Skip to main content

इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 01/08/2010 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा. मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.) http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात! असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल! या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा! राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in जय हिंद!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 215133
प्रतिक्रिया 474

प्रतिक्रिया

In reply to by सुधीर काळे

विकि-लीक्स अफगाणिस्तान युद्धातील अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या कागदपत्रांच्या leakage मुळे जो गदारोळ चालू आहे त्या संदर्भात असेल बहुतेक...

In reply to by बहुगुणी

बहुगुणी-जी, मी स्वत: ISI च्या दुटप्पीपणाचे संदर्भ या 'विकीलीक्स'मध्ये शोधतोय्, पण इतकी अमाप कागद पत्रे आहेत कीं 'find' function वापरूनही अद्याप ते संदर्भ सापडले नाहींत. म्हणून विचारले इथे.

आदरणीय काळेकाका, आपण जकार्ताला जायच्या आधी, पुणे महापालिकेत मूषक निवारण विभागात कर्मचारी होतात का ? नाही, एकंदरीत "संपाद्कांस पत्रे" धाटणीचा लेख वाटला, म्हणून म्हणतो. (ता. क. मीटरभर पुढे जाण्यासाठी, इंचभर माघार घेणे कधीकधी गरजेचे असते. विचार करा.)

In reply to by मिसळभोक्ता

आदरणीय मिभोकाका एखाद्याच्या उत्साहावर असे विरजण घालणे चांगले नाही. संपादकांस पत्रे अशा धाटणीचा असला तरी हळु हळु सुधारणा होईल. बाकी तुमच्या प्रतिसादातला कंस { हो तो च तो ( ) } फारच काहीच्या काहीच { अश्लील म्हणत नाही} आहे ब्वा.. चक्क न जमणा-या गोष्टी करायला सांगत आहात.

In reply to by मिसळभोक्ता

तुम्ही म्हणताच आहात तर घेउ चालवुन.

In reply to by मिसळभोक्ता

मी 'त्या' नोकरीसाठी अर्ज केला होता पण दुसर्‍यालाच (मिलिंद भोईर) ठेवले त्यांनी. मग नाइलाजाने जकार्तातील नोकरी पत्करली! काळे

इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?
लवकरच ह्यावर 'सेवन इंचेस इच' असा धगधगता लेख लिहिण्याचा मी संकल्प सोडत आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून नवरा व सासर सोडून पळून गेलेल्या स्त्रीला तालीबान राजवटीत नाक-कान कापून विद्रूप करण्यात आले होते तिचा हा फोटो 'टाईम' या साप्ताहिकाच्या नव्या अंकाच्या पृष्ठभागावर दिलेला आहे! असे फोटो प्रकाशित करायला दुसरी जागा नसल्यामुळे नाइलाजाने इथे दाखविला आहे. (http://www.time.com/time/magazine या दुव्यावर अधीक माहिती वाचता येईल.)

In reply to by नितिन थत्ते

भविष्यकाळात काश्मीरात तालिबानी शिरजोर होऊन काश्मीरातही अशीच परिस्थिती येईल अशी भिती काळे काकांना वाटली असावी कदाचित म्हणून त्यांनी हे चित्र इथे डकविले असा कयास. तेव्हा या चित्राचा चर्चेशी अगदीच संबंध नाही असे नाही.

In reply to by सुधीर काळे

सुधीर काळे, नविन धागा काढा ना! इथे कश्मिरवरच चर्चा चालू द्या. उगीच नसते फाटे नकोत. नेहरुंच्या विषयावर तुम्हाला प्रतिसाद आले आहेत त्यावर तुमचा प्रतिसाद वाचायला आवडेल.

In reply to by आमोद शिंदे

नितिन-जी आणि आमोद-जी, खरडपळ्यावरची ही सोय नवीन मिपावर नसल्यामुळे वैफल्यातून मी ते चित्र इथे टाकले. त्याची ही जागा नव्हेच. काढून टाकू का? कीं असू दे? सुधीर

In reply to by आमोद शिंदे

आमोद-जी, माझे या विषयीचे वाचन अपुरे आणि एकतर्फी असावे असे वाटते. माझ्याकडे या विषयावरचे एक मराठी पुस्तक आहे. "फसवणूक" लिहून संपल्यावर वाचायचा विचार आहे. तोवर यावर लिहावे असे वाटत नाहीं. कांहीं प्रतिसाद वाचून मलाच नवी माहिती मिळाली आहे!

काळे काका,तुमची या विषयातील तळमळ समजते पण तश्या प्रकारची तळमळ आपल्या राजकारण्यांच्या मनात उत्पन्न होताना काही इतक्या वर्षात दिसले नाही. ज्या काश्मिर बद्धल तुम्ही बोलत आहात तिथे नेहमी अस्थिरता नांदावी यासाठी पाकड्यांनी काय नाही केले ? तुम्ही सर्वांना पत्र पाठवत आहात त्यामागची कळकळ पण समजते पण त्याचा काही फायदा होताना दिसतो तुम्हाला ? तुम्ही म्हणता :--- पाकिस्तानला आवरले तर इतरांकडे लक्ष देता येईल ना? मग माझा एक प्रश्न तुम्हाला आहे,ज्या पाकड्यांमुळे आपल्याला इतका त्रास होत आहे,ज्यांनी कुरापत काढायची एकही संधी कधी सोडली नाही,हिंदुस्थाना विरुद्ध सर्व कारवाया करणार्‍याना त्यांनी नेहमीस सहारा दिला नव्हे प्रोत्साहन देखील दिले.कारगिल पासुन अक्षरधाम...संसंदे वरील हल्ला ते ताज मुंबई हल्ला इतकी कटकारस्थान आपल्या देशा विरुद्ध करुन आपल्या देशातील अनेक निरपराधी नागरिकांना ठार केले...हे एक प्रकारचे अघोषित युद्ध ते आपल्या विरुद्ध लढत आहेत, तर मग आपण पाकड्यांविरुद्ध धडक कारवाई का करु नये ?

मदनबाण-जी, लोकशाही म्हणजे सर्वात कमी कार्यक्षम राज्यपद्धती समजली जाते....कारण या राज्यपद्धतीततले निर्णय जनतेला काय आवडेल यावरून घेतले जातात, देशाला सर्वात जास्त हितावह काय यावरून नाहीं. (हे माझे विधान नसून कुठे तरी वाचलेले आहे. लिंकही माझ्या संग्रहात नाहीं, पण मला ते पटते.) आपले सरकार जातिनिहाय आरक्षणाचे राजकारण करत आहे ते एका मर्यादेपर्यंत बरोबर होते, पण आता ते सुद्धा देशाच्या हितात आहे असे मला वाटत नाहीं. पण वोटके लिये कुछभी करेंगे या तत्वानुसार हे चालूच आहे. आता मुद्द्यावर येतो. या सरकारला आपण निवडून दिलेले आहे. यांच्यावर आपला अंकुश पाहिजेच. आणि तो ठेवण्यासाठी आपण पत्रे लिहिणे जरूरीचे आहे. माझ्यासारख्या एक-दोन पत्रांनी कांहीं होणार नाहीं, पण अशा पत्रांचा जर पाऊस पडला आणि त्यामुळे जर सरकारला कळले कीं आता आपण कारवाई केली नाहीं तर आपली खुर्ची जाईल तर [आणि तरच] ते कारवाई करेल याच्यावर माझा विश्वास आहे व मी असे लिहिण्याचे काम इमाने इतबारे करतो. उदा. फी.मा. माणेकशांच्या दफनविधीला कमांडर-इन्-चीफ (प्रतिभाताई) पासून पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, संरक्षणमंत्री कुणीही गेले नाहीं म्हणून मी त्यांना निषेधाची पत्रे पाठवली. एक पत्र केराच्या टोपलीत जाईल, पण शेकडो पत्रे नाहीं जाणार. म्हणून मी हे करतच रहाणार आणि आपणा सर्वांनाही असे करायची विनंती करणार. धन्यवाद! काका

In reply to by सुधीर काळे

यांच्यावर आपला अंकुश पाहिजेच. आणि तो ठेवण्यासाठी आपण पत्रे लिहिणे जरूरीचे आहे. माझ्यासारख्या एक-दोन पत्रांनी कांहीं होणार नाहीं, पण अशा पत्रांचा जर पाऊस पडला आणि त्यामुळे जर सरकारला कळले कीं आता आपण कारवाई केली नाहीं तर आपली खुर्ची जाईल तर [आणि तरच] ते कारवाई करेल याच्यावर माझा विश्वास आहे व मी असे लिहिण्याचे काम इमाने इतबारे करतो. :D :D :D :D

माझ्यासारख्या एक-दोन पत्रांनी कांहीं होणार नाहीं, पण अशा पत्रांचा जर पाऊस पडला आणि त्यामुळे जर सरकारला कळले कीं आता आपण कारवाई केली नाहीं तर आपली खुर्ची जाईल तर [आणि तरच] ते कारवाई करेल याच्यावर माझा विश्वास आहे व मी असे लिहिण्याचे काम इमाने इतबारे करतो. पत्र लिहुन अंकुश ठेवता येईल ? इतके वर्ष आपले देशवासी पाकड्यांचा उपद्रव सहन करत आहेत आता अजुन किती पत्र पाठवायची ??? मला गांधीगिरी अजिबात पटत नाही...माझी चूक नसताना कोणी माझ्या थोबाडीत मारली तर मी त्याचे थोबाड असे फोडीन की बाप जन्मात तो कधी माझ्या वाटेला परत येणार नाही. हेच पाकड्यां विषयी केले पाहिजे असे माझे ठाम मत आहे...आज पाकडे एकटे नाहीत त्यांच्या मागे मदतीला चीन देखील आहे, पण तोछुप्या स्वरुपात...उद्या चीनने उघडपणे पाकिस्थानला समर्थन देणे सुरु केले तर हिंदुस्थान साठी ते अत्यंत कठीण परिस्थीती निर्माण करणारे ठरेल... एकदा आपण आपली जरब बसवली की दुसरा कोणी आपल्या देशावर डोळे वटारुन पहताना १० वेळा नक्कीच विचार करेल...ज्याची खरज गरज आहे असे मला तरी वाटते. फी.मा. माणेकशांच्या दफनविधीला कमांडर-इन्-चीफ (प्रतिभाताई) पासून पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, संरक्षणमंत्री कुणीही गेले नाहीं म्हणून मी त्यांना निषेधाची पत्रे पाठवली. कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराने जेव्हा कॅप्टन कालिया आणि त्यांच्या सहकार्‍यांचे विद्रुप केलेले मृतदेह ( या सर्व परमवीरांना अत्यंत हाल हाल करुन मारण्यात आले आहे.) जेव्हा आपल्या देशाला सुपूर्त करण्यात आले होते तेव्हा किती नेता मंडळींनी आवाज उठवला होता ? कुठे गेले होते मानवाधिकार वाले....? जाता जाता :--- इथे अबु सालेम तुरुंगात पंचतारांकित सुविधेत लोळतो !!! अशा देशात तुमच्या सारख्या पत्र व्यव्हार करणार्‍यांकडे सरकार लक्ष देईल असे वाटते याचेच मला नवल वाटते...असो...नियमाने पत्र पाठवत रहा.पुढील सर्व पत्र व्यव्हारांसाठी शुभेच्छा !!!

पत्रे लिहिणे हा एक उपाय आहे, एक उपाय नाहीं! कितीही झाले तरी आपण असे 'mild and meek ' भारतीयच शेवटी! आताचे UPA सरकार काय किंवा कट्टर हिंदूवादी म्हणवून घेणारे BJP चे 'मिली-जुली सरकार' काय, सगळे सारखेच! मौलवी अझर मसूदला एकाद्या नववधूप्रमाणे 'सोबत' देऊन कंदाहारला पोचवणारेही आपणच. सोबत कोण गेले? तर एके काळचे हवाईदलातील अधिकारी जसवंत सिंह! एक 'वामनमूर्ती' शास्त्री आणि 'वाघीण'बाई इंदिरा गांधी सोडल्या तर असे कणखर नेतृत्व आपल्याला कुठे लाभले आहे? मतदानाला ५०-५५ टक्के लोकसुद्धा जेमतेम जातात, मग असे बोटचेपे नेते निवडून येतात!! मनमोहन सिंह यांचा तर एक डोळा सोनियाबाईंच्याकडे! पण त्यांच्याकडून काम करून घ्यायला हवेच ना? पत्रें लिहिणे चूक आहे? मग तुमची पर्यायी सूचना काय आहे? शस्त्रे घेऊन स्वारी करायची? सरकारला उद्युक्त करणे हाच उपाय आहे आणि प्रचंड जडत्व/सुस्ती (inertia) असलेल्या सरकारला हजारो पत्रे पाठवून कमरेत (virtual) लाथ घालणे हेच आपल्या हातात (किंवा पायात) आहे असे माझे मत आहे!

In reply to by सुधीर काळे

पत्रें लिहिणे चूक आहे? नाही... पण माझ्या दृष्टीने त्याचा काडीचाही उपयोग नाही. मग तुमची पर्यायी सूचना काय आहे? जशास तसे... शस्त्रे घेऊन स्वारी करायची? पाकड्यांना आपल्यावर स्वारी करता येते,मग आपण वन टाईम सोल्युशन का शोधु नये ?

In reply to by मदनबाण

>>पाकड्यांना आपल्यावर स्वारी करता येते,मग आपण वन टाईम सोल्युशन का शोधु नये ? वन टाईम सोल्युशन म्हणजे नक्की काय करायला हवे. सरकार निषेध खालितांचे गठ्ठे घेऊनच बसलेली आहे, पडला बॉम्ब कि पाठवा ट्रक भरून खलिते. पकडला गेलेला कसाब गेली दोन वर्षे झाली तुरुंगात बिर्याणी तोडत आहे, संसदेवर हमाला करणारा निवांत आहे. यावरून 'मायबाप सरकार तिथे पाकिस्तानात घुसून नायनाट करेल' असे स्वप्नात देखील स्वप्न पडत नाही. एक सुचते आहे, आपल्या (लष्करे-तोएबा पेक्षा घातक असलेल्या ) हिंदू दहशतवाद्यांना एकत्रित करून पाकिस्तानात पाठवून द्यायचे का ?

In reply to by सुधीर काळे

... (आपापल्या दृष्टिकोनाप्रमाणे) (१) पोष्टखात्याचे काम मर्यादेपलीकडे वाढवणे, किंवा (२) पोष्टखात्याचा अपरिमित फायदा (किंवा तोटा) करून देणे, यांपैकी काहीतरी एक (किंवा दोन्ही) आपण निश्चितच करू शकतो. वरील (२)च्या अनुषंगाने, पन्नास नव्या पैशांत भारतात कोठूनही कोठेही पोष्टकार्ड पोहोचवणे हे भारतीय पोष्टखात्याकरिता फायद्याचे आहे की तोट्याचे, याचा हिशेब होऊन त्यातून निघणारा निष्कर्ष प्रसिद्ध होणे हे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. संबंधित अधिकारी कृपया यात लक्ष घालतील काय?

In reply to by सुधीर काळे

मतदानाला ५०-५५ टक्के लोकसुद्धा जेमतेम जातात, मग असे बोटचेपे नेते निवडून येतात!! मतदानाला १००% लोक गेले तरी काहीही फरक पडणार नाही. सर्व राजकीय पक्ष भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांना देशाचे काहीही पडलेले नाही.

पण हे इथे लिहून काय उपयोग? मनमोहन सिंग मिसळ-पाव थोडेच वाचतात? इथे रागारागाने लिहिण्यापेक्षा त्यांना ते पंतप्रधान आहेत हे न विसरता योग्य भाषेत लिहिलेत तर आज नाहीं तर उद्या उपयोग होईल! आपल्या लोकसभेवर हल्ला झाला तेंव्हां भाजपाचे सरकार होते, वाजपेयी पंतप्रधान व अडवानी गृहमंत्री होते? काय झाले? त्यातल्या एका आरोपीला तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले! पण जर लोकप्रतिनिधींना भीती बसली कीं आपले मतदार रागावले तर आपण निवडून येणार नाहीं तरच ते कांहीं extra-ordinary काम करतील! आज अमेरिकेत असा वचक त्यांच्या प्रतिनिधींवर असतो असे माझ्या वाचनात आहे.

पण हे इथे लिहून काय उपयोग? मनमोहन सिंग मिसळ-पाव थोडेच वाचतात? हेच मी तुमच्या पत्रव्यव्हारा संबंधी देखील म्हणू शकतो... जर लोकप्रतिनिधींना भीती बसली कीं आपले मतदार रागावले तर आपण निवडून येणार नाहीं तरच ते कांहीं extra-ordinary काम करतील! फारच अपेक्षावादी बॉं तुम्ही !!! प्रमाणाच्या बाहेर अवांतर :--- आमच्या ठाण्यात जागो- जागी मोठ मोठ्या नेत्या लोकांचे वाढदिवासाच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लागलेले आहेत...त्याच पोस्टर्सखाली / समोर असलेल्या खड्यांमधुन रोज लोक रस्ता आहे असे समजुन वाहने चालवतात...आता ५ फुटी उंची असलेल्या नेत्यांचे २५ फुट उंचीचे फलक लावुन अभिनंदन करण्यापेक्षा रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यावर पैसे खर्च केले पाहिजेत हे जिथे या देशातला नेत्यांना आणि त्यांची चाटुगिरी करणार्‍यां पिल्लावळीला कळत नाही...तिथे तुमचा पत्रव्यव्हार कसली आणि कुठल्या प्रकारची भिती या निर्लज्य राजकारण्यांच्या मनात निर्माण करणार तेच मला कळत नाही.

हे कराचीच्या 'डॉन'मधील एक मस्त व्यंगचित्र पहा! (MNA= Member of National Assembly i.e. MP and MPA=Member of Provincial Assembly i.e. MLA) सध्याच्या पूरपरिस्थितीवर MP/MLA कसे नक्काम आहेत हे सांगते. त्यांच्या राष्ट्राध्यक्षांवरही (जरदारींवर) पॅरिस/लंडनला गेल्याबद्दल टीका सुरू आहे. आपले MPs आणि MLAs असेच आहेत. खुर्ची जायची वेळ आली तरच जागे होतात! हे व्यंगचित्र आहे व

हे असे असते...पण नंतर काय होते ? ;) ख्या ख्या ख्या आपले लोक पुरावा देत बसणार आणे ते... (वरील चित्रे जालावरुन घेण्यात आली आहेत...)

>> देशाला सर्वात जास्त हितावह काय यावरून नाहीं. देशाला हितावह काय हे जेव्हा जनतेखेरीज कोणीतरी दुसरा ठरवतो तेव्हा त्याला हुकूमशाही म्हणतात. हिटलरने दुसरे महायुद्ध सुरू केले ते जर्मनीच्या हितासाठी होते असा त्याचा दावा असणारच.

In reply to by नितिन थत्ते

जनतेचे मत आणि स्मृती क्षणभंगुर असतात. तिचे (जनतेचे) आजचे मत चुकीचे होते हे तिला कळते पण उशीरा. पण राज्यकर्त्यांना केलेली चूक सुधारायची संधी क्वचितच मिळते. म्हणून धूर्त आणि समर्थ नेता जनतेच्या मागे न जाता जनतेला आपल्या मागे आणतो. पण याला राज्यकर्ता समर्थ हवा. माझे मत चुकीचे असेल, पण मला आजचा आपला कुठलाच राज्यकर्ता वा नेता-सत्तेवरील वा विरोधी पक्षातील-समर्थ पठडीतला वाटत नाहीं!

In reply to by नितिन थत्ते

जर्मनीच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास असे वाचनात येईल कीं हिटलरने निवडणूक rig केली व तो सत्तेवर आला. त्याच्या निवडीला जर्मन जनतेने कधीच स्पष्ट अनुमती दिली नव्हती.

In reply to by नितिन थत्ते

पण त्याआधी ३ वर्षात त्याने जर्मनीला कुठून कुठे पोचवले? ते तर चांगलेच केले ना ? युद्धे कोण करत नाही ? ज्यूंचा संहार आणि रशियावर स्वारी केली नसती तर कदाचित तो हारलाही नसता आणि युद्धाचे सर्व फायदे जर्मनीला मिळाले असते. कुठलीही शाही वाईट नसते, तिचे बरेवाइट परिणाम ती चालवणार्‍या माणसांवर अवलंबून असतात. उदा. शिवाजी महाराजांची कुठे होती लोकशाही ? पण सुखी जनता आणि कायदा - सुव्यवस्थेचे राज्य होतेच ना ?

मी इथे नविन आहे.... पण एक मुद्दा नमुद करावा वाटतो. चीन ने जेव्हा भारतावर हल्ला केला त्या कित्येक महिने आधी गुप्तचर यन्त्रनानी अशी शक्यता व्यक्त केली होती. आणी भारतीय सेने कडे चक्क चान्गली शस्त्र पण नव्हती. हे नेहरुना माहित होते. पण ते ईन्दिरा आणी फिरोज प्रकरणामधे गुन्तले होते. त्याना या मुद्द्याकडे लक्ष द्यावे असे का वाटले नाही ? शेवटी भारत हरला. नेहरु बद्दल मनात आदर निर्मान होत नाही हे खरेच. ता.क. हे मी वाचलेले च आहे. कारन अस्मादिकान्चा तेव्हा जन्म झाला नव्हता.

In reply to by श्रीमन्त

आपल्या सैन्याची तयारी नव्हती हे तर आहेच पण लष्करी अधिकार्‍यांच्या कामात ढवळाढवळ करून त्यांना अनेक चूकिचे निर्णय अमलात आणायला लावले. उदा. जागोजागी चौक्या उभारणे. संदर्भः एका निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचे "हिमालयन ब्लंडर" नावाचे पुस्तक यावर कोणाला इतर काही माहिती असल्यास द्या.

In reply to by Pain

बाकी नेहरुंवरची पुस्तकंही नेहरुप्रेमाची कावीळ झालेल्यांनीच लिहीलेली असतात. त्यातून नवनवीन नेहरु भक्त तयार होत असतात. असो. सुधीरकाका तुमचा मुद्दा रास्त आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तुमचा प्रतिसाद समजला नाही. हे पुस्तक नेहरूप्रेमाचे नाही, राजकीय हस्तक्षेपाने (नेहरू आणि इतर) बसलेल्या फटक्याबद्दल (आणि इतर काही गोष्टी) आहे.

सर्व प्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे की चीन चे धोरण आपल्या देशास हिताचे नाही. त्यांची पाकड्यांशी मैत्री आपल्या देश हितास हानिकारक आहे हे कधीच विसरुन चालणार नाही. चीन सातत्याने पाकड्यांना लष्करी मदत पोहचवत आहे आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्या देशाला भोगावे लागतील... आता आपले हिंदुस्थानचे सरकार चीन विरुद्ध आपल्या देशाचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य बाळगुन आहे का ? नाही !!! असे कोण सांगत आहे ? जरा खालचा व्हिडीयो पहा... चीनने अ‍ॅन्टी सॅटेलाईट मिसाइलचे सफल परिक्षण आधीच केले आहे, लक्षात घ्या...जर आजच्या घडीला सॅटेलाईट नसेल तर तुमचा देश एका लुटा पांगळा ठरेल यात शंका नाही.या मिसाइली धास्ती अमेरिकेने सुद्धा घेतली आहे... मागच्या वर्षी झालेल्या (६० वर्ष पूर्ण झाल्या बद्धल विशेष झालेली) परेड मधे चीनने मोठ्या प्रमाणात आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन केले होते. काही जबरदस्त चायनीज मिसाईल्स तुम्हाला इथे पाहता येतील :--- http://wareye.com/chinas-yj-12-and-other-covered-advanced-weapons-to-be… सर्वात महत्वाची बाब म्हणजे काही अतिशय घातक हत्याराचे प्रदर्शन चीनने या परेडमधे केलेच नाही. http://news.xinhuanet.com/english/2009-10/01/content_12146313.htm चीनच्या J-10 bomber पाहिले आहेत ? हे पहा :--- http://yfrog.com/4a20090928145023563j

इथे फक्त माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद! खरे तर हा "हातच्या का़कणाला आरसा कशाला" असाच प्रकार आहे. 'फसवणूक'मधे चीनने पाकिस्तानला अणूबाँब दिल्याबद्दलही खूप माहिती आहे तीही वाचली असेलच तुम्ही. चीनचा केसही आपण वाकडा करू शकत नाहीं (आपणच काय, कुठलाही देश एकट्याने ते करू शकेल असे मला वाटत नाहीं) पण मग काय करावे? तुमच्या प्रतिसादात हे कुठे आहे? यावर आपले काय म्हणणे आहे ते कृपया लिहा. असो. आता हा प्रकार one-on-one होत आहे आणि नवीन कांहींच दिसत नाहींय्. तेच तेच पुन्हा-पुन्हा सांगणे होत आहे. म्हणून आता मला आणखी कांहीं लिहिण्यायोग्य वाटले तरच प्रतिसाद लिहीन. एरवी नाहीं.

In reply to by सुधीर काळे

काळेजी, चिनने ही प्रगती, हे सामर्थ्य एका दिवसात प्राप्त केलेले नाहि. आणि त्यांचा उद्देश केवळ भारताला उपद्रव देणे हा नाहि. त्यांची महत्वाकांक्षा फार फार मोठी आहे. नेपोलिअयनने जगाला सावधन केले होते कि चीनला जागे करु नका... अन्यथा हा ड्रॅगन सर्वांना गिळल्याशिवाय राहणार नाहि (याचा संदर्भ आत्ता आठवत नाहि. पण मी हे निश्चितपणे नेपोलियनबद्दलच वाचले होते ). सांगायचा मुद्दा असा कि एका फार मोठ्या महत्वाकांक्षी राक्षसी शक्तीने ऑपरेट करायला सुरुवात केली आहे. त्याचे प्रत्युत्तर देखील तुल्यबळ असणे आवश्यक आहे. इथे गरज आहे थंड डोक्याने लांब पल्ल्याचे उपाय योजण्याची. सामान्य भारतीयाने आपल्या बुद्धीवर, परिश्रमांवर श्रद्धा ठेऊन भारताच्या आत्मबलामध्ये आपले योगदान द्यावे. शक्य होईल तेव्हढे. शेवटी राजकारण हा शक्तीचा खेळ आहे. येथे बुद्धी देखील एक शक्ती म्हणुनच वापरली जाते. या परिस्थीतीतुन देशाला तारुन न्यायला भोसले-त्रयी (शहा-शिव-शंभू ) आले तर ठीक... नाहि तर हे इंच इंच कमी होणारे सीमाप्रदेश बघण्याची आपल्याला सवय करुन घ्यावी लागेल. स्वगत: बा अर्धवटराव... अरे आपण कोणाशी बोलतोय याचं काहि भान ?? आयला... तेंडुलकरला बॅटींग करायला शिकवतोस होय... (मास्तर) अर्धवटराव

पण मग काय करावे? तुमच्या प्रतिसादात हे कुठे आहे? पाक व्याप्त काश्मिरवर थेट ल़ष्करी कारवाई, ती सुद्धा लवकारात लवकर केली पाहीजे. जितक्या अतिरेकी स्थळांची माहिती हिंदुस्थानी लष्कराकडे आहे तितक्या सर्व स्थळांचा निप्पात केला जावा. असे न झाल्यास चीन जो पाक व्याप्त काशिमर मधुन रस्ता बांधत आहे त्याच रस्त्याने आपल्या इतर राहिलेला काश्मिरचा भाग गिळंकॄत करेल !!! पत्र टाकुन आयुष्य जाईल पण त्याचा उपयोग मात्र होणार नाही, एव्हढाच पत्र व्यवहार करायचा असेल तर त्यात धडक कारवाईची मागणी करा. हीच तुम्हाला विनंती आहे. माझी मागणी हिंदुस्थानच्या सरकारकडे धडक कारवाईची आहे.

In reply to by मदनबाण

पूर्वी संसदेवरील हल्ल्यानंतर "आर या पार" लडाईची घोषणा झाली आणि सीमेवर सैन्य नेण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी युद्ध न करताच सैन्य माघारी आणले गेले. त्यावेळी भारतात असलेले सरकार "मतांसाठी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे" नसल्याने, ज्या अर्थी त्यांनी धडक कारवाईचा निर्णय रहित केला त्या अर्थी जमिनीवरची वस्तुस्थिती (आपली तयारी, पाकिस्तानची तयारी, अण्वस्त्रयुद्ध होण्याचा धोका, आंतरराष्ट्रीय दबाव आणि संभाव्य प्रतिक्रिया) अशा प्रकारच्या धडक कारवाईला योग्य नसल्याचा निष्कर्ष तेव्हाच्या सरकारने काढला असावा. तेव्हाचा तो निर्णय योग्यच होता असे मी समजतो. सध्याच्या सरकारची कृती जर "लांगूलचालन न करणार्‍या, कणखर" सरकारसारखीच असेल तर ती विचारपूर्वक आणि वास्तवाचे भान ठेवून केलेलीच कृती असावी असेच मी तरी समजेन. त्यामुळे धडक कारवाई करा असे लाखो पत्रांद्वारे सांगणे धोक्याचे आहे असेही मला वाटते. न जाणो; लाखो पत्रांच्या-लोकेच्छेच्या दबावाखाली सरकारने आततायी आणि देशहिताची नसलेली कृती केली तर त्या कृतीचे परिणाम काय होतील याची मला कल्पना करवत नाही.

In reply to by नितिन थत्ते

नितिन-जी, माझ्या पत्रात "जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रीय सरकारने राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून, परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!" असे लिहिले होते. हे माझे मत! ऋषिकेष-जींआणक्त्यांचा विचार सांगितला आहेच. प्रत्येकाने आपापल्या सूचना द्यायच्या होत्या. नितिन-जी, सरकारने काय करावे असे आपल्याला वाटते ते अद्याप कळलेले नाहीं, पण आता जे चालले आहे ते पसंत असेल तर कांहींच लिहायची गरज नाहीं. फार तर पाठिंब्याचे पत्र पाठवावे. कदाचित हेच धोरण व्यावहारिक (pragmatic) असेल तर अभिमान गिळून स्वीकारलेच पाहिजे, दुसरे काय करणार? पण गिलानीसारख्यांना शिक्षा केली नाहीं तर असे लोक (ज्यांना मी देशद्रोही समजतो ते) नक्कीच शिरजोर होतील असे मला वाटते. स्वारी करायला हवी होती २७/२८ नोव्हेंबर २००८ रोजी. त्यावेळी सारे जग आपल्याला साथ द्यायला तयार होते. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनीही तसे संकेत दिले होते. पण आपल्याला त्यावेळीही हिंमत झाली नाहीं हे तर खरेच. आता आणखी एका मोठ्या कुरापतीची वाट पहावी लागेल? कदाचित. नाहीं तर "कांहींही न करता गप्प बसावे व जे जे होईल ते पहावे" हा सध्याचा उपायही एक उपाय आहेच. तो चालू राहू दे. (कदाचित तोच चालू रहाणार आहे!) मला वैयक्तिकदृष्ट्या मनस्ताप झाला (आणि नेहमीच होतो) म्हणून मी इथे हा धागा टाकला इतकेच.

In reply to by सुधीर काळे

>>स्वारी करायला हवी होती २७/२८ नोव्हेंबर २००८ रोजी. त्यावेळी सारे जग आपल्याला साथ द्यायला तयार होते. साथ द्यायला तयार होते म्हणजे काय हे माहिती नाही. कारण त्याहीवेळी अमेरिका वगैरे युद्ध टाळायचाच प्रयत्न करीत होती असे स्मरते. शिवाय आपण धडक कारवाई केली की पाकिस्तान चुटकीसरशी शरन येईल हा समज काय आधारावर बनला आहे हे माहिती नाही. येथे मला धनंजय यांनी पूर्वी (२६-११ च्या घटनेनंतर) एका धाग्यात लिहिलेला मजकूर उधृत केल्याशिवाय राहवत नाही.
आपल्यापैकी बहुतेकांना वाटते, की "मी अमुक-तमुक सांगितलेच होते, तसे केले असते तर हे घडले नसते". प्रत्येकालाच आपण चांगले सरसेनापती आहोत, "लोक आपले ऐकत नाहीत, हा लोकांचा अडेलतट्टूपणा" असा प्रचंड आत्मविश्वास असतो. "आता आणीबाणीची वेळ आहे, माझे ऐका, सर्वजण गप्प बसा!" संजय/इंदिरांनाही असाच आत्मविश्वास होता, पण त्यांची धोरणे माझ्या मते चुकलेली होती. काश्मीरात भारतीय सैन्याने ताबारेषेच्या पलीकडे जाऊन अतिरेक्यांचा पाठलाग करावा (म्हणजे आता करत नाहीत), असे आपले काही मित्र आपल्याला सांगतात. भारतीय लष्कर डावपेचास योग्य असा पाठलाग हल्लीच असे करत नाही हे तुम्हाला कोणी सांगितले? मी पलिकडे कारवाई केलेल्या कप्तानाशी बोललेलो आहे. पण हे धोरण भारताने जगजाहीर करावे, असे तुम्हाला वाटते का? "आपण असे करत नाही" असे जगाला सांगून (म्हणजे स्वतःच्या लोकांनाही) मग त्या कारवाया करण्यात मुत्सद्देगिरी आहे. (मी त्या कप्तानाशी अशी भेट झाली आहे, असे सांगणे म्हणजे गौप्यस्फोट नाही. भारत लष्करी तंत्रास योग्य अशा कारवाया करत आहे, हे सर्वच विचारी लोकांना ठाऊक आहे. अफगाणिस्तानातून भारत पाकिस्तानाला शह देत आहे, [हे ठीकच करत आहे], हे जगाभरातल्या वर्तमानपत्रांना माहीत आहे, पण "नेभळट-भारत-संताप"वादी लोकांना ठाऊक नाही.) १९४७ मध्ये काश्मीर [जेहलम नदीचे] खोरे व्यापून मग भारताने युद्धबंदी घोषित केली. सिंधुनदी खोर्‍यातल्या गिलगित पर्यंत पोचल्याशिवाय म्हणे युद्धबंदी घोषित करायला नको होती. इथे आपण सगळे लष्करी डावपेचात तरबेज आहेत. कारण आपण मर्द मराठे असल्याकारणाने डोंगराळ प्रदेशातील युद्धात लष्कराच्या तुकड्या कशा हलवायच्या हे आपल्याला ठाऊक असते. त्या काळातल्या मूख सरसेनापतींनी मला विचारले नाही, असे कित्येकांचे मत दिसते. काश्मीरच्या खोर्‍यातून गिलगितकडे जायला रस्ता कुठे आहे? १९४७मध्ये हल्लीच द्विभाजित झालेल्या सैन्यापाशी रस्ता नसलेल्या प्रदेशात रसद पुरवायची साधनसामुग्री कितपत होती? जगाभरातली शाहाणी सैन्ये जमेल तेवढे सर्व विजय घेतात, आणि मगच "मोठ्या मनाने आम्ही वाटाघाटी करणार आहोत" असा आव आणतात. यात मुत्सद्दीपणा असतो. (शिवाजीराजांनीही सोयीनुसार युद्धे केलीत, सोयीनुसार तह केलेत.) पण छे! आम्ही चुटकी वाजवू आणि म्हणू, जितक्या सहज काश्मीर घेतले तितक्याच सहज गिलगित घेऊ. आम्ही पुण्यात बसलेले सेनापती रस्ता/रसद या असल्या फडतूस तपशीलांकडे लक्ष देत नाही.
मला वाटते हे उत्तर पुरेसे आहे.

In reply to by नितिन थत्ते

नितिन-जी, मी ते निवेदन शोधायचा प्रयत्न नक्की करेन पण २६/११ नंतर "याविरुद्ध भारताने लष्करी कारवाई केली तर ते बरोबरच ठरेल" असे विधान अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी केले होते इतके आठवते आहे. दुवा सापडल्यास नक्की इथे देईन. काळे

In reply to by सुधीर काळे

२६/११ नंतर "याविरुद्ध भारताने लष्करी कारवाई केली तर ते बरोबरच ठरेल" असे विधान अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी केले होते इतके आठवते आहे समजा, असे आवाहन केले जरी असले तरी, वस्तुस्थिती काय होती? अफगाणिस्थानात अमेरिकेला आपल्या बंदुका ठेवायला पाकिस्तानी खांदे हवे होते (अद्याप हवे आहेत). अशा परिस्थितीत, भारताने हल्ला केला तर हे खांदे जातील (किमानपक्षी कमी तरी होतील) आणि अमेरिकेला स्वतःचेच खांदे वापरावे लागतील. जे तिला नक्कीच नको आहे. तात्पर्य, एकाच विभागात दोन लढाया टाळण्याचाच प्रयत्न अमेरिका करणार, हे उघड आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी सदर वक्तव्य (केले असेलच) तरी ते निव्वळ राजकीयच होते, असे म्हणावे लागेल. अवांतर - हल्लीच बिटीश पंतप्रधांनांनीदेखिल पाकिस्तानबाबत एक वक्तव्य भारतात केले, जे भारतीय प्रसारमाध्यमांनी हुरळून जाऊन डोक्यावर घेतले. पण सदर महाशय हे इथे विमाने विकायला आले होते आणि संभाव्य ग्राहकाच्या भूमीत त्याला रुचेल असे वक्तव्य करणे हे (दुकानदारांचा देश म्हणवल्या जाण्यार्‍यांकडून) अपेक्षितच होते, हे लक्षात घेतले नाही!

In reply to by सुनील

सुनिल-जी, माझ्या आठवणीप्रमाणे २६/११नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते की अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो समर्थनीयच असेल. आता याच्यापेक्षा जास्त सूचक कोण काय बोलणार? त्यावेळी आपण हल्ला केला असता तर भारताला जागतिक नैतिक समर्थन मिळाले असते. अजूनही ती लिंक शोधतोय! कॅमेरॉन यांच्या बेंगळूरू येथील वक्तव्यानंतर पाकिस्तानने जो brouhaha केला त्याला दाद न देता ते आपल्या वक्तव्यावर आतापर्यंत तरी ठाम आहेत. मला वाटते कीं विकीलीक्सनंतर राजकारण्यांची परिस्थिती बदलली आहे. कारण पूर्वी जे फक्त त्यांनाच नीट माहीत असायचे ते आता सार्‍या जगाला कळलेले आहे! बघू जरदारी आणि त्यांच्या शुक्रवारच्या बैठकीत काय होते ते!

In reply to by सुधीर काळे

माझ्या आठवणीप्रमाणे २६/११नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते की अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो समर्थनीयच असेल.
ओबामा ढीग म्हणूदेत. एक म्हणजे 'समर्थनीय'चा अर्थ viable असा होतो का? (कृपया viableकरिता योग्य मराठी प्रतिशब्द कोणीतरी सुचवावा.) दुसरे म्हणजे, असा हल्ला करणे viable आहे, त्यातून दीर्घकालीन फायदा होण्यासारखा आहे, धोका फारसा नाही किंवा पत्करण्यासारखा आहे आणि तोटा नाही किंवा एकंदर फायद्यातोट्याच्या हिशेबात फायदा खूपच जास्त आहे, आणि इतर (गैरलष्करी) मार्ग उपलब्ध नाहीत अशा निष्कर्षाप्रत जर गणिताअंती (म्हणजे, तुम्हालाआम्हाला सांगितले नाही, तरी असे गणित त्यांनी केलेच असणार!) भारत सरकार आणि भारतीय लष्कर आले असते, तर केवळ ओबामांकडून समर्थनाची वाट पाहत बसले असते, आणि परवानगी मिळाली नसती तर सगळा कार्यक्रम रद्द करून बसले असते, असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटते का? ओबामांचे काय बिघडते समर्थन करायला? ते अमेरिकेच्या हितसंबंधांच्या दृष्टिकोनातून विचार करणार, भारताच्या नव्हे. भारताने असे काही पाऊल उचलल्यास त्याचे समर्थन करणे (किंवा त्याच्या आड न येणे) हे जर अमेरिकेच्या तात्कालिक हितसंबंधांच्या दृष्टीने हितावह असेल, तर ते समर्थन करणारच. 'हल्ला करणे समर्थनीय आहे' याचा अर्थ एवढाच, की 'तुम्ही हल्ला केल्यास आम्ही आड येणार नाही'. 'हल्ला करा' असा नव्हे. तो निर्णय ओबामा भारताच्या वतीने घेऊ शकत नाहीत, किंवा त्यासाठी त्यांनी परवानगी देण्या-नाकारण्याचा प्रश्नही येत नाही. (आपल्या माहितीसाठी: भारत हे एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे, आणि अमेरिकेचे अंकित राष्ट्र तर मुळीच नाही.) तो निर्णय शेवटी भारत सरकारने आणि भारतीय लष्कराने मिळून, परिस्थिती आणि आपले हितसंबंध यांचा विचार करूनच घ्यायचा असतो. आणि, या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यायला भारत सरकार आणि भारतीय लष्कर नक्कीच समर्थ आहे असे वाटते. (बाय द वे, माझ्या आठवणीप्रमाणे त्या वेळी हे वक्तव्य ओबामा यांनी केले होते. ओबामा हे तेव्हा अध्यक्ष म्हणून निवडून आलेले असले, तरी तोपर्यंत अध्यक्ष झालेले नव्हते. त्या क्षणी बुश हेच अध्यक्ष होते.) सरतेशेवटी, असांसदीय भाषा वापरण्याबद्दल क्षमा करा, पण भारत सरकार काय किंवा भारतीय लष्कर काय, हा येड*व्या आणि incompetent गाढवांचा बाजार आहे असे मला प्रामाणिकपणे वाटत नाही. त्यामुळे, Kindly give them a bit more credit for competence - I think they deserve it.

In reply to by पंगा

नितिन-जी आणि पंगा-जी, सर्वप्रथम उत्तर जरा लांबलचक आहे याबद्दल माफ करावे. तुम्हा दोघांच्या प्रतिसादावरून तुमचे वाचन प्रगल्भ आणि सखोल आहे हे लक्षात येते. इतरही कांहीं प्रतिसाद असेच किमती (valuable) आहेत. धन्यवाद! सर्वात आधी थोडासा शब्दच्छल! समर्थनीय म्हणजे "justifiable". "Viable"ला जवळचा शब्द म्हणजे व्यवहार्य किंवा किफायतशीर ("जमा-खर्चा"चा हिशेब केल्यावर). मी स्वत: आपण पाकिस्तानवर हल्ला करावा असे या लेखाच्या संदर्भात लिहिले नव्हते. फक्त गिलानींना अटक करून त्यांच्यावर खटला चालवावा व आरोप सिद्ध झाल्यास शिक्षा करावी हाच माझा सध्या तरी (रविवार ऐवजी शुक्रवार सुटी करण्यावरून) मुद्दा होता. सरकारी नियमाविरुद्ध केलेले असले कृत्य मुळीच चालू देता कामा नये असे मला वाटते. नितिन-जी आणि पंगा-जींना याबद्दल काय वाटते? गिलानी करत आहेत ते (आणि सरकार यावर कांहींही करत नाहीय़् ते) बरोबर आहे कां? दुर्लक्ष करण्यासारखे आहे कां? कीं शिक्षापात्र आहे? नेहमीप्रमाणे धागा जरासा भरकटला, पण विचार वेगवेगळे असले तरी मला वाचनीय वाटले. मदनबाण यांच्या एका प्रतिसादाला उत्तर देतांना म्हटले होते कीं हल्ला करायचाच होता तर तो २६/११ नंतर लगेच करायचा होता, तोही दहशतवाद्यांची प्रशिक्षणकेद्रें वेचून (precisions, surgical attacks). कारण त्यावेळी जग आपल्या बाजूला जास्त झुकले होते. आपण सार्वभौम राष्ट्र आहोतच. पण viability हा पंगांचा मुद्दा विचारात घेतला तर आपल्याला कोण समर्थन देईल आणि कोण देणार नाहीं हा विचार करायलाच हवा, नाहीं कां? त्यावेळी (२६/११ नंतर) खूप राष्ट्रे आपल्याशी सहानुभूती दर्शविणारी होती ही नक्कीच जमेची बाजू होती आणि त्याचा फायदा घेता आला असता व घ्यायला हवा होता. रहाता राहिला "सारासार विचार करणे" हा मुद्दा. पण आपण बर्‍याचदा Paralysis by Analysis चे शिकार बनतो हा विचार या उदाहरणात किती लागू पडतो आणि किती लोकांना तो भावतो यावर एकाहून जास्त मतें असू शकतील. लढाऊपणा हा गुण आपल्यात अभावानेच. गेल्या २५०० वर्षांत आपण कुणावरही आक्रमण केले नाहीं हा आपल्याला अभिमानाचा मुद्दा वाटतो. ही परंपरा जुनीच आहे. शिवाजीमहाराजांसारखे एकादे उदाहरण अपवाद म्हणून सोडले तर एरवी आपल्यावर इतरांनीच हल्ले केले, आपल्याला जिंकले व आपल्यावर राज्य केले. मग ते बहामनी असोत, मोगल असोत किंवा इंग्रज! मग भविष्यात कांहीं वेगळे करावे कीं जुनीच परंपरा चालू ठेवावी? कीं आपण कांहींच करू नये? मी एक उपाय सांगितला. मदनबाण यांनी त्यांचा सांगितला पण बहुतेकांनी अशा सल्ल्यांमधील/शिफारशींमधील त्रुटीच दाखविल्या. काय करावे हे क्वचितच सांगितले. शेवटी असे दिसते कीं आपले सैन्य वा आपले सरकार खूप विचारी आहे आणि म्हणूनच (विचारांती) निषेधखलिते पाठविणे हाच योग्य मार्ग आहे या विचाराचे आहे. म्हणून ते जे करत आहेत (किंवा नाहींत) तेच बरोबर असून त्याबद्दल सरकारचे कौतुक, सरकारची प्रशंसाच करणे योग्य? कधी-कधी वाटते की आपण जिंकतही नाहीं आणि शरणही जात नाहीं. पाकिस्तानने 'आपल्या' काश्मीरचा (पाकव्याप्त काश्मीरचा) तुकडा खुशाल चीनला देऊन टाकला व चीनशी दोस्ती केली. आपला भूभाग चीनने 'बळकावून' घेतला व 'दुश्मनी' केली. आपणही अक्साईचीन, अरुणाचलप्रदेश देऊन दोस्ती करावी कीं लढावे (चीनशी लढणे हा पर्याय तर viable नाहींच!) जे जे होईल ते ते पहात बसावे? सध्या तर तेल गेले, तूप गेले हाती धुपाटणे राहिले अशीच परिस्थिती नाहीं कां? ना आपण धूर्त आहोत ना धाडसी आहोत ना लढाऊ! मग काय आहोत? विचारवंत? नक्कीच. जरा जास्तच. पण एक राष्ट्र म्हणून याबद्दल विचार करायची वेळ आली आहे असे मला वाटते. आज वयाच्या ६८व्या वर्षीं माझे विचार जुनाट, बुरसटलेले वाटतील, असतीलही. पण तरुण लोकांना आपला भारत कसा हवा आहे? त्यांना भारतात कसे जगायचे आहे? मूग गिळून अपमान सहन करत कीं लढून जिंकत/मरत किंवा हरत? कीं फक्त उलट-सुलट विचार करत कीं भारत सोडून परदेशात वास्तव्य पत्करून? अनेक पर्याय आहेत! इस्रायल हेही एक उदाहरण आहेच, पण आपल्या स्वभावाला, जडण-घडणीला तो पर्याय सोयीचा नसेल तर सोडून देऊ व आपल्याला सोयीचा पर्याय वाटतो त्यानुसार कार्यवाही करू! हे मी उपहासाने लिहीत नसून पोटातल्या तळमळीने लिहितो आहे. आपण सार्वभौम आहोत हे सांगणे आणि तसे वागणे यातला फरक प्रत्येकाने आपापल्यापुरता ठरवावा आणि तसे वागावे, तसा सरकारला सल्ला द्यावा किंवा तोही न देता गप्प रहावे. अबब! किती हे पर्याय!!

In reply to by सुधीर काळे

>>ना आपण धूर्त आहोत ना धाडसी आहोत ना लढाऊ! मग काय आहोत? विचारवंत? नक्कीच. जरा जास्तच. पण एक राष्ट्र म्हणून याबद्दल विचार करायची वेळ आली आहे असे मला वाटते. आज वयाच्या ६८व्या वर्षीं माझे विचार जुनाट, बुरसटलेले वाटतील, असतीलही. पण तरुण लोकांना आपला भारत कसा हवा आहे? त्यांना भारतात कसे जगायचे आहे? मूग गिळून अपमान सहन करत कीं लढून जिंकत/मरत किंवा हरत? मिपावर विचारवंत ही एक शिवी म्हणून वापरली जाते (मी पण ती एकदा वापरली आहे). तुम्ही ज्याला "मूग गिळून अपमान सहन करीत" आणि "लढून जिंकत/मरत" म्हणत आहात त्याविषयी थोडेसे. मला वाटते आपण "मू गि अ स क" लढाई न करून जे साध्य केले आहे ते आपल्या शेजार्‍याने काल्पनिक मानासाठी "ल जिं/ह किं म" साध्य केले नाही. मानापमानासाठी युद्धे न केल्यामुळेच आपण आज जी प्रगती केली आहे ती करू शकलो आहोत. अर्थात आपल्या देशाच्या नेत्यांनी पुरेशी डिटरंट शक्ती ठेवण्याचे भान नेहमीच ठेवले आहे. म्हणूनच सुरुवातीला युद्धे तीनचार वर्षांच्या अंतराने झाली तरी नंतर ३९ वर्षे युद्ध झाले नाही. पाकिस्तानशी एकदाच एखादा महिना काय ते युद्ध केले की तो प्रश्न कायमचा सुटेल अशी जर तुमची धारणा असेल तर मला वाटते तुम्ही 'नंदनवनात' रहात आहात. पाकिस्तानची युद्ध तयारी आपल्यातल्या बर्‍याच स्वयंघोषित तज्ञांना वाटते तेवढी कच्ची नसावी आणि हे सत्य खर्‍या तज्ञांना (पक्षी=आपले लष्करप्रमुख) माहिती असावे. स्वयंघोषित तज्ञांना वाटते तसे खरेच असते तर आपल्या देशाने सबुरीचे धोरण ठेवले नसते असे मला व्यक्तिशः वाटते. (बाकी २५०० वर्षात आपण आक्रमण केले नाही वगैरे चालू द्या).

In reply to by नितिन थत्ते

नितिन-जी, आपल्या मतांची दखल घेतली आहे पण आता आणखी कांहीं टिप्पणी नाहीं. मी कुठल्याच विषयाचा-राजकारण आणि युद्धशास्त्र-तज्ञ नाही किंवा तसा आवही आणत नाहीं. पण काश्मीरमध्ये कुणी शुक्रवारी सुटी जाहीर करतो आणि ती सूचना 'स्टेट बँक ऑफ इंडिया'सारख्या संघटनाही पाळू लागतात याचे दु:ख झाले इतकेच.

In reply to by सुधीर काळे

ही घटना दुखःद, संतापजनक तर आहेच... अलार्मींग देखील आहे. नितीनजी आणि इतरांनी म्हटल्याप्रमाणे आपले सरकार योग्य ति कारवाई करत असणारच. पण या कारवाईचा डेमोंस्ट्रेटीव्ह इफेक्ट दिसत नाहिये खरा. आणि हेच मला वाटतं तुमच्या उद्वीगनेचं कारण आहे. (जे जे होईल ते ते पहाणारा) अर्धवटराव

In reply to by नितिन थत्ते

सहमत अजून एक कारण म्हणजे युद्ध सुरु झाल्यावर लढाऊ विमाने आणि इतर अनेक यंत्रांचे सुटे भाग लागतात, ते आणि इतर अनेक गोष्टी उदा. पेट्रोल आपण आंतरराष्ट्रीय बाजारातून विकत घेतो. बड्या देशांच्या मनाविरुद्ध युद्ध सुरु केले तर आपण ते पूर्ण करू शकणार नाही. शिवाय निर्बंध लादले जाणेही परवडणार नाही.

In reply to by मदनबाण

मदनबाण-जी, शाबास! तुम्ही जो उपाय सुचवला आहे तो १३ डिसेंबर २००१ नंतर २-३ दिवसात भाजपा सरकारने करायला हवा होता व सध्याच्या सरकारने २७/२८ नोव्हेंबर २००८ला करायला हवा होता. त्यावेळी सारे जग आपल्याबरोबर होते. या दोन्ही संध्या (कीं संधी) आपण घालवल्या! आताही करायला हरकत नाहीं, पण त्यात 'गरमी' नाहींय्. त्यावेळी आपण आबांना व शिवराज पाटलाना दरवाजा दाखविण्यापलीकडे कांहींच केले नाहीं. (Line of least resistance?) त्यातले आबा तर परतही आले! सोनिया-जींना हवे असेल तर शिवराजही आज-उद्या परत येतील! मदनबाण-जी, पण या धाग्यात तुमची जी मते मी वाचली ती तुम्ही लिहा ना पंतप्रधानांना! नुसते आतल्या-आत धुमसू नका.

In reply to by सुधीर काळे

काळे काका, मी अजुन तरी पत्र व्यवहार करावा या मताचा नाही. कारण आपल्या नेते लोकांना देशाची काही पडली असे मला अजिबात वाटत नाही !!! संसदेत अतिरेकी घुसले होते ना,तेव्ह्या ह्या मंत्री-संत्री लोकांची पार तंतरली होती...कारण आयुष्यात पहिल्यांदाच "त्यांच्या" जिवाला धोका निर्माण झाला होता ना !!! प्रत्येक नेत्यांच्या ढुंगणात ४ गोळ्या अतिरेक्यांनी ठोकल्या असत्याना मग बरोबर या लोकांनी आरपारच्या लढाईची मागणी केली असती !!! आता काय सिमेवर जवान स्वतःचे प्राण पणाला लावत आहेत, त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. या नेता लोकांना फार देश सेवा करायची हौस असते ना,मग यांनाच बॉर्डरवर काही दिवस काढायला लावले पाहिजेत, करा देश सेवा. जाता जाता :--- एकदा सहज रस्तांने जाताजाता अशीच चर्चा माझ्या कानावर आली होती,त्यातला एक म्हणाला अरे अतिरेक्यांनी जर संसदे मधे या नेत्यालोकांना ठार मारले असते ना तर हिंदुस्थानातला अर्धा भ्रष्टाचार एका क्षणात संपला असता.,निदान देशाचं काही तरी भलं या अतिरेक्यांनी केलं असतं !!! असो...तुम्ही पत्रव्यव्हार करत रहा,परमेश्वर करो आणि तुमच्या पत्ररुपी विचारांनी देशहित साध्य होवो. अवांतरः--- कॉमनवेल्थ गेम्स हा भ्रष्टाचाराचा नवीन गेम आपल्या भ्रष्टाचारी लोकांनी खेळला आहे, साला लायकी नसेल तर खेळ स्पर्धा भरवतात तरी कशाला ? सार्‍या जगात नाव खराब मात्र होणार आपले. :(

In reply to by मदनबाण

मदनबाण-जी, आपल्या प्रतिक्रियेची नोंद घेतली आहे पण त्यावर कांहींही टिप्पणी करायची नाहींय्

युद्धा कोणाला हवे असते ? पण जर तुमच्यावर लादले जात असेल तर ? इतके निरपराधी लोक आत्ता पर्यंत बॉम्बस्फोटात मारले गेले आहेत्,अजुन किती लोकांचा बळी आपण द्यायचा आहे ?जे सिमेवर जीव मुठीत ठेवुन जगतात त्यांनी तसे का जगावे ? आंतरराष्ट्रीय दबाव आपल्या देशावर का ? जो आपल्या देशामधे घातपात घडवुन आणतोय त्याच्यावरच अजुन का वाढवता येउ नये ? आज पाक व्यात काश्मिर पाकड्यांनी चीनला आंदण दिले, चीन व्याप्त अक्साई भाग आहेच !!! म्हणजे युद्धाच्या हानीला घाबरुन आपण असेच देशाचे लचके तोडुन दिले पाहिजेत काय ? मग कशाला असले धागे काढायचे आणि पत्र व्यवहार का करायचा ? जिसकी लाठी उसकी भैस !!! तुम्ही दुबळे असला तर शक्तिशाली माणुस सांगेल तेच तुम्हाला ऐकावे लागणार...मग तुम्ही ठरवा तुम्हाला शक्तीशाली व्ह्यायचे आहे की दुबळे !!!

एक गोष्ट लक्षात आली. आश्चर्य वाटले नाहीं पण कांहींसे वैषम्य नक्कीच वाटले. मीच लिहिलेले 'फसवणूक'चे १९वे प्रकरण, ज्याचा शेवटचा १०-१५ टक्के भाग (आपल्या सर्वांच्या आणि देशाच्या long term हिताच्या दृष्टीने) प्रत्येक भारतीयाने वाचायला हवा त्याची फक्त १७९ वाचने झाली व मोजून पाच प्रतिसाद आले त्याविरुद्ध काश्मीरवरील लेखाची १३००-१४०० वाचने झाली व कदाचित् प्रतिसादांचे शतक होईल. यावरून मिपावरील वाचकांची एक वेगळीच profile मला दिसली. तिची कल्पना होतीच पण आता जास्त खात्री झाली. हा प्रतिसाद इथल्या मूळ लेखाशी थेट संबंध नसलेला प्रतिसाद आहे, पण तरीही तो लिहायला हीच जागा बरोबर वाटली म्हणून लिहिला आहे!

माझ्या वरील लेखावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यात श्री नितिन थत्ते आणि पंगा-जी यांच्या प्रतिक्रिया माझ्या म्हणण्याच्या विरुद्ध असल्या तरी त्या माहितीपूर्ण होत्या आणि मला खूप 'अपील'ही झाल्या होत्या (आता हे मराठीत कसे लिहायचे?). पण गेले कांहीं दिवस एक वेगळाच विचार डोक्यात थैमान घालतोय्. तो म्हणजे कुणाला कुणी काय म्हणायचे! उदा. मुशर्रफ नेहमी म्हणायचे कीं काश्मीरात ज्यांना आपण दहशतवादी म्हणतो ते स्वातंत्र्यसैनिक आहेत. पण जेंव्हां मुशर्रफ यांची गाडी उडविण्याचा दोनदा अयशस्वी प्रयत्न झाला त्यांना मात्र त्यांच्याच "In the line of fire" या पुस्तकात मुशर्रफनी दहशतवादीच म्हटले आहे. याबद्दल मी त्या पुस्तकाच्या प्रकाशकांतर्फे मुशर्रफना आव्हानही दिले पण नेहमीप्रमाणे ते त्यांच्या one-ended bag मध्ये गेले असावे. (तरीही असे आव्हान वेळोवेळी द्यायला हवे हेच माझे मत आहे). आत विचार येतो कीं 'स्वात' इथे जे होतंय ते काय आहे? ते बंड आहे कीं स्वातंत्र्ययुद्ध? तिथे पाकिस्तानी लष्कराने हजारो लोक मारले. ते मात्र सगळे एकजात दहशतवादी! एकही civilian मेल्याची बातमी नाहीं. आणि नुसती पाकिस्तानी मीडियाच नव्हे तर सार्‍या जगातही अशाच बातम्या कीं "इतके-इतके दहशतवादी मारले गेले." Long War Journal नावाचे एक ई-पत्र मी वाचतो. बिल रोगियो नावाचा (बहुदा) अमेरिकन त्याचा संपादक आहे. त्यालाही मी लिहिले होते कीं तू असे कसे लिहितोस? इतका precision बाँबहल्ला किंवा गोळीबार प्रत्यक्ष देवालाही जमणार नाही मग ड्रोन्समधून किंवा पाकिस्तानी लष्कर असा precision हल्ला कसा काय करू शकते? (त्याचे मात्र उत्तर आले कीं तो फक्त संकलित वार्ता देतो.) आता आपल्या ताब्यातल्या काश्मीरमध्ये जे होत आहे त्याला आपलीच मीडिया वेगळा रंग का देते? आपण खरे कां बोलतो? पाकिस्तानी मीडियाप्रमाणे आपण एकतर्फी बातम्या कां देत नाहीं? आज काश्मीरमध्ये जे गेल्या महिन्याभरात ४०-५० लोकांना मृत्यू आला त्यांना आपलीच मीडिया दहशतवादी कां म्हणत नाहीं. आपल्याला सदसद्विवेकबुद्धीची टोचणी जरा जास्तच आहे कां? आणि पाकिस्तानी मीडियाला अजीबात नाहींच आहे काय? म्हणजे हे शस्त्रास्त्रांचे आणि वाग्युद्ध भलतेच एकतर्फी होत आहे! या सर्वाचा तारतम्याने विचार व्हायला हवा. अलीकडेच (२-३ दिवसांपूर्वी) आपल्या 'विचारी' पंतप्रधानांनी घोषणा केली कीं 'घटनेतील तरतुदीं'नुसार काश्मीरला स्वायत्तता द्यायला सरकार तयार आहे. (मला वाटते कीं ते अका सर्वपक्षीय बैठकीत होते. इतर पक्षांची प्रतिक्रिया वाचनात आली नाहीं.) माझा समज होता कीं आतापर्यंत अशी स्वायत्तता दिलीच आहे, मग आणखी काय देणार आहेत ममोसिं? आपले धोरण असे बोटचेपे आणि कचखाऊ कां? ३७० कलम आपण कां ठेवले आहे? मी आणि माझ्यासारखे अनेक नागरिक विचार न करणारे, भावनाप्रधान व अपुर्‍या माहितीवर आधारित सल्ला सरकारला देतात असा आरोप माझ्यावर झाला व तो १०० टक्के खराही आहे. मग विचारी, माहिती असलेले आणि भावनेच्या आहारी न जाणारे आपले पंतप्रधान जे करत आहेत (किंवा जे करत नाही आहेत) ते बरोबरच म्हणायचे काय? छे! विचार करकरून सुन्न व्हायला होतं! ’मिपा’करांना काय वाटते?

काळेसाहेब, तुम्ही नक्की काय वाचता? केवळ डॉनच नव्हे तर, इतर पाकिस्तानी वृत्तपत्रेदेखिल अमेरिकी ड्रॉनमुळे अमुक इतके सिविलियन मेले, अशा बातम्या दर दिवसाआड एकदा देतात. त्यांना ते दहशतवादी म्हणत नाहीत. हे वाचा . विशेषतः खालील परिच्छेद- डॉनच्या १८ जुलैच्या वृत्तपत्रातील. The drone attacks have been disproportionate to their objectives, causing avoidable loss of human life and resources .... Drone attacks are reprehensible not only in their violation of Pakistan’s sovereignty but also for the civilian deaths they cause and which are becoming increasingly frequent. So far, 144 drone strikes have been carried out in the tribal areas with 1,366 civilian casualties, according to the US National Counterterrorism Center.

In reply to by सुनील

अमेरिकन ड्रोन हल्ला पाकड्यांच्या विविध भागात होत आहे,पण त्यातुन पाकडे इतके उत्साहित आणि प्रभावित झाले आहेत की ते आता स्वतः ड्रोन विकत घेणार आहेत...ते सुद्धा अमेरिकेला फाट्यावर मारुन !!! जास्त माहिती इथे मिळेल :--- http://siyasipakistan.wordpress.com/2010/07/17/turkey-to-sell-anka-dron… http://rupeenews.com/2010/07/16/turkey-to-sell-anka-drone-aircraft-to-p… आता याच्या विरुद्ध आपण आपले संरक्षण करण्यासाठी काय तयारी करतोय ते म्या गरीबाला ठाव नाय...

सुनिल-जी, मी असे पाहिले आहे कीं पाकिस्तान आणि अमेरिकन सरकारांच्यादरम्यानाचे संबंध एका विशिष्ठ वेळी कसे असतात यावर हे अवलंबून असते. जेंव्हां पाकिस्तानी लष्कर स्वातमध्ये बंड मोडायच्या मागे होते तेंव्हां सगळे मारे अचूक असायचे. आता विकीलीक्समुळे भांडे फुटल्यावर झालेला बदल मीही पाहिला आहे, विशेषतः अफगाणिस्तानबद्दलच्या हल्ल्यांबद्दल. पण मुख्य मुद्दा तो नाहीं. आपण काश्मीरमध्ये काय करायला हवे हा आहे.

घटनेच्या ३७० व्या कलमाच्या "ग्राउंड रिआलिटी" विषयी एक लेख [येथे] पाहता येईल. लेखात मांडलेले मुद्दे खरे आहेत कि नाही याबाबत खात्री नाही.

सुनिलसाहेबांच्या इतके नसेल पण मी बरंच वाचतो. परवाच्या त्यांच्या प्रतिसादानंतर BBC वरचा हा अलीकडचा नवा लेख वाचनात आला. त्याचा दुवा खाली दिला आहे. उघडून वाचल्यास आम्हा दोघांच्या (आणि कांहीं इतरांच्या) perceptions मधील फरकाचे कारण कदाचित उघड होईल. १००टक्के सत्य-असत्य फक्त त्या परमेश्वरालाच ठाऊक!! हा दुवा वाचा! http://www.bbc.co.uk/news/mobile/world-south-asia-10728844?SThisEM त्यातील खालील वाक्य महत्वाचे, पण पाकिस्तान्यांचा दुटप्पीपणा कांहीं नवा नाहीं! Often, after drone missile strikes, the Pakistani army will release a statement saying all of the casualties were from the various militant groups based in the area, only for local residents to say civilians have been killed. थोडक्यात काय कीं आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्टं! पाकिस्तानी लष्कराने केलेल्या (आणि अमेरिकन ड्रोन विमाने पाकिस्तानी लष्कराच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या स्वात हल्ल्याला पूरक म्हणून केलेल्या) कत्तलींत फक्त अतिरेकी टिपून-टिपून मारले जातात. एकही नागरिक त्यात मरत नाहीं. पण तीच ड्रोन विमाने जेंव्हा अफगाणिस्तानमध्ये प्रक्षेपणास्त्रे डागतात तेंव्हां (आणि तेंव्हांच) नागरिक मरतात. भारतीय फौजांनी केलेल्या हल्ल्यातही नागरिक मरतात. पुन्हा खायचे आणि दाखवायचे दांत निराळेच. सार्‍या दुनियेला सांगायचे कीं फक्त अतिरेकी मेले आणि वझीरिस्तानी जनतेला नागरिक मेल्याचे सांगायचे. खरं तर असे टिपून-टिपून अतिरेकी कुणालाच मारता येत नाहींत. त्यांच्या बरोबर आसपासचे नागरिक मरणारच. पण अपप्रचार पहा कसा चालतो ते! पाकिस्तानी सरकार आणि लष्कर फारच धूर्त आणि लबाड आहे हे माहीत होतेच पण अशी माहिती वाचायला मिळाली कीं या दुटप्पीपणाचा पुनःप्रत्यय येतो!