मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रश्नोपनिषद (२)

शरद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
=================================================================== उपनिषदे : (१)... (२)... (३)... (४)... (५)... (६)... (७) उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?... (८) ईशावास्योपनिषद... (९) केनोपनिषद... (१०) अविद्या... (११) मुंडकोपनिषद... (१२) प्रश्नोपनिषद-१... (१३) प्रश्नोपनिषद-२... (१४) कठोपनिषद-१... (१५) कठोपनिषद-२... (१६) ऊर्ध्वमूलमध:शाखमश्वत्थं... =================================================================== प्रश्नोपनिषद (२) प्रश्न ४ सौर्यायणी गार्ग्य विचारतो, "भगवन्, ह्या पुरुषात (देहात) कोणती इंद्रिये झोपतात ? (झोप लागली की कार्य करत नाहीत ?) कोणती कार्य करतात ? कोण देव (इंद्रिय) स्वप्न पहातो ? सुख कुणाला मिळते ? आणि ही सर्व कोणाच्या अधिष्ठानावर आहेत ? " माणसाच्या जीवनातील मोठा काळ झोपेत जातो. झोपेत काही वेळ त्याला स्वप्न पडतात, काही वेळ, गाढ झोपेत, पडत नाहीत..झोप लागली असतांना त्याची इंद्रिये उदा. डोळा, कान, काम करत नसतात. तरीही तो स्वप्नात काहीतरी पहात असतो, ऐकत असतो, तुम्हाला हा प्रश्न कधी पडला होता का ? की जर माझा डोळा काम करत नाही, तर पहातो कोण ? कसे ? गाढ झोपेत मला स्वप्न पडत नाहीत, मग त्यावेळी स्वप्न "पहाणारा" काय करतो ? दुसर्‍या प्रश्नाच्या उत्तरात भ. पिप्पलादांनी देव व इंद्रिये यांची सांगड घातली होती, ती ध्यानात ठेऊन गार्ग्य विचारत आहे कोणता देव काय करतो, काय करत नाही, आणि ही स्वप्ने पहातो तरी कोण ? जागेपणी मी एखादे सुंदर दृष्य पाहिले , सुरेल गाणे ऐकले तर "मला सुख मिळते" पण स्वप्नात माझी इंद्रिये कार्य करत नाहीत, मग हे सुख कोणाला मिळते ? आणि हे जे काय चालते ते कोणाच्या जोरावर ? भ. पिप्पलाद उत्तर देतात "अस्ताला जाणार्‍या सूर्याचे किरण त्याच्यातच विलीन होतात त्याप्रमाणे जेव्हा मनुष्य ऐकत नाही, बोलत नाही, पाहत नाही... त्यावेळी तो झोपला असे म्हणतात. त्याची इंद्रिये त्याच्या मनात लीन झालेली असतात. तेव्हा फक्त प्राणाग्नी जागृत असतात. अपान प्राण हा गार्ह्यपत्य अग्नी, व्यान हा अन्याहार्यपचन अग्नी, श्वासोच्छवासरूपी आहुती हा समान प्राण असून मन हे यजमान असते..त्याला प्राप्त होणारे इष्ट फल हा उदान प्राण होय. तोच मनाला झोपेत ब्रह्मस्वरूप प्रतीत होतो. तो स्वप्नात ब्रह्माचा अनुभव घेतो. दृष्ट-अदृष्ट, श्रुत-अश्रुत, अनुभूत-अननुभूत, सत्-असत्, हे सर्व तो जीव पाहतो. गाढ झोपेत स्वप्न पडत नाहीत, तेव्हा तो या शरीरात सुखी होतो. पक्षी आपल्या घरट्यात एकरूप होतात तद्वत इंद्रियसमूह झोपेत आत्म्यात विलीन होतात. पंचमहाभूते, ज्ञानेंद्रिये, कर्णेद्रिये, मन बुद्धी, अहंकार चित्त, तेज व प्राण हे सर्व आत्म्यात विलीन होतात.(सांख्यांची तत्वे आठवली ?) हा ज्ञाता, कर्ता व विज्ञानस्वरूप पुरुष निद्रेत आत्म्यामध्ये विलीन होतो. दोषरहित, अशरीर, गुणरहित, शुभ्र असे जे आहे ते तो जानतो, परब्रह्मरूपाला प्राप्त होतो. तो अक्षरब्रह्म जाणतो. भ. पिप्पलाद गाढ झोप म्हणजे ब्रह्मानंद असे म्हणतात तसेच छांदोग्य उपनिषदातही म्हटले आहे. पण हे तितकेसे पटत नाही कारण गाढ झोपेत माणुस ब्रह्मलोकात जात असला तरी त्यास त्याची आणीव नसते. हे म्हणजे दरिद्री माणसाने रोज जमिनीत पुरलेले धन तुडवित जावे असेच झाले. थोडक्यात, झोपेत सर्व इंद्रिये मनात विलीन होतात. प्राण जागा असतो. मन इंद्रियांचे काम करते. गाढ झोपेत मन ब्रह्मात लीन होते प्रश्न ५. सत्यकाम भ,पिप्पलादांना विचारतो, " भगवन्, जो मनुष्य मरणापर्यंत ॐकाराचे ध्यान करतो त्याला कोणता लोक मिळतो ?" उत्तर सरळ व थोडक्यात आहे. " ॐकार हे पर व अपर ब्रह्म आहे. त्यानेच ज्ञाता त्यापैकी एक मिळवतो. (ॐकाराच्या मात्रा तीन; अ,उ,म ) जर "एकमात्रक" ॐकाराचे ध्यान करील तर त्याला मनुष्यलोक प्राप्त होतो.त्याला ऋग्वेद, (तप, ब्रह्मचर्य व श्रद्धा यांच्या योगाने) माहात्म्य प्राप्त करून देतो. तो जर "द्विमात्रक" ॐकाराचे ध्यान करील तर यजुर्वेद त्याला सोमलोकाला घेऊन जातो. तेथे ऐश्वर्य भोगून तो परत मनुष्यलोकास येतो. जो कोणी "त्रिमात्रक" ॐकाराचे ध्यान करतो तो तेजस्वी सूर्यलोकास जातो. पापमुक्त झाल्याने सोमवेद त्याला ब्रह्मलोकाला घेऊन जातो. ॐकाराच्या "अकार" "उकार" व ",मकार" या तीन मात्रा परस्परसंबद्ध,व एकरूप आहेत. बाह्य, अभ्यंतर व मध्यम म्हणजे "जाग्रुत", "स्वप्न" व "सुषुप्ति" या तीन अवस्था आहेत. ॐकाराच्या साह्याने ज्ञात्याला शांत, अजर, अमृत, अभय, व परब्रह्म मिळते. " (इथे तीन मात्रा सांगितल्या असल्या तरी "मांडुक्य उपनिषदा"त ॐकाराचे चार पाद सांगितले असून तुरीय हा चौथा पाद म्हटले आहे. अथर्ववेदाची मुंडक, प्रश्न व मांडुक्य ही तीन उपनिषदे. मांडुक्य सर्वात उत्तर कालीन. प्रश्न हे मुंडकचे जास्त विवेचन करते तर ॐकारावर "प्रश्न" मध्ये एका प्रश्नाचे उत्तर आहे (सहातला एक भाग) व मांडुक्य उपनिषद फक्त ॐकारावरच लिहले आहे.) . प्रश्न ६ सुकेशाने भ. पिप्पलादांना प्रश्न केला, " भगवन् , हिरण्यनाभ नावाच्या राजपुत्राने मला विचारले ’तू षोडषकलायुक्त पुरुष जाणतोस ?’ मी उत्तर दिले, "नाही, जर मला माहीत असते तर मी तुला सांगितले असते. खॊटे बोलतो त्याचा सर्वनाश होतो." तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तो पुरुष कोठे आहे?" भ. पिप्पलाद सुकेशाला म्हणाले, "हे भल्या माणसा , या शरीरातच तो पुरुष आहे. त्याच्या मध्ये षोडश कला आहेत. (प्रथम षोडश कला कशाला म्हणतात ते पहा. पंच प्राण, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये व मन मिळून सोळा कला होतात) परब्रह्माने विश्वनिर्मितीच्या वेळी देह निर्माण केला व मग तो विचार करू लागला, "(या देहातून) काय गेले असता मी जावे व काय राहिले असता मी रहावे ?" त्याने प्राण निर्माण केला त्या प्राणापासून श्रद्धा, पंच महाभूते, दहा इंद्रिये, मन, अन्नापासून वीर्य, तप, मंत्र, लोक व लोकामध्ये नाम उत्पन्न झाले. नद्या समुद्राला जाऊन मिळतात व नाहीशा होतात. त्यांचे नाम, रूप नाहिसे होते. त्या समुद्र नावानेच ओळखल्या जातात. त्या प्रमाणे मनुष्याच्या सोळा कला, मनुष्यशरीरात येऊन नष्ट होतात फक्त मनुष्य (पुरुष) म्हणून लोक त्यांना पुढे ओळखतात. हा "अकल" (सोळा कला रहित) अमृत होतो. रथाच्या चाकात आरे असतात, त्याप्रमाणे सोळा कला असलेला पुरुष जो जाणतो, त्याला मृत्यूचे दु:ख होत नाही " आता प्रथम या षोडशकला असणार्‍या पुरुषाबद्दल राजपुत्राला व सुकेशाला जिज्ञासा का ते समजावून घेऊ. विश्वातल्या वस्तूंचे दोन विभाग. जड व चेतन. देह हा चेतन की जड ? जो पर्यंत देहात "प्राण" आहे तो पर्यंतच तो चेतन. नाही तर तो जडच. हा "प्राण"च "जीवा"ला "शीवा"ला जोडणारा दुवा आहे. हा प्राणच मनुष्याला "पुरुष" करतो. या पुरुषापासून सोळा कला निराळ्या करता येत नाहीत. त्या समुद्राला मिळणार्‍या नद्यांप्रमाणे पुरुषाबरोबर एकजीव होऊन जातात. छांदोग्य उपनिषदात हे निराळे उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे. तेथे म्हटले आहे की मधमाश्यांनी निरनिराळ्या फुलातून गोळा केलेला रस एकदा पोळ्यात एकत्र केला की मग प्रत्येक रसाला निराळे अस्तित्व नसते. सगळे रस एक मध म्हणूनच ओळखले जातात. शंकराचार्य यालाच "अद्वैत" म्हणतात जीवात्मा एकदा का परमात्म्याला भेटला की ते एकरूपच होतात. . सांख्यांची "लिंगशरीर" कल्पना ही येथील षोडश कला पुरुष वरून घेतली असावी. तेथे "बुद्धी" ही सतरावी मिळवली आहे. सांख्य व अद्वैत ही दोनही दर्शने "प्रश्न"चा आधार घेतात. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात शेवटच्या वाक्यात "माया" हा शब्द येतो तेथे त्याचा अर्थ "भास" असा होतो. अद्वैतातही तसेच काहीसे म्हटले आहे. नाही का ? अकल पुरुष ही कल्पना समजण्यास थोडी अवघड आहे. (माझी कमतरता !) बाकी"प्रश्नोपनिषदा"त पहिल्या उत्तरापासून सहाव्या उत्तरापर्यंत ’प्राणा"ची महिती सांगितली आहे शरद . . .

वाचने 3687 वाचनखूण प्रतिक्रिया 7

एस Tue, 08/02/2016 - 18:48
सांख्यांची "लिंगशरीर" कल्पना ही येथील षोडश कला पुरुष वरून घेतली असावी. तेथे "बुद्धी" ही सतरावी मिळवली आहे. सांख्य व अद्वैत ही दोनही दर्शने "प्रश्न"चा आधार घेतात. याबद्दल मला थोडी शंका आहे. संदर्भ तपासून पाहतो. पुभाप्र.

In reply to by एस

प्रचेतस Tue, 08/02/2016 - 21:36
सांख्यांचा उगम तंत्रातून आहे ना? पुरुष प्रकृती ही सांख्यांनी तंत्रातून घेतली आहे असे बरेच जण मानतात. लोकायतात बघायला हवं जरा.

In reply to by प्रचेतस

एस Tue, 08/02/2016 - 23:19
सांख्य तत्त्वज्ञानात मूळ फक्त प्रकृती होती. नंतर पुरुष आला. मग अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रतिवाद करता करता पूर्णपुरुष व ब्रह्म हे सगळंही आलं.