मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

मृत्युन्जय · · जनातलं, मनातलं
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले. त्यापैकी अर्जुन उच्च्कुलीन राजपुत्र म्हणून वाढल्याने त्याला साक्षात गुरु द्रोणांकडुन सर्व दैवी अस्त्रांचे आणि शस्त्रांचे ज्ञान मिळाले तर कर्ण एक सूतपुत्र म्हणुन वाढल्याने त्या ज्ञानापासून वंचित राहिला मात्र द्रोणाचार्यांच्या आश्रमातच राहुन त्याने शस्त्रास्त्रांचे उत्तम ज्ञान मिळवले आणि धनुर्विद्येत प्राविण्य मिळवले पण सर्व प्रकारे लायक असुनही केवळ प्रचलित जातिव्यवस्थेमुळे एका ठराविक मर्यादेपलीकडे ज्ञान न मिळवु शकल्याने त्याला दैवी अस्त्रांपासून वंछित रहावे लागले जी त्याने नंतर परशरामांकडुन फसवणुकीने मिळवले आणी त्याच्मुळे त्याचा घात झाला. पण या सर्व घटनाक्रमामागचे जबरदस्त राजकारण कधी कोणी समजुन घ्यायचा प्रयत्न करताना दिसत नाही. कर्ण आणि अर्जुन या दोन व्यक्तिरेखांच्या आडुन दुर्योधन आणि कृष्ण या दोन राजकारण्यांनी जे अप्रतिम राजकारण खेळले त्याच्या विवेचनासाठी हा खटाटोप. महाभारत आपण नेहमीच एका साचेबद्ध रितीने पाहतो आणि ते बरोबरही आहे कारण तसे न केल्यास ते मूळ कथाबीजाला आव्हान देण्यासारखे होइल. पण थोडा वेळ त्यातील सर्व दैवी घटना आणि संगती बाजूला करुन बघितल्यास मानवी भावभावनांचे अगणित कंगोरे सामोरे येतील. दैवी अस्त्रे, कृष्णाचे देवत्व, देवांचे अस्तित्व आणि दैवी चमत्कार या संदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास कृष्ण आणि दुर्योधन यांच्या राजकारणाचे द्वंद्व दिसुन येइल. त्यामुळे फक्त या लेखापुरत्या या सगळ्या गोष्टींना मी फाटा दिला आहे आणी हे लक्षात ठेउनच कृपया हा लेख वाचावा. जर दैवी अस्त्रांचे अस्तित्वच अमान्य केले तर हे लक्षात येइल की द्रोणाचार्यांनी त्यांच्या सर्वच शिष्यांना केवळ युद्धकलेत आणि युद्धशास्त्रात प्रवीण केले होते. यात कदाचित रासायनिक शास्त्रावर आधारित अस्त्रे असु शकतील जी त्यांनी काही ठराविक लोकांना शिकवली ज्यांचा उपयोग कदाचित " सर्वसंहारक अस्त्रे " म्हणुन होउ शकत होता पण एकास एक युद्धात कदाचित ही अस्त्रे निरुपयोगी होती. हे गृहीतक मान्य केल्यास एकल्व्याची कथा देखील अजुन जास्त समजुन घेता येइल. जर अर्जुनाकडे इतकी सगळी संहारक अस्त्रे होती की जी एकास एक युद्धात देखील वापरता येत होती तर द्रोणाचार्यांच्या मनात तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होइल की नाहीए याबाबत शंका असण्याचे कारण नव्हते. पण धनुर्विद्येतली एकलव्याची प्रगती आणी कौशल्य बघता त्यांना त्याबद्दल भय उत्पन्न झाले याचाच दुसरा अर्थ असा होतो की कदाचित दैवी अस्त्रे असा काही प्रकार नव्हताच. होत्या त्या सगळ्या अफवा. त्यामुळेच कर्णाकडे दैवी अस्त्रे नाहित हे माहिती असुनही दुर्योधनाला त्याच्यात अर्जुनाचा प्रतिस्पर्धी दिसला. युद्धकलेत आणि धनुर्विद्येत अर्जुनाचा उतारा कौरवांकडे नव्हता आणि त्यामुळॅच पहिली संधी मिळताच दुर्योधनाने कर्णाला आपल्या जाळ्यात ओढले. दुर्योधनाच्या गुणाग्राहकतेचा आणी राजकीय दूरदृष्टीची ही पहिली चुणूक होती. या वेळी तरी युधिष्ठिराकडे त्या राजकीय कुवतीवर उतारा नव्हता आणी सर्वंकष राजकीय पटलावर कृष्णाचा उगम होइस्तोवर युधिष्ठिर विदुराच्या राजकारणीय कौशल्यावर विसंबुन तरलेला दिसतो. अर्जुनाकडे दैवी अस्त्रे आहेत आणी कर्णाकडे ती नाहित हे जेव्हा कंठशोष करुन सांगितले जात होते त्याच्याच आसपास कधीतरी दुर्योधनाने कर्णाकडे दैवी अस्त्रे नसली तरी जन्मजात दैवी कवच आणी कुंडले आहेत अशी आवई उठवुन दिली असावी आणि ही नि:संशयपणे एक आवईच होती असे म्हणण्यास वाव आहे. कर्णाचे जन्मजात दैवी कवच भेदुन कुठलेही अस्त्र किंवा शस्त्र त्याला इजा पोचवु शकत नाही हे सत्य असल्यास द्रौपदी स्वयंवरामध्ये, गंधर्व युद्धात आणि विराट युद्धात त्याला इजा कश्या झाल्या याचे काही स्पष्टीकरण मिळु शकत नाही. शिवाय जर कर्णाकडे दैवी कवच कुंडले होती तर ती एक असामान्य घटना होती आणि अश्या असामान्य माणसाबद्दल परशुरामांना काही माहिती नव्हती हे संभवत नाही. त्यामुळे कर्णाचे अभेद्य कवच आणि कुंडले अस्तित्वातच नव्हती हे मानायला वाव आहे. अशी आवई उठवल्याने कर्ण अर्जुनापेक्षा सरस, प्रबळ आणि अजेय आहे अशी भावना सैन्यात पसरवण्यात दुर्योधन यशस्वी झाला आणि त्यामुळे सैन्याचे आणी कौरवपक्षाचे मनोधैर्य वाढले असावे. दुर्योधनाने राजकारणाच्या पटावरचे अजुन एक घर या खेळीमुळे सर केले. दुसरीकडे द्रोणाचार्यांनी न शिकवलेली विद्या आणी कौशल्य कर्णाने परशुरामांकडुन हस्तगत केली असावी परंतु हे करताना त्याने यच्चयावत सर्व दैवी अस्त्रे परशुरामांकडुन शिकुन घेतली आहेत अशी आवई उठवण्यात दुर्योधन यशस्वी झालेला दिसतो. द्रोणाचार्यांना दैवी अस्त्रे परशुरामांनी शिकवली होती त्यामुळे अर्जुनाच्या गुरुंच्या गुरुंकडुन दैवी अस्त्रे शिकलेला महान धनुर्धर म्हणुन कर्णाची जाहिरात करण्याची संधी दुर्योधन दवडेल असे वाटत नाही. दुर्योधनाने अजुन एक पॉईंट सर केलेला दिसतो. त्यानंतर त्याच्या या तंत्राला त्याच्यावरच उलटवण्याचा यशस्वी प्रयत्न कृष्णाने केलेला दिसतो. त्याने दुर्योधनावर कडी करत अशी आवई उठवलेली असावी की अर्जुनाने तर सर्वच देवांकडुन दैवी अस्त्रे मिळवली (परशुराम काय चीज आहे) आणी भरीस भर म्हणुन त्याने देवाधिदेव शंकराचा कृपाप्रसाद ग्रहण करुन त्यांच्याकडुन अस्त्रांमध्ये सर्वोच्च स्थानी असलेले पाशुपत अस्त्र थेट शिवाकडुन मिळवले. अजुन एक ब्राउनी पॉइंट सर करताना या सग्ळ्या कथेला कर्णाला (न) मिळालेल्या शापांची फोडणी दिली गेली आणी अशी अफवा पसरवली गेली की कर्ण ऐनवेळी त्याचे ब्रह्मास्त्र विसरेल असा शाप परशुरामांनी दिला आहे तर कर्णाचे रथचक्र युद्धाच्या ऐन ध्मश्चक्रीत चिखलात घुसेल असा शाप त्याला ब्राह्मणाने दिलेला आहे. यानंतर कर्णाला पुरते निष्प्रभ करण्यासाठी पुढची चाल खेळली गेली असावी आणि कुठल्याश्या ब्राह्मणाला पुढे करुन कर्णाकडे कधी नसलेले कवच आणी कुंडल त्याने त्या ब्राह्मणाला म्हणजे इंद्राला दान केली अशी आवई उठवली गेलेली दिसते. लोकांना दाखवण्यापुरता हा बनाव कदाचित खरेच घडवुन आणला गेला असाबा आणि घेणार्‍याला आणी देणार्‍याला दोघांनाही त्यातला फोलपणा जाणवला असावा पण त्यामुळे सैन्यावर मोठा दुष्प्रभाव पडु शकतो. झालेल्या या नुकसानीची भरपाई करण्यासाठी कौरवांनी अजुन एक आवई उठवुन दिली की कर्णाच्या दानशूर पणावर प्रसन्न होउन इंद्राने त्याला अशी एक अमोघ शक्ती दिली आहे की ज्या योगे तो कुठल्याह्ही यौद्ध्याला मारु शकेल. या शेवटच्या अफवेवरचा उतारा कॄष्णाला घटोत्कचाच्या मृत्युत दिसला आणि एवढी दु:खद घटना घडलेली असतानाही त्या घटनेचे देखील सवतःच्या राजकीय फायद्यासाठी भांडवल करण्यात कृष्ण यशस्वी झाला. घटोत्कचाच्या मृत्युसरशी त्याने कर्णाची शक्ती वापरुन संपली आणी इंद्राकडे परत गेली अशी आवई उठवुन दिली. सर्व पांडव दु:खी असताना कृष्णाने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने रथावर उड्या मारुन आपला आनंद व्यक्त करताना कर्णाने त्याची शक्ता गमावल्याची बातमी पसरवली. त्यामुळे घटोत्कचाच्या मृत्युने मनोबल गमावलेल्या पांडव सैन्याला उलट आता अर्जुनाचा मार्ग निर्धोक झाला असे मानुन मनातली सर्व मरगळ झटकुन युद्ध करण्यास आधारच मिळाला. यामुळेच कदाचित अर्जुनाचे देखील मनोबल वाढले असावे. सैन्याचे तर नि:संशय वाढतेच. युद्धाच्या सतराव्या दिवशी कर्णाने शल्याला रथाचे सारथ्य करण्याची विनंती केली याचा कृष्णाने या सगळ्या घडामोडीत अचूक उपयोग करुन घेतला आणि शल्याने मोठ्या कौशल्याने कर्णाचा रथ वेगळा काढुन युद्धाभूमीवर चिखल साठला असेल अश्या ठिकाणी नेउन उभा केला. आणि मग "चिखलातुन चाक निघाले की सांग, मी येतो परत सारथ्य करायला" असे सांगुन शक्य चक्क निघुन गेला. त्या चिखलात चाक रुतलेले असताना सारथी सोडुन गेलेला असताना आणि रथ हलत नसताना केलेल्या त्या एकतर्फी युद्धात कर्णाला नि:शस्त्र असताना मारताना 'अखेरच्या युद्धात रथचक्र जमिनीत रुतण्याचा ' त्याला शापच होता असे सांगण्याचे नैतिक पाठबळ देखील कृष्णार्जुनाला त्या शापाच्या अफवेतुनच मिळाले. महाभारत युद्धात बहुतेक सगळ्या प्रमुख यौद्ध्यांचा अंत साध्या बाणांनीच झाला आहे. दैवी अस्त्राने सदगती प्राप्त झालेले फार थोडे. भीष्म साध्या बाणांनी शरपंजरी पडले. द्रोणांचा तलवारीने शिरच्छेद झाला, भूरिश्रवाचेही तेच, कर्ण साध्या अंजलिक बाणाने मारला गेला, दुर्योधन गदायुद्धात गेला, वृषसेन साध्या बाणाने मारला गेला, दृष्ट्यद्युम्न आणि युधामन्यु यांना तर अश्वत्थाम्याने हातानेच मारले. असे असताना अवास्तव महत्व दिल्या गेलेल्या दैवी अस्त्रांना आणि शक्तींना राजकारणाच्या पटावर मोहर्‍यांसारखे वापरुन कृष्ण आणि दुर्योधनाने राजकीय चातुर्याचे असीम प्रदर्शन केले असे मानण्यास वाव आहे. या सगळ्या खेळ्यांमध्ये कर्ण आणि अर्जुन या दोघांचा प्याद्यांसारखा मोठ्या खुबीने वापर केला गेला. ****************** तळटीपा: १. वरचे विवेचन हे माझे मत झाले. महाभारताच्या मुख्य कथेत सगळ्या दैवी घटना, व्यक्ती आणी शक्तींचा उल्लेख केला गेला आहे. जर या सर्व गोष्टींचे दैवी आवरण अथवा अस्तित्व अमान्य करायचे झाले तर या सगळ्या घटनांचे स्पष्टीकरण क्से करता येइल याचे विवेचन करण्याचा हा माझ्या दृष्टीकोनातुन छोटा प्रयत्न. २. महाभारतातले राजकारण मुख्यत्वे लढले गेले चार पात्रांमध्ये दुर्योधन आणि शकुनी एका बाजुला आणि कृष्ण आणि युधिष्टिर दुसर्‍या बाजुला. त्यातही मुख्य खेळाडु दुर्योधन आणी कृष्ण त्यामुळे या दोघांचाच प्रामुख्याने उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात या संपुर्ण राजकारणामागे अजुनही व्यक्ती असु शकतात. " वर नमूद केल्याप्रमाणे हे माझे "रीडिंग बिटवीन द लाइन्स" किंवा "इंटरप्रिटेशन आहे त्यामुळे अमुक गोष्ट कृष्णाने केली याचा पुरावा मूळ महाभारतातुन काढुन द्यायला सांगितल्यास तसा काही देता येणार नाही. ३. हा लेख लिहिताना मुळात महाभारत घडले का? महाभरत खरे की केवळ एक कथा? या दृष्टीकोनातुन?विचार केलेला नाही. एका खर्‍या कथेचे दैवी आवरण बाजुला सारुन त्यातील काही घटनांचे विवेचन इतक्या ढोबळ अर्थाने कृपया या लेखाकडे बघावे.

वाचन 33511 प्रतिक्रिया 107

मन१ Fri, 04/01/2016 - 17:54
महाभारताबद्दल इतरही कुणाचा अभ्यास असेल तर त्यांची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.

धर्म ग्रंथाकडे एक 'कथा' म्हणून बघण्याचा चांगला व्यू आहे. अवांतर : अजून 'चेष्टा' करणारी माकडे आली नाहीत, तयार राहा. विशेषतः 'रामायण आणि महाभारत' म्हंटल्यावर आजकाल 'मर्कट चाळ्यांचा आणि लाथांचा' सुकाळ असतो. कुठलाही धागा सोडला नाही आहे या लोकांनी. इथे आलेच तर त्यांना रिस्पोन्स न देणे योग्य, उगाच कचरा होत जातो चर्चेचा. मी पा आणि मु पी मध्ये आजकाल फार फरक राहिला नाही आहे.

इरावती कर्वे यांचे "युगान्त" (वाचले नसल्यास) वाचा. महाभारतातील पात्रांच्या कृतींचे तत्कालीन समाज-राज-धर्म-कारणाच्या पार्श्वभूमीवर केवळ मानव म्हणून (मानवी राग-लोभ-ईर्षा-अपेक्षा-उद्देश जमेस धरून) फार छान विष्लेशण केलेले आहे. राजकारण का व कसे झाले आणि नंतर कृष्णाचे दैवतीकरण कसे झाले हा भागही रोचक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मूळ इतिहास/कथेच्या हातभर ढलपीला दोन योजने लांब बनवणे हे नंतर प्रक्षेपीत झालेल्या भागांमुळे होतच राहते... मूळ "जय" आणि आताचे "महाभारत" यांच्या लांबीतला फरक हेच सांगतो. व्यक्तींना देवत्व/संतपणा बहाल करण्यासाठी आणि पुस्तकांना दैवी बनवण्यासाठी त्यांना चमत्कार चिकटवण्यासारखी दुसरी जास्त पॉवरफूल्ल ट्रिक नाही... उदा "हा एवढा महापूर आला / भूकंप झाला, पण त्या देवस्थानाला धक्कापण नाय लागला" किंवा "हात लावून कॅन्सर बरा केला", इ, इ, इ. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

Anand More Sat, 04/02/2016 - 12:39
हो ते तर वाचाच आणि भैरप्पांचे पर्व व कुरुंदकरांचे व्यासांचे शिल्प देखील वाचल्यास तुमची मते बदलतील.

अभ्या.. Fri, 04/01/2016 - 18:33
परफेक्ट विवेचन. मलाही बर्‍याचदा असेच वाटायचे. काय ही दिव्यास्त्रे? एकेका बाणाने हजारो सैनिक मारायची ताकद असलेली प्रत्यक्षात कशी असतील? धनुर्विद्येतले परफेक्षन अचूक लक्ष्यावर बाण सोडणे, हलत्या वाहनातून तिरंदाजी करणे, शब्दवेधीपणा असणे याशिवाय अजून काय असेल. एकाच वेळी आगीचा पाउस पाडणे, पाणी पाडणे, हजारो सैनिक मारणे ह्या अव्वाच्या बव्वा असणार. बर्‍याच प्रश्नांना लॉजिकली समर्थन मिळतेय मृत्युंजयराव तुमच्या विवेचनातून. धन्वाद.

In reply to by अभ्या..

विजय पुरोहित Fri, 04/01/2016 - 19:05
अभ्या...च्या प्रतिसादाशी सहमत. लेख अतिशय आवडला. एका नवीन दृष्टीकोणातून महाभारत समजून घेता आले. धन्यवाद.

हकु Fri, 04/01/2016 - 19:24
आपण सांगितलेल्या या चार पात्रांव्यातिरिक्त तितकेच महत्वाचे अजून एक पात्र म्हणावे लागेल, ते म्हणजे 'भीम'. डॉ. प. वि. वर्तक यांच्या 'स्वयंभू' या भीमावर आधारित पुस्तकाचा संदर्भ घेऊन काही मुद्दे मांडतो. त्यांच्या मते भीम हे महाभारताचा नायक शोभावा असे व्यक्तिमत्व. त्याची काही कारणे - १) लहानपणापासूनच भीम हा अतिशय बलवान म्हणून समजला गेलेला. त्यामुळे झोपेचे औषध खाऊ घालून तलावात बुडवून आधीच त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या कुठल्याही पांडवाबरोबर हे घडवण्याची आवश्यकता वाटली नाही. (अर्थात इथे ती तलावात बुडवण्याची गोष्ट ग्राह्य धरली तर) पण एकंदरीतच कौरव गण लहानपणापासूनच भीमाला टरकून होते ही बाब मानली पाहिजे. २) लाक्षागृहाला लागलेल्या आगीतून कुंतीसकट सर्व भावंडांना वाचवण्याचे काम भीमानेच केले. इथे भीमाची बुद्धी लक्षात घ्यायला हवी. ३) भीमाची ताकद अचाट होतीच. जरासंधासारख्या कसलेल्या मल्लाला उभा फाडण्याचे काम इथे भीमाने करून दाखवले. इथे कृष्णाचं राजकारण आपल्या सहज ध्यानात येतं. त्याने जरासंधासारख्या प्रचंड बलवान शत्रूला भीमाकरवी परस्पर मारलं. पण इथे भीम (आणि केवळ भीमच) त्याला मल्ल युद्धात मारू शकतो ह्याची कृष्णाला पूर्ण खात्री होती. ४) द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगात केवळ युधिष्ठीराचा आदेश झाला नाही म्हणून भीम- अर्जुन हात चोळत चरफडत बसले, पण सर्वांसमक्ष दुर्योधनाच्या मांड्या फोडण्याची, दु:शासनाचं रक्त पिण्याची आणि सर्वच्या सर्व १०० कौरवांचा वध करण्याची प्रतिज्ञा इथे भीमाने केली आणि कुरुक्षेत्राच्या युद्धात ती कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण करून दाखवली. मात्र अर्जुनाच्या प्रतीज्ञांकडे बघितलं तर असं दिसतं की त्याला प्रत्येक वेळी कृष्णाची मदत घ्यावी लागलेली दिसते. कर्ण वध, जयद्रथ वध इ. ५) इथे भीमाने सुद्धा शंभर कौरवांना कुठल्याही दैवी अस्त्रांनी मारलेले नाही. ६) डॉ. प. वि. वर्तक यांच्या मते, भीमाने रणांगणावर प्रत्यक्ष युद्धात कर्णाला जवळजवळ ३१ वेळा जीवदान दिले. केवळ अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी यासाठी. कर्ण प्रत्येक वेळी भीमाला पाठ दाखवून पळत सुटला. अर्थात भीमाने कर्णाला धनुर्विद्येत सुद्धा हरवले असा याचा अर्थ होतो. ते ही ३१ वेळा. (इथे डॉ. प. वि. वर्तक यांनी महाभारतातले दाखले त्या पुस्तकात दिलेले आहेत.) ७) अज्ञातवासात असताना, पाचही पांडव आणि द्रौपदी एकाच ठिकाणी म्हणजे विराट राजाच्या दरबारी राहत असताना जेव्हा कीचकाने द्रौपदीशी लंपटपणा केला तेव्हा द्रौपदीने ईतर कोणाच्याही कानावर न घालता केवळ भीमाला जाऊन सांगितले. अगदी अर्जुनाला सुद्धा तिला हे सांगावेसे वाटले नाही. म्हणजे तिचाही विश्वास सर्वात जास्त भीमावर च होता हे लक्षात येते. पुढे भीमाने कीचकाला हातांनीच अगदी अमानुष पद्धतीने मारले आणि त्यानंतर द्रौपदीला पळवून नेणाऱ्या शंभर अनुकीचाकांना सुद्धा पाठलाग करून मारले. यातला प्रत्येक अनुकीचक हा किचकाच्याच ताकदीचा होता. इथे भीमाने अक्षरश:मोठमोठाले वृक्ष उपटून ह्या सर्वांना मारल्याचे वर्णन महाभारतात आहे. ८) कुरुक्षेत्रावर सुद्धा प्रतिस्पर्धी पक्षाचा सर्वात जास्त संहार एकट्या भीमाने केलेला दिसतो. तो ही कुठल्याही अस्त्राविद्येशिवाय. ९) कुंती ला सुद्धा सर्वांपेक्षा जास्त भीमाच्याच ताकदीवर विश्वास होता असा दाखला सुद्धा त्या पुस्तकात दिला आहे. १०) सर्वात महत्वाचे- कृष्णाने गीता सांगण्यासाठी केवळ अर्जुनाचीच निवड का केली? युधिष्ठीर किंवा भीम यांना गीता सांगावी असे त्याला का वाटले नाही ? कारण गीतेचे तत्वज्ञान त्या दोघांनाही बहुतांश प्रमाणात माहित होते. दयूत प्रकरणात गीतेत सांगितलेले तत्वज्ञान ऐकवत भीमाने युधिष्ठिराची कानउघडणी केल्याचा एक प्रसंग इथे वर्तकांनी सांगितलेला आहे. थोडक्यात भीम हा केवळ शक्तीत नाही तर बुद्धीतही श्रेष्ठ होता. त्यामुळे हे महाभारतातले एक अतिशय महत्वाचे पात्र म्हणून म्हणायला हवे. कर्ण आणि अर्जुनापेक्षाही महत्वाचे.

In reply to by हकु

मृत्युन्जय Sat, 04/02/2016 - 12:28
नक्कीच भीम हे एक महत्वाचे आणी रोचक पात्र आहे. मात्र लेखाचा मुख्य उद्देश सर्वात महत्वाच्या पात्रांवर लिहायचा नसून मर्यादित गोष्टींवरील राजकीय दृष्टीकोनाचे विवेचन करायचा असल्याने भीमाचा उल्लेख केला नाही. राजकारणाच्या खेळात भीम हे एक फारच कच्चे पात्र होते हे नक्की. कर्ण आणि अर्जुन स्वतःदेखील राजकारणात फार निष्णात नव्हते. त्यामानाने दुर्योधन आणी कृष्ण फार पोचलेले राजकारणी होते आणि युधिष्टिराने फार मोठ्या प्रमाणावर राजकीय सूज्ञता दाखवली हे नक्की. मात्र दुर्योधन आणी कृष्ण यांच्यापेक्षा तो थोडा कच्चा होता राजकारणात. मात्र तो प्रचंड डिप्लोमॅटीक होता असे दिसते.

हकु Fri, 04/01/2016 - 19:31
अजून एक मुद्दा- भीमाबद्दल कोणीही कसलीही आवई उठवण्याच्या भानगडीत पडलं नाही कारण भीमाची ताकद सर्वांना परिचित होती आणि स्वतः भीम ती वेळोवेळी सिद्ध करून दाखवीत होता.

In reply to by मृत्युन्जय

अस्वस्थामा Mon, 04/04/2016 - 16:53
भिमाच्या ताकदीबद्दल शंकाच नाही. तरी पण त्याच्याबाबतीत जास्त अंगावर येणारी बाब त्याचं क्रौर्य. त्याचे बहुतेक पराक्रम अथवा सूड हे खूप रक्तरंजित आणि बीभत्स वाटावेत असे (आठवा जरासंध, कीचक, दु:शासन) आहेत. अमानुष ताकदीसोबतच अमानुष अशी क्रौर्यकर्मे करणारा म्हणून तरी तो लक्षात राहतो हे नक्की. (महाभारतातील इतर पात्रातले कोणी असे नसतील असं नव्हे पण भीमाचे असले पराक्रम अगदी चवीने रंगवले आहेत असं वाटतं.)

उगा काहितरीच Fri, 04/01/2016 - 19:36
ओके म्हणजे महाभारतातून सगळे चमत्कार वगैरे वजा करून त्यात आजच्या काळानुसार काही लॉजीक बसवायचे तर... चांगला प्रयत्न आहे. शुभेच्छा ! पण मग बरेचसे लूप होल्स राहतील साहेब. तुमच्या महाभारताच्या अभ्यासाबाबत जाणून आहे, पण काही विद्या , कला काळाबरोबर नष्ट पण झाल्या असतील ना. एक सोपे उदाहरण घ्यायचे तर त्याकाळात धनुष्य ज्या साधनांचा वापर करून बनवत असत ती कला आज नामशेष झाली असेल ना. ( अॉफकोर्स त्यापेक्षा ॲडव्हान्स बो असतील पण तसे धनुष्य तर आज नाही ना बनवू शकत कुणी) मे बी अशाच प्रकारे अस्त्रे वगैरे चं नॉलेज नष्ट झालं असु शकते.... . . .(प्रतिसाद विस्कळीत झाला आहे समजून घ्याल अशी आशा आहे.)

In reply to by प्रचेतस

अर्धवटराव Sat, 04/02/2016 - 05:25
अस्त्र म्हणजे संहारक फॉर्मुला म्हणावं काय? आज आपण ज्याला शस्त्रास्त म्हणतो त्यातला शस्त्र म्हणजे मेकॅनीकल असेम्ब्ली आणि अस्त्र म्हणजे जैवीक अस्त्र, रासायनीक अस्त्र या अर्थाने...

In reply to by समाधान राऊत

प्रचेतस Fri, 04/01/2016 - 21:33
संजयाला दिव्य दृष्टि होती हे एक मिथक आहे. महाभारताचा सर्वच वृत्तांत संजय हा फ्ल्याशब्याक स्वरूपात सांगतो. सुरुवातीला पर्वाचा सारांश आणि नंतर धृतराष्ट्राने विस्ताराने हकीकत सांग अशी आज्ञा केली असता त्या त्या दिवसानुसार आदल्या दिवसाच्या वृत्ताचा विस्तार. शल्यपर्वाच्या शेवटी कौरवांचा पराभव होऊन उरलेसुरले कौरव प्राणभयाने पळत असतात त्यात संजय देखील असतो. तो धृतराष्ट्राला म्हणतो की जीवाच्या भितीने आम्ही पळत सुटलो. बाणांपासून बचावून कसा बसा जीव वाचवून आम्ही येथे परत आलो. संजयाला दिव्य दृष्टी वैगेरे काहीही नसून तो प्रत्यक्ष युद्धाच्या वार्तांकनासाठी युद्धभूमीवर प्रत्यक्ष हजर असे व् रात्री शिबिरात परत जात असे. दिव्यदृष्टी ही प्रक्षिप्त कथा आहे.

In reply to by प्रचेतस

अगम्य Sat, 04/02/2016 - 00:34
गीतेत सुद्धा श्री भगवान "उवाच" अर्जुन "उवाच" असा परोक्ष भूतकाळ वाचक प्रयोग केला आहे. साधा भूतकाळ किंवा live commentary सारखा वर्तमानकाळ नाही वापरलेला.

In reply to by समाधान राऊत

मृत्युन्जय Fri, 04/01/2016 - 22:29
संजय महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने लढला. युद्धाच्या महत्वाच्या टप्प्यांनंतर त्याने युद्धाचे वार्तांकन केले. इतकेच काय युद्धाच्या एका सत्त्रात तर चक्क ध्रुतराष्ट्र स्वतः चिलखत चढवुन युद्धभूमीवर हजर होता. अर्थात त्याने युद्ध लढले नाही. चिलखत केवळ संरक्षणापुरते असावे

चांदणे संदीप Fri, 04/01/2016 - 20:32
हे लॉजिक तर सेम मला लहानपणी'च' डोक्यात आलेले. अजून कोणीच कसा असा विचार करत नाही याचेच मला तेव्हाही राहून राहून आश्चर्य वाटायचे. आज इथे हा लेख पाहिला आणि काही अंशी पटला. मीच एक लेख यावर लिहून काढायचा विचार करत होतो, नव्हे सुरुवातही झाली होती पण इथली धूळवड नको वाटत होती, आजही वाटते! त्यामुळेच इथेच प्रतिसादात थोड्या वेळात लिहितो. बीजी! :) वरती हकु यांचा प्रतिसाद आवडला. त्यावरही लिहितोच! म्हात्रेकाकांचा प्रतिसादही विषयाला धरून, उत्तमच. त्यांनी उल्लेखलेले पुस्तक वाचायचा योग मात्र आलेला नाही! उका यांचा प्रतिवाद आवडला....आलोच! तरी, सविस्तर प्रतिक्रिया थोड्या वेळाने देतोच! स्टे टयून्ड! Sandy

Jack_Bauer Fri, 04/01/2016 - 20:42
हा खूपच इंटरेस्टिंग विषय आहे. ह्यात सूर्यग्रहण आणि जयद्रथ हि घटना देखील सांगता येईल.

विवेकपटाईत Fri, 04/01/2016 - 20:54
महाभारत असा ग्रंथ आहे, त्यात प्रत्येकाला त्याचा दृष्टीकोनातून काहीना काही सापडतेच. भैरप्पाचा पर्व आणि वासुदेव नायर यांचा दुसरा पांडव हे हि वाचण्यासारखे आहेत. या शिवाय हिंदीत राम कुमार भ्रमरचे हि महाभारतावर आधारित पूर्ण पुस्तकांची सिरीज आहे. ती हि वाचून पहावी. प्रत्येकवेळी काही अलग आणि निराळे अनुभव मिळतील. खर म्हणाल तर महाभारत हा एक मोठा महासागर आहे. आजची राजनीती हि महाभारतात पाहता येते.

हेमंत लाटकर Fri, 04/01/2016 - 21:17
दुर्याधनाला जेवढे वाईट समजले जाते तेवढा वाईट नसावा असे वाटते. तो चंगला राजा होता. हस्तिनापुरातील जनता सुखी समाधानी होती. पांडवांना राज्य मिळवून देण्यासाठी दुर्याधनाची जास्तीत जास्त वाईट प्रतिमा निर्माण केली गेली. यात कृष्णनितीच होती.

गॅरी ट्रुमन Fri, 04/01/2016 - 21:31
रोचक लेख. पण काही गोष्टी नाही पटल्या. विशेषत: पत्त्याच्या चॅलेन्ज या खेळात चालते त्याप्रमाणे (चार राजे, उपर चार, उसके उपर और दो वगैरे) एकामागोमाग दुसरी चढवून सांगितलेल्या आवया पसरवणे हा मुद्दा विशेष पटला नाही. जर कर्ण कुठल्याकुठल्या लढायांमध्ये जखमी झाला असेल तर मुळात त्याच्याकडे कुठलेही कवच वगैरे नव्हते हे कोणालाच कसे समजले नाही?म्हणजे दुर्योधनाने त्याच्या राजकारणाच्या सोयीसाठी ही आवई उठवली हे जरी मान्य केले तरी त्याविरूध्द लक्षणे सामोरी येऊनही (कर्ण जखमी होणे) सगळ्यांनी विश्वास कसा ठेवला? तीच गोष्ट नसलेली कवचकुंडले कर्णाने दान केली ही आवई उठवली गेली त्याविषयी. जर दुर्योधनाने कर्णाकडे कवच कुंडले आहेत ही आवई उठवली असेल आणि कृष्णाने ती कवच कुंडले गेली ही त्याविरूध्द आवई उठवली असेल तर त्याचे खंडन करायचा दुर्योधन-कर्णाकडून काही प्रयत्न कसा झाला नाही? तिसरे म्हणजे इंद्राने कर्णाला कोणालाही मारता येईल असे अमोघ शस्त्र दिले अशी आवई उठवली गेली असली तरी घटोत्कचाला मारण्यासाठी "त्या अमोघ शस्त्राचा" वापर न करताच कर्णाने आपले काम केले अशीही आवई उठवता येणे कितपत कठिण होते? आणि घटोत्कच युद्धात धुमाकूळ घालत असताना "याच्या तावडीतून वाचलो तरच अर्जुनाकडे बघून घेता येईल तेव्हा अर्जुनासाठी ते अमोघ अस्त्र ठेवले असलेस तरी ते आताच घटोत्कचाविरूध्द वापर" असा आग्रह दुर्योधनाने कर्णाकडे धरला होता असे मी वाचलेल्या महाभारताच्या पुस्तकात होते. जर मुळात असे कुठलेच अमोघ अस्त्र नसेल तर दुर्योधनाने असा आग्रह धरायची तर्कसंगती लागत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

प्रचेतस Fri, 04/01/2016 - 21:40
जन्मजात कवचकुंडले व सूर्याद्वारे इंद्रापासून सावध राहण्यास सांगणे व इंद्रहस्ते त्याचे कपटाने हरण ह्या सरळ सरळ मागाहून घुसडलेल्या गोष्टी आहेत. कर्णास त्याचे जन्मरहस्य कृष्णाकडून शिष्टाइचे वेळेस कळते. कवचकुंडल हरण प्रकार आधीचा आहे. इंद्रहस्ते मात्र कधीतरी त्याला शक्ती मिळाली असावी हे मात्र मूळ संहितेत असेल असे वाटते. बाकी महाभारत (आणि रामायणातही) जेव्हढे म्हणून परशुरामाचे उल्लेख आहेत ते सर्व प्रक्षिप्त आहेत. इसपू २०० ते इस २०० ह्या दरम्यानचे हे मूळ कथांवरचे हे भार्गवी संस्करण आहे. ह्यानंतरचे कृष्णाचे भगवंतात झालेले संस्करण हे गुप्त काळात झालेले. भार्गवी आणि गुप्त संस्करणे महाभारतात सर्वात मोठी संस्करणे मानली जातात.

In reply to by गॅरी ट्रुमन

मृत्युन्जय Sat, 04/02/2016 - 12:24
१. कर्ण अनेक लढायांमध्ये जखमी झाला हे तर वरती नमूद केलेच आहे. द्रौपदी स्वयंवर, विराट युद्ध आणि घोषयात्रा ही त्यातली काही उदाहरणे. कवच कुंडले असताना तो जखमी कसा झाला हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरितच राहतो. २, कर्णाने शक्ती वापरलीच नाही अशी आवई उठवता आलीही असती. पण कृष्णाने मुख्य म्हणजे जो नाटकीपणा केला त्यामुळे पांडव सैन्याचे मनोधैर्य नक्कीच उंचावले असावे. या सगळ्या खेळ्या अश्याही प्रतिस्पर्ध्ह्यावर मानसिक विजय मिळवण्यासाठी होत्या.

In reply to by मृत्युन्जय

गॅरी ट्रुमन Sat, 04/02/2016 - 12:45
कवच कुंडले असताना तो जखमी कसा झाला हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरितच राहतो.
तोच तर मुद्दा आहे. जर कर्ण जखमी झाला तर त्याच्याकडे कवचकुंडले वगैरे काही नाही हे कोणाच्याच लक्षात न येता सगळ्यांनी या आवईवर विश्वास ठेवला हे अविश्वसनीय वाटते. अशी आवई उठविणे हे राजकारणाच्या सोयीसाठी केले असेल हे समजू शकतो. पण समजा त्या आवईच्या विपरीत असे काही घडले तर मात्र मुळातल्या त्या आवईतच काही दम नाही हे लक्षात येऊन त्या आवईचा उलटा परिणाम व्हायला हवा. एक उदाहरण द्यायचे झाले तर क्रिकेट संघात घेतलेला नवा खेळाडू सचिन+ब्रॅडमन+लारा इत्यादींचे कॉम्बिनेशन आहे ही आवई संघातील इतर खेळाडूंचे मनोबल उंचावावे म्हणून उठवली असे समजू. पण हा खेळाडू जर गल्लीत बॉलिंग करणार्‍या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कधी तोंडही न बघितलेल्या बॉलरकडून दोनचार वेळा सहज आऊट झाला तर त्या आवईत काही अर्थ नाही हे इतर खेळाडूंच्या लक्षात यायला किती वेळ लागणार? कर्ण जर जखमी झाला असेल तर नेमके असेच काहीतरी झाले नाही का?तरीही सगळ्या जगाने या आवईवर विश्वास ठेवला, इतकेच नव्हे तर कृष्णानेही ती कवचकुंडले गेली अशी उलटी आवई उठवली हे सगळे कसे काय?

In reply to by गॅरी ट्रुमन

मृत्युन्जय Sat, 04/02/2016 - 14:32
पण हा खेळाडू जर गल्लीत बॉलिंग करणार्‍या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कधी तोंडही न बघितलेल्या बॉलरकडून दोनचार वेळा सहज आऊट झाला तर त्या आवईत काही अर्थ नाही हे इतर खेळाडूंच्या लक्षात यायला किती वेळ लागणार? तसे झालेले दिसत नाह्ही. कर्ण एक धनुर्धर म्हणुन नि:संशय श्रेष्ठ होता. तो तुम्ही म्हणाता त्याप्रमाणे गल्लीतल्या खेळाडुंकडुन हारलेला दिसत नाही. अर्जुनाशी जेव्हा जेव्हा त्याचा सामना झाला तेव्हा तेव्हा तो एकतर्फी झाला असे म्हणवत नाही. अपवाद विराट युद्धाचा. त्यात अर्जुनाने त्याच्यापेक्षा सरस मानल्या गेलेल्या द्रोण आणी भीष्मांना देखील धूळ चारलेली दिसते. अगदीच उदाहरण द्यायचे झाल्यास अर्जुन जर सचिन तेंडुलकर असेल त्तर कर्ण कदाचित जॅक कलिस होता. तो जितका श्रेष्ठ धनुर्धर होता तितकाच श्रेष्ठ मल्ल देखील होता. मल्लयुद्धात भीम जरासंधाला ९ / १८ दिवस हारवु शकला नव्हता तिथे तीच करामत कर्णाने एका दिवसात करुन दाखवल्याचे दिसते. अंतिम युद्धात कर्णाने सात्यकी सोडुन इतर सर्वांना कधी ना कधी हरवले आहे. अर्जुन देखील त्याच्या बाणांनी विद्द्ध होउन बेशुद्ध पडलेला असतानाच कर्णाने रथचक्र जमिनीतुन बाहेर काढण्यासाठी खाली उडी मारली. त्यामुळे त्यातही तो अगदी कमकुवत होता असे मानण्यास वाव नाही. शिवाय दिग्विजयात त्याने यादव सोडुन सगळ्यांनाच नमवलेले दिसते.

तिरकीट Fri, 04/01/2016 - 21:36
म्हात्रे साहेबांनी उल्लेखलेले युगांत नक्कीच वाचनीय आहे. नुकतीच इपिक वाहीनीवर आलेली 'धर्मक्षेत्र' ही मालिकाही आवडली.

बोका-ए-आझम Fri, 04/01/2016 - 23:13
एक उत्सुकता - कर्ण हा सूर्यपुत्र आणि अर्जुन हा इंद्राचा पुत्र, नकुल आणि सहदेव हे अश्विनीकुमारांचे पुत्र - याकडे कसे पाहता तुम्ही? दुर्योधनाने पांडवांना राज्यात वाटा द्यायला नकार देण्यामागे त्यांचे जन्म संशयास्पद असल्याचा काही भाग असेल का?

In reply to by बोका-ए-आझम

मृत्युन्जय Sat, 04/02/2016 - 12:16
पाचही पांडव तर सरळ सरळ नियोगाने जन्माला घातलेले आहेत. जसे धृतराष्ट्र, पांडु आणी विदुर जन्मले तसेच. ते औरसपुत्र नसल्याचा मुद्दा दुर्योधनाने उचलला होताच. त्यावेळेस विदुराने अथवा नारदांनी त्याला त्याच्या बापाच्या जन्माची उकल करुन सांगितली आणी मग त्या हिशोबाने भीष्म वगळता कोणाचाच राज्यावर हक्क उरत नाही हे दाखवुन दिले. त्यामुळॅ मग नंतर हा मुद्दा चर्चिलेला गेलेला दिसत नाही. शिवाय तसे बघता कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेने झालेला दिस नाही :)

In reply to by मृत्युन्जय

शिवाय तसे बघता कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेने झालेला दिस नाही :) कौरवांचा जन्म देखील सरळ साध्या गर्भधारणेनेच झालेला दाखविला आहे (पक्षी, द्रोणातून वगैरे नाही). मात्र ती गर्भधारणा सरळ साध्या प्रथेने झाली नसावी असे म्हणायला जागा आहे. :)

In reply to by मृत्युन्जय

Anand More Sat, 04/02/2016 - 16:49
पाचही पांडव तर सरळ सरळ नियोगाने जन्माला घातलेले आहेत. जसे धृतराष्ट्र, पांडु आणी विदुर जन्मले तसेच.
नियोगाबद्दल माझ्याकडे थोडी वेगळी माहिती होती. आता समोर संदर्भ ग्रंथ नाही आहे पण जेव्हढे आठवतेय तेव्हढे लिहितो. पतीच्या परवानगीने केवळ अपत्यप्राप्तीसाठी नियोग शास्त्र संमत होता. तो देखील पतीच्या भावाशी किंवा पतीने निवडलेल्या ब्राह्मणाशी. त्यात देखील त्या परपुरुषाबद्दल शारीर आकर्षण राहणार नाही याची काळजी घेतली जात असे. एका अपत्य प्राप्तीनंतर दुसऱ्या अपत्यासाठी नियोग शास्त्र संमत नव्हता. त्या न्यायाने धृतराष्ट्र आणि पंडू यांचा राज्यावरचा अधिकार शास्त्रसंमत होता. धृतराष्ट्र अंध असल्याने आणि राजा अव्यंग हवा या अटीमुळे तो ज्येष्ठ असूनही अपात्र ठरला. आणि राज्य पंडू कडे गेले. पंडू निपुत्रिक होता. तो राज्य सोडून पत्नीसहीत वनात गेला होता. वडिलधारे जवळ नसताना, त्यांची संमती घेतली नसताना, राजप्रासादापासून दूर, वनात, शारीरिक दृष्ट्या असमर्थ पंडूने, एका अपत्य प्राप्तीनंतरही घडू दिलेला नियोग शास्त्र संमत कसा? आणि अश्या अशास्त्रीय नियोगातून जन्मलेल्या मुलांचा अधिकार योग्य की मूळच्या ज्येष्ठ परंतु अव्यंग राजाच्या स्वअपत्याचा अधिकार योग्य ? हा खरा महाभारताचा प्रश्न आहे. यावर त्याकाळातील समजूतीप्रमाणे भीष्म, द्रोण आणि बहुसंख्येने राजे (अगदी माद्रीचा भाऊ शल्य, म्हणजे पांडवांचा मामा सुद्धा) दुर्योधनाच्या बाजूने उभे राहतात . पांडवांना राज्यात दिलेला प्रवेश हा मानवतेच्या कारणाने दिलेला होता. आणि त्यांना मिळालेला पाठींबा इतर राजांच्या सूडाच्या राजकारणाचा भाग होता. असे माझे मत आहे.

In reply to by Anand More

lgodbole Sat, 04/02/2016 - 22:48
बहुतेक नियोग ३ अपत्यासाठी अलाउड होता... एक देवाला , एक देशाला , एक आईबापाला..... कुंतीकडे चौथ्या अपत्याची पंडुने मागणी केल्यावर म्हणुनच कुंती पुढची अपत्ये माद्रीकडुन घ्यायला सांगते. .... राजा अव्यंग असावा असा संकेत होता. लिखित नियम नव्हे... एकदा ध्रूतराष्ट्राने राज्य व्यवस्थित संभाळल्यावर तो नियम पुन्हापुन्हा मध्ये आणायचे कारण नव्हते. .... कुंतीने मोठ्या लबाडीने आधी अश्रित म्हणुन स्वतःची मुले मोठी करुन घेतली व नंतर डाव साधला. शापानंतर जंगलात गेल्यावर जो पंडू राज्याकडे फिरकलाही नव्हता तो व पांड्व प्रजेची सहानुभुती गिळुन बसले व शक्य तितके पण सुंदरयेने राज्य संभाळलेला धृतराष्ट्र मात्र प्रजेचा रोष व उपहास यांचा मानकरी ठरला. .... भारतीय ( हिंदु ? ) जनता आजही तशीच आहे. धृतराष्ट्र = आमची काँग्रेस पंडू = तुमची बीजेपी

In reply to by lgodbole

उगा काहितरीच Sat, 04/02/2016 - 22:57
एक नम्र विनंती: प्लिज या धाग्यावर तरी आपले अनमोल विचार मांडू नका . आम्हा पामरांना इथल्या चर्चेतून महाभारताविषयी थोडीफार माहिती मिळत आहे ती मिळू द्या .

In reply to by Anand More

मृत्युन्जय Mon, 04/04/2016 - 11:41
नियोगासाठी निवडला जाणारा पुरुष उच्चकुलीन आणि सदवर्तनी असावा अशी व्यवस्था केली जायची. आजही कृत्रिम गर्भधारणा करताना लोक तश्या पएक्षा करतात तर त्या काळी तर तसा नियम असणे स्वाभाविकच आहे. नियोगातुन जन्मलेली अपत्ये ही त्या स्त्रीच्या नवर्‍याची समजली जायची (मग तो जिवंत असो अथवा मृत). नियोगाद्वारे अपत्यप्राप्तीचा निर्णय अगदी थोरामोठ्यांच्या मतानेच घेतला जायचा असे नाही तर बर्‍याचदा दांपत्य स्वतःही तो निर्णय घ्यायचे किंवा अशीही उदाहरणे आहेत की "नवर्‍याच्या भल्याकरता " पत्नीनेच परस्पर नियोगाद्वारे अपत्य्प्राप्ती करुन घेतली. पुत्रप्राप्तीशिवाय स्वर्गप्राप्ती होउ शकत नाही असा समज असल्याने पांडुला पुत्रप्राप्ती करुन घेण्याचा मोह आला. त्याला मिळालेल्या शापामुळे तो स्वतः ते करु शकत नाही हे माहिती असल्याने त्याने कुंतीला नियोगाद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेण्याची गळ घातली. त्या आधी त्याने काही ऋषीमुनींशी चर्चा करुन हे योग्य असल्याची खात्री करुन घेतली होती. महाभारतातील वर्णनानुसार असे दिसते की अर्जुनाच्या जन्माच्या आधीदेखील पांडुने विद्वज्जनांशी संवाद साधुन तिसर्‍या अपत्यप्राप्तीसाठी मार्गदर्शन घेतले होते. त्यावरुन असे दिसते की नियोगाद्वारे एकापेक्षा अधिक अपत्यप्राप्ती शास्त्रसंमत होती. कुंतीपासुन ३ मुले झाल्यावर देखील पांडुला अधिक पुत्र हवे होते पण कुंतीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. पती व्यतिरिक्त ३ पेक्षा अधिक लोकांशी संभोग करणार्‍या स्त्रिया वेश्या गणल्या जातात त्यामुळे याहुन अधिक पुत्रांना मी नियोगाद्वारे जन्म देणार नाही असे तिने ठणकावुन सांगितले (खरे बघता सुर्य धरुन ही संख्या आधीच ३ पेक्षा जास्त झालीए होती). यादरम्यान माद्रीला देखील पुत्रप्राप्तीची इच्छा होतीच. तिइने पांडुला विनंती करुन देवांना आमंत्रित करण्याचा एक मंत्र कुंतीकडून शिकुन घेतला आणी पहिल्याच प्रयत्नात जुळ्या अश्विनीकुमारांकडुन २ पुत्रांची प्राप्ती करुन घेतली. कुंतीने यावरुन असा ग्रह करुन घेतला की असे जर ३ प्रयत्न माद्रीनेदेखीले केले तर तिच्या मुलांची संख्या माद्रीपेक्षा कमी होइल (आणी मग अर्थातच तिचा वरचष्मा कमी होइल) म्हणुन तिने त्याहुन जास्त मंत्त्र माद्रीला देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पांडुच्या मुलांची संख्या ५ वर मर्यादित राहिली. राज्यावरचा दावा कुणाचा ह प्रश्न तर महत्वाचा खराच. पांडु हा अभिमंत्रित राजा होता तर धृतराष्ट्र हा त्याचा प्रतिनिधी होता. पांडु राज्य सोडुन गेलाच नव्हता तर तो केवळ काही काळासाठी त्याचे राज्य धृतराष्ट्रच्या अधिपत्याखाली सोडुन गेला होता असे पांडवाच्या समर्थकांचे म्हणणे होते तर राज्य सोडुन गेलेला पांडु मृत्युपर्यत परत आलाच नाही आणी मग राज्य धृतराष्ट्रानेच सांभाळले, तो असाही ज्येष्ठ होता तर त्या अधिकाराने राज्य दुर्योधनाचेच असे कौरव समर्थकांचे म्हणणे होते.

In reply to by मृत्युन्जय

चांदणे संदीप Mon, 04/04/2016 - 12:06
कुंतीने यावरुन असा ग्रह करुन घेतला की असे जर ३ प्रयत्न माद्रीनेदेखीले केले तर तिच्या मुलांची संख्या माद्रीपेक्षा कमी होइल (आणी मग अर्थातच तिचा वरचष्मा कमी होइल) म्हणुन तिने त्याहुन जास्त मंत्त्र माद्रीला देण्यास स्पष्ट नकार दिला आणि पांडुच्या मुलांची संख्या ५ वर मर्यादित राहिली.
With all due respect... हे आजिबातच पटले नाही! प्रत्येक अपत्यप्राप्तीसाठी वेगवेगळा मंत्र लागत होता ह्याला काही आधार आहे का? Sandy

In reply to by चांदणे संदीप

मृत्युन्जय Mon, 04/04/2016 - 12:25
महाभारतात असेच लिहिले आहे हो. अगदीच स्पष्ट बोलायचे झाल्यास ही मंत्र वगैरे निव्वळ थापेबाजी होती असे माझे मत आहे. आअ कुठलाही आशिर्वाद कुंतीला नसावा. कारण तसा वर असल्यास इंद्राला आवाहन करण्यापुर्वी तपःश्चर्या वगैरे करुन त्याची आळवणी करायला लागली नसती. पुर्ण एक वर्ष इंद्राची स्तुती केल्यावर प्रसन्न होउन त्याने कुंतीला पुत्र मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्याचे दिसते. त्यामुळे केवळ मंत्राच्या सहाय्याने देवांना आवाहन करता येत होते हे पटत नाही. बाकी तुम्ही आक्षेप घेतल्यावर परत वाचले तेव्हा असे लक्षात आले की कुंतीने माद्रीला मंत्र दिला याचा अर्थ तिने तिला तो सांगितल असे नाही तर बहुधा मंत्र तिनेच म्हटला होता आणि माद्रीने फक्त कुठल्या देवांकडुन पुत्रप्राप्ती व्हावी त्यांचे स्मरण केले होते आणि त्या स्मरणाला अनुसरुन आमंत्रित केलेल्या अश्विनीकुमारांनी तिच्याबरोबर संबंध ठेवले.

In reply to by मृत्युन्जय

चांदणे संदीप Mon, 04/04/2016 - 13:14
आअ कुठलाही आशिर्वाद कुंतीला नसावा. कारण तसा वर असल्यास इंद्राला आवाहन करण्यापुर्वी तपःश्चर्या वगैरे करुन त्याची आळवणी करायला लागली नसती. पुर्ण एक वर्ष इंद्राची स्तुती केल्यावर प्रसन्न होउन त्याने कुंतीला पुत्र मिळवुन देण्याचे आश्वासन दिल्याचे दिसते. त्यामुळे केवळ मंत्राच्या सहाय्याने देवांना आवाहन करता येत होते हे पटत नाही.
इथेही लॉजिक गडबडतय....सूर्याची आळवणी केल्यावर मात्र त्याने लगेच येऊन कर्णाची भेट कुंतीच्या उदरात ठेवली. तिथे कुंतीने एक पूर्ण वर्ष सूर्याची आळवणी करण्याची शक्यता आजिबातच नाहीये!
कुंतीने माद्रीला मंत्र दिला याचा अर्थ तिने तिला तो सांगितल असे नाही तर बहुधा मंत्र तिनेच म्हटला होता आणि माद्रीने फक्त कुठल्या देवांकडुन पुत्रप्राप्ती व्हावी त्यांचे स्मरण केले होते
हे म्हणजे सलाईन एकाला लावले आणि बरे दुसर्याला वाटल्यासारखे आहे! :) Sandy

In reply to by चांदणे संदीप

मृत्युन्जय Mon, 04/04/2016 - 13:34
इथेही लॉजिक गडबडतय....सूर्याची आळवणी केल्यावर मात्र त्याने लगेच येऊन कर्णाची भेट कुंतीच्या उदरात ठेवली. तिथे कुंतीने एक पूर्ण वर्ष सूर्याची आळवणी करण्याची शक्यता आजिबातच नाहीये! इथे लॉजिक काहिच नाहिये. इथे फॅक्ट्स जशाच्या तश्या मांडलेल्या आहेत. सुर्य लगेच आला तर इंद्राची मात्र आळवणी करायला लागली असे महाभारतातच लिहिले आहे. इंद्रापासुन पुत्रप्राप्तीसाठी कुंतीने पुर्ण एक वर्ष काहिसे व्रत घेतले आणी पांडुने तर एका पायावर उभे राहुन तपश्चर्या केली असे म्हटले आहे. मात्र भीम आणि अर्जुन यांच्यामधील एका वर्षाचे अंतर पाहता इंद्र कदाचित ३ महिन्यात तयार झाला असावा आणि कुंतीने व्रत मात्र १ वर्षे केले असावे असे दिसते. हे म्हणजे सलाईन एकाला लावले आणि बरे दुसर्याला वाटल्यासारखे आहे! :) तसे आहे खरे. दुर्वासांचा आशिर्वाद लई स्ट्राँग होता बरं का.

In reply to by मृत्युन्जय

चांदणे संदीप Mon, 04/04/2016 - 13:44
इंद्राची मात्र आळवणी करायला लागली असे महाभारतातच लिहिले आहे.
बरोबर आहे, साधे देव आणि देवेंद्र यांच्यात काहीतरी तर फरक नको का असायला! ;) असो, धन्यवाद, तुम्ही वेळ काढून माझ्या फालतू शंका-कुशंकांना उत्तरे देत आहात! Sandy

In reply to by चांदणे संदीप

मृत्युन्जय Mon, 04/04/2016 - 13:58
महाभारत आवडीचा विषय आहे हो. आणी शंका फालतु आजिबात नाहित. तुम्हाला उत्तरे देताना मलादेखील महाभारताबद्द्दल २ नविन गोष्टी कळाल्या आज.

In reply to by मृत्युन्जय

अभ्या.. Mon, 04/04/2016 - 14:08
बापरे, महाभारताचे वाचन केलेच पाहिजे. एवढ्या एका प्रतिसादात मला कमीतकमी १० आधुनिक काळातली कथाबीजे सापडलीत. अ‍ॅक्चुअली व्यासांनी काहीच सोडलेले नाही लिहिण्याचे.

भाऊंचे भाऊ Fri, 04/01/2016 - 23:17
सर्व डोलारा महाभारत युद्धात बहुतेक सगळ्या प्रमुख यौद्ध्यांचा अंत साध्या बाणांनीच झाला आहे. या एकमेव विधानाभोवती एकवटला आहे... पण या तर्कटामधे लोकाना अस्त्र निवारणाचे सुपरनेचुरल कौशल्य ज्ञात होते म्हणून ते प्रमुख गणले गेले हीबाब सोयीस्करपणे विसरली आहेच परंतु हे मेलेले जे प्रमुख योध्दे आहेत ते अस्त्रामुळे न्हवे तर त्यांना त्यांच्या शक्तिंपासून अस्त्रांपासून श्री कृष्णाने कावेबाज पणे दूर केले ही बाब विसरणे अशक्य आहे अन एकदा ते असे कावेबाज पणाला बळि पडल्यावर ईसिसच्या लोकांनी सुधा त्यांना नुसत्या सुऱ्याने ग्ळे कापून मारले असते तिथे दिव्य शक्तिची गरज काय ?

In reply to by भाऊंचे भाऊ

मृत्युन्जय Sat, 04/02/2016 - 12:19
नाही नाही. तसे नाही. कदाचित मी मुद्दा योग्यप्रकारे मांडलेला नाही. मला असे म्हणायचे होते की महाभारताभोवतालची सगळी अद्भुतरम्यता शेष केल्यास बाकी जी काय कथा उरेल त्याचे तार्किक विश्लेषण काय असेल. सर्व प्रमुख यौद्ध्यांचा अंत कसा झाला याचे विवेचन फक्त त्यातील एक भाग म्हणुन घेतला आहे. तसे पाहता दिव्यास्त्रांच्या उपयोगाची अनेक उदाहरणे महाभारतात आहेतच की. घटोत्कच देखील वासवी शक्तीने मारला गेला असेच मानण्यात येते ना.

In reply to by मृत्युन्जय

भाऊंचे भाऊ Sat, 04/02/2016 - 12:45
दुर्योधन धूर्त न्हवे तर लो सेल्फ इस्टीम , इनसिक्योर असलेली व्यक्तीरेखा ठरते. विशेषत: एकत्र शिक्षणात पांडव जास्त गुणी असे चित्र निर्माण झालेले असताना. त्याला लक्षागृह, भिमाला विष पाजने, दोन वेळा द्युत खेळावे लागणे या सर्व गोष्टीमधे करताना त्याची पांडवासोबत युध्द टाळायची आगतिकता पुन्हा पुन्हा दिसते. त्याने युद्ध टाळायचेच प्रयत्न जास्त केलेत आणि अशी नकारात्मकतेला बळि पडलेली व्यक्ति धूर्तपणे नको असलेल्या भावी युध्दाच्या चाली रचते पटत नाही. कारण युध्द हे आपल्या ह्क्कासाठी का असेना पांडवानी छेडले आहे. दुर्योधनाने नाही. आणि तो या कलेत परिपूर्ण नाही... महाभारत युध्द स्ट्रेटेजिक कृष्णाने (नाइलाजाने) बनवले अन कौरवाने ही दृष्टी युध्द टाळाय्ला वापरली करायला कधीच नाही

In reply to by भाऊंचे भाऊ

मृत्युन्जय Sat, 04/02/2016 - 13:19
युद्ध टाळण्याचा सर्व प्रयत्न पांडवांकडुन झालेला दिसतो. याउलट दुर्योधन नेहमीच युद्धाची तयारी करत होता. पांडव वनवासात असताना दुर्योधनाने हे ताडले होते की १३ वर्षांनी युद्धाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे ती १३ वर्षे त्याने भीमाच्या पुतळ्यावर प्रहार करुन गदेचा सराव केला. या १३ वर्षांदरम्यानच कर्णाने दिग्विजय करुन मित्र जोडले. शिवाय कर्णाला आपल्या बाजुला वळवुन घेण्यात दुर्योधनाही हीच दूरदृष्टी होती. बाकी महाभारत युद्धा स्टृएटेजिकली कृष्णाने लढण्यास भाग पडले हे १००% मान्न्य. थोडेसे याच अंगाने मी या आधीही एका लेखात लिहिले होते. आणि एक वर्तुळ पुर्ण झाले

In reply to by मृत्युन्जय

भाऊंचे भाऊ Sat, 04/02/2016 - 13:52
पण हो 13 वर्षानी पांडवांचा हक्क अमान्य करून युध्दास भाग पाडायचे त्याने ठरवले हे मान्य. तसेच ईराक बाबत जश्या रासायनिक अस्त्रे असल्याच्या अफवा उठ्वल्या गेल्या तसेच काहीसे करण आर्जुन बाबत केले गेले असावे हां आपला तर्क पटतो. फक्त हे अशी अस्त्रे अस्तित्वात न्हवती असे गृहीत धरले तरच अन्यथा त्यांच्यात खरोखर शितयुध्दच चालू झाले. पण अफवाच उठवायच्या आहेत तर त्या इतक्या मर्यादित कशा ? तसेच विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर अर्जुनाने अस्त्रांचे प्रदर्शन प्रजेसमोर केले होते जिथे प्रथमच त्याची गाठ कर्णासोबत पडली(हे मी टिवित पाहिले) मग अस्त्रांच्या अस्तित्वावर मर्यादा कशा मानायच्या ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भाऊंचे भाऊ Sat, 04/02/2016 - 14:08
त्या वेळी फार वाचन करत न्हवतो. आणि नंतर महाभारता सारख्या अवांतरावर वेळ घालवायला वेळ मिळाला नाही :(

In reply to by मृत्युन्जय

आनन्दा Sun, 04/03/2016 - 09:27
नाही ते म्हणतायत त्यात पण तथ्य आहे.. दुर्योधनाने शक्यतोवर समोरासमोरचे युद्ध टाळायचाच प्रयत्न केलेला दिसतो.. अपवाद विराटाकडे झालेले युद्ध, ज्यात तो हरून देखील जिंकला असता.. किंबहुना जिंकलाच. नंतर फासे वेगळे पडले हा भाग वेगळा. आणि दुसरे अंतिम युद्ध - जे होणार आहे हे गृहीत धरून तो शेवटची १३ वर्षे तयारी करत होता. पण ही २ सोडल्यास तो शक्यतो युद्धबाह्य मार्गाने विजय मिळवण्यआचा प्रयत्न करत होता असे दिसते.

In reply to by भाऊंचे भाऊ

तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 13:50
पांडव म्हणजे चांगुलपणाचा आदर्श आणि कौरव म्हणजे वाइटपणाचा आदर्श असा दॄष्टीकोन ठेवला तर मृत्युंजय जे म्हणत आहेत ते कळायला कठिण जाईल. हे पूर्वग्रह बाजूला ठेवून तटस्थपणे निव्वळ घटनांकडे बघणे योग्य ठरेल. तुम्ही म्हनताय तशी लो सेल्फ एस्टीम, इन्सिक्योर अशी व्यक्तिरेखा वाटत नाही. ज्यांच्या जन्माचा, बापांचा पत्ता नाही, संशयास्पद मूळ आहे अशा पाच जणांनी येऊन इस्टेटीत वाटा द्या म्हनून ठाण मांडून बसले तर कुणी ही चिडचिड करेल. दुसरा मुद्दा युद्धाचा की युद्ध का टाळले. माझ्या मते राजकारणात थेट मैदानात उतरण्या आधी मुत्सद्दी चाली खेळायला लागतात, छल कपट करायला लागतं, शत्रुला तुच्छ, नालायक ठरवून मनोबल तोडायला मानहानी करायला लागते. कमीत कमी उर्जा, बळ, माणसे, वेळ वापरुन शत्रूचा नायनाट करणे हे जास्त आदर्श मानलं जातं. प्रत्येक प्रश्न प्रतिष्ठेचा बनवणे व युद्धाच्या मैदानात घेऊन जाणे राजधर्माला शोभत नाही. कॄष्णशिष्टाईच्या प्रसंगात सुईच्या अग्रावर मावेल एवढी जमीन द्यायलाही त्याने नकार दिला. ह्याचा अर्थ त्याला सेटलमेंट नकोच होती, त्याला त्यांच्याशी संबंधच नको होते. शेवटी युद्धाचे आव्हान दिले तेव्हा तेही स्विकारले, जर तो युद्धाला घाबरला असता तर 'घ्या काय पायजे ती दोन पाच एकर जागा आणि टळा एकदाचे' असेही तो म्हणू शकला असता.. आपल्याच सैन्यातल्या रथी-महारथींचे मन शत्रूच्या बाजूने झुकलेले असतांना युद्ध करायला लागलेला राजा. तो शेवटपर्यंत शौर्याने लढला. त्याला आपण भित्रा, कमकुवत, पलायनवादी अशा दॄष्टीने पाहू शकतो का? हा प्रतिसाद टायपत असतांना मृत्युंजय यांचे उत्तर आलेले बघितले. त्या उत्तराशी सहमत आहे.

In reply to by तर्राट जोकर

भाऊंचे भाऊ Sat, 04/02/2016 - 14:00
. नाहि तर मृत्युंजय यांनी महाभारत कशाला वाचले असते त्यांनी निळु फुलेंच्या एखाद्या चित्रपटातिल पात्रांवर लेखमाला लिहली नसती काय ? तटस्थता म्हणजे वास्तवाकडे डोळे मिंटूण बघणे अशी आपली काही धारणा असेल तर आपला प्रतिसाद योग्य आहे

In reply to by भाऊंचे भाऊ

तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 14:12
महाभारत आपण नेहमीच एका साचेबद्ध रितीने पाहतो आणि ते बरोबरही आहे कारण तसे न केल्यास ते मूळ कथाबीजाला आव्हान देण्यासारखे होइल. पण थोडा वेळ त्यातील सर्व दैवी घटना आणि संगती बाजूला करुन बघितल्यास मानवी भावभावनांचे अगणित कंगोरे सामोरे येतील. दैवी अस्त्रे, कृष्णाचे देवत्व, देवांचे अस्तित्व आणि दैवी चमत्कार या संदर्भाकडे दुर्लक्ष केल्यास कृष्ण आणि दुर्योधन यांच्या राजकारणाचे द्वंद्व दिसुन येइल. त्यामुळे फक्त या लेखापुरत्या या सगळ्या गोष्टींना मी फाटा दिला आहे आणी हे लक्षात ठेउनच कृपया हा लेख वाचावा.
हे वाचले नाही का? मला नाही वाटत लेखकमहोदयांनी आदर्शिकरणाच्या उठाठेवीसाठी लेख लिहला आहे. बाकी तुम्हाला तो कसेही करुन त्याच्यातच बसवायचा असेल तर आपला पास.

In reply to by भाऊंचे भाऊ

मृत्युन्जय Sat, 04/02/2016 - 14:36
महाभारताच्या खरे घडले असेल तर प्रश्नच नाही. नसेल घडल्यास ती जगातली सर्वोत्तम कथा आहे असे मी मानतो. त्यामुळे महाभारतावर जितके जमेल तितके वाचायला आवडते. आदर्शतावादासाठी रामायणा वाचणे उत्तम. महाभारत त्या उलट करड्या रंगात गुंफले आहे. जवळजवळ सगळीच पात्रे या रंगाच्या थोड्याफार अल्याड पल्याड उभे असलेली दिसतील. मानवी भावभावनांचे जितके कंगोरे महाभारतात दिसतात तितके क्वचितच इतरत्र कुठल्या कथांमध्ये दिसतात. त्यामुळेच महाभारत मला श्रेष्ठ वाटते.

समाधान राऊत Fri, 04/01/2016 - 23:55
म्हणजे जयद्रथ ला रात आंधळे होते(तरिही तो युद्धात उतरला) असं म्हणायचे आहे का आपल्याला भाऊ((भाभा)) आणि कृश्नाने त्याला दिवसाच(कट रचुण --अर्थात सुर्य ग्रहणाने) अंधळे केले....असेच म्हणावे लागेल

In reply to by भाऊंचे भाऊ

समाधान राऊत Sat, 04/02/2016 - 17:59
जादु मंत्रे अस्त्रे यांचा विचार न करता महाभारत कसे असेल असा मुळ मुद्दा असतना आपन म्हटले कि सर्वांकडे supper natural skill होते. असो((आनि त्याही क्रुष्णाने काढुण घेतल्या )) म्हंजे विषयच आप्ल्या डोक्यावरुन गेलेला दिस्तो..म्हनुं हे उपहासात्मक उदाहरन... कदचित ते ही खरे असु शकेल कारण आजची हुशार मंडळी अनि संगनक ही हेच संगतात कि तेरा दिवसात दोन ग्रहने झाली.. 1..पहिले सुर्य ग्रहं युद्धाच्या 14 व्या दिवशी --यावेळी जयद्रथ मेला. 2.तेथुन पूढे 13 दिवसने जे ग्रहण झाले त्यावेळी क्रुश्न गेल..((पण इथे ग्रहण कारण नसुन कालदर्शक आहे..)) अनि महाभारतामधेहि हि दोन ग्रहणे उल्लेखिलि आहेत. may be days will Chang

जगप्रवासी Sat, 04/02/2016 - 11:30
मृत्युंजय साहेब तुमचा लेख एकदम पटला. महाभारतातील या महत्वाच्या २ पात्रांकडे पूर्ण लक्ष असताना मागून सूत्र हलवणारे दुर्योधन आणि कृष्ण होते हे तुमच्या विवेचनातून पटत. खूप छान लेख.

साहना Sat, 04/02/2016 - 14:01
माझा मूळ लेख (ज्याचा उल्लेख पहिल्या परीश्चेदांत केला आहे) आधिकारिक महाभारताच्या प्रती मध्ये नव्हता. त्याचा मुल स्रोत एका गुजराती मासिक आहे. सध्या आठवत नाही. आपले म्हणणे १००% पटते. महाभारतातील अनेक गोष्टी कवी कल्पना असल्या तरी सूत्रधार कृष्ण आणि दुर्योधन होते ह्यांत शंका नाही. महाभारताची कथा सांगत असताना दुर्योधनचा उल्लेख जास्त केला जात नाही तरी सुद्धा मूळ महाभारतांत दुर्योधन चाणाक्ष राजकारणी म्हणूनच दिसून येतो. द्यूत असो वा अज्ञातवास, दुर्योधन प्रत्येक ठिकाणी कायद्याचा आसरा घेत असतो. अगदी द्रौपदी वस्त्र हरणात सुद्धा दुर्योधन धर्म आणि कायदा ह्याचीच भाषा वापरतो. आम्हा भारतीयांना सगळ्याच गोष्टी अतिरंजित करून किंवा ब्लेक आणि व्हयिट स्वरूपांत पहायची खोड असल्याने या युद्धांतील दुर्योधनाचा ग्रांड प्लान कधी पुढे येताच नाही.

चांदणे संदीप Sat, 04/02/2016 - 15:39
मृत्युंजय सर... आपल्या लेखाचा रोख हा कृष्ण आणि दुर्योधन यांनी आपापल्या प्याद्यांचा (पक्षी:कर्णार्जुन) वापर करून हे महाभारत घडविले असा दिसतो. इथे आशयाशी जरा सहमती नोंदवतो पण त्याचबरोबर 'त्या' दोघांना प्यादे म्हणण्याबाबत माझा आक्षेप! कारण एक लगेच सांगता येईल की, दोघेही महाभारताची अतिमहत्वाची पात्रे आहेत. तसेच त्यांच्याकडे अस्त्रे वगैरे असणे ह्या अफवा असण्याच्या शक्यतेला तर मी आजिबात सहमत होऊ शकत नाही. आता, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अस्त्रांचा दैवीपणा काढला तर दोघेही सर्वसामान्य योद्धेच कदाचित ठरले असते. यासाठी तुम्ही द्रोणांनी एकलव्याचा अंगठा कापून घेतल्याचे उदाहरण दिले आहे. ओके! आता, माझ्या मते, अस्त्र वगैरेंचा वापर करण्यासाठी धनुष्य चालवता येणे ही बेसिक गरज होती. गदेवर अस्त्र लावून फेकल्याचे कुठेही उदाहरण नाही. मग त्याहीपुढे जाऊन जर कोणीतरी त्या धनुर्विद्येत अतिशय प्राविण्य मिळवत असेल तर अस्त्रांचा वापर करायला तो एक ॲडेड ॲडव्हांटेज आहे! कारण, समजा एखाद्या नवशिक्याला किंवा कामचलाऊ धनुर्धाराला सांगितले की बाबारे इथून सोलापूरवर अस्त्र चालव आणि त्याने कोल्हापूरवरच सोडले तर! "आर्र्र स्वारी बर्का सर...." म्हणण्यावाचून त्याला नो इलाज! आपण ऑलिंपीक वगैरेमध्ये तीरंदाजीची अटीतटीची स्पर्धा पाहतो. एक-अर्ध्या गुणाच्या फरकानेही मेडल हातातून निसटू शकते. मग अस्त्र चालविणे हे मेडल मिळवण्यापेक्षा नक्कीच महत्वाचे ठरते, नाही का? शिवाय एकलव्याच्या गोष्टीतून वाचल्या/समजल्याप्रमाणे एकलव्याने ज्या पद्धतीने कुत्र्याच्या तोंडात बाण मारून त्याला इजा न होऊ देता त्याचे तोंड बंद केलेले ते पाहता नुसत्या अचूक नेम मिळवण्यापुरते त्याचे कौशल्य मर्यादित राहिले नव्हते तर त्याहीपेक्षा पुढे गेलेले. एक चांगले उदाहरण आत्ता सुचते ते म्हणजे, धोनीसारखे उत्तम फिनीशर व स्ट्रॉंग हिटर असणे केव्हाही चांगलेच पण त्याचवेळी उत्तम फिनीशर, तंत्रशुद्ध हिटर, गॅप काढण्याची अनोखी कला, दबावात आपल्यातले सर्वोत्तम बाहेर काढणे व सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या सगळ्यात सातत्य राखणे ह्या गुणांमुळे कोहली आताचा सर्वश्रेष्ठ फलंदाज गणला जाणे यात नो नवल. म्हणून द्रोणांनी एकलव्याला आताचा कोहली होण्याची संधीच मिळू दिली नाही! ;) दुसरे म्हणजे वर "उका" भाऊंना म्हणायचे आहे की अस्त्रे वगैरे सगळ होतं पण काळाने ते सगळ चट्टम करून टाकलं. याचा अर्थ त्यांना महाभारत खरेच घडले असावे असे म्हणायचे आहे. त्यांनी स्वत:च म्हटल्याप्रमाणे प्रतिसाद विस्कळीत आहे खरा, बट लेट मी हेल्प हिम. इथेही मी त्यांच्याशी अंशत:च सहमत आहे. म्हणजे, त्यांच्या अस्त्रांच्या अस्तिवाबद्दल असणाऱ्या समजुतीला माझे अनुमोदन पण महाभारत खरेच घडले का नाही याबद्दल मी नॉट दॅट खात्रीशीर! :) आता तुम्ही म्हणाल जिथं आडातच नाही तिथं पोहऱ्यात कुठून? थांबा... दोन्ही शक्यतांचा विचार करू... १) महाभारत खरेच घडले होते नि अस्त्रांचे ज्ञान कालौघात नष्ट झाले.... ऊका खुश! ;) २)महाभारत ही त्या काळची साय-फाय/फिक्शन कॅटेगरीतली उत्कृष्ट कादंबरी होती, त्यामुळे अस्त्र वगैरे त्यात असणं हा एक कल्पनाशक्तीचा जबरद्स्त आणि लोकप्रिय आविष्कार होता! इथे, पहिल्याविषयी मी काय बोलणार? तो प्रत्येकाच्या वैयक्तिक मानण्याचा/श्रद्धेचा भाग आहे. मानो तो गंगा मा है ना मानो तो बहता पानी वगैरेसारखं! आणि दुसरी शक्यता विचारात घेतली तर काय, प्रश्नच मिटला! कारण ते काल्पनिक आहे म्हटल्यावर इथे लिहीण्यात तुम्हांला कल्पनेच्या बाबतीत सर्वच स्वातंत्र्य आहे. तुमच्या कल्पनांच्या सीमा तुम्ही ताणून किती दूरवर नेऊ शकता हे केवळ तुमच्याच कल्पना'शक्ती'वर अवलंबून आहे. इथे त्या महाकवीने त्या कल्पनेच्या लगोरीला परिणामकारक ताणून सर्वसामान्यांना त्यात बसवून दूर भिरकावून दिले आहे, जे की त्या हवेतल्या प्रवासातच सर्वजण आहेत अजून, खाली पडलेच नाहीत! त्याबद्दल व्यासांना एक कडक सलाम! आता आपण ह्या दोन्ही शक्यतांमधला संयुक्त दुवा म्हणाजेच "अस्त्राचे असणे" केवळ याचाच विचार करू. अस समजा महाभारत काळात विज्ञानाच्या बाबतीत लोक चरमसीमेवर होते म्हणजे आतापेक्षाही कित्येक पटीने पुढे. पर्जन्यास्त्राकडे पाहिले असता आताच्या काळात ज्या पद्धतीने कृत्रीम पाऊस पाडला जातो, आठवा २००८ च्या ऑलिम्पीक्समध्ये चीनने या तंत्राने ऑलीम्पीक निर्विघ्नपणे पार पाडून जगाची वाहवा मिळवली होती, हेच तंत्रज्ञान पर्जन्यास्त्रात काहीच्या काही पटीने विकसीत करून वापरले असणार. आता हेलिकॉप्टरने पावसाच्या ढगात रसायनांची फवारणी करतात , तेव्हा नॅनो टेक्नोलॉजीने 'बाणावरच' काम भागत असेल. इथे या कामी आतासारख मिसाईलच का वापरलं गेल नसेल याचा विचार करता, आता जसं इंधनाच्या उपलब्धतेची मर्यादा लक्षात येऊन उशीरा का होईना आपण सौर व वायु उर्जेकडे वळलोय तसं त्या काळातल्या लोकांनी आधीच ते ओळखून उर्जेचे नेमके हेच स्त्रोत निवडले असणार. शिवाय हाताने बाण मारायचा म्हणजे हाताला, डोळ्याला, मेंदूला काम! जे आपण हळूहळू कमी करत जाऊन रोबोट वगैरे आणून एके दिवशी हॉलिवूडच्या वॉल ई ॲनिमेशनपटात कल्पना केल्याप्रमाणे हात-पाय यांच्या जेनेटिक्समध्ये अमूलाग्र बदल घडवू व त्यांना कसलेही काम कराण्यासाठी निरूपयोगी बनवू. शिवाय कुणीही उठावे आणि अस्त्र चालवावे असे न होऊ देण्यासाठी त्यांना मंत्र नामक व्हॉईस कमांड फिचरचे समर्पक, सुयोग्य असे कोंदण दिले. व्हॉईस कमांड आज किती प्रगत झाले आहे ते आपण बघतोच आहोत. स्मार्टफोनवर नंबर डायल करण्यापासून ते गुगलला कामाला लावण्यापर्यंत याचा वापर सहजपणे करता येतो. मी स्वत:विंडोज ७ या ऑपरेटींग सिस्टीमवर स्पीच रेकग्निशन फिचर वापरत होतो. सध्या विंडोज १० वर अजून वापरायला सुरू केलेले नाही. एकदम जबरदस्त उपयोगी असे फिचर आहे. मग यालाच त्या काळात पुन्हा काही पटीने विकसीत केले गेले असेच मानूयात. (फिक्शनमध्येही!) तसेच आजच्या काळातले टार्गेट सर्चिंग/हिट सर्चींग मिसाईल्स ही त्या काळातल्या अस्त्रांचीच बालके आहेत असे त्यांच्या संहारक क्षमतेच्या वर्णनांवरून वाचून वाटते. "हकु" यांच्या भीमाच्या नंबर एक नायकपात्र असण्याच्या प्रतिसादाला बहुतेक धनुष्यविद्याच व धनुर्धरच का श्रेष्ठ गणला गेलाय याचे उत्तर माझ्या आतापर्यंतच्या प्रतिसादात मिळू शकेल. तरीही धनुर्धाऱ्यांच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडतो. १) वर यकु यांनी भीमपराक्रमाचे जे दाखले दिलेत यावरून तो महावीर, महापराक्रमी होता याबाबत यत्किंचीतही संशय मनात येत नाही पण नीट पाहून विचार केला असता दिसते की ह्या सर्व पराक्रमगाथांत तो फक्त हॅन्ड टू हॅन्ड कॉम्बॅट लढला आहे असे दिसते. जिथे त्याने कर्णाला लढाईत ३१ वेळा हरविले आहे असेही म्हटले गेले आहे ती शुद्ध अतिशयोक्तीच वाटते मला. ३१ वेळा कर्णाबरोबर लढत बिजी होण्यापेक्षा शंभरच्या शंभर कौरव मारणे ही आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यातच त्याचा बहुतांश वेळ खर्ची गेला असावा. कारण तासाला एक कौरव या गतीने जरी सपाटा लावला तरी बराच वेळ गेला की हो! गणित मला जमत नाही, नाहीतर आकडेमोडही मोडून इथे ठेवली असती. तसेच जिथे बाकी महारथींनी अस्त्रे ठराविक वेळी वापरल्याचा उल्लेख आहे तिथे भीमाने कधी काही वापरल्याचा उल्लेख नाही. भीमाला स्वत:च्या मुलाकडूनही एकदा पराभव पत्करावा लागल्याचे वाचलेय. परत माझ्या कर्णार्जुनांना प्यादे म्हटल्याच्या आक्षेपाकडे वळतो. माझ्यामते हे दोघेच सोडून इतर सारे चाकरी करत होते किंवा व्हिजनलेस होते. कर्णाला मित्रप्रेम ही भावना प्रोटीनसारखी होती तर पांडवांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचे अर्जुन जाणत असल्याने आपला पराभव म्हणजेच आपल्या घराण्याचा सर्वनाश या दडपणातून म्हणा किंवा आपला आधिकार आपल्याला मिळाला पाहिजे या भावनेतून नेहमी आपले सर्वोत्तम प्रदर्शन करीत राहायचे याचा जणू निश्चय अर्जुनाने केलेला व आयुष्यभर त्यात तो सुदैवीही ठरला! म्हणजेच दोघांनाही आपले ध्येय/उद्दिष्ट माहीत होते होते व त्यावरून ते आजीवन हटले नाहीत. शेवटी जशी प्रत्येकाची वेळ असते तशी कर्णाची दुर्दैवाने रथाचे चाक चिखलात फसल्यावर आली तशीच यादवी काळात अर्जुनालाही मानहानीकारक पराभवाची चव चाखावी लागली. म्हणजेच माझ्या मतानुसार दोघेही श्रेष्ठ धनुर्धर व अस्त्रांचे दोघांनाही ज्ञान असल्याने(वरचं अस्त्रांबद्दलच माझं लॉजिक!) तसेच दोघांपुढे आपापल्या बाजूंचे योग्य उद्दिष्ट असल्याने कुणी त्यांना चालवावे अशातले ते नव्हते. हे माझे वैयक्तिक मत/लॉजिक आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो! लेखनसीमा! Sandy

In reply to by चांदणे संदीप

हकु Sat, 04/02/2016 - 16:25
खरंच शेपरेट लेखच हवा होता की! जसा "अर्जुन आणि कर्ण" ह्या लेखावरच हा वर लिहिलेला लेख, तसा तुमच्या ह्याच्यावरचा उपर एक!!! :D

In reply to by चांदणे संदीप

उगा काहितरीच Sat, 04/02/2016 - 21:24
प्रतिसाद आवडला... कसं आहे ना , महाभारत म्हणजे महासागर आहे . कुणी शंखशिंपले गोळा करतो, कुणी मासेमारी करतो, कुणी सागरतळाशी जाऊन अनमोल मोती काढतो तर कुणी काठावर बसुन त्याच्या भव्यतेने दिपून जातो. मी सगळ्यात शेवटच्या प्रकारातील आहे. महाभारत झालेच नाही असे कसे मानता येईल हो ? शेकड्यानी पुरावे आहेत ना साहेब . त्यावेळच्या जागा , वगैरे आजही आहेत . क्रुष्णासारख्या काही व्यक्तींची आजही पूजा वगैरे होते . ( लोक कितीही भाबडे असले ना तरीही कादंबरीतल्या व्यक्तिरेखांची पूजा नाही करणार असे मला वाटते.) हं आता काळानुसार काही भाग कमी जास्त झाला असेल नाही असे नाही . पण म्हणुन सगळे महाभारतच काल्पनीक आहे असे म्हणने बरोबर नाही असे मला वाटते. मला वाटते कोणता भाग प्रक्षिप्त आहे कोणता नाही याचा अभ्यास धागा लेखकाचा व इतरही काही मिपाकरांचा आहे. बाकी चर्चेतुन बरीच माहीती होत आहे.

In reply to by उगा काहितरीच

चांदणे संदीप Sat, 04/02/2016 - 23:03
तुमच्या प्रतिसादातून तुम्ही मला जाब विचारल्यासारखा फील का येतोय? मी स्पष्ट वर लिहिले आहे ते माझे वैयक्तिक मत आहे आणि ते मी कुणालाही मान्य करा अशा आग्रही सुरातही लिहीले नाही. शिवाय, हेही म्हटले आहे की, महाभारत घडले का नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही पण मी दोन्ही शक्यता गृहीत धरून त्यावर कायम मनन, चिंतन करत असतो कारण एकूणच महाभारत ही रचना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अजून एक, जेव्हा मी महाभारत खरेच घडले असाही विचार करतो ना तेव्हाही मी दैवी शक्ती, देव वगैरे मानत नाही. एकूणच मी नास्तिक आहे. श्रद्धा ही सुद्धा माझ्यापासून खूप लांब राहते! ;) :D बोला, काय म्हणण आहे तुमच यावर? Sandy

In reply to by चांदणे संदीप

उगा काहितरीच Sat, 04/02/2016 - 23:26
तुमच्या प्रतिसादातून तुम्ही मला जाब विचारल्यासारखा फील का येतोय?
बिलकुल नाही. तसं वाटत असेल तर ते माझी शब्दनिवड चुकली असावी.
मी दोन्ही शक्यता गृहीत धरून त्यावर कायम मनन, चिंतन करत असतो कारण एकूणच महाभारत ही रचना माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
सेम हिअर , माझ्याही अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे हा.
अजून एक, जेव्हा मी महाभारत खरेच घडले असाही विचार करतो ना तेव्हाही मी दैवी शक्ती, देव वगैरे मानत नाही. एकूणच मी नास्तिक आहे. श्रद्धा ही सुद्धा माझ्यापासून खूप लांब राहते! ;) :D बोला, काय म्हणण आहे तुमच यावर?
तर मग तुम्ही महाभारताचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे असे नम्रपणे सुचवू इच्छितो .