मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पॉईंट झीरो

अभ्या.. · · जनातलं, मनातलं
झीरो ................ "चला राजं, नवं साह्याब आलंत रेस्ट हाऊसला. पीआय साह्यबानं सांगीतलय. जाऊन येऊ." रेस्ट हाऊसला सगळा थाटच, लाल दिवा मिरवत बाहेर थांबलेली अ‍ॅम्बॅसेडर, दोन जीपा, चार पाच सफारीवालं, दोन इन्शर्टात गॉगल मिरवणारं. एक जण फाईल घिवून भईर आला की मोरेदाजीनी वर्दी दिली. रव्याला घीवून आत घुसले तसा साह्यब फिरुन बघितला. खालमानेच्या रव्याकडे डोसक्यापासून पायापर्यंत पहात मोरेदाजीवर कडाडला. "काय मोरे, युनिफॉर्म बदलला का नियम बदलले परस्पर? आँ" "न्हाई सोनकांबळे साहेब, मी आहे की. ह्ये कॉन्स्टेबल न्हाई, झीरो आहे, गावचाच आहे आपल्या. रवी जाधव नाव हाय, आपल्या पाव्हण्यातलाय. वळकत असताल तुम्ही बी, आयकलाव की हितलेच हाव ना तुम्ही" ....................... मोरेदाजीची पडकी भाषा ऐकताच रव्याचा फणा उठला. ताठ मानेनं साह्यबासमोर उभारला. "दाजी चलतो मी, जातीच्या न पुस्तकाच्या जीवावर हितं बसलंय हे. दोनदा कुत्र्यागत हाणला ते विसरलंय. चला" "आऊट, आय से." उपजिल्हाधिकारी नितीन सोनकांबळेचा शांत आवाज आला. ...................... "लका रव्या, तुझा क्लासमेट होता ना, घ्यायचं की धीरानं. लावला असता कुठं तर ज्याक" "न्हाई दाजी, हे काय खरं न्हाई. ह्याच्या ज्याकनं वर चढाया आपण रस्त्यावर न्हाई. दारात कधी उभा केला न्हाई ह्याला, आता त्येचं उंबरं झिजवायाची ड्युटी होत नसती बघा." "आरं पण जमाना बदलला आता, काय घेऊन बसला जातनपात, आपण बरं, आपलं घर बरं" "न्हाई तर, जमत नाही. पाटील साह्यबाला गाठावं लागतया. बघतो कायतरी त्येंच्याकडं" "आरं आयक रव्या, पाटील मुलखाचा चोर बोड्याचा. ही कर ड्युटी. करु आपण कायतरी" "दाजी, जातीसाठी माती खाईन पण असला अपमान नको. सोडा मला" ....................... पाटलाचा दरारा मोठा तसा व्याप बी मोठा. दोन डेर्‍या, कारखाना, पतसंस्था न एक बँक बुडाखाली दाबलेली. वाड्यावर शे दोनश्याचा राबता कायम. रव्याची वर्दी कुठं लागावी हे पीए सावंताला कळंना. रव्याचं डोस्कं गरम. पटकन हात उचलला जायचा. त्यात डोक्यात जात बसलेली. युनिफॉर्मच्या वेडात अंगात असलेली मग्रुरी उतरंना. शेवटी पतसंस्थेच्या वसुली पथकात भरती झाली. जीपमध्ये थाटात फ्रंटसीटवर बसून गावोगाव फिरायला रव्याला भारी वाटायलं. चार गरीबाचं बकुटं पकडून कागदं फेकायची मजा अलग वाटायली. मॅनेजर सांगायचा मागं. "हे कुळं असलीच बघा जाधव. आपल्या साह्यबांची मया आड येती. कर्ज घेतेत, द्यायच्या नावानं बोंब" रव्याला पण साह्यबाचा पैसा आपला पैसा अशी सुरसुरी यायची. रोज दोन तीन तरी खाती वसूली केल्याबिगर घरी येऊ वाटंना. वसूली संपत आली तशी इलेक्शन लागली. साह्यबांनी थाटातच शहरगावच्या सिक्युरीटीचे बौंसर लावले शो करायला. त्यांना मार्गदर्शनाला दिला रव्या. सिक्युरीटीने एक मापातला सफारी आन शोचं पिस्टल रव्याला दिलं. मजबूत बुट चढवून, टाईट सफारी आन आर्मीकट मारलेला रव्या थाटात उभारायला पाटलासंगं. जणू काय पंतप्रधान राष्ट्रपतीमागं उभारल्याचा आव घेऊन. इलेक्शनच्या धुराळ्यात माय न घराकडं लक्ष बी देण हुईना. मम्मी दोन दिवस तापानी फणफणली न म्हातार्‍याने अ‍ॅडमिट केलं. रव्यामागच्या सभा न प्रचार काय संपनांत. रात्री दावखान्यात गेला तर डॉक्टरानी ३० हजाराची जुळणी सांगितली. आता असल्या धुरळ्यात पाटलाकडं मागायची सोय नव्हती. सावंत पीएला सांगितले तर सकाळी ये म्हणला बंगल्यावर. सकाळी बंगल्यावर जाताच पाटील समोरच झोपाळ्यावर बसलेलं. "अरे कॅप्टन या या. राजं तुमची मेहनत रंग आणतीय बरका. असे मावळे असले की गड आपलाच ओ" "पण साहेब तेवढं सावंत सोयर्‍यांनी सांगितलय न्हवं" "काय झालं राजं, काळजी करु नका. तुमची माऊली, आमची माऊली, एकच ओ. जावा बिनधास्त पतसंस्थेत." "पण तिथं हुईल ना काम? नाही म्हनजे..." "जावा कॅप्टन, आपलीच हैत सगळे" ............................. पतसंस्थेत जाताच मॅनेजरने आत बोलावून घेतला रव्याला. काय न बोलता हातात हाजाराच्या दोन नोटा कोंबल्या. "पण साहेब, नड ३० ची हाय ओ, मागचं पेमेंट बी दिलं नाही अजून" "हे बघा जाधव, वरनं सांगितलं तेवढं दिलं, या आता तुम्ही" "आर्र साह्यबानी सांगितलंय, कळंना व्हय. फोन लावा साह्यबांना, ३० ची नड आन दोन हजारात कशी भागवू" इतकं बोलत रव्याचा आवाज चिरकायला. साह्यबाला फोन लावून ५ मिनट्ं मॅनेजर हूं हूं करत राह्यला. शेवटी दिला फोन आस लावून बसलेल्या रव्याला. "हे बघा कॅप्टन, दिलेत तेवढं घ्या. सिक्युरीटीवाले बी गेलेत परत आता. आचारसंहिता लागलीय आता. संपलं काम. त्याचं युनिफॉर्म आन शूज तेवढं ठीवून जावा. निघा" दारापर्यंत पोहोचलेल्या रव्यानं मागं वळून पाह्यलं. स्टाफ सकट भल्या दांडग्या फोटोतलं पाटीलसाहेब आपल्याकडं बघून हासतेत काय वाटायलं. शांतपणे दारातल्या बाकावर बसून काढला तो बुट अन भिर्रदिशी कॅशिअरच्या केबिनवरुन पाटलाच्या फोटोकडं भिरकावला. ................................

वाचने 14654 वाचनखूण प्रतिक्रिया 56

आम्ही असेच बरबाद झालो. नशिबी कुत्र्याची जीनगानी आली, अन मिसळपाववरच निःसंग कुत्रा होता आले. इमान अबाधित त्यामुळे मालकाचा बाजार उठवता येईना अन पोटाला भाकरी नाही म्हणून थांबता ही येईना. अभ्या सर, आमची जिंदगी उभी केलीत तुम्ही आमच्याच समोर. निघतील आमच्याही पाटलांचे किस्से पुढे मागे कधी अंमल जास्त झाल्यास. (केविलवाणा) ढेल्या

शलभ 21/09/2016 - 20:45
मस्त लिहीलीय.. अशा गोष्टींमुळेच मोर्चे व्ह्यायला लागलेत काय..जातीचा वॄथा अभिमान, पुढार्‍यांनी कामापुरतं वापरणं, तथाकथित हलक्या जातींना कमी लेखनं..

अभ्याच्या कथेच सार जातीत शोधायचं म्हणलं तर ती व्यर्थ जाइल. अभ्याची(च) परवानगी असली तरच ह्या कथेचे एक विडंबन करावे म्हणतो रे भावा,चालणार असले तर कळव. कथ आवडली हे वेगळे सांगायला नकोच.

In reply to by बॅटमॅन

अभ्या.. 21/09/2016 - 23:52
कुठली ताकद न कुठलं काय बॅट्योबा, दोस्त हाय आपलं ते रव्या. नावगावनपत्त्यासहित सगळा खरा. १०० टक्के. ये कवा बी, भेटू घालतो.(नाराज हाय सध्या आमच्यावर पण भेटायला नाय म्हननार नाय)

झेन 22/09/2016 - 21:22
भिडलं राव तुमचं लिखाण. प्रातिनिधीक वाटलं, शेवटच्या क्षणापर्यंत जो वापरला जातो त्याला वापरणा-याचा लै म्हंजे लै अभिमान जसं कसायाला गाय वश.

शिव कन्या 23/09/2016 - 08:46
अभ्या भौ, दोन्ही भाग आवडले. स्पर्धा परीक्षांत पास होण्यासाठी काय काय करणारी गल्लीबोळातल्या क्लासेस मधली सगळी पोरं झटक्यात डोळ्यासमोर तरळली..... त्यात अपेशी ठरलेल्याचे पुढे काय काय म्हणून होते, लिहू पुढे कधीतरी. सकस लेखन! लिहित रहा.

टर्मीनेटर 26/06/2019 - 19:22
मगाशी झैरात वाचली झीरोची म्हणून आलो, पुढचा भाग पॉईंट झीरो पण वाचला आणि समाधान झाले... मध्यंतरी जेम्स वांड ह्यांच्या कथेवर प्रतिक्रिया देताना मि जव्हेरगंज आणि ते ग्रामीण भाषेत चांगले लिहितात असे म्हंटले होते, पण तुम्हालाही ति कला (शैली) चांगलीच अवगत आहे. झैरात वाचून येऊन समाधानी झालेला कष्टमर. टर्मीनेटर

Rajesh188 26/06/2019 - 20:01
खूप मस्त लिहलय समोर घडतंय असे वाचताना वाटत. कथेचा जो नायक आहे तशी लोक आजूबाजूला वावरत असतात. खूप कष्ट करून सुद्धा जीवनाच्या रंगमंचावर हरलेल्या अशा लोकांचं खूप वाईट वाटत. अस्वस्थ होत मन. त्यातून काही सावरतात तर जे भावनाशील असतात ते निराशेने ग्रासले जातात आणि व्यासनच्या आहारी जावून ५० शी chya आताच जीवन संपवता त

Rajesh188 26/06/2019 - 20:02
खूप मस्त लिहलय समोर घडतंय असे वाचताना वाटत. कथेचा जो नायक आहे तशी लोक आजूबाजूला वावरत असतात. खूप कष्ट करून सुद्धा जीवनाच्या रंगमंचावर हरलेल्या अशा लोकांचं खूप वाईट वाटत. अस्वस्थ होत मन. त्यातून काही सावरतात तर जे भावनाशील असतात ते निराशेने ग्रासले जातात आणि व्यासनच्या आहारी जावून ५० शी chya आताच जीवन संपवता त

जेम्स वांड 03/07/2019 - 07:08
लैच जबर अन जिमीनीला धरून लिवतो गड्या तू. हे असलं अंगात जातीची माती असणं अन जातीतल्या लोकांनीच नाडणं म्हंजी खास लक्षण गावाकडील!. काय बोलाय लगा, लैच आटवनी चाळीवल्यास, सरसोती माय तुला बी परसन्न हायेच तितकं लिवत र्हावा!. (पूर्वाश्रमीचा रव्या न अजून बी यका कंपनीचं झीरो) वांडो

गणेशा 25/08/2025 - 23:24
निव्वळ अप्रतिम... प्रत्येक पात्र डोळ्यासमोर उभे राहिले.. कथेचा नायक रुबाबदार पण त्याची अवस्था, त्यामागचे प्रसंग जबरदस्त.. मला तरी हि खरीच गोष्ट वाटतेय... अप्रतिम.