Skip to main content

मुळांनी धरू नये अबोला

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 14/12/2016 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुळांनी जमिनिशी अबोला धरून पानाफुलांना अडचणीत आणू नये त्या बिचाऱ्यांच्या वाऱ्याशी बहराच्या गप्पा रंगलेल्या असतात आपले अधाशी कोंब घेऊन वाट फुटेल तिकडे फुटू नये जुन्या खंबीर इमारतीही मग भेगाळून ढासळू लागतात घनघोर तूफान येतं चालून तेव्हा आपली जागा सोडू नये मुळांवर विसंबूनच तर फांद्या तूफानाशी लढू शकतात जावं खोल खोल रूजून, मातीवर उघडं पडू नये वर कोरड्या उफाड्यात खाली झुळझुळ झरे असतात इमान राखावं जमिनीशी, आभाळाकडे व्यर्थ पाहू नये उन्मळून वर आलेल्या सांगा, मुळांना काय अर्थ आहे? - संदीप चांदणे
लेखनविषय:

वाचने 7852
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

मस्त लिहिले आहे. फक्त एवढेच वाटते की, उपेक्षा मुळांची कुठेही नसावी फुलांची मुळांशी गोड गट्टी असावी घनदाट फांद्या नको गर्व त्यांना मुळांचे स्मरण असो डहाळ्यांना

आवडलीय कविता. -दिलीप बिरुटे

कविता खूप म्हणजे खूपच आवडली संदीपभाऊ

सर्व वाचक आणि प्रतिसाद देणाऱ्या रसिकांचे सर्वात आधी आभार. नवीन प्रतिसाद आले आणि 'अबोला' विषयाशी संबंधित दोन काव्यपुष्प मेनबोर्डावर आले म्हणून हा प्रतिसाद. अबोला खरंतर वाईट. शरीराने जवळ असलेले दोन जीव मनाने खूप दूर जातात आणि त्यातील अंतर अजून वाढवण्याचे काम हा अबोला 'शांत'पणे करत राहतो. कवितेत त्याला उतरवताना ज्या कविला तो जसा दिसेल तसाच उतरेल. उदाहरणादाखल हीच कविता माझ्या एका जवळच्या मित्राच्या वैवाहिक आयुष्याला पाहून मी त्याला समजावण्यासाठी लिहिली आहे. मला जे कदाचित जवळ बसून परखडपणे किंवा योग्य भाव आणि शब्द जुळवून सांगता आलं नसतं ते मला कवितेतून लिहिता आलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी हे केलं त्याला ते उमजलं. अजून, दुसऱ्या एका जवळच्या मित्राच्या आयुष्यातही असंच काहीसं घडत होतं तेव्हाही 'अबोला' नावाची कविता लिहिली आणि त्याला वाचून दाखवली. सुदैवाने, घटस्फोटापर्यंत गेलेलं ते प्रकरण आता निवळून सुरळीत सुरू आहे. माझ्या कवितेचे त्यात योगदान नाही पण माझे दोन शब्द मी मला वाटले तसे लिहिले आणि पोचवले. नवा कवितेचा धागा नको वाटतोय म्हणून ती कविता खाली देत आहे. तुझे शब्द ना माझ्या कानावर ना माझे शब्द तुझ्या कानावर होतील अशाने भावना अनावर राहील कुणी कसे मग भानावर? शब्द तुझ्याजवळ नाहीत शब्द माझेही संपले नव्या ओळी रचण्याची सांग जबाबदारी कोणावर? पूर्वी अनोळखी होत्या वाटा ज्या जुळाल्या अजूनही रस्ता पुढेच आहे नजर खिळली का मग फाट्यावर? कागदाचे काही कपटे मर्मबंधाची ठेव होतील मग, उलगडून वाचताना, शब्द ओघळतील गालावर चांदण्या रात्री आकाश पाहताना जाणवेल भेसूर नीरवता नकोसा वाटेल मग चंद्रही उगवता आणि घड्याळाचे पडतील ठोके-ठोक्यावर! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

कागदाचे काही कपटे मर्मबंधाची ठेव होतील मग, उलगडून वाचताना, शब्द ओघळतील गालावर चांदण्या रात्री आकाश पाहताना जाणवेल भेसूर नीरवता नकोसा वाटेल मग चंद्रही उगवता आणि घड्याळाचे पडतील ठोके-ठोक्यावर! हे विशेष आवडले.