वल्ली यांच्या http://www.misalpav.com/node/20767 या भाजे येथील लेण्यांवरील धाग्यात काही प्रतिसादांमध्ये मी अजातशत्रू आणि प्रसेनजितावरून उल्लेख केला होता. तेव्हा असे जाणवले की या गोष्टी बौद्ध लेखनाशी संबंध आला आहे असे काही थोडे लोक वगळता इतरांमध्ये विशेष प्रसृत नसाव्यात. आणि या कथा इतक्या सुरस आहेत की त्या माहिती नसणे बरे नाही असे वाटते! पण त्याहीपेक्षा त्या अभ्यसनीय आहेत ते त्यातून काही तत्कालिन समाजांची माहिती हाती येऊ शकते म्हणून. म्हणून त्या इथे देत आहे.
---------------------------------------
अजातशत्रूची कथा -
अजातशत्रूची थोडक्यात गोष्ट सांगायची तर अशी की हा मगधाचा जो राजा बिंबिसार, त्याचा मुलगा. बिंबिसाराच्या तीन पत्नी असाव्यात. एक वैशाली नगरीतली कन्या, दुसरी काशीची कोसलादेवी आणि तिसरी मद्र देशीची राजकन्या. यापैकी एकीचा (बहुतेक कोसलादेवीचा) मुलगा म्हणजे अजातशत्रू. अजातशत्रू बिंबिसाराला मारून (किंवा तुरुंगात घालून) सत्तेवर आला. आणि त्याने अनेक वर्षे वैशाली नगरीशी युद्ध केले, तसेच काशीचा राजा प्रसेनजिताशीही म्हणजे त्याच्या मामाशीच युद्ध केले. ज्या अर्थी अजातशत्रूला बिंबिसाराच्या दोन प्रमुख राण्यांच्या परिवारांशी लढावे लागले त्याअर्थी त्याला मातुल कुटुंबाकडून विरोध असावा. कदाचित लढण्याशिवाय पर्याय नसावा.
प्रसेनजित हा काशीचा राजा. अजातशत्रूचे वडिल आणि मामा दोघेही बुद्धाचे थोडेफार अनुयायी होते. मात्र अजातशत्रू जसा वडिलांना मारून सिंहासनावर आला तसे त्याने त्यांचे हितचिंतकांनाही दूर करून स्वत:चे समर्थक गोळा केले. बुद्धापासून तो दूर गेला आणि त्याने बुद्धाचा विरोधक असलेल्या देवदत्ताला जवळ केले.
पुढे अजातशत्रूला वडिलांना त्रास दिल्याचा (किंवा मारल्याचा) पश्चात्ताप झाला, त्याच्या मनाला स्थिरता मिळेना तेव्हा जीवक नावाच्या त्याच्या वैद्याने अजातशत्रूला बुद्धाची भेट घेण्याची सूचना केली. राजवैद्य जीवकाने आपली आंब्याची बाग बुद्धाला राहण्यास दिली होती. अजातशत्रूने आपल्या वैद्याचे म्हणणे ऐकले खरे आणि बुद्ध ज्या आंब्याच्या वनात राहत असे तेथे त्याची भेट घेण्यासाठी आपले सैनिक, आणि राजाला शोभेल असा सर्व थाटामाटासह प्रस्थान केले. ही वाट खूप बिकट होती. तेथे राजाचे मोठे सैन्य जाईना. तेव्हा अजातशत्रूला आपले सैन्य आणि लवाजमा मागे ठेवून पायउतार व्हावे लागले. सैन्य मागे ठेवले तेव्हा तो मनात घाबरला की आपला घात तर होणार नाही ना? पण जीवकाने त्याला आश्वासन दिले आणि तो बुद्धाला भेटला. बुद्धाला भेटल्यावर (कथेत म्हटले आहे की) अजातशत्रू म्हणाला ते असे की आपला मुलगा उदयभद्र याला मनाला शांतता नाही. (बहुतेक वडिलांना मारले तेव्हाच्या स्वतःच्या मनःस्थितीची कल्पना असल्याने असावे!) बुद्धाने हे सर्व ऐकून घेतले. आणि राजाच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. बुद्धाबद्दल खात्री पटल्यानंतर अजातशत्रूने स्वतःच आपल्या वडिलांना मारल्याचे बुद्धाजवळ कबूल केले. बुद्धाने तुझ्याकडून चूक झाली हे तू मान्य करत आहेस म्हणजे तुझी प्रगती आहे असे म्हटले. आपले दुष्कृत्य सांगितल्यानंतर अजातशत्रूच्या मनावरचे ओझे हलके झाले. मात्र कथा सांगते की यानंतर अजातशत्रूने पुढे बुद्धमार्गाकडे वळण्याचा निर्णय घेण्याऐवजी हे सांगून मन मोकळे करून बुद्धाचा निरोप घेतला. बुद्धाला असे वाटले की राजाने आपली सत्याकडे जाण्याची संधी घालवली. पुढे या अजातशत्रूच्या मुलाने (उदयभद्राने) अजातशत्रूला ठार मारून सत्ता बळकावली असा उल्लेख आहे. उदयभद्राबद्दल विशेष माहिती मिळत नाही. पण बुद्धाच्या नंतरच्या धम्मप्रसारात अजातशत्रूचा अडथळा झाला नसावा असे वाटते.
अजातशत्रूची नाणी, खुणा असे काही मिळते असे नाही, मात्र अजातशत्रू हा ऐतिहासिक राजा असावा किंवा त्याचे बिरूद असावे असे वाटते. मथुरेतील एका शिल्पावर अजातशत्रूचा उल्लेख "वैदेही पुत्तो अजातसत्तू कुनिक" म्हणून येतो.
अजातशत्रू आणि सम्राट अशोकाच्या आयुष्यात अनेक साम्यस्थळे आहेत. पण महास्तूपवंशातली एक कथा त्यांना दोघांना जोडते ती अशी:
बुद्धाच्या मृत्युनंतर त्याच्या अस्थिंचे काय करायचे, त्यावर कोणाचा अधिकार असा वाद झाला. यात मगध आणि इतर सात नगरांनी आपापला अधिकार सांगितला. तेव्हा द्रोण म्हणून एका ब्राह्मणाने अस्थिंचे आठ भाग करावेत असे सुचवले ते सर्वांना मान्य झाले. तरीही द्रोणाने त्यातील एक भाग चोरण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही. शेवटी दहा भाग करण्यात आले, आणि आठ नगरे, तसेच नंतर आलेले मौर्य आणि द्रोण असे दहा अधिकारी धरून बुद्धाच्या अस्थिंवर वेगवेगळ्या नगरांमध्ये दहा स्तूप बांधण्यात आले. मात्र तरी पुढे ही भांडणे परत लागतील या भितीने महाकश्यपाने अजातशत्रूला सांगितले की ह्या सर्व अस्थि परत आण आणि त्या एका ठिकाणी गुप्तपणे ठेवून दे. अजातशत्रूने एकात दुसरी बसतील अशा आठ चंदनाच्या पेट्यातील सर्वात आतल्या पेटीत अस्थि ठेवल्या. त्यातली सर्वात बाहेरची पेटी अशाच एकात एक बसतील अशा चंदनी स्तूपांमध्ये घातल्या. मग रक्तचंदन, हस्तीदंत अशा प्रकारच्या विविध पेट्यात घालून त्याने त्या राजगिरच्या बाहेर एका स्तूपात घातल्या. यावर सुवर्णाचे पान बसवले आणि त्यात भविष्य लिहीले की पुढे राजपुत्र प्रियदर्शी अशोक म्हणून हे उघडेल आणि सर्वांमध्ये वाटेल. त्यानंतर त्या खोलीबाहेर रत्नांचा एक ढीग ठेवून त्यावर लिहीले की पुढे जे गरीब राजपुत्र येतील त्यांना अस्थिंची काळजी घेणे सोपे जावे म्हणून हा निधी ठेवत आहे! नंतर शाक्याने विश्वकर्म्यास पाठवले. येथून स्तूपवंशातले पुढचे वर्णन थोडे विचित्र आहे. विश्वकर्म्याने या खोलीत वन्य प्राण्यांना मारणारे एक यंत्र (हा उल्लेख कळत नाही) बसवले, स्फटिकासारख्या तलवारी/जांबिये घेतलेल्या लाकडी मूर्ती बसवल्या (लोकपाल?) आणि त्यानंतर हे सर्व विटांच्या, दगडाच्या स्तूपाने झाकून टाकले, त्यावर माती पसरली. अशी बरीच वर्षे लोटली. सत्तापालट होत होत अशोक सम्राट झाला. पुढे अशोकाने बुद्धमार्गाकडे कल झाल्यानंतर ८४, ००० स्तूप बांधायचे ठरवले. कोणा जुन्या माणसाने त्याला ही जागा दाखवली, अशोकाने मग प्रयत्नपूर्वक अस्थि परत बाहेर काढल्या. ते करताना रत्नांबद्दल अजातशत्रूने लिहीलेली गरीब राजपुत्रांबद्दलची टीप वाचून तो वैतागला असाही गंमतीदार उल्लेख आहे, पण त्याने काम पूर्ण केले. ह्या अस्थिंवर एकंदरीत ८४,००० स्तूप बांधण्यात आले.
अशोक आणि अजातशत्रूमध्ये बरेच साम्य आहे. दोघेही आपापल्या वडिलांना मारून सत्तेवर आले. अजातशत्रूच्या वडिलांचे नाव बिंबिसार तर अशोकाच्या वडिलांचे नाव बिंदुसार असे सांगितले जाते. अजातशत्रू आणि अशोक हे दोघेही युद्धखोर सत्ताधीश होते. दोघांनीही सुरुवातीच्या काळात सत्तेसाठी वाटेल ते प्रयत्न केले, सत्ता काबीज केली, आणि नंतरच्या काळात धार्मिकांना जवळ केले होते. पण नंतर मात्र वरील कथा खरी मानली तर अजातशत्रूने मुलाच्या सत्तालोलुपतेला आळा घातला नाही. अशोकाने मात्र मुलांच्या सत्तालोलुपतेला आळा घातला म्हणण्यापेक्षा लक्ष मगधापासून बाहेर वळवले. संघमित्रा, आणि महिंद्र या दोन्ही मुलांना दूर श्रीलंकेत पाठवले. त्याचा अजून एक मुलगा कुणाल हा काही काळ अशोकाच्या मर्जीबाहेर होता, पण नंतर अशोकाला चूक कळल्यावर त्याने मुलाला परत राजदरबारी आणले असे दिसते. अशोकाच्या उत्तर आयुष्यात त्याला फारसे विरोधक उरले नसावेत असे वाटते. म्हणून या काळात भव्यदिव्यतेच्या कल्पना स्तूपांच्या संख्येशी जोडल्या गेल्या असे दिसते. मात्र अशोकाच्या काळात जर ८४,००० स्तूप बांधून झाले असले तर नंतर शुंग आणि इतर राजांनी काय केले असा प्रश्न पडतो. यावरून एवढेच म्हणता येईल की अशोकाच्या काळात स्तूपांच्या बांधकामाची चलती झाली. अशोकाच्या शिलालेखांमधून त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळते पण ती तो सत्ताधीश म्हणून स्थिर झाल्यानंतरची. त्याआधीची माहिती ही अशा कथा-कहाण्यांमधूनच मिळते. ती कितपत खरी धरायची, आणि किती खोटी हे ठरवणे अवघड आहे. काही कपोलकल्पित कथा (उदा. अजातशत्रूने लिहून ठेवलेले भविष्य) या स्तूप खणून आधीचे पुरून ठेवलेले अवयव काढले यावरून गहजब होऊ नये म्हणून किंवा अजातशत्रूशी अशोकाचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी रचल्या गेल्या असाव्यात*.
भविष्य आदी गोष्टी पुराणातली वांगी म्हणून सोडून दिली तरी अनेक गोष्टी विचारांना खाद्य असल्याप्रमाणे आहेत.
१. भविष्य सांगण्याची प्रथा बरीच जुनी दिसते :)
२. राजांनी भविष्ये आणि भविष्य सांगणार्यांना स्वतःच्या हितासाठी वापरून घेण्याची पद्धतही जुनीच दिसते.
३. अशोकाच्या काळात यज्ञयाग राजकीय हस्तक्षेपाने कमी झाले असे म्हणतात. यज्ञांनी होणारा तोटा, नुकसान टळले हे उत्तमच झाले, पण लोकांचा यज्ञयागांवर खर्च होणारा पैसा आणि लक्ष इतरत्र वळले असावे, त्याला आळा घातला गेला नाही. उलट प्रोत्साहन दिले गेले. अर्थात त्यामुळेच स्तूपांसारखी स्थाने आज भारतीय इतिहासाची माहिती देत उभी आहेत हा झालेला फायदा. पण तोटेही बरेच असावेत. मुख्य तोटा असा की अशोकाच्या काळात यज्ञांना आळा बसला म्हणून नंतरच्या शुंगांनी आणि सातवाहनांनी जरी लेणी कोरणे, आणि स्तूप उभारणे सुरूच ठेवले तरी यज्ञयागांचेही थोडेफार पुनरुत्थान केले. जरी नंतर त्यात प्राण्यांचे बळी देण्याचे प्रमाण कमी झाले, तरी पैसा आणि शक्तीचा अपव्यय टळला नाही. मुळात अर्थव्यवस्थेचा भाग झालेली कोणतीही वाईट पद्धत मोडकळीला आणायची असल्यास तिला अनेक पर्याय तयार करायला हवेत. पर्याय तयार करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक जाण अशोकाने दाखवली (स्तूपांची बांधकामे हा त्याचाच प्रकार), पण अनेक पर्याय तयार झाले नसल्याने ही जाण समाज पूर्ण बदलण्यास पुरेशी पडली नाही असे मला वाटते.
असो. यानंतर अजून एक विचारांना खाद्यः
अस्थिंबरोबर पुरण्याच्या गोष्टींबद्दल जे काही लिहून ठेवले गेले आहे त्यापैकी काही पद्धती पाहून जुन्या चिनी संस्कृतींशी त्यांचा काही संबंध असावा का असे वाटते. इजिप्तमध्ये लाकडी मानवी बाहुल्या शवपेटिकेबरोबर पुरण्याची पद्धत होती. लाकडी बाहुल्या पुरण्याची पद्धत चीनमध्येही होती असे दिसते. (पूर्वी कोणी राजा मरण पावला की त्याच्याबरोबर नोकरचाकर, घोडे, रथ पुरले जात, नंतर ती पद्धत सोडून बहुदा लाकडी वस्तू पुरल्या जाऊ लागल्या). http://history.cultural-china.com/en/56History9562.html विशेष म्हणजे हे वर्णन श्रीलंकेच्या महावंसामध्येही सापडते. उदा. महावंसातील लेखनात स्तूपातील 'स्वर्गाचे' वर्णन करताना चार टोकांना चार राजे (बहुदा लोकपाल) आहेत असे म्हटले आहे. चीनमधील या नवीन उत्खननांबद्दल कोणाला काही दुवे मिळाल्यास ते जरूर द्यावे. ह्यामध्ये काही संबंध आहेत का हे अभ्यसनीय असावे. मात्र यावरून या कथा किंवा व्यक्ती भारतातल्या नाहीत किंवा आहेतच अशा पद्धतीचे निष्कर्ष काढणे मला योग्य वाटत नाही**.
----------------------------------
टीपा:
* याचे कारण समजत नाही.
** माझ्या हे स्पष्ट करण्यामागचा संदर्भ आहे तो खट्टामिठा या ब्लॉगचा. या ब्लॉगकर्त्याने http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_07.html भास्कर जाधवांचे उदाहरण देऊन रामकथा ही इजिप्तमधली आहे असा निष्कर्ष घाईने काढल्यासारखा वाटतो.
------------------------------------
जालावरील संदर्भः
Indian Kavya literature:The wheel of time, Volume 7, Part 1
Anthony Kennedy Warder, Motilal Banarsidass Publ., Apr 30, 2004.
http://history.cultural-china.com/en/56History9562.html
Mahavamsa:Great Chronicle of Ceylon
Wilhelm Geiger
Asian Educational Services, Dec 1, 1996 - 300 pages
प्रतिक्रिया
उत्तम लेख.
सविस्तर प्रतिसाद नंतर देईनच. तूर्तास ही पोच.
लेखन आवडले.
अजातशत्रू आणि अशोकामधली साम्ये आणि इतर माहिती सोप्या भाषेत सांगितल्यामुळे माझ्यासारख्या इतिहास विषय न आवडणार्यांनाही वाचन करावेसे वाटले.
नंतरच्या काळात धार्मिकांना जवळ केले
ही मानवी प्रवृत्ती असल्याने वेगळे वाटले नाही. दोघांमधले साम्य म्हणून ठीक आहे.
अजातशत्रूने त्याच्या मुलाला यातून वेगळे होण्यासाठी काही मार्ग अवलंबला नव्हता पण अशोकाने मात्र तसे केले. इतकेच नाही तर एका मर्जीत नसलेल्या मुलाला 'उपरती' झाल्यावर आणण्याचे काम केले यावरून राज्यविस्तार किंवा ८४००० स्तूप बांधण्याच्या (आणि इतर) कामांमध्ये लागणारी विश्वासू मदत मिळवली. याशिवाय लेखात आलेल्या उल्लेखानुसार त्याने चांगल्या गोष्टी सुरु करण्यासाठी पर्याय देऊ केले. अजातशत्रूपेक्षा अशोक 'राजा' म्हणून योग्य वाटला. (दुवे पाहिले नाहीत.)
पण उपरती मुलाला नाही झाली, अशोकाला झाली.. अशोकाच्या कुणाल नावाच्या मुलाची कथा इथे आहे. http://en.wikipedia.org/wiki/Kunala
बौद्ध धर्म वाढवण्याचे काम त्याच्या महिंद्र नावाच्या मुलाने आणि संघमित्रा (मुलगी) यांनी केले. कुणालाच्या मुलाला गादी मिळाली असे धरले जाते.
माझ्या मते अजातशत्रू आणि अशोकात मुख्य फरक असा आहे की अशोकाची महत्त्वाकांक्षा बरीच मोठी होती, आणि दृष्टीची झेपही बरीच मोठी होती.
होय. मी आणखी व्यवस्थित लिहायला हवे होते.:)
अजातशत्रूने पुरून ठेवलेल्या भगवान बुद्धाच्या अस्थी अशोकाने बाहेर काढल्या, तेव्हा लोकांकडून विरोध होऊ नये म्हणून त्याचा आणि अजातशत्रूचा संबंध जोडणारी कथा प्रसृत केली गेली असावी.
http://en.wikipedia.org/wiki/Ajatasatru इथे अजातशत्रूची कथा विस्ताराने दिली आहे पण विकिवरच्या कथा किती विश्वासार्ह असाव्यात माहिती नाही. त्याप्रमाणे अजातशत्रूचा काळ ४९१ ते ४६१ (ख्रिस्तपूर्व) आणि अशोकाचा काळ ३०४ ते २३२ (ख्रिस्तपूर्व) असा दिला आहे. म्हणजे दोघात साधारण १५० वर्षांचं अंतर होतं.
याच पानावरच्या माहितीप्रमाणे अजातशत्रूचं एक नाव अशोकचंद्र आणि दुसरं वैदेही पुत्र असं दिलं आहे. शिवाय बौद्ध आणि जैन दोन्ही मतं त्याला आपला मानतात.
स्तूपाच्या जागी परत यज्ञयाग वगैरे आले हे आपण आताच्या संदर्भात बघू नये कारण तेव्हा लोकांच्या धर्मविषयक कल्पना आणि खर्चाच्या, वैभवाच्या कल्पना अगदी वेगळ्या असणार. राजाने किती कर घ्यावा आणि तो पैसा लोकांसाठी कसा वापरावा याबद्दलही तेव्हाच्या कल्पना खूप वेगळ्या असणार. लोकांच्या गरजाही कमी असतील आणि मनोरंजन करण्यासाठी आणि राजांचं शौर्य आणि पुरोहितांची विद्वत्ता दाखवण्यासाठी त्याना यज्ञ हे एक साधन होतं.
आणखी पुस्तकं आणि आंजा शोधायला बराच वाव आहे, आणि काही सापडेल ते इथे आणून ठेवीनच!
यज्ञयाग आपण होऊन वाईट असे नाही. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. यज्ञयागांमध्ये असंख्य प्राणी बळी जात, तूप-दूध यांचा नाश होई, आणि शक्तीचा अपव्यय. म्हणून ते कमी झाले हे चांगलेच झाले. पण मी म्हटले आहे तसे -
मुळात अर्थव्यवस्थेचा भाग झालेली कोणतीही वाईट पद्धत मोडकळीला आणायची असल्यास तिला अनेक पर्याय तयार करायला हवेत. पर्याय तयार करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक जाण अशोकाने दाखवली (स्तूपांची बांधकामे हा त्याचाच प्रकार), पण अनेक पर्याय तयार झाले नसल्याने ही जाण समाज पूर्ण बदलण्यास पुरेशी पडली नाही असे मला वाटते.
यापुढे जाऊन म्हणायचे तर - इतरत्र म्हटल्याप्रमाणे -
बुद्धाचा जन्म उत्तरेत लुंबिनीला झाला आणि त्याच्या हयातीतला धम्मप्रसार हाही बिहारच्या (मगधाच्या आजूबाजूच्या परिसरात) झाला. यानंतर भारतातील धर्म प्रसाराचे काम हे विविध नगरांमधील भिक्षूंनी केले. माझे मत जर मोठ्या प्रमाणात धर्म प्रसार करायचा असला तर त्या त्या भागातले भिक्षू असणे गरजेचे झाले असावे. अशा भिक्षूंना शिक्षित करणे, त्यांची राहण्याची सोय करणे इ. व्यवस्था करण्यासाठी स्तूप बांधले गेले असावे. याला एक शिस्त जाणवते. म्हणून नुसताच तळागाळातून बुद्धाचा धर्म उचलून धरला गेला असे म्हणण्यापेक्षा हा धर्मप्रसार सत्ताधार्यांनी (कदाचित अशोकानेच) राजकीय हेतूने केला होता अशी माझी समजूत आहे. ह्याविरुद्ध काही पुरावे आहेत का?
अजातशत्रूच्या कथेत आणि अशोकाच्या कथेत बरेच साम्य आहे. इतके की ते दोघे एकच व्यक्ती आहेत असे वाटावे. पण त्यांच्या पत्नींची, तसेच मुलांची नावे वेगळी येतात. देवानाम प्रिय प्रियदसी हे बिरुद त्याच्या कुळातले अनेक जण वापरत. पण स्तंभ बांधणारा, त्यावर देवानाम प्रिय प्रियदर्शी कोरून घेणारा राजा अशोक होता ह्याबद्दल इतिहासकारांच्या मनात शंका नाही, असे वाटते. तसेच बुद्धाच्या मार्गापासून दूर राहिलेला राजा हा अजातशत्रू असावा. हे दोघे दोन व्यक्ती आहेत असे मला जे काही वाचले त्यावरून वाटते, पण याहून वेगळी माहिती असल्यास नक्की द्यावी.
यज्ञात बर्याच गोष्टींचा अपव्यय होतो हे बरोबर आहेच, पण मी या गोष्टीचा त्या काळच्या संदर्भात विचार करते आहे. तेव्हा इतर काही पर्याय नसल्यामुळे यज्ञ आणि देवळं, ते नसेल तर स्तूप आणि लेणी इतकाच मर्यादित विचार केला जात असे. एकतर इतर आरोग्य, शिक्षण, रस्ते वगैरे बांधणे याचा फार प्रश्नच नव्हता. आणि राजा हा सर्वसत्ताधीश. त्याला जे पटेल ते तो करणार. देऊळ, लेणी किंवा स्तूप तयार करून ठेवले तर आपलं नाव राहील इतकाच विचार सगळीकडे दिसतो. सगळीकडे देऊळ बांधून घेणार्याच्या नावचा शिलालेख आपल्याला सापडेल पण ते प्रत्यक्षात आणणारा स्थपती, शिल्पकार यांची नावं कुठे नोंद करून ठेवलेली अपवादानेच सापडतील.
त्या काळातला धर्मप्रसार राजाश्रयाने झाला हे उघडच आहे. एक तर राजा ज्या मताचा आश्रय करील त्याचा प्रजाजन सुद्धा स्वीकार करीत यात सरळ व्यवहार दिसतो. भिख्खूना रहाण्यासाठी स्तूप वगैरे बांधणे, गुहा/लेणी खोदून घेणे जैन बस्त्या या सार्याला प्रचंड पैसा लागत असणार. जो भिख्खू/श्रमण यांच्याकडे असणं शक्य नाही. सरळच अहे, तत्कालीन राजे किंवा राजाला जवळचे श्रेष्ठी या भिख्खूंची सोय करत असत. अशोकाने धर्मप्रसारासाठी त्याच्या मुलाना समुद्रपारसुद्धा पाठवले म्हणजे धर्मप्रसाराला राजाचा आशीर्वाद होताच! राजकीय हेतूने हे झालं असेल ही शक्यता फारच मोठी वाटते. एकतर बुद्धाची शिकवण अहिंसेची. तिचा अवलंब करणारा समाज अशोकाच्या विरुद्ध लढायला तयार होण्याची शक्यता त्यामुळे आपोआप कमी झाली. याच्या बाजूने जसे पुरावे नाहीत तसे विरुद्धही नाहीत!
>तिचा अवलंब करणारा समाज अशोकाच्या विरुद्ध लढायला तयार होण्याची शक्यता त्यामुळे आपोआप >कमी झाली.
हे एक लोडेड विधान आहे.
मला एक विचार अलिकडे नेहमी ऐकायला मिळाला आहे.
गीतेचे तत्वज्ञान हे जैसे थे राहायला शिकवते, तसेच आले आहे ते कर्म करत राहावे असे शिकवते, आणि ते ब्राह्मणांनी मुद्दाम रचले, कोणा गुप्त राजाच्या सहाय्यासाठी त्याचा वापर केला असे गीतेविषयी म्हटले जाते. तसेच अहिंसेचे तत्वज्ञानही लोकांना दुसर्यांविरुद्ध शस्त्र उगारू नये इ. शिकवते आणि म्हणून बौद्धांचे अहिंसेचे तत्वज्ञान अशोकाने अंकित लोकांना अंकित ठेवण्याची शक्यता वाढावी म्हणून वापरले असेल अशी analogy करता येईल अशी कल्पना आली नव्हती.
हे अशोकाने मुद्दाम केले, का आपोआप झाले असे तुम्हाला म्हणायचे आहे?
अजून एका चुकीची दुरुस्ती:
अशोकाने सत्तेवर येताना वडिलांना नाही, तर भावांना मारले अशी कथा आहे.
मी या विषयात तज्ञ नाही हे अगदी ठळक अक्षरात कबूल करते. तुझा लेख आणि प्रतिसादांची साखळी यावरून हा मला आताच सुचलेला विचार आहे. या बाजूने किंवा विरोधात काहीही वाचलेलं नाही. पण शक्यता मात्र खूप वाटते.
गीतेचा अकर्मवादी अर्थ लावल्यामुळे भारतीय निष्क्रिय झाले असं वाचलंय पण या दोन्ही विधानांबद्दल आज आता काहीही ठामपणे सांगणं कठीण आहे. अशोक काय किंवा गुप्त काय त्यांनी सम्राट होताना सर्व प्रकारे शत्रूला नामोहरम करणे हे ओघानेच आलं. पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे काय कारणं असतील यांचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. कारण आपल्यासमोर फक्त त्याचे परिणाम तेही पुसटसे दिसणारे आहेत.
कालौघात अनेक बर्यावाईट गोष्टींचे टोचणारे कंगोरे घासून गुळगुळीत होतात आणि बहुतेकवेळा त्यातल्या चांगल्या गोष्टी लोकांच्या स्मरणात रहातात. इथेही असं झालेलं असू शकतं. पण कोणी ते असं नाही म्हणून दाखवून दिलं तरी स्वागतच आहे! या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि आपण आजच्या संदर्भात त्यांचा फक्त अर्थ लावतो आहोत इतकंच.
अशोकाबद्दल ठाऊक नाही, पण बौद्धांच्या विहार व्यवस्थेबाबत दा. ध. कोसंबींनी समाजातील अतिरिक्त उत्पादन काढून घेण्याचे साधन (किंवा अन्य साधनांपैकी एक), अशा प्रकारचे विश्लेषण केल्याचे आठवते. मगधाबाहेर प्रसार करणार्या भिक्खूंचे विहार व्यापारी मार्गांवर होते, आणि बहुधा व्यापारांना सराई म्हणून सेवा पुरवत. या बाबतीत ख्रिस्ती व्यापारी आणि पाद्री यांचे एकमेकांत गुंतलेले हितसंबंध आठवतात. (तसेच आदिवासींमध्ये आजही आप-आपला धर्म प्रसारण करणार्या सर्व संस्था.)
बौद्ध तत्त्वज्ञान अनात्मवादाबाबत थोडेफार बंडखोर असेलही, पण अष्टमार्गातील बहुतेक भाग "राजाला हवे, तसे गुण्यागोविदाने वागा" अशाच प्रकारचा आहे.
>>तसेच आदिवासींमध्ये आजही आप-आपला धर्म प्रसारण करणार्या सर्व संस्था.
यात काहीच शंका नाही, की आदिवासींमध्ये आपापला धर्म प्रसार करणार्या संस्था व्यापारी संबंध टिकवून असतात आणि त्यांचे छुपे किंवा स्पष्ट आर्थिक, आणि राजकीय हितसंबंध त्यात गुंतलेले असतात.
आपण अशोकाबद्दल लिहीतो आहोत म्हणूनः
अशोकाच्या शिलालेखांमध्ये हे सर्व आले आहेच.
संदर्भः
http://en.wikipedia.org/wiki/Edicts_of_Ashoka
Everywhere within Beloved-of-the-Gods, King Piyadasi’s domain, and among the people beyond the borders, the Cholas, the Pandyas, the Satiyaputras, the Keralaputras, as far as Tamraparni and where the Greek king Antiochos rules, and among the kings who are neighbors of Antiochos, everywhere has Beloved-of-the-Gods, King Piyadasi, made provision for two types of medical treatment: medical treatment for humans and medical treatment for animals. Wherever medical herbs suitable for humans or animals are not available, I have had them imported and grown. Wherever medical roots or fruits are not available I have had them imported and grown. Along roads I have had wells dug and trees planted for the benefit of humans and animals. Rock Edict Nb2 (S. Dhammika)
In past there were no Dhamma Mahamatras but such officers were appointed by me thirteen years after my coronation. Now they work among all religions for the establishment of Dhamma, for the promotion of Dhamma, and for the welfare and happiness of all who are devoted to Dhamma. They work among the Greeks, the Kambojas, the Gandharas, the Rastrikas, the Pitinikas and other peoples on the western borders. They work among soldiers, chiefs, Brahmans, householders, the poor, the aged and those devoted to Dhamma – for their welfare and happiness – so that they may be free from harassment. Rock Edict Nb5 (S. Dhammika)
आपल्या देशापलिकडे औषधी पाठवण्याचा उद्देश हा व्यापार-उदीम वाढवणे, राज्यविस्तार करणे, विश्वास संपादन करणे इ. पैकी काही किंवा सर्व असू शकतात असे वाटते. आज अजूनही गेटस फाऊंडेशन इ. संस्था धर्मादायाचे काम करताना व्यापार आणि विशिष्ट औषधांचा प्रसार करत असाव्यातच. हे कायमच चालत आले आहे. आणि चालत राहील यात शंका नाही.
अशोकाने यज्ञयागांना बंदी घातलेली नव्हती पण यज्ञीय हिंसेला त्याचा विरोध होता. यज्ञात जो पशुहत्या करेल त्याला दंडित करण्याची आज्ञा अशोकाने एका शिलालेखात कोरून ठेवली आहे.
अशोकाने प्रचंड स्तूप बांधले. स्तूप हे प्रामुख्याने बुद्धाच्या स्मरणार्थच बांधले जात. भिक्खूंच्या राहण्यासाठी विहार बांधले जात. अनेक विहार आणि प्रार्थनेसाठी एक स्तूप अशी सर्वसाधारणपणे रचना असे. महाराष्ट्राच्या बाहेर बांधीव स्तूप आढळतात. आपल्याकडे मात्र बांधीव आणि खोदीव दोन्ही प्रकारच्या स्तूपरचना होत असत. कान्हेरीच्या एका लेणीपुढे एक बांधीव स्तूप बांधल्याचा एका शिलालेखात उल्लेख आहे. नालासोपार्याला बांधीव स्तूपाचे अवशेष मिळाले आहेत. पण वाढत्या नागरीकरणानंतर भिक्खूंना वर्षावासात शांतपणे ध्यान करता यावे यासाठी सह्याद्रीच्या गिरिकुहरांत खोदीव लेण्यांची परंपरा सुरु झाली असावी.
अशोकाने बुद्ध धर्म दूरवर पोहोचवला. पण तो प्रजाजनांत खोलवर झिरपला नाही. क्षत्रिय, वैश्य किंवा सधन शेतकरी अशा उच्च कुळांपुरताच तो मर्यादीत राहिला. यज्ञीय हिंसा बंदीमुळे समाजमन मौर्यांच्या विरोधात जाऊ लागले व अशोकाच्या मृत्युंनर उत्तरेत कण्व, शुंग व दक्षिणेत सातवाहनांचे साम्राज्य उदयास आले. जरी या राजांनी बौद्धांना राजाश्रय दिला असला तरी हे सत्ताधीश वैदिक धर्माचे कट्टर पुरस्कर्तेच राहिले.
सावरकरांच्या ६ सोनेरी पाने या पुस्तकात याबद्दल लिहिलं आहे.
>>>यज्ञीय हिंसा बंदीमुळे समाजमन मौर्यांच्या विरोधात जाऊ लागले व अशोकाच्या मृत्युंनर उत्तरेत कण्व, शुंग व दक्षिणेत सातवाहनांचे साम्राज्य उदयास आले.
माझ्या माहितीप्रमाणे शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ याला मारुन सेनापती पुष्यमित्र शुन्ग गादीवर बसला जो ब्राह्मण होता. त्यामुळे तो वैदिक धर्माचा पुरस्कर्ता असणार हे ओघानेच आले. अशोकानंतरचे मौर्य सम्राट इतके काही खास नव्हते. प्रचंड वाढलेल्या राज्याचा पसारा त्यांना आवरेना झाला, सबब प्रादेशिक मांडलिकांनी उठाव केले आणि ते स्वतन्त्र झाले. यज्ञीय हिंसा बंदीचा इथे संबंध नाही.
मौर्य सत्तेच्या र्हासाच्या अनेक कारणांपैकी तेही एक कारण आहे इतकेच. प्रजाजनांचा पाठींबा नसता तर दुसर्या सत्तांना सत्तेवर येणे अवघड होते.
ह्म्म....असेलही. पण एक शंका अशी, की भारतात मुस्लिमपूर्व काळात राजकीय सत्तेसाठी धार्मिक कार्ड कितपत चालायचे? जरा पाहिले पाहिजे.
बहुतेक चालत नसावे.
हिंदू हा धर्म तेव्हा तर नव्हताच, शंकराचार्यांच्या उदयानंतर वैदिक धर्माला हिंदु धर्माचे कोंदण लाभले. मूळ संस्कृती एकच असल्याने हे तिन्ही धर्म (हिंदू, बौद्ध, जैन ) बरोबरीनेच वाटचाल करत होते.
लढाया धार्मिक कारणांवरून होत नसत. सातवाहन-क्षत्रप एकमेकांचे कट्टर वैरी असूनही त्यांनी एकमेकांच्या धर्मस्थळांचा विध्वंस केल्याचे उलेख नाहीत. फार काय त्यांचे शिलालेखसुद्धा चांगल्या अवस्थेत एकाच लेणीत अगदी शेजारी शेजारीच दिसतात.
बाकी धाग्यावर अवांतर होत असल्याने अधिक चर्चा खवत अथवा व्यनित करू.
>>>बाकी धाग्यावर अवांतर होत असल्याने अधिक चर्चा खवत अथवा व्यनित करू.
--- कशाला ? कशाला?
लेखाच्या शीर्षकातच अवांतर आहे, चिंता करो नये.
आणि हे नेमकं अवांतर काय भानगड आहे ते एकदा ठरवूनच टाका राव.
मूळ विषयांवरून धागा भरकटत चाललाय म्हणून अवांतर हो.
शीर्षकातले अवांतर हे प्राचीन शवपेटीकांबद्दल आहे.
आणि त्या शवपेटिकांबद्दल अजून कोणीच लिहिलं नाहीये.
आपल्याला काय् समजना ब्वॉ!
आता चर्चा विषयच ऐतिहासिक असेल तर तिला थोडेसे फाटे फुटणारच.
उलट हे एका जागी राहिलं तर पुढच्या संदर्भांसाठी चांगलं.
इथे धाग्यांची मुंज करुन नवे धागे काढायची पद्धत सहसा पाहण्यात नाही.
आणि लोकांनी खरडवह्या कुठे तपासत बसायच्या? त्यावरही खंडीभर खरडी पडतील काही दिवसात.
आणि शवपेटिका !
कुठेय ती?
हा प्रतिसाद मात्र अवांतर झाला.
>यज्ञीय हिंसा बंदीमुळे समाजमन मौर्यांच्या विरोधात जाऊ लागले व अशोकाच्या मृत्युंनर उत्तरेत कण्व, >शुंग व दक्षिणेत सातवाहनांचे साम्राज्य उदयास आले.
यज्ञीय हिंसा बंदीचा बहुतेक संबंध नसावा. असला तरी तात्कालिक असावा. मौर्यांच्या विरोधात जनमत गेले असले तर त्याची कारणे बहुदा आर्थिक असावीत.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नागरिकांवर कोणते कर द्यावेत याबद्दल बरेच विवेचन आले आहे असे दिसते. कर बसवण्याचे कारण हे अर्थव्यवस्थेवर पडलेला भार असावा. अतिरिक्त कर द्यावे लागल्याने असंतोष वाढलेला असू शकतो. बाकी कारणे इतिहासकारांच्या विशेषतः रोमिला थापर यांच्या पुस्तकात मिळतील असे वाटते.
वल्ली मित्रा,
पुरातन काळात तुला असलेला रस एकदम जबरदस्त असाच आहे. मान गये उस्ताद...आपलं इंडियाना जोन्स ;)
अशोकाने बुद्ध धर्म दूरवर पोहोचवला. पण तो प्रजाजनांत खोलवर झिरपला नाही.
याबद्दल सहमत आहेच. पण हा धर्म सर्वसामान्यांत न झिरपण्याचे अजून एक कारण आहे ते म्हणजे हजारो-शेकडो वर्षे परंपरागत पाळलेल्या रुढी सोडून देऊन (तुलनेने) एकदम नवीन धर्माच्या (राजाश्रय असला तरी) रिती-नियम पाळणे तसेही अवघडच होते. म्हणूनच बौद्ध धर्माचा प्रसार जेवढ्या वेगात झाला तेवढ्याच वेगात तो संकुचितही झाला. दुसरे असे की वैदिक धर्माचे पुनरुत्थान करणारी व्यक्ती जेव्हा जेव्हा पुढे आली तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीला पाठींबा मिळत गेला कारण समाजमन परंपरा बदलण्यापेक्षा जतन करुन ठेवण्याकडेच जास्त झुकले. मग ते आदी शंकराचार्य असोत वा कण्व, शुंग वा सातवाहन :)
म्हणजे क्रमिक इतिहासाच्या पुस्तकात ज्याचे वर्णन ' युद्धातील रक्तपाताने दग्ध होऊन बुद्धाचा अनुयायी झालेला सम्राट अशोक (तोच तो, अशोक स्तंभ, नोटांवरचं आणि सिंहप्रतिमांच्या भारतीय राजमुद्रेवरचं सत्यमेव जयते*, तिरंग्यावरचे चोवीस आर्यांच्या चक्राची सोय करुन गेलेला )' आणि हा वरचा अजातशत्रू हे दोन्ही वेगळे आहेत तर.
"वैदेही पुत्तो अजातसत्तू कुनिक"महान भारतीय संस्कृतीत (हॅहॅहॅ) स्त्री नुसती मुक्तच नव्हती, स्त्रीच्या नावाने पुरुष ओळखले जात वगैरे वगैरे. स्त्रीमुक्तीवाल्यांनी विशेष नोंद घ्यावी. ;-) * सत्यमेव जयते ही अशोकाचीच देन आहे काय ?
क्रमिक इतिहासाच्या पुस्तकात ज्याचे वर्णन ' युद्धातील रक्तपाताने दग्ध होऊन बुद्धाचा अनुयायी झालेला सम्राट अशोक.
मला असे वाटत नाही. अशोकाकडून शिकायला भरपूर आहे, आणि ते केवळ रक्तपाताने दग्ध होऊन बुद्धाचे किंवा कोणाचेही अनुयायी बनणे नाही असे वाटते. माझ्या मते त्याला दृष्टी होती, पश्चात्ताप खोटा असे मात्र मला म्हणायचे नाही. उलट बुद्धाच्या मार्गातून त्याला शांततेने राज्यविस्तार करण्याची संधी दिसली असली तर आश्चर्य नाही. अशोकाचे शिलालेख वाचले तर त्याच्या दूरदृष्टीची, राजकीय आणि सामाजिक जाणिवेची कल्पना येते. http://www.cs.colostate.edu/~malaiya/ashoka.html
>महान भारतीय संस्कृतीत (हॅहॅहॅ) स्त्री नुसती मुक्तच नव्हती, स्त्रीच्या नावाने पुरुष ओळखले जात वगैरे >वगैरे.
>स्त्रीमुक्तीवाल्यांनी विशेष नोंद घ्यावी.
:)
हेच सातवाहनकाळापर्यंत चालत आले आहे: गौतमीपुत्र सातकर्णी, किंवा वसिष्ठीपुत्र पुळुमावी ही नावे आईच्या नावाने सुरू होतात असे दिसते. अर्थात या काळात सर्वत्र स्त्रियांना काय वागणूक मिळत होती हा प्रश्न नाही. तसेही उच्चवर्गामध्ये कायमच स्त्रियांना कनिष्ठ वर्गीय स्त्रियांपैक्षा अधिक पैसा, अधिक अधिकार मिळत आले आहेत. पण ते नंतर कधीतरी.
* सत्यमेव जयते ही अशोकाचीच देन आहे काय ?
नसावी.
मला असे वाटत नाहीनाही, नाही.. रक्तपात केला म्हणजे तो फार खराब मनुक्ष होता असे म्हणायचे नाही.. त्याला पश्चाताप झाला होता असं आम्ही शाळेत शिकलो होतो असे म्हणायचे होते..
* सत्यमेव जयते ही अशोकाचीच देन आहे काय ? नसावी.Satyameva Jayate" ([0]सत्यमेव जयते) (संस्कृत: "अकेले सत्य की जीत") भारत का राष्ट्रीय आदर्श वाक्य है.[1] यह राष्ट्रीय प्रतीक के नीचे देवनागरी लिपि में खुदा है. यह प्रतीक उत्तर भारतीय राज्य उत्तर प्रदेश में वाराणसी के निकट सारऩाथ में 250 ई.पू. में सम्राट अशोक द्वारा बनवाये गए सिंह स्तम्भ के शिखर से लिया गया है, लेकिन उसमें यह आदर्श वाक्य नहीं है. आदर्श वाक्य का मूल मुण्डक-उपनिषद का सर्वज्ञात मंत्र 3.1.6 है.[1] पूर्ण मंत्र इस प्रकार है: सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः| येनाक्रमंत्यृषयो ह्याप्तकामो यत्र तत् सत्यस्य परमम् निधानम्||[2] [ इति विकिपिडीया ;-) ] हा जो प्रकार आहे, सत्यमेव जयतेचा त्याबद्दल एका विद्वानाचा आक्षेप मला आवडलेला आहे. सत्यमेव जयते) (संस्कृत: "अकेले सत्य की जीत" हे असे असल्याने जिंकते तेच सत्य असते, मानले जाते ही शोकांतिका आहे.. नानृतम् ला भारताच्या राजमुद्रेवरील सत्यमेव जयते मध्ये स्थान नाही.. :( असो. आमच्या परममित्रांना कळ लागेल अजून जास्त विचारजंत सोडले तर .
"सत्यमेव जयते" हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतलेले आहे.
हो, मुंडक उपनिषदातूनच घेतले आहे..
अशोकस्तंभ, अशोकाची सिंहप्रतिमांची राजमुद्रा आणि चक्र [ पक्षी: बौद्ध राजाची चिन्हे ]
भारत सरकार ही प्रतिके राष्ट्रीय ठरवत असताना कमिटीत असणारे हुशार, आणि संतप्त
ब्राह्मण : काय चालवलं आहे काय नेमकं ? भारत देश बौद्ध देश घोषित करायचा आहे का ?
मग मुंडक उपनिषदातलं वाक्य राजमुद्रेवर !
ब्राह्मण खूश, बौद्धही* खूश !
असं काही झालं होतं का?
* पैचान कोन
पैचान कोन
पैचानलं!
पण राष्ट्रीय प्रतिके ठरविण्याच्या वेळेपावेतो "ते" बौद्ध झालेले नव्हते. सबब, तुमचे विधान फाऊल!
धन्यवाद!
:)
सर्वधर्म समभावाचा विजय असो.
भारतीय लोकशाही चिरायू होवो.. वंदे मातरम् , जय हिंद,
जय महाराष्ट्र, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा !
आणि पुन्हा लेखातील संदर्भांच्या अनुषंगाने -
बुद्धम् सरणम् गच्छामि, धम्मम् सरणम् गच्छामि. : )
पण अवांतरांच्या अनुशंगाने तुर्तास युद्धातील रक्तपाताने दग्ध होऊन बुद्धाचा अनुयायी झालेला सम्राट अशोक आणि हा वरचा अजातशत्रू हे दोन्ही वेगळे आहेत असं पटतयं हे नमुद करतो.
छान रोचक कथा आणि नवीन माहिती मिळाली.
शाळेत असताना इतिहासात काही गतिच नव्हती त्यामुळे त्यावर जास्त अभ्यास/विचार सुद्धा केला नाही. पण आता मात्र असा इतिहास समजून घ्यायला छान वाटतं. अश्या आणखी कथा वाचायला आवडतील.
इतिहास माझा आवडता विषय त्यामुळे लेख आवडला व प्रतिसाद वाचतोय.
त्यात अजून माहितीची भर पडावी असे वाटते.
सुंदर लेख.
खूप माहितीपूर्ण आणि इंटरेस्टींग!
बराच अभ्यासपुर्ण लेख आहे. अन लि़ंक्स ही हेल्पफुल.
धन्यवाद!
खुप माहितिपुर्ण लेख, अतिशय धन्यवाद.
अजुन काही शतकांनी अशोकाच्या स्तुपांची आणि मा. मायवतींच्या हत्त्तींची तुलना झाली तर आश्चर्य वाटायला नको.
लेख व दुवे आवडले.
हिस्ट्री चॅनेलवरचा एपिसोड बघीतल्यासारखे वाटले.
इतक्यात या वाहिनीवर इतिहासाशी काडीचाही संबंध नसलेले (फूड टेक्नोलॉजी, डेडलीएस्ट रोडस ई.ई.) कार्यक्रम बघुन वाईट वाटतं.
अमृत
ज्ञानात भर पडली. इतिहास हा मूळातच आवडता आणि कुतुहलाचा विषय. (सनावळ्या सोडून :-)) जितके वाचाल तितके कमीच. या आणि अशाच विषयांवर आणखी वाचायला आवडेल.
(इतिहासप्रेमी) अमृत
अस्स लेखस्स मिसळपाविनो पठनस्स महाभाग्गं मम...
चित्रातै, लेख लै भारी झालाय.
वाह सध्याच्या धुमधामीत अत्यंत वाचनिय असा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद.
अतिशय मस्त सुंदर लेख.
लेख लिहिताना घेतलेले कष्ट लेखात प्रतित होत आहेत. मस्त लेख.
खर तर बुध्द ह्यांचि शिकवण सगळ्यांवर दया करा अशी आहे तरी बहुतेक बुध्द धर्म मानणारे देश हे पक्के मांसाहारी आहेत.
हे विरोधा भास आहे .
असो लेख अप्रतिम आहे.
चूक.
बुद्ध हा स्वतः मांसाहारी होता (मूळचा क्षत्रियच तो). पण यज्ञात होणार्या हिंसेला त्याचा विरोध होता.
स्वतः प्राणीहत्या करून अन्न शिजवण्यास त्याचा विरोधच असे पण भिक्षेमध्ये कुणी मांस वाढले तर ते खायला त्याची ना नसे.
बुद्धाचा मृत्यु अळंबी खाऊन झाला असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात शिळे मांस खाल्याने त्याचा मृत्यु झाला असे दुर्गाबाई भागवतांनी म्हटलेले आहे.
तर मग बुध्द धर्माचा पाया वर उभा आहे . कारण दया क्षमा शांती ही तत्व आहेत त्यांची.
तुम्ही म्हणता की बूध्द जर कोणी आणुन दिल तर मांसाहार करत असे. पण त्या साठी कुठल्या तरी जीवला माराव लागत असेल ना. म्हंजे जीव हत्या आली. आणी बुध्द धर्म हा जीव हत्या करु नये अस म्हणतो.
बुद्ध धर्माचा माझा काहीही अभ्यास नसल्याने याचे उत्तर मी देऊ शकत नाही पण भिक्षेमध्ये मांसाचा समावेश असे याचे दाखले मात्र आहेत. (अशोकाचे काही शिलालेख, दुर्गा भागवतांची काही पुस्तके, )
जैनांमध्ये संपूर्ण अहिंसा पाळली जात असे.
भिक्षेमध्ये मांसाचा समावेश असे
मुळात बौद्ध धर्मात हिंसा करु नये हे आज आपण समजतो. पण सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला तरी सैन्य जसेच्या तसेच ठेवले होते. एवढ्या मोठ्या साम्राज्याचे रक्षण हिंसेशिवाय अशक्यच. वल्लीने अगदी बरोबर सांगितले आहे की बौद्ध धर्मात मांसाहार करुच नये असेही कुठे सांगितले नाहिये.
म्हणूनच आज कम्युनिस्ट चीन मध्ये बौद्ध हा प्रमुख धर्म असूनही ते आक्रमक आहेत, मांसाहार करणारे आहेत, पशुहत्या करणारेही आहेच.
@ चित्रा आणि पैसा
गीतेच्या तत्त्वज्ञानाचा चुकीचा अर्थ पुढे प्रसृत होत गेल्याने आजही लोकांत गैरसमज आहेत. हे कुणी समाजाने/जातीने/विद्वानाने जाणीवपूर्वक केलेले नाही. डोळे मिटून 'मम' म्हणायच्या आपल्या वृत्तीचा परिपाक असावा. 'कर्मण्येवाधिकारस्ते' या श्लोकाच्या अर्थाशी मी सहमत नव्हतो. फळाची अपेक्षा न धरता तू कर्म करत राहा, असे श्रीकृष्णासारखा महान योजक का म्हणेल, हा प्रश्न पडला. त्याचे उत्तर मला एका पुस्तकातून मिळाले. डॉ. मधुसूदन चान्सरकर लिखित 'भगवद् गीतेतील अर्थशास्त्र' हे पुस्तक वाचनीय आहे. त्यात हा अर्थ सुरेख उलगडून दाखवला आहे.
'कर्मण्येवाधिकारस्ते' म्हणजे 'कर्मात तुला अधिकार आहे, पण त्याच्या फलावर तुझा अधिकार नाही' थोडक्यात 'या जगात तुला कर्म करण्यापासून कुणी रोखू शकत नाही. तुला योग्य/पसंत/जमणारे असे कर्म तू नक्कीच करु शकतोस. पण त्याचे फळही त्याच प्रमाणात तुला मिळेल. (जितना काम उतना दाम) हे श्रम व मोबदल्याचे साधेसरळ तत्त्व श्रीकृष्ण सांगतो. फळाचा निरंकुश अधिकार कर्म करणार्याला गाजवता येणार नाही. याचे एक उदाहरण म्हणजे शेतकरी शेती (कर्म) करतो, पण त्यातून पिकणार्या धान्याचा (फळ) अवाजवी/निरंकुश अधिकार त्याला नाही. आजच्या काळात हे थोडेसे धक्कादायक वाटेल, पण समाज कल्याणासाठी हे तत्त्व मापदंड (यार्डस्टिक) मानता येईल. शेतकर्याला त्याच्या धान्याचा भाव त्याच्या श्रमाच्या प्रमाणातच मिळेल. हा भाव काय असेल, हे उपभोक्ता असणारा समाज ठरवेल. (आज हा भाव दलाल/व्यापारी ठरवतात, हे दुर्दैव)
----
@ वल्ली
नंद घराण्याचे राज्य मौर्य घराण्याने संपुष्टात आणले. मौर्य घराण्याचे राज्य शुंग घराण्याने संपवले. शुंगांचे राज्य काण्व घराण्याने संपवले. काण्वांचे राज्य सातवाहनांनी संपवले. मी तुमचा थोडासा क्रम दुरुस्त केला. माफ करा.
@ बॅटमॅन
मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट बृहद्रथ (अशोकाचा नातू) हा व्यसनी होता. तो राज्यकारभारापेक्षा विलासात मग्न होता. मुख्य म्हणजे त्याने बौद्ध तत्त्वांचा अतिरेक केला. सम्राट अशोकाने कलिंग संहारानंतर हिंसेचा वीट आल्याने शांतीचा प्रसार केला असला तरी तो अखेरपर्यंत चक्रवर्ती राहिला. म्हणजे त्याने चतुरंग सेना कधीच विसर्जित केलेली नव्हती आणि सैन्याच्या स्वतंत्र संस्कृतीला हात घातला नव्हता. ती चूक बृहद्रथाने केली. वैदिक धर्माभिमानी असलेल्या मगध सैन्याला तो शस्त्रत्याग करुन भिख्खु बनण्याचे आवाहन करु लागला. यावेळी मगधाच्या साम्राज्याचा घास घेण्यासाठी कलिंग सम्राट, ग्रीक क्षत्रप आणि दक्षिणापथातील प्रबळ मांडलिक टपून बसले होते. त्यामुळे पुष्यमित्राने बृहद्रथाचा वध केला. पुढे त्याच्याही शुंग घराण्याला तेच भोगावे लागले. शुंग घराण्याचा अखेरचा वारस देवभूती हा व्यसनी होता. त्याला मित्रदेवाकरवी मारुन त्याचा सेनापती वासुदेव सत्तेवर आला आणि शुंग घराण्याची सत्ता काण्व घराण्याकडे गेली. काण्व घराण्याची सत्ता सातवाहनांनी लढाईत विजय मिळवून संपवली. पण हे भारतीय इतिहासात सर्रास घडलेले दिसते. कारण पुढे चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी या घराण्यांची सत्ताही अशाच भाऊबंदक्या आणि खुनाखुनीच्या राजकारणातून लयाला गेली आहे.
काण्वांचे राज्य सातवाहनांनी संपवले.हा उल्लेख चुकीचा आहे. कण्व आणि सातवाहनांमध्ये लढाई झाल्याचे वा कण्वांचे राज्य सातवाहनांनी बळकवल्याचे कुठलेही पुरातत्वीय पुरावे नाहीत. नाशिक लेण्यांत शक, यवन, पल्हवांचा निर्दालन केल्याचा शिलालेख आहे पण यात कण्व कुठेच नाहीत. कण्वांचे राज्य उत्तरेत (मगध) होते. तर सातवाहन दक्षिणेत. कण्वांचे राज्य कलिंगाधिप खारवेलाने नष्ट केले असे मानले जाते(नक्की माहित नाही). खारवेलाचा हातीगुंफेतील शिलालेखात अधिक उल्लेख मिळायला हवा.
अप्रतिम! अतिशय माहितीपूर्ण!