'असल उत्तर'! भाग-२

लेखक: मुशाफिर जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे, भारतीय सैन्य लहोरच्या 'कंटॉनंमेंट' पर्यंत जरी पोहोचलं असलं, तरी पंजाब आघाडी लढवणं, ही काही सोपी गोष्ट नव्हती. एक गोष्ट इथे नमूद कराविशी वाटते, ती म्हणजे बहुतेक वेळा आपण जो इतिहास वाचतो किंवा सिनेमात पाहतो, तो फार एकांगी आणि अतिरंजीत असतो. पाकिस्तानी सैन्याधिकारी हे मुर्ख आहेत, असाच आपला समज होतो. वास्तव परिस्थिती तशी नाही. आणि ते ह्याही लढाईच्या बाबतीत खरे आहे. भारतीय सैन्याच्या ३ वेगवेगळ्या डिव्हिजननी लाहोर आणि परिसरात (' लाहोर अँड कसूर सेक्टर') हल्ला केला होता. कसूर परिसरात हा हल्ला ७ वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आला होता. आपल्या सैन्याधिकार्‍यांची अपेक्षा होती की ह्या भागात पाकिस्तानच्या नियमित सैन्याची (रेग्युलर आर्मी) केवळ एकच बटालियन तैनात आहे आणि केवळ तीच प्रतिकार करेल. पण खरतरं पाकिस्तानने तिथे एक पूर्ण रेजिमेंट तैनात केली होती, तीही चिलखती दलासोबत. आणि त्यांच्यामागे तैनात होती पाकिस्तानी चिलखती दलाची १ ली डिव्हिजन, जी त्यांच्या सैन्याचा मानबिंदू समजली जात असे ('प्राईड ऑफ पाकिस्तान आर्मी). लक्षात घेण्यासारखा भाग असा, की आपल्या सैन्याने (पाकिस्तानने आगळिक केल्यास) लाहोर आणि ईचोगिल भागात हल्ला करून तो भाग ताब्यात घेण्याची योजना जून १९६५ च्या युद्धसरावातच नक्की केली होती. त्यातही कसूर भागात (कसूर सेक्टर) दोन बाजूनी हला करून लाहोर लढवणं पाकिस्तानला कठीण करून टाकावं, अशी ही योजना होती. परंतु, भारतीय सैन्याधिकार्‍यांच्या अपेक्षेविपरित हा भाग पाकिस्तानी सैन्याने फारच चांगल्या प्रकारे सुरक्षित केला होता. पाकिस्तानच्या सैन्यानेही खेमकरणचा भाग (खेमकरण सेक्टर) ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्याचा मुख्य कारणं म्हणजे त्यावेळी बियास नदीवर दोन पूल होते. त्यातला एक पूल ताब्यात घेउन उत्तरेकडे सैन्य वळवायचं आणि भारतीय सैन्याच्या ११ डिव्हिजनना वेगळं पाडायचं, हा पाकिस्तानी लष्कराचा उद्देश होता. ह्या अकरा डिव्हिजन म्हणजे भारताच्या पंजाब, पठाणकोट, जम्मू-काश्मिर आणि लडाख इथे तेव्हा तैनात असलेल्या एकूण सैन्याच्या ५०% सैन्य होतं. तसचं त्यावेळी भारताने बियास नदीच्या पूर्व किनार्‍यावर राखीव सैन्यही तैनात केलं नसल्याने, पाकिस्तानी सैन्यासाठी दिल्ली फक्त एका दिवसाच्या अंतरावर आली असती. (काही जाणकारांच्या मते पाकिस्तान जर ह्यात यशस्वी ठरला असता तर ही पानिपतची ४थी लढाई ठरली असती. पुढचा विचार न केलेलाच बरा!) त्यामुळे, ही लढाई एकप्रकारे १९६५ च्या युद्धातली सर्वात निर्णायक लढाई ठरते. आधी म्हटल्याप्रमाणे, केवळ पाकिस्तानची केवळ एकच बटालियन आपल्यासमोर प्रतिकार करतेय, ह्या समजातून कसूर परिसरात आघाडीवर गेलेली भारताची ४थी माउंटन पाकिस्तानच्या ह्या (प्रति)हल्ल्यामुळे चांगलीच अडचणीत सापडली होती. आघाडीवरील भारतीय सैन्याकडे (४थी माऊंटन डिव्हिजन) केवळ एकच टँक रेजिमेंट होती. त्यातही शेरमन-४ आणि शेरमन-५ रणगाड्यांचा समावेश होता (हे रणगाडे दुसर्‍या महायुद्धात वापरात होते) आणि पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांसमोर जवळजवळ कुचकामी होते. तसेच पाकिस्तानच्या तोफखाना दलाच्या (आर्टिलरी) १४० तोफा अतिशय सुनियोजित मारा करीत होत्या. ४थ्या मांऊटन डिव्हिजनकडे असलेल्या तोफांची क्षमताही पाकिस्तानी तोफांच्या मानाने अतिशय तोकडी होती. भारतीय सैन्याकडे असलेल्या १०६ मि मि आर. सी. एल. तोफाही पाकिस्तानच्या रणगाड्यांवर लांबून हल्ला करण्यासाठी निष्प्रभ ठरत होत्या. त्यातच त्या कुठे तैनात केल्या आहेत हे कळू न देण्यासाठी, त्यांचा माराही पाकिस्तानी सैन्य जवळ येईपर्यंत करता येत नव्हता. याउप्पर, पाकिस्तानच्या हवाईदलाची त्यांच्या पायदळाला पूर्ण मदत मिळत होती. तर भारतीय हवाईदलाची म्हणावी इतकी मदत पायदळाला होत नव्हती (काही तज्ञांच्या मते तर भारतीय पायदळाला हवाईदलाची मदत ह्या लढाईत अजिबात मिळाली नाही). ह्या सगळ्या विपरित परिस्थीतीमुळे, ४थ्या माऊंटन डिव्हिजनच्या मुख्याधिकार्‍यांनी त्या डिव्हिजनला ताबडतोब माघार घ्यायला सांगितली. त्याप्रमाणे, ४थ्या मांऊटन ब्रिगेडने माघार घ्यायला सुरूवात केली. इथून पुढे सुरूवात होते एका थरारक लढाईची आणि भारतीय सैन्याने जवळपासच्या भूप्रदेशाचा सुयोग्य वापर करून मिळवलेल्या जवळजवळ अशक्यप्राय अशा विजयाची. ४थ्या माउंटन डिव्हिजनने माघार घेउन पाकिस्तानातून खेमकरणकडे येणार्‍या दोन रस्त्यांच्यामध्ये घोड्याच्या नालेच्या आकारात संरक्षक फळ्या उभ्या केल्या. आणि ह्या संरक्षक रचनेचा केंद्रबिंदू होता 'असल उत्तर'!

नेत्रेश यांनी 09/09/2010 - 00:19 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अजुन पर्यंत न वाचलेली माहीती. पुढचा भाग लवकर येउदे...

सुनील यांनी 09/09/2010 - 00:29 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

वाचतोय. अब्दुल हमीद याच लढाईत शहीद झाला होता ना?

मुशाफिर यांनी 09/09/2010 - 01:00 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by सुनील

Permalink

अब्दुल हमीद खेमकरणच्या लढाईतच १० सप्टेंबरला शहीद झाला. मुशाफिर.

मुशाफिर यांनी 09/09/2010 - 00:41 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

"तसेच भारतीय सैन्याकडे केवळ एकच टँक रेजिमेंट होती" हे वाक्य "आघाडीवरील भारतीय सैन्याकडे (४थी माऊंटन डिव्हिजन) केवळ एकच टँक रेजिमेंट होती." असे वाचावे. संपादकानी शक्य असल्यास ही सुधारणा करून हा प्रतिसाद उडवावा. मुशाफिर.

नंदन यांनी 09/09/2010 - 00:42 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

एक गोष्ट इथे नमूद कराविशी वाटते, ती म्हणजे बहुतेक वेळा आपण जो इतिहास वाचतो किंवा सिनेमात पाहतो, तो फार एकांगी आणि अतिरंजीत असतो. पाकिस्तानी सैन्याधिकारी हे मुर्ख आहेत, असाच आपला समज होतो. वास्तव परिस्थिती तशी नाही. आणि ते ह्याही लढाईच्या बाबतीत खरे आहे.
--- +१ अर्थात हे दोन्हीकडून खरे आहे. मुशर्रफनी केलेलं वर्णन ह्या दुव्यावर वाचता येईल :) हाही भाग मस्त, वाचतो आहे.

प्रभो यांनी 09/09/2010 - 00:45 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by नंदन

Permalink

>>सिनेमात पाहतो, सिनेमात आम्हाला भारतीय सैन्य म्हणजे एकटा सनी देओल हेच माहित आहे लहानपणापासून... ;) हा भाग आवडला...लवकर येऊ द्या पुढचा भाग..

पुष्करिणी यांनी 09/09/2010 - 01:18 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by प्रभो

Permalink

+३ पुढील भागाच्या प्रतिक्षेत... मलाही फक्त जवान/मेजर/ जनरल/ कर्नल असं सगळं मिळून सनीपाजीच माहित आहेत ..:) क्रमशः लिहायला विसरलात का?

क्रमशः राहिलच लिहायचं. :) हरकत नाही. काही लोक क्रमश: लिहितात आणि पुढचं लिहायचं राहतं. त्यापेक्षा हे बरं!!

बहुगुणी यांनी 09/09/2010 - 01:22 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

भौगोलिक रचनेची कल्पना यावी म्हणून या संदर्भातला एक व्हिडिओ इथे देतो आहे:

विलासराव यांनी 09/09/2010 - 11:46 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

माहिती आणि छान लिहिलय. बहुगुणींचे विडिओ बद्दल आभार. आता होउन जाउद्या घनघोर लढाई लवकरच

टुकुल यांनी 09/09/2010 - 12:26 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

पुढील भागाची वाट पाहतोय. --टुकुल

कानडाऊ योगेशु यांनी 09/09/2010 - 12:29 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

युध्दस्य कथा: रम्य: हे खरेच आहे!

llपुण्याचे पेशवेll यांनी 09/09/2010 - 12:51 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

एक गोष्ट इथे नमूद कराविशी वाटते, ती म्हणजे बहुतेक वेळा आपण जो इतिहास वाचतो किंवा सिनेमात पाहतो, तो फार एकांगी आणि अतिरंजीत असतो. पाकिस्तानी सैन्याधिकारी हे मुर्ख आहेत, असाच आपला समज होतो. वास्तव परिस्थिती तशी नाही. आणि ते ह्याही लढाईच्या बाबतीत खरे आहे. सहमत असलो तरी काही काही सेनाधिकारी इतके बेरकी, मुत्सद्दी, डावपेचनिपुण असतात की त्यांच्यासमोर भलेभले शत्रु ज्यांनी अन्यत्र मोठमोठी कामे केली आहेत ते मूर्ख ठरतात. त्याचा अर्थ ते मूर्ख असतात असे नाही पण समोरचा इतका तयार असतो की तो प्रतिस्पर्ध्याची हुशारी वेड्यात काढतो. दुसर्‍या महायुद्धात रोमेलच्या विमानभेदी तोफांचे कारस्थान यात गणता येईल. Halfaya Pass ची लढाई सुप्रसिद्ध आहे. पराभूत हेवी माल्टीडा टँक च्या कमांडरने त्याला रोमेल समोर उभे केल्यावर विचारले आम्हाला माहीत होते तुमच्या रणगाडाभेदी तोफा माल्टीडाला थांबवू शकत नाहीत मग तू काय वापरलेस आमची वाताहात करण्यासाठी. बाजूला लावलेल्या विमानभेदी तोफेच्या मोर्चाकडे रोमेलने बोट दाखवले. तो अधिकारी म्हटला 'विमानभेदी तोफ रणगाड्याविरुद्ध? धिस् इस नॉट फेअर'

गणेशा यांनी 09/09/2010 - 20:55 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

वाचत आहे .. मस्त लिहित आहात राव ..

धमाल मुलगा यांनी 09/09/2010 - 21:43 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मस्त लिहिताय! प्रचंड आवडलं. अवांतरः ते क्रमशः काय टायमिंगवर टाकलंय राव...मुरब्बी क्रमशःकार झालात की. ;)