शब्दांची कर्णफुले
शब्दांची कर्णफुले
प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी
ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले
शब्दांची कर्णफुले
प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी
ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले
तसं म्हटलं तर त्यांची ती होती खरीखुरी डेट
पण तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
सुट्टीचा दिवस होता,
Backdrop ला पाऊस होता.
Romantic होतं weather,
एकांताची हलकी चादर.
ती म्हणाली, खरंच येऊ? तो म्हणाला, yes plz, I'll wait....
पण... तिच्या त्याच्या मनासारखी घडलीच नाही भेट..
काय निवडावं लोकांनी
बॅड कि वर्स ?
कसला लागला आहे हा
महाराष्ट्राला कर्स
कितवा स्वातंत्रदिन आहे
हे विसरणारा मुख्यमंत्री
कि कानाखाली वाजवण्याची
भाषा करणारा मंत्री
तिसरी लाट, अफगाणीस्थान झालं,
मिडीयाला चघळायला नवं हाडूक
कोरोना, रोजगारी,वाहतूक,सुरक्षा
सर्वच मूळविषय झाले गूडूप
किती उर्जेचा होतो विध्वंस
मनातल्या हिंसा-द्वेषाने
कीव येते चूकीचे समर्थन
करुन लढणा-यांचे त्वेषाने
रेणुबंध होतील खिळखिळे
खळकन् फुटतील ठाशीव साचे
हादरून जातील स्तंभही
तर्काच्या भक्कम इमल्यांचे
गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या
लाव्हारस येईल उधाणून
अगणित जीवांचा कोलाहल
उरेल भवतालाला कोंदून
विस्कळखाईत कोसळताना
असेच काही घडेल? किंवा,
विज्ञानाचे ज्ञात नियम मग
वागतील वेगळेच तेव्हा?
ज्या प्रश्नांना नसते उत्तर
तेच मला खुणविती निरंतर
अज्ञेयाच्या पल्याडून कुणी
म्हणते,"यातून सुटका नाही"
तीन मितींची अभेद्य कारा
तिचे दार किलकिले उघडुनी
बघती प्रतिभावान थोडके
तेही म्हणती,"सुटका नाही"
तुंदिलतनु तुपकट ध्येयांची
हाक ऐकुनी डळमळते मन
उनाड भटकी पायवाट मग
खेचून म्हणते,"सुटका नाही"
देव म्हणजे हवा, नाही अगरबत्तीचा सुगंध
तो अन्नात आहे, उपवासात नाही.
देव दानशूर मोठा, लाचार नाही
न्यायी आहे देव, नवसाचा व्यापारी नाही.
देव आहे सदाचारात, अन्यायाचा शत्रू
देव मुहूर्त नाही, अनंत काळ आहे.
देवही भक्त आहे, भावाचा भुकेला
देव नाही खजिनदार-पुजारी.
देव देवळात नाही फक्त, आहे सगळीकडे
देव दाढीत नाही, शेंडीतही नाही.
जीवन देव आहे, मृत्यूही तोच
प्रचारात देव नाही, तो प्रकांड आहे.
देव म्हणजे गंभीर गोष्ट
माणूस त्याची गंमत करतो.
गुलाबजाम जणू पाकातला
हलवायाची व्याख्या करतो.
साखरझोपेच्या डोळेजड सीमेवरून
हाकारणार्या अनघड कल्पनांची
वास्तवाच्या धगीत
कापूरवाफ होताना बघण्याची
आता सवय करून घेतोय
मास्कावगुंठित श्वासात
अवकाळी पावसाचा विषण्ण मृद्गंध
ऊरफोड भरून
पाऊसगाणे गाण्याची
आता सवय करून घेतोय
हताशेच्या महासाथीची "न"वी लाट
सकारात्मक विचारांच्या प्लासिबोने
नेस्तनाबूत होईलच
हे स्वत:ला वारंवार पटविण्याची
आता सवय करून घेतोय
प्रश्न आयुष्याचा असतो
उत्तर असते आयुष्याचे.
आपण निव्वळ कोरे कागद
नशीब छपाईच्या कामाचे.
शब्दांना का कळतो अर्थ
लिहिणाऱ्याच्या मनातला?
अर्थ कोणता जीवनाला मग
जन्म देत असे अज्ञातातला.
मृत्यू म्हणजे शेवट कसला?
पितरांच्या शांतीत काकही फसला.
अनुभवाचे गाठोडे सोडून
वर्तमानावर भूतकाळ हसला.
विश्वाचे मुळ गूढ भयंकर
सोबत नाही एकही शंकर.
अंधाराला शोधीत भास्कर
पृथ्वीस सांगे, "मारत राहा चक्कर"!
रोज तो जुळवून अपुली
एक कविता ठेवतो
वृत्त-मात्रा-अर्थ-लय-
-छंदात निशिदिनी रंगतो
जे न दिसते रविस तेही
मिटून डोळे पाहतो
काव्य अन् शास्त्रामधे तो
क्षण नि प्रतिक्षण डुंबतो
कल्पनांचे भव्य इमले
सुबकसे तो बांधतो
(मी तयांची द्वारपाली
आपखुशीने निभवितो)
विविध प्रश्नांचा तुम्हाला
अटळ छळ जो जाचतो
मात त्याला देऊनी तो
मिति-दिशा ओलांडतो
शब्द धन वाटून अविरत
थकून कधि तो थांबतो
(मी ही त्या दुर्मिळ क्षणाची
वाट गुपचूप पाहतो)
एकही कविता आताशा
काळजाला भिडत नाही
शब्द मोहक विभ्रमांनी
भ्रमित आता करीत नाही
कोरडा असतो किनारा
लाट फुटते मत्त तरिही
जखम होते खोलवर पण
रक्त आता येत नाही
प्रार्थनांचे मंत्र निष्प्रभ,
बीजअक्षर श्रांतलेले
भंगलेल्या देवतांना
आळवूनी भ्रष्टलेले
मार्गदर्शी ध्रुव अन्
सप्तर्षी आता लोपलेले
दीपस्तंभांचे दिवेही
भासती मंदावलेले
या अशा कुंठीत वेळी
दाटुनी येते मनी
विफलता, जी रोज उरते
रोमरोमा व्यापुनी