मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो !

संजय क्षीरसागर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
संदीप औलीया आहे याची साक्ष देणारी ही एक सुरेख कविता ! स्वच्छंद जगण्याची आदीम उर्मी प्रत्येकाच्या अंतरी आहे पण रोजच्या जगण्यात ती हरवून गेलीये. स्वानंद किरकिरेची शायरी रांचो नांवाच्या स्वछंदाला शोधतांना हृदयस्पर्शी होते आणि डोळ्यात पाणी तरळवून जाते.... बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो, कहाँ गया उसे ढूँढो हम को तो राहें ही चलती वो खुद अपनी राह बनता गिरता संभालता, मस्ती में चलता था वो | हमको कलकी फिकर सताती, वो बस आज का जश्न मनाता, हर लम्हें को खुल के जीता था वो | कहाँ से आया था वो छू के हमारे दिल को कहाँ गया...उसे ढूँढो | स्वानंद म्हणतो आम्हाला रोजचा दिनक्रमच चालवतो, पण तो स्वतःचा दिवस मांडतो. आम्ही उद्याच्या चिंतेत जगतो, तो हरेक आजचा उत्सव करतो आणि हर क्षणाला साहसानं सामोरं जातो. झेन मास्टर रिंझाई या स्वच्छंदाचं वर्णन, केवळ दोनच शब्दात करतो `लिव्ह डेंजरसली !' आणि संदीप त्याच्या स्वच्छंदाचा माहौल रंगवतांना म्हणतो : मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो ! ही कविता संदीपनं स्वत: गायलीये कारण ते त्याचं स्वत:चंच वर्णन आहे. त्यानं प्रत्येक कडव्यापूर्वी कव्याचं विवरणही केलंय त्यामुळे हे रसग्रहण म्हणजे एका अर्थानं संदीपशी केलेली जुगलबंदी आहे. तो कवितेतून स्वत:ला खोलतोयं आणि मी गद्यातून स्वच्छंदाचा माहौल उभा करण्याचा यत्न करतोय. संदीप म्हणतो ही आपल्यातल्याच दोन मींची कविता आहे. मला वाटतं, हा एका स्वच्छंद गवसलेल्याचा रोजच्या जगण्याचा अंदाज़ आहे. एकदा स्वच्छंद गवसला की चौकटीत जगणारं असं कुणी राहातच नाही. रोज तेचते जगण्याची वृत्ती, सुरक्षितचौकटीत जगण्याची सवय आणि किरकोळ गोष्टींनी व्यथित होणं संदीप किती सुरेखपणे मांडतो. सहज भिडणारी रुपकात्मकता रसिकाला संदीपच्या अनुभवाशी तत्क्षणी रिलेट करते. जुनाट दार आणि किरकिरा बंदी ही धारणात बांधली गेलेली मानसिकता आहे, जी मोकळा श्वासच घेऊ देत नाही. स्वानंद म्हणतो तसा ‘एक कहानी ख़तम तो, दुजी शुरु हो गई मामू !’ असा जगण्याचा पॅटर्न होऊन बसतो. संदीप ती स्थिती ‘बिजागरीशी जीव गंजवत बसतो’ अशी मांडतो आणि शेवटच्या ओळीत तर कहर करतो...तो लंघून चौकट पार निघाया बघतो ! ही चौकट म्हणजे भीती आहे. आणि ती भीती दुहेरी आहे. मूळात जे भय आहे ते शारीरिक म्हणजे मृत्यूचं आहे आणि मानसिक भय इज्जतीचा कधीही फालुदा होण्याचं आहे. या दोन भयांना जो पार करतो तो चौकट लंघून जातो, स्वच्छंद होतो. मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो तो लंघून चौकट पार निघाया बघतो ! मग या रोजमर्राच्या जिंदगीत वरुन कितीही हसतमुख दिसलो तरी आत कधीही भडका होईल असा संताप धगधगत असतो. इन अ वे, व्यक्तीमत्त्वाच्या जगण्याला हा उन्हाचा शाप आहे. आणि ज्याला स्वच्छंद गवसला तो याच उन्हाचे दागिने घडवतो ! तीच रिलेशनशिप्सची गुंतागुंत, त्याच आर्थिक विवंचना, तेच दैहिक प्रश्न, पण चौकट लंघून गेलेला त्यांची दाहकता सूर्यफुलात रुपांतरित करतो. डोळ्यांत माझिया सूर्याहुनी संताप दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप ! तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते- - घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो !! यशस्वी झालो तरच खरा जगलो ही मानसिकता अस्तित्वाविरोधात लढा उभा करते. प्रत्येक अडचण काच होते आणि रडीचा का होईना डाव खेळून जिंकण्याची इर्ष्या निर्माण करते. पण निसर्गदत्त महाराज म्हणतात तसा ‘स्व कायम विजयी आहे’ कारण तो दुसर्‍याच्या विजयात स्वत:ची हार मानत नाही तर ते त्याचं कौशल्य मानतो, त्याला दाद देतो. आणि मग ती हार सुद्धा त्याला आनंद देऊन जाते कारण तो नवं काही तरी शिकलेला असतो. मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो मी डाव रडीचा खात जिंकतो अंती तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो ! आस्तिक देवावर भरोसा ठेवून असतो आणि तो सदैव आपल्याच पाठीशी उभा राहावा म्हणून नवस-सायास करतो. ‘तो’ आपल्या मनाजोगतं घडवेल या भाबड्या आशेपायी वेळातवेळ काढून भक्ती करतो. पण स्वच्छंद जगणार्‍याला दान काय पडेल याची फिकीर नसते, त्याचा सगळा रस खेळण्यातच असतो. या निर्वेध चित्तदशेमुळे आणि अशा बहुआयामी विश्वात, आपली व्यक्तिगत इच्छा रेटणं व्यर्थ आहे हे उमगल्यानं, तो अस्तित्वाशी कायम समरुप असतो. असं जगणं मग कृतार्थ होतं आणि अस्तित्वाचा धन्यवाद घेऊन जातं. मी आस्तिक ! मोजत पुण्याईची खोली नवसांची ठेवून लाच, लावतो बोली ! तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन्‌ 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !! ज्या काव्याला अध्यात्मिक आयाम नाही ते फार सुपरफिशियल होतं. संदीप त्याचं अध्यात्मिक आकलन कवितेत आणतोच आणि त्यामुळेच तर त्याची कविती मिस्टीकल होते. चौकटीत जगणार्‍याला स्यूडो अध्यात्माचा मोठा आधार असतो. म्हणजे ‘तत् त्वं असी’ किंवा फारच डेरींग असेल तर ‘अहं ब्रह्मास्मी’ असे काही फंडा मनातल्या मनात रिपीट करत तो जगत असतो. शिवाय हे फंडे प्रसंगानुरुप बदलत असतात. या मानसिकतेला संदीप म्हणतो...मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार ! पण हे इतकं वरवरचं असतं की आतला चेहरा तसाच भेसूरच राहातो, कारण व्यक्तीमत्त्वातून सुटका झाल्याखेरिज तो बदलणार तरी कसा? स्वच्छंद जगणारा आकाश झालेला असतो ! त्याचं सगळं जगणं मोरपंखी झालेलं असतं. आणि या स्थितीचं वर्णन संदीप असं काही कमालीचं लोभस करतो की त्याच्या प्रतिभेचा केवळ हेवा वाटतो !...तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही, त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !! मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार लपतो न परि चेहरा आत भेसूर ! तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !! मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !

वाचने 19971 वाचनखूण प्रतिक्रिया 103

मला आधीच जर का अध्यात्मात इंटरेस्ट नसता, तरी हे वाचून नक्कीच आला असता ! `लिव्ह डेंजरसली !' वॉट अ स्टेटमेंट !

पुंबा 08/02/2017 - 10:22
आयुष्यावर बोलू काही मधील हे माझं सर्वात आवडतं गाणं.. 'मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो' ही ओळ या कवितेचा मुकुटमणी वाटतो. इतक्या सुरेख रसग्रहणाबद्दल धन्यवाद संक्षि.. अवांतरः साहित्य आणि कवितेच्या क्षेत्रातील हुच्चभ्रूंमध्ये संदीप खरेबद्दल इतका तिटकारा का असतो काय माहीत? कदाचीत लोकप्रियतेमुळे असूया वाटत असेल. तिकडे ऐसीवर पण मोकळ्यात चिखलफेक चालू असते संदीप खरेवर आणि त्याच्या कविता आवडणार्‍यांवर. संदीप, पाडगावकर, खेबूडकर, गदिमा हे कवि म्हणून कोलटकर, आरती प्रभू, ग्रेस यांच्यापेक्षा कमी प्रतीचे म्हणे!

In reply to by पुंबा

प्रस्थापित आणि त्यांचे चाहते अस्वस्थ होतात. संदीपचा पहिला अल्बम `दिवस असे की' होता. ती मंदार आगाशेनं, संदीपनं स्वतःच्या आवाजात म्हटलेल्या कवितांची `कॅसेट' काढली होती. कॅसेट कमालीच्या बाहेर लोकप्रिय झाली ती त्यातल्या `सरीवर सरं', `मनं तळ्यात, मळ्यात, ...जाईच्या कळ्यात' `कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे' आणि `दिवस असे की' या गाण्यांमुळे. ही गाणी तरुणाईनी ज्याम उचलून धरली त्यामुळे संदीपवर कॉलेजियन्सचा कवि असा शिक्का बसला. तो इंटरनेटचा जमाना नसल्यानं संदीप दृक-श्राव्य माध्यमातनं त्याची कविता पुढे आणू शकला नाही. नंतर त्यानं सलीलबरोबर `आयुष्यावर बोलू काही'चे सरळ तिकीट लावून कार्यक्रम करायला सुरुवात केली. लोक तिकीट काढून कविता ऐकायला येतात हे प्रस्थापितांना आणि त्यांच्या चाहत्यांना अतीच झालं. त्यामुळे संदीपची कविता इम्यॅच्युअर आहे असा प्रचार त्यांनी सुरु केला. खरं तर त्याची कविता डायरेक्ट आहे आणि त्याहूनही कौतुक म्हणजे ती गेयं आहे. संदीपनं कुणालाही कधीही आव्हान दिलं नाही की स्वतःची बाजू डिफेंड केली नाही. पण त्याचा हा चॅलेंज कुणाही कविला झेपेना म्हणून त्याच्या कवितेला प्रतिष्ठीतांनी आशयघन म्हणण्याऐवजी कॉलेजियन्सची कविता म्हणण्याचा प्रघात पाडलांय. इन अ वे, ही इज पार एक्सलंस. सामान्यांना त्याची कविता सरळ भिडते आणि `आपणही कविता करु शकू' अशी आकांक्षा ती जागवते, हे तीचं खरं यश आहे.

In reply to by पुंबा

सरीवर सरं पुन्हा पुन्हा ऐकाविशी... केवळ जबरदस्त ! अशा पावसात सये, व्हावे तुझे येणे जाणे, उमलते ओले रानं, रानं नव्हे मन तुझे, जशी ओली हुरहूर थरारते रानभर, तसे नांव तरारावे, माझे तुझ्या मनभर, सरीवर सरं....सरसर सरीवर सरं !

In reply to by संजय क्षीरसागर

मोदक 08/02/2017 - 14:39
संक्षींशी बेशर्त सहमत. संदीप, पाडगावकर, खेबूडकर, गदिमा हे कवि म्हणून कोलटकर, आरती प्रभू, ग्रेस यांच्यापेक्षा कमी प्रतीचे म्हणे! यातला संदिप खरेचा उल्लेख अस्थानी आहे. बाकी वाक्याबद्दल "हो म्हणायचे आणि सोडून द्यायचे" समीक्षक लोकांना जग वेगळे दिसते. बोहारणीचे उदाहरण माहिती आहे ना..?

In reply to by मोदक

जो दिलको सुकून दे वो अच्छी मौसिकी ! तसंच मला ही वाटतं, जी मनाला भिडते ती कविता !

In reply to by मोदक

पुंबा 08/02/2017 - 17:27
नाही नाही. संदीप खरे या सार्‍यांइतका ग्रेट कवि आहे असं मला म्हणायचंच नाही, परंतू, त्याला एकदम मोडीतच काढायचं आणि संदीपच्या वाचकाला 'अरे ते सवंग काय वाचतो, कोलटकर वाच!' असा शहाजोगपणाचा सल्ला द्यायचा हा हुच्चभ्रूपणा खुपतो. अरे त्याला संदीप खरेच्या कवितांतून आनंद मिळत असेल तर मिळू द्या की, हळूहळू होईल त्याची इतरही चांगल्या कविंची ओळख. थेट सवंग म्हणून हुसकावल्यामुळे, माझ्या मते, खरेच चांगले काही सर्जीत केले तरीही ते अ‍ॅकनॉलेज होत नाही. (माझ्यामते, कवितेत डावं-उजवं करता येते पण कवि थेट महान किंवा फालतू असं वर्गीकरण कसं करता येईल? आणि संदीप तर सातत्याने उत्तमोत्तम कविता देतोय. हा, जर रसिकप्रियता एकमेव निकष असेल त्याला सुमारात काढायला तर तो संक्षि म्हणताहेत तसा प्रस्थापितांच्या पोटदुखीचा भाग ठरतो. )

In reply to by पुंबा

मोदक 08/02/2017 - 21:07
संदीप खरे या सार्‍यांइतका ग्रेट कवि आहे असं मला म्हणायचंच नाही - हे लक्षात आले होते, पण तसे ध्वनीत होत होते म्हणून मुद्दाम उल्लेख केला इतकेच. :) तुमच्या बाकीच्या मताशीही सहमत आहेच. पण मी खरे सांगू का..? हे समीक्षक म्हणा किंवा कशातही सुधारणा सुचवणारे कोणत्याही जमातीचे लोक असोत, त्यांची मते विचारात घेताना त्यांचे स्वत:चे कर्तुत्व काय हा मुद्दा (मला व्यक्तीशः) जास्ती महत्वाचा वाटतो. "पाडगांवकरांच्या कवितेत सुधारणा हवी" हे सांगणारा तज्ञ गाताडवाडीच्या ऊसवाहतुकीचा ठेकेदार असेल तर त्याचे मत बिन्धास्त बारा गडगड्याच्या विहीरीत टाकावे. आपण अंतर्जालावर लिखाण करतो म्हणून लगेच कुणाच्याही कलाकृतीवर / साहित्यावर वेडीवाकडी टीका करण्याचा हक्क प्राप्त होत नाही हे लोकांना कळेल तो सुदिन.

In reply to by पुंबा

राजाभाउ 08/02/2017 - 12:29
तथाकथित हुच्चभ्रूंमध्ये लोकप्रिय = सवंग अशी सरळसळ जोडणी असते, आणि कविते बाबत तर सुबोध = सवंग अशीही जोडणी असते. आपल्याला काय जे आवडत, भीडत ते वाचायच बाकीच्याना काय म्हणायचय ते म्हणोत बापडे.

In reply to by राजाभाउ

कवितेबाबत तर सुबोध = सवंग अशीही जोडणी असते. म्हणून तर संदीपच्या कवितांचं रसग्रहण करतोयं. एकसोएक कविता आहेत त्याच्या.

स्पा 08/02/2017 - 10:44
क्या बात संक्षी मझा आला
ज्या काव्याला अध्यात्मिक आयाम नाही ते फार सुपरफिशियल होतं. संदीप त्याचं अध्यात्मिक आकलन कवितेत आणतोच आणि त्यामुळेच तर त्याची कविती मिस्टीकल होते. चौकटीत जगणार्‍याला स्यूडो अध्यात्माचा मोठा आधार असतो. म्हणजे ‘तत् त्वं असी’ किंवा फारच डेरींग असेल तर ‘अहं ब्रह्मास्मी’ असे काही फंडा मनातल्या मनात रिपीट करत तो जगत असतो. शिवाय हे फंडे प्रसंगानुरुप बदलत असतात. या मानसिकतेला संदीप म्हणतो...मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार ! पण हे इतकं वरवरचं असतं की आतला चेहरा तसाच भेसूरच राहातो, कारण व्यक्तीमत्त्वातून सुटका झाल्याखेरिज तो बदलणार तरी कसा? स्वच्छंद जगणारा आकाश झालेला असतो ! त्याचं सगळं जगणं मोरपंखी झालेलं असतं. आणि या स्थितीचं वर्णन संदीप असं काही कमालीचं लोभस करतो की त्याच्या प्रतिभेचा केवळ हेवा वाटतो !...तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही, त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !! मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार लपतो न परि चेहरा आत भेसूर ! तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!
सुपर .... विचार करण्यासारखे

In reply to by स्पा

आकाश अशी काही गोष्ट या जगात नाही . ओशो तर म्हणतात, आकाश ही नजरेची मर्यादा आहे ! आणि मजा म्हणजे आकाश ही स्वछंद झालेल्याची चित्तदशा आहे. ती दर्शवता येत नाही पण आहे मात्र हमखास. त्यामुळे संदीप म्हणतो, तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही... ही नभाची शाल म्हणजे व्यक्तीमत्वाचा झालेला निरास आहे, अंतर्बाह्य आलेली पारदर्शकता आहे. त्या नभाच्या शालीत कुणीही नाही ! फक्त एक मूड आहे... क्षणोक्षणी मनसोक्त आणि दिलखुलास जगण्याचा.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पा 08/02/2017 - 13:25
अंतर्बाह्य आलेली पारदर्शकता आहे
. ज्याला हि पारदर्शकता आली तो जिवंत असतानाच मुक्त झाला म्हणून समजावे

मितान 08/02/2017 - 14:26
वा वा !! ही कविता अतिशय आवडती आहे. तुम्ही केलेले रसग्रहण ही आवडले. मध्येच काही शब्द दाताखाली आले पण चलतय तेवढं :)

चौकटराजा 08/02/2017 - 18:48
हे रसग्रहण आमच्या वेळच्या ( १९७०) युवांच्या भाषेत सांगायचे झाले तर " तुटले " आहे. आजच्या भाषेत "लय भारी." मी या दोघांसही ओळखतो अगदी फार जवळून !

मला रसग्रहणं आवडत नाहीत. आपल्याला जे जाणवलंय ते तस्संच शब्दात मांडता येत नसतं.. भावना एवढी मोठी असते की शब्द तोकडे पडतात. आणि खास करुन कविता हा असा प्रांत आहे की वाचताक्षणी लख्खपणे तो भाव मनात उमटला पाहिजे. म्हणुन मी शक्यतो कविता वाचते पण रसग्रहण नाही. तुमचेही वाचले नाही. प्रतिसाद मात्र वाचले. संदीप खरेच्या कविता आवडतात. त्या सहज सोप्या आणि सरळ आहेत ह्याच्याशी सहमत आहे. ग्रेसची कविता लोकांना जास्त दर्जेदार वाटते, कदाचित तसं असेलही. पण मला मनातले अ‍ॅबस्ट्रॅक्ट भाव इतके अचूक आणि सहज शब्दात मांडता येणं हीच एक मोठी कला वाटते. म्हणुन मला संदीपची कविताही तेवढीच दर्जेदार वाटते.

In reply to by पिलीयन रायडर

आणि हो.. तुम्ही कुठेतरी म्हणाला होतात ना की संदीपची मुलाखत घ्यायला आवडेल. तर नक्की घ्या. तुम्ही फार चांगले प्रश्न विचाराल. रादर गप्पा स्वरुपात घ्या. मेहफिल जमवल्या सारखी. (फक्त आपलं विळ्या भोपळ्याचं नात बघता.. त्यालाही थोडं बोलु द्या असा खोचक सल्ला देते!)

राजाभाउ 09/02/2017 - 11:45
संक्षी सर मस्त रसग्रहण मनापासुन आभार संदिप च्या बर्याच कविता अध्यात्मिक अंगाना जाणार्या आहेत. एक सो एक. त्याची "आताशा मी फक्त रकाने दिवसंचे भरतो" ही पण भारी कविता आहे, का माहीत नाही पण ही वाचताना मला अस वाटल कि भाउ पाध्येंच्या धोप्या (अनिरुदद्ध धोपेश्वरकर) ची ही कविता आहे. सर जरा आगाउपणा करून या ही कविते चे रसग्रहण करा अशी विनंती करतो

In reply to by राजाभाउ

या कवितेचा अर्थ तोच आहे पण ती मनसोक्त जगण्याला स्पर्श करत नाही. ती काहीशी एकांगी आहे . बघा... कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या... उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा | दारी नाही फिरकत कुठला नवा छंद-चाळा... राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा | कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो... मला प्रश्नापेक्षा उत्तरात रस आहे त्यामुळे

In reply to by राजाभाउ

या कवितेचा अर्थ तोच आहे पण ती मनसोक्त जगण्याला स्पर्श करत नाही. ती काहीशी एकांगी आहे . बघा... कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या... उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा | दारी नाही फिरकत कुठला नवा छंद-चाळा... राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा | कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो... प्रश्नापेक्षा मला उत्तरात रस आहे त्यामुळे केवळ प्रश्न मांडणारी कोणतीही अभिव्यक्ती मला मोहवत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

राजाभाउ 10/02/2017 - 20:01
यातला "आताशा" हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे कधीतरी स्वछंद, संवेदनाक्षम आसाणारा तो आता मात्र निराश झाला आहे, जगण्याची मजा हरवुन बसला आहे असे कदाचीत म्हणायचे असेल.

In reply to by राजाभाउ

माणूस मात्र कधी कधी स्वच्छंद जगतो . बाकी सर्व वर्कींग डेज जवळजवळ एकसारखे असतात . या रूटीनला संदीप 'दिवसांचे रकाने भरतो ' म्हणतो . थोडक्यात , सगळे आयटम फक्त टिकमार्क होतात : जेवण झालं ? येस . अंघोळ झाली ? येस. ऑफिसला वेळेवर गेलास? येस . घरी वेळेवर आलास ? येस . टिवी पाहिलास ? येस . आता काय ? झोपतो !.... कशाला ? उद्या सगळं हेच परत करायला !

पैसा 09/02/2017 - 12:16
रसग्रहण आवडलं. बहती हवा सा बद्दल तुम्ही बहुतेक स्वतंत्रपणे लिहिलं होतं. एक्कच तक्रार आहे. तुमच्या लिखाणात हिंदी शब्द खूप येतात. तिथे ठेचकाळल्यासारखं होतं. हे जरा टाळता आलं तर बघा.

In reply to by पैसा

पण मराठी साहित्याबरोबर उर्दूचाही व्यासंग केल्यानं काही वेळा अभिव्यक्तीसाठी त्या अनुभवाजवळ नेणारा मराठी शब्द चटकन सापडत नाही. परिणामी लेखनाचा ओघ थांबल्यासारखा होतो आणि मग हिंदी शब्द जवळचा वाटतो. उदा. .... मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए । नाज़ूक, नाज़ूक, मीठे मीठे, होठोंकी खैरात लिए । या ओळींच्या रसग्रहणासाठी तितके नाजूक मराठी शब्द सापडणं माझ्या सीमेपलिकडे आहे.

नीलमोहर 09/02/2017 - 16:14
स्वानंद यांचं 'बहती हवा सा' आणि संदीपचं ' मी हजार चिंतांनी' दोन्ही रचनांमधील साम्य आश्चर्यकारक आहे, पण दोन्हीही तितक्याच प्रभावी आहेत. ही दोन भिन्न व्यक्तींमधील तुलनाही वाटते, आणि एकाच व्यक्तीच्या स्प्लिट पर्सनॅलिटी टाईप दोन व्यक्तिमत्वांचीही. साध्या सरळ शब्दांतही कविता होऊ शकते हे संदीपने परिणामकारकपणे दाखवून दिलेले आहे, आणि त्याच्यामुळेच लोकांत विशेष करून तरुणाईत मराठी कवितांची आवड निर्माण झाली हे सत्य आहेच. रॅट रेसमधून बाहेर पडून फक्त स्वतः करता आणि स्वतःच्या आनंदाकरता जगणे सबके बस की बात नहीं. तुम्ही नेहमी म्हणता तसं स्वच्छंद जगण्याचा पर्याय खूप सोपा आणि तितकाच अवघड आहे, पण एकदा ते जमलं की मात्र जगण्याचंच गाणं होऊ शकतं.

In reply to by नीलमोहर

ही दोन भिन्न व्यक्तींमधील तुलनाही वाटते, आणि एकाच व्यक्तीच्या स्प्लिट पर्सनॅलिटी टाईप दोन व्यक्तिमत्वांचीही. स्वच्छंद आपल्या सर्वांचा एकच आहे. तो व्यक्तीमत्त्वातून सुटका झालेल्या प्रत्येकाचा जगण्याचा अंदाज आहे. ३ इडियटसमधे तो रांचो झालायं, एक उनाड दिवसमधे तो अशोक सराफ झालायं, या कवितेत तो संदीप खरे झालायं आणि रसग्रहणात तो संजय क्षीरसागर झालायं. स्प्लीट पर्सनॅलिटी म्हणजे अनेक व्यक्तीमत्वातून जगणारी व्यक्ती, तो सायकॉलॉजिकल प्रॉब्लम आहे आणि स्वच्छंद म्हणजे व्यक्तीमत्वातून झालेली सुटका.

In reply to by संजय क्षीरसागर

मोदक 09/02/2017 - 19:06
स्वच्छंद आपल्या सर्वांचा एकच आहे. तो व्यक्तीमत्त्वातून सुटका झालेल्या प्रत्येकाचा जगण्याचा अंदाज आहे. ३ इडियटसमधे तो रांचो झालायं, एक उनाड दिवसमधे तो अशोक सराफ झालायं, या कवितेत तो संदीप खरे झालायं आणि रसग्रहणात तो संजय क्षीरसागर झालायं.

जियो संक्षी..!!!

.

स्वच्छंद तुमचा आणि माझा, असा काही वेगळा नसतो, व्यक्तित्वाच्या बंदितून तो मोकळा झालेला, श्वास असतो | `फाइव पॉइंट समवन' लिहीतांनातो, चेतन झालेला असतो, आणि स्क्रीनप्ले - डिरेक्शन करतांना तो, राजू हिरानी होतो | पडद्यावर तो अमीर खानसारखा भासतो, आणि `बहेती हवासा ' लिहीणारा स्वच्छंदच, स्वानंद असतो | गाणं गातांना शानच्या आवाजात तोच गात असतो, आणि रांचोला चुंबनात घुसमटवतांना, तो पिया झालेला असतो | `मी हजार चिंतांनी' लिहीतांना तो संदीप होतो, आणि तिच्या रसग्रहणाचा कैफ, मला स्वच्छंद करुन जातो | दिलखुलास दाद देतांना, तो रसिकांमधून व्यक्त होतो, आणि प्रतिसाद मोदकाचा, पण तोच सारं रंगारंग करुन जातो |

In reply to by संजय क्षीरसागर

स्वच्छंद म्हणजे नभासम कृष्णाचा, नित्य वारसा असतो, आपल्यात तो आणि त्याच्यात आपण, वसत असतो | स्वच्छंद तुमचा आणि माझा, असा काही वेगळा नसतो, व्यक्तित्वाच्या बंदितून तो मोकळा झालेला, श्वास असतो |

संक्षी साहेब, तुमच्या ह्या वाक्याबद्दल 'माणूस मात्र कधी कधी स्वच्छंद जगतो . बाकी सर्व वर्कींग डेज जवळजवळ एकसारखे असतात' --- ह्याला उपाय काय ? वर्कींग डेज एकसारखे होणारच. तसे होऊ नये म्हणून नक्की काय करावे ते तरी सांगा.

In reply to by अभिजीत अवलिया

मृत्यू ही कोणत्याही क्षणी घडू शकणारी घटना आहे या वस्तुस्थितीचं कायम भान असायला हवं. त्याशिवाय जगण्यात उत्कटता येत नाही. ते आकलन म्हणजे भयभीत होऊन राहाणं नाही तर मृत्यूचा स्वीकार आहे. वर्तमान हा एकच काळ आहे हा उलगडा झाल्याशिवाय प्रत्येक क्षणाचा उत्सव करता येत नाही. हे दोन्ही अध्यात्मिक विषय आहेत पण ते जगण्यात आणले नाहीत तर सर्व वर्कींगडेज एकसारखेच राहातात. मग रिटायरमेंट नंतर मजा करु असा स्वतःला दिलासा देत व्यक्ती रुटीन रेटत राहाते. आणि रिटायरमेंट नंतर साहस करण्याची क्षमताच उरत नाही कारण इतकी वर्ष लागलेली सवय सुटतासुटत नाही. मग यथावकाश आयुष्य संपून जातं. मी इथे अध्यात्मावर अजिबात लिहीणार नाही. तरी सुद्धा तुमची विचारणा प्रामाणिक असल्यानं मुख्य गोष्टी सांगितल्या. आता त्या तुम्हाला पटणं आणि स्वतः च्या आयुष्यात उतरवणं तुमची जवाबदारी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रतिसाद अंशतः आवडला. रिटायरमेंट नंतर मजा करायची हे मला देखील मान्य नाही. 'म्हातारपणी मजा करू' असे म्हणत पूर्ण तारुण्य वाया घालायचे हे चुकीचेच आहे. वैयक्तिरित्या मला निरनिराळ्या ठिकाणी भटकायला आणी फोटो काढायला खूप आवडते. पण ह्या गोष्टी मी फक्त सुट्टीच्या दिवशी करू शकतो आणी ते मी करतोच. पण हे रोज करायचे म्हटले तर पहिले नोकरी सोडावी लागेल. त्यामुळेच मी विचारले की वर्किंग डे एकसारखे होऊ नयेत ह्यासाठी काय करावे लागेल.

In reply to by अभिजीत अवलिया

संदीप डांगे 12/02/2017 - 22:29
फार सोपं आहे उत्तर म्हटलं तर... आता बघा कितीही रुटीन असलं तरी त्यात प्रत्येक प्रसंग जसाच्या तसा, प्रत्येक परिस्थिती जशीची तशी नसते. प्रत्येक क्षणही अगदी सेम टु सेम नसतो. हर क्षण नवनवीन घडत असते. हे प्रत्येक क्षणाला नवनवीन घडत असतांना जागृत असणे म्हणजेच एकसारखेपणा घालवणे. आपण मशिन नाही, जीवंत प्राणी आहोत, हर क्षणाला आपल्या शरिरातून लाखो संवेदना प्रवास करत असतात, अनेक गोष्टी विविध पद्धतीने घडत असतात. हे सगळं जाणवायला लागलं की रुटीन संपतो. भले तुम्ही रोज कंपनीत जाऊन फक्त सह्या करायचे काम का करीत असेना.. किंवा फक्त गवत कापायचे काम का करीत असेना... काम काय आहे ह्याने मग फरक पडणे बंद होते... अगदी बॅन्केत कॅशियर असेल कोणी तरी त्याला प्रत्येक एन्ट्रीला सेम माणसाच्या सेम खात्यात सेम रक्कम भरावी-काढावी लागत नसते. सर्वात आधी असे बघूया की रुटीनचा कंटाळा का येतो. तेच तेच करण्याचा कंटाळा येतो, खरे तर मन असं मशिनी रिपिटीशनमधे रमत नाहीच. मनाला सतत नवीन चॅलेंज हवी असतात. पण दुसरीकडे कम्फर्टझोनही प्रिय असतो. आता ज्या कोणाला चॅलेंजेसही हवी पण कम्फर्टझोनमधे राहून त्याला रुटीनचा कंटाळा यायला सुरुवात होते. ज्याची कंझो सोडायची तयारी होते, त्याला रुटीन हे रुटीन वाटत नाही. म्हटलं तर सर्वांचेच आयुष्य रुटीन आहे. जन्म होतो-मरण येते. आता ह्यात देशागणिक, धर्मागणिक, सामाजिक, आर्थिक आणि अनेक स्तरांवर लोकांचे आयुष्य एकदुसर्‍यापेक्षा वेगळे होत जाते. तरी एखाद्या धर्मातल्या लोकांचे रुटीन सारखे असते, एखाद्या देशातल्या लोकांचे दुसर्‍या देशातल्या लोकांपेक्षा रुटीन वेगळे असते... आता हे रुटीन अधिकाअधिक वैयक्तिक पातळीकडे नेले तर लक्षात येईल की एका गावाचे, कुटूंबाचे रुटीन असते. ते दुसर्‍यापेक्शा वेगळेच असते. मग आपल्या स्वतःकडे बघा... आपले रुटीन अस्ले तरी ते रोज वेगळे काहीतरी घडत असतेच. हा वेगळेपणा टिपायची सवय लागली तर कंटाळा उडनछू होऊन जातो. वर बॅन्ककॅशियरचे उदाहरण खूप मासलेवाईक आहे. त्याला आठ तासात कित्येक वेगळी लोकं भेटायला येतात, कित्येक लोकांच्या कित्येक आकड्यांच्या रकमा असतात. त्याच्या काउंटरवर घडणार्‍या प्रत्येक क्षणाची परिस्थिती दुसर्‍या क्षणापेक्षा नक्कीच वेगळी असते. पण होतं काय की आपण अधिकाधिक विगंगावलोकन करत जातो. एकूण हिशोब मांडायला जातो.. मग गणित चुकतं. स्वच्छंदपणाचे गुपित विहंगावलोकन करत स्वस्थ बसण्यात नाही. बरेच वर्किंग क्लास लोक सोमवारच्या कंटाळ्याबद्दल (मन्डे-ब्लूज) बोलतात, खरेतर सोमवार हा कंटाळवाणा नसतो तर कंटाळा ह्या लोकांमध्येच अस्तो. ते आपल्या आयुष्यात घडणार्‍या गोष्टींना एकाच साच्यात बघत जातात, मग कंटाळतात... खरेतर प्रत्येक सोमवार मागच्या सोमवारपेक्षा वेगळा असतो, खुप चांगला किंवा वाईट कसाही... पण असतो वेगळा. तोच बॉस असतो, तेच कलिग असतात, तीच प्रोजेक्ट्स, तेच क्लायंट असतात, पण मागच्या एका आठवड्यात बरंच काही बदललेलं असतंच... सगळं नवं असतं प्रत्येक दिवसाला.. पण रुटीनवाले घडून गेलेला कालचाच दिवस... मागचा आठवडा.. मागचंच वर्ष खांद्यांवर ओढून चालत असतात.. त्या आठवणींनी मनावर घट्टा केलेला असतो.. प्रत्येक नवीन क्षण त्या घट्ट्यातून निसटून जातो.... मग वाटायला लागतं सगळं एकसुरीच आहे.... ही जाणीव तोडली तरी वर्किंग डेच्या रुटीनमधून मुक्त होता येते. असे मुक्त व्हा, स्वच्छंद व्हा वगैरे गोष्टी आध्यात्मिक, किंवा वेगळ्या ग्रहावरच्या, वेगळ्या मनोवृत्तीच्या, गर्भश्रीमंत लोकांच्या कविकल्पना वाटतात जरूर. पण त्या तशा नसतात. आहे त्या क्षणाला समरसून जगले तर स्वच्छंद म्हणजे काय याची व्याख्या पुरेशी स्पष्ट होईल.. एखाद्या मीटींगमधे आपण खूप उत्साही असतो, खूप ब्रेनस्टोर्मिन्ग होते, एखाद्या दिवशी अनेक तास खपून काम केलेलं अस्तं तरी आपण अजिबात थकलेले नसतो, तो दिवस, तो क्षण आपण मनापासून स्वच्छंद जगलेले अस्तो. स्वच्छंद जगणे फारच सोपे आहे. त्यासाठी घरदार-नोकरी-कमाई-जबाबदार्‍या सोडायची काहीएक आवश्यकता नाही. असे सतत समरसून जगणे लगेच शक्य नसले तरी असे जगायचे आहे याची जाणीव जागृत ठेवावी, हळू हळू सवय होत जाते.

In reply to by संदीप डांगे

आहे त्या क्षणाला समरसून जगले तर स्वच्छंद म्हणजे काय याची व्याख्या पुरेशी स्पष्ट होईल.. आहे तो क्षण समरसून जगायला, मनात येईल तर करीन नाही तर करणार नाही अशी चित्तदशा लागते. उदा. हा लेख मी ८ फेब्रुअरीला रात्री १.०४ ला अप लोड केला , ती बुधवारची रात्र होती हे मी आता बघितलं ! वेळ, वार, तारीख यांची मला फिकीर नसते (इथे ३१ जुलैबद्दल गोड गैरसमज करुन घेतला आहे पण तो `वार्षिक अपवाद' होता आणि मी केवळ डिस्क्लेमर दिला होता की माझ्याकडे उत्तर नाही असा गैरसमज नको, फक्त प्रतिसादाला वेळ लागू शकतो. आणि मी ३१ जुलैला सुद्धा प्रतिसाद दिले याचं सोयिस्कर विस्मरण झालं आहे. ) तर मुद्दा असा की वर्तमान हाच केवळ जगण्याचा क्षण आहे आणि लिहीन किंवा न लिहीन या विकल्पामुळे ही पोस्ट इंटरेस्टींग झाली आहे. उद्या सकाळी उठायलाच हवं असं माझ्यावर कोणतंही बंधन नाही. इन अ वे, मृत्यू केंव्हाही आला तरी मला फरक पडत नाही त्यामुळे लेखनात उत्कटता येते आणि ती वाचणार्‍याला भावते. कॅशीअरला खुर्ची सोडणं असंभव आहे त्यामुळे आयुष्य क्षणोक्षणी बदलत असलं तरी त्याला फोकस कामावरच ठेवावा लागतो. मी केंव्हाही काम बंद करु शकतो आणि होणारा परिणाम भोगायला तयार असतो त्यामुळे प्रत्येक बदलणार्‍या क्षणाला अनुरुप वागू शकतो. प्रश्न तुम्ही नोकरी करतायं की व्यावसाय हा नाही आणि उगीच कल्पना ताणणं, की अमुकएक डेडलाइन आहे, समोर क्लायंट बसलायं, आता तुम्ही सिंथ वाजवाल का ? हा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आहे. प्रश्न तुम्ही स्वतःला काम आणि पैसा यापेक्षा श्रेष्ठ समजता की कायम त्याखालीच दबलेले असता हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारण्याचा आहे. जर तुम्ही समजत असाल तर चर्चाच संपली !

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 13/02/2017 - 12:00
संक्षि, समोर क्लायंट बसला असतांना सिंथ वाजवायची इच्छा झालीच पाहिजे अशी जबरदस्ती आहे काय? मग ते सैरभैर मनोवृत्ती चे उदाहरण होईल. मात्र सिंथ वाजवत असतांना अचानक थांबवून आता मला काम करायचे आहे त्यामुळे क्लायंटने आताच्या आता समोर आले पाहिजे हेही घडू शकत असेल तर ओके! मला वाटतं, तुम्ही तुमची कल्पना फार अवास्तव ताणत आहात, कारण मला आत्ताच्या आता अमेरिकेत जायची इच्छा झाली तरी ते होऊ शकत नाही हे मला माहित आहे. (बॉलिवूड सिनेमात सकाळी अमेरिकेहून भारतात आलेला हिरो मनासारखं घडत नाही बघून मैं आजही शाम कि flight से वापस जा रहा हूँ वगैरे म्हणतो तसं) अचाट योगायोग घडतात पण ते आपल्या स्वच्छंद मनोवृत्तीच्या आज्ञा पाळत नसतात. दुसरीही अनेक वास्तव जगातली उदाहरणे देता येतील पण विनाकारण वितंडवाद झाल्यासारखं वाटेल. क्रेडिट कार्ड धाग्यवरची चर्चा वाचली तिथेही असंच अवास्तव ताणले असे वाटले होते.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 13/02/2017 - 14:01
दोन भाग आहेत बघा. वर अभिजीत यांनी विचारलंय की एकसुरी वर्किंग डे ला सामोरे कसे जायचे त्याचे उत्तर मी वर दिले. दुसरा भाग आहे तुम्ही हातातले काम सोडून सिंथ वाजवायचे म्हणता तो. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हातातले काम सोडून सिंथ वाजवणे विक्षिप्तपणा म्हणावा लागेल. हा स्वच्छंदपणा तुम्हाला अभिप्रेत असेल तर आपल्या दोघांच्या बेसिक समजुतीत जमिन आसमान फरक आहे असं वाटतंय. कामाची जबाबदारी हे प्रत्येकवेळी कम्पल्शन नसतं. योग्य-अयोग्य काय हेही ठरवावं लागतंच. उदा. मोटरमनने लोकल चालवता चालवता अचानक, आता मी बासरी वाजवणार असे म्हटले तर तो स्वच्छंदीपणा नव्हे, विक्षिप्तपणा ठरेल. पण त्याचे मूळ पॅशन बासरी वाजवणेच असेल तर मोटरमन ही नोकरीच तो स्विकारणार नाही, बासरीतूनच किंवा जिथे त्याच्या स्वच्छंदीपणात कमाईचे माध्यम आडवे येणार नाही असे व्यवसाय निवडेल.. त्याला मी स्वच्छंद म्हणेल... पण अंतःप्रेरणा सतत बासरी वाजवण्याकडे खेचत असेल आणि मोटरमनचे काम मन मारुन करत असेल तर सगळं आयुष्य बिघडलं असे म्हणता येईल... `स्वेच्छेनं केलेल्या कामात स्वच्छंद आहे' हे बरोबरच आहे. पण त्याचे इन्टरप्रिटेशन माझ्यासाठी वेगळे आहे. तुमच्यासाठी वेगळे आहे असे दिसते.

In reply to by संदीप डांगे

दोघांच्या बेसिक समजुतीत जमिन आसमान फरक आहे असं वाटतंय.
हेच असण्याची शक्यता जास्त आहे. मीही तिथेच येऊन थांबलो दुसऱ्या धाग्यावर! :) एकसुरी वर्किंग डेला सामोरं जाण्यापेक्षा वर्किंग डे एकसुरीच न होऊ देणे म्हणजे स्वछंद नव्हे का? येणारा प्रत्येक क्षण (जसा येतोय तसा) एन्जॉय करणे म्हणजे स्वछंदी असणे असं माझं मत आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

स्वतःला काही प्रश्न विचारुन पाहा : १) सकाळी उठल्यावर कामाला जाण्याव्यतिरिक्त आपल्याला कायकाय पर्याय उपलब्ध असतात ? २) ९ ते ५ मधे आपण काय स्वच्छंद पुरवू शकतो ? ३) आपण भूक लागल्यावर जेवतो की लंच टाईम झाला म्हणून जेवतो ? ४) समजा पगार मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली तर आपण सध्या ज्या खुर्चीत ९ ते ५ बसतो तिथे बसून समोर येणारं काम आनंदानं करु का ? ५) सकाळी घड्याळाचा विधीनिषेध न बाळगता आपण मनसोक्त झोपू शकतो का ?

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 13/02/2017 - 19:19
संक्षि, पण तुम्ही 'काम करणे' ह्याचा एवढा का बाऊ करत आहात? अर्थार्जनासाठी काम करणे, नोकरी करणे हे निरस, लादलेलं, मनाविरुद्ध, बळजबरी असे का मानत आहात?

In reply to by संदीप डांगे

मी स्वेच्छेनं काम करण्यात आनंद आहे असं म्हणतोयं ! बाय द वे, ज्या प्रतिसादाला तुम्ही उपप्रतिसाद दिला आहे त्याबद्दल काय म्हणणंय ?

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 13/02/2017 - 20:20
मीही तेच विचारतोय तर.. स्वेच्छेने काम करणे म्हणजे क्लायंट समोर बसला असतांना हातात काम चालू असतांना, मलाही 'तेव्हा' तेच करायचे असतांना सिंथ वाजवू शकता काय असा प्रश्न विचारणे हा नक्की काय प्रकार आहे? आनंद विचाराल तर, तो तर सब्जेक्टीव आहे. चला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देतो. १) सकाळी उठल्यावर कामाला जाण्याव्यतिरिक्त आपल्याला कायकाय पर्याय उपलब्ध असतात ? >> माझ्याकडे काहीच पर्याय नसतात, अगदी काम करण्याचाही पर्याय नसतो. ते मीच ठरवतो की कोणते काम कधी करायचे ते, कोणते टाळायचे, माझ्या इच्छेवर आहे. २) ९ ते ५ मधे आपण काय स्वच्छंद पुरवू शकतो ? >> मी ९ ते ५ मध्ये स्वतःला बांधून घेतले नाही, ते जमले नाही कधीच. म्हणून नोकरी करत नाही. ३) आपण भूक लागल्यावर जेवतो की लंच टाईम झाला म्हणून जेवतो ? >> भूक लागल्यावर जेवतो. लंच टाईम वगैरे प्रकार नसतो माझ्याकडे. तरी २ वाजेच्या आत जेवूनच घेतो अन्यथा डोकं गरगरायला लागतं, त्यानंतर कितीही जेवलं तरी ते गरगरणं संध्याकाळपर्यंत पुरतं.. :-) ४) समजा पगार मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली तर आपण सध्या ज्या खुर्चीत ९ ते ५ बसतो तिथे बसून समोर येणारं काम आनंदानं करु का ? >> मी नोकरी करत नाही, व्यवसाय करतो. गेले चार वर्ष 'रोज' अशाच दणदणीत अशक्यतेवर जगत आहे. प्रचंड कर्ज आहे डोक्यावर, स्वतःचे घर नाही अजून, भाड्याच्या घरात राहतो, माझ्यासकट दोन मुलं, एक बायको यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे अंगावर, कोणतीही वडिलोपार्जित इस्टेट नाही, दुसरीकडून कोणतेही इन्कम नाही. तरी येणारी कामे निवडून घेतो, मला करावंसं वाटते त्याच क्लायंट चे काम करतो, मला पाहिजे तितकेच पैसे मिळत असतील तर काम करतो, कधी लॉटरी लागते, कधी उपाशी राहावे लागते. तरी जी कामे करतो ती आनंदानेच करतो, कारण ते काम समोर येण्याआधी त्यातला आनंद मारु शकेल अशा सर्व शक्यता आधीच बाद करुन टाकलेल्या असतात. त्यामुळे माझं प्रत्येक काम क्लायंटलाही आनंद-समाधान देतं. कारण मी माझ्या कामात जीव ओतलेला असतो. ५) सकाळी घड्याळाचा विधीनिषेध न बाळगता आपण मनसोक्त झोपू शकतो का ? >> हो... रात्री-बेरात्री कधीही जागत राहत असतो. इथे तुमच्या खालोखाल वेळी-अवेळी मिपावर प्रतिसाद टायपत असतो, भरपूर वाचत असतो, भटकत असतो, भरपूर कामही करत असतो. माझ्यावर अशा जबाबदार्‍यांचा डोंगर असतांनाही मनसोक्त कामे-नोकर्‍या बदलल्या-सोडल्या आहेत, कधी कधी पैशाचा फार विचार न करता कामे केलेली आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात फक्त 'आवडलं' म्हणून नवनवीन शिकून घेऊन, झोकून देऊन कामं केली आहेत. मला असं जगायला आवडतं. ह्याने फार मोठे इमले उभे राहणार नाहीत कदाचित, मी अब्जाधिशही होणार नाही कदाचित कधी, वर्ल्डफेमसही होणार नाही. स्वच्छंद जगून किंवा दिवसरात्र कामाला जुंपूनच लोक भिकारी किंवा अब्जाधिश होतात असे काही कुठे आढळले नाही. जीवन कसे जगायचे याचे कोणतेही दगडी नियम मला माहित नाहीत, कोणी असे नियम बनवत असेल तर मला जमत नाहीत... याला तुम्ही स्वच्छंद म्हणा की कसेही, वॉटेवर! व्यवसायाच्या, काम करण्याच्या बाबतीत किशोरकुमार माझा आदर्श आहे. आणि तेच योग्य आहे असे मला वाटते.

In reply to by संदीप डांगे

आनंद विचाराल तर, तो तर सब्जेक्टीव आहे ? आनंद आणि स्वच्छंद या सर्वासाठी एकच गोष्टी आहेत. स्वेच्छेनं काम करणं हाच आनंद आहे. अगदी काम करण्याचाही पर्याय नसतो. ते मीच ठरवतो की कोणते काम कधी करायचे ते, कोणते टाळायचे, माझ्या इच्छेवर आहे. तुम्ही पुन्हा कामाविषयीच बोलतांय ! मी विचारलंय 'कामाला जाण्याव्यतिरिक्त आपल्याला कायकाय पर्याय उपलब्ध असतात ?' मी ९ ते ५ मध्ये स्वतःला बांधून घेतले नाही, ते जमले नाही कधीच. म्हणून नोकरी करत नाही. तुम्ही प्रश्न नीट वाचलेला दिसत नाही. मी विचारलंय ` ९ ते ५ मधे आपण काय स्वच्छंद पुरवू शकतो ?' भूक लागल्यावर जेवतो. छान ! चला एकतरी नैसर्गिक गोष्ट रुटीनला डिफीट करणारी आहे. त्यामुळे माझं प्रत्येक काम क्लायंटलाही आनंद-समाधान देतं. कारण मी माझ्या कामात जीव ओतलेला यालाच मी स्वेच्छेनं काम करणं म्हणतो ! आणि अशाच कामात आनंद मिळू शकतो. तुम्हाला मूळ मुद्दा समजलायं असं गृहित धरतो. लगे रहो ! हो... रात्री-बेरात्री कधीही जागत राहत असतो. इथे तुमच्या खालोखाल वेळी-अवेळी मिपावर प्रतिसाद टायपत असतो, सहमत आहे. गेले चार वर्ष 'रोज' अशाच दणदणीत अशक्यतेवर जगत आहे. प्रचंड कर्ज आहे डोक्यावर,... इथे थोडा (आणि खरं तर बराच मोठा) फरक आहे. कायम अनिश्चिततेत जगणं यालाच `लिव डेंजरसली' म्हणतात. आयुष्यात कधीही कर्ज न घेतल्यामुळे काम आणि अर्थाजन या नेहमी दुय्यम गोष्टी आहेत. यावरनं बहुदा तुम्हाला स्वच्छंदाचा आवाका लक्षात येऊ शकेल. जीवन कसे जगायचे याचे कोणतेही दगडी नियम मला माहित नाहीत, कोणी असे नियम बनवत असेल तर मला जमत नाहीत... याला तुम्ही स्वच्छंद म्हणा की कसेही, वॉटेवर! स्वच्छंद हा दगडी नियम नाही. ते स्वेच्छेनं जगण्याचं साहस आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 13/02/2017 - 21:57
तुम्ही पुन्हा कामाविषयीच बोलतांय ! मी विचारलंय 'कामाला जाण्याव्यतिरिक्त आपल्याला कायकाय पर्याय उपलब्ध असतात ?
>> मी कामाविषयी नाही माझ्या पर्याय निवडण्याच्या स्वातंत्र्याबद्दल बोललोय. 'काय काय पर्याय असतात' असे विचारणे माझ्या मते माझ्या स्वातंत्र्याला मर्यादित करण्यासारखे आहे. काम करण्याव्यतिरिक्तही अनेक पर्याय असतातच की... अगदी काम न करण्याचाही पर्याय असतो. मुलांशी खेळणे, घरची कामे करणे (उत्सव-सोहळा वगैरे) इ. इ.
तुम्ही प्रश्न नीट वाचलेला दिसत नाही. मी विचारलंय ` ९ ते ५ मधे आपण काय स्वच्छंद पुरवू शकतो ?'
>> हाही परत स्वातंत्र्याला मर्यादित करणारा प्रश्न नाही काय? मला वाटलं तर मी मिपावर मेगाबायटी चर्चा करतो, बासरी वाजवतो, गाणी म्हणतो, रेकॉर्ड करतो, वेगवेगळ्या व्यवसायांवर माहिती गोळा करणे हाही छंद आहे माझा, अनेक आयडियाज वर काम करत असतो, त्याचं नीट डॉक्युमेन्टेशन करत असतो, त्यांचं ब्रॅन्डिंग-मार्केटींग प्लान करत असतो, असली कामे मला पैसे मिळावेत म्हणुन नसतात, आनंद म्हणून करतो. आणि ह्या सर्व गोष्टी करण्यात मला मुळातच ९-५ हा अडसर नाहीच. त्यामुळे प्रश्न गैरलागू आहे.
आयुष्यात कधीही कर्ज न घेतल्यामुळे काम आणि अर्थाजन या नेहमी दुय्यम गोष्टी आहेत.
>> इथं गंडतंय तुमचं तत्त्वज्ञान संक्षि, कर्ज न घेतल्यामुळे काम आणि अर्थार्जन ह्या दुय्यम गोष्टी आहेत असं म्हणताय, कर्ज असते तर कदाचित दुय्यम नसत्या. (तुम्ही इथे इफ-देन वापरत आहात. स्वच्छंदात असं चालत नाही. तिथे सगळे इफ-देन-बट-अल्सो गळून पडतात. तिथे फक्त तुम्ही असता, इतर जर-तर ला काही थारा नसतो.) आणी मी म्हणतोय की कर्ज असूनही काम आणि अर्थार्जन दुय्यम गोष्टी आहेत. म्हणजे खरेतर कर्ज असले काय किंवा नसले काय कोणत्या गोष्टींना काय प्रायोरिटी द्यावी हे स्वतःवर ठरलं पाहिजे हेच ना? म्हणजेच आनंद, स्वच्छंद हा कोण काय काम करतोय, किती कमवतोय, किती कर्ज आहे, श्रीमंत आहे, गरिब आहे, नोकरदार आहे, व्यवसायिक आहे यावर अवलंबून नसतो.
स्वच्छंद हा दगडी नियम नाही. ते स्वेच्छेनं जगण्याचं साहस आहे.
>> स्वच्छंदीपणाला दगडी म्हणालो नाही, असो. आणि माझ्यासाठी ते साहस वगैरे काही नाही. इट्स जस्ट वे ऑफ माय लाइफ. मी ठरवून तसा जगत नाही. तो माझा स्वभाव आहे. त्याच्या बाहेर गेलं की कोंडल्यासारखं होतं मला... बाकी ओके... बाकी माझेही काही प्रश्न. १. तुम्ही काम करण्याचे पैसे घेता का? २. तुम्हाला सि-एचे काम करण्यातून आनंद मिळतो का? ३. आनंद मिळतो आणि तुम्हाला पैशांची गरज नाही तर मग त्या कामाचे पैसे का घेता?

In reply to by संदीप डांगे

कर्ज असूनही काम आणि अर्थार्जनाला पार करतो हे बघून नवल वाटलं . निदान माझ्या तरी पाहाण्यात तुम्ही प्रथमच आहात कारण कर्ज डोक्यावर असलेले माझ्या पाहाण्यातले लोक कर्ज केंव्हांना केंव्हा फिटेल अशा दैववादावर भरोसा ठेवून असतात. तुम्ही तसे नसाल अशी आशा आहे पण तुमचे प्रश्न मात्र चमत्कारिक आहेत. १. तुम्ही काम करण्याचे पैसे घेता का? अर्थात ! कामाचा मोबदला हा व्यावहार आहे. २. तुम्हाला सि-एचे काम करण्यातून आनंद मिळतो का? अर्थात. ज्या कामात आनंद नाही ते मी करतच नाही. ३. आनंद मिळतो आणि तुम्हाला पैशांची गरज नाही तर मग त्या कामाचे पैसे का घेता? मला पैश्याची गरज नाही हा शोध तुम्ही कसा लावला ? आनंदाचं काम स्वेच्छेनं करुन त्यातनं पैसे मिळवणं हा माझा आनंद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 14/02/2017 - 00:08
निदान माझ्या तरी पाहाण्यात तुम्ही प्रथमच आहात >> निश्चितच! मला यावर पूर्ण विश्वास आहे.
कारण कर्ज डोक्यावर असलेले माझ्या पाहाण्यातले लोक कर्ज केंव्हांना केंव्हा फिटेल अशा दैववादावर भरोसा ठेवून असतात. तुम्ही तसे नसाल अशी आशा आहे
>>कर्ज दैववादामुळे आलं नाही, सो फिटणे दैववादावर अवलंबून नाही, ते फिटणे सर्वस्वी माझ्यावरच आहे. आणि ते केव्हा फिटेल ह्या बद्दल कशावरही भरोसा वगैरे ठेवून भविष्यावर ढकलणे जमले नाही. मी आशावादी आहे पण दैववादी नाही. उत्तरांसाठी धन्यवाद!
मला पैश्याची गरज नाही हा शोध तुम्ही कसा लावला ? आनंदाचं काम स्वेच्छेनं करुन त्यातनं पैसे मिळवणं हा माझा आनंद आहे.
>> असेच इतरांचेही असू शकते हे तरी मान्य आहे की नाही? पैश्याची गरज ही मूलभूत आहे. बाकी सगळा लेबलांचा पसारा आहे. जितक्या व्यक्ती तितकी लेबलं. (बाकी काही लोक ज्यात-त्यात करवादत असतात ते अपवाद समजूया)

संदीप डांगे 13/02/2017 - 14:07
अभिजीत यांचा मूळ प्रश्न आहे की त्यांना निरनिराळ्या ठिकाणी भटकायला व फोटो काढायला खूप आवडते, पण त्यासाठी फक्त सुट्टीच्या दिवशी वेळ काढू शकतो. अन्यथा नोकरी सोडावी लागेल. असे असेल तर भटकणे-फोटोग्राफी ही आवड, छंद, पॅशन की व्यसन हे आधी ठरवायला लागेल. आपल्याला असलेला कोणताही छंद, कोणतीही आवड रोज उठून करायला लागलो तर कायम स्वरुपी आवडेल काय हे कोणीही स्वतःला विचारावे. ते उत्तर हो असेल तर नक्कीच नोकरी सोडणे योग्य. क्रमशः

In reply to by संदीप डांगे

मी पाहिल्यापास्नं एकच म्हणतोय, तुम्ही स्वतःला काम आणि पैसा यापेक्षा श्रेष्ठ समजत असाल तरच स्वेच्छेनं काम करण्याचा विकल्प उपलब्ध होतो. आणि स्वेच्छेनं केलेल्या कामाशिवाय स्वच्छंद अशक्य आहे . आता या गोष्टी तुमच्या जीवनात कशा आणायच्या तो तुमचा प्रश्र आहे पण लिहीलंय ते निर्विवाद आहे. समाप्त .

In reply to by संजय क्षीरसागर

मोदक 13/02/2017 - 15:22
बाकी सगळे ठीक आहे.. पण "लिहीलंय ते निर्विवाद आहे." हे तुम्हीच लिहुन स्वतःच्या लिखाणाला स्वत:च का सर्टिफिकेट देताय..? वाचकांना तसे बोलुदे की.

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी योगायोगाने तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे. पण समजा तुम्हीसुद्धा आमच्या सारखे एक नोकरदार असता तर? तुम्ही सतत ९-५ च्या बंधनाचे उदाहरण देत आहात. पण मुळात अर्थार्जनासाठी मेजोरिटी जनता नोकरीच करते. त्यांनी काय करायचे? असे ९-५ ऑफिसला जावेच लागणे मुळात स्वच्छंदी होण्याच्या आड येत असेल, तर मग नोकरदार माणुस कधीच स्वच्छंदी होणार नाही का?

In reply to by पिलीयन रायडर

याचं उत्तर इथे दिलंय . .....आता त्या तुम्हाला पटणं आणि स्वतः च्या आयुष्यात उतरवणं तुमची जवाबदारी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

हे बघा. तुमचा मुद्दा अगदी साधा आहे आणी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या तत्वज्ञानात आजवर अनेकदा ऐकण्यात आलेला आहे. आजचा हा क्षण महत्वाचा. त्याचं भान असावं, त्यात समरसुन जगावं. ज्यावर आपली सत्ता नाही अशा कोणत्यातरी भविष्यकाळात मी समरसुन जगेन असं म्हणण्याला अर्थ नाही. हे सांगणारे किंवा जगणारे तुम्ही पहिले नाही आणि हे सगळं तत्वज्ञान कुणीच नाकारतही नाही. प्रश्न असा आहे की हे मी मान्य केलं आणि त्याप्रमाणे जगायला सुरुवात केली तरीही नोकरी करणार्‍या माणसाला मनात आलं म्हणुन काम सोडुन बागेत जाऊन बसता येत नाही. किंवा आज बुधवार आहे, अमुक चार कामं मी करुन देणं अपेक्षित आहे, पण मी स्वच्छंदी आहे म्हणुन मी आज ते करणार नाही हे म्हणण्यालाही काही अर्थ नाही. त्यामुळे माणुस अगदी स्वच्छंदी पण नोकरदार असेल तर आपण विचारलेले खालील प्रश्न गैरलागु आहेत. १) सकाळी उठल्यावर कामाला जाण्याव्यतिरिक्त आपल्याला कायकाय पर्याय उपलब्ध असतात ? - व्यावसायिकांना भरपुर असतील पण नोकरदारांना फारसा नसतो. २) ९ ते ५ मधे आपण काय स्वच्छंद पुरवू शकतो ? - मी कंपनी सोबत करार केला आहे, मला ते काम करुन देणं आवश्यक आहे. ३) आपण भूक लागल्यावर जेवतो की लंच टाईम झाला म्हणून जेवतो ? - भुक लागली की कारण मी तरी अशा ठिकाणी काम करत नव्हते जिथे लंच टाईममध्येच जेवावं लागत होतं. पण अनेक लोक अशा नोकर्‍या करतात. त्यांना कितीही स्वच्छंद रहायचं म्हणलं तरी त्याच वेळेला जेवावं लागतं. ४) समजा पगार मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली तर आपण सध्या ज्या खुर्चीत ९ ते ५ बसतो तिथे बसून समोर येणारं काम आनंदानं करु का ? - तुम्ही तरी पोटापाण्यासाठीच सीए आहात ना? केवळ आनंदासाठी असाल तर मी एक छदामही दिला नाही तरी तुम्ही माझे काम करुन द्याल का? ५) सकाळी घड्याळाचा विधीनिषेध न बाळगता आपण मनसोक्त झोपू शकतो का ? - पुन्हा एकदा, मी स्वच्छंद असले तरी माझा करार आहे कंपनी सोबत. मला जावंच लागेल. संक्षी, स्वच्छंद असणं आणि ९-५ नोकरी करणं म्युचअली एक्स्ल्युझीव्ह नाहीत. ९-५ नोकरी करणारा, सायरनच्या आवाजासरशी जेवायला जाणारा, आणि पैशासाठी नोकरी करणारा माणुसही अत्यंत आनंदी आणि समरसुन जगणारा असु शकतोच. माझ्यामते तुम्हाच्याकडे अबोव्ह अ‍ॅव्हरेज बुद्धिमत्ता आणि पैसा आहे म्हणुन तुम्हाला बहुसंख्य सामान्यांचे प्रश्न लक्षात येत नाहीत.

In reply to by पिलीयन रायडर

सायरनच्या आवाजासरशी जेवायला जाणारा, आणि पैशासाठी नोकरी करणारा माणुसही अत्यंत आनंदी आणि समरसुन जगणारा असु शकतोच. मग चर्चा कशासाठी चाललीये ? माझ्यामते तुम्हाच्याकडे अबोव्ह अ‍ॅव्हरेज बुद्धिमत्ता आणि पैसा आहे म्हणुन तुम्हाला बहुसंख्य सामान्यांचे प्रश्न लक्षात येत नाहीत. अजिबात नाही ! स्वच्छंद जगायला साहस लागतं आणि एकदा मनसोक्त जगायला लागलं की समोर येणार्‍या प्रश्नाची उत्तरं लगोलग मिळतात. ते प्रश्न राहात नाहीत, तो चॅलेंज होतो. स्वतः चा बचाव करत राहाणारी व्यक्ती फक्त साहस न करण्यासाठी कायम कारणं शोधत राहाते.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हीच तर ९-५ वाल्यांवर प्रश्न उपस्थित करताय. की बाबांनो तुम्हाला वाट्टेल तेव्हा उठता येतं का? वाट्टेल तितकं उशीरा जागता येतं का? वगैरे वगैरे.. म्हणुन चर्चा चालली आहे. असो... मी थांबते... धन्यवाद!

In reply to by पिलीयन रायडर

पण ९ ते ५ चा विषय कशामुळे निघाला ते पाहा, म्हणजे तुमचा परत हिणवणं वगैरे गैरसमज व्हायला नको. एकसुरी वर्किंग डेला सामोरं जाण्यापेक्षा वर्किंग डे एकसुरीच न होऊ देणे म्हणजे स्वछंद नव्हे का? याचा अर्थ हप्रनां ९ ते ५ एकदम स्वच्छंदी करता आलंय असा त्यांचा दावा होता, म्हणून स्वच्छंदाच्या डिटेल्स मागितल्या इतकंच.

In reply to by संजय क्षीरसागर

हप्र म्हणत आहेत की नोकरी असुनही स्वच्छंद होता येईल, आहे तो दिवस आनंदानी जगता येईल. तर तुम्ही त्याला वरचे प्रश्न विचारुन काऊंटर केलंत की ९-५च्या बंधनात अडकुन ते शक्य नाही. म्हणुन मी तुम्हाला काऊंटर केलं की असं बंधन असणं आणि तरीही स्वच्छंदी असणं शक्य आहे (जे की हप्र सुद्धा म्हणत आहेत). तर तुम्ही म्हणताय की मग चर्चा का करतोय आपण? हो किंवा नाही मध्ये एका प्रश्नाचं उत्तर दिलंत तर हा मुद्दा निकाली लागेल. ९-५ नोकरी करणारा मनुष्य स्वच्छंदी होऊ शकतो का?

In reply to by पिलीयन रायडर

असा दुहेरी खेळ चालवलायं. स्वच्छंदीपणाच्या मुळात अशा व्याख्या असणं हेच किती बोरिंग आहे... स्वेच्छेनं काम करणं ही कल्पना तुम्हाला बोरींग वाटते ना ? तद्वत ९ ते ५ मधे माणूस स्वेच्छेनं जगतो ही कल्पना मला हास्यास्पद वाटते.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 14/02/2017 - 01:07
अहो, त्याची काही आखीव रेखीव 'संक्षिकृत' व्याख्या असणं बोअरींग वाटते असे म्हणल्या त्या.. तुमच्या मूळ कल्पनेला त्यांचा पाठिंबाच आहे असे दिसतंय.. (सॉरी, मध्येच टपकतोय...)

In reply to by संदीप डांगे

आता इतकं समजुन घेतलं दुसर्‍याचं तर त्यांना संक्षी का म्हणावं!! संक्षी, रात्री बेरात्री जागुन शकणारा, सकाळी वाट्टेल तेवढा झोपु शकणारा, ९-५ मध्ये न अडकलेला... असल्या व्याख्या तुम्ही करताय. त्या मला पटत नाहीत, असो.. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कधी देणार? हो किंवा नाही मध्ये...

In reply to by संजय क्षीरसागर

स्वेच्छेनं काम करणं ही कल्पना तुम्हाला बोरींग वाटते ना ?
नीट वाचत चला हो.
तद्वत ९ ते ५ मधे माणूस स्वेच्छेनं जगतो ही कल्पना मला हास्यास्पद वाटते.
म्हणजे उत्तर "नाही" आहे तर. एकंदरित स्वच्छंदी होऊन जगायला व्यवसायच केला पाहिजे, कारण नोकरी करणारा माणुस ९-५ मध्ये अडकल्याने स्वच्छंदी होऊ शकत नाही. तुमच्या स्वच्छंदीपणाच्या कल्पना तुमच्यापुरत्याच बरोबर आहेत. जमल्यास इतरांना त्याच तराजुत तोलु नका. लोक तुम्हाला जे सतत सांगतात की तुम्ही दुसर्‍यांना हिणवता किंवा मुर्खात काढता.. ते हेच.

In reply to by पिलीयन रायडर

माझ्या मते जगता येत नाही कारण सगळा फोकस फक्त कामावरच ठेवावा लागतो इतका साधा मुद्दा आहे. यात मूर्खलेखण्याचा संबंध कुठे आला ? तस्मात, तुम्ही आनंदात असाल तर मला दु:ख होण्याचं काही कारण नाही. स्वछंद जगता येत नाही म्हणजे मूर्ख आणि म्हणून स्वतःला मूर्ख समजणं हा तुम्ही स्वतःपुरता काढलेला निष्कर्श आहे. अर्थात, नोकरदारांनाही स्वच्छंद कसं जगता येईल याच्या ब्रॉड हिंटस मी अभिजीतला वर दिल्या आहेत. मला कुणालाही कमी लेखण्यात रस नाही. तुम्हाला स्वतःला कमी लेखून इतरांची सहानुभूती मिळवायची असेल तर तो तुमचा दृष्टीकोन आहे. मला प्रश्न सोडवण्यात रस आहे. पण इथे काही विद्वान सदस्यांनी अध्यात्माच्या लेखांवर इतकी विद्वत्तापूर्ण शेरेबाजी केली आहे की आता त्या विषयावर लिहीणे नाही. आणि अध्यात्मिक आकलनच व्यक्तीत साहस निर्माण करु शकतं हा अनुभव आहे. पण आता ती संधी येणे नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

पण मी काय म्हणतो, ह्या एवढ्या गहन चर्चेनंतर मला एक प्रश्न पडला आहे. स्वछंदीपणा आणि लहरीपणा यातला फरक काय मग? मला वाटेल तेव्हा आणि लहर आली की लहर पूर्ण करणे म्हणजे लहरीपणा असंच मी आतापर्यंत समजत आलोय.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आणि लहरीपणा म्हणजे कामाच्याबाबतीतली अनास्था. लहरी माणसाची कामं पेंडींग राहातात, त्याच्यावर भरोसा टाकता येत नाही. स्वेच्छेनं काम करणारा एकदा जवाबदारी घेतल्यावर काम पूर्ण करतोच आणि तेही वेळेत. स्वेच्छेनं काम करणारा जर मनात नसेल तर काम नाकारेल, लहरी माणूस काम घेईल आणि मग नंतर गोंधळ घालून ठेवेल. थोडक्यात, लहरीपणा बेजवबदार असतो आणि स्वच्छंदी कायम जवाबदारीनं वागतो.

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे 13/02/2017 - 20:37
एग्झॅक्टली! मी ह्याच प्रश्नावर येणार होतो आता... पण त्यावरही त्यांच्याकडे उत्तर असेल हे माहित आहे म्हणून विचारला नाही. वर माझ्या प्रतिसादात त्या प्रश्नाचे उत्तर आहे. "स्वच्छंद असतो तर नोकरी सोडून व्यवसायिकच झालो असतो". पण मेजॉरिटीला देण्यासारखे उत्तर पर्सनल अनुभवांवरुन देता येत नसते हे मला ठावूक आहे. मला वाटते संक्षिंनी जो नोकरदारांचा सॅम्पल जमवला आहे ज्यावरुन ते आपले निरिक्षण मांडत आहेत, ते संक्षिंकडे फार करवादत असावेत... सगळं आलबेल असतांना उगाच करवादणे हाही काहींचा गुण असतो. त्यातून संक्षिंना आपले व्यवसायिक असल्याने मुक्त असणे खूप भावले असावे. अवांतरः (प्रश्न संक्षिंच्या रोखाने अजिबात नाही हे आधीच नमूद करतो) फार दिवसांपासून मनात एक कुतूहल आहे. मला इथल्या सी-ए लोकांना प्रश्न विचारायचा आहे की बेरोजगार सि-ए, किंवा कमाई करण्यास असमर्थ सी-ए अशी काही परिस्थिती असते काय? म्हणजे आधीच सी-ए लोक इतक्या तगड्या परिक्षेतून तावून सुलाखून पास होत असतात, त्यांना वकिल-डॉक्टर-इंजिनियर-आर्किटेक्ट यांच्यासारखी सनद मिळत असली तरी पास-आउट्सची संख्या मर्यादित असल्याने इतर सनदधारी व्यवसायिकांसारखे संख्यात्मक स्पर्धेला सामोरे जावे लागत नसावे असे वाटते. त्यामुळे कामच मिळत नाही, उपाशी राहायची पाळी आली, सी-ए होऊन फायदा नाही झाला असे होत नसावे. असे काही असते काय? कृपया मार्गदर्शन करावे. म्हणजे आमच्या व्यवसायात तुम्ही कुठून डिग्री घेतली, काय शिकलात ह्याला परफॉर्मन्स पुढे महत्त्व नसते त्यामुळे स्पर्धा भरपूर असते, त्यात लग्जरी व्यवसाय, आले क्लायंटच्या मना तर काम, तर पैसे, तर सगळी मज्जा. तसे सी-एच्या व्यवसायात नसते ना? कम्पलसरी टॅक्सेस भरावेच लागतात. सी-एशिवाय काम होत नाहीच. वगैरे वगैरे.

In reply to by संदीप डांगे

पण मेजॉरिटीला देण्यासारखे उत्तर पर्सनल अनुभवांवरुन देता येत नसते? साहस हे सर्वांसाठी एकच आहे. तुम्ही नोकरीत करता की धंद्यात यानं त्यात फरक पडत नाही. पण साहसाशिवाय स्वच्छंद नाही हे तितकंच नक्की. त्यामुळे कामच मिळत नाही, उपाशी राहायची पाळी आली, सी-ए होऊन फायदा नाही झाला असे होत नसावे. असे काही असते काय? उपाशी राहाण्याचा नाही, कामाच्या स्टाईलचा प्रश्न आहे. माझे सर्वच्या सर्व मित्र अजूनही स्वतःच्या ऑफिसमधे नोकरी केल्यासारखं काम करतात. कारण त्यांना स्टाफसमोर कामसू इमेज राखायची असते. शिवाय क्लायंटचा दट्ट्या असतोच, म्हणजे कामच्या वेळेत हा पिक्चरला गेला तरी ट्रिब्यूनला जातोयं असंच सांगातो. शिवाय सगळा व्यावसाय हा सरकारची मनमानी आणि क्लायंटची टॅक्स भरण्याविषयी नाराजी यातला खेळ आहे, जो इतर कोणत्याही व्यावसायात नाही. थोडक्यात क्वालिफीकेशन आणि स्वच्छंद जगणं यांचा डायरेक्ट संबंध नाही. झाडू मारणारा सुद्धा मनसोक्त जगू शकतो आणि मोस्ट क्वालिइफाइड सुद्धा , बाहेर पडून काही करता येणार नाही म्हणून कॉलेजात छपरी विषय आयुष्यभर शिकवू शकतो.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 13/02/2017 - 22:25
झाडू मारणारा सुद्धा मनसोक्त जगू शकतो आणि मोस्ट क्वालिइफाइड सुद्धा , बाहेर पडून काही करता येणार नाही म्हणून कॉलेजात छपरी विषय आयुष्यभर शिकवू शकतो.
मी तरी अजून वेगळे काय म्हणतोय. झाडू मारणारा कदाचित आळशी असू शकेल, किंवा कॉलेजात छ्परी विषय शिकवण्याची नोकरी पत्करणारे कदाचित त्यांच्या स्वच्छंदाच्या कक्षेतून बघत असतील. आपण कोण आहोत कोणाला जज करणारे? नाही का?

In reply to by संदीप डांगे

तुम्ही हे म्हणतायं ! मला वाटते संक्षिंनी जो नोकरदारांचा सॅम्पल जमवला आहे ज्यावरुन ते आपले निरिक्षण मांडत आहेत, ते संक्षिंकडे फार करवादत असावेत... सगळं आलबेल असतांना उगाच करवादणे हाही काहींचा गुण असतो. त्यातून संक्षिंना आपले व्यवसायिक असल्याने मुक्त असणे खूप भावले असावे. आणि आता मूळ विषय सोडून उगीच असा आपण कोण आहोत कोणाला जज करणारे? नाही का? सेंटी मारतायं. मी कुणालाही जज कलेलं नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आणि सीए व्यावसायाची गोष्ट काढलीये म्हणून सांगतो. ऐकून भल्याभल्यानां फेफरं येईल. व्यावसायिक सिएला ऑलमोस्ट सगळ्या क्लायंटसचं काम वर्षभर करायला लागतं आणि पैसे वर्षातून फक्त एकदाच, म्हणजे रिटर्न भरल्यावर मिळतात. त्यामुळे तुम्ही उगीच मी म्हणतोयं तेच म्हणतायंत वगैरे गैरसमज करुन घेऊ नका.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 13/02/2017 - 23:37
मी काहीही सेन्टी मारलं नाहीहो! तुमच्या काही घट्ट समजुती वाटल्या म्हणून.. कोणीही स्वच्छंदी जगू शकतो, अगदी कोणीही. मग तसंच जगतोय असं कोणीतरी सांगितलं तरी तुम्ही मात्र आपले मत सोडलेले नाही असे क्रेडिटकार्डच्या धाग्यावरच्या चर्चेत दिसलं. तिथेही आप्ण कर्ज असेल तर माणूस स्वच्छंदी (म्हणजे तुमच्यासारखा) जगूच शकत नाही हेच सांगत होतात ना? आता मात्र झाडूवाला, प्रोफेसर अशी जेनेरिक उदाहरणे देऊन स्वच्छंदीपणाला कोणतीही अट नसते हे सांगत आहात. नेमकं काय खरं समजायचं असं झालंय मला. म्हणजे कोणी नोकरदार स्वतः तुम्हाला सांगतोय तरी म्हणताय त्याला स्वच्छंदी जगणे शक्यच नाही, आणि स्वतःचा आता म्हणताय की कोणालाही शक्य आहे.
व्यावसायिक सिएला ऑलमोस्ट सगळ्या क्लायंटसचं काम वर्षभर करायला लागतं आणि पैसे वर्षातून फक्त एकदाच, म्हणजे रिटर्न भरल्यावर मिळतात. त्यामुळे तुम्ही उगीच मी म्हणतोयं तेच म्हणतायंत वगैरे गैरसमज करुन घेऊ नका.
>> म्हणजे? वर्षातून एकदाच मिळतात म्हणजे? त्यात फेफरं येण्यासारखं नक्की काय आहे ते समजलं नाही. जरा विस्तार कराल काय...

In reply to by संदीप डांगे

तिथेही आप्ण कर्ज असेल तर माणूस स्वच्छंदी (म्हणजे तुमच्यासारखा) जगूच शकत नाही हेच सांगत होतात ना? तिथे तुम्ही या विचाराशी सहमत होतात, हे पाहा : इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे. >> अगदी सहमत. माझे तर मत असे आहे की इएमआय ही आधुनिक व्हाईटकॉलर वेठबिगारी आहे. असो. हे माझे वैयक्तिक मत आहे. आता मात्र झाडूवाला, प्रोफेसर अशी जेनेरिक उदाहरणे देऊन स्वच्छंदीपणाला कोणतीही अट नसते हे सांगत आहात. संदर्भ नीट वाचलात तर गोंधळ उडणार नाही. ते मी स्वच्छंद आणि क्वालिफिकेशन या तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलंय. त्यावर मी ठाम आहेच. म्हणजे? वर्षातून एकदाच मिळतात म्हणजे? त्यात फेफरं येण्यासारखं नक्की काय आहे ते समजलं नाही. जरा विस्तार कराल काय... नोकरदाराला जसा महिन्याला पगार मिळतो किंवा इतर व्यावसायात जसं सतत काम आणि पैसे हे चक्र चालू असतं तसं व्यावसायिक सीएच्या प्रोफेशनमधे नसतं. वर्षभर क्लायंट सपोर्ट द्यावा लागतो आणि त्याचं बिलींग इन्कमटॅक्स रिटर्न भरल्यावर म्हणजे वर्षातून एकदाच होतं . तुम्ही तुमच्या सीएला वर्षातून किती वेळा पैसे देता?

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 14/02/2017 - 01:00
माझे आजही हेच मत आहे की इएमआय ही आधुनिक व्हाईटकॉलर वेठबिगारी आहे. पण त्यापुढे तुम्ही जे विवेचन करत गेलात ते मात्र मला पूर्णपणे मान्य नाही. आणि तो संदर्भ गृहकर्जाचे इएमआय भरणार्‍यांबद्दल आहे. इएमआय भरण्यासाठीच नोकरी करत राहण्याची गरज पडणे ही वेठबिगारी आहेच. मात्र जसे तिथे काहींनी म्हटले की ते त्यांच्या अ‍ॅबिलिटीनुसार मॅनेजेबल आहे तेव्हा तेही पटले. म्हणजे सरसकट इएमआय हा वाईटच आणि वेठबिगारीच असे म्हणत नाही, माझे मत वर बोल्ड केले आहे. समजा एक लाख पगार असणार्‍याने १२ महिन्याचा २००० रुपये इएमआय घेतला तर तो वेठबिगारी नाही. पण चाळीस हजार कौटुंबिक इन्कम असनार्‍यांनी वीस हजार इएमआय भरणे वेठबिगारी आहे. केस्टूकेस बदलतं ते. मी आपली मते संदर्भासहीत मांडत आहे व सरसकटीकरण टाळत आहे.
ते मी स्वच्छंद आणि क्वालिफिकेशन या तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलंय. त्यावर मी ठाम आहेच.
>> ओके.
नोकरदाराला जसा महिन्याला पगार मिळतो किंवा इतर व्यावसायात जसं सतत काम आणि पैसे हे चक्र चालू असतं तसं व्यावसायिक सीएच्या प्रोफेशनमधे नसतं. वर्षभर क्लायंट सपोर्ट द्यावा लागतो आणि त्याचं बिलींग इन्कमटॅक्स रिटर्न भरल्यावर म्हणजे वर्षातून एकदाच होतं . तुम्ही तुमच्या सीएला वर्षातून किती वेळा पैसे देता?
>> इतरांचे महिन्यावारी, तसे सीएंचं वार्षिक... म्हणजे रेगुलरच ना? ह्यात इर्रेगुलॅरिटी कुठे आहे? फेफरं येईल असं काय आहे ते समजलं नाही. मी वर्षातून समजा दहा लाख कमवत असेल , ते मला रोज थोडे थोडे मिळाले काय, महिन्या-तिमाही-सहामाहिला मिळाले काय किंवा वार्षिक मिळाले काय त्यात फेफरं येण्यासारखं काय आहे ते समजत नाही. वर्षातून एकदा इन्कम ह्या रेगुरॅलिटीच्या अवतीभवतीच आयुष्य गुंफलं असेल ना सीएंचे? जसे नोकरदाराचे महिन्यावारी आणि रोजंदारीवाल्याचे रोजावारी असते तसे? वर्षभर सपोर्ट केल्यावर आता रिटर्न फाइल केल्यावर क्लायंटच्या मर्जीवर पैसे देणं न देणं अवलंबून असतं काय? अनसर्टंटी असायला पाहिजे ना फेफरं येण्यासाठी. ती अनसर्टंटी दिसत नाही यात. तीच शोधत आहे मी.

In reply to by संदीप डांगे

किंवा वार्षिक मिळाले काय त्यात फेफरं येण्यासारखं काय आहे ते समजत नाही. वर्षातून एकदा इन्कम ह्या रेगुरॅलिटीच्या अवतीभवतीच आयुष्य गुंफलं असेल ना सीएंचे? यात अनिश्चितता नाही ? वर्षातून एकदा पैसे अशी सायकल कोणत्या प्रोफेशनमधे आहे सांगाल काय? का उगीच प्रतिसाद ठोकायचा म्हणून चाललंय ?

In reply to by संजय क्षीरसागर

अनिश्चितता नाहीच आहे. आम्हाला महिन्याला १० हजार मिळत असतील तर तुम्हाला वर्षाला एकदाच एक लाख २० हजार मिळत असतील. ह्यात "अनिश्चित" काय आहे? पैसे मिळतात ना? हे म्हणजे रोजंदारीवर काम करणार्‍याला "तुझं बरंय रे.. तुला रोज १० रुपये मिळतात. मला एकदाच महिन्यातुन १० हजार. परत महिनाभर काही नाही." असं म्हणण्या सारखं आहे. आता तुम्ही सीए हे एक अद्भुत प्रोफेशन आहे असंही म्हणायचं आहे का?