(कोणताही रहस्यभेद/रसभंग होऊ नये अशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे)
वा! काय झटका बसला राव. अगदी नटबोल्ट हलून गेले. जिभेची चित्र-चव हल्ली, तेच तेच भंगार साजिदछाप विनोद, सलमानछाप भीमउड्या, शाहरुखछाप मर्कटलीला आणि आचरट, अतर्क्य प्रेमकथांचा रतीब पाहून रद्दीत गेलेली होती, ती या 'उडता पंजाब' नामक झणझणीत मिर्चीच्या थेंबाने आधी खवळली, मग तृप्त झाली. शाब्बाश लेको!
निदान चोवीस तास चित्रपट डोक्यातून जाणार नाही याची खात्री असू द्या!
सर्वात आधी, सेन्सॉरशी खमकेपणाने लढून, न्यायालयाकडे दाद मागून, आर्थिक नुकसानाचा धोका पत्करून हा चित्रपट हट्टाने जसाच्या तसा ठेवल्याबद्दल निर्मात्यांचे अभिनंदन. भक्त पहलाज आणि तत्सम संस्कृतीरक्षक कंपूच्या कानपुराखाली लालबाग काढणारा न्यायालयाचा सणसणीत निर्णय हा यापुढे अधिकाधिक निर्माते-दिग्दर्शकांना धैर्य देणारा ठरेल.
'उडता पंजाब' या चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे मूळ विषयाशी कुठेही न केलेली तडजोड. चित्रपटात अनेक सुपरस्टार आहेत. पण केवळ त्या कारणासाठी हिंदी सिनेमात व्यक्तिरेखांची मूळ रूपे बदलली जातात (आठवा: नृत्यकुशल बँक कारकून कटरीना) किंवा ऐनवेळी फासे फिरवून एखाद्या कलाकाराला झुकते माप दिले जाते किंवा कथा पलायनवादी मार्गाने नेली जाते तसे इथे होत नाही.
याचा असाही अर्थ होतो की प्रेक्षकांनी मनाची त्या दृष्टीने तयारी करूनच हा चित्रपट पहावा.
दुसरी जमेची बाजू म्हणजे कलाकारांनीही "माझ्या चाहत्यांना काय वाटेल?" या भीतीला थारा न देता धीटपणे स्वीकारलेल्या चाकोरीबाह्य भूमिका आणि जीव तोडून केलेला अभिनय. विशेषतः शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांना पाहून 'भूमिकेचे सोने करणे' या शब्दमालेचा खरा अर्थ कळतो. पंजाबी चित्रपटांचा नायक दिलजीत दोसंझ हाही आपल्या या राष्ट्रीय पदार्पणात भरपूर वाहवा कमवेल. लहान सहाय्यक भूमिकांमधील कलाकारही अप्रतिम आहेत.
तिसरा मुद्दा: बांधेसूद पटकथा. १४० मिनिटांचा लांबलचक चित्रपट असला तरी कुठलाही भाग उगाच ताणलाय असे वाटत नाही. प्रत्येक दृश्य महत्वाचे आहे आणि पुढच्या प्रसंगाशी जोडलेले आहे. तीन समांतर कथांची केलेली गुंफण कौशल्यपूर्ण आहे. व्यक्तिरेखा आणि संवाद अतिशय वेधकरीत्या लिहिलेले आहेत. ज्या अपशब्दांमुळे चित्रपट सेन्सॉरने अडवला होता, ते कथानकाच्या आणि दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून अपरिहार्य आहेत. (अपरिहार्यतेचा मुद्दा बाजूला ठेवला तरी व्यक्तिशः मी सेन्सॉरबोर्डाला पूर्णपणे रद्दबातल करावे या मताचा आहे). अंमली पदार्थांचा घट्ट होत चाललेला भयावह विळखा अख्ख्या समाजालाच कसा हतबल करीत आहे, हे समष्टीचे चित्र लेखक-दिग्दर्शक यशस्वीपणे उभे करतात.
चित्रपटात पंजाबी भाषेचा सढळ वापर केलेला असल्यामुळे मराठीभाषिक प्रेक्षकांच्या रसास्वादात अडथळा येण्याची शक्यता आहे. मी पाहिलेल्या खेळाला (उत्तर भारतातील शहर असूनही) इंग्रजी उपशीर्षके होती.
चौथा: असे सर्व असूनही मनोरंजनमूल्य या कसोटीवर चित्रपट चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो. अर्थात मनोरंजन कशाला म्हणतात याबद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असते. "आपल्याला बुवा नाचगाणं, कॉमेडी, मारामारी, परदेशात शूटिंग, एसीची हवा, सामोसे, पॉपकॉर्न, शिट्ट्या-टाळ्या, हुल्लड असा फुल तीन तास टाईमपास पाहिजे" असा विचार बाळगणारे कदाचित माझ्याशी सहमत होणार नाहीत. (व्यक्तिगतरीत्या मी फक्त चांगला आणि वाईट असे चित्रपटांचे दोनच प्रकार मानतो.) मी उत्तर भारतातील एका लहान पंजाबीबहुल शहरात हा चित्रपट पाहिला. सिनेमा सुरू झाला आणि तीन-चार कुटुंबवत्सल लोक पहिल्या पंधरा मिनिटांतच बायकापोरांना घेऊन चालते झाले. पहिल्या संवादापासून सुरू झालेली अनिर्बंध पंजाबी शिवीगाळ त्यांना सहन झाली नव्हती हे उघड होते. (या सिनेमात अशिष्ट भाषेचा वापर आहे हे एव्हाना भारतभर सार्वजनिक झालेले आहे. कदाचित ते लोक घरी वृत्तवाहिन्या पाहत नसतील!)
पाचवा: जोषपूर्ण संगीत, पार्श्वसंगीत, बुद्धिमान संकलन आणि कथेला पूर्णतः अनुरूप असे पंजाबचे नेमके दर्शन घडवणारे छायाचित्रण.
सर्वच उच्च दर्जाचे घटक अशा प्रकारे जुळून येण्याचा योग विरळा असतो. लवकरात लवकर हा चित्रपट पहा.
हेही परीक्षण आवडले. चित्रपट