मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्हेंन्टीलेटर

नाखु · · जनातलं, मनातलं
स्थळः बागेच्या दाराशी असलेली नेहमीची भेळेची गाडी. पात्रे: किमान १५-२० वर्षांपासून गाडी लावणारे भेळवाले काका. आपल्या मावशीबरोबर आलेली शुभदा सोबत तीची दहा वर्षाची क्षिप्रा. शुभदाची मावसबहीण वैशाली सोबत तीचा ११-१२ वर्षांचा अनय. आणि अर्थात मावशी वय अदमासे ५५-६०. शुभदा "भय्या मेरी भेल जरा कम तीखी,और बेटीकी जरा मीठी करना. भेळवाला :ताई मराठी येते मला तुम्ही मराठीत बोला,या ताईंशी मराठीत बोलताना पाहिले मी.काय मावशी कश्या आहात? मावशी: अरे आज भाच्या आल्यात त्यांना घेऊन आले बागेत त्यांच्या आवडीची भेळ खायला .आणि शुभे हा मराठीच आहे तू का त्याच्यासमोर हिंदीच्या चिंध्या फाडतेस. भेळ दिल्यावरः "क्षिप्रु माझ्यातली भेळ खाऊन बघ जास्त तिखट नाहीये पण टेस्टी आहे बघ" "हो ग आई स्पाईसी वाटते पण मस्त टेष्ट आहे, अजून एक चमचा घेऊ का?" "शुभे अनयला जरा तिखटच आवडते पण इथली जास्त तिखट नाहीये ना गं " "ताई काळजी करू नका त्याच्या बेतानेच तिखट बनवली आहे,काय दादा आवडली का रे ही भेळ" "काका मस्त आहे तिखट आहे पण चालेल इतकी तिखट" ================================ "यार हे चिटींग आहे राव" शीर्षक भलतेच आणि खाली लिखाण भलतेच. नाही नाही मी विचारवंत किंवा गेला बाजार मनाची अर्त स्पंदने शोधणारा मिपा तज्ञ झालो नाही. ======================================== मावशी अशी भेळ घरी करता येईल ना ग ? "ए आज्जी घे ना त्या काकांना विचारून काय काय टाकलय ते या भेळेत?. पुढील संवाद आपल्या मगदूराने आणि कल्पनाशक्ती नुसार. ******************** सिनेमाची कथा तशी अगदी साधी आणि दोन ओळीत मावेल अशी मोठ्ठ्या कुटुंबातील (म्हणजे अता विखुरलेल्या) एका गजाकाकाला अत्यवस्थ झाल्याने इस्पीतळात दाखल केले आहे. आजार गंभीर असल्याने अगदी व्हेंटीलेटर वर आहे (जीवन रक्षक प्रणाली) आता त्या अनुषंगाने पुढे सरकणारी कथानके म्हणजे, रूग्ण असलेला गजाकाका आणि त्याचा मुलगा प्रसन्ना (जितेंद्र जोशी) ,ज्याला मुलासारखा जीव लावला तो पुतण्या राजा (आशुतोष गोवारीकर्),मोठा भाऊ व राजाचे वडील (सतीष आळेकर).कन्या (सुकन्या) आणि बहीण (उषा नाडकर्णी).बाकी पात्रे कथेच्या ओघात आणि परिघाच्या आत बाहेर (केंद्र बिंदू समान अंतरावर ठेऊन). अता इतकी सरधोपट कथा असूनही विशेष काय आहे असा प्रश्न सजग चौकस मिपा वाचकांना पडला असेल्च. तर त्याचे उत्तर आहे हाताळणी आणि समांतर कथेचा (व्यक्त्/अव्यक्त) प्रवास. प्रसन्ना हट्टाने राजकारणी झाल्याने त्याच्या सरळमार्गी वडीलांशी त्याचे पटत नाही,बराचसा अबोला आणि दुरावाच आहे त्या नात्यात. अग्दी तसेच राजा आणि त्याचे वडील यांच्यातही आहे,राजा (वडीलांच्या ईच्छे विरूद्ध जाऊन) सिनेमा दिग्दर्शक असल्याने वडीलांच्या जुन्या सवयी त्याला गांवढ्ळ वाटतात.
बाकीचे नातेवाईक म्हटलं तर सांत्वनाला (आणि कोकणातील गणपतीवर सूतकाचे सावट येउ नये या करिता आलेले) आणि खरे तर इस्टेटीची बोलणी वाटप रुजुवात करायला आलेली आहेत.
हा सगळा प्रवास पुर्ण सिनेमात अगदी शेवटची १५-२० मिनिटे सोडली तर अगदी खेळकरपणे आणि हास्यविनोदातून घेतला आहे.मार्मीक टिप्पणी,कोकणी स्वभावाचे थेट दर्शन्,फटकळपणा,राजकीय खेळ्या,दांभीकता,हे सगळे पडद्यावर पाहूनच अनुभवण्यासारखे आहे. प्रसन्नाला वडीलांबाबत असलेला पुर्वग्रह आणि अव्यक्त राग निवळतो का? राजाला या सगळ्या प्रसंगातून बोध होतो का? राजाचा दुसरा चुलत भाऊ हा या सगळ्या गोंधळाकडे निर्लेपणाने आणि सहजतेने बघत असतो. त्याची वेगवेगळ्या प्रसंगी केलेल्या टिपण्ण्या सूचक आणि मार्मीक आहेत.(प्रसंगी अंतर्मुख करायला लावणार्याही) सिनेमाचे बलस्थान अचूक पात्र निवड हे आहे. राजाचे वडील आळेकर एक्दम सोळा आणे काम. राजा मराठीत आशुतोष अगदी सहजतेने वावरला आहे प्रसन्ना : या सिनेमा साठी मी जित्याचे बाजीचे पाप माफ करायला तयार आहे इतके चांगले काम. हसवण्यासाठी निखिल रत्नपारखी,राहुल सोलापुरकर आदींनी यशस्वी फलंदाजी केली आहे. सगळ्यात तटस्थ पण मार्मीक भाष्य करणारे पात्र म्हणून बोमन इराणी यांनी पाच-सात मिनिटात एकदम झक्कास काम केले आहे. काहींना शेवट मेलो ड्रामाटीक वाटेल पण जे या प्रसंगातून स्वत: गेले आहेत त्यांना त्यात नाट्यमयता कृत्रीमता वाटणार नाही. माझ्या जखमा ओल्या असल्याने (माझ्या नकळत ) आसवे आपसूक आली.कन्या कावरी बावरी होतेय हे पाहून लपवण्याचे नाटक करावे लागले.कन्या आणि लेकालाही सिनेमा आवडला. ======

अता हरिदासाची कथा मूळपदावर भेळ ही सगळ्या जिन्नसांची मिळून बनते प्रत्येकाला स्वतंत्र अस्तीत्व आहे पण एकमेकांच्या सहवासात त्याची स्वतंत्र चव जाऊन एक वेगळी पण स्वादीष्ट चव येते त्या भेळीला. अता कुणाला आंबट गोड आवडेल कुणाला कमी तिखट कुणाला जहाल तिखट पण , एक दुसर्याच्या प्लेटमधील एखादा घास खाऊन पाहिला तरी भेळ खाल्ल्याचे सार्थक होईल. भेळेची चव पुढचे दोन तीन दिवस रेंगाळली पाहिजे जीभेवर.

अगदी तशी जमून आलेली भेळ आहे ही. वि.सू. कथानक सांगीतल्याने कुणाचाही हिरमोड होणार नाही अशी अपेक्षा आहे. एक्दा तरी बघावा असा सिनेमा आहे. ======================
तळ टीप "यार हे चिटींग आहे राव" हे वचन आमचे मिपास्नेही प्रगो यांचे असून लेखा पुरते उधार घेतले आहे.

वाचने 10857 वाचनखूण प्रतिक्रिया 33

चांदणे संदीप 07/11/2016 - 12:05
मस्त चित्रपरिचय!! आता आवडेल चित्रपट पाहायला! :) Sandy

अजया 07/11/2016 - 14:44
ओळख आवडली. सिनेमा शनिवारी पाहिला.बेस्टच आहे.

स्वाती दिनेश 07/11/2016 - 19:38
तुमची भेळ मस्त जमली आहे. ह्या सिनेमाबद्दल उत्सुकता आहे. कधी आणि कसे जमते बघायला ते पाहू. स्वाती

विखि 07/11/2016 - 20:17
सध्या सगळीकडे हेच घडतय हे जाणवल, प्रसना आनी राजा सारखी पोर काही फार वेगळी नाहीयेत.

सुधांशुनूलकर 07/11/2016 - 21:16
व्हेंटिलेटर बघायचा असं ठरवलं होतंच, हे परीक्षण वाचून नक्की केलंय.

निओ१ 07/11/2016 - 21:22
असे लेखन चित्र्पट येऊन गेल्यावर काही दिवसांनी लिहलेले उत्तम राहिल असे वाटत आहे. हे माझे मत आहे. व्यक्तीगत आहे, राग आहे.

खेडूत 07/11/2016 - 21:22
परीक्षण आवडले. आशुतोष मराठीत सहजपणे वावरणारच. मराठीच आहे ना! कच्ची धूप मालिकेपासून आपण त्याचे अन भाग्यश्रीचे पन्खा आहोत. नक्की बघणार हा. याशिवाय इतके रंगमंचीय कलाकार एकत्र असल्याने बघणीय असेलच..

सिरुसेरि 08/11/2016 - 18:22
भेळ जशी घरच्यांबरोबर , मित्रांबरोबर मिळुन खाल्ली की तिची लज्जत अजुन वाढते , तसाच हा सिनेमा जर ग्रुपने पाहिला तर तो अजुन मनाला भावतो असाही एक विचार हा लेख वाचुन आला .

नीलमोहर 09/11/2016 - 13:24
परीक्षण भारीच लिहीले आहे, चित्रपट जमल्यास बघण्यात येईल,

चौथा कोनाडा 18/11/2016 - 08:55
सिनेमा पाह्यला , आवडला !! संख्येने जास्त असलेल्या पात्रांची सुरेख वीण घालणारी पटकथा !! विनोदी प्रसंग पाहता पाहता आपल्या मनाच्या बॅकग्राऊंडला व्हेंटीलेटर सतत जागा राहतो! छोट्या छोट्या खेळकर प्रसंगानंतरच्या शेवटच्या वीस पंचवीस मिनिटांत कथा रिलेशनशिप वर आणण्याचं कौशल्य थक्क करणारं आहे एक सुंदर सिनेमा पाहिल्यांच समाधान मिळते. जरूर पहा व्हेंटिलेटर !!