✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दहशतवादावर प्रॅक्टिकल उपाय भारताकडे आहे का?

ऋ
ऋषिकेश यांनी
गुरुवार, 07/14/2011 - 14:34  ·  लेख
लेख
काल मुंबईवर आतांकवादी हल्ला झाला...नेहमीप्रमाणेच.. खरंतर हे दुर्दैव की 'नेहमीप्रमाणे' हा शब्द वापरावा लागावा! :( आधी बसलेला धक्का, मग दु:ख, मग उद्वेग आणि शेवटी चीड या क्रमाने माझ्या भावना बदलल्या. मग सुरू झाले ते प्रतिक्रीयांचे पूर. "नालायक सरकार" पासून ते "कसाब" आणि "षंढ समाजा"पासून ते "परकीय शत्रु" पर्यंत मी अनेकांना दुषणे दिली. आणि तुमच्या-माझ्यासारख्यांच्या या कोलाहलाचे रुपांतर "सरकार" या आपल्यातील एका संस्थेला टारगेट करण्यात झाले. सरकारचा यावेळी दोष आहे की नाहि हे तूर्त बाजूला ठेवले तरी हे नाकारता येणार नाही सरकार दहशतवादाशी दोन हात करण्यात अयशस्वी ठरलं आहे हे नक्की! पण फक्त सरकार अपयशी ठरलं आहे म्हणून आपण वेगळे राहु शकतो का? सरकार अपयशी ठरलंच मात्र अहेही तितकंच खरं आहे की सरकार आपल्यातूनच बनलंय. तेव्हा, गेल्या अनेक वर्षातील घडामोडी बघता हे स्पष्ट आहे की कोणतेही सरकार असो, आपण भारतीय समाज म्हणून दहशतवादाशी लढण्यात अपयशी ठरलो आहेत. (ज्यात सरकार आले, सरकारी संस्था आल्या व तुम्ही-आम्हीही आलोच) मात्र प्रश्न असा पडतो की या दहशतवादाशी लढायला आपल्याकडे काय योजना आहे? या दहशतवादाशी कसं लढावं? यासाठी काहि उपाय अनेकदा सुचवले जातात उपाय१: बहुतांश अतिरेकी शेजारील देशांतून येतात तेव्हा त्या देशांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा'. असं षंढासारखं जिण्यापेक्षा / अश्या भ्याड हल्ल्यात मेल्यापेक्षा युद्धात मेलेलं काय वाईट? किंवा अतिरेकी क्यांपांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' किंवा कसंही करून कोणती तरी 'अग्रेसीव' अ‍ॅक्शन घेऊन 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' (मात्र युद्ध करून हा प्रश्न सुटेल की चिघळेल याचे उत्तर चिघळेल असेच येते) उपाय२: चर्चा हाच प्रश्न सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. सरकारने विविध घटकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. (मात्र अतिरेकी चर्चेस तयार नाहीत, त्यांच्या मागण्या माहित नाहित, असल्याच तर त्या कोणतेही सार्वभौम राष्ट्र मान्य करु शकणार नाही मग चर्चा कसली करायची?) उपाय३: अंतर्गत बचाव (संरक्षण) फळी सक्षम करणे. गुप्तहेर, स्पेशन कमांडोज, प्रगत पोलिसिंग वगैरे वगैरे (काहि प्रमाण योग्य वाटते. मात्र किती व कसे याची उत्तरे नाहीत. शिवाय हा बचावात्मक पवित्रा असल्याने इतके करूनही हल्ला होण्याचा धोका आहेच. अनेकांना भारताने या मुद्द्यावर बचावात्मक होऊ नये असे वाटते) तेव्हा चर्चेसाठी प्रश्न असे आहेतः
  • वरीलपैकी एखादा उपाय तुम्हाला योग्य वाटतो का? नसल्यास तुमच्यामते काय उपाय आहे?
  • दहशतवादाला प्रभावीपणे संपवू शकेल असा प्रॅक्टिकल उपाय मुळात भारतीय समाजाकडे आहे का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29142 वाचन

💬 प्रतिसाद (100)

प्रतिक्रिया

टार्‍याच्या ह्या धाग्याची

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/14/2011 - 14:47 नवीन
टार्‍याच्या ह्या धाग्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

उपाय

शाहिर
गुरुवार, 07/14/2011 - 14:49 नवीन
उपाय१ खर्चिक ..अव्यव्हारी आहे ...पण सर्वात प्रभव शाली आहे ...पण दह्शत्वाद हा मनातुन नष्ट होनार नाही .. बाहेर च्या ना मारु ...घरातल्यन्चे काय ?? उपाय३ चान्गला आहे पण तु लिहिल्या प्रमाणे " किती व कसे याची उत्तरे नाहीत"
  • Log in or register to post comments

उपाय १ - तो केल्यावरही

नितिन थत्ते
गुरुवार, 07/14/2011 - 15:04 नवीन
उपाय १ - तो केल्यावरही दहशतवाद नाहीसा होईलच हे सांगता येत नाही. कारण दहशतवादाला आता फक्त भारत पाकिस्तान एवढाच पदर नाही. तसेही हा उपाय शक्य नाही/व्यवहार्य नाही असे माझे मत आहे. उपाय २ व ३ हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून वापरायला हवेत. उपाय २ मध्ये अतिरेकी चर्चेस तयार नाहीत, त्यांच्या मागण्या माहित नाहित, असल्याच तर त्या कोणतेही सार्वभौम राष्ट्र मान्य करु शकणार नाही मग चर्चा कसली करायची? हे तितकेसे बरोबर नाही. पंजाबच्या स्वातंत्र्याची मागणी मान्य करणे शक्य नव्हते पण चर्चेद्वारा ती मागणीच ड्रॉप करून घेण्यात (उपाय ३ च्या सहाय्याने) यापूर्वी यश मिळालेले आहे. त्याचप्रमाणे भारताला स्वातंत्र्य देण्याची जवळजवळ अशक्य मागणी ब्रिटिशांनी मान्य केली होती. दोन्ही बाजूच्या लवचिकतेवर ते अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments

आर तु सिरियस ??

अर्धवटराव
गुरुवार, 07/14/2011 - 21:56 नवीन
>>पंजाबच्या स्वातंत्र्याची मागणी मान्य करणे शक्य नव्हते पण चर्चेद्वारा ती मागणीच ड्रॉप करून घेण्यात (उपाय ३ च्या सहाय्याने) यापूर्वी यश मिळालेले आहे -- पंजाबचा दहशतवाद आणि चालु दहशतवाद यात फार फरक आहे ना? आता "कसे" म्हणुन विचारु नका (ते तुम्हाला माहित आहे असं मानुन चालतो) >>त्याचप्रमाणे भारताला स्वातंत्र्य देण्याची जवळजवळ अशक्य मागणी ब्रिटिशांनी मान्य केली होती -- नितीनरावांची आयडी हॅक झालि कि काय? कि मलाच कळत नाहिये तुम्ही काय म्हणताय ते... (संभ्रमीत) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

द्विरुक्ती !!

अर्धवटराव
Fri, 07/15/2011 - 01:09 नवीन
प्र. का. टा. आ. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सहमत

कच्ची कैरी
गुरुवार, 07/14/2011 - 15:05 नवीन
पूर्णपणे सहमत
  • Log in or register to post comments

भारत सध्या उपाय २ आणि ३

एक तारा
गुरुवार, 07/14/2011 - 15:21 नवीन
भारत सध्या उपाय २ आणि ३ दोन्ही ही वापरतोय. पण त्याचे फळ आपण पाहतोच आहे. उपाय १ वर म्हटल्याप्रमाणे जमणार नाही. म्हणजेच चौथाच उपाय शोधायला हवा.
  • Log in or register to post comments

आता काहीही उपाय नाही हे

श्रीरंग
गुरुवार, 07/14/2011 - 15:28 नवीन
आता काहीही उपाय नाही हे कटुसत्य आहे. वेळ निघून गेली आहे.
  • Log in or register to post comments

बहुतांश अतिरेकी शेजारील

विजुभाऊ
गुरुवार, 07/14/2011 - 15:31 नवीन
बहुतांश अतिरेकी शेजारील देशांतून येतात तेव्हा त्या देशांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा'. म्हणजे नक्की काय करावे. बहुतेकांची अपेक्षा असते की पकिस्तानचे सरकार र्नेस्त्नाबुत केले तर प्रश्न सुटेल. एक क्षण समजून चालू कि तेथील सरकार नेस्तनाबुत केलेले आहे आणि एक मंडलीक सरकार भारताने तेथे बसवलेले आहे किंवा पकिस्तान पूर्णपणे भारताचा भाग झालेला आहे. अशा अवस्थेत निव्वळ तो भूभाग भारताच्या ताब्यात येत नाही तर तेथील नागरीक देखील येतात. अवघ्या पाच किलोमिटर रुंदीच्या गाझा पट्टीचे उदाहरण समोर आहेच. ज्या नागरीकांची मानसीक जडघडण भारत भयावर झालेली आहे ते स्वस्थ बसतील असे नाही. मात्र असे युद्ध अमेरीका इराक युद्धाप्रमाणे असणार नाही. अमेरीकेला अजूनही अफगाणीस्थानवर पूरेसे वर्चस्व मिळवता आलेले नाहिय्ये.
  • Log in or register to post comments

मी काय म्हणतो

एक तारा
गुरुवार, 07/14/2011 - 15:55 नवीन
मी विघ्न संतोषी किंवा देशद्रोही आहे अश्यातला भाग नाही, पण युद्ध आपणच जिंकु याची guarantee देते का कोणी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

केले तर जिंकू आपणच याची

गवि
गुरुवार, 07/14/2011 - 16:01 नवीन
केले तर जिंकू आपणच याची गॅरंटी देतो. किंवा साधारणपणे कोणीही देईल. (जिंकले म्हणजे काय? युद्धात कोणीच जिंकत नसतो.. असे क्वोटेबल क्वोट्स आले तर नाईलाज.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक तारा

मुलाला आपण (पाहिजे तितकेसे

नितिन थत्ते
गुरुवार, 07/14/2011 - 16:07 नवीन
मुलाला आपण (पाहिजे तितकेसे हुशार नसल्याने) परीक्षेत नापास होऊ असे वाटत असते/माहिती असते. म्हणून तो परीक्षेला बसणे टाळतो. त्याचे पालक गावभर सांगतात. मुलगा हुशार आहे फक्त अभ्यास करायला नको. मुलगा हुशार नाही हे पालक कधी मान्य करत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आजच्या जमान्यात

एक तारा
गुरुवार, 07/14/2011 - 16:09 नवीन
जो पहिले अणु बाँब वापरेल तो जिंकेल असं समजलं तर वावगे नसावे. आणि त्याचा पुरेपुर वापर जर केल्या गेला तर असं होऊही शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

दहशतवाद मुळात ज्या देशांत मूळ

गवि
गुरुवार, 07/14/2011 - 15:40 नवीन
दहशतवाद मुळात ज्या देशांत मूळ धरुन आहे (म्हणजे जगभरात पसरलेले भूमिगत हस्तक नव्हेत.. मूळ रीतसर माहेरघरे..) असे देश कोणत्याही उपायाने बेचिराख (नुसते नष्ट नव्हे) होण्याने सर्वात मोठा इम्पॅक्ट होईल असं वाटतं. हा भीषण उपाय त्या त्या देशातल्या सामान्य निरपराधांचे प्राण घेणार हे नक्कीच..हे बेचिराख होणे आपल्या हातून होईल की आणखी एखाद्या जास्त प्रगत मोठ्या राष्ट्राकडून की मित्रराष्ट्रे वगैरे मॉडेलवर.. माहीत नाही. या बेचिराख झालेल्या जमिनीचे पुढे काय? माहीत नाही. अविचारी अविवेकी वाटला तरी उपाय जालीम आहे हे खरं. हे मॉडेल, आदर्श उत्तर नाही पण उद्देश साध्य होईल असं उत्तर आहे. चर्चेनेही प्रश्न सुटू शकतात. नाही असे मुळीच नाही. पण त्यात मुख्य रोडब्लॉक असे: १) शेकडो अतिरेकी संघटना ग्रॉसली एकसारखे पण इन्डिव्हिज्युअली वेगवेगळे उद्देश घेऊन लढतेय. त्यातही काही एकमेकांचे विरोधक असतीलच. तेव्हा अशावेळी चर्चा किती किती जणांशी करायची आणि मागण्या कोणाच्या मान्य करायच्या. पंजाबात किंवा ब्रिटिशांबाबत शत्रू म्हणा किंवा चर्चेतला प्रतिपक्ष म्हणा, एकमात्र होता म्हणून चर्चा संभवली. २) मागण्या मान्य करण्यात राष्ट्रप्रेम किंवा आणि काही नावाखाली हात आखडते घेऊन "चर्चा करु पण तुमचे काहीच मान्य करणार नाही" असा बाणा चर्चेला निष्फळ ठरवेल. खूप ड्रास्टिक अशी काहीतरी तडजोड करण्याची तयारी ठेवूनच ही भिंत तोडता येईल. नपेक्षा आग्रा..लाहोर.. चालत राहील. याने काय होईल न होईल ते माहीत नाही पण चर्चा आता नुसत्या स्वतःचे षंढत्व /नाकर्तेपणा अधोरेखित करत किंवा कुरवाळत बसण्यापेक्षा अन्य मार्गाकडे चालली आहे हे बघून बरे वाटले. धागाकर्त्याचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

बराचसा सहमत आहे. पहिल्या

नितिन थत्ते
गुरुवार, 07/14/2011 - 16:00 नवीन
बराचसा सहमत आहे. पहिल्या परिच्छेदात काही (युद्धोत्तर) प्रश्नांची उत्तरे माहीत नाही असे आपण म्हटले आहे. म्हणजे ती उत्तरे शोधावी लागतील असे तुम्हाला वाटते हे पाहून बरे वाटले. शेकडो अतिरेकी संघटना ग्रॉसली एकसारखे पण इन्डिव्हिज्युअली वेगवेगळे उद्देश घेऊन लढतेय. त्यातही काही एकमेकांचे विरोधक असतीलच. तेव्हा अशावेळी चर्चा किती किती जणांशी करायची आणि मागण्या कोणाच्या मान्य करायच्या. पंजाबात किंवा ब्रिटिशांबाबत शत्रू म्हणा किंवा चर्चेतला प्रतिपक्ष म्हणा, एकमात्र होता म्हणून चर्चा संभवली. पंजाबात आणि ब्रिटिशांबाबतही अनेक पक्ष होते किंवा तसे आहेत असे म्हणून तत्कालीन सरकारांना चर्चा टाळता आली असती. परंतु त्या सरकारांनी तसे केले नाही. काही गटांशी चर्चा करून आणि काही सवलती देऊन त्यातील एखादा गट यशस्वी होत आहे असा भास त्यातल्या लोकांसाठी निर्माण केला गेला. मग पुढच्या वाटाघाटीत तो विशिष्ट गटच लोकाचा पाठिंबा मिळवू लागतो आणि मग चर्चा एकाच गटाशी करावी लागते. ब्रिटिशांनीही असेच काँग्रेसला पुढे आणले. सुरुवातीला यश म्हणजे बंगालची फाळणी रद्द, मग काही सुधारणा, मग काँग्रेसच्या अजून मागण्या वगैरे..... वाटाघाटी करताना आडमुठेपणा नको हे पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

थोडे अधिक

ऋषिकेश
गुरुवार, 07/14/2011 - 16:23 नवीन
पंजाबात आणि ब्रिटिशांबाबतही अनेक पक्ष होते किंवा तसे आहेत असे म्हणून तत्कालीन सरकारांना चर्चा टाळता आली असती. परंतु त्या सरकारांनी तसे केले नाही. काही गटांशी चर्चा करून आणि काही सवलती देऊन त्यातील एखादा गट यशस्वी होत आहे असा भास त्यातल्या लोकांसाठी निर्माण केला गेला
एखाद्या पक्षाशी/विचाराशी चर्चा करणे किंवा न करणे हे पर्याय असु शकतात. मुळात दहशतवाद्यांची काहि मागणी आहे का केवळ दहशत निर्माण करून आपले महत्त्व वाढवणे इतकेच उद्दिष्ट आहे? गेल्या अनेक हल्ल्यांनंतर दहशतवाद्यांनी कोणतीही मागणी केल्याचे ऐकिवात नाही. प्रश्न असा आहे की कोणताही चेहरा, चर्चा करण्यास किमान तयार असलेले नेतृत्त्व / संस्था, ज्यावर चर्चा करायची तो विषय/विचार असे काहिच नसताना चर्चा कशावर आणि कोणाशी करावी? पाकिस्तानशी चर्चा करण्यात काहिच हशील नाहि कारण त्यांचा स्वतःच्या देशातील घटनांवर कंट्रोल राहिलेला नाहि तर तेथील 'सरकार'चा भारतातील घटनांवर कंट्रोल असेल असे वाटत नाही. बाकी उपाय तिसरा अमलांत आणायचा हा पर्याय योग्य कितपत आहे याबद्दल मी साशंक आहे. बचाव भक्कम करताना भारतीय नागरीकांनाही बर्‍याच नियमांना, प्रसंगी स्वात्संत्र्यावर घाला घालणार्‍या नियमांना सामोरे जावे लागेल. हे कितपत योग्य ठरेल? (उदा. फोन टॅपिंग, एमेल स्क्यानिंग वगैरेला मान्यता द्यावी असे वाटते का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आयला गवि, तुम्ही फारच

प्यारे१
गुरुवार, 07/14/2011 - 16:09 नवीन
आयला गवि, तुम्ही फारच वैयक्तिक घेताय का काय षंढत्वाला? अधोरेखित कोण करतंय? वस्तुस्थिती मांडणं म्हणजे कुरवाळणं? उगाच आहे ती जखम तशीच तात्पुरती मलमपट्टी लावून काम करणे याला मुंबई स्पिरीट म्हणतात का? नक्की काय झालंय ते कळाले की पुढची व्यवस्था नीट होऊ शकते. टु द पॉईंट होऊ शकते. असो. मला तरी अंतर्गत सुरक्षा वाढवणे हा म्हणजे पर्याय क्र. ३ योग्य वाटतो. आणि त्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत. सुरेश खोपडे यांनी राबवलेल्या मोहल्ला कमिटीचा मार्ग ही चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आयला गवि, तुम्ही फारच

गवि
गुरुवार, 07/14/2011 - 16:21 नवीन
आयला गवि, तुम्ही फारच वैयक्तिक घेताय का काय षंढत्वाला? अधोरेखित कोण करतंय? वस्तुस्थिती मांडणं म्हणजे कुरवाळणं? बिलकूलच नाही. पण तीन चार लेख आणि असंख्य प्रतिसाद त्या षंढत्वाभोवतीच फिरत होते म्हणून तो शब्द उचलला. बाकीही शब्द वापरले गेलेत आणि तेही अनेकांकडून.. मूळ रोख हा नागरिकालाच नाकर्ता / न्यूट्रल / बेजबाबदार किंवा आणि काही म्हणा..ठरवण्याकडे दिसला. (तुमचे लिखाण नव्हे. आंजावर अनेक ब्लॉग्जवर असे चालू आहे) उगाच आहे ती जखम तशीच तात्पुरती मलमपट्टी लावून काम करणे याला मुंबई स्पिरीट म्हणतात का? नक्की काय झालंय ते कळाले की पुढची व्यवस्था नीट होऊ शकते. टु द पॉईंट होऊ शकते. हे तर अगदीच मान्य होण्यासारखे आहे आणि याच्या विरोधी मी काहीच म्हटलेलं दिसत नाही. मुळात चर्चा पुढे नेण्यासाठी मी मुद्दे मांडतोय. काही कोणाचंच व्यक्तिगत मत वगैरे खोडून काढण्याचा संबंधच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

एक सिंबॉलीक

एक तारा
गुरुवार, 07/14/2011 - 16:01 नवीन
एक सिंबॉलीक धाक म्हणून आपण कारगिल च्याच सीमेवरुन पी ओ के मधे आक्रमण करुन आपलाच भुभाग परत मिळवु शकतो.
  • Log in or register to post comments

पिसाळलेला कुत्रा मारण्या शिवाय पर्याय नसतो

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/14/2011 - 16:13 नवीन
त्यांनी तुमचा एक मारला तर तुम्ही त्यांचे दहा मारा. दहशत हेच दहशतवादाला उत्तर असु शकते. पिसाळलेला कुत्रा आपण मारुनच टाकतो. त्याच्या बरोबर चर्चा करत नाही किंवा तो चावु नये म्हणुन पायाला पॅड लावुन फिरत नाही. सध्या आपला देश चवथा उपाय करतो आहे. ते म्हणजे कुत्रा चावायची वाट पहायची आणि कुत्र्याचा तिव्र शब्दात निशेध करायचा. आपली एकजुट नाही याचा दहशतवादी फायदा घेत आहेत. "सरफरोश" मधे एक छान वाक्य आहे. "त्यांना आपल्या विरुध्द लढण्या साठी माणसे नाही तर फक्त शस्त्र पाठवावी लागतात" जोपर्यंत आपण एकजुट होउन जोरदार प्रत्युत्तर देत नाही तोपर्यंत हे असेच चालणार. सुवर्णमंदीर ऑपरेशन केल्यावर पंजाब दहशतवाद थंडावला हे आपण सोईस्कर विसरलो आहोत. अमेरीकेने काय केले? तो चिमुरडा इस्त्राईल काय करतो? तेच आपणही करायला पाहीजे. परीणामांची चिंता नंतर आधि कॄती पाहीजे.
  • Log in or register to post comments

-१

ऋषिकेश
गुरुवार, 07/14/2011 - 16:27 नवीन
पिसाळलेला कुत्रा आपण मारुनच टाकतो. त्याच्या बरोबर चर्चा करत नाही किंवा तो चावु नये म्हणुन पायाला पॅड लावुन फिरत नाही
अहो पण पिसाळलेल्या कुत्र्याला मारल्यावर त्याचे निमित्त करून किंवा त्याला बघुन इतर कुत्रे पिसाळत नाहित.. दहशतवादी त्याचे निमित्त करून किंवा त्याचा वापर करून अनेक दहशतवादी उभे करतात. मला तरी उपाय१ अयोग्य वाटतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

>>अहो पण पिसाळलेल्या

नन्दादीप
गुरुवार, 07/14/2011 - 17:20 नवीन
>>अहो पण पिसाळलेल्या कुत्र्याला मारल्यावर त्याचे निमित्त करून किंवा त्याला बघुन इतर कुत्रे पिसाळत नाहित.. दहशतवादी त्याचे निमित्त करून किंवा त्याचा वापर करून अनेक दहशतवादी उभे करतात.>> आपल्याकडे फक्त एकच माणूस नाहिये....ही सर्व मारामारी करायला... दुसरा कुत्रा पिसाळला तर त्याला पण मारायच... आणि तसेही आपण २ नंबर वर आहोत लोकबळाच्या बाबतीत. होवून जाऊंदेत एक्दाच काय ते..... बाकी . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

उपाय १, हा सर्वात घातक

गणेशा
गुरुवार, 07/14/2011 - 16:29 नवीन
उपाय १, हा सर्वात घातक आहे. ---- > ज्या देशातुन अतिरेकी येतात त्या देशावर हल्ला करुन जर अतिरेकी पकडण्यास यश आले तरच ह्या उपयाची सफलता आहे, नाहितर फक्त आक्रमण करायचे.. आणि अतिरेकी तेथुन मिळालेच नाहि तर मग काय तेथील सामान्य जनतेला जाळायचे ? आणि यातुन काय मिळणार ? पुन्हा वाचलेले आनखिन नविन आतंकवादी बनणार आणि पुन्हा तेच सुरु राहणार... दहशवादा ला उत्तर दहशदवाद हे वरील उत्तर अतिशय चुकीचे वाटते. आणि आता आपण वापरत असलेलो दहशतवादाला उत्तर आशावाद हे ही चुकीचेच आहे. उपाय ३ हाच आपल्या हातात आहे आणि तो योग्य आहे .. दहशवाद पुर्णपणे रोखण्यात कोणालाही यश कधीच येणार नाहि .. तो कमी करणेच आपल्या हातात आहे. उदाहरणे, दाखले देणे सोपे असते .. मार्ग तयार करुन त्यावर चालणे अवघड असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments

रक्ताच्या काही ठराविक

गवि
गुरुवार, 07/14/2011 - 16:39 नवीन
रक्ताच्या काही ठराविक प्रकारच्या कर्करोगांत "पोटेन्शियल क्युअर" आणि "रिमिशन" असे प्रकार अचिव्ह करण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. केमोथेरपी करुन कॅन्सरग्रस्त पेशी मारायच्या आणि त्यासोबत काही नॉर्मल पेशींचेही बलिदान द्यायचे आणि अशा मार्गाने आजार "कंट्रोल"मधे ठेवायचा..पुन्हा पेशी वाढल्या की पुन्हा केमो.. परिस्थिती मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न.. क्युअर नव्हे.. बोन मॅरो मधे नव्या कॅन्सरपेशींचा कारखाना चालूच... तुम्ही म्हणताय तो असा उपचार झाला. जिथे शक्य आहे तिथे "बोन मॅरो ट्रान्स्प्लांट" अशा उपचाराने दोषग्रस्त पेशींचे मूळ मारण्यासाठी संपूर्ण बोन मॅरो जालीम द्रव्याने मारुन टाकायची आणि तिथे नवीन हेल्दी मॅरो रोपित करुन तिची वाढ होऊ द्यायची. या दुसर्‍या मार्गात सर्वच पेशी बेचिराख होतात पण "क्युअर" किंवा "बरे होणे" या दृष्टीने केलेला हा उपाय असतो. दोन्ही उपचारच आहेत.. आपली ट्रीटमेंट काय हे ठरवताना सगळ्याचाच कॉस्ट बेनिफिट रेशो बघावा लागतो. मुळात म्हणजे ट्रीट्मेंटचे ध्येय ठरवावे लागते. "क्युअर" की "कंट्रोल(ऊर्फ पुल ऑन टिल डेथ..)"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

उदाहरण चांगले आहे, पण संपुर्ण

गणेशा
गुरुवार, 07/14/2011 - 17:02 नवीन
उदाहरण चांगले आहे, पण संपुर्ण पेशिंचा नायनाट करुन ही तोच माणुस जिवंत असतो फक्त नव्या पेशी तेथे असतात. दहशवाद हा रोग अविचारांवर वाढलेला आहे.. आणि विचार/अविचार पुर्णपणे नष्ट करणे आजपर्यंत माणसाला जमलेले नाहि. जर तुम्ही नविन पेशी ट्रांस्प्लांट करत आहात, तर उलट तुमच्या मतेच दहशवादी लोकांचे अविचार बदलुन तेथे सुविचार रुझवले पाहिजे पर्यायी आशावादी मार्ग आहे असे वाटते. (नोट : हा रिप्लाय फक्त आपल्या रिप्ल्याय ला आहे, संपुर्ण थ्रेड ला नाही, आणि कृपया आपल्या मुळ मुद्द्याला उत्तर देणे माझा उद्देश नाहिये.. मला येव्हडेच सांगायचे आहे उदाहरणे अनेक देता येतात.. मार्ग तयार करुन त्यावर चालणे वेगळे.. उदाहरणांना अनेक बाजु असतात.. त्यातील एक शक्यता मी मांडली.. हा तुम्ही जर कॅन्सर झालेल्या व्यक्तीला आणि त्याबरोबर त्याच्या आजुबाजुच्या व्यक्तीला मारणार असला तर तुम्हाला आवडेल का? कदाचीत कॅन्सर न झालेली आणि वाचलेली एखादी व्यक्तीच तुमचा हा नायनाट करण्याच्या उद्देशाने पेटेल ना असे वाटते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अ‍ॅनॉलॉजी समजून घ्यावी.

गवि
गुरुवार, 07/14/2011 - 17:20 नवीन
पण संपुर्ण पेशिंचा नायनाट करुन ही तोच माणुस जिवंत असतो फक्त नव्या पेशी तेथे असतात. संपूर्ण बोन मॅरो मारुन परत रोपित करण्याच्या प्रक्रियेत तो मनुष्य मेल्यातच जमा असतो. जगण्याचे चान्सेस मरणापेक्षा कमी असतात. म्हणून ही सर्व कल्पना देऊनच हा मार्ग निवडला जातो. दहशवाद हा रोग अविचारांवर वाढलेला आहे.. म्हणूनच कर्करोग, अतएव वेड्या / अविचारी पेशींचे उदाहरण घेतले. हा तुम्ही जर कॅन्सर झालेल्या व्यक्तीला आणि त्याबरोबर त्याच्या आजुबाजुच्या व्यक्तीला मारणार असला तर तुम्हाला आवडेल का? उदाहरणाची अ‍ॅनॉलॉजी कृपया समजून घ्या. पेशींना माणसाचे रुपक म्हणून वापरले आहे. पेशी मारणे = माणसे मारणे. कॅन्सरग्रस्त पेशीसोबरच आजूबाजूची नॉर्मल (चांगली/निरपराध/अविकृत्/विवेकी) पेशीही मारणे अशी समांतर उदाहरणे घेतली आहेत. त्यामुळे माणूस /माणसे मारुन टाकणे हा मुद्दा मधे आणणे उदाहरणाला धरुन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

तुमचा मुद्दा मला कळलेला आहे

गणेशा
गुरुवार, 07/14/2011 - 18:26 नवीन
तुमचा मुद्दा मला कळलेला आहे गवि. आणि त्यामागिल भावनेला/विचारांना मी उत्तर देत नाहिये. मला येव्ह्यडेच म्हणायचे आहे की असा मार्ग प्रॅक्टीकल नाहिये. तो अमलात आणताना सर्व अतिरेकी/माणसे कसे मारले जातील.. आणि असा उपाय आपल्याकडे असु शकत असेन .. तर अतिरेक्यांना पण हाच उपाय आपल्यावर पण वापरता येइलच.. आणि आपण दहशतवादाचा सामना अश्या पद्धतीने करत असु तर आपण दहशवाद्/दहशतवादी कमी न करत वाढवू असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आयडीयाची कल्पना

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/14/2011 - 16:52 नवीन
मी काय म्हणतो की जुन्याकाळी कसे एखादा राक्षस गावाच्या जंगलाच्या हद्दित असला की त्याला आठवडा / चार दिवसाला एक माणूस, गाडाभर अन्न वैग्रे गावकरी पाठवुन देत असत. तसे पाकिस्तानी भयभित जनतेला आणि सरकारला शांत करण्यासाठी आपण प्रत्येक गावातुन / शहरातुन त्यातील प्रत्येक घरातुन एक ५०,००० रुपये आणि ४ माणसे अशी बॉर्डरवरती पाठव जाउ. घरात ४ माणसे नसली तर शेजारच्या घरातुन उरलेली उचलायची. किती फायदे आहेत बघा :- १) दर आठवडा चार दिवसाला हिंदुस्थानी कुत्ते की मौत मरत आहेत हे बघुन भयभीत पाकिस्तानी जनता खूष. २) जनता खूष म्हणून पाकिस्तानी सरकार खूष. ३) हिचा आयडीया आपण चिन बरोबर वापरली की चिन खूष. ४) पाकिस्तान चिन खूष म्हणजे देशात शांतता आणि देशातले लोक खूष. ५) देशातले लोक खूष म्हणजे आपल्या सिमा भगातील लोक खूष. ६) सिमा भागातील लोक खूष म्हणजे तिथे ड्यूटीवर असलेले कर्मचारी खूष. ७) तिथे असलेले कर्मचारी खूष म्हणजे निलकांत खूष. ८) निलकांत खूष म्हणजे मिपाचा सर्वर खूष. ९) मिपाचा सर्वर खूष म्हणहे मिपाकर खूष. लास्ट बट नॉट द लिस्ट १०) ह्यासर्वामुळे जनता सरकारवर खूष आणि जनता सरकारवर खूष म्हणून थत्ते चाचा खूष.
  • Log in or register to post comments

आमच्या वतीने पर्‍यालाच पाठवा.

Nile
गुरुवार, 07/14/2011 - 17:05 नवीन
आमच्या वतीने पर्‍यालाच पाठवा. पैसे दुबैवरून मागवू. पर्‍या गेला म्हणजे मिपाकर खूष, मिपाकर खूष म्हणजे... ...म्हणजे ....म्हणजे ...म्हणजे ..म्हणजे ...म्हणजे देशात शांतता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१००००००००००००००००

sagarparadkar
गुरुवार, 07/14/2011 - 17:18 नवीन
सर्वात उत्तम प्रतिसाद, एकदम पटले, पूर्णपणे सहमत .... किंवा थत्ते चाचांनाच पंतप्रधान करून टाकू .... म्हणजे मग आपल्या देशासमोरचे सर्वच प्रश्न सुटतील ( देश शिल्लक राहिला तर) .... :) साहेब विचारतात कि पकिस्तानशी क्रिकेट सामना खेळ्वू शकाल का? आम्ही पामरं विचारतो कि आपण हा पाक्-पुरस्कृत दहशतवाद थांबवू शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मला

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 07/14/2011 - 17:35 नवीन
मला तर कित्येकदा असा प्रश्न पडतो की आपले राज्यकर्ते मिपा नियमीतपणे वाचत कां नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

उपरोधाशी सहमत....

मन१
गुरुवार, 07/14/2011 - 18:30 नवीन
मनातलं लिहिलस......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

@ ॠशिकेश , गणेशा,

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/14/2011 - 17:11 नवीन
@ ॠशिकेश , गणेशा, अमेरिकेवर एकच दहशतवादी हल्ला झाला. पण त्याचे उत्तर त्यांनी कसे दीले. अफगाणीस्तान मधे अजुन किती लादेन तयार होतील याची त्यांनी पर्वा केली का? त्यांच्यावर दुसरा हल्ला झाला का? आणि आपल्यावर मागच्या दहा वर्षात किमान २० हल्ले झाले असावे. असे का होते? कारण आपण काहीही करु शकत नाही हे त्यांना पक्के ठाउक आहे. यापध्द्तीने आपल्यावरचे हल्ले दहशतवाद्यांनीच कंटाळुन थांबवले तर थांबतील उपाय ३ ने नव्हे. एवढा मोठा आपला देश. कोट्यावधी लोक रहातात ईथे. हजारो किलोमीटरची सीमा आणि विशाल सागर कुठे कुठे आणि कीती पुरे पडणार आहोत आपण. आणि हल्ला होईल म्हणुन २४ तास ३६५ दिवस सर्तक रहायचे या साठी येणार्‍या खर्चाचा नागरीकांना होणार्‍या त्रासाचा कधी विचार केला आहे? आपल्याच खिशातुन जातील हे पैसे आणि वर आपल्यालाच ताप होईल. स्वतःच्या देशात आपल्याच लोकांकडे सतत संशयाने पहाणे कितपत योग्य आहे? बंदुक स्वस्त असते. बुलेटप्रुफ जॅकेट बंदुकी पेक्षा कीती तरी महाग असते. समोरच्याला जेव्हा तुमच्या कडे बंदुक आहे आणि तुम्ही ती चालवु शकता याची जाणिव असते तेव्हाच तो तुम्हाला वचकुन असतो. डास चावायला लागला की आपण त्याला फटका मारतोच ना. दुसरा आला की त्यालाही मारतो.की सतत मच्छरदाणीत बसुन रहातो? "भित्या पाठी ब्रम्हराक्षस" हे नेहमीच लक्षात असावे.
  • Log in or register to post comments

एवढा मोठा आपला देश. कोट्यावधी

गवि
गुरुवार, 07/14/2011 - 17:21 नवीन
एवढा मोठा आपला देश. कोट्यावधी लोक रहातात ईथे. हजारो किलोमीटरची सीमा आणि विशाल सागर कुठे कुठे आणि कीती पुरे पडणार आहोत आपण. आणि हल्ला होईल म्हणुन २४ तास ३६५ दिवस सर्तक रहायचे या साठी येणार्‍या खर्चाचा नागरीकांना होणार्‍या त्रासाचा कधी विचार केला आहे? आपल्याच खिशातुन जातील हे पैसे आणि वर आपल्यालाच ताप होईल. स्वतःच्या देशात आपल्याच लोकांकडे सतत संशयाने पहाणे कितपत योग्य आहे? बैलाचा डोळा. अर्थात बुल्ज आय.. परफेक्ट...!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

+१००००००००००००० भाऊ.

नन्दादीप
गुरुवार, 07/14/2011 - 17:23 नवीन
+१००००००००००००० भाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ज्ञा. पै.शी पुर्ण सहमत

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/14/2011 - 17:49 नवीन
+ १००००००००००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

डास चावायला लागला की ...

sagarparadkar
गुरुवार, 07/14/2011 - 17:20 नवीन
>> डास चावायला लागला की आपण त्याला फटका मारतोच ना. दुसरा आला की त्यालाही मारतो.की सतत मच्छरदाणीत बसुन रहातो? आम्ही एका गालावर डास चावला कि दुसरा गाल पुढे करतो ....
  • Log in or register to post comments

शिवाजी महराजांचे वंशज म्हणवतो

हरिप्रिया_
गुरुवार, 07/14/2011 - 17:50 नवीन
शिवाजी महराजांचे वंशज म्हणवतो आपण, गनिमी काव्याचा वापर करता नाही का येणार ह्या दहशतवादाला ठेचून काढायला? मला कितपत प्रक्टिकली शक्य आहे माहित नाही, पण खरच थेट युद्ध न पुकारता, छुपे हल्ले करून आपण त्यांना नेस्तनाबूत नाही का करू शकत? अमेरिके सारख्या राष्ट्रांशी थेट शत्रुत्व नको आणि आपल्या देशावर सतत टांगती तलवार नको... पण आता सतत शांतपणे सहन करणे नको,एवढं मात्र खर...
  • Log in or register to post comments

दोष

तिमा
गुरुवार, 07/14/2011 - 18:14 नवीन
काही झाले की भावनेच्या आहारी जाऊन दुसर्‍यांना दोष देण्यापेक्षा आधी स्वतः सुधारा. ज्या देशातल्या लोकांना कुठल्याही प्रकारची शिस्त पाळायची नसेल त्यांनी अवास्तव अपेक्षा ठेवूच नयेत.
  • Log in or register to post comments

उपाय आहे!

चतुरंग
गुरुवार, 07/14/2011 - 18:32 नवीन
१ - अफजल गुरु, कसाब आणि इतर कोणी असतील त्यांना तातडीने फाशी - मुंबई बाँबस्फोटाला आठवडा व्हायच्या आत हे झाले पाहिजे! ह्याने जी शॉक ट्रीटमेंट होणार आहे त्याचे मूल्य फार मोठे आहे, असा अनपेक्षित धक्का हा अतिरेक्यांची मानसिक शक्ती खच्ची करतो. २ - दहशतवाद्यांबरोबर वाटाघाटी नाहीत - नो निगोशिएशन्स! अतिरेकी सापडले की लवकरात लवकर त्यांचा निकाल लावणे हे महत्त्वाचे. वर्षानुवषे खटले चालवण्याने सामान्य माणसाचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. ३ - पाकिस्तान बरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध कमी करणे - आपण संबंध सुधारायचे जसे प्रयत्न करतो तसेच वेळ पडताच ते ताणूही शकतो हे समजायला हवे. सतत आपणच गळ्यात गळे घालायचे आणि गळे कापून घ्यायचे याला अर्थ नाही. ४ - अंतर्गत बचाव - हा तर सक्षम करायलाच हवा. पोलीस यंत्रणांनी आता महाविद्यालयीन तरुणांना महाविद्यालयात जाऊन अतिरेकी कसे काम करतात, समाजात वावरताना काय काळजी घ्या, संशयास्पद हालचाली कशा टिपा, असे काही आढळल्यास तातडीने काय करा, कुठे संपर्क साधा ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली पाहिजे. शेवटी पोलीस सगळीकडे पुरे पडू शकत नाहीत. सामाजिक जबाबदारी हा भाग अपरिहार्य आहे आणि येणार्‍या पिढ्यांना किंचित जरी शांत आयुष्य हवे असले तर ह्याला पर्याय नाही. असेच प्रशिक्षण जास्तितजास्त खाजगी आणि सरकारी कर्मचार्‍यांना देणे अत्यावश्यक आहे. आपण सगळेच पोलीस आणि सैन्य यांच्यावर अवलंबून राहून आपले कर्तव्य विसरतो हे आता चालणार नाही. ५ - इयत्ता ९, १०, ११ आणि १२ अशी चार वर्षे लष्करी प्रशिक्षण (उदा, एन्सिसी) सक्तीचे करणे. शिस्त, समन्वय, आज्ञापालन, टीमवर्क, धाडस, प्रसंगावधान अशा गुणांची जोपासना व्हायला हे नक्कीच मदत करते. यातले ४ आणि ५ हे दूरगामी उपाय आहेत परंतु अतिशय आवश्यक आहेत. ----------------------------- पाकिस्तानबरोबर युद्ध हे आता तितकेसे प्रॅक्टिकल राहिलेले नाही. यात केवळ भारत वि पाकिस्तान असे गणित नसून इतरही अनेक देशांचे संबंध येतात. शिवाय पाकिस्तानी सामान्य नागरिक हा अजूनही भारताशी जोडलेला आहे तसेच सीमाभागातला सामान्य भारतीय नागरिकही पाकिस्तानशी जोडलेला आहे हे सत्य नाकारुन चालणार नाही. मूठभर अतिरेक्यांपायी हजारो निरपराधांची राखरांगोळी हा उपाय होऊ शकत नाही!
  • Log in or register to post comments

क्र. ४ ची उपाययोजना आधीच अंमलात आण्ल्या गेली आहे.

मस्त कलंदर
गुरुवार, 07/14/2011 - 19:34 नवीन
मुंबई पोलिस गेल्या ३-४ वर्षांपासून 'अ‍ॅलर्ट मुंबईकर अभियान' राबवत आहेत. मी स्वतः या कार्यक्रमास २००७ व २०१० साली उपस्थित होते. या अभियानांतर्गत पोलिस (बहुधा एक सबइन्स्पेक्टर, आणि चार जणांची टीम) हिंदी, मराठी आणि इंग्रजी या सगळ्या भाषांमधून सामान्य मुंबईकरही थोडीशी 'जाण' वापरून कसा गुन्हेगारी/दहशतवादाशी सामना करू शकतो हे सांगतात. सुरूवातच 'अ‍ॅलर्ट' आणि 'अवेअर' हा फरक सांगून केली जाते. (प्रश्नः असा कोणता खेळ आहे जो जिंकण्यासाठी आपणांस मागे सरकावे लागते? उत्तर प्रतिसादाच्या शेवटी दिले आहे.) छान विनोदांची पखरण करत आणि ओघवत्या शैलीत एका भाषेतून दुसर्‍या भाषेत जात, मुंबईच्या बहुभाषिक लोकांना समजेल आणि त्याचबरोबर माहिती रटाळही होणार नाही याची काळजी घेत हे अभियान चालवले जाते. सिनेमातले प्रसंग पाहून त्यात नक्की काय चुकीचे असते, आणि त्या गोष्टी केल्याने काय होऊ शकते हे ही सांगितले जाते. 'हिरो' बनायला जाऊ नका, फक्त डोकं जाग्यावर असलेला माणूस म्हणून वागल्यानंतर किती धोके टाळले जाऊ शकतात हे त्यांच्या तोंडून खरंच ऐकावं. उदा., गैरसमजः बाँब उचलून दूर मैदानात्/पाण्यात फेकणे (वस्तुस्थिती: तो फेकण्याआधीच फुटला तर?), गैरसमजःमी बाँब घेऊन पळून जातो, एकटाच मरेन पण बाकीचे लोक वाचतील (वस्तुस्थिती: ९३ मधल्या बॉंबमधील वस्तू फुटल्यानंतर ती मधल्या वस्तूंचा वेग साधारण ८००किमी/सेकंद-ही त्यांनीच सांगितलेली माहिती- असतो, त्यामुळे असं करण्यानं काही फायदा नाही; बाँबविरोधी पथकालाच बोलावणं ही हुशारी आहे) आणि असं बरंच काही. फक्त दहशतवादच नाही, तर घरगुती चोर्‍या, साखळ्या लांबवणं यांसारख्या गुन्ह्यात आपण स्वतःच कसे बेजाबदार वागून गुन्हेगारीला आमंत्रण देतो यांची अगदी सहज पटतील अशी रोजच्या जीवनातली उदाहरणे दिली गेली होती. हे अभियान मुख्यतः शाळा, कॉलेजेस आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन चालवले जाते. म्हणजेच, सामान्य नागरिकांपर्यंत ही माहिती पोचवली जातेय. काहीतरी कुठेतरी कमी पडते आहे, पण काहीच केले जात नाही असं नाही. या पोलिस पथकाचं मला विशेष कौतुक करावंसं वाटतं. मी पाहिलेल्या दोन्ही प्रयोगांत इन्स्पे. मसूरकर सूत्रधार होते. त्यांनी संभाषणादरम्यान ते फक्त बीकॉम आहेत आणि तुम्हा इंजिनिअर्स इतकं मला चांगलं इंग्रजी येत नाही असं म्हटलं खरं, पण त्यांची सगळ्याच भाषांवरची पकड, आणि एकूण तयारी खूपच चांगली होती. उगीच सरकारीपणा औषधालाही नव्हता आणि प्रेक्षकांवर अगदी उत्तम प्रभाव पडला होता. प्रश्नाचे उत्तरः रस्सीखेच. उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण प्रश्न ऐकल्यानंतर पटकन आठवत नाही. तात्पर्यः उत्तराबद्दल आपण सगळेच अवेअर असतो, पण अ‍ॅलर्ट असणं त्याहून जास्त महत्वाचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

माहितीबद्दल धन्यवाद मक!

चतुरंग
गुरुवार, 07/14/2011 - 20:10 नवीन
हे अभियान चालवले जाते आहे याची माहिती अधिक लोकांपर्यंत कशी पोचवता येईल? मक, इन्स्पेक्टर मसूरकरांची मुलाखत घेऊन मिसळपाववर चढवता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

दुर्दैवाने गुगलबाबाकडे या अभियानाची काहीच माहिती नाहीय.

मस्त कलंदर
Fri, 07/15/2011 - 10:17 नवीन
सगळेकडे जेव्हा अभियान चालू झाले तेव्हा गफूर काय म्हणाले आणि शाहिद कपूर आला होता याच बातम्या आहेत. मी त्यांचा कार्यक्रम दोन्ही वेळेस -एकदा शिकवते तिथे व दुसर्‍यांदा शिकत होते तिथे-कॉलेजमध्येच पाहिला. त्यांनी त्या वेळेस दिलेल्या माहितीनुसार ते स्वयंस्फूर्तपणे शाळाकॉलेजात आणि गृहसंकुलात जातात. त्यावेळेस त्यांनी काही फोन क्रमांकही दिले होते ज्याद्वारे गुन्ह्याची खबर देता येते, स्वतः निनावी राहूनही माहिती देता येते वगैरे. माझ्याकडे असलेली अर्धवट माहिती आठवून देण्यापेक्षा एक नागरिक (फक्त मुंबईकर म्हणून नाही, आठवा चक दे इंडिया) म्हणून या उपक्रमाची संपूर्ण माहिती मिळवून एक सविस्तर माहिती इथे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर मराठी व इंग्रजी विकिपिडियावरही त्यासंबंधी पाने तयार करून ती माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून देता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ग्रेट, मक!

चतुरंग
Fri, 07/15/2011 - 19:14 नवीन
असा सक्षम सहभाग घेतल्याबद्दल आभारी आहे. माहितीच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

माहितीबद्दल धन्यवाद.

नितिन थत्ते
गुरुवार, 07/14/2011 - 20:21 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

छान माहिती

प्रदीप
गुरुवार, 07/14/2011 - 21:02 नवीन
अशा प्रकारची व्याख्याने बर्‍याच मोठ्या प्रमाणावर होणे जरूरीचे आहे. त्याला योग्य तो प्रतिसाद जनतेकडून लाभणे हेही तितकेच महत्वाचे. तसे होण्यासाठी अशा उपक्रमांची भरपूर व योग्य तर्‍हेने जाहिरात झाली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

होत असेलही

पंगा
गुरुवार, 07/14/2011 - 21:22 नवीन
अशा प्रकारची व्याख्याने बर्‍याच मोठ्या प्रमाणावर होणे जरूरीचे आहे. त्याला योग्य तो प्रतिसाद जनतेकडून लाभणे हेही तितकेच महत्वाचे.
कोणास ठाऊक, कदाचित होत असतीलही. किंवा आणखीही बरेच तर्‍हेतर्‍हेचे प्रयत्न शांतपणे, गाजावाजा न करता सतत चालत असणेही शक्य आहे. होते काय, की असे काही घडले, की उच्चरवात 'षंढ! षंढ!!!' करून सार्वजनिक ठिकाणी ओरडण्याची अहमहमिका लागते. त्या कोलाहलात बाकीचे काही ऐकू येत नाही. आणि बाकी सगळे विसरले जाते. (काही उपाययोजना व्हायची असेल, किंवा करता यावी म्हणून किमान काही साधा सकारात्मक विचार जरी करायचा असेल, तर सर्वप्रथम हे बोंबलणे बंद झाले पाहिजे. बोंबलणार्‍यांना 'आपण षंढ आहोत' असे वाटत असेल तर तसे खुशाल वाटो बापडे, नव्हे भाडखाऊ लोकशाहीत तसा तो त्यांचा अधिकारही आहे, पण इतरांनाही आणि देशालाही षंढ ठरवण्याने काहीही विधायक असे साध्य होत नाही. उलट, 'झाला अतिरेकी हल्ला की उठले सगळे भारतीय आणि स्वतःलाच आणि स्वतःच्याच देशाला षंढ म्हणून घेऊ लागले' असे जर होऊ लागले, तर अतिरेक्यांचा त्याहून मोठा विजय नसावा. आपणच आपलेच डीमॉरलायज़ेशन करू लागलो, तर अतिरेक्यांची गरजच काय आहे - फक्त क्याटालिष्ट म्हणून?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

+१०००००

गवि
Fri, 07/15/2011 - 10:18 नवीन
शेवटच्या परिच्छेदाशी प्रचंड सहमत. "षंढ" या शब्दाच्या पोस्ट्ब्लास्ट सढळ वापराविषयी (प्राजुताईच्या एका कवितेत किंवा पोस्टमधेच नव्हे तर ब्लॉगविश्वात खूप ठिकाणी) अस्वस्थ होऊन हेच दोन दिवस सगळ्या प्रतिसादांतून सांगण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद अर्थात सर्वांना (राज्यकर्ते आणि नागरिक) षंढ म्हणणे ही तात्कालिक निराशेतून आलेली तातडीची प्रतिक्रिया असू शकते. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

लेख वाच्ल्यावर डोळ्यांसमोर

स्वप्निल..
Fri, 07/15/2011 - 04:10 नवीन
लेख वाच्ल्यावर डोळ्यांसमोर वरील १, २, ३ आलेत. सगळ्यात पहिले हे जर झाले तर मग बाकिचा विचार करता येइल. स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

५?

प्रियाली
Fri, 07/15/2011 - 06:45 नवीन
५ - इयत्ता ९, १०, ११ आणि १२ अशी चार वर्षे लष्करी प्रशिक्षण (उदा, एन्सिसी) सक्तीचे करणे. शिस्त, समन्वय, आज्ञापालन, टीमवर्क, धाडस, प्रसंगावधान अशा गुणांची जोपासना व्हायला हे नक्कीच मदत करते.
हा उपाय वर वर चांगला वाटत असला तरी भयंकर अतिरेकी आहे. या उपायाने भारताचा इस्राएल व्हायला वेळ लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा