आईस पत्र
शुचिचे मुलीस पत्र पाहून मलाही पत्रलेखनाची सुरसुरी आली. पंतप्रधान आणि/किंवा जगप्रमुख (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष) यांना पत्र लिहीण्याएवढा मला वेळ नाही. मग ("माझ्या" काल्पनिक) आईलाच पत्र लिहून टाकलं.
हाय आई,
आता मोठी समजशील, नंतर मोठी समजशील आणि मग तरी तुझे उपदेशाचे डोस थांबतील असं वाटलं होतं. माझा अजूनही विश्वास बसत नाही की आता मी नोकरीनिमित्ताने दुसर्या ठिकाणी येऊन रहाते आहे तरीही तू मला अजून बाळच समजते आहेस. अशा वेळी तरी तुला तुझं तरूण वय आठवेल असं वाटलं होतं. कालपर्यंत तू मला डोस पाजत होतीस, पण आतातरी निदान तू मला माझा स्वतंत्र विचार करू देशील असं वाटलं होतं. तो मी तसाही करतेच, पण ते तुला समजेल अशी अपेक्षा होती.
मानापमान - माते, तुला हे कधी समजलं आहे की लहान मुलांच्या मनातही त्यांचे स्वतंत्र विचार, कल्पना असतात. डोस पाजणारे कोणालाच आवडत नाहीत आणि म्हणूनच चुकूनसुद्धा डोस पाजायचा आव आणायचा नसतो.
संस्कार - संस्कार करताना तू मला कायम झाडाकडे बघ असं शिकवलंस. नारळाला खत म्हणून मीठच घालतात, तू मला आंबा समजून खत घालत असशील याची शक्यता तू कधी विचारात घेतली आहेस का? तुझ्या तरूणपणची मूल्यं, समाज, समज वेगळे असतील आणि माझी वेगळी असतील याची तुला थोडीतरी जाणीव आहे का?
विचार - तू म्हणतेस पैसा खर्च करताना नेहेमी फेरविचार कर. सक्षमपणे निर्णय घेण्यासाठी आधी स्वतंत्रपणे विचार करू दिला पाहिजे. जबाबदारी हा शब्द मला नीट कळण्यासाठी कधी चुकूनतरी तू माझ्यावर जबाबदारी टाकली आहेस का? आणि मी नाही पैसे खर्च करणार तर कोण करणार, खर्च नाही करायचे तर मिळवायचे कशाला पैसे? काय वाईट आहे पैसे खर्च करण्यात?
स्तुती - स्तुतीमुळे किती चांगल्या गोष्टी होतात हे तुला माहित आहे का? जेव्हा आपला आपल्यावरही विश्वास नसतो तेव्हा आपल्या लोकांनी केलेल्या तोंडदेखल्या स्तुतीमुळेसुद्धा खूप आत्मविश्वास निर्माण होतो. एखाद्याची एखादी गोष्ट खरोखरच चांगली वाटली तरी तुझ्या या उपदेशामृतामुळे कोणी सांगणार नाही.
कष्ट - कोणाचे कष्ट विनमोल घेऊ नकोस हे ठीक आहे. पण आपल्याच लोकांसाठी किंवा लोकांनी काही केलं तर काय त्याचं मूल्यमापन करायचं का? मैत्रीसारखी सुंदर नाती वगैरे फक्त बोलण्याची गोष्ट नाही आई, वेळ पडली की निभावून नेण्याची गोष्ट आहे. आणि हे घरापासून दूर राहिल्यानंतर मी शिकले आहे. घरात उपदेशामृत मिळतं आणि बाहेर प्रत्यक्ष अनुभव.
वाचा - मला कोणी काही बोललं तर मी का ऐकून घेऊ? माझी चूक नसेल तरीही मी पडतं का घ्यायचं? वाईट शब्दच वापरायला पाहिजेत असं नाही, पण स्पष्ट शब्दांत आपलं म्हणणं न मांडताच का निघून जायचं मी! हे लोकं मला खायला घालत नाहीत, मी माझ्या कष्टांनी कमावून खाते, उगाच का कोणाचं ऐकून घ्यायचं?
तू नेहेमीच प्रवचन देतेस, हजार गोष्टी सांगतेस. पण त्यापेक्षा कधी माझ्यावर थोडी जबाबदारी टाकली असतीस, मला माझं आयुष्य जगण्याचं, माझ्या निवडी करण्याचं स्वातंत्र्य देऊन मागे उभी राहिली असतीस ना, तर एक अक्षर न बोलताही तू मला खूप गोष्टी शिकवू शकली असतीस. "काय हे उपदेशामृत" असा उद्वेग वाटला नसता, तू माझी मैत्रीण होऊ शकली असतीस. मी तुझ्याशी काही बोलत नाही, शेअर करत नाही कारण माझ्या एका वाक्यावर तुझे दहा बुलेट्स येतात. आता पत्रातूनच काय ते लिही. टंकाळा केलास तर निदान मला वाचण्याचा त्रास कमी होईल.
तुझी(?) दिया
स्वानुभवावर आधारित.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पत्र अजिबात आवडले नाही.
आजकाल मुली आईला असं पत्र
पत्र आवडलं.....कधीकधी असे
दैत्या, तुला अदितीचं काय
पत्र आवडले.
इन्टरेष्टिंग्
छान सुभाषित
व्यत्यास आणि पाल्हाळ
खाया
प्रकाटाआ.
लेखातील विचार पटले नाहीत
जिंदगी तेरे दर पर मै हजार
छान पत्र!