मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गावाचे नाव "सानपाडा" नव्हे "सॅन पाडा" होय

पाषाणभेद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(श्री. केदार यांनी चालवलेल्या "मिसळून मिसळ" या कायआप्पा गृपवर एक फोटो आला होता. त्यात सॅन San Francisco, San Diego त्याच प्रमाणे सान पाडा हे गाव देखील सॅन पाडा असू शकते या अर्थाचा मेसेज आला होता. त्यावर आम्ही अभ्यास करून एक लेख लिहीला तो येथे प्रसिद्ध करत आहोत.) साधारणतः १६ व्या शतकात(१) आताची ठाणे खाडी परिसर, नवी मुंंबई आदी परिसर समुद्राच्या पाण्याने पुर्ण व्यापलेला होता. घनदाट खारपुटीचे, नारळी-फोफळीचे झाडे, जंगली श्वापदे तेथे होती. आताचा संजय गांधी नॅशनल फॉरेस्टचा परिसर लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. तर १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात घणसोली गाव फार छोटे होते. पाडाच म्हणाना. आजूबाजूलाही लोकवस्ती वेगवेगळ्या पाड्यातच राहत होती. गावांची नावे पाड्यांवरूनच ठरत असे. तेथे एक कोळी मासेमारी करत असे. त्याचे नाव महाप असे होते. महा म्हणजे महा - मोठा अन प म्हणजे पाटील असा तो महाप. तर असा तो मोठा पाटील कोळी होता. १६८८ च्या चैत्री पुनवेला त्याचे अन त्याच्या बायकोचे मोठे भांडण झाले. महाप वैतागला अन खाडीच्या बाजूला जावून झोपडीत राहू लागला. ( त्या महाप पाटलाच्या नावानेच आता तेथे "महापे" गाव आहे.)(२) तेथे राहत असतांना सन १६९० च्या रमजान सणात त्याचे अन रब अली नावाच्या मुस्लिम तरूणीचे प्रेमसंबध तेथे जुळले. सगळे पाडेकरी मग त्यांना रबअली - महाप असे चिडवू लागले. ( रब अली ज्या पाड्याची होती ते पाडे आता "रबाले" नावाने ओळखले जाते.) रबअली अन महापचे संबंध काही वर्षे ठीक होते. महाप जवळच्या खाडीत मासेमारी करून उदरनिर्वाह करत असे. रबअली पासून त्याला एक मुलगी - नाव जुई - झाली अन एक अपंग मुलगा झाला. त्याचे नाव खैरना असे होते. त्याचा डावा हात कोपरापासून नव्हता. मोठे झाल्यावर जुई अन खैरनाने खुप पराक्रमी कामे केलीत. (आताचे "जुईनगर" त्या जुई नावाच्या मुलीवरून तर "कोपरखैरने" हे गावाचे नाव त्या खैरना या मुलाच्या नावावरून पडले. खैरनार या कुळाचा तो पुराणपुरूष होय.)(३) जुई १२ वर्षंची अन खैरना लहान असतांना काही कारणांनी रबअली च्या समाजाच्या लोकांनी रबअलीचा खून केला. यासर्व कारणांमुळे संसारपाशाकडे आताशा महापचे लक्ष कमी झाले. तो आध्यात्माच्या गोष्टी करत असे. इ. सन १७२० साली मे महिन्यात तो खोल समुद्रात मासेमारी करत असतांना होडीत त्याला तहान लागली पण होडीतल्या भांड्यातले पाणी संपलेले होते. मग भर समूद्रात तो "पाणी... पाणी" असे ओरडू लागला. भोवळ येवून महापाटील होडक्यातच बेशुद्ध पडला. तेवढ्यात तेथून एक इंग्रजाचे व्यापारी जहाज जवळून जात होते. त्या जहाजातल्या पाद्र्याने पाणी देवून महापाटलाचा जीव वाचविला. महापचे होडके त्या जहाजाच्या कप्तानाने ओढून अन महापला आपल्या जहाजावर घेतले. जहाजावरील पाद्र्याने (सेंट पाद्री) मोठ्या प्रेमाने थोड्या बेशुद्ध महापला त्याचे गाव कोणते असे विचारले. तेवढ्यात महापला शिंक आली अन तो "आंछी" असा आवाज करून शिंकला. त्या जहाजाच्या कप्तानाला ते "वाशी" असे ऐकू आले अन त्याने आपले गलबत वाशी या नावाच्या पाड्याच्या दिशेने हाकारले. पण महापला वाचवण्याच्या गडबडीत तो दिशा साफ चुकला होता अन गलबत चुकून पाडा या गावाच्या दिशेने जावू लागले. सारी गावे पाडेच तर हे देखील एक पाडेच होते. जेव्हा पाडा हे गाव आले तेव्हा ते गाव वाशी असे समजून पाद्री तेथे उतरला. उतरतांना त्याने अर्ध मुर्छीत महापला देखील सेवेसाठी घेतले. महापची त्याने दयाळू अंतःकरणाने वैद्यकीय सेवा केली. पुढे महाप याने देखील ख्रिस्ती धर्म स्विकारला अन संसारपाशाचा त्याग केला. जुई अन खैरना भेटायला येत तेव्हा तो त्यांना पराक्रमी होण्याची आठवण देई. पाड्याच्य लोकांवर सेंट पाद्री अन महापचा फार लोभ होता. पाद्रीला ते मोठा पाद्री अन महापला ते लहान महाप पाद्री असे बोलू लागले. महापला वाचवणार्‍या पाद्री निवर्तल्यानंतर त्या पाड्याच्या लोकांनी महापला संत महाप असे म्हणायला सुरुवात केली. त्याने त्या काळात वैद्यकीय सेवा करण्यासाठी चर्चमध्येच दवाखाना सुरू केला. इंग्रजांचे आक्रमण झाल्यानंतर महापचे नाव इंग्रजी गॅझेटमध्ये सेंट महाप असे नोंदवले गेले. कालांतराने ते पाडे गाव वैद्यकीय सेवेसाठी फार प्रसिद्ध झाले. परंतु पाडे म्हटले की कोणते पाडे असे उपचारासाठी येणार्‍या लोकांना प्रश्न पडू लागला. कारण आजूबाजूला सारी गावे पाडे या नावानेच ओळखली जात. म्हणून पाड हे गावा महापच्या नावावरून "संत पाडा" गाव असे ओळखले जावू लागले. जेव्हा रेल्वेचा विकास होवू लागला तेव्हा या संत पाडा गावालाही रेल्वे आणण्याचे प्रयत्न झाले. कारण पुढे वाशी ही मोठी बाजारपेठ त्यांना रेल्वेद्वारे जोडायची होती. पुढे इंग्रज देखील त्या पाड्याला "सेंट पाडा"(४) असे म्हणू लागले. पुढे कालओघात या सेंटचेच मराठी रुपांतर सान असे झाले अन त्या पाड्याला "सानपाडा" असे म्हटले जावू लागले. अधिक अभ्यासू व्यक्ती खालील संदर्भ घेवून आपल्या अभ्यास वाढवू शकतात. संदर्भः (१) इंग्रजांचे गॅझेटीअर : A reference book of Grater Bombay (1522 to 1732) By Ray Maccmilan, Pub: Ocean Pub. १८९७ II Ver. (२) "मुंबई परिसराचा विकास अन सामाजिक परिस्थिती एक अध्ययन अन एक अभ्यास" - PHD चा अभ्यास करणार्‍या सौ. वांगणीकर यांचा संदर्भ. (मुंबई विद्या.) (३) खैरनार कुलाचा कुलवृत्तांत. (संदर्भ भाट आणि सनावळी यांनी लिहीलेले हस्तलिखीते) (४) "How to run Great Indian Railway Commercially and profitable So that Great Britain achieves more - A HandBook on Indian Railway Installation" - Reference manual Ver. 2.082B.

वाचने 17880 वाचनखूण प्रतिक्रिया 35

उपयोजक 06/03/2018 - 12:16
'सॅन' पाड्याची ही नवी माहिती वाचून 'शहाण'पाड्यात वाढ झाली!! :)

जेम्स वांड 06/03/2018 - 13:11
रहस्याचा गौफ्यस्फोट अन वाचणाऱ्याचा हास्यस्फोट एकदमच होऊन जातो, फारच लवकर मग पुढे वाचू वाटत नाही! म्हणून नाय जमलं

पैसा 06/03/2018 - 13:29
अरारा! हे संशोधन वाचून हाताची दहाही बोटे तोंडात घातली आहेत! अजून येऊ द्या. पण एकही चित्र नसल्याने अंमळ निराशा झाली.

दुर्गविहारी 06/03/2018 - 13:50
आपण "कानात" ( कि कामात ? ) व्यस्त असताना देखील, बॉसकडे दुर्लक्ष करुन हे महान संशोधन आम्हा वाचकांचे पुढे आणण्याचे कष्ट घेतलेत याबध्दल हाभारी आहोत. असेच मौलिक संशोढन आपल्या हातून होवो आणि नवीन नविन प्रबंध आम्हाला वाचायला मिळोत, ;-)

सस्नेह 06/03/2018 - 14:44
वाह ! भन्साळी कुलोत्पन्न 'लीला'धर संजयांच्या नंतर श्रेष्ठ इतिहासकार आपणच =))

Nitin Palkar 06/03/2018 - 15:10
तुमच्याकडून हजार पृष्ठांच्या ग्रंथ रचनेची अपेक्षा आहे ;)

In reply to by Nitin Palkar

जेम्स वांड 06/03/2018 - 15:16
ह्यांना ह्या एका लेखातच, महामहोपाध्याय पदवी द्यावी वाटते आहे.

सतिश गावडे 06/03/2018 - 15:35
नाशिकचा एक संशोधक अतीव मेहनत घेऊन नवी मुंबईवर संशोधन करून तो इतिहास जगासमोर आणतो ही सुखद घटना आहे. माजी म्हापे यमायडीशी कामगार

खेडूत 06/03/2018 - 16:46
छान छान! असेच संशोधन अन्य उपनगरांविषयी व्हावे.. . कळवा ही मुंबईची हद्द होती, तिथं पर्यंत मुंबईकर पाहुण्यांना निरोप देण्यासाठी येत आणि पोचलात की कळवा म्हणत असत!

गामा पैलवान 06/03/2018 - 19:57
पाभे, तुम्ही लिहिलेली कथा बनावट आहे. खरी गोष्ट वेगळीच आहे. तो जो पाद्री होता ना तो चर्चच्या सर्वकालीन शिरस्त्याप्रमाणे पेडोफाईल होता. म्हणून ते सान पेडो असं नाव पडलं. त्याचा अपभ्रंश होऊन सान पाडा झालं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पाषाणभेद 06/03/2018 - 21:19
आ. न., गा. पै जी, माझी कथा? अहो संशोधन आहे ते. अन ते बनावट कसे? अस्सल कागदपत्रांच्या संदर्भासहीत सिद्ध झालेले संशोधन आहे ते. आता शिवाजी महाराजांच्या जन्म तिथिबाबत जसा वाद होतो, त्याप्रमाणे यात वाद होवू शकेल पण सरळ बनावट म्हणणे फार खोटा आरोप आहे हे आम्ही ठासून सांगू पाहतो. आपल्या येथील श्री. चित्रगुप्तांना या संशोधनाबद्दल माहिती पडले तर ते एक काय दहा चित्रांमधले पुरावे देतील हा आमचा विश्वास आहे. आणखी एक, आमच्या संशोधनातले संदर्भासहित दिलेली कागदपत्रे अन पुस्तके तुम्ही बघितली नाहीत काय? एकदा सदर कागदपत्रे मेहनतीने मिळवा म्हणजे संशोधन् काय असते ते माहीती होईल. आ. न., पाभे

In reply to by पाषाणभेद

गामा पैलवान 06/03/2018 - 21:34
अहो दगडफोडे संशोधक, सदर कागदपत्रे तुम्ही मेहनतीने मिळवलेली आहेत यावरून तुम्ही बनावट कथा लिहिलीये हेच सिद्ध होतं ना? संशोधन फक्त ढापलेल्या मालावरूनच करता येतं हा मूलभूत सिद्धांत तुम्हांस ठाऊक नाही? काय सांगायचं तुम्हांस आता ....! आ.न., -गा.पै.

जयन्त बा शिम्पि 06/03/2018 - 20:02
पुलंच्या " चितळे मास्तर " कथेत ज्याप्रमाणे सुलतानाच्या सुनबाईला परत पाठविण्याच्या प्रसंगाचे वर्णन , चितळे मास्तर अशा काही अफलातुन शब्दात करित असत्,कि ऐकणार्‍यास वाटावे कि चितळे मास्तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातच हजर होते. तसं आताही " पाषाणभेद " सुक्ष्म देहाने त्याकाळी हजर होते असेच वाटून गेले. चालू द्या. भारतातील बर्‍याच शहरांच्या नावांवर असेच संशोधन सुरु ठेवा आणि आम्हा पामरांच्या ज्ञानात भर घालावी ! !

नाखु 06/03/2018 - 20:51
बदलापूर, भांडुप, मळवली यावरही संशोधन, उत्खनन होउन बर्याच गोष्टी उजेडात याव्यात. अखिल मिपा खफ माहीतीची महती आणि महतीची माहीती प्रक्षेपण केंद्रीय समितीच्या "दिव्याखाली अंधार"या पाक्षिकातील वाचकांची मागणी

In reply to by नाखु

बबन ताम्बे 07/03/2018 - 18:56
तळेगाव, मळवली, लोणावळा ही आत्ताची गावे इस्टुर फाकडाच्या पराभवानंतर तळवली, मळवली, लोळावला अशा नावाने ओळखली जायला लागली. इंग्रजी फौज इंद्रायणी क्रॉस कर असताना मराठी फौजेने तोफ गोळ्यांचा मारा केला. त्यामुळे इंग्रज फौज अक्षरश: पाण्यात तळुन निघाली. म्हणुन तो परिसर तळवली. इंग्रज आणि मराठी सैनिक दिवसभर धुमश्चक्री केल्यानंतर निवांत तंबाखु मळत ते मळवली. शेवटचा इंग्रज सैनिक जिथे लोळवला ते गाव लोळावला. कालांतराने वस्ती वाढल्यानंतर तळवलीचे तळेगाव झाले, लोळावलाचे लोणावळा झाले (ल आणि ळ शेजारी शेजारी आले की उच्चारायला अवघड जाते म्हणुन असावे). मळवली मात्र तसेच राहीले. (संदर्भ : अकलेच्या तार्‍यांवरुन दिशा ओळखणे आणि माझी भ्रमंती हे १९ व्या शतकात गाजलेले पुस्तक)

डॉ सुहास म्हात्रे 06/03/2018 - 21:16
काल संध्याकाळी मला स्विडनमधून नोबेल समितीचा फोन आला होता. ते या संशोधनाची चौकशी करत होते. लवकरच एका फार मोठ्या आनंदाची घोषणा ते करणार आहेत असे त्यांनी सांगितले. :)

In reply to by चामुंडराय

डॉ सुहास म्हात्रे 06/03/2018 - 23:30
ते संशोधन माझे आहे. एकदा एक कोकणी माय कॅलिफोर्नियातिल "सान दिया" या ठिकाणी राहणार्‍या आपल्या लेकीला भेटायली तेथे गेली असता तिने लेकीला विचारले, "ह्यो सान सान काय हाय गो ?" लेक म्हणाली, "सान-दिया-गोsss". हे जवळून चाललेल्या एका इमिग्रंट पॉप सिंगरने ऐकले व ते हेल काढून म्हटलेले शब्द त्यांला आवडले. त्याने ते शब्द वापरून, "सान-दिया-गो, सान-दिया-गो" असे धृपद असलेले गाणे बनवले. ते गाणे इतके फेमस झाले की त्या शहराचे नाव "सान-दिया-गो" असे पडले. "कौन से 'सान'ने किसको क्या 'दिया' है "गो" ?" असा प्रश्न एका जपानी-हिंदी-कोकणी मिश्रवंशिय इमिग्रंटने नुकताच उभा केला आहे. त्याचे उत्तर शोधायला तेथिल सरकारने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधिल संशोधकांना ५० मिलियन डॉलर्सची ग्रँट मंजूर केली आहे. संशोधनात भाग घेण्याची इच्छा असलेल्यांनी व्यनित चौकशी करावी. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

पेशव्यांच्या कुठल्याशा लढाईत जिथं सैनिकांची हाडं पसरलेली होती त्या गावात निवांत बसले असतील शास्त्री.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गामा पैलवान 07/03/2018 - 13:04
डॉक्टर सुहास म्हात्रे, तुमचं हे संशोधन बनावट आहे. खरी गोष्ट वेगळीच आहे. तिकडे स्थलांतरित झालेल्या एका मालवणी चेडवाचा पाट तिच्याहून वयाने लहान झिलग्यासोबत लावला. म्हणून सान (= लहान) दिला घो असं ते नाव झालं. मग तिथे भय्ये घुसले आणि त्यांनी दिला चं दिया केलं. आ.न., -गा.पै.

इरसाल 10/03/2018 - 13:53
सानपाडा नक्की सानपाडा आहे की सांडपाडा ?????

तेजस आठवले 10/03/2018 - 16:49
वाहवा, पण चित्रगुप्त यांची सर आली नाही. असो. ठाण्याहून महाप पर्यंत जाताना दलदलीचा रस्ता चालून लोकांना अगदी वीट येत असे. त्यामुळे हळूहळू त्या दलदलीच्या प्रदेशाला विटावा म्हणू लागले. कामोठ्याजवळ मुले चेंडूफळी नावाचा खेळ खेळत असताना त्यांना मान नावाचे एक पंजाबी प्रशिक्षक शिकवत.एकदा ते बॉलिंग करत असताना त्यांना गुडघ्याला जबरदस्त मार लागला आणि त्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊन ते गेले.ती त्यांची शेवटची ओव्हर ठरली. मग त्या ठिकाणचे नाव मान-सर-ओव्हर अश्या अर्थाने मानसरोवर पडले. :) ही ही ही