Skip to main content

कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 07/12/2020 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयाचे आधीचे संदर्भ : १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज ३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य ४. पूरक विषय: पल्स ऑक्सीमीटरचे गमभन मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! ……………………………………….. करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा : डिसेंबर 2019 : चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते. * 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली. जानेवारी 2020 : * या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला. * हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले. * WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. फेब्रुवारी : बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू. मार्च : * 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर. * HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू. * संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर. * भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद. एप्रिल-मे : * Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता. * रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच. * अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली जुलै : हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन. ऑगस्ट : बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता. सप्टेंबर : जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला. ऑक्टोबर : * Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला). • भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला. नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता. डिसेंबर २०२० : • काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंडने ८ डिसेंबरला लसीकरण सुरु केले. • आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित. ............... ok समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे ! लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा. एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा ! .............................................................................

वाचने 84106
प्रतिक्रिया 183

प्रतिक्रिया

पुणे येथील सीरम इंस्ट्यूट ऑफ़ इंडियाने तयार केलेली कोविशील्ड लस पुढील महिन्यात अनुक्रमे डॉक्टर्स, कर्मचारी आणि सामान्य जनता असे यांना मिळणार आहे, असे बातम्या वगैरे वरुन समजते. बाकी वर्षभरापूर्वी सुरुवातीच्या करोनाच्या कहर आणि बातम्यांनी जग किती शील्लक राहील अशी भीती वाटून गेली होती, आज मागे वळून पाहिल्यावर करोना काळ भयंकरच होता, पण तो काळ काळजी घेतली तर तितका भयंकरही नव्हता असे वाटते. असो. सर्वांना लस मिळावी, सर्व लोक ठणठणीत व्हावेत. लोकांचे प्रवास, नोक-या, पार्टी, लफडी, पर्यटन सर्व पूर्वीप्रमाणे व्हावे हीच विज्ञानेश्वराला प्रार्थना. बाय द वे, एक व्हीडीयो पाहण्यात आला होता. वाट्सपयुनवर्सिटीतच आला होतो who च्या नावावर की करोना एक सीजनल फ्लू होता वगैरे. असेच काही तरी व्हावे असे वाटते. -दिलीप बिरुटे

एक वर्ष झालं सुद्धा ! हे म्हणजे जागतिक महायुद्धासारखेच - फक्त शत्रू समोर सहज न दिसणारा विषाणू. ...सर्व लोक ठणठणीत व्हावेत. लोकांचे प्रवास, नोक-या, पार्टी, लफडी, पर्यटन सर्व पूर्वीप्रमाणे व्हावे हीच विज्ञानेश्वराला प्रार्थना...... याला तथास्तु !

सहकारी बंधूंचे आभार !
लोकांचे प्रवास, नोक-या, पार्टी, लफडी, पर्यटन सर्व पूर्वीप्रमाणे व्हावे
>>> +१११११ 😎 😈

छान आढावा!
लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
पोलिओचा डोस द्यायला जेसे घरोघरी येतात तसे तुमच्या घरात कोणी लस घ्यायचे बाकी राहिलंय का? असे विचारायला आरोग्यसेवक येत नाहीत तो पर्यंत कोविड साठीची लस घ्यायची नाही असा ठाम निर्धार केला आहे 😀 विनोदाचा भाग बाजूला ठेऊ, पण खरोखर लसीकरणाला सुरुवात झाल्यावर किती लोकं लस टोचून घेण्यासाठी गर्दी करतील/झुंबड उडेल ह्याची कल्पना करवत नाही! लवकरात लवकर ह्या आजाराचे पृथ्वीतलावरून समूळ उच्चाटन होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

कोविड लसीकरण लवकर सुरु होईल असे वाटतेय. मे बी जानेवारी पासून. व्यक्तिशः मला लस टोचून घेण्यास थोडं अंकफर्टेबल वाटतेय. लस फार च घाई गडबडीत तयार केलेली आहे. तिची विश्वासार्हता किती हा नक्कीच वादाचा विषय होईल. आणि लॉन्ग टर्म ( उशिरा दिसून येणारे ) साईड इफेक्ट काय असतील ते अजुन नेमके क्लिअर नाहीये. त्यामुळे शक्यतो जितक्या उशिरा लस घेता येईल तितक्या उशिरा घेईल. तोवर मास्क, सोशल डिस्टन्स, साबण, सैनिटायझर हेच करेल. अर्थात हे माझे वयक्तिक मत ( आजच्या घडीला ) आहे आणि ते नंतर बदलू शकते.

In reply to by बाप्पू

लस फार च घाई गडबडीत तयार केलेली आहे. काही गोष्टी काही गोष्टीत आजच्या तंत्रज्ञानाने फरक झाला आहे . उदा पूर्वी डेटा गोळा करणे, त्याचे पृथक्करण करणे यात प्रचंड वेळ जात असे. हा वेळ आंतरजाल आणि वेगवान संगणक यामुळे अतिशय सोपे झाले आहे. याशिवाय बहुसंख्य लसी या पूर्ण विषाणूंमुळे तयार झालेल्या नसून त्याच्या अर्ध्या पाव भागापासून बनलेल्या आहेत त्यामुळे या लसींमुळे कोव्हीड होण्याची शक्यता खूप कमी आहे. अर्थात लसीमध्ये जैविक कच्चा माल वापरला आहे त्याची ऍलर्जी किंवा त्याचा शरीरावर आणि शरीराची त्याला प्रतिक्रिया काय असेल हे लगेच सांगणे कठीण आहे. परंतु आज जर कोव्हीड चा मृत्यू दर १ टक्का ( शंभरात एक)असेल तर लसीमुळे होणारे मृत्यू दहा हजारात एक( कदाचित १० लाखात एक असेल. तेंव्हा वयाच्या ६० वरील वृद्ध माणसे, मधुमेह रक्तदाब हृदयविकार मूत्रपिंड विकार सारखे रोग असलेले वृद्धच नव्हे तर ४० वयावरचे मध्यमवयीन आणि आरोग्य कर्मचारी यांनी उपलब्ध झाल्याबरोबर लस घ्यावी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मास्क, सोशल डिस्टन्स याबद्दल आपण काळजी घेतली तरी जनतेची बेफिकिरी आपल्याला महाग पडू शकेलच. ( मी अशाच बेफिकीर रुग्णांचा बळी आहे) साबण, सैनिटायझर हे एकंदर आरोग्यासाठी कायम चालू ठेवावेच (कोव्हीड गेल्यावर) सुद्धा यात शंकाच नाही

विचारायला आरोग्यसेवक येत नाहीत तो पर्यंत कोविड साठीची लस घ्यायची नाही शक्यतो जितक्या उशिरा लस घेता येईल तितक्या उशिरा घेईल.
एक सामान्य नागरिक म्हणून हे योग्य विचार आहेत. +११ लशी घाईत केलेल्या आहेत. अधिक धोकावाल्या गटांना शिफारस असावी. सामान्यांना सक्ती नको .

In reply to by मराठी_माणूस

अधिक धोकावाल्या गटांना म्हणजे उदाहरणार्थ खालील गटातले लोक : १. वय 70 वरील २. मधुमेह आदी दीर् कालीन आजार असलेले ३. वृद्धाश्रमात राहणारे आणि ४. सर्व प्रकारचे आरोग्यसेवक

In reply to by हेमंतकुमार

जसा कोवीड चा संसर्ग ह्या लोकांना होण्याचा जास्त धोका असतो तसाच त्यांना लसीचा धोका (अजुन माहीत नसलेला ) ही अधिक असु शकतो ना ? म्हणजे ह्या लोकांनी नेहमीपेक्षा अधिक काळजी (त्रिसुत्री, वेळच्या वेळी औषधे, आहार, तपसण्या इत्यादी) घेणे हे लस घेण्या पेक्षा जास्त चांगले नाही का ?

In reply to by मराठी_माणूस

दीर्घकालीन आजार असलेल्या वृद्ध व्यक्तीला समजा संसर्गातून कोविड झाला, तर या गटात मृत्यूचे प्रमाणही तुलनेने जास्त असते. त्या तुलनेत अशा व्यक्तींना लसीचा धोका कमी स्वरूपाचा राहतो - म्हणजे मर्यादित स्वरूपाची अलर्जिक प्रक्रिया इत्यादी. त्याचे एकूण प्रमाणही तसे कमी असते. म्हणून इथे फायदा/ तोटा याची याची तुलना करता त्रिसूत्री अधिक लस हे फायदेशीर ठरावे. अर्थात असा निर्णय घेताना संबंधित रुग्णाचा वंश, सद्य आजाराची तीव्रता किंवा स्थिती आणि डॉक्टरांचे मत या सगळ्यांची सांगड घालावी लागेल.

In reply to by हेमंतकुमार

लस न घेता बाकीच्या गोष्टी नीट पाळल्या आणि संसर्ग होउच न देण्याची काळजी घेतली तर लस टाळु शकतो असे वाटते

संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत सहमत. “...If we are able to vaccinate a critical mass of people, and break that virus transmission, then we may not have to vaccinate the entire population,” सगळ्यांना लस देण्याची गरज नाही ईती ICMR. पहील वाटायच हं.. काहीही दाखवतात. पण आता झोम्बी फिल्मस बघायला लागलो आहे.

गोंधळी , झोंबीचा संदर्भ नाही समजला. .................... योगेश, लसींचा हा तक्ता : ok प्रत्यक्ष उपयुक्तता वापरानंतरच कळेल.

In reply to by हेमंतकुमार

करोना सद्रुश्य व्हायरसवर एक फिल्म आली होति. पण झोंबी व्हायरसवर खुप फिल्म्स आहेत. त्यामुळे कुतूहल वाटते.

In reply to by हेमंतकुमार

वरील तक्ता वर्ड मधून जे-पेग करताना मराठी अक्षरांचे रफार का विस्कटतात ? कुणी तंत्रद्न्य सांगेल का?

In reply to by हेमंतकुमार

त्यावर उपाय म्हणजे तक्ते jpeg format मधे न देता html table मधे द्यावेत. नमुन्यादाखल वरील तक्ता html table अगदी बेसिक स्वरुपात खाली देत आहे.
औषधोद्योग निर्मिती व तांत्रिक मुद्दे लस वाहतूक व वितरण माणशी डोस शेरा
Pfizer शुद्ध लस, टिकाऊ, रसायन विरहित, उत्पादन वेगात. उणे ७० C तापमान आवश्यक २:२१ दिवसांच्या अंतराने. दुसरा डोस त्याच उत्पादकाकडून घेणे, पाठपुरावा लागेल.
मॉडर्ना वरील प्रमाणेच उणे ४ C तापमान आवश्यक २:२८ दिवसांच्या अंतराने. वरील प्रमाणेच
Astra Z उत्पादन वेळखाऊ, लस साठवण सोपी. अतिशीत तापमानाची गरज नाही. वरील प्रमाणेच
J & J वरील प्रमाणेच वरील प्रमाणेच फक्त १ निरंक

In reply to by टर्मीनेटर

वा ! धन्यवाद. पण त्यासाठी html table शिकावे लागेल मला. बघू एकदा सवडीने. जे पेग जालावर स्वयं करून मिळते.

In reply to by हेमंतकुमार

पण त्यासाठी html table शिकावे लागेल मला.
हो, कुमार साहेब पण ते शिकणे अतिशय सोपे आहे. किंवा अजून एक सोपा online उपाय आहे त्यासाठी. वर्ड मध्ये टेबल बनवण्यापेक्षा गुगल ड्राईव्ह वर एक नवीन google doc तयार करून (फायर फॉक्स ब्राउझर वापरून) त्यात टेबल बनवायचे, आणि फायर फॉक्स देत असलेल्या 'Take a Screenshot' पर्यायाचा वापर करून png format मधली इमेज मिळवायची. (कुठलेही 3rd पार्टी app वापरायची गरज भासत नाही). चला त्या निमित्ताने मला एक लेखन विषय मिळाला, आता ह्यावर तंत्रजगत विभागात लवकरच एक धागा काढतो 😀

यापुढे अपत्यप्राप्ती करण्याचा कुठलाही प्लॅन / गरज / इच्छा उरलली नसलेल्या लोकांनी लस टोचुन घ्यावी. विशेषतः ३०-४० वयोगटातल्या लोकांनी. असं केल्याने लशीचे काहि दुष्परीणाम असतीलच तर ते पुढील पिढीत संक्रेमीत होण्याचं टाळता येईल.. शिवाय पुढच्या ४०-५० वर्षात या लस घेतलेल्या लोकांचा डाटा तपासता येईल...

अ आ, नेहमीप्रमाणेच सुरेख चित्र. तुमच्या चित्रातील पिस्तुलामुळे आता मिपावरुन या विषाणूचा नायनाट झाला आहे ! तेव्हा सर्व मिपाकरांनी निर्धास्त राहावे 😀 😀 😀

ही साथ सुरू झाल्यापासून अनेकानी ( त्यात अनेक मेडिकल प्रोफेशनल ही आले ) आपले ज्ञान पाजळले ! १९१८ साली साथीचे रोग कसे पसरतात ,त्यात नैर्सर्गिक प्रतिकारशक्तीचा किती वाटा ? याबद्द्ल आजच्या इतके ज्ञान कुणालाही असेल असे वाटत नाही. तरीही अनेक लोक त्यातून रोग न होताही वाचले याला त्यावेळी जागतिक पातळीवर माणूस आजच्या इतका सम्पर्कात नव्हता असेही कारण कोणी देतील .पण सारी काळजी देवाला असे मानले तर विषाणू व जीवाणू चा अभ्यास करून प्रतिपिन्डे निर्माण करण्याची अजब देणगी काहीना जन्मतःच मिळाली असावी असा तर्क अवाजवी ठरू नये. आज देखील काही टक्के शरीरामध्ये प्रतिपिन्डे सापडली आहेत. जसे एखाद्या तीन वर्षाच्या मुलाला अगदी लहान वयातही स्वर व तालाची समज असते तसे प्रतिपिंड निर्मितीची केस असू शकेल की नाही ? यावरून असे वाटते की .. ( जरी माझ्या सारख्या सामान्य माणसाला ते सिद्ध करता येत नसले तरी ) सर्व वयो गटातील अनेकाना हा रोग होऊन गेलेला असून त्यातील सुमारे ५० टक्के लोकानी त्यावर स्वतः निसर्गाच्या क्रुपेने मात केली आहे ! त्याना लसीची गरज नाही ! मग हे कसे ओळखायचे की त्याना गरज नाही ? तर सर्वाना एक पर्याय द्यावा की अँटिबॉडी टेस्ट तरी करून सिद्ध करा की तुम्ही रोगप्रतिकारक्षम आहात नाहीतर सक्तीने लस घ्या ! या माझ्या तर्कटात काही गफलत असेल तर सन्माननीय अभ्यासू लोकांनी माझा तर्क खोडून काढला तरी मला आनंद आहे !

In reply to by चौकटराजा

अँटिबॉडी टेस्ट तरी करून सिद्ध करा की तुम्ही रोगप्रतिकारक्षम आहात नाहीतर सक्तीने लस घ्या ! लस फुकट दिली तरच सरकार ती घेण्यासाठी सक्ती करू शकते. बाकी अँटिबॉडी असल्या तर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती असेलच असे नाही आणि अँटीबॉडी नसल्या म्हणून तुमची प्रतिकारशक्ती नाही असेही सिद्ध झालेले नाही. (टी सेल प्रतिकारशक्ती असू शकते) बाकी अँटीबॉडी टेस्ट करून तुम्हाला फक्त कोव्हीड झालेला होता एवढेच सिद्ध होऊ शकते. एकंदर काय सगळाच गोंधळ आहे सध्या अँटीबॉडी टेस्टची रुग्णांना पडणारी किंमत ७००-८०० रुपये आहे तेंव्हा येणारी लस अँटीबॉडी टेस्टपेक्षा स्वस्त असण्याची शक्यता जास्त आहे.

कोरोना लस नेमकी काय आहे ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न, ह्या लिंकवर वाचू शकता किंवा koolamol.wordpress.com इथे पण वाचता येईल https://bit.ly/39AW3xb

In reply to by kool.amol

सदर लेख पूर्णपणे वाचला काही स्पष्टीकरणे अगदी इम्युनॉलोजिस्ट लोकाना समजतील अशी आहेत. अर्थात ते कोणत्याही ज्ञान शाखेत होत असते ! या लेखाप्रमाणे मानव एक जैविक " ब्रेक थ्रू " वर येऊन ठेपला आहे असे वाटत आहे. आपण अशा करू की ही सनातन लढाई मानव जिंकेल. मी जन्माला आलो त्यावेळी डी एन ए चा शोध लागला आता मरण्यापूर्वी काहीतरी भन्नाट बातमी ऐकावी म्हणतो ! धन्यवाद या लेखाबद्दल !

In reply to by चौकटराजा

अहो, शतायुषी व्हाल तुम्ही. तेव्हा बऱ्याच भन्नाट बातम्या ऐकायला मिळणार आहेत. काळजी नसावी. शुभेच्छा !!

चौरा,
एक पर्याय द्यावा की अँटिबॉडी टेस्ट तरी करून सिद्ध करा की तुम्ही रोगप्रतिकारक्षम आहात
विषय इतका सरळ नसून गुंतागुंतीचा आहे. नेहमीच्या ‘फ्लू’ विषाणूंच्या तुलनेत सध्याच्या विषाणू संदर्भात शरीराचा अँटीबॉडीज प्रतिसाद बराच वेगळा व काही वेळेस विचित्र आलेला आहे. काही ठळक मुद्दे : १. सहसा संसर्गनंतर तीन आठवड्यांनी अँटीबॉडीची पातळी चांगली असते. सध्याच्या संसर्गात अगदी 10 ते 12 व्या दिवसापासून देखील अँटीबॉडीची पातळी मोजण्याइतकी दिसून आली. २. अँटीबॉडी चाचणी ++ असतानाही काही रुग्ण RT-PCR + दाखवत आहेत. ३. शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजपैकी काही ठराविकच विषाणूमारक प्रकारच्या आहेत. पण त्यामुळे प्रत्येक रुग्णाला भावी संरक्षण मिळेलच असे नाही. काहींच्या बाबतीत तर त्यांनी शरीराला अधिक इजा घडवली. त्यामुळेच मूळ आजार वाढत गेला. ४. एखाद्या व्यक्तीत अँटीबॉडीज असल्या तरीही तो इतरांसाठी रोगप्रसारक ठरू शकतो. त्यामुळे या चाचणीकडे ‘सुरक्षा चाचणी’ म्हणून पाहता येणार नाही. (काही लोक कामवाल्या व्यक्तींना बोलावण्यासाठी याचा आधार घेत आहेत). या चाचणीतून आपण सुरक्षेबाबत खात्रीशीर काही बोलू शकत नाही. **** लस घ्यावी की नाही हा वेगळा मुद्दा राहील. ................................................ अमोल, चांगला दुवा.

In reply to by हेमंतकुमार

ह्या शंकाबद्दल आता लिहिणार आहे. ह्यावर सध्या सर्वत्र चांगली चर्चा सुरू आहे. त्यातल्या काही शंकांची उत्तरं देता आली तर प्रयत्न करेन.

In reply to by हेमंतकुमार

ह्या शंकाबद्दल आता लिहिणार आहे. ह्यावर सध्या सर्वत्र चांगली चर्चा सुरू आहे. त्यातल्या काही शंकांची उत्तरं देता आली तर प्रयत्न करेन.

२. अँटीबॉडी चाचणी ++ असतानाही काही रुग्ण RT-PCR + दाखवत आहेत. . एखाद्या व्यक्तीत अँटीबॉडीज असल्या तरीही तो इतरांसाठी रोगप्रसारक ठरू शकतो.

In most people, this innate response slows down the infection and controls it, allowing the final immune layer – your adaptive immune system – to come into play. Adaptive immunity consists of antibodies made by B cells and antiviral cell-killing T cells. Both B and T cells develop to fight specific threats, learning on the job during an infection. This response usually takes a bit of time to kick in but has the added benefit that when it is there it can stay around for years, developing a memory of past infections.

In reply to by चौकटराजा

वरील लेखात लेखक म्हणतो की जरी काही माणसात " बरे झाले " असण्याची पात्रता असली तरी त्याना हे कवच किती काल पर्यन्त उपयुक्त ठरेल हा प्रश्न शिल्लक रहातोच ! सबब म्हातारे कोतारे , पोटुशा स्त्रिया यांच्यासाठी तरी लस हाच उपाय आहे !

आपल्या प्रतिकारशक्तीचे दोन मोठे विभाग आहेत; १. अँटीबॉडीज आणि २. विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशी ( T cells). 1.antibodies : ही प्रथिने दोन प्रकारची असतात : a.. मारक (Neutralizing) b.. अ-मारक यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत/ व्यक्तीत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप निर्विवाद स्पष्ट झालेले नाही). पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत. २. अँटीबॉडीज आणि T पेशींची मोजणी वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. अँटीबॉडीजची मोजणी तुलनेने सोपी असल्याने नेहमीच्या प्रयोगशाळेत होते. याउलट पेशींची मोजणी संशोधन पातळीवर करावे लागते. ती गुंतागुंतीची असते. तसेच त्या पेशी नेहमीच रक्तप्रवाहात सापडत नाहीत. ज्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आहेत त्यांच्यात T सेल्सची निर्मिती नेहमीच झालेली असेल असे मात्र नाही. विविध रुग्णांमध्ये वेगवेगळे प्रतिसाद आढळलेले आहेत.

तोही तज्ञ व्यक्तीकडून. छान वाटले. अनेक अनेक धन्यवाद. रच्याकने -७० तापमानात साठवणे, वाहून नेणे भारतात कसे काय जमणार आहे कोण जाणे. शहरात ठीक, गावात कठीण दिसते. वीज गायब होणे, निष्काळजीपणा, दुर्लक्ष वगैरे व्यत्यय येतीलच. किंमतीत प्रचंड वाढ होईल. सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता. सबसिडीतून भ्रष्टाचार उद्भवेल. आईस क्रीम ट्रक वाहनांसारखी पण छोटीदेखील शीतवाहने वापरात येतील. रुग्ण इतिहासाबरोबर साठवण, वाहतूक याचाही इतिहास नोंद करावा लागेल. त्यातून -७० तापमानाची लस जास्त परिणामकारक ठरली आणि सर्व लसी उपलब्ध असतील तर निवडीचा निर्णय घेणे कठीण जाणार.

जशी कोव्हीड होऊन बरे झालेल्या लोकांमध्ये प्रतिपिंडे किती दिवस राहतात आणि मूळ रोगाविरुद्ध निर्माण झालेल्या प्रतिकारशक्ती मुळे किती संरक्षण मिळते याबद्दल लस तयार करणाऱ्या कंपन्या ठणाणा करत आहेत ( धंद्याचा भाग ) पण आज पर्यंत एकही वैद्यकीय तज्ञ लसीमुळे निर्माण होणारी प्रतिपिंडे किती दिवस राहतात आणि लसीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्ती मुळे किती संरक्षण मिळते आणि लस घेतल्या मुले आयुष्यभर कोव्हीड पासून संरक्षण मिळते का याबद्दल एक अक्षरही बोलताना आढळत नाही. याचे कारण जगात आतापर्यंत कोव्हीड झालेले रुग्ण जवळ जवळ ६ कोटी ९२ लाख आहेत आणि त्यातून नैसर्गिक रित्या/ औषधोपचाराने पूर्ण बरे झालेले लोक जगात जवळ जवळ ५ कोटी आहेत. १५ लाख मृत्यू मुखी पडले आहेत आणि बाकी अजून पॉझिटिव्ह आहेत. आणि याचा गेल्या ८ महिन्याचा अनुभव आता जमेस आहे. याउलट लस हि फक्त काही हजार लोकात चाचणी झालेली आहे आणि ती सुद्धा फार तर २ महिने. त्यामुळे लस हि नैसर्गिक प्रतिकारशक्ती पेक्षा जास्त चांगली आहे असे सिद्ध करणारा एकही पुरावा कुणाकडेही नाही. असे असले तरी कोव्हीड रोगापासून आपले संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे दुसरा कोणताही उपाय नाही. वारंवार हात धुणे हि सवय आयुष्यभरासाठी चांगलीच ठरेल पण महिनोन्महिने मुखवटा लावणे आणि योग्य अंतर बाळगणे हा अनैसर्गिक उपाय आहे आणि तो अनंत काळापर्यंत करत राहणे अशक्य आहे. लोकांनी आताच ते करणे सोडून दिलेले आहे. त्यामुळे ज्यांना मधुमेह हृदय किंवा मूत्रपिंडाचा विकार आहे आणि वयोवृद्ध व्यक्ती यांनी बाहेर पडण्यास सुरुवात करण्या अगोदर प्राधान्याने लस टोचून घेणे हे शहाणपणाचे ठरेल. सुदृढ आणि तरुण व्यक्ती नि लस सार्वत्रिकपणे उपलब्ध होईपर्यंत थांबणे ( इतर वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी) हे इष्ट ठरेल. ज्यांना कोव्हीड आजार झाला आहे त्यांनी लस स्वस्तात उपलब्ध होईपर्यंत थांबले तरी चालेल. कारण अशा लोकांना लस घ्यायची वेळ येईपर्यंत हि साथ बहुधा संपलेली असेल.

चांगल्या चर्चेबद्दल वरील सर्वांना धन्यवाद. सुधीर, लसीकरणासाठीच्या ग्रामीण भागातील अडचणी तुम्ही योग्यपणे दाखवून दिल्या आहेत. सुबोध, समतोल प्रतिसाद आवडला.
ज्यांना मधुमेह हृदय किंवा मूत्रपिंडाचा विकार आहे आणि वयोवृद्ध व्यक्ती यांनी बाहेर पडण्यास सुरुवात करण्या अगोदर प्राधान्याने लस टोचून घेणे हे शहाणपणाचे ठरेल.
>>>> + 111111

सध्या इंग्लंडमध्ये फायझर कंपनीची वापरून लसीकरण सुरू झालेले आहे. ही लस mRNA या नव्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. तिचे फायदे, मर्यादा आणि संभाव्य दुष्परिणाम याबद्दल काही माहिती: फायदे १. शरीरात टोचल्यानंतर ही पेशींमध्ये सहज पोचते. २. ती उत्पादन करताना त्यात प्रत्यक्ष विषाणू वापरत नाहीत. त्यामुळे ती काही पारंपरिक लसिपेक्षा अधिक सुरक्षित असते. या लसीचे दोन डोस द्यावयाचे असल्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. ३. तिचे उत्पादनही निर्धोकपणे करता येत असल्याने ते मोठ्या प्रमाणात व वेगात करता येते. ४. मान्यता मिळण्याआधीच्या प्रयोगांमध्ये ही लस टोचल्यानंतर संबंधित लोकांमध्ये अँटीबॉडीज आणि टी- सेल्स असे दोन्ही प्रतिसाद चांगले आलेले आहेत. मर्यादा १.तंत्रज्ञान नवीन आहे त्यामुळे या लसीपासून मिळणारी सुरक्षा किती काळ असेल हे आज सांगता येणार नाही. २. ही लस प्रत्यक्ष श्वसनमार्गामध्ये स्थानिक प्रतिकारशक्ती कितपत देईल याबाबत शंका आहे. दुष्परिणाम कुठलीही लस टोचल्यानंतर टोचलेल्या ठिकाणी वेदना, लाल होणे थोडाबहुत ताप येणे या गोष्टी काही लोकांमध्ये होऊ शकतात. सध्या या लसी संदर्भात अशी सूचना देण्यात आलेली आहे, की ज्यांना कुठलेही औषध, अन्नपदार्थ अथवा अन्य एखाद्या लसीची पूर्वी तीव्र एलर्जी आली असेल, तर त्यांनी ही लस घेऊ नये.

विशिष्ट विषाणूच्या काटेरी मुकुटाचा अभ्यास केल्यानन्तर तो काटा बधीर -गुळगुळीत करण्याचे कार्य करणारे अतिविशिष्ट केमिकल शरीर तयार करते त्यामुळे विषाणूचा पेशीप्रवेश अवघड होऊन बसतो. तसेच हे कार्य काही प्रमाणात सनिटायझर व ह्न्डवॉश शरीराच्या बाहेर देखील करतात. म्हणजे धुताना गळून पडलेला विषाणू आत जेनेटिक मटेरिअल असून तसा विद्धच होतो. हे झाले विषाणू विरोधी केमिकल युद्ध ! शरीरात जेंव्हा बाह्य जैविक वस्तूचा प्रवेश होतो त्यावेळी विशिष्ट पेशी त्याना ओळखतात व तसा सन्देश टी सेल ना देतात ज्यायोगे टी सेल त्या जैविक अगान्तुकाला जैविक युद्ध ( चक्क मारामारी ) करून मारतात. ट्रान्स्प्लान्ट ऑपरेशन चे वेळी यासाठीच टी सेल ना पुरते ( पण तात्पुरते) नामोहरम करावे लागते ना ? ( इम्युनो सप्रेशन ???).मात्र बीजफलनाचे चे अगोदर असाच एक अगांतुक स्त्री चे शरीरात आल्यावर मात्र टी सेल त्याला काहीही करत हे या सृष्टीचे कवतिक म्हणावे काय ? शेवटी --- शरीरात कितीही टी सेल चे सैन्य असले तरी शत्रू सैन्य जबर असेल ( क्रिटिकल व्हायरल लोड ) तर माणूस हरतो किंवा थोडे शत्रू सैन्य जरी आले तरी टी सेल चे प्रमाण त्यापेक्शाही कमी झाल्याने ( वय , मधुमेह , मुत्रपिन्ड विकार ई ???? ) माणूस हरतो असे असावे !

भारतात लशीच्या सुरक्षितता याबाबत अजून काही तपशील हवे असल्यामुळे लशीला अजून दोनेक महिने लागतील अशी काही तरी पाहण्यात आली. संदर्भ विसरलो. -दिलीप बिरुटे (विसरभोळे प्राध्यापक)

मला वाटतय ज्या दिवशी इंग्लंड किंवा अमेरिका Oxford च्या लशी ला मान्यता देईल त्या नंतरच आपल्या हिथे लसीकरणाची ची मान्यता मिळेल. तो पर्यंत चल ढकल चालू राहील.

प्रा डॉ.>> +११ रा चा,
ज्या दिवशी इंग्लंड किंवा अमेरिका Oxford च्या लशी ला मान्यता देईल
>>> मुद्दा बरोबर आहे सध्या ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून पहिल्या दोन टप्प्यांचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. शेवटच्या टप्प्यातील निष्कर्ष नाताळपर्यंत येणे अपेक्षित आहे. या लसीची साठवण सोपी असून त्यासाठी नेहमीचे सामान्य फ्रीजचे तापमान पुरते. त्यामुळे भारतात तिला मान्यता मिळाल्यास ते बरेच होईल.

https://www.loksatta.com/pune-news/mask-the-distance-the-cleanliness-re… ह्या लेखात फ्लु ची लस दरवर्षी घेणे अपेक्षीत आहे असे म्हटले आहे. अशी कोणती लस आहे आणि ती घ्यावी लागते हेच आज पर्यंत माहीत नव्हते. ह्या वर प्रकाश टाकाल का ?

In reply to by मराठी_माणूस

ममा, इन्फ़्लुएन्ज़ा आणि न्यूमोकॉकस यांच्यामुळे होणारे आजार ज्येष्ठ नागरिकांमध्ये गंभीर होऊ शकतात. आपल्याकडे त्यांच्यावरील उपचारांच्या सुविधा अगदी तळागाळापर्यंत किंवा ग्रामीण भागात पुरेशा नाहीत. म्हणून तज्ञांच्या समितीने गेली काही वर्षांपासून या आजारांविरुद्धच्या लस्सी 60 वयावरील नागरिकांसाठी नियमित देण्यात याव्यात, अशी शिफारस केलेली आहे. तुम्ही दिलेल्या दुव्यामध्ये हे खालील महत्वाचे वाक्य आहे : फ्लू किंवा न्युमोनियाची लस ६० वर्षांवरील, मधुमेह, उच्च रक्तदाबासारखे सहआजार किंवा दमा, सीओपीडी इत्यादी श्वसनाचे आजार असलेल्यांना घेण्याचा सल्ला आम्ही देतो. निदान या गटाने तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित लसी घेतल्या तर फायदा होऊ शकतो.

In reply to by मराठी_माणूस

ह्या लसी कधी पासुन >>> सुमारे १५ वर्षांपासून. माझे एक सहकारी फुफ्फुसरोगतज्ञ त्यांच्या ज्येष्ठ रुग्णांना नेहमी शिफारस करतात. 'साठीनंतरचे लसीकरण' हा विषय लोक भारतात फारसा मनावर घेत नाहीत. या वयात काही त्रास होत नसला तरी फिजिशियनचा एक सहज सल्ला घ्यावा हे आपल्याकडे मंजूर नसते ! तसा घेतला तर नवी माहिती मिळू शकते.

In reply to by हेमंतकुमार

मुळात हा सल्लाच कधी मिळाला नाही. जर लोकांमधे ह्या बद्दल एव्ह्ढी अनभिज्ञता असेल तर ह्याचे दुष्परीणाम तर दिसायला हवेत ना ? ते तेव्ह्ढ्या प्रमाणात आहेत का ?

In reply to by मराठी_माणूस

भारतातील न्युमोकॉकल आजारांचा विदा इथे पाहू शकता https://www.lungindia.com/article.asp?issn=0970-2113;year=2020;volume=3… वय ६० चे वर 31.3 % ………………… आमच्या वैद्यक संघटनेच्या मासिकात गेल्या काही वर्षांपासून ‘प्रौढांचे लसीकरण’ यावर नियमित लेख असतात. बरेच डॉ त्यानुसार रुग्णप्रबोधन करीत असतात.

In reply to by हेमंतकुमार

२०१९ च्या दिवाळीचे सुमारास मला अशी माहिती मिळाली की ६० वर्षाचे वरील मधुमेहीनी ठराविक मुदतीनंतर एन्फ्लूएन्झा व न्युमोनियाची लस घेतली पाहिजे ! आमचे फिजिशियन इतके बिझी असतात की त्यावेळेपासून दरवेळी यान्चा या बाबतीत सल्ला घेणे शक्य झाले नाही. पण २०२१ चा माझा सन्कल्प तोच असेल !

तूर्त रशियन मंडळींची याबाबतची उलटसुलट विधाने बाजूला ठेवू आणि त्यातील विज्ञान पाहू. मद्याचे प्रतिकारशक्तीवर होणारे प्रतिकूल परिणाम असे आहेत : १. पचनसंस्था : मद्य आतड्यातील उपयुक्त जंतूंवर अनिष्ट परिणाम करते हे जंतू एरवी स्थानिक प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतात, ज्यामुळे तोंडाद्वारे आलेले अनेक घातक जंतू नेस्तनाबूत होत असतात. इथल्या टी-पेशींसह अन्य पांढऱ्या पेशीवरही विपरीत परिणाम होतो. २. श्वसनसंस्था: इथल्या श्वासमार्गातील स्वच्छता पेशी आणि फुफ्फुसांतील पांढऱ्या पेशी या सर्वांवर अनिष्ट परिणाम होतात. त्यातून न्यूमोनिया आणि अन्य जंतुसंसर्गाचे आजार होण्याचा धोका वाढतो. (https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4590612/)

फायझरच्या लसीला अमेरिकेच्या औषधी प्रशासनाने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्यासाठी संबंधित समितीत मतदान होऊन १७ विरुद्ध ४ अशा बहुमताने मान्यता मिळाली. लस वापरासाठीच्या अटी : १. ही लस फक्त सोळा वर्षे वयावरील व्यक्तींसाठी वापरली जावी. २. ज्यांना एखादे औषध, अन्य लस अथवा खाद्यपदार्थाची तीव्र ऍलर्जी येते त्यांनी ती घेऊ नये ३. गरोदर स्त्रियांबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.

अमेरिका व कॅनडात फायझरच्या लसीने लसीकरण सुरू. अमेरिकेतील पहिला डोस लिंडसे या नर्सबाईंना तर कॅनडातील पहिला एका सामाजिक कार्यकर्तीला देण्यात आला. https://www.businesstoday.in/current/world/victory-day-for-science-us-c…

In reply to by हेमंतकुमार

आपल्याला कंपलसरी लस घ्यावीच लागेल का ? मला वाटतं, जमतंय तोपर्यंत चालवून घ्यावं. लशीवर विश्वासच नै ये. आम्ही मोबाईलला कष्टम रोम टाकणारे लोक जसे काही बग राहीले की नवीन दुरुस्तीच्या झीप फाइल्स बनवून प्याच मारतो, तसे मला वाटतं लशीमुळे काही तिसरं उद्भवलं तर आणखी तिसरा एखादा दुरुस्तीचा डोस घ्यावा लागेल. सालं शरीराची नुसती प्रयोगशाळा झालीय. अजिबात सुख राहीलं नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आताच टिव्ही वर बातमी पाहिली, कोणालाही लसीची सक्ती नाही

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

छान...पण असे सर्वच लोक म्हणतील, की आम्हाला लशीची गरज नाही. वयस्कर लोकांना लस देतील पण ठणठणीत मधले काही जे करोना वाहक असतील त्यांच्यापासून पुन्हा धोका राहीलच असे वाटते. आपल्याल सततच मास्क लावणे, साबण-पाण्याने हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवून बोलणे. मार्केटात, ऑफिसात, हॉटेलात अजून कुठे कुठे जाऊन आल्यावर कोणी संसर्गाने आपल्याला स्पर्श केला तर नसेल, झाला तर नसेल, असे मनावर ओझे घेऊन फिरणे आहेच असे दिसते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असे मनावर ओझे घेऊन फिरणे आहेच असे दिसते.
>>> अजून काही महिने तरी त्याला इलाज नाही.

समाजातील सर्वांनी लस घेण्याची काही गरज नाही असे माझे मत आहे. लसीकरण सुरुवात अधिक धोका असलेल्या गटापासून सुरुवात होईलच. ठराविक प्रमाणात समाजाचे लसीकरण झाले, की तोपर्यंत साथीचे प्रमाण कमी होऊ लागणार आहे आणि न घेतलेल्या लोकांनाही अप्रत्यक्ष फायदा होईल. आपल्याकडे आयसीएमआरनेही तसे स्पष्ट केलेले आहे. तेव्हा अन्य दीर्घकालीन आजार नसलेल्यांनी आपापल्या मताशी ठाम रहावे.

आज दिनांक २० रविवार रोजी मा.मुख्यमंत्री म्हणाले की करोनाची दुसरी तिसरी लाट अजून येऊ शकते. लशीला अजून खूप वेळ आहे, पुढे किमान सहा महिने मास्क, सुरक्षित अंतर, साबणपाण्याने हात धुणे- सॅनिटाइजरचा वापर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे लागेल असे म्हणाले. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

अमेरिकेत फायझरच्या मागोमाग आपात्कालीन मान्यता मिळालेली ही दुसरी लस : ok या लसीची वैशिष्ट्ये: * दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने द्यायचे आहेत • ही वय 18 वरील व्यक्तींसाठी मंजूर केलेली आहे • प्रयोगादरम्यान तिची उपयुक्तता 94% दिसली आहे • साध्या फ्रिजमध्ये साठवता येते

जगात आतापर्यंत तयार झालेल्या लसिंमध्ये कुठलीही लस 100% सुरक्षित नाही. गेली पन्नास वर्षे ज्या लसी बालकांना नियमित दिल्या जात आहेत, त्यांच्यापासूनही अल्पप्रमाणात कधी ना कधी धोके उद्भवलेले होतेच. आता सध्याच्या लसीला जी आपात्कालीन मान्यता दिली गेली यातील तत्त्व समजून घेऊ. पश्चिमी देशांमध्ये साथ फोफावतेच आहे आणि दिवसागणिक होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आणि काही ठिकाणी तर भयावह आहे . आता जेव्हा समितीपुढे हा प्रश्न येतो तेव्हा तिला दोन बाजू तराजूत तोलाव्या लागतात. एका बाजूला दररोज डोळ्यासमोर दिसणारे खूप मृत्यू, तर दुसर्‍या बाजूला या लसीमुळे होऊ शकणाऱ्या धोक्यांचे अत्यल्प प्रमाण ( उदाहरणार्थ, दहा हजारात दोघांना ऍलर्जिक प्रक्रिया झाली). कुठल्याही उत्पादकाने किंवा विज्ञानाने हा धोका नाकारलेला नाही. म्हणूनच इतर कुठलीही तीव्र अलर्जी असणाऱ्यांनी लस घेऊ नये, या सूचनांसह तिकडे लसीकरण चालू झालेले आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/health-ministry-calls-urgent-… ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार सापडला आहे असे बातमीत म्हटले आहे. आता प्रश्न असा आहे की, ज्या लशी देण्याचे ठरले आहे त्या लशी ह्या प्रकारावर सुध्दा परीणामकारक असतील का ?

In reply to by मराठी_माणूस

लंडनमध्ये लॉकडाउन...! ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅन्कॉक यांनी म्हटलंय, की कोरोना विषाणूचा नवा अवतार इंग्लंडमध्ये दिसतोय आणि हा अवतार पसरला, तर साथ 'हाताबाहेर' जाईल. विषाणूंच्या 1623 सॅम्पल्समध्ये 20 सप्टेंबर ते 15 डिसेंबर या काळात बदल आढळलेयत. ऑक्स्फर्ड, केंब्रिजसह नऊ विद्यापीठांनी एकत्रितपणे हा अभ्यास केलाय आणि तो नुकताच प्रसिद्ध झालाय. या अभ्यासानुसार, आतापर्यंतचा नोंद झालेल्या SARS-CoV-2 विषाणूमधला हा सर्वात अभूतपूर्व बदल आहे. कोव्हिड19 विषाणू शरीरातल्या पेशींवर जिथं घट्ट चिकटतो, तिथं बदल झाला असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे, असं सोप्या भाषेत सांगता येईल. विषाणूतल्या या बदलामुळं ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय आणि जगभरात तातडीनं याबद्दल सर्वेक्षण करावं लागेल, असंही संशोधकांनी सांगितलंय. विषाणूमध्ये झालेला हा बदल ब्रिटनसाठी धक्कादायक आहे. त्यामुळं, ख्रिसमस रद्द करण्याचा निर्णय ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी घेतलाय. विषाणूच्या नव्या अवतारामुळं लंडन आणि आसपासच्या भागात रुग्णांची संख्या दररोज सातशेनं वाढतेय आणि रुग्णालयांवर कमालीचा ताण येतोय, असं गार्डियन वर्तमानपत्रानं म्हटलंय. एकूण युरोपमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढतोय, असं दिसतंय. त्याचे दोन तत्काळ परिणामही झालेयतः 1. लंडन आणि दक्षिणपूर्व इंग्लंडमध्ये आजपासून लॉकडाउन आहे. हा लॉकडाउन कित्येक आठवडे चालेल, असं म्हटलं जातंय. 2. बेल्जियम, इटली आणि नेदरलँडस् या देशांनी ब्रिटनवरून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. फ्रान्स, जर्मनीदेखील ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घालतील, असं वृत्त आहे. ही गडबड आपल्यासाठी महत्वाची आहे; कारण आपल्याकडं विकसित होत असलेल्या लशीमध्ये ऑक्स्फर्डचं संशोधन सहभागी आहे. एकीकडं लस विकसित करण्याची घाई आणि दुसरीकडं विषाणूनमध्ये होत असलेला बदल, असं दुहेरी आव्हान वैद्यकीय संशोधकांसमोर आता उभं राहिलंय. (रिसिव्ह as फॉरवर्ड) -दिलीप बिरुटे

लसी तयार करताना याचा अभ्यास झालेला आहे काही प्रथिने याच्या सर्व जातींत टिकून राहतात

In reply to by मराठी_माणूस

या संदर्भात बरेच उलटसुलट वाचनात आले. फायझर व मॉडर्न या उत्पादकांनी अधिक प्रयोग सुरू केले आहेत. RNA तंत्रावर आधारित या लसीमध्ये गरजेनुसार बदल करणे सोपे जाते. बघूयात काय होतंय

विषाणूच्या इंग्लंड मधील नव्या प्रजातीचे नाव VUI-202012/01 असे आहे. त्यात १७ जनुकीय बदल झाले असून त्याच्या टोकदार प्रथिनावरही परिणाम झालाय. त्यामुळे तो अधिक संसर्गजन्य झालाय का, यावर अधिक अभ्यास चालू आहे .

अंटार्क्टिकामध्येही करोनाचे रुग्ण https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-reaches-antarctic… … अगदी पूर्णार्थाने जागतिक साथ झाली.

सद्य विषाणूच्या जनुकबदलाबद्दल काही मते : १. मुळात हा RNA प्रकारचा असल्याने त्याचे बदल सातत्याने होतातच. २. विषाणू एखाद्या दुबळी प्र-शक्ती असलेल्या माणसाला संसर्ग करतो >>> त्याच्या शरीरात अर्धवट दाहप्रक्रिया होते >>> यातून विषाणूचा उत्क्रांत व्हायचा संदेश मिळतो >> नवा विचित्र प्रकार उदयास येतो.

आकडेवारी आणि माध्यमे हा भाग घोळदार आहे. तो एकवेळ सोडून देऊ. पण…. हे पहा मोठ्या चुकांचे गांभीर्य नसल्याचे उदा: "समितीने १५ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना मॉडर्ना लस देण्यासंबंधी प्रस्ताव ठेवला होता. करोना लसीमुळे होणारे फायदे आणि संभाव्य धोकेही यावेळी सांगण्यात आले होते. यासंबंधी मतदानही करण्यात आलं. यावेळी २०-२० मतं मिळाली. यानंतर १८ डिसेंबरला मंजुरी देण्यात आली." (https://www.loksatta.com/desh-videsh-news/us-doctor-suffers-severe-alle…) योग्य असे हवे: १५ वर्ष>>> १८ वर्षे २०-२० मतं मिळाली.>>> २०-० असे मतदान

कोव्हिशिल्डला जानेवारीत परवानगीची आशा अशी बातमी वाचनात आली. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाले म्हणाले की सीरमने कोव्हिशिल्ड या करोना प्रतिबंध्क लशीचे उत्पादन केले आहे त्याच्या दोन टप्प्यांतील चाचण्या पूर्ण झाल्या असून तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. चाचण्यातील निष्कर्षाबाबतची माहिती केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे सादर करण्यात आली असून तातडीच्या परवानगीसाठी अर्जही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकदाच्या लशीला सुरुवात करावी असे वाटते. एक नवी सुरुवात पुन्हा एकदा व्हावी जगाची खळखळ पुन्हा पूर्ववत सुरु व्हावी असे आता वाटत आहे. घरातील वयस्कर मंडळी घरात बसून आता वैतागून गेली आहे. कुटुंबेही तशीच वैतागली आहेत. -दिलीप बिरुटे

ऑक्सफर्ड लसीला इंग्लंडची मान्यता. लस वैशिष्ट्य: व्हेक्टर प्रकार २ डोस; १-३ महिन्यांच्या अंतराने साठवण : साधा फ्रीज अन्नपदार्थ वा औषधांची ऍलर्जी असणाऱ्यांना बंदी नाही मात्र लसीतील पूरक रसायनांची ऍलर्जी असणाऱ्यांना बंदी

https://www.loksatta.com/desh-videsh-news/cdsco-expert-panel-set-to-rec… सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय. चला, आता रिलॅक्स राहू. आज नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्व बसूया सॉरी एकमेकांना भेटलं पाहिजे. :) -दिलीप बिरुटे

एकमेकांना भेटलं पाहिजे. :)
हे बाकी महत्वाचे. मान्यता काय 'अटींवर' दिली आहे ते बघूया आता. सर्वांना नववर्ष आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा !

भारतात तीन लशीना परवानगी मिळाली असे वृत्त आहे, आता या तीन पैकी कोणते व्हर्जन घ्यावे असा प्रश्न नागरिकांना राहील. सरकार त्यात काही ऑप्शन देणार नाही असे वाटते. -दिलीप बिरुटे

च्यायला, लशीच्या परिणामकारकतेच्या बाबतीत 'सीरम आणि बायोटेक' मधे जुंपली. ''जगभरात करोनावरील फायझर मोडर्ना आणि ऑक्सफर्डच्या लशींंनी परिणामकारकता सिद्ध केली आहे, त्यामुळे बाकी लशी पाण्यासारख्या सुरक्षित आहेत - अदर पुनावाला मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इंस्ट्यूट.'' '' काही कंपन्यांनी भारत बायोटेकच्या लशीला पाण्याची उपमा दिली आहे, ही टीका अनाठायी असून, आमच्याकडे लशी विकसित करण्याचा मोठा अनुभव आहे, मला एक आठवडा द्या, मी तुम्हाला लस परिणामकारकतेची निश्चित आकड़ेवारी देतो'' - डॉ.कृष्णा इल्ला, भारत बायोटीक. फोकलीच्यांनो, आम्ही सगळे भारतीय जनता लशीच्या भरवशावर घरी कोंडून कांडुन दिवस काढले. आता लस टोचायची वेळ आली तर एकमेकांच्या लशीची परिणामकारकतेचे असे जाहीर वाभाडे काढले तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा. वाय झेड साले. -दिलीप बिरुटे (भडकलेला मिपाकर)

प्रा डॉ तुमच्या भावनांशी सहमत आहे. हे असे व्हायला नको आहे. ...................... तिकडे अमेरिकेत एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला गेलाय. त्यांची रुग्णसंख्या अजूनही धो धो वाढतेच आहे. एकीकडे फायझर व मॉडरनाच्या लसी टोचणे सुरू झालेले आहे. या दोन्ही लसीचे दोन डोस ठराविक काळाने घेणे आवश्यक आहे. मात्र अद्याप या लसी सर्व जनतेला पुरतील इतक्या प्रमाणात नाहीत. म्हणून काही तज्ञांनी एक वेगळा पर्याय सुचवलेला आहे. ते म्हणतात की आधी शक्य तितक्या सर्व जनतेला फक्त एक डोस द्या; कालांतराने जेव्हा लसीचा पुरवठा अजून होईल तेव्हा दुसऱ्या डोसचा विचार करावा. मात्र लस-प्रतिकारशक्ती या विज्ञानानुसार असे करणे बरोबर नाही. यातून तिथ्ल्या तज्ञांमध्ये वाद उद्भवलेला आहे.

‘सिरम’ व ‘भारत बॉयोटेक’ या दोघांच्या लसीना ज्या प्रकारे ‘तातडीच्या वापराची मान्यता’ मिळाली त्या संदर्भात नामांकित लसतज्ञ डॉ. गगनदीप कांग यांची दीर्घ मुलाखत इथे आहे : ठळक मुद्दे : १. दोघांनाही दिलेली मान्यता ‘घाईगडबडीतली’च आहे. २. 'भारत बॉयोटेक’ने पुरेशा परिणामकारकतेचा विदा सादर केलेला नाही. ३. म्हणून ती लस (२)स्वतःसाठी डॉ. कांग ‘ट्रायल’ दरम्यानच घ्यायला तयार आहेत; थेट उपयुक्त लस म्हणून नाही.

कोविड होऊन बरा झालेल्या काही रुग्णांचा पुढे पाठपुरावा करून अभ्यास चालू आहेत. अशा एका अभ्यासात सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा सर्व प्रकारच्या आजाराचे रुग्ण अभ्यासले गेले. त्यांच्या रक्तातून अँटीबॉडीज आणि ‘टी’ व ‘बी’ स्मृतीपेशींचा अभ्यास केला गेला. हे तिन्ही घटक मूळ आजारानंतर सुमारे आठ महिने टिकतात, असा निष्कर्ष आहे. तीव्र आजाराच्या लोकांत या सर्व घटकांचे प्रमाण सर्वात जास्ती होते. अशा लोकांना भविष्यात पुन्हा संसर्ग झालाच तर तेव्हाचा आजार सौम्य किंवा लक्षणविरहित असू शकेल, असा प्राथमिक अंदाज आहे. असे निष्कर्ष आपल्यासाठी उत्साहवर्धक ठरतील.

काल कोव्हीड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या

१ कोटीच्या वर

गेली आहे. यापैकी १ टक्का लोकांना जरी पुनः संसर्ग झाला असता तरी हि संख्या एक लाखाच्या वर जाते. याचाच अर्थ असा आहे कि पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता( reinfection) फारच कमी आहे ( हा भयगंड आहे)असे तज्ज्ञांचे मत आहे.

"ओडिशा प्रशासनानं लसीकरणाची ही मोहिम रविवारच्या दिवसापुरती थांबवली असून, पहिल्या दिवशी लस घेतलेल्यांच्या निरिक्षणासाठी त्यांनी हा वेळ दिल्याचं कळत आहे." (https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/…) हा दृष्टीकोन अगदी योग्य वाटतो. दमादमानेच पुढे जावे.

कोविड १९ हे त्याचे अधिकृत बारसे झालेले नाव आहे. तेच राहील . त्यातून इतिहास समजतो

२०१५ पासून WHO ने नव्या आजारांना नावे देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीत. त्यानुसार ही नावे व्यक्ती, प्राणी वा भौगोलिक स्थाने यावरून देऊ नयेत अशी सूचना आहे.

करोना सार्स 2 हा २०१९ मध्ये नव्याने सापडला व त्याचा आजार कोविड१९ .

लस घेतल्यानंतरही मुखपट्टी का लावायची याची ५ कारणे : १. या लसीची उपयुक्तता १००% नाही २. लसीकरणानंतर दीड महिन्याने संरक्षण मिळेल ३. लसीमुळे 'आजारा'पासून संरक्षण मिळेल, पण नवा संसर्ग वा प्रसार यापासून मिळेल की नाही हे अजून अस्पष्ट. ४. ज्यांना कर्करोग/गंभीर आजार आहेत त्यांना तशीही मुखपट्टी उपयुक्तच असते. ५. जनुकबदल झालेल्या विषाणूपासून संरक्षणास उपयुक्त. चालू लस याबाबत किती उपयुक्त आहे हे संदिग्ध आहे.

Ivermectin या जंतावरील औषधाचा सौम्य कोविड रुग्णांवर एक शास्त्रशुद्ध प्रयोग स्पेनमध्ये पार पडला. रुग्णास लक्षणे जाणवल्यावर ७२ तासांत जर हे औषध एकदाच दिले तर बऱ्यापैकी फरक पडतो असे दिसले. भविष्यात अजून प्रयोग केले जावेत. संसर्ग झाल्यानंतरच्या रोगप्रतिबंधांसाठी याचा विचार होऊ शकतो .

कोविशिल्ड तयार करणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट मध्ये भीषण आग: आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे नुकतेच रेडियोच्या बातम्यांमध्ये ऐकले . मृतांना आदरांजली. कोविशिल्ड लसीचा विभाग सुरक्षित आहे हे चांगले झाले

भारतीय लोकांच्या रक्तात च बेजबाबदार पण ठासून भरलेला आहे. इतकी महत्वाची संस्था असून आग लागते म्हणजे ज्यांच्या वर जी जबाबदारी दिली होती ती त्यांनी योग्य रित्या निभावली नाही. चोकशी होवून जो अधिकारी ह्या हलगर्जी पणाला जबाबदार आहे त्या वर मनुष्य वधाच्या गुन्ह्यापासून बाकी सर्व कलम लावून खटला चालला पाहिजे.

कोविड लसींच्या प्रकारांमध्ये फायझर व मॉडर्नच्या लसी या एम-आरएनए तंत्रज्ञानाने बनवलेल्या आहेत. यानिमित्ताने या नव्या तंत्राचे अन्य काही उपयोग दृष्टिक्षेपात आहेत. एम-आरएनए या नव्या तंत्रज्ञानाचे अन्य काही गंभीर आजारांमध्येही औषध (उपचार ) म्हणून उपयोग होऊ शकतील. त्या दृष्टीने गेली काही वर्षे संशोधन प्रगतिपथावर आहे. या संदर्भात एम-आरएनए हे एक प्रकारे “आयुष्याचे सॉफ्टवेअर’ म्हणून काम करते असे संशोधकांचे म्हणणे आहे. अर्थात या संशोधनाला बराच काळ जावा लागणार आहे. काही संशोधने प्रयोगावस्थेत आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान खालील आजारांसाठी उपचार म्हणून प्रभावी ठरू शकते : • जनुकीय आजार • एचआयव्ही • काही प्रकारचे हृदयविकार आणि • बऱ्याच अवयवांचे कर्करोग

In reply to by हेमंतकुमार

थोडेसे अवांतर पण सूक्ष्मजीवाबद्दलच आहे. https://glacierhub.org/2020/02/06/ancient-viruses-awaken-as-the-tibetan… सध्या हिमालयाच्या वितळण्या मुळे Aceint सूक्ष्मजीव मुक्त होऊ शकतात.आणि मानवाच्या जीवनचक्रात येऊ शकतात. (चालू घडामोडी)

अमरावतीची बातमी. लस घेउन पॉझिटीव्ह ?
>>>>> लसी पासून मिळणारी प्रतिकारशक्ती दोन प्रकारची असते : १. Effective : म्हणजे या शक्तीमुळे संबंधित जंतूच्या संसर्गापासून मोठा आजार होत नाही, परंतु तो जंतुसंसर्ग पुन्हा होऊ शकतो. २. Sterilizing : यामुळे जंतुसंसर्गाचा परिणाम पूर्ण थांबवला जातो. अशामुळे लक्षणविरहित रुग्णही निर्माण होत नाहीत. वरील २ हे आदर्श व अंतिम ध्येय असले तरी क्वचित साध्य होते. अन्य काही मुद्दे माझ्या 19 Jan 2021 - 9:18 am प्रतिसादात आधीच आलेले आहेत

@ डॉ. कुमार , टाईम्स ऑफ ईंडियाने Kurnool Medical College, Kurnool, Institute of Genomics and Integrative Biology, Delhi, and Academy of Scientific and Innovative Research, Ghaziabad यांचा रिइन्फेक्शनबद्दलच्या संशोधनाचे वृत्त दिले आहे. मला वाटते या रिपोर्टचा परिपेक्ष आपण अधिक चांगला उलगडून सांगू शकाल. शिवाय रिइनफेकशनच्या शक्यतांना लसिकरण किती तोंड देऊ शकते आहे या बद्दल ही अधिक जाणून घेणे आवडेल.

मागा , त्या संशोधनाची मूळ पत्रिका वाचली. त्यांनी सुमारे ८६ बदललेल्या विषाणूंचा अभ्यास केलाय. १. विशिष्ट बदलांमुळे विषाणूंना जगायचा फायदा मिळतो. >>> नवे रुग्ण निर्माण. २. हे नवे प्रकार आपल्या अँटिबॉडीजना दाद देत नाहीत. ३. त्यांच्यावर मात करण्यासाठी लसीत काही सुधारणा कराव्या लागतील. mRNA तंत्राच्या लसीत त्या करणे शक्य व सुलभ असते.

Colchicine हे औषध गाऊटच्या उपचारांसाठी वापरले जाते. त्याचा उपयोग कोविडच्या सुरवातीच्या अवस्थेत होऊ शकेल असे गृहीतक आहे. त्या संदर्भात कॅनडातील प्रयोग आशादायी ठरलेत. आता इंग्लंडमध्येही त्याचे प्रयोग अभ्यास सुरू झालेत.

१) covid होवून गेलेल्या व्यस्ती मध्ये तयार झालेली प्रतिपिंड,आणि covid विरोधी प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारे प्रतीपींड आणि covid विरूद्ध निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे. २) reinfection झालेल्या लोकांची जगात निश्चित किती संख्या आहे.

१)
covid होवून गेलेल्या व्यक्ती मध्ये तयार झालेली प्रतिपिंड,आणि covid विरोधी प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारे प्रतीपींड आणि covid विरूद्ध निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक
आहे. >>>> covid होवून गेलेल्या व्यक्ती मध्ये तयार झालेली प्रतिपिंडे ही आजाराच्या तीव्रतेनुसार कमी अधिक असतील. त्यांचा अंदाज करणे अवघड असते. लसीची मात्रा प्रमाणित असल्याने प्रतिपिंडांचे प्रमाण सांगता येते तसेच ती टिकण्याचा कालावधी. अर्थात दोन्हीत काहीशी व्यक्तीसापेक्षता राहील.

रेमडेसि. बद्दल who आणि काही देशांतील तज्ञांत मतभेद आहेत. काही रुग्णालयांत त्याचा उपयोग दिसला आहे

संबंधित रुग्णास बरेच आजार होते व त्यावर औषधे चालू होती. तज्ञ समितीचा अहवाल येईपर्यंत आपण काही प्रतिक्रिया देऊ नये हे मा म.

दुष्काळ कायदा जाहीर झाला तरच आपल्याला अनुदान किंवा धान्य मिळेल. बाकी आपले कुटुंब उपासमारीने मेले तरी फ्यामिन ऍक्ट पास झालेला नाही तोवर आप्ल्याला काहीही मिळणार नाही. बेस्ट च्या कर्मचाऱ्यांना कोव्हीड मुळे मृत्यु झाला तर ५० लाख रुपये भरपाई मिळेल पण डॉक्टरना आपले रजिस्ट्रेशन रद्द करण्याची धमकी देऊन बंद दवाखाना उघडायला लावून रुग्ण तपासायला लावून त्यातून करोना झाला तर ते केवळ करोना रुग्णालयात काम करत नव्हते म्हणून पैसे मिळणार नाहीत. उद्धवा अजब तुझे सरकार

In reply to by सुबोध खरे

डाॅक्टरांची सेना, साॅरी संघटना नसते, हे एक कारण शिवाय, डाॅक्टरांना काय समजते? कंपाउंडरला जास्त अक्कल असते, ही विचारसरणी.... बेस्टच्या कामगारांची संघटना असल्याने, ते जास्त महत्वाचे आहेत, ही पण एक भावना, असू शकते.... एकट्या दुकट्या माणसासाठी, शिवसेना कधीच निर्णय घेत नाही..हे माझे निरीक्षण आहे... रमेश किणी, हे एक उदाहरण डोळ्यासमोर आहे...

In reply to by मुक्त विहारि

एकट्या दुकट्या माणसासाठी............
एकट्या दुकट्या माणसासाठी कोणीच निर्णय घेणार नाहीत , अशांसाठी समाजाने उभे रहावे लागते. ते आपल्याकडे होत नाही , म्हणुनच राजकारण्यांचे फावते.

+१ यावरून कायदा हा गाढव आहे ही म्हण आठवली.

सध्या कोविडवरील उपचारांसाठी ज्या अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत त्या इंजेक्शनद्वारे द्याव्या लागतात आणि त्यांचे उत्पादन खूप खर्चिक आहे. त्याला पर्याय म्हणून नाकातून फवाऱ्याद्वारा द्यायच्या सूक्ष्म अँटीबॉडीज(nanobodies) आता विकसित होत आहेत. त्यांचे काही फायदे : १. त्या जिवाणू वा यीस्टमध्ये तयार करतात. २. त्या टिकाऊ असतात व साध्या तापमानातही त्यांची साठवण चांगली होते ३. हे औषध रुग्ण स्वतः घरच्या घरी घेऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती चाचणीद्वारा कोविड-पॉझिटिव्ह निघते तेव्हा लगेचच हा फवारा चालू केल्यास आजार फोफावत नाही. सदर संशोधनाचे प्रमुख अमेरिकास्थित डॉ. आशिश मंगलिक आहेत. त्यांच्या संशोधनास शुभेच्छा !

कोविड रुग्णांच्या रक्तचाचण्यापैकी एका चाचणीसंबंधी व्यक्तिगत संपर्कातून विचारणा झाल्याने त्याबद्दल लिहितो. या चाचणीचे नाव सीआरपी असे आहे. हे एक प्रथिन असून ते आपल्या यकृत व रक्तवाहिन्यांच्या आवरणात तयार होते. जेव्हा शरीरात कोणत्याही कारणाने दाहप्रक्रिया होते तेव्हा त्याच्या रक्त पातळीत बऱ्यापैकी वाढ होते ( अगदी शंभर किंवा त्याहून अधिक पटीपर्यंत देखील). समजा एखाद्याला जंतुसंसर्ग झाला आणि त्याचे सीआरपी वाढलेले दिसले. आता त्या रुग्णावर उपचार सुरू केले जातात. पुढे काही दिवसांनी सीआरपीची पुन्हा मोजणी केली जाते. जर शरीरातील दाह कमी होत असेल तर ही पातळी सुद्धा कमी झालेली दिसते. अशा तऱ्हेने नियमित अंतराने ही पातळी मोजल्यास त्याचा रूग्णाच्या उपचारांसाठी चांगला उपयोग होतो.

कोविड, बाळंतपण आणि फुप्फुसरोपण : अमेरिकेतील अभूतपूर्व घटना 31 वर्षांची एक तरुणी. गरोदरपणाचे 36 आठवडे पूर्ण झालेले. अचानक तिला खोकला व दम लागतो. रुग्णालयात दाखल. एक आठवड्यात डॉक्टर तिचे बाळंतपण घडवून आणतात. बाळ झाल्यावर या तरुणीला न्यूमोनिया होतो - अगदी गंभीर. व्हेंटिलेटर, ECMO वर देखील ठेवावे लागले. फुफ्फुसात बिलकुल सुधारणा नाही; दोन्ही अगदी निकामी झालेली. सुदैवाने १० दिवसांत फुफ्फुसदाता मिळाला. मग दोन्ही फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्यात आले. आता तब्येत उत्तम. रुग्णास शुभेच्छा आणि डॉक्टरांच्या चमूचे अभिनंदन !

आईने गर्भारपणात लस घेतल्यामुळे नवजात शिशूत जन्मतः कोविड विरूद्ध antibody आढळल्या. https://www.biotecnika.org/2021/03/first-baby-born-with-sars-cov-2-anti…

विशेष घटना . ..................... करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evasion) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे. डब्ल्यूएचओने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीचा हा संक्षेपित तक्ता : ok या संदर्भात भारतीय लसींच्या बाबतीतले सरकारचे निवेदन इथे

गेल्या दोन वर्षात वैद्यकीय कारणांसाठी पीपीइ संच, एन 95 मास्क इत्यादींच्या भरपूर वापरामुळे वैद्यकीय प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती खूप झालीय. त्याची योग्य विल्हेवाट ही पण एक मोठी समस्या आहे. पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेने या कचऱ्याचे विघटन आणि पुनर्वापर यादृष्टीने एक चांगले तंत्रज्ञान शोधले आहे. बातमी इथे अभिनंदन !

In reply to by हेमंतकुमार

" प्लास्टिकचे विघटन आणि मास्कचा पुनर्वापर " ही बातमी नक्कीच आशादायक आहे. अश्या आश्वासक बातम्या बर्‍याच वेळा वाचण्यात येतात, पण त्याची अंमलबजावणी फारच कमी वेळा झालेली दिसते. मागच्या शासनाच्या कार्यकाळात प्लास्टीकवर तडकाफडकी बंदी घालण्यात आली ज्याचा जनतेने धसका घेतला. नियम करून ४९-५० मायक्रॉन वाढवून ५१+ मायक्रॉन जाडीचे प्लास्टिक वापरात आले. पण प्लास्टिकचा कचरा थांबायचे नाव घेत नाही. नक्की किती प्लास्टिक कचरा पुनर्वापरात येतो हे पर्यावरण विभाग जनतेला विश्वासात घेऊन सांगत नाही जो पर्यंत यावर पर्यावरण विभाग आणि यंत्रणा जनतेच्या पातळीवर उतरून गंभीरतेने काम करत नाही, तो पर्यंत अश्या बातम्या फक्त "आशादायक" म्हणूनच वाचायच्या.

श्रीरंग जोशी यांनी खरडफळ्यावर टाकलेली लिंक 👉 CDC Says You No Longer Need to Do These Things After Vaccination. इथे कदाचित जास्त चांगला उहापोह होऊ शकेल या हेतूने चिकटवतोय.

लस तयार करताना तिच्यामध्ये संबंधित विषाणूची रोगकारक प्रथिने अंतर्भूत केलेली असतात.ती शरीरात टोचल्यानंतर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात आणि T पेशी देखील निर्माण होतात. जर अशा व्यक्तीला भविष्यात विषाणूचा नैसर्गिक संसर्ग झाला, तर आता या अँटीबॉडीज त्या विषाणूला ओळखतात आणि त्याच्या प्रथिनावावर हल्ला चढवून त्याला निष्प्रभ करतात.