाषेची लिपी बंगाली / अहोमिया सारखी होती, पण आता ख्रिश्चन प्रभावाने ती रोमन लिपी झालीय.
:) मध्यंतरी आपले मिपाकर श्री.विश्वास कल्याणकर ह्यांचे इशान्य भारतातील कार्याबद्दलचे काही धागे आले होते त्यामध्ये हा मुद्दा प्रकर्षानं दिसला होताच. मिशनर्‍यांनी येन केन प्रकारे जवळपास पुरता इशान्य भारत धर्मांतरीत केला आहे. मला प्रश्न पडतो, अशा धर्मांतरावर बंदी आणण्याबद्दल कोणी बोललं, काही हालचाल सुरु केली की तथाकथित सेक्युलर डोकी जो थयथयाट करतात, तीच भूमिका अशा रितीनं घडवल्या जाणार्‍या धर्मांतरामुळे खून पाडल्या जात असलेल्या संस्कृती, भाषा/लिपी ह्यांच्या र्‍हासाविषयी मूग गिळून गप्प कसे बसतात? >कोच, हजाँग ह्या जमाती हिंदु धर्म पाळतात. आणि जैंतिया जमातीत अजूनही "अॅनिमिझ्म"चे अंश आहेत. मोठी आश्चर्याची बाब आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या आक्रमक प्लॅनिंग & एक्झिक्युशनपुढं हे लोक कसे काय टिकले ह्याचं नवल वाटतं. काही विशेष माहिती आहे का ह्यासंदर्भात?
मुलांचा शिक्षणातला रस हळू-हळू कमी होऊन ड्रॉप-आउटचं प्रमाण भरपुर आहे.. मी माझ्यापुरतं तरी शिक्षकांशी बोलतांना "गारो फ्युचर म्हणजे तुमची सशक्त, सुशिक्षीत मुले" हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो.. आता १५ फेब्रुवारी नंतर शाळा सुरु होतील, तेव्हा सगळ्यांना भेटून, मुलांच्या आई-वडीलांच्या आणि वडीलधार्‍या माणसांच्या मनात पाल्याच्या शिक्षणात जास्त रस घेण्यासाठी बोलायचा विचार आहे..
उत्तम! स्तुत्य प्रयत्न आहे. ह्या शाळांची भाषा कोणती असते? म्हणजे, ड्रॉप-आउटचं मोठं प्रमाण असण्याचं कारण भाषा आहे असं वाचल्यामुळं प्रश्न पडला. धर्मांतर, आक्रमण आणि प्रशासन ह्या अनुशंगानंही काही प्रश्न आहेत, पण ते आपण खाजगीतच बोलू. अवांतरः मराठीमध्ये इशान्य हा शब्द असताना 'उत्तरपुर्व' असं म्हणलं जाऊ नये असं माझं प्रामाणिक मत.

In reply to by धमाल मुलगा

बहुतांश गारो समाज आता ख्रिश्चन झाला असला तरी त्यांची पारंपारीक जीवनपद्धती तशीच आहे रे.. म्हणून तर मातृसत्ताक पद्धती अजूनही टिकून आहे ना.. लग्नही सगळीच काही चर्चमध्ये जावून होत नाहीत. मणिपुर मधे नावामागे "सिंग" किंवा "सिंघा" लिहील्या जाते, कारण की तिथे हिंदु बरेच आहेत. सगळ्यात आधी आपण सरसकट "इशान्य भारत" ही सिंगल इन्टीटी मानतो, तसे नाहीय. वर वपाडावने त्यांच्या चेहर्‍या, डोळ्यांबद्दल जे म्हटले आहे त्यावरुन हीच वृत्ती दिसते.. आसामात बर्‍याच जणांची ठेवण ही बंगाली लोकांसारखी आहे. गारो आणि खासी ह्यांच्यातही फरक आहे. अरुणाचली वेगळे, नागा वेगळे आणि मिझो वेगळे.. त्यांच्या भाषा, संस्कृती मराठी आणि पंजाबी इतक्याच वेगवेगळ्या आहेत, राजेहो.. आपण जेव्हा "त्यांच्यात भारत-विरोधी भावना का आहेत?" असे म्हणतो (ती नाही हा माझा अनुभव) तेव्हा दिल्ली, मुंबईत ह्या मुलांचा "ऐ चायनीज, ए चाऊमीन" हे ऐकून त्यांना काय वाटत असेल त्याचा विचार आपण करतो का? केला का? "चक दे"मध्ये ते दाखवलंय की.. धर्मांतराबद्दल मला फार माहिती नाही. माझ्याइथे बेलबारीमध्ये "गरुडाचल विद्यापीठ" हे सेवाभारतीद्वारा चालवले जाणारे निवासी विद्यापीठ आहे आणि त्याला प्रतिसादही चांगलाच मिळतोय. आणि इथे "कामाख्या मंदीर"पण आहे तसेच दुर्गापुजाही जोरात साजरी होते.. बाकी बोलूयात..

शेवटचे किस्से वाचून ह.ह.पू.वा

मेघालयाबद्दलचा हा First hand report फारच उत्तम. धम्याने म्हणलेले बरोबरच आहे. पूर्वाचालांबद्दल आपण अज्ञानी आहोत. पूर्वाचालांत अनेकवर्षे काम करीत असलेल्या सुनील देवधरांनी दोन वर्षापुर्वी म.टा.मधे लेखमाला लिहीली होती. त्यातील मेघालयाबद्दलचा " स्वर्गापासून सात पावलावर.." हा लेख जिज्ञासुंनी जरूर वाचावा.

माझ्या सारख्या भटक्यास एक अजुन निमीत्त. तेकडील भटकंती साठी कोणते महीने योग्य ठरतील ? छान लेख आणि सुंदर परीचय. छायाचित्र असती तर 'सोने पे सुहागा"

स्वतःचाच धागा वर आणण्याचं पातक करतोय ह्यासाठी क्षमस्व.. हे करण्यामागे कारण म्हणजे आज आमपाटीत म्हणजे माझ्या सबडिव्हीजन मधे निघालेली "शांती रॅली".. वर लेखात लिहीलेल्या GNLA ने मागच्या दिड आठवड्यापासून इथे बंद पाळलेला होता. दहशतीमुळे लोक घरांतून बाहेर पडत नव्हते. माझ्या ऑफीसमध्येही मी सोडून कुणी येत नव्हते. आणि लोकच येत नसल्याने मीही बसून काही फायदा नव्हता, पण बसायचो, फिरायचो आपला.. ह्या दहशतवाद्यांनी सरकार त्यांच्या विरोधात करत असलेल्या कारवाईच्या विरोधात पुन्हा ३०० तासांचा बंद करायचे ठरवले तेव्हा मात्र लोक बिथरले. आम्ही आमच्याकडून सप्लाय डिपार्टमेंटद्वारे शनिवारी आणि रविवारी (इथली सुट्टी) घाऊक आणि किरकोळ धान्य विक्री केंद्रे उघडायला लावून लोकांपर्यंत धान्य पोहचवले, पण बाकीच्या गोष्टींचे काय? शेवटी अख्ख्या गारो हिल्समध्ये सकाळी ८ वाजतापासून वेगवेगळ्या ठीकाणी शांती रॅलीज काढायचे ठरवले लोकांनी. अख्ख्या गारोहील्सची जनसंख्या साडेदहा लाख आहे ३ जिल्ह्यांत मिळून, तिथे एकट्या तुरा शहरात जवळपास ३० हजार लोक उतरले रस्त्यांवर.. आमपाटीसारख्या (आपल्या तुलनेत) खेडेगावात २५०० लोक ह्या "शांती रॅली" साठी बाहेर पडले. कुठलाही दंगा, घोषणाबाजी न करता शांतपणे बॅनर्स घेऊन हे लोक चालले होते (आम्हीही त्यांच्यासोबत होतो) ... आणि "लोकांना होणार्‍या त्रासापायी" GNLA ने बंद रद्द केला !! :-D जनशक्तीच्या ह्या आविष्काराला माझा सलाम !!

In reply to by कवितानागेश

ग्रेटच! :)

In reply to by यकु

सहीच रे

लेखन, माहिती आणि किस्से ज ह बर्‍या ! बाकी बरोब्बर ३ महिन्यांपूर्वी आजच्याच तारखेला टाकलेला हा धागा आमच्या नजरेतून सुटलाच कसा ? असो.. लेख पुन्हा वर आणून आम्हाला हास्यानंद दिल्याबद्दल लेखकुचे आभारप्रदर्शन्स.

हा धागा कसा काय वाचला नै बरं!! असो. अजुन लिहा...आम्हाला इशान्येतल्या राज्यांबद्दल काहीच माहीती नाही.