मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेडी सीमोर- कुंती, द्रौपदी आणि सीता

पिशी अबोली · · जनातलं, मनातलं
लेडी सीमोर वर्सली या १८व्या शतकातील इंग्लंडच्या नैतिकतेच्या कल्पनांची धूळदाण उडवणाऱ्या बाईबद्दल ऐकून तिला तसंच विसरून जाणं कठीण आहे. तिच्यावरचा अख्खा बीबीसी २ चा 'द स्कँडलस लेडी डब्ल्यू' हा एपिसोड पाहून तर लिहिल्याशिवाय राहवणारच नव्हतं. ज्या काळात स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मालकीची वस्तू समजलं जायचं, तिची संपत्ती लग्नानंतर पूर्णपणे तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जायची,आणि तिला स्वतःची बाजू मांडायलाही मज्जाव होता, त्या काळात प्रचंड बदनामी पत्करून आपल्या नवऱ्याने प्रियकरावर चालवलेल्या खटल्यात संपूर्ण निकाल फिरवून दाखवून त्या बदनामीसहित ताठ मानेने जगणारी ही व्यक्ती खरंच होऊन गेली यावर विश्वासच बसत नाही. पण विचार केला, तर स्त्री आणि स्त्रीचा पायदळी तुडवला गेलेला सन्मान यांचे अविश्वसनीय संदर्भ द्यायला आपल्या जनमानसात रुजलेल्या कथा तरी कुठे कमी आहेत? कुंती, द्रौपदी, आणि सीता या आपल्या अग्निशिखांचे नशीब घेऊन त्याचा वणवा करणाऱ्या या मनस्विनीबद्दल लिहिणे म्हणूनच क्रमप्राप्तच होते. लेडी सीमोर फ्लेमिंग या प्रचंड श्रीमंत सौंदर्यवतीने तिच्या प्रतिष्ठेला साजेशा रिचर्ड वोर्सलीशी लग्न केले आणि तिचं माणूस असणं संपलं. ती आता नवऱ्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास बांधील असलेली एक वस्तू होती. आणि तिच्या नवऱ्याच्या इच्छांसाठी तिने जे केलं, ते आजच्या काळातपण अंगावर शहारे आणेल. रिचर्ड हा ‘voyeur’ होता. तिला अन्य पुरुषांशी प्रणय करताना दाराच्या छिद्रातून बघणे ही त्याची अपेक्षा होती. आणि त्याने तिला यासाठी अक्षरश: वापरले. नवऱ्याचा आदेश पाळणे हे तिचे कर्तव्य समजले जात असल्याने तिने ही गोष्ट सहन केली. नवऱ्याच्या इच्छेने आपले शरीर इच्छेविरुद्ध दुसऱ्याला समर्पित करणारी कुंती इथे मला दिसली. या कुंतीची द्रौपदी झाली, ती रिचर्डचा जिवलग मित्र, कॅप्टन बिसेट आल्यावर. आतापर्यंत ती कोणत्याही मित्राला वापरू देण्याची वस्तू होती. पण बिसेटच्या ती खरीखुरी प्रेमात पडली होती. त्यांच्या बहरलेल्या प्रणयाने रिचर्डला अजून विकृत आनंद मिळत असल्याने त्याची ना असायला हरकतच नव्हती. आता ती दोन जिवलग मित्रांची ‘पतिव्रता’ झाली. एक लग्नात तिला जिंकून घेणारा ‘मालक’ आणि दुसरा, ज्याच्यावर तिचं प्रेम होतं. पण प्रेम म्हणजे शरीरापलीकडे जे काही असतं त्याचे तरंग आता सीमोरच्या आसुसलेल्या अंतरंगात उमटायला लागले होते. या आयुष्याचा तिला मनस्वी कंटाळा आला होता. बिसेटसोबत, तिच्या खऱ्या प्रेमासोबत त्याच्यापासून झालेल्या मुलीला घेऊन तिला संसार थाटायचा होता. हे लोढणं गळ्यात घेण्याचं बिसेटने कुठच्या नशेच्या क्षणी ठरवलं काय माहीत, पण त्या दोघांनी पळून जाण्याचं धाडस केलं. कदाचित सीमोरला वाटलं असेल की रिचर्डची या सगळ्यालाच संमती असल्याने तो तिला सहज घटस्फोट देईल. पण इतक्या पुरुषांना ओळखूनही तिला पुरुषी अहंकार काय चीज असते त्याची ओळख व्हायची होती. ते दोघं पळून गेले आहेत हे कळल्यावर रिचर्डने थयथयाट केला. सीमोर आणि बिसेट यांच्या प्रेमाला तो मान्यता देत होता तो त्याच्या आनंदासाठी, तिच्या नव्हे हे ते दोघंही विसरून गेले होते. रिचर्ड हे राजकारणातील बडं धेंड होतं. त्याची नाचक्की त्याला कदापि सहन झाली नसती. त्याने बिसेटवर कोर्टात केस टाकली, आणि त्याच्या मालकीची बायको पळवल्याबद्दल त्याच्यावर तब्बल २०००० पाऊंडचा दावा ठोकला. आता बिसेट हबकला. हे असं काही त्याला अपेक्षितच नव्हतं. एवढी मोठी नुकसानभरपाई देऊन तो रस्त्यावर आला असता. लग्नबाह्य संबंधाबद्दलचे कायदे बघता तो सरळ सरळ दोषी होता. आणि इथे उभी राहिली ती अग्निदिव्याची तयारी असणारी सीमोरमधली सीता. तिला कोर्टात जाऊन साक्ष देणं शक्य नव्हतं. म्हणून तिने तिला ज्यांच्यासोबत शय्यासोबत करायला रिचर्डने भाग पाडलं होतं त्या लोकांना कोर्टात उभं केलं. बिसेटला वाचवण्यासाठी तिने आपली अब्रू पणाला लावली. इतका रसभरीत विषय मिळाल्यावर त्याचं चर्वितचर्वण होणारच. या केसची अनेक वर्णनं, त्यावरची व्यंगचित्रं अतिशय प्रसिद्ध झाली. सीमोरच्या आयुष्यात एकूण २७ पुरुष होते अशी वर्णनं इंग्लंडमधे प्रसिद्ध झाली. इतका वणवा पेटवलेल्या सीमोरने शेवटी निर्णय फिरवला. गुन्ह्यात जर आरोपीला दावेदाराची साथ असेल, तर गुन्ह्याची तीव्रता कमी होते. त्यामुळे केसचा निर्णय लागला तेव्हा कोर्टाने नुकसानभरपाई म्हणून बिसेटने रिचर्डला १ शिलिंग एवढी रक्कम द्यावी असा निर्णय दिला. जिला जवळपास वेश्येसारखं वागवलं गेलं, तिने स्वतःचा उलटा लिलाव करून स्वतःची किंमत २०००० पाऊंडवरून १ शिलिंग करवून घेतली. प्रचंड नाचक्की सहन केली सीमोरने, तिच्या प्रियकरासाठी, एक सामान्य आयुष्य जगण्यासाठी. पण जगात धोब्याच्या शब्दावरूनपण स्त्रीला टाकता येतं, इथे तर सगळ्या जगासमोर तिने चारित्र्याच्या कल्पनांचे बुरखे टराटरा फाडले होते. त्या बिसेटने तिला काही काळातच सोडून दिलं. त्यानंतर तिने वाईट परिस्थितीत दिवस काढले. अजून सूड पूर्ण न झालेल्या रिचर्डने तिला घटस्फोट दिलाच नव्हता. त्यासाठी त्याने तिला फ्रान्सला ४ वर्षे जाण्याची अट घातली. सीमोर फ्रान्सवरून परत आली आणि रिचर्डचा मृत्यू झाला. तिला विधवा म्हणून तिच्याच राहिलेल्या हुंड्यामधली शिल्लक मिळाली. सीमोरने आयुष्यभर शारीरिक आणि मानसिक प्रचंड त्रास सहन केला. पण तिच्या लग्नाच्या भयाण वास्तवातून बाहेर पडल्यावर तिने जगाला काही किंमतच दिली नाही असं दिसतं. हुंड्याची रक्कम मिळाल्यावर रॉयल लायसन्सने तिने आपलं लग्नापूर्वीचं आडनाव परत मिळवलं आणि स्वतःपेक्षा दोन दशकांनी लहान असणाऱ्या एका संगीतकाराशी लग्न केलं. तिच्या या नवऱ्याने लग्नानंतर तिचं आडनाव घेतलं होतं.. सीमोरची कथा हादरवून टाकते. ही घटना घडून दीड शतकपण लोटलं नाहीये, हे अजून हादरवून टाकतं. जे रामायण-महाभारतातले संदर्भ माझ्या भारतीय मनात पक्कं मूळ धरून होते, त्यांना गदागदा हलवते सीमोर. कुंती काय, द्रौपदी काय, सीता काय, समाजाने ठरवून दिलेल्या नियमांसाठी आपला आत्मसन्मान गिळाव्या लागलेल्या स्त्रिया. त्यांच्या, आणि असमानतेच्या इतिहासातील अनेक व्यथांना चव्हाट्यावर आणणारी सीमोर कधीच विसरली जाणार नाही.

वाचने 17841 वाचनखूण प्रतिक्रिया 105

पैसा 02/12/2016 - 16:48
काय भयानक प्रकार आहे! बरे त्या बिसेटनेही सहीसलामत सुटल्यावर तिला सोडून दिले. महाभारतातील माधवीची कथा आठवली.

लेडी सीमोर बद्दल तुम्ही लिहिलं नसतं तर कदाचित वाचनात आलंही नसतं. धन्स. बीसलेटनेही सोडुन द्यावं, हे वाचून त्रासच झाला. छ्या.!! तिच्या शारिरिक वेदनेइतकीच, मानसिक जी ससेहोलपट सोसली ते भयंकरच आहे. -दिलीप बिरुटे

मारवा 02/12/2016 - 17:38
सीझर चा डायलॉग आठवला. लेख विचार करण्यासारखा आहे. नवऱ्याच्या इच्छेने आपले शरीर इच्छेविरुद्ध दुसऱ्याला समर्पित करणारी कुंती इथे मला दिसली. कुंतीची तुलना जरा जमली नाही. प्रथमदर्शनी सीमोर आणि कुंती त दोघांच्या परीस्थीतीत व्यक्तीमत्वात फरक दिसतो. कुंतीने मर्जीविरुद्ध केले म्हणावे तर तसे वाटत नाही. कर्णाची कथा तपासुन बघायला लागेल नीट...

In reply to by मारवा

नवऱ्याच्या इच्छेने आपले शरीर इच्छेविरुद्ध दुसऱ्याला समर्पित करणारी कुंती इथे मला दिसली.
कर्ण लग्नाआधीचा होता, पतीच्या इच्छेने झालेला नव्हे. कुंतीची लग्नानंतरची तीन मुले, युधिष्ठिर, अर्जुन व भीम, पतीच्या इच्छेने देवांपासून झाली होती.

सस्नेह 02/12/2016 - 17:50
छान लिहिलय. सीमोरच्या धैर्याबद्दल कौतुक आहे आणि दुर्दैवाबद्दल खेद ! तरीही, सीता, द्रौपदी आणि कुंती यांच्याशी केलेली तुलना पटली नाही. या तिघी पुरुषी वर्चस्वाच्या नव्हे तर सामाजिक रूढींच्या बळी होत. तसेच त्यांच्या पतींनी स्वत:च्या विकृत हव्यासाकरिता त्यांना तशी वागणूक दिलेली नव्हती, तर प्रचलित धर्माला अनुसरूनच ते वागले होते. आणि हे समजूनच या तिघींनी पतींकरिता समर्पित झाल्या. सीमोरची मानसिक स्थिती व भावना सीता इं.शी मिळत्या जुळत्या असल्या तरी जीवनमूल्यांत प्रचंड फरक आहे.

In reply to by सस्नेह

सीता, द्रौपदी आणि कुंती यांच्याशी केलेली तुलना पटली नाही.
+१ मुळकथा हदरवुन टाकणारी आहे पण सीता द्रौपदी आणि कुंतीशी केलेली तुलना अस्थानी आहे. मुख्य म्हणजे ही सीतेविषयीची ही धोब्याची घटना रामायणातील कोणत्या कांडात आहे , तो भाग प्रक्षिप्त असण्याची किती शक्यता आहे ? कुंतीचा निर्णय तिने स्वतः घेतलेला आहे आणि नियोग ही त्याकाळी समाजमान्य आणि न्याय अशी प्रथा होती. राहता राहिला प्रश्न द्रौपदीचा . पण त्यावरही प्रचंड काथ्याकुट मिपावर नव्हे तर खुद्द महाभारतात झालेला आहे व्यवस्थित डॉक्युमेन्ट केला आहे. द्रौपदीविषयीचा निर्णय हा न्य्याय्य, धर्मसंमतच आहे ( तसा तो नसता तर युधिष्ठीराने मान्यच केला नसता. महाभारतात सगळेच ग्रे शेडस मध्ये आहेत पण एक युधिष्ठीर आणि दुसरा विदुर हे दोनच पुर्ण व्हाईट शेड्स #ffffff आहेत किमान त्यांच्यावर अविश्वास दाखवु नये) अर्थात तुम्हाला उपमाच हवी असेल तर स्वतःची राज्ये वाचवण्यासाठी राजपुतांनी मुघलांच्या जनानखान्यात पाठवल्या स्त्रियांची कित्येक उदाहरणे देता येतील !

प्रियाजी 02/12/2016 - 18:59
माझ्या मते कुन्ती व इतरांना स्वतःचा अपमान होत आहे हे त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीमुळे जाणवले तरी नसावे अथवा त्यांचे मत रामायण/ महाभारत लिहिणार्यांनी लक्षात घेतले नसावे. सिमोर तुलना करता कलीयुगात वाढलेली असल्याने तिने बंड केले. मुख्य म्हणजे वाचून त्रास तर झालाच पण अशी अजून एक बंड्खोर स्त्री १०० वर्षांपूर्वी होउन गेल्याने तिचा अभिमान ही वाटला. स्त्री वा पुरूष कोणीही असो अन्यायाचा प्रतिकार हा नेहमी केलाच पाहिजे. विष्रयांतर असेल तरी आज उच्च जातीचे लोक अजूनही आम्हाला कमी दर्जाचे समज्तात अशी ओरड करणारे लोक त्यांच्या स्वतःच्या घरातील स्त्रियांना स्वतःच्या बरोबरीची वागणूक देतात का?

सिमोरच आयुष्य खरच खूप यातनामय होत. केवळ एक सामान्य आयुष्य जगण्यासाठी अगोदर तिला तिच्या अस्तित्वाची आहुती द्यावी लागली आणि तरीही मनातलं सामान्य आयुष्य ती कधी जगू शकली नाही हे वाचून खुप त्रास झाला.

राही 02/12/2016 - 19:43
छानच आहे लेख. एका निराळ्या बंडखोरी संदर्भात डॉ.रखमाबाई यांचे नाव आठवले. दहाव्या वर्षी त्यांच्या संमतीविना झालेले लग्न (१८७४) त्यांनी धुडकावले. नवर्‍याने रिस्टोअरेशन ऑव्ह कॉन्जुगल राइट्स् साठी केलेली फिर्याद त्या हायकोर्टात हरल्या, पण प्रचंड लोकनिंदा सोसूनही त्यांनी नवर्‍याबरोबर राहायला नकार दिला. वीस एकविसाव्या वर्षी स्कॉट्लंड येथून डॉक्टर होऊन त्या भारतात आल्या. त्यांना वाळीत टाकलेले असूनही नवर्‍याचे नाव न लावता स्वतंत्रपणे आपले यशस्वी आणि प्रदीर्घ आयुष्य जगल्या. माफ करा, थोडे अवांतर झाले. लेख आवडला हे पुन्हा एकदा.

किती अमानुष आहे हे. बाई ची शक्तीच तिला उभे रहायला शिकवते.सिमोरची अवस्था विचाराच्या पलिकडे आहे.किती सोसलं असेल तिने. वाचून काटा आला अंगावर.

बापरे... सत्य कल्पनेपेक्षा जास्त विलक्षण असतं.. त्या काळात, हे असं सगळं सहन करणं किती भयानक अवघड असेल. त्यात ते संपुर्ण जगासमोर मांडणं तर... आणि एवढं सगळं करुन तिच्या प्रियकराने तिला सोडुन दिलं??????? जितका विचार करु तितका त्रास होतोच आहे.. काय लिहीतेस पिशे तू.... कमाल!

बिसेटला वाचवण्यासाठी तिने आपली अब्रू पणाला लावली. पण तीनं पहिले छूटच रिचर्डला नकार दिला असता तर ही पाळीच आली नसती.

In reply to by संजय क्षीरसागर

येस, माझ्याही डोक्यात हाच विचार आला होता . बाकी वेळेचे माहीत नाही पण पहिल्या वेळेस मॅडम च्या दृष्टिकोणाविषयी , हेतुविषयी शंका घेण्यास वाव आहे , आहेच । कदाचित पहिली वेळ मॅडम ने एन्जॉयच केली असावी.

In reply to by प्रसाद गोडबोले

लॉजिक समजले नाही. दर रेप मध्ये होतो तसा एक आरोप इथेही होऊ शकतो की स्त्री ने ते एन्जॉय केलं. पण एन्जॉय केलं म्हणुन रेप जस्टिफाईड असतो का? (तुम्हाला तसं म्हणायचंय असम मी म्हणत नाही. पण हा मुद्दाच कसा इथे येऊ शकतो?) बरं समजा नैतिक मुल्य वगैरे बाजुला ठेवु. लॉजिकली सुद्धा, पहिल्यावेळचय हेतु विषयी तरी शंका कशाच्या आधारावर नक्की घेतली जाऊ शकते? मला वाटतं की तिने नकार द्यायला हवा होता हा मुद्दाच तकलादु आहे कारण ती आजच्या काळात घडलेली घटना नाही. जिथे स्त्रीयांना मुलभुत हक्कच नव्हते तिथे तिच्या नकाराला कुणी गणलं असतं का? आणि मी काही ती फिल्म पाहिलेली नाही, पण तिच्यावर हे जबरदस्तीने लादलं गेलं असण्याचीच शक्यता दाट आहे. कोण बायको आनंदाने हे करायला तयार होईल? आणि ज्या मन्युष्याला ह्या अशा फॅण्टीसीज आहेत, तो काही बायकोशी चर्चा करुन, तिची परवानगी घेऊन ह्या गोष्टी करुन घेत असेल असं वाटत नाही. आयडीयली तिने स्वतःसाठी ठाम उभं रहायला हवं होतं वगैरे बरोबर आहे. पण अनेकदा (मला तर वाटतं बहुतांश वेळा) बायका सोशल कंडीशनिंगमुळे "आपण ह्याला विरोध करु शकतच नाही" पासुन ते "आपण विरोध केलाच नाही पाहिजे" सारख्या अनेक विचित्र मनस्थितींमध्ये अडकलेल्या असतात. मारझोड करणारा असला तरी कुंकवाचा धनी हवा म्हणुन हजारो विकृत गोष्टी सहन करतात.. आजही. शक्यता तर अनेक असु शकतात सीमोरच्या मनस्थितीबाबतही.. पण तरीही त्याकाळची बायकांची परिस्थिती पहाता, तिला हे करण्याची इच्छाच नव्हती, पण तिच्या इच्छेला आणि नकाराला काहीही किंमत नव्हती, असं मला मनापासुन वाटतं.

In reply to by पिलीयन रायडर

ज्या काळात स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या मालकीची वस्तू समजलं जायचं, तिची संपत्ती लग्नानंतर पूर्णपणे तिच्या नवऱ्याच्या ताब्यात जायची,आणि तिला स्वतःची बाजू मांडायलाही मज्जाव होता,
ह्यातुन स्त्रीच्या मताला काय किंमत असेल हे लक्षात यायला हवं ह्या घटनेत...

In reply to by पिलीयन रायडर

पण प्रेम म्हणजे शरीरापलीकडे जे काही असतं त्याचे तरंग आता सीमोरच्या आसुसलेल्या अंतरंगात उमटायला लागले होते. या आयुष्याचा तिला मनस्वी कंटाळा आला होता. बिसेटसोबत, तिच्या खऱ्या प्रेमासोबत त्याच्यापासून झालेल्या मुलीला घेऊन तिला संसार थाटायचा होता.
सुरुवातीपासून केवळ ' नवरा करायला लावतो' या कारणासाठी (आवडो-न आवडो) तिने ते केलं.

In reply to by पिलीयन रायडर

तिच्या नवर्‍याची कृती अजिबात समर्थनीय नाहीये.... नाहीयेच . मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की आयडीयली तिने स्वतःसाठी ठाम उभं रहायला हवं होतं . तेही पहिल्याच वेळेला , किमान दुसर्‍यावेळेलातरी जेव्हा तिच्या लक्षात आले होते की आपण हे एन्जॉय करत नाहीये . स्वतःच्य आत्मसन्मानासाठी उभे रहाणे ही प्रत्येक प्रौढ व्यक्तीची जबाबदारी आहे, मग ती स्त्री असो की पुरुष. आज असो की १०० वर्षांपुर्वी की १०० वर्षांनंतर. आत्मससंमान, स्वातंत्र्य, पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वगैरे माणुसपणाच्या संकल्पनांच्या बाबतील मला इतकेच म्हणावेसे वाटते की No one gives it to you, YOU HAVE TO TAKE IT ! अवांतर : बाकी इतर लोकं मुळ साहित्य न वाचताच सीता द्रौपदी कुंती विषयी ज्या कॉमेन्ट करत आहेत ते पाहुन फार मनोरंजन होत आहे . =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

मिस्टर रिचर्ड की होलमधून बघतायंत म्हटल्यावर तीनं `मी हा बोल्ड सीन देणार नाही!' हा डायलॉग पहिल्यांदाच बोलायला हवा होता. सत्ताविस म्हणजे फारच रिटेक्स झाले.

In reply to by प्रसाद गोडबोले

आपण दोघंही "आयडीयली" हा शब्द वापरत आहोत, फॉर अ रिझन. कारण असं खरंच घडत असतं तर जगात कधीच कुणावर कुठेही अन्याय झाला नसता. मी वर तेच सांगतेय तुम्हाला, बायका नवर्‍यांना अत्यंत विचित्र परिस्थीती मध्येही सोडत नाहीत. त्यांनी "आयडीयली" सोडायला हवं, पण त्या तसं करत नाहीत. कारण सरळ आहे.. आर्थिक, सामाजिक परावलंबित्व. मला समजत नाही, जिथे साधा स्वतःच्याच पैशावर हक्क नाही, तिथे ही नकार देणार कशी आणि हिचं एकणार कोण होतं? मला तर असंही वाटतं की हा जो २७व्या पुरुषानंतरही नकार दिला गेलाय, तो केवळ प्रेमातुन नाही तर आधाराला दुसरा पुरुष होता, जो तिच्या मागे उभा होता म्हणुनही असेल कदाचित. अन्यथा आर्थिक आणि सामाजिक पाठबळ नसलेली स्त्री, नवर्‍याला सोडुन काय करेल नक्की? बादवे, तिने नकार "दिलाच नाही" असं तरी कुठे माहिती आहे आपल्याला? दिल असेलच आणि अर्थातच तो उडवुन लावला गेला, नवर्‍याने आपला निर्णय तिच्यावर लादला हे घडलं असण्याची तेवढीच दाट शक्यता आहे.

In reply to by पिलीयन रायडर

बादवे, तिने नकार "दिलाच नाही" असं तरी कुठे माहिती आहे आपल्याला? दिल असेलच आणि अर्थातच तो उडवुन लावला गेला, नवर्‍याने आपला निर्णय तिच्यावर लादला हे घडलं असण्याची तेवढीच दाट शक्यता आहे.
ह्म्म्म , हा पॉईंट योग्य आहे, पहिल्या वेळेस मॅडम ने नकार दिला कि नाही नाही दिला हे आपल्याला ठाऊक नाही . दोन्ही समान शक्यता आहेत. ५०-५० ! आनि ह्या केस मध्ये मॅडम विक्टिम असल्याने त्यांना बेनीफिट ऑफ डाऊट द्यायला हरकत नाही ! इत्यलम .

In reply to by प्रसाद गोडबोले

व्यक्ती मनाविरुद्ध वागण्याची दोनच कारणं आहेत. भीती किंवा मोह. परिस्थिती दुय्यम आहे. धागा साहसाविषयी आहे. तर प्रश्न सरळ आहे : जे साहस सिमोरनं शेवटी केलं, ते पहिल्यांदाच का नाही केलं ? `मी हा बोल्ड सीन देणार नाही!' हा डायलॉग पहिल्यांदाच आला असता, तर पिक्चर सत्तविस रिळं झालाच नसता.

In reply to by संजय क्षीरसागर

यशोधरा 03/12/2016 - 14:13
व्यक्ती मनाविरुद्ध वागण्याची दोनच कारणं आहेत. भीती किंवा मोह.
अ‍ॅक्चुअली!

In reply to by संजय क्षीरसागर

>>>>>> `मी हा बोल्ड सीन देणार नाही!' हा डायलॉग पहिल्यांदाच आला असता, तर पिक्चर सत्तविस रिळं झालाच नसता. हं ! मुद्दा बिंदुगामी आहे आणि पटण्यासारखाही आहे. -दिलीप बिरूटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही तरीच काय सर.. इथे काय नवरा बायकोसोबत "अगं मी काय म्हणतो.." म्हणुन चर्चा करायला बसलाय का? की बायकोच्या परवानगीची वाट पहाणार होता? की तिच्या नकाराला मनावर घेणार होता? आजही हजारो घरात पुरुषांसमोर बायकांना ब्र काढता येत नाही. ह्या सामाजिक परिस्थितीला "दुय्यम" मानता येत नसतं सर.

In reply to by पिलीयन रायडर

वर प्रतिसाद लिहितांना तुम्ही म्हटलं तसं सबंध प्रकरणात तिने नकार दिला असेल का ? आणि दिलाही असेल तरी तो पुरुषी वर्चस्वाखाली दबला असे समजू. पण, तरीही तिच्या नकाराने कदाचित झाला तितका त्रास सहन केल्यामुळे जे भोगावं लागलं त्या पेक्षा पहिल्या नकाराने त्या वेदनेची तीव्रता नक्कीच कमी असली असती असे वाटते. अर्थात, आता या वाटण्याला काही अर्थ नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निओ१ 03/12/2016 - 22:26
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब, तुम्ही आजच्या क्षणालातीला पाहत आहात असे वाट आहे, जरा तीच्या जागी, त्या काळी, त्या क्षणी स्वतःला उभे करून पहा, अहो, १०० एक वर्षापुर्वी आपल्याकडे देखील सतीप्रथा होतीच ना ? त्यात काय स्त्रीची आधी विचारणा होत होती?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रश्न शंभर की हजार वर्षापूर्वी, तेंव्हाची आणि आत्ताची परिस्थिती, असा अजिबात नाही. स्वत्त्वाचा आहे. आणि त्याही पुढे जाऊन `व्यक्तीसापेक्ष स्वत्त्वाचा' आहे. परपुरुषाशी संग म्हणजे स्वत्त्वाचा अपमान अशी सिमोरची निश्चयात्मकता असती, तर जुलमापेक्षा स्वत्त्व श्रेष्ठ, मग प्राण गेले तरी बेहत्तर, पण असा संग करणार नाही, हे पहिल्यांदाच झालं असतं. आणि त्याचा जयजयकार उचित होईल. मग ते हजार वर्षापूर्वी असो की आज. कारण स्वत्त्वासाठी बाजी लावली गेली. पण तसं झालं नाही. स्टोरीनं यू टर्न बिसेट आल्यावर घेतला. याचा अर्थ, बाजी बिसेटच्या ओढीमुळे लागली. स्वत्त्वाच्या (किंवा इथे, गैरसमजातून चालू असलेल्या `स्त्रीत्वा'च्या) अभिमानासाठी नाही. थोडक्यात, अनेक पुरुषांशी, स्वतःच्या पतीदेखत संग करतांना, सीमोरनं एकदाही बाजी लावली नाही. बिसेटमुळे तिला मुलगी झाली. हे त्या काळात मान्य असावं. (आज आपण याला डेरिंग म्हणतो!). त्यामुळे ती रिचर्डबरोबर जगण्याला (म्हणजे बोल्ड सीन्स करायला) कंटाळली, की तीचा स्वार्थ जागा झाला ? तीला जगण्याचा एक नवीन आयाम दिसला. सो, नाऊ शी स्टेक्ड हरसेल्फ. असा या स्टोरीचा एकूण अर्थ आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मलाही तो मुद्दा पटलाच आहे, तुम्हाला मला पटलेला मुद्दा सर्वांनाच पटला पाहिजे असं काही नाही. असो. पुन्हा एकदा लेडी सिमोरची ओळख करून दिल्याबद्दल पिशी अबोलीचे आभार. ह्याव अ गुड्डे...! -दिलीप बिरुटे

वीणा३ 03/12/2016 - 02:16
परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. मला असं वाटतं कि प्रत्येक संस्कृतीने स्त्री मधली लढाऊ वृत्ती संस्कार -समाज - वंशवृद्धी ह्या गोष्टीमध्ये संपवायचा प्रयत्न केला. कदाचित पूर्वी संतती निरोधन शक्य नसल्यामुळे तिचं परावलंबित्व सुद्धा जास्त होतं. ज्या वयात काहीतरी "कमवायची" इच्छा असते तो पूर्ण उमेदीचा काळ फक्त मुलं जन्माला घालण्यात -वाढवण्यात गेल्यामुळे स्वतःचा कर्तृत्व दाखवायची संधी अतिशय कमी मिळाली. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पड खाणं अनिवार्य बनलं असावं आणि स्त्री च घराबाहेरच अस्तित्व शून्य झालं असावं. अशा काळामध्ये स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारची लढाई लढणारी प्रत्येक स्त्री किती खमकी आणि धीराची असेल ह्याची कल्पना सुद्द्धा करणं कठीण. ती बरोबर का चूकपेक्षा सुद्धा तिला जे हवं त्यासाठी त्या काळात, त्या वेळच्या नियमांविरुद्ध एवढी लढाई लढली, अपमान सहन केले त्यासाठी तिचं कौतुक. काही हजार वर्ष या पृथीवर राहिलेला, स्वतःच्या मते अतिशय हुशार असलेला माणूस, दुसऱ्याच्या खासगी आयुष्याचा, आवडीनिवडीचा, निर्णयाचा आदर करायला कधी शिकणार देव जाणे. सिमोर ला (आणि आसपासच्या असंख्य व्यक्तींना) आपल्या आवडीच्या माणसाबरोबर राहणं इतक अवघड करणाऱ्या प्रत्येक समाजाबद्दलच्या वैतागातून एवढं वरचं लिहिलं :(.

गामा पैलवान 03/12/2016 - 03:04
पिशी अबोली, रिचर्डने ज्याअर्थी २७ पुरुषांना लेडी सीमूरच्या आयुष्यात प्रवेश मिळवून दिला त्याअर्थी तो मैथुनप्रेक्षी (=व्हॉयुर) होता हे नक्की. मात्र तिची सीता, द्रौपदी, कुंती यांच्याशी केलेली तुलना पटली नाही. या चौघी आपापल्या स्थानी श्रेष्ठ आहेत. चौघींना जबर संघर्ष करावा लागला. मात्र लेडी सीमूरची परिस्थिती वेगळी असल्याने थेट तुलना जुळंत नाही. बिसेटने तिला सोडण्याचं कारण म्हणजे त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण रिचर्डने तिला घटस्फोट दिला नव्हता तर केवळ विभक्त होण्यास परवानगी दिली होती. जाताजाता : धोब्याने सांगितल्यामुळे रामाने सीतेला सोडली वगैरे फालतू बाजारगप्पा आहेत. शक्यतो उल्लेख टाळलात तर बरं. आ.न., -गा.पै.

नगरीनिरंजन 03/12/2016 - 07:38
सीता, कुंती व द्रौपदीशी केलेली तुलना बरोबरच आहे. नवर्‍याच्या आनंदासाठी असो की वंश टिकवण्यासाठी असो परपुरुषाशी संग करावा लागणे हे सीमोर व कुंतीच्या बाबतीत झाले. तेच द्रौपदीचं. निव्वळ कुंती अनवधानाने म्हणाली वाटून घ्या म्हणून लगेच पांडव कंपनीने ठरवून टाकलं वाटून घ्यायचं म्हणून. तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी जाणून घेतलेला दिसत नाही. सितेलाही निर्दोष असूनही सरळसरळ जंगलात सोडून देण्यात आलं. ह्या स्त्रिया सीमोरपेक्षा महान होत्या; त्यांचा संघर्ष वेगळा होता वगैरे उगाच पोकळ मुद्दे मांडून आपल्या संस्कृतीची लक्तरे झाकण्याची गरज नाही. अगदी फुले-कर्व्यांनी काही करेपर्यंत म्हणजे दीड-दोनशे वर्षांपुर्वीपर्यंत आपल्याकडे हीच परिस्थिती होती आणि मागास ग्रामीण भागात अजूनही असेल. शोषण करण्याची कारणे फक्त वेगळी.

In reply to by नगरीनिरंजन

मारवा 03/12/2016 - 12:29
मी कुंती शी तुलना "जमली" नाही असे वर म्हणालो. करु नये असे माझे म्हणणे नाही. सहसा दोन भिन्न काळातील व्यक्तींची केलेली तुलना "जमत" नाही. कुंती संदर्भात विवाहपुर्व तिने सुर्याशी ( या तथाकथित दांभिक कथेच्या पडद्यामागे व्यासांनी लपवलेला जो कोणी पुरुष असेल त्याच्याशी ) स्वतःहुन स्वखुषीने शरीरसंबंध प्रस्थापित करुन अपत्य प्राप्ती करुन घेतलेली आहे ही एक बाब. व अखेरपर्यंत पंडु शी ही बाब लपवुनही ठेवलेली आहे ही दुसरी बाब सिमोर आणि कुंती च्या बाबतीत एक फरक स्पष्ट करते. इथे सिमोर ने असे काही संबध स्वखुषीने स्वनिर्णयाने प्रस्थापित केलेले आहेत असे दिसत नाही. ( बिसेट चा अपवादात्मक संदर्भ वगळता तो दुसरा विषय आहे इथे तिचा प्रथम पुढाकार एपिसोड मधे दाखवलेला आहे) दुसरे तीने जे काय केलेले आहे ते कुठेही लपवलेले नाही.तिने उघडपणे बिसेट ला प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुंतीने पंडु समोर सुर्य ( जो कोणी दडवलेला पुरुष असेल तो) शी असलेले संबंध उघड करुन त्याच्या बरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी पंडु विरोधात संघर्ष यापैकी काही केलेले नाही. अर्थात दोन्हींना समाजाची रुढींची जाचक बंधने होतीच व त्यामुळेच हे शक्य झाले नाही हा समान मुद्द्दा अभिप्रेत असेल तर मात्र तुलना योग्य च आहे. म्हणजे कुंतीला स्वतःचे प्रेम सुर्य न मिळवता येणे व सिमोर ला स्वतःचे प्रेम बिसेट ला मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणे या अर्थाने, द्रौपदी ची सिमोरशी तुलना स्वतःची मर्जी नसतांना पांचात शरीर वाटुन घ्यावे लागणे व पुढे जुगारात हरल्यावर स्वतःची मर्जी नसतांना एक वस्तु म्हणुन वागणुक मिळणे. इतपत बरोबर जाते. मात्र इथेही विषय फार गुंतागंतीचा होतो. उदा. द्रौपदीचे आर्ग्युमेंट करतांना माझ्या अगोदरच स्वतः गुलाम झालेल्या पांडवांना मला डावावर लावण्याचा हक्क कसा मिळतो असा प्रश्न विचारते. इथे तिचे आर्ग्युमेंट बघुन हे स्पष्ट आहे की " नियमानुसार " ती दासी होण्यास तिचा स्वतःचा नकार नव्हताच. वा दासप्रथे विरोधात वगैरे ती कधीही नव्हती. इथे चर्चा बघण्यासारखी आहे पांडवांना द्रौपदीला कुठल्या परीस्थितीत पणाला लावायचा " अधिकार " आहे की नाही इतकाच प्रश्न चर्र्चेत आहे. इथे मात्र दुरदुर पर्यंत द्रौपदी सहीत इतक्या विद्वानांच्या सभेत कोणाच्याच डोक्यात एका माणसाला दुसर्‍या माणसाला गुलाम करण्याचा नैतिक हक्कच नाही. मानवी स्वातंत्र्य हे मुलभुत व स्वयंसिद्ध आहे. मानवाचे स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क आहे. अशी त्या सभेतील कोणालाच स्वतः द्रौपदी सकट दुरदुर पर्यंत जाणिवच नाही. त्या हक्काचा कोणाला साधा विचार ही शिवत नाही. हा तो समाज मानवी वैचारीक प्रगतीच्या संदर्भात किती मागास होता याचा सुस्पष्ट पुरावा आहे. हा मागास समाज मानवी मुल्यांच्या उत्क्रांती संदर्भात कीती मागच्या पायरीवर उभा होता हे आज १९४८ नंतरच्या ह्युमन राइट्स डिक्लरेशन च्या उजेडातील समाजात स्पष्ट दिसते. अर्थात त्या टप्प्या पर्यंतही तो समाज मागुन प्रगती करत करत आलेला होता हे मान्य च आहे.( त्याहुनही अधिक वाईट अशा प्रथा अशा विचारसरणीला सोडत )तिथपर्यंत. असे वेगवेगळ्या विकासच्या टप्यावरील समाजातील कॅरेक्टर्स ची तुलना जमणे अवघड असते. हा एपिसोड यु ट्युब वर बघितला व त्याचे काही रीव्ह्यु आणि विकीपेडीयावरील लेख वाचला. पिशींचे चित्रण काहीसे गडद काळे पांढरे व व्यामिश्रतेला सुलभ करुन केलेले आहे असे मला तरी प्रामाणिकपणे जाणवले. विशेषतः बिसेट चे आगमन झाल्यावर तिघां मधील न्हाणीघरातला सीन, बेडवर तिघे एकत्र , सिमोरचा पुढाकार घेऊन सिड्युस करणे इ. भाग यातील कन्सेटींग अ‍ॅडल्ट चा एलीमेंट काहीच नाही असे म्हणवत नाही. असो टंकाळा आला. पुन्हा एकदा मुळ सिमोर वर अन्यायच झालेला आहे या विषयी काहीच शंका नाही. हा मिश्र गुंतागुंतीचा विषय आहे काळे पांढरा असा नाही. एक एक धागा काळजीपुर्वक हाताळण्यासारखा बघण्यासारखा आहे. मुळ केस रेकॉर्ड उपलब्ध असलेले पुस्तक वाचल्या खेरीज याहुन अधिक मत व्यक्त करणे चुकीचेच व घाईचेच होइल. हा ही उतावळाच प्रतिसाद आहे हे मान्य.

In reply to by मारवा

एस 03/12/2016 - 19:19
तो द्रौपदीचा 'टेक्निकल' मुद्दा होता. आणि तिने नैतिकतेच्या भरसभेतील हननाबद्दल भीष्म इत्यादींना जाबच विचारला आहे. तेव्हा द्रौपदीचा दासी होण्यास विरोध नव्हता हे तुमचे आरग्युमेंट चुकते आहे.

In reply to by नगरीनिरंजन

चतुरंग 03/12/2016 - 18:58
स्त्रियांवर होणारा अन्याय हा रूढींमुळे होतोय, की सामाजिक दबावामुळे/प्र्सिस्थितीमुळे होतोय हा मुद्दाच नाहीये, तर तो होतोय आणि ते गैर आहे हा मुद्दा आहे. पण मुळात सीता, द्रौपदी, कुंती यांना ज्यातून जावं लागलं तो "अन्यायच" नाहीये अशी भूमिका असेल तर काही बोलायला उरत नाही. आपल्या कथांमधून अशा अनेक सामाजिक विसंगती येतात आणि त्यांची भलामण न करता त्या गोष्टी चूक होत्या हे म्हणण्याचे धाडस आपल्याला दाखवले पाहिजे.

In reply to by चतुरंग

सस्नेह 06/12/2016 - 12:05
तसेही प्रत्येक संस्कृतीत स्त्रियांवर कधी ना कधी अन्याय झालाच आहे. एखाद्याच स्त्रीला संपूर्ण न्यायमय जीवन लाभले असेल. केवळ तेच कारण असेल तर सीता, द्रौपदी आणि कुंती यांचाच संदर्भ घेण्याचे कारणच रहात नाही !

In reply to by सस्नेह

नगरीनिरंजन 06/12/2016 - 15:09
तसं तर प्रत्येक जीवावर अन्याय होतोच कधीना कधी छोटा-मोठा; मग कोणाचेच नाव घेण्याचे प्रयोजन उरत नाही. किंबहुना लेखाचेच प्रयोजन उरत नाही.

अजया 03/12/2016 - 10:04
पिशे सुन्न झालं डोकं लेख वाचताना :( परपुरूषाशी मर्जीविरुध्द संग एवढा मुद्दा लक्षात घेतला तर वर केलेली तुलना योग्य वाटते आणि अग्नीपरिक्षा या शब्दासंदर्भाने सीतेचा केलेला उल्लेखही पटला.

कवितानागेश 03/12/2016 - 11:54
बरेच प्रश्न उभे राहिले. अर्थातच व्यक्तींबद्दल नाही तर ठराविक मान्यतांबद्दल! मूळातच नैतिकता, लैंगिक संबंध आणि मालकी हक्क या तीन गोष्टींचा एकमेकांशी नक्की काही संबंध आहे का? आणि असल्यास कसा?

यशोधरा 03/12/2016 - 20:33
वर संक्षी ह्यांनी एक मुद्दा मांडला आहे, की, व्यक्ती मनाविरुद्ध वागण्याची दोनच कारणं आहेत - भीती किंवा मोह. हे अगदी मान्यच आहे. अगदी टाळ्याघेऊ वाक्य आहे. तरीही, सीमोरबद्दल - तिने पहिल्यांदाच धाडस दाखवायला हवे होते वगैरे आपण कोणत्या गृहीतकावर बोलतोय? आज ह्या काळातही जगात स्त्रियांवर, लहान मुलांवर अत्याचार होतात. निर्घॄण अशी कॄत्ये केली जातात. आजही बलात्कारीत स्त्री, लैंगिक अत्याचार झालेली मुले, क्वचित पुरुषही - ह्यांना समाज संवेदनशीलतेने वागवू शकत नाही आणि ज्या काळात स्त्रीला कसलेही सामाजिक, कौटुंबिक पाठबळ नव्हते, त्या काळात बंडखोरी करणे इतके सोपे असेल का? केवळ तिने प्रथमच बंड केले नाही म्हणून तिच्याबद्दल, तिच्या हेतू(???!!!) इत्यादिबद्दल बेछूट विधाने करायचा हक्क कसा काय प्राप्त होतो?

चेक आणि मेट 03/12/2016 - 21:04
तिचा नवरा रिचर्ड हा मुळातच विक्षिप्त माणूस,बायकोसोबत इतर पुरूषाला कि होलमधून पाहणे म्हणजे काय निराळेच फॅड आहे राव! त्याला पयला फोडला पाहिजे.

पिशी अबोली 03/12/2016 - 21:37
इथे ज्यांना तुलना पटलेली नाही, त्यांच्या मताचा मला आदर आहे. एका गोष्टीमुळे कदाचित थोडा गोंधळ उडतोय. तिने नवऱ्याचा आदेश पाळला पाहिजे, ही काही माझी कल्पनेतून निघालेली गोष्ट नाहीये. अँग्लिकन चर्चच्या विवाहाच्या वेळी घ्यायच्या शपथा बघितल्या तर त्यात नवरा आणि बायकोने घ्यायच्या शपथा वेगळ्या आहेत. नवरा 'love and cherish' अशी शपथ घेत असे, तर बायको 'love, cherish and obey' अशी. त्याकाळी ही शपथ फार गांभीर्याने घेतली जात असे हे अन्य ठिकाणीही वाचल्याचं स्मरतं. त्यामुळे रिचर्डच्या इच्छेविरुद्ध उभं राहण्याचा सीमोरला काही पर्याय नव्हता असे दिसते. बाकी पहिल्यांदा तिने किती एन्जॉय केलं, आणि सत्ताविसाव्या वेळी किती त्याच्या चर्चा करण्यात स्वारस्य नाही. रामायण-महाभारताचे मूळ संदर्भ घेऊन चर्चा तशा रिसर्च-ओरियेन्टेड धाग्यावर करण्यात येईल.

In reply to by पिशी अबोली

रिसर्च-ओरियेन्टेड धागे आले की सत्य बाहेर येतें हो, आणि ते बर्‍याच वेळा कटु असतं , मग लोकांना ते झेपत नाही आणि सत्य बाहेर आणणारे संशोधन करणारे न ठरता , एकांगी , वाद उकरुन काढणारे ठरतात ... मागे एकदा लय रीसर्च करुन करुन , अशाच अन्यायाला बळी पडलेल्या अहिल्या मॅडमचा एक श्लोक शोधुन काढला होता त्यावर महागदारोळ झाला होता. http://www.misalpav.com/comment/484538#comment-484538 असो. इतिहासाची पुनरावृती नको . इत्यलम !

निओ१ 03/12/2016 - 21:52
अतिशय सुरेख लेख व सुंदर पद्धतीने वापरलेले संदर्भ, पण काही पुरुषी मानसिकता आज ही गेली नाही आहे उलट या नव्या काळात देखील ठाण मारुन आपल्यासमोर येत असतेच, तशीच येथे देखील येत आहे असे म्हणावे असे वाटत आहे. तुम्ही लिहित रहा, असे "काही प्राणी" इकडे-तिकडे आपला आवाज दाखवत फिरत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे हेच उत्तम.

बॅटमॅन 04/12/2016 - 02:15
लेख आवडला. हिच्याबद्दल अगोदर कधी ऐकलेही नव्हते. इंग्लंडमध्ये मध्यमवर्ग व पब्लिक स्फिअर तेव्हा ठीकठाक अवस्थेत असल्यामुळेच कोर्टकचेरी वगैरे शक्य झाले, नाहीतर शक्य नव्हते. नवर्‍याने सरळ उडवली असती तिला. इच्छेविरुद्ध इतक्या वेळा संभोग करणे आणि शेवटी त्याचा प्रतिकार करणे खरेच खूप धाडसाचे काम आहे. कैकवेळेस मन मारल्यामुळे लाजलज्जा फाट्यावर मारणे शक्य झाले असून तिथूनच ते कोर्टकचेरीचे डेअरिंग आले असावे. आजही वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रियांचा निर्भीड स्वभाव कैक लेखांतून दिसतो, बुधवार पेठेतून कधी त्या भागाजवळून जाणे झाले तरी ओझरत्या दृष्टिक्षेपाततसुद्धा त्यांची नजर ही निबर झालेली आहे हे जाणवते. तेच ते तेच ते अती झाल्यामुळे नंतर त्याचा इश्श्यू स्वतःपुरता तरी झाला नसावा असे मला वाटते.

मारवा 04/12/2016 - 09:10
आपण म्हणता तो द्रौपदीचा 'टेक्निकल' मुद्दा होता. आणि तिने नैतिकतेच्या भरसभेतील हननाबद्दल भीष्म इत्यादींना जाबच विचारला आहे. तेव्हा द्रौपदीचा दासी होण्यास विरोध नव्हता हे तुमचे आरग्युमेंट चुकते आहे. सर्वप्रथम हा महाभारतकालीन जो समाज होता त्यात व त्याच्या पुर्वी व नंतर प्राचीन भारतात दास प्रथा गुलामगिरी ही अस्तित्वात होती समाजमान्य होती याचे अनेक पुरावे अनेक ठिकाणी सापडतात. महाभारतातच स्वत: धर्मराज युधिष्ठीर याने ब्राह्मणांना दासी दानात दिल्याचा उल्लेख येतो, स्वत: कृष्ण आदीपर्वात सुभद्रेच्या विवाहात दासी दानात देतो. उद्योग पर्वात माधवीची कथा येते जी सरळ वस्तुच वागवलेली आहे दासी आहे. शांती पर्वात तुलाधर स्पष्ट म्हणतो की असे बघण्यात येते की माणसे माणसांना गुलाम करतात.दासांचे प्रकार होते गर्भदास, क्रितदास इ.तर या विषयी तरी किमान दुमत नसेल असे समजतो. द्रौपदी ही या अशा दासप्रथा मानत असलेल्या मागास समाजाचीच एक घटक आहे. यातच या दास प्रथे व्यतिरीक्त वर्णाश्रमाच्या स्वरुपातही माणसां माणसांत भेदभाव आहेच. द्रौपदी दोन्ही दासप्रथा व वर्णाश्रम या दोन्ही प्रकारच्या मागास उच्चनीचतेच्या कल्पनेने जखडलेल्या मागास समाजाचाच एक भाग आहे. कर्णाचा सुतपुत्र व प्रतिकामीचा सुत हा तुच्छतापुर्ण उल्लेख व स्वत:च्या क्षत्रिय असण्याचा अभिमानास्पद उल्लेख हा एक साधा स्पष्ट पुरावा तिच्या या वर्णाधिष्ठीत भेदभावाला असलेल्या तिच्या मान्यतेला दाखवतो. याचप्रमाणे दासप्रथेला ही ती प्रतिकुल कुठेच नाही. क्रितदास, गर्भदास इ. दासांचेही सात प्रकार संस्कृतीमान्य आहेत. अगदी अलीकडे ब्रिटीशांनी ते रद्द करेपर्यंत गुलामगिरी सुखाने नांदत होती. आता अजुन एक काहीसे विनोदी वाटेल असे उदाहरण घेऊ समजा कोर्टात एक काल्पनिक खटला एका कंपनीने त्यांच्या माजी कर्मचार्‍यावर भरला हा आमच्या कंपनीत तीन वर्षे अगोदर कामाला होता तेव्हा त्याने अमुक केले... असा संदर्भ आहे, आता ज्यावर आरोप केला ती व्यक्ती जर एक साधी समजा देशपांडे आहेत तर ते पुरावे मागतील मला चेक दिला होता का सॅलरीचा, पीएक इ., मस्टरवर सही होती का माझी इ. यात ती व्यक्ती मी कुणाची तरी नोकरी करु शकतो मी नोकर असु शकतो हे मान्यच करत आहे व म्हणुनच या रीतीने आर्ग्युमेंट करेल. आता आरोप झालेली व्यक्ती मुकेश अंबानी सारखी ( खानदानी श्रीमंत समजा हो क्षणभर ) असेल तर तो कशी सुरुवात करणार बचावाची ? तो सुरुवातच अशी करेल मी अंबानी आहे माझे वडील धीरुभाई अंबानी मै किसी की नौकरी कर ही नही सकता. सबसे पहले तो सवाल ही नही उठता इस बात का.अंबानी /टाटा किसी के नौकर हो ही नही सकते. हम नौकरी देते है कभी करते नही ..करनेका सवाल ही नही उठता. तर गंभीर मुद्दा असा मांडायचाय की द्रौपदी इथे जे आरग्युमेंट करत आहे ती स्त्री दासप्रथा वर्णाश्रम या विरोधात कुठलेही क्रांतिकारक विधान करत नाही. ते चुक आहे असे म्हणुच शकत नाही. कारण ती स्वत: एका मागास समाजाचा जो या सर्व मागास बाबींना अधिक्रुत मान्यता देतो त्याचाच एक घटक आहे. म्हणुन तीची आर्ग्युमेंट्स देशपांडे सारखी आहेत ज्यात हे इम्प्लाइड आहे हे गृहीत धरुन आहे की ती दासी बनु शकते. इतकेच कशाला स्वत:ला वाटुन घ्यायलाही तिने हे प्रकरण घडण्या अगोदरच संमती दिलेली आहेच तिथेही तिचा विरोध नाहीच तेव्हाच ती विरोध करु शकली असती की सवाल ही नही उठता. मी वस्तु नाही वाटुन घ्यायला, तिथेही तिने विरोधी पवित्रा घेतला असता. पण ती असे काहीच करत नाही, करणारही नाहीच. कारण ती एक मागास समाजाच्या स्त्री विषयक मुल्यांनी कंडिशन्ड झालेली स्त्री आहे. ही मागास मुल्ये तिच्या रक्तात नकळत भिनलेली आहेत. या संदर्भाचे सर्व श्लोक सभापर्वात व त्यात द्युतपर्वात येतात. या मुळ श्र्लोकांचाच मी इंग्रजी अनुवाद जो देत आहे तो श्री के. एम. गांगुलींचा आहे व तो नेट वर उपलब्ध आहे. याचे क्रॉस चेक साठी मुळ संस्कृत श्लोक भांडारकरची प्रत वापरली आहे ही पण नेटवर आहे. तुमचा आक्षेप आल्यास मुळ श्लोकही देतो. तर काही श्लोक महत्वाचे आहेत. ज्यात द्रौपदीचे आर्ग्युमेंट येते. पहील्या श्र्लोकात जेव्हा कौरवांच्या आदेशानुसार "प्रतिकामी" द्रौपदीला बोलावण्यास येतो व सांगतो की जुगारात तुला युधिष्ठीर पणाला लावुन गमावुन बसलेला आहे. तुला दुर्योधनाने जिंकले आहे तु माझ्याबरोबर दरबारात चल. त्यावर दौपदी म्हणते त्याला मी सोडुन इतर काही वस्तु पणाला लावायला मिळाली नाही का ? त्यावर प्रतिकामी तिला माहीती देतो की त्याने अगोदर भावांना पणाला लावले मग स्वत:ला आणि शेवटी तुला. त्यावर संतापलेली द्रौपदी प्रतिकामी ला म्हणते तु जा आणि त्या जुगार्‍याला (युधिष्ठीर) अगोदर विचार की त्याने अगोदर कोणाला पणात लावुन गमावले स्वत:ला की मला? याचे उत्तर अगोदर आण आणि मगच मला तुझ्यासोबत ने . "The Pratikamin said,--'When he had nothing else to stake, it was then that Ajatasatru, the son of Pandu, staked thee. The king had first staked his brothers, then himself, and then thee, O princess.' "Draupadi said,--'O son of the Suta race, go, and ask that gambler present in the assembly, whom he hath lost first, himself, or me. Ascertaining this, come hither, and then take me with thee, O son of the Suta race.' आता इथे जर तिला दास्यत्व मुळातुनच मान्य नसते तर तिने कोण अगोदर दास झाला कोण नंतर यात वेळ घालवलाच नसता. तिचा सरळ दावा असा असता की मला पणाला लावायचा मुळातच प्रश्न येत नाही अगोदर ही नाही नी नंतर ही नाही. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे सवाल ही नही उठता मुझे दांव पे लगानेका. निकल जा यहा से और कह दे युधिष्ठिर से उसे ये हक किसने दिया आखिर मुझे दाव पे लगाने का ? अगोदर तो की अगोदर मी हे विचारण्याची गरजच नव्हती यात ती खात्री करुन घेत आहे रीतीची नियमांची परंपरेची प्रोसिजरची की ती पाळली गेली आहे की नाही. जुगाराचे प्रचलित नियम इ. अगोदर दास झालेली व्यक्ती दुसर्याला पणाला लावु शकत नाही हे तिला सिद्ध करायच आहे. (उदा बघा याचाच इम्प्लाइड अर्थ देशपांडेंना मान्य आहे की ते नोकर बनु शकतात नोकरी करु शकतात ते चेक नंबर इ. मागत आहेत. )द्रौपदी खात्री करत आहे अगोदर त्याने स्वत:ला पणाला लावले की मला इ.इ. इथे द्रौपदीचा मुळापासुन दास्यत्वाला विरोध नाही तो रीतसर वाट्याला आलेला आहे की नाही याची शहानिशा ती करत आहे मुळाला सुरुंग लावत नाही.( इथे सुताचा तुच्छ उल्लेख तिची वर्णाश्रम या दुसर्या शोषणाच्या भेदभावाच्या सिस्टीम शी असलेली कमिटमेंट दाखवतो. हीच कमिटमेंट दासप्रथेशीही आहे. ती प्रतिकामी पुरेसा सम्मान देत नाही म्हणुन त्याच्यावर उखडलेली आहे याची ही ग्रंथात नोंद आहे. या मुळ संस्कृत श्लोकाचे इंग्रजी अनुवाद असे. "The Pratikamin said,--'When he had nothing else to stake, it was then that Ajatasatru, the son of Pandu, staked thee. The king had first staked his brothers, then himself, and then thee, O princess.' "Draupadi said,--'O son of the Suta race, go, and ask that gambler present in the assembly, whom he hath lost first, himself, or me. Ascertaining this, come hither, and then take me with thee, O son of the Suta race.' . प्रतिकामी तिचा प्रश्न घेऊन सभेत जातो व युधिष्ठीराला विचारतो तो काहीच उत्तर देत नाही. दुर्योधन प्रतिकामी ला आदेश देतो तु पुन्हा जा आणि पांचाली ला येथे घेऊन ये आणि तिला तिचा प्रश्न स्वत: इथे या सभेसमोर युधिष्ठीराला विचारु दे सभेला कळु दे दोघांचा संवाद. प्रतिकामी पुन्हा द्रौपदीकडे जातो त्यावर ती म्हणते. सुख दुख प्रत्येक शहाण्या व मुर्ख माणसाच्या नशिबी येतात इ.पुढे नैतिकता/ धर्म हीच एकमेव महान गोष्ट आहे जी पाळली तरच सर्व कल्याण होते इ. व कौरवांनी धर्म सोडु नये इ. व पुढे सर्वात महत्वाचा संदेश प्रतिकामी ला द्यायला सांगते.की जा सभेत आणि मी धर्मा विषयी जे म्हणाले ते सभेतल्या ज्येष्ठांना आणि ज्यांना धर्माचे नितीचे सखोल ्द्न्यान आहे अशा नितीमानांना माझे म्हणणे सांग. आणि सर्वात महत्वाच ती म्हणते जे काही ज्येष्ठ व नितीमान लोक म्हणतील ते करायला मी तयार आहे. इथे तिने सुस्पष्ट तयारी दासी होण्याची दाखवलेली आहे जर की हे ज्येष्ठ व नितीमानांना मंजुर असेल ( तिला आशा आहे की ते याचा विरोध करतील आशा असणे हा भाग वेगळा ) पण निर्णय मिळाला तर मी तयार आहे. याचाच अर्थ की या जुगारात तिला पणाला लावल जाणं हे योग्य असेल ती नंतर पणाला लावली गेली हे योग्य हा निवाडा ज्येष्ठांनी दिला तर ती तयार आहे असे तिच स्वत: सांगते. त्यांना विरोध करेल ते ठरवणारे कोण सवाल ही नही उठता, मला कोणी पणाला लावुच कसा शकतो ? ही भाषा इथे नाही. तुम्ही म्हणाल तसं ,परंपरा ज्येष्ठ म्हणतील ते, ही भाषा आहे. ज्येष्ठ गेले उडत ही भाषा नाही. या मुळ श्लोकांचे अनुवाद हे. Vaisampayana continued,--"The messenger, obedient to the command of Duryodhana, going once again to the palace, himself much distressed, said unto Draupadi,--'O princess, they that are in the assembly are summoning thee. It seemeth that the end of the Kauravas is at hand. When Duryodhana, O princess, is for taking thee before the assembly, this weak-brained king will no longer be able to protect his prosperity.' "Draupadi said,--'The great ordainer of the world hath, indeed, ordained so. Happiness and misery pay their court to both the wise and unwise. Morality, however, it hath been said, is the one highest object in the world. If cherished, that will certainly dispense blessings to us. Let not that morality now abandon the Kauravas. Going back to those that are present in that assembly, repeat these my words consonant with morality. I am ready to do what those elderly and virtuous persons conversant with morality will definitely tell me. पुढे प्रतिकामी जाण्यास कचरतोय हे बघुन दुर्योधन दु:शासनाला पाठवतो. दु:शासन जेव्हा तिला फ़रफ़टत आणत असतो तेव्हा ही परंपराबद्ध स्त्री म्हणते की तु मला अशा अवस्थेत ओढत नेतोस हे मोठे पाप आहे. माझे पती तुला या गुन्ह्यासाठी कधीच माफ़ करणार नाहीत इ.इ. व पुन्हा एकदा परंपरेचा स्वीकार करत म्हणतेय की माझा पती युधिष्ठीर हा आता सध्या नैतिकतेने बांधला गेलेला आहे. ( म्हणुन तो तुला विरोध करु शकत नाहीये इथे तो दास झालाय म्हणुन दु:शासनाला विरोध शक्य नाही. दासाने मालका विरोधात जाणे चुक आहे याला ती स्वत:ची स्पष्ट मान्यताच दाखवत आहे. हे सर्व युधिष्ठीरा संदर्भात आहे याचाच अर्थ तीला आता युधिष्ठीर या दास ने गुलामाच्या दास्यत्वधर्मानुसार वागणे योग्य आहे हा नाईलाज आहे हे ती म्हणतेय. इथेही तिचा दासप्रथेचा स्वीकार त्यातली मजबुरी मान्य असणे इ. स्पष्ट दिसतोच आहे. इथे मला वाचवण्यासाठीही त्याने दासधर्म सोडु नये हीच अपेक्षा आहे. O wretch! O thou of cruel deeds, drag me not so. Uncover me not so. The princes (my lords) will not pardon thee, even if thou hast the gods themselves with Indra as thy allies. The illustrious son of Dharma is now bound by the obligations of morality. Morality, however, is subtle. Those only that are possessed of great clearness of vision can ascertain it. In speech even I am unwilling to admit an atom of fault in my lord forgetting his virtues. Thou draggest me who am in my season before these Kuru heroes. This is truly an unworthy act. But no one here rebuketh thee यानंतर सभेत पुन्हा द्रौपदीचे आर्ग्युमेंट प्रोसीजर बरोबर आहे की नाही हे बघण्याच्याच दिशेने जाते. ती पुन्हा प्रोसीजरचा नविन मुद्दा उचलते. ती दावा करते की युधिष्ठीराला ध्युत जुगार खेळण्यास बोलावले गेले मात्र त्याच्यात या जुगार खेळण्याचे मुळात कौशल्यच नाहीये. आणि अशा माझ्या पतीला या खेळातील कुशल, दृष्ट अशा शकुनी इ.पुरुषांबरोबर खेळांडु बरोबर तुम्ही त्याला हा खेळणे भाग पाडले. त्याला बहकवण्यात आले, युधिष्ठीर शकुनी इ. च्या नीच हेतुंना बळी पडला इ.इ. त्याने स्वत:हुन मला पणाला लावले असे कसे म्हणता येइल. तो माझा नवरा बिचारा इनोसंट होता, माझा नवरा जुगारात अनस्कील्ड होता अशा अर्थाचे हे आर्ग्युमेंट आहे (म्हणजेच बरोबरीत असता तर बाब मान्य होती ) पण झालं ते झालं आता तुम्ही ज्येष्ठांनो तुम्हीच ठरवा काय करायच ते मी तयार आहे. पुन्हा एकदा निर्णय इतरांवर सोपवला. क्रांतिकारी विरोध नाही स्कील बिल माहीत नाही मी मुळात पणाला लावलीच जाऊ शकत नाही. असा कुठलाच विरोध नाही बंडखोरी नाही मी हे मानणार नाही असे नाहीच. ( तुम्ही कुंती ने वाटुन घ्या म्हणाली मान्य आहे त्याच प्रकारचा बिनशर्त स्वीकार ) "Draupadi said,--"The king was summoned to this assembly and though possessing no skill at dice, he was made to play with skilful, wicked, deceitful and desperate gamblers. How can he be said then to have staked voluntarily? The chief of the Pandavas was deprived of his senses by wretches of deceitful conduct and unholy instincts, acting together, and then vanquished. He could not understand their tricks, but he hath now done so. Here, in this assembly, there are Kurus who are the lords of both their sons and their daughters-in-law! Let all of them, reflecting well upon my words, duly decide the point that I have put. पुढे दुर्योधनाचा लहान भाऊ विकर्ण द्रौपदीच्या बाजुने जोरदार आर्ग्युमेंट करतो व म्हणतो की जुगार दारु शिकार स्त्रीसंग या चार गोष्टींच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या केलेल्या कृत्याला मान्यता नसते इ.इ. व माझ्या मते द्रौपदी ही जिंकली गेलेली नाही. त्यावर कर्ण त्याला रागावुन तु लहान आहेस तुला कळत नाही इ. म्हणुन त्याला "धर्म" सांगतो की द्रौपदी ही युधिष्ठीराची प्रॉपर्टी आहे. O son of Dhritarashtra, how dost thou regard Krishna as not won, when the eldest of the Pandavas before this assembly staked all his possessions? O bull of the Bharata race, Draupadi is included in all the possessions (of Yudhishthira). Therefore, why regardest thou Krishna who hath been justly won as not won? Draupadi had been mentioned (by Suvala) and approved of as a stake by the Pandavas. For what reason then dost thou yet regard her as not won? पुढे पुन्हा दु:शासन तिला ओढुन नेत असतांना हतबल असलेली द्रौपदी किती परंपराबद्ध आहे त्याचे करुण चित्र उभे करणारे संवाद येतात. ज्या ज्येष्ठांनी तिचा इतका अपमान होऊ दिला. त्यांना मला नमस्कार तरी करु दे असे ती दु:शासनाला विनवते. ती म्हणते थांब मला माझे ज्येष्ठांना वंदनाचे कर्त्यव्य निभावु दे. ही इतकी परंपरेने बद्ध स्त्री आहे की इतका अन्याय होउनही त्याचे ज्यांनी मुक समर्थनच केले त्याच नालायकांना तुझ्या या ओढाताणीच्या तणावात मी अगोदर वंदन करु शकले नाही यांची खंत व्यक्त करत दु:शासनला म्हणते Draupadi said,--'Wait a little, thou worst of men, thou wicked-minded Dussasana. I have an act to perform--a high duty that hath not been performed by me yet. Dragged forcibly by this wretch's strong arms, I was deprived of my senses. I salute these reverend seniors in this assembly of the Kurus. That I could not do this before cannot be my fault.'" तात्पर्य हे की ही स्त्री बंडखोर कुठेच नाही परंपरा शरण आहे. पुर्णपणे स्त्रीने कसे वागावी ची जी या समाजाची मुल्ये आहेत ती तीच्या रक्तात भिनलेली आहेत. स्त्रीला कसे वागवले पाहीजे स्त्रीने कसे वागले पाहीजे इ.इ. ही त्या मागास समाजा्च्याच मुल्यभाषेत बोलत आहे. हे सर्व फ़ारच करुण आणि व्याकुळ करणार आहे पण आहे च हा सर्व एपिसोड च असा आहे. आणि सर्वात शेवटी तर द्रौपदीने आता पुर्ण च शरणागती पत्करलेली आहे अनेक करुण ओळींनी स्वत:ची दुरावस्था वर्णन केल्यानंतर द्रौपदी शेवटी म्हणते की तुम्ही निर्णय द्या की मी दासी आहे की नाही तो मी कौरवांकडुन जिंकली गेली आहे की नाही तुमचा निर्णय जो काय असेल तो मी सहर्ष मान्य करायला पुर्णपणे तयार आहे मात्र तुम्ही मला निर्णय द्या. हा शेवटचा श्लोक तर धडधडीत क्रिस्टल क्लीअर पुरावा आहे की जर नैतिक रीत्या योग्य असेल प्रोसिजरने झालेले असेल नियमात बसत असेल (तेव्हाच्या त्यांच्या) तर ती दासी होण्यास सहर्ष तयार होती. ती म्हणते. Ye Kauravas, I am the wedded wife of king Yudhishthira the just, hailing from the same dynasty to which the King belonged. Tell me now if I am a serving-maid or otherwise. I will cheerfully accept your answer. This mean wretch, this destroyer of the name of the Kurus, is afflicting me hard. Ye Kauravas, I cannot bear it any longer. Ye kings, I desire ye to answer whether ye regard me as won or unwon. I will accept your verdict whatever it be.' या व्यतिरीक्त अजुन एक मुद्दा असा की सिमोर आणि पांचाली त तुलना गुंतागुंतीची आहे. दोन्हींना त्या पतिची प्रॉपर्टी आहे असे धर्मा/ कायद्याने मानले होते हे समान, दोन्हींचा भरसभेत/ कोर्टात भयानक अपमान समान, मात्र एक शिलींग इतकी नुकसान भरपाई जाहीर झाल्यावर विजयाच्या अल्लड आनंदाने खळाळुन हसणारी सिमोर वेगळी व थांब मला वंदन करायचे राहुन गेले असे रडत म्हणणारी द्रौपदी वेगळी. नवरा रीचर्ड च्या तोंडावर एका प्रसंगात " आय मे बी युवर प्रॉपर्टी ,बट आय वुइल नॉट बी युवर्स " हे ठणकावुन ठामपणे सांगणारी सिमोर वेगळी, व The illustrious son of Dharma is now bound by the obligations of morality. Ye Kauravas, I am the wedded wife of king Yudhishthira the just, म्हणणारी पतीव्रता द्रौपदी वेगळी. परंपरेलाच उखडुन स्वत:च्या नावात बदल करुन घेणारी, पुढे २३ वर्ष लहान मुलाशी पुनर्विवाह करणारी व त्याला आपले आडनाव देणारी इ.इ. परंपरेला शरण तर नाहीच प्रसंगी मॅनिप्युलेट करणारी ( रीचर्ड अजुन नवरेपणाचा हक्क सोडत नाही म्हणुन परंपरा आहे का मग पाठव मला खर्चाचे पैसे याची पत्रे पाठवुन रीचर्डवर दबाव टाकणारी चतुर खमकी सिमोर वेगळी.) आणि ध्रुतराष्ट्रा कडुन तीन वरदान मिळाल्यावरही त्याचा वापर तिच्या पतींना दास्यत्वातुन मुक्त करण्यासाठी वापरणारी (स्वत:ला नाही ) द्रौपदी वेगळी. परंपरेचाही गैरवापर न करणारी द्रौपदी, क्षत्रिय स्त्री ने दोनच वर वापरावे या मुल्य शिकवणीला प्रामाणिकपणे पाळणारी ( तीला तीन वर मिळुनही दोनच वर वापरले पुन्हा परंपरेचे पालन संधी मिळुनही परंपरेचे मॅनीप्युलेशन नाहीच उलट काटेकोर पुर्ण पालन ) अशी मागास समाजाच्या मागास मुल्यव्यवस्थेने कंडिशन्ड केलेली द्रौपदी इथे पुर्ण वेगळी आहे. एकुण प्रकरण गुंतागुंतीचे आहे तुलना गुंतागुंतीची आहे इतकेच सुचवायचे आहे. संदर्भ- १ के एम गांगुलीं यांचा मुळ संस्कृत श्लोकांचा इंग्रजी अनुवाद इथुन पुढे बघावा आपला विषय SECTION LXVI पासुन सुरु होतो. तिथुन नेक्स्ट वर क्लीक करत चला. पुर्ण संवाद सलग मिळेल. http://www.sacred-texts.com/hin/m02/m02066.htm २ आणि संबंधित मुळ संस्कृत श्लोक क्रॉस चेक करण्यासाठी भांडारकर ओरीएंटल रीसर्च इन्स्टीट्युट च्या सभापर्व ची पिडीएफ़ ची लिंक इथे. य़ात आपला चर्चेतला पहीला श्लोक येतो पान क्र, २१७ वर द्युतपर्व या भागात अध्याय क्र.६० श्लोक क्र, ००६ पासुन आपला संबंधित संवाद सुरु होतो. http://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/pdf/mbh-02.pdf

In reply to by मारवा

छान विश्लेषण! केवळ प्रासंगिक साम्यतेतून (परिस्थितीजन्य साम्यता वगळून) केलेली तुलना पटली नाही. बाकी एक प्रेरणादायी कथा म्हणून छान! अवांतर : महाभारत व रामायण यांचा (विश्वासार्ह्य: या अर्थाने कि मूळ वाल्मीकींच्या रामायणात मोडतोड ना करता) मराठी अनुवाद वाचण्यासाठी एखादे पुस्तक माहिती आहे का?

In reply to by मारवा

पण इतक्या उहापोहाची आवश्यकता नाही असं वाटतं. जर प्रस्थापिताविरुद्ध बगावत केली तर कौतुक व्हावं. पण दीर्घकाळ तो पॅटर्न मान्य केला आहे. आता बिसेट, स्वतःची त्याच्यापासून झालेली मुलगी आणि नो डेली सोप ऑफ बोल्ड-सीन्स, असा पर्याय दिसला आहे. त्यानुसार पहिल्या विरुद्ध बंड केलं, यात स्त्रीत्त्वाचा गौरव दिसत नाही.

गामा पैलवान 04/12/2016 - 14:02
नगरीनिरंजन, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
सीता, कुंती व द्रौपदीशी केलेली तुलना बरोबरच आहे.
वैयक्तिक मत. ते मांडायचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. २.
नवर्‍याच्या आनंदासाठी असो की वंश टिकवण्यासाठी असो परपुरुषाशी संग करावा लागणे हे सीमोर व कुंतीच्या बाबतीत झाले. तेच द्रौपदीचं.
माझ्या मते कुंती आणि द्रौपदी यांना परपुरुषाशी संग करावा लागला नव्हता. ३.
निव्वळ कुंती अनवधानाने म्हणाली वाटून घ्या म्हणून लगेच पांडव कंपनीने ठरवून टाकलं वाटून घ्यायचं म्हणून. तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न कोणी जाणून घेतलेला दिसत नाही.
माझ्या मते द्रौपदीला कसलीही अडचण नव्हती. एव्हढंच काय तिच्या माहेरच्यांनाही कसलाच आक्षेप नव्हता. हस्तिनापुराच्या उत्तरेस नेपाळ/तिबेट प्रांत आहे. तिथे आजही अनेकपतीत्व चालतं. आजून एक गोष्ट म्हणजे द्रौपदीस बालपण नव्हतं. त्यामुळे स्वप्नांतला राजकुमार वगैरे जशी स्वप्नं असतात तशी तिची नसावीत. ४.
सितेलाही निर्दोष असूनही सरळसरळ जंगलात सोडून देण्यात आलं.
तिला आश्रमात सोडलं होतं. जंगलात नव्हे. तिच्यावर अन्याय झालाय हे मान्य. मात्र तो रामाने केला हे अमान्य. प्रजाजनांनी आक्षेप घेतल्यानेच त्याला तिचा त्याग करावा लागला. नंतर त्याने दुसरं लग्नदेखील केलं नाही. विशेषत: दशरथाने अनेक स्त्रियांशी विवाह करण्याच्या (हल्लीच्या भाषेत बायका ठेवण्याच्या) पार्श्वभूमीवर हे वर्तन पार वेगळं आहे. ५.
ह्या स्त्रिया सीमोरपेक्षा महान होत्या; त्यांचा संघर्ष वेगळा होता वगैरे उगाच पोकळ मुद्दे मांडून आपल्या संस्कृतीची लक्तरे झाकण्याची गरज नाही.
संस्कृतीची लक्तरे? हा खमंग पदार्थ कुठल्या हाटिलात लाभतो? कुंती, द्रौपदी आणि सीता या लेडी सीमूरपेक्षा महान आहेत असं कोण म्हणतो? या चौघीही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत हे माझं वाक्य तुम्ही वाचलेलं दिसंत नाही. ६.
अगदी फुले-कर्व्यांनी काही करेपर्यंत म्हणजे दीड-दोनशे वर्षांपुर्वीपर्यंत आपल्याकडे हीच परिस्थिती होती आणि मागास ग्रामीण भागात अजूनही असेल. शोषण करण्याची कारणे फक्त वेगळी.
फुले कर्वे येण्यापूर्वी जणू सगळा अंध:कार (=जहिलीयत) होता. ते आल्यानंतर स्त्रियांचं जग एकाएकी उजळून निघालं. ते म्हणजे बायकांचे फुल्टू मसीहे का? आ.न., -गा.पै.

In reply to by nanaba

गामा पैलवान 04/12/2016 - 21:25
naanba, माझ्या मते फक्त तुम्हीच तुमचे मसीहा असता. तेंव्हा जरा सांभाळून. शिवाय जहिलीयतचं काय? फुले कर्वे यांच्या अगोदर ज्यांनी प्रयत्न केले ते नगण्य का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नगरीनिरंजन 06/12/2016 - 14:57
माझ्या मते कुंती आणि द्रौपदी यांना परपुरुषाशी संग करावा लागला नव्हता.
तुमच्या मते? तुमची संस्कृतीरक्षक (की जातरक्षक?) भूमिका आधीच माहित असल्याने पुढे वाद घालायची इच्छा नाही. चतुरंग यांना समजलेय मला काय म्हणायचेय ते आणि तेवढे मला पुरेसे आहे.
फुले कर्वे यांच्या अगोदर ज्यांनी प्रयत्न केले ते
ह्याबद्दलचे माझे अज्ञान मात्र दूर झाले तर बरेच. ह्या लोकांबद्दल थोडक्याततरी लिहावे.

मारवा 04/12/2016 - 16:03
अजून सूड पूर्ण न झालेल्या रिचर्डने तिला घटस्फोट दिलाच नव्हता. त्यासाठी त्याने तिला फ्रान्सला ४ वर्षे जाण्याची अट घातली. सीमोर फ्रान्सवरून परत आली आणि रिचर्डचा मृत्यू झाला. तिला विधवा म्हणून तिच्याच राहिलेल्या हुंड्यामधली शिल्लक मिळाली. आपले विधान जे आहे ते थोडे मला कन्फ्युज्ड करत आहे. म्हणजे मी या विषयाची माहीती मिळवत ट्राइंग टु पीसेस इट ऑल टुगेदर करतांना इथे अडखळलो. हे विधान जरासे एकांगी भासले. हे अगदी बरोबर आहे. रीचर्ड ला सुड हवा होता म्हणुन त्याने तिला मुद्दाम डिव्होर्स दिला नाही याचे कारण १- सिमोर ला डिव्होर्स न मिळाल्याने दुसरा विवाह कायदेशीर करणे शक्य नव्हते. याने तिच्या अडचणी वाढणार होत्या. २- यामूळेच सिमोर च्या हक्काची स्वतःचीच हुंड्याची रक्कम तिला परत मिळणार नव्हती कारण अजुनही लीगल पत्नीच. मात्र जो बीबीसी चा एपिसोड बघितला त्यात तिने याचा प्रतिकार फार आक्रमकतेने केलेला आहे. तिने असंख्य पत्रे पाठवुन लीगल पत्नीच्या नात्याने विविध वस्तुंची मागणी रीचर्डला करुन त्याला हे प्रकरण महागात पाडलेले आहे. हे ती खुष होउन बिसेट ला सांगण्याचा सीन आहे. बिसेट जेव्हा म्हणतो आपल्याकडे पैसे नाहीत तेव्हा मी अजुनही रीचर्डची कायदेशीर पत्नी आहे व त्याला वस्तु मागु शकते अशा अर्थाचा. व तिची असंख्य मागणीची पत्रे वाचुन हताश झालेला रीचर्ड ही एपिसोड मध्ये दाखवलेला आहे. हा एक चतुर कॅलक्युलेटेड आक्रमक प्रतिकार सिमोर ने केलेला आहे. परंपरेचा कायद्याचाच वापर करुन त्याच्यावर बाजी उलटवलेली बीबीसी एपिसोड मध्ये तरी दिसते. याला कंटाळुन थकुन रीचर्ड पडती बाजु घेऊन स्वतः तिला वाटाघाटीसाठी बोलावतो.द त्यात तो हे ही कबुल करतो की आता मी या सर्व प्रकारांनी थकलो आहे ती ही म्हणते की मी ही थकलेली आहे मग तो म्हणतो की ठिक आहे मग आपण अ‍ॅग्रीड आहोत ना ती संमती देते. हा एक सामोपचाराचा सीन आहे यात रीचर्ड तिला म्हणतो की तु फ्रान्स ला ४ वर्षासाठी जायचे आहेस आणी सीझ द एक्स्पेन्डीचर्स अशी ही अट घालतो. म्हणजे त्याच्यावर लादत असलेले खर्च थांबवावे या अर्थाने मागणी आहे. त्यावर तु मला एक्साइल मध्ये पाठवतोयस का ? असे सिमोर विचारते ? त्यावर रीचर्ड म्हणतो की तुला फ्रान्स ला जाण्यात काय अडचण आहे इंग्लंड बरोबर फ्रान्स पीस शांतता करारात आहे. तिथे तुला अनेक सांभाळ करणारे मिळतील इ. हे तो साध्या समजुतीच्या टोन मध्ये बोलतोय. तीही या प्रस्तावावर फार हताश चिडलेली आहे असे एपिसोड मध्ये तरी दाखवलेले नाही. दोन प्रौढांमधला समजुतदार सेटलमेंट असा सीन एकुण दिसतो. उलट ती पुन्हा तक्रारही करते की तु मला कधीच चेरीश केलं नाहीस इ. ही बोलणं होत. दोन्ही जण एकुण सुडभावना संपुन थकलेल्या व्हेटरन्स सारखे दिसतायत. आता त्या काळच्या परीस्थितीत सेमोर ला पॅरीस अधिक अनुकुल होते हेच ध्यानात घेऊन ही अट घातलेली दिसतेय. पॅरीस कॉन्झर्व्हेटीव्ह इंग्लडच्या मानाने तरी किमान तेव्हा पुढारलेले होते. व सिमोर सारख्या स्त्री कडे पाहण्याचा दृष्टीकोण ही उदार होता असे रुबेनहोल्ड च्या पुस्तकातील जो भाग गुगल बुक्स वर वाचायला मिळतो त्यात लेखकाने म्हटलेले आहे. तर या पार्श्वभुमीवर तुमचे चित्रण काहीस गडद व एकांगी वाटतेय. मला या विषयाचा पुर्ण अभ्यास नाही व सर्वात महत्वाची कमी म्हणजे माझ्याकडे रुबेनहोल्ड चे पुर्ण पुस्तक नाही तुकड्या तुकड्यात गुगल बुक्स वर वाचायचा कंटाळा येतो मात्र रुबेनहोल्ड चे पुस्तक अत्यंत उत्कृष्ठ आहे असे सॅम्पल पाहुन खात्रीपुर्वक वाटते. त्यात फ्रान्स इंग्लड च्या सामाजिक परीस्थितीचा संकेंतांचा परंपरांचा फार सखोल आढावा घेतलेला दिसतोय. पुस्तक फारच सखोल आहे हे नक्कीच वाचणार. पण तो पर्यंत बीबीसी एपिसोड ( जो मला वाटत पुस्तकाला मॅच च करु शकत नाही ) हा मर्यादीत सत्य दाखवत आहे असे वाटते. आणि नुसता एपिसोड बघुन तुमचे वरील विधान वाचल्यास मात्र कनफ्युजन वाढते तुम्हाला जमल्यास यावर खुलासा करावा. म्हणजे अजुन जाणुन घ्यायला आवडेल पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हा तिच्यावर झालेला अन्याय खोडण्याचा प्रयत्न नाही. हा एक व्यामिश्र विषय त्याच्या सामाजिक/ सांस्कृतिक पार्श्वभुमीत मुळातुन समजण्यासाठी केलेला माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. (आणि एक मला थोडे सिमोर शी मादाम बोव्हारी चे साम्य आढळले कर्ज खरेदी अनेक पुरुष इ.इ.) https://books.google.co.in/books?id=IQ0nCgAAQBAJ&pg=PT157&lpg=PT157&dq=reasons+behind+lady+worsley%27s+exile+to+france&source=bl&ots=Y2TRrf8IpJ&sig=3rW8nRrCsmUZ_zi3sqsYiX7cFqY&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiHudmWptrQAhVKr48KHXr8AIYQ6AEIJTAC#v=onepage&q=reasons%20behind%20lady%20worsley%27s%20exile%20to%20france&f=false हा पुर्ण भाग सिलेक्ट करुन पेस्ट अ‍ॅन्ड गो केल्यास वरील संदर्भ असलेले पान मिळते.

In reply to by मारवा

पिशी अबोली 05/12/2016 - 15:19
मारवाजी, तुमचं आणि माझं इंटरप्रिटेशन वेगळं असू शकतं. मला तुमच्या मताचा पूर्ण आदर आहे. मी पुस्तक वाचलेलं नाही, नाहीतर त्याचा उल्लेख लेखातच केला असता. तुम्हाला माझं चित्रण एकांगी वाटलं असेल, तर त्याचा आदर आहे. मात्र, हा लेख पूर्णपणे त्या एपिसोडची ओळख करून देण्यासाठी लिहिलेला नाही. एखाद्या व्यक्तिरेखेला नाट्यरूपात आणताना गडद केले जाते. सीमोरने चतुराईने रिचर्डला त्रास देणे, अतिशय बोल्ड कविता लिहिणे, यात काही तथ्यांश असेलही, पण इंटरनेटवर मला तसा संदर्भ सापडला नाही म्हणून मी तो टाळला. बाकी, आधीच लिहिल्याप्रमाणे मूळ रामायण-महाभारतातले संदर्भ घेऊन मी या धाग्यावर बोलणार नाही कारण इथे त्याचे प्रयोजन मला वाटत नाही. धन्यवाद.

५ ऑक्टोबर १९५८ ते ९ सप्टेंबर १८१८, असा ६० वर्षांचा जीवनपट आहे. १७ व्या वर्षी रिचर्डशी विवाह. रॉबर्ट या पहिल्या मुलाचा अकाली मृत्यू. २३ व्या वर्षी (ऑगस्ट १९७१), बिसेटपासून जेन नांवाची मुलगी. पण लोकापवाद टाळण्यासाठी रिचर्डनं ती आपलीच आहे म्हटलं. एकूण सत्तावीस पुरुषांशी संबंध असल्याची वदंता. नोव्हेंबर १९७१ ला बिसेटबरोबर पलायन. त्यावर रिचर्डनं बिसेट विरुद्ध २०,००० पौंडाचा दावा ठोकला. कोर्टात सिमोरनं (बिसेटला वाचवायला), ज्या पुरुषांशी संबंध आले होते आणि सांप्रत चालू होते अशांची साक्ष काढली. दावा रिचर्ड विरुद्ध जाण्याची दोन कारणं झाली. (१) रिचर्डनं बिसेटला सिमोरचं, स्नानगृहातलं नग्नावस्थेत दर्शन घडवलं होतं. (२) विल्यम ऑसबॉर्न या डॉक्टरनं, सिमोरला जेम्स ग्रॅहमशी संबंध ठेवल्यामुळे गुपप्तरोग झाला होता, अशी साक्ष दिली. परिणामी रिचर्डला दाव्यापोटी, फक्त १ शिलींग डॅमेज मिळालं. बिसेटनं सिमोरला सोडण्याचं कारण असं की ती रिचर्डपासून सेपरेशन मागत होती, डिवोर्स नाही. त्यामुळे रिचर्ड जीवंत असेपर्यंत सिमोरशी विवाह शक्य नव्हता. आता सिमोरला जगण्यासाठी, हाय-प्रोफाईल गणिका व्हावं लागलं. पुढे सिमोर कर्जबाजारी झाल्यानं, तिला पॅरीस सोडावं लागलं. १७८८ मधे नवा प्रियकर, जोसेफ बोलोग्नेबरोबर इंग्लंडला आगमन. तिथे रिचर्डशी सेपरेशन करारवर सह्या. त्यात (इतका गोंधळ घातल्याची शिक्षा म्हणून) फ्रांसला ४ वर्ष रवानगी. १७९७ ला सिमोर पुन्हा इंग्लंडला. १८०५ मधे रिचर्डचा मृत्यू. ७०,००० पौंड मिळाले. त्या वेळी ही ४७ वर्षांची. १२ सप्टेंबर १८०५ ला (म्हणजे ४७ व्या वर्षी) पुन्हा, २६ वर्षाच्या जॉन लेवीसशी लग्न! ९ सप्टेंबर १८१८ ला मृत्यू . ही घ्या लिंक मी पहेले छूटच बोललेलो की २७ रिळांचे बोल्ड सीन्स करायची गरज नव्हती.

In reply to by संजय क्षीरसागर

२३ व्या वर्षी (ऑगस्ट १७८१), बिसेटपासून जेन नांवाची मुलगी. पण लोकापवाद टाळण्यासाठी रिचर्डनं ती आपलीच आहे म्हटलं.

In reply to by संजय क्षीरसागर

मी पहेले छूटच बोललेलो की २७ रिळांचे बोल्ड सीन्स करायची गरज नव्हती. संक्षी काका, लेडी सीमोरने किती बोल्ड सीन्स कोणाबरोबर करायचे किंवा करायला हवे होते हे तुम्ही ठरवणार का ? की हे नविन मोरल पोलिसींग ? तिने स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी बोल्ड सीन दिलेही असतील. तिचा प्रश्न. बाई मोठी धाडसी असणार. बाकी तिच्यावर किती अन्याय झाला वगैरे गळेकाढूपणा फोल वाटतो इथपर्यंत ठीक आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

ज्योक आहे हो तो ! मला काय पडलीये तिची ? बाकी तिच्यावर किती अन्याय झाला वगैरे गळेकाढूपणा फोल वाटतो इथपर्यंत ठीक आहे. तेवढ्यासाठीच तर दुनियेपेक्षा वेगळा विचार मांडलायं ना!

गामा पैलवान 05/12/2016 - 18:44
पिशी अबोली,
आधीच लिहिल्याप्रमाणे मूळ रामायण-महाभारतातले संदर्भ घेऊन मी या धाग्यावर बोलणार नाही कारण इथे त्याचे प्रयोजन मला वाटत नाही.
तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर आहे. पण सीता, द्रौपदी अशी नावं घेतली तर रामायणमहाभारताचे उल्लेख येणं अपरिहार्य आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पिशी अबोली 05/12/2016 - 20:03
गामा पैलवानजी, ज्या पद्धतीने हे संदर्भ लेखात आले आहेत, ती अतिशय नवीन पद्धत आहे का? या कशाशीच संबंध नसणाऱ्या 4 भारतीयांना तुम्ही विचारलेत, तर त्यांना 'मूळ' महाभारतातील संदर्भ माहीत असतील का या लेखातील? दुसरं, पुन्हा पुन्हा 'मूळ' म्हणून उल्लेख केला जात आहे म्हणून, हा वाद घालणाऱ्यांना लोककथांमधील रामायण आणि महाभारत नाकारायचं असेल, तर तो त्यांचा निर्णय आहे. मला मात्र भांडारकरच्या एडिशनइतकीच जनमानसात रुजलेली रामायणे आणि महाभारते जवळची वाटतात. महाभारत आणि रामायणाच्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या संस्कृत एडिशनमधील संदर्भ घेऊन चर्चा करायला मला फार आवडेल. पण इथे त्याचे प्रयोजन मला वाटत नाही. हा रिसर्च पेपर नाही. अगदी मिपावरचा संस्कृत रामायण-महाभारतात प्रक्षिप्त भाग किती, अशा प्रकारची काही चर्चा असणारा धागाही नाही. रामायण-महाभारताचे संदर्भ आले, की ते प्रमाण मानल्या गेलेल्या प्रतीबरहुकूम असले पाहिजेत असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. जर कुणाला वाटत असेल, तर त्याचा आदर आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. अजून एकच- कदाचित बऱ्याच जणांनी इथे केलेले उल्लेख भांडारकरचे आहेत. भांडारकरच्या महाभारत प्रकल्पाला माझ्या स्मृतीप्रमाणे 'क्रिटिकल एडिशन' म्हणतात,'ओरिजिनल महाभारत' नव्हे. तीही लिखित एडिशन आहे, manuscripts चा अभ्यास करून केलेली. Oral महाभारतांचं असं डॉक्युमेंटेशन अजून झालेलं नाही, म्हणून भांडारकरच्या एडिशनचं महाभारत तेच मूळ, असं म्हणणं मला पटत नाही. मला वाटतं माझी बाजू मी शक्य तेवढी मांडलेली आहे. माझ्या मतस्वातंत्र्याचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by पिशी अबोली

गामा पैलवान 06/12/2016 - 13:34
पिशी अबोली, मूळ प्रत वापरण्यासंबंधी तुमच्या मतांचा आदर आहे. :-) संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची मूळ प्रत सिद्ध केली होती. त्याप्रमाणे रामायण आणि महाभारताच्या मूळ प्रती सिद्ध करण्याची गरज आहे. बाकी, मूळ प्रतीचा आग्रह धरण्यामागे एक कारण आहे. न घडलेल्या घटनांचा हवाला देऊन राम, कृष्ण, युधिष्ठिरादि पुरुषांची मानखंडना केली जाते. सीता, द्रौपदी यांच्यावर जो अन्याय झाला तो या पुरुषांमुळे अशी काहीशी भावना वाढीस लागण्याचा धोका आहे. तो टाळण्यासाठी मूळ प्रतीचा आधार घेतलेला बरा पडेल (असं माझं मत). आ.न., -गा.पै.

In reply to by पिशी अबोली

लोककथांमधील रामायण आणि महाभारत
लोककथांमधील रामायण महाभारत हे जर मूळ संदर्भांचा विपर्यास करणारे असेल तर ते खोडुन काढावेच लागेल . आणि तसे न करता उगाचच भलत्याच कथा लोककथांच्या नावाखाली पसरवायच्या असतील तर तशा त्या सीमोर मॅडमच्याही मिचाक पसरवता येतीलच की ! महाभारतात १८ पर्वे + रामायणाची ७ कांड एकत्र केले तरीही सीमोर मॅडमची तर २७ कांडांची तुलना होणार नाही .... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

गामा पैलवान 05/12/2016 - 18:50
हतोळकरांचा प्रसाद,
महाभारत व रामायण यांचा (विश्वासार्ह्य: या अर्थाने कि मूळ वाल्मीकींच्या रामायणात मोडतोड ना करता) मराठी अनुवाद वाचण्यासाठी एखादे पुस्तक माहिती आहे का?
इथे महाभारताची अनुवादित आवृत्ती (मूळ संस्कृत श्लोकांसाहित) आहे : https://www.scribd.com/collections/14820370/Mahabharat-marathi आ.न., -गा.पै.