मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन - ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण

मनो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण रविवार, १६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६ वाजता Please click on the link of BISM YouTube channel for this programme. https://www.youtube.com/channel/UC32NxNt3qpCe6x6HNLkUvUg image


वाचने 18545 वाचनखूण प्रतिक्रिया 58

या (ऑनलाइन) व्याख्यानाच्या निमंत्रणासाठी मनःपूर्वक धन्यवाद. रविवारी भाप्रवेनुसार संध्याकाळी ६ वाजता युट्युबच्या माध्यमातून श्रोता म्हणून नक्की सहभागी होतो.

In reply to by अनन्त अवधुत

मनो 14/01/2022 - 03:11
एक खुलासा करणे आवश्यक आहे - व्याख्यान जरी भारतीय वेळेनुसार जास्तीत जास्त लोकांना सोयीस्कर अश्या ६ वाजता संध्याकाळी असलं तरी मला स्वतःला पहाटे ४.३० वाजता उत्स्फूर्त बोलणं आणि त्यासोबतच व्याख्यानाचा प्राण असलेली चित्रं, कविता इत्यादी सोबत जोडून दाखवणं तंत्रिकदृष्टया शक्य नाही, त्यामुळं फक्त प्रक्षेपण लाईव्ह असेल, बोलणं नाही.

मर्यादीत वेळेत एका फार मोठ्या व गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घडामोडींवर उत्तम विवेचन. या विवेचनाला ऐतिहासिक चित्रांद्वारे उत्तम जोडी दिलीत. एक सुचवणी - असे व्याख्यान देताना पुढच्या वेळी नकाशाच्या माध्यमातून सुरुवातीला कोणत्या बाजूचे कुठे वर्चस्व होते अन कोण कुठे आक्रमण करत होते हे समजावून सांगावे.

बबन ताम्बे 16/01/2022 - 21:18
सुंदर आणि माहितीपूर्ण व्याख्यान. खूप माहिती मिळाली आणि मुख्य म्हणजे दुर्मिळ आणि कधी न पाहिलेली चित्रे आपण पहाण्याची संधी मिळवून दिलीत. खूप खूप धन्यवाद. पानिपत कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे गोल मोडल्यामुळे मराठ्यांचा तोफखाना बंद झाला आणि नन्तर त्यामुळे पराभव ओढवून घेतला यात कितपत तथ्य आहे?

In reply to by बबन ताम्बे

मनो 17/01/2022 - 09:38
या 'गोल' कथेचा उगम कसा झाला ते मी शोधत होतो. मूळ फारसी साधने अथवा मराठी साधनांमध्ये मला कुठेही भाऊंनी एक वर्तुळाकार सैन्य-गोल बनवला होता असा उल्लेख आढळला नाही. श्री. निनाद बेडेकर यांच्या व्याख्यानांमध्ये मी प्रथम हे सर्व ऐकले. त्याआधीही कदाचित मराठे निजामसारखा पोकळ गोल बांधून लढले असा उल्लेख क्वचित कुणी इतिहासकाराने केलेला असावा. मग हा समज आला कुठून? तर माझा अंदाज असा की काशीराजाच्या बखरीत आणि इतरत्र 'घोल' غول असा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ सैन्याची तुकडी. तर हा शब्द गोल या अर्थाने वाचला गेला का? त्यामुळे अर्थाचा विपर्यास होऊन मराठे गोलात लढले असा समज झाला असावा का? https://meaning.urdu.co/troop/ तुम्ही हे चित्र पाहिलेत तर नुसते मराठेच नव्हे तर अब्दालीसुद्धा चौकोनी रचना करून सैन्यांच्या रांगांसह लढत होता. http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/other/largeimage55447.html याला infantry squares असं म्हणतात. कदाचित आपल्याकडील सैन्यातील लोक याचा अर्थ चांगला सांगतील. https://en.wikipedia.org/wiki/Infantry_square जर मुळात गोलच अस्तित्वात नसेल तर त्यामुळे पराभव झाला यालाही काही अर्थ उरत नाही.

In reply to by मनो

बबन ताम्बे 17/01/2022 - 15:28
दक्षिणायन मुळे पराभवाला कितपत हातभार लागला ? मराठी फौज थंडी, उपासमारीने शारिरीक दृष्ट्या दुर्बल झाल्यामुळे तगड्या अफगाणांसमोर टिकू शकली नसेल.

In reply to by बबन ताम्बे

मनो 17/01/2022 - 22:36
दक्षिणायन आणि पराभवाचा काही संबंध नाही. दुसऱ्या एका बाबतीत त्याचे महत्व आहे. काशिराज ही लढाई पूर्व पश्चिम झाली म्हणतो, पण ती वस्तुतः उत्तर दक्षिण हवी होती. मी त्या दिवशी सूर्याची आकाशातील जागा आणि मार्ग गणिताने काढला. त्यातून असे दिसते, की नकाशातील पूर्व आणि त्या दिवशी सूर्योदयाची प्रत्यक्ष जागा यात साधारण ४५ अंशाचा कोन आहे, त्यामुळे लढाई त्या दिवसाच्या आभासी पूर्व पश्चिम, परंतु नकाशावरून आग्नेय वायव्य अशी आहे, जी सुसंगत वाटते. उपासमारीबद्दल एक महत्वाचा मुद्दा असा की आता पुढे उपासमार होणार म्हणून मराठ्यांनी हल्ला केला, ती उपासमार २-३ दिवसांच्या पूर्वी सुरू झाली होती. ती शिंदे होळकर या सर्वांनाच सारखीच बाधत होती असेही नाही. शहावलीखान आणि दुंदेखान यांचा सकाळी पराभव करताना मराठ्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. त्यावरून थोडा प्रभाव असला तरी हे काही पराभवाचे मूळ कारण नाही.

In reply to by मनो

अनन्त अवधुत 17/01/2022 - 15:28
मराठा हिस्ट्री ह्यांच्या पानिपतावरील ह्या भागात गोलचा उल्लेख आलाय. त्यात ते म्हणतात उद्गीरच्या लढाईत निजामाने गोल वापरला. त्याच व्हिडीओ नुसार गोल ही फ्रेंचाकडुन आलेली व्युह रचना आहे. फ्रान्समध्ये गौल लोक राहतात, फ्रान्स त्यांनीच वसवला. पूर्वी फ्रान्सला गौल म्हणत, त्याचा इथे काही संबंध असावा का? फ्रान्सला गौल म्हणण्याबद्दल.

In reply to by अनन्त अवधुत

मनो 17/01/2022 - 21:37
गॉल हे विशेष नाम आहे, म्हणजे फ्रान्स. लॅटिनमधून हा शब्द रोमन लोकांनी फ्रान्स देशासाठी वापरला आहे. जुन्या मराठीत फ्रान्सिस असे फ्रेंचांचे नाव येते, उदा. फ्रान्सिस रयतेने आपला राजा मारला. काशीराज 'घोल ए शाहवलीखान' म्हणतो, तर याप्रमाणे शहावलीखानाचा फ्रान्स असा अर्थ जुळणार नाही. यामुळं गॉल आणि गोल आणि घोल यांचा काही संबंध नसावा असेच मला वाटते. मराठा हिस्ट्री चॅनलचे श्री प्रणव महाजन यांच्याशी मी याबद्दल चर्चा केली आहे. त्यांनी ही रचना श्री निनाद बेडेकर यांच्या संदर्भाने घेतली आहे. बेडेकरांनी ती कुठून घेतली ते त्यांना माहीत नाही. माझ्या मते संपूर्ण सैन्य आणि बुणगे यांचा असा गोल करणे हे संपूर्ण अव्यवहार्य (impractical) आहे. त्यासाठी लागणाऱ्या तोफांची संख्याच प्रचंड होईल, कारण वर्तुळाचा घेरा २*पाय*त्रिज्या याप्रमाणे प्रचंड होणार आहे. तसेच प्रत्येक माणसाला, तोफेला हलवून त्याच्या जागेवर नेण्यासाठी प्रचंड वेळ लागेल. या गोलाला हलण्यासाठी प्रचंड नैसर्गिक अडथळे (तलाव, गावे, जंगल) मध्ये येणार आहेत, त्यातून गोल कायम ठेऊन मार्ग कसा काढणार? या वेळी नाना फडणीस बुनग्यात होते, त्यांनी अशी कोणतीही रचना वर्णन केलेली नाही. प्रत्येक साधन दोन्ही बाजूंची सैन्यरचना सांगताना एका ओळीत, डावी, मध्य, उजवी अशीच सांगतो, त्यामुळं गोल या कल्पनेला काही पुरावा नाही. आपण उगाच काहीतरी तर्काने निर्माण केलेली ती कल्पना आहे असे माझे मत उपलब्ध पुराव्यावरून झालेले आहे. निजामाने उदगीर येथे कदाचित हजार पाचशे गारदी लोकांचा छोटा चौकोन केलेला असू शकतो, त्याला गोल म्हणजे सैन्याची तुकडी म्हणजेच गोल असे मानलेले असणे सहज शक्य आहे. उदगीरचा अभ्यास मी केला नसल्याने निश्चित सांगू शकत नाही.

अनन्त अवधुत 17/01/2022 - 07:42
दुर्मिळ चित्रे पहायला मिळाली. नविन माहिती मिळाली. “बचेंगे तो ओर भी लडेंगे” ही कोणा मराठी माणसाने उद्गारलेले सगळ्यात महत्वाचे शब्द वाटतात. तसे कोणी म्हटले नाही हे कळून मन थोडे खट्टु झाले. पण असो. ईतिहास जसा आहे तसा आहे.

काल संध्याकाळी सात पर्यंत पाहिलं. राहिलेलं रात्री उशीरा पाहिलं. तुमच्या लेखांतून तुमचा अभ्यास दिसतोच, तोच कालच्या व्याख्यानात दिसला. आम्ही एखादं चित्रं पाहतो आणि 'वा! छान चित्र!' असं म्हणून दुसरं पाहतो. पण त्या चित्रातील बारकावे 'पाहणं' आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्यांचा अर्थ लावणं हे अनुभव अन अभ्यासाशिवाय शक्य नाही. उदा. लखुजी जाधवांच्या चित्रातील चुनारदान. दुसरी गोष्ट नावांची. अनेक तत्कालीन फारसी तसेच युरोपियन साधनांत आपल्याकडचे उल्लेख वेगळे असतात. ते आमच्या लक्षातही येत नाहीत. उदा. सेवाजी हेसुद्धा ओळखायला अनुभव अन् अभ्यास सखोलच हवा. तुमच्याकडून असेच प्रसंगोचित आणखी लेख्/व्याख्यान वाचायला/पाहायला आवडतील. मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by तुषार काळभोर

मनो 17/01/2022 - 22:41
धन्यवाद. दिग्गज चित्रकार ब्रशच्या दोनचार फटक्यांतून बरेच काही सांगून जातात. चित्रगुप्तकाका माझ्यापेक्षा छान सांगतील. ते थोडेफार एखाद्या कवितेप्रमाणे किंवा ज्ञानेश्वरमाऊली-तुकोबांच्या अभंगप्रमाणे असते. अर्थ कळतो पण अनुभूती होत नाही, योग्य वेळी अचानक न सांगता ती होते.

In reply to by कंजूस

मनो 17/01/2022 - 22:46
पानिपतची रणभूमी अगदीच सपाट मैदानात आहे. एकच उंचवटा थोडा आहे, तिथे पानिपत शहरात किल्ला बांधला आहे. तर्क खूप करता येतील, पण मूळ साधनांत कुणीतरी त्याला दुजोरा दिल्याशिवाय तसं निश्चित नाही सांगत येत. म्हणून जुनी हस्तलिखिते धुंडाळून त्यात काय आहे ते पाहावे लागते, आणि अर्थातच खूप सावधपणे प्रत्येक शब्द तपासावा लागतो.

मनो 17/01/2022 - 23:25
आमचे मित्र मिपाकर बॅटमॅन यांचे भारताबाहेरील भारतीय हे काही दिवस आधीचे व्याख्यानदेखील सर्वाना आवडेल, ते इथे आहे https://www.facebook.com/watch/live/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=watch_permalink&v=4528801770574859

In reply to by मनो

Trump 18/01/2022 - 17:35
थोडे बघण्याचा प्रयत्न केला. भारतीयांचे कमी आणि मुस्लिमांचे जास्त उल्लेख आहे. प्रयत्न चांगला, पण मजकूर सामान्य आणि निरुपयोगी. असो.

In reply to by Trump

कंजूस 18/01/2022 - 19:22
तो अप्रियही असतो. कादंबरी विरंगुळा असतो, भाटगिरी असते, वाचकांची अस्मिता वाढवणारी असते. तसं केलं नाही तर पुस्तक खपत नाही.

In reply to by कंजूस

Trump 18/01/2022 - 20:48
भारताचा इतिहास मुसलमान येण्याआधी सुरु झाला आहे. मुस्लिमांचा उल्लेख टाळावा असे कोणी म्हणत नाही, पण तो प्रमाणात असावा.

In reply to by Trump

कंजूस 19/01/2022 - 05:45
पण इतिहासकार हे लिखित इतिहास आणि आता त्याचे कोणते पुरावे आहेत हे शोधून स्थापित करतात. त्या संदर्भात 'The loss of Hindustan, The Invention of India's. या पुस्तकात वाचलं. सारनाथ येथील खोदकामानंतर अशोकापर्यंतचा इतिहास स्थापित झाला.

In reply to by राघवेंद्र

मनो 19/01/2022 - 01:32
धन्यवाद वल्लीशेठ, खरं तर तुम्ही शिल्पशास्त्र, मुर्त्या, मंदिरे, लेणी असे एक-दोन व्हिडिओ असे बनवा, आम्हाला नक्कीच पाहायला आवडेल.

In reply to by मनो

कंजूस 19/01/2022 - 05:50
आधारभूत पुस्तकांचं परीक्षण किंवा माहिती देता येईल. किंवा ( वेळ नै तर) कुणाला सांगून ते शब्दांकन करता येईल. सध्या ओनलाइनचे सत्ययुग चालू आहे.

अनन्त अवधुत 20/01/2022 - 05:32
मराठ्यांचे जसे पानिपतावर विश्वासराव, सदाशिवराव, जनकोजी शिन्चे, वगैरे मातब्बर मंडळी खर्ची पडली तसे अब्दालीचे कोणते महत्वाचे सरदार मारल्या गेले?

In reply to by अनन्त अवधुत

मनो 20/01/2022 - 09:33
अब्दालीच्या वजीराचा चुलतभाऊ अताईखान मारला गेला. अब्दालीने वेळीच कुमक पाठवल्याने वजीर शहावलीखान, व हाफिज रहमत, बंगश इत्यादी रोहिले बचावले, नाहीतर ते मारले जाण्याची दाट शक्यता होती. मराठ्यांच्या बाजूला विश्वासरावांचा एकच मृत्यू अचानक आणि अपघाती गोळा लागून झाला. भाऊंना जिवंत कैद होणे शक्य होते, पण त्यांनी वीरमरण पत्करले. काशीराजचे म्हणणे सत्य मानायचे तर जनकोजी, इब्राहिमखान जिवंत पकडले गेले आणि मग मारले गेले. अंताजी माणकेश्वर, बाजी हरी पळताना, समशेर बहाद्दर जखमांमुळे असे इतर मृत्यू टाळणे शक्य होते, पण पराभवानंतर ते अशक्य झालेले दिसते.

In reply to by मनो

अनन्त अवधुत 25/01/2022 - 06:02
जखमांमुळे असे इतर मृत्यू टाळणे शक्य होते, पण पराभवानंतर ते अशक्य झालेले दिसते
पराभूत सैनिकांच्या जखमा जास्त घातक असतात. :(