मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज काय बरे खावे - सामिष का निरामिष? का पुठ्ठा किंवा गवतच बरे ?

शेखरमोघे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 शीर्षकच गोन्धळवून टाकणारे वाटते ना ? बरोबर - कारण आता कोणीच सामिष किंवा निरामिष खात नाही (बंगाली सोडून - ते मात्र अजूनही हे शब्द रोजच्या जीवनात वापरतात), आता तर कोणीच "शाकाहारी" किंवा "मांसाहारी" सुद्धा नसतात तर "व्हेज्ज" (बहुशः "प्युव्वर व्हेज्ज") किंवा "नॉन व्हेज्ज"च असतात, कदाचित "शाकाहारी" किंवा "मांसाहारी" असणे हे out of fashion झाले असावे किंवा मांसाहारी न म्हणता "नॉन व्हेज्ज" म्हटल्याने हा महामानव नुकताच आकाशातल्या बापाशी हस्तांदोलन करून आला असावा असा ग्रह करून देणे सोपे जात असावे (बहुशः "प्युव्वर व्हेज्ज" म्हणणारे "असा कसा हा नॉन व्हेज्ज नाही" ही टीका चुकवायला बघत असावेत). असो : मला काही काळ प्रश्न पडला आहे - का बरे "सामिष" या शब्दात काहीतरी "आमिष" सामील केले गेले असावे - जसे मासा गळाला लागण्याकरता लावावे लागते? असे आमिष नसेल तर "सामिष" पदार्थाना थारा न मिळता म्हणून? मला असे वाटायला प्रथम लागले ते साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी - जेव्हां "mad cow' रोग (जो गायी-बैलाना होतो) आणि त्यानंतर Creutzfeldt–Jakob disease (vCJD or nvCJD, जो माणसाना होऊ शकतो) या बद्दलची माहिती पहिल्यांदा माझ्या वाचण्यात आली. प्राण्याना देण्यात येणाऱ्या खाद्यात जर प्राणिज आणि दूषित अन्न (जसे दळलेले वाळवलेले प्राण्यांचे मांस/हाडे/रक्त ज्यातून सगळे सजीव जीवाणू काढले गेलेले नाहीत) मिसळले गेले असेल तर ते सजीव जीवाणू नंतर "विषाणू" मध्ये बदलू शकतात. असे विषाणू गायी-बैलाना "वेडे" (म्हणून mad cow हे रोगाचे नाव - ज्याला वैज्ञानिक नाव आहे Bovine Spongiform Encephalopathy) करू शकतात म्हणजेच अशा "आजारी" झालेल्या गायी-बैलाना हळू हळू स्वतःचे जीवन चालू ठेवण्यास जरूर असणारे खाणे पिणे देखील न जमता काहीतरी लहानशा कारणानेही ती उधळतात, बिथरतात, धडपडतात आणि काहीही व्यवस्थित करणे जमत न राहील्याने खंगून मरतात. अशा रोगाने बाधित गायी-बैलांचे मांस माणसांच्या खाण्यात आल्यास त्यांना Creutzfeldt–Jakob disease (vCJD or nvCJD) होऊ शकतो ज्यामध्ये माणसांची देखील परिस्थिती "mad cow" सारखी होऊन त्यातून फक्त मृत्यूनेच सुटका शक्य होते. अमेरिकेत गायी बैलांच्या खाण्यातील प्रथिने वाढवण्याकरता सोयाबीन, शेंगदाणा असे वनस्पतीजन्य पदार्थ उपलब्ध असल्याने प्राणिज पदार्थ फारसे वापरले जात नसत. युरोपात, विशेषतः इंग्लंडमध्ये तसे नसल्याने, ही समस्या तेथे गंभीर होती. जरी या रोगाने जगभरात ५०० पेक्षा कमी माणसे मृत्युमुखी पडली तरी हा रोग आटोक्यात आणण्याकरता इंग्लंडमधील mad cow आजाराची लागण झाल्याची शंका असलेल्या सुमारे ५ लाख गायी-बैलाना आणि इतर जगातील सुमारे तेव्हढ्याच गायी-बैलाना मारून त्यांचे मांस आणि सर्व अवयव जाळून टाकावे लागले. या रोगांना कारणीभूत असणारे विषाणू हे "virus" असावेत का एखाद्या तऱ्हेचे प्रथिन की ज्यामुळे मेंदूच्या क्रियेत उलथापालथ होऊ शकते, हे निश्चित होऊ न शकल्याने काही काळ "गायी बैलांचे मांस खाणे टाळा" असाच फक्त उपाय Creutzfeldt–Jakob disease टाळण्याकरता उपलब्ध होता. आता प्रगत देशातले कायदेकानू काटेकोरपणे जनावरांच्या खाद्यान्नात प्राणिज पदार्थांचे प्रमाण किती असावे हे ठरवतात आणि त्याची अंमलबजावणी करतात आणि म्हणून गायी बैलांच्या मांसाचा पुरवठा करणारे त्यांच्या "माला"ची खात्री देतात. पण असे काटेकोर कायदेकानू आणि त्यांची अंमल बजावणी नसलेल्या इतर देशातल्या गायी बैलांच्या मांसाबद्दल काय खात्री धरावी? त्या आधी १९५६ सालापासून जपानमधल्या मिनामाता या बंदरातल्या रहिवाशांना (मुख्यतः मासेमारी करणारे कोळी) आणि विशेषतः तेथील वाढत्या वयाच्या मुलामुलीना तसेच अनेक घरगुती जनावरांना (जसे मांजरे किंवा कुत्री, जी माणसांचे उरलेले अन्न खातात), हातापायातील संवेदना जाणे, हातापायाची बोटे वाकडी होऊन चालता फिरता न येणे अशी सुरवात होत शेवटी जगायला लागणाऱ्या अनेक हालचाली करता न येण्याने मृत्यू अशा अनेक अनाकलनीय तक्रारींने अनेक वर्षे ग्रासले होते. या तक्रारींचे कारण शोधताना लक्षात आले की त्यांच्या खाण्यात आलेल्या सागरी अन्नपदार्थात (मासे, कालवे, खेकडे इ. इ.) कारखान्यांतून समुद्राच्या पाण्यात सोडलेल्या उत्सर्गातून समुद्रात आलेला पारा साठलेला असे आणि असा त्यांच्या खाण्यात - अति सूक्ष्म प्रमाणात - आलेला पारा त्याना होणाऱ्या सर्व त्रासाचे मूळ होते. सुमारे ३० वर्षे चाललेल्या संशोधनानंतर या सर्व प्रकाराचे मूळ चिसो नांवाच्या कंपनीच्या कारखान्यातून पारा असलेल्या द्रव्यांच्या समुद्रात होणाऱ्या उत्सर्गात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा कारखाना बंद करण्यात आला. "mercury poisoning" हा एक नवा शब्द जो शब्दकोषात त्यानंतर आला त्याचा अर्थ कदाचित "मानवाने रत्नाकरावर केलेल्या अत्याचारांचे उट्टे काढण्याचा समुद्राने केलेला प्रयत्न" म्हणून देणे उचित ठरेल. इतरत्र अशा रोगाचा अजून तरी प्रादुर्भाव झाल्याचे आढळलेले नाही. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतल्या हडसन नदीत दिसून आला - जनरल इलेक्ट्रिक या कंपनीने नदीत सोडलेल्या Polychlorinated Biphenyls (PCB) या कर्करोगजनक रसायनाचा लहान माशांच्या शरीरात प्रादुर्भाव झाल्यावर हे मासे खाणाऱ्या मोठ्या माशांच्या शरीरातही हे रसायन जमा होत राहिल्याचे आढळून येऊ लागले. त्यामुळे हडसन नदीत सुमारे ३०० मैलाच्या टापूत मासेमारीला बंदी घालण्यात आली आणि नदीच्या पाण्याची सफाई करण्याचे अत्यंत खर्चिक काम अजूनही चालू आहे. अमेरिकेतल्या इतर अनेक नद्यात आढळात आलेले लिंगभेदरहित/द्विलिंगी (hermaphrodite) बेडूक किंवा मासे अशा घातकी रसायनांच्या परिणामाने झाले असावेत. अमेरिकेतील उदाहरणे देण्याचे कारण एव्हढेच की इतरत्र अशा अनैसर्गिक चमत्कृतींचा फारसा अभ्यास आणि पाठपुरावा केला जात नाही आणि त्यामुळे असेच इतरत्रही घडत असल्यास त्याबद्दलची माहिती सहजी मिळत नाही. मुंबई किंवा इतर तत्सम दाट लोकवस्ती, जहाजांची ये-जा आणि कारखान्यांचा उत्सर्ग असलेल्या शहरांजवळच्या समुद्रात ज्या ज्या वस्तू, रसायने, कचरा, जहाजातून गळणारे तेल आणि मानवी सांडपाणी/ मैला इ. इ. फेकले जाते त्यांचा तिथल्या समुद्री जीवांवर काय परिणाम होतो, त्या पाण्यातले कुठले घातक भाग अशा सागरी जीवांच्या शरीरात साठून राहू शकतात आणि त्यानंतर अशा "बाधित" जीवांना आपल्या उदरात नियमित आश्रय देणाऱ्या "नॉन व्हेज्ज" महात्म्यांवर त्या सगळ्या समुद्री कचऱ्याचा दीर्घकाळचा परिणाम काय असू शकतो हे कोणीही संकलित करत नसल्याने सध्यातरी गूढच आहे. त्याचप्रमाणे नदीकाठच्या दाट लोकवस्ती आणि कारखान्यांचा उत्सर्ग असलेल्या पाण्यात जी रसायने, कचरा आणि मानवी सांडपाणी/ मैला इ. इ. फेकले जाते त्यांचा तिथल्या नदीच्या पाण्यातल्या जीवांवर (की जे माणसाच्या अन्नसाखळीचा भाग होऊ शकतात) काय परिणाम होतो हे देखील तपासण्याची जरूर आहे. . थोडाबहुत हाच प्रकार मानवी नियंत्रणाखाली वाढवल्या जाणाऱ्या इतर "नॉन व्हेज्ज" कच्च्या मालाच्या बाबतीत होतो. मागणीप्रमाणे जिवंत/ "fresh" सोललेल्या कोंबड्या विकणाऱ्या दुकानांच्या जवळपासची कोंबड्यांची खुराडी जर रस्त्यालगत कुठे असली तर तिथून जाताना काही मिनिटे आजूबाजूच्या वातावरणातल्या उडत्या पिसांच्या आणि पांढऱ्या, पिवळ्या आणि तांबड्या अशा विविध रंगाच्या आणि वासाच्या भुकटीच्या वर्षावात नाक बंद करून पुढे वाट काढावी लागत असतानासुद्धा तिथे असलेली गिऱ्हाईकांची गर्दी बघून "नॉन व्हेज्ज" खाणारे लोक निधड्या छातीचे असतात कां (स्वतःच्या तसेच घरच्या इतरांच्या) जीवावर उदार असतात हे मला ठरवता आलेले नाही. आंतरराष्ट्रीय कुक्कुट पुराण आणखीनच घोळ घालते - तज्ञाना अजून हे ठरवता आलेले नाही की मागच्या काही वर्षांत कोंबडीचा आकार सतत का वाढतो आहे ? चांगल्या पैदाशीमुळे का वेगवेगळी औषधे (जसे antibiotics आणि growth hormones) वापरल्यामुळे? जगातल्या वाढत्या hormones शी संबंधित आजारांचा/समस्यांचा (जसे मुली ९ -१० व्या वर्षीच वयात येणे) अशा "औषधीयुक्त" कोंबड्या आहारात असण्याशी काही संबंध आहे का? माझ्या एका आशियाई देशातल्या वास्तव्यात एकदा शहरातल्या मंडईवर देखरेख करणाऱ्या विभागाच्या लक्षात आले की सोललेल्या कोंबड्या विकणाऱ्या दुकानांत विकायला असलेल्या कोंबड्यांना formalin (जे मयत व्यक्तीचे शरीर दफ़नाच्या वेळेपर्यंत टिकवण्याकरता वापरले जाते) टोचून "चिरयौवना" (विकल्या जाईपर्यंत) ठेवले जात होते. त्यावर बराच आरडाओरडा झाला तरी अशा चिरयौवना कोंबड्या ओळखण्याची सहज सोपी पध्दत न मिळाल्यामुळे विकायला असलेल्या सर्व कोंबड्या जप्त करून त्यांची तपासणी केल्याखेरीज कोंबड्यांना formalin टोचल्याचे सिद्ध करणे शक्य नव्हते. बिरबलाच्या तोडीच्या कुणातरी महात्म्याच्या लक्षात एक युक्ती आली - ज्या कोंबड्यांना formalin टोचण्यात आलेले असे त्यांच्या जवळपास सुद्धा माशा फिरकत नसत मात्र ज्या कोंबड्या अशा "दिखाऊ" तयार केलेल्या नसत त्यांच्यावर मात्र माशा घोंघावत. विकत घेणारे मात्र धर्मसंकटात - formalin ने सजवलेली (आणि सुजवलेली - कारण जितके हे द्रव्य टोचले गेलेले असेल तितके कोंबडीचे वजनही वाढले) कोंबडी घ्यावी का माशा घोंघावणारी? मानवी नियंत्रणाखाली वाढवल्या जाणाऱ्या ("aquaculture") कोळंबी, वेगवेगळ्या तऱ्हेचे मासे अशा जलचरांच्या बाबतीत तर प्रश्न आणखीनच जटिल होतो कारण या बंदिस्त पाण्यात वाढवल्या जाणाऱ्या जातीना त्यांच्या स्वास्थ्याकरता खाद्यातून प्रतिजैविके (antibiotics) दिली जातात. या प्रतिजैविकांची मात्रा कायद्याने कितीही नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी प्रत्यक्षात (खर्च कमी करण्याकरता) ही मात्रा जरूरीपेक्षा कमी असेल तर अशा जलचरांना त्यांच्या शरीरांत वाढणाऱ्या salmonella सारख्या सूक्ष्म जीवांना (micro-organisms) रोखणे कठीण होते आणि मग असे सूक्ष्म जीव या जलचरांच्या माध्यमातून मानवी शरीरातही प्रवेश मिळवू शकतात. पण गंमत ही की ही मात्रा जरूरीपेक्षा जास्त किंवा कमी कशीही असेल तरी अशा जलचरांच्या शरीरांत वाढणाऱ्या सूक्ष्म जीवांना विविध प्रतिजैविकांची इतकी सवय होऊ शकते की असे सूक्ष्म जीव मग बऱ्याच प्रतीजैविकाना दाद देत नाहीत. असे सूक्ष्म जीव व्यवस्थित शिजवल्याने जरी नाश पावत असले तरी शिजवण्याआधी "normal" (म्हणजे ज्यांना प्रतिजैविके मारू शकतात) किंवा प्रतिजैविकाना दाद न देणाऱ्या अशा कुठल्याही तऱ्हेच्या सूक्ष्म जीवांचा उपसर्ग माणसाना होऊ शकतो. मर्यादित प्रमाणात झालेला "normal" सूक्ष्म जीवांचा उपसर्ग औषधोपचाराने बरा होऊ शकला तरी जास्त गंभीर उपसर्ग जीवावर बेतू शकतो. प्रतिजैविकाना दाद न देणाऱ्या सूक्ष्म जीवांचा उपसर्ग झालेल्या माणसाना जरूर असेल तेव्हां प्रतिजैवके लागू न पडण्याचा (जसे इतर जीवावरच्या दुखण्यात) आणि त्यामुळे मृत्यू ओढवण्याचा धोका असतो. अशा super (प्रतिजैविकाना दाद न देणाऱ्या) सूक्ष्म जीवांचे अजाणते उत्पादक या रूपांत कांही व्यक्ती इतरांकरता धोकादायक ठरू शकतात . अशीच समस्या जनावरांना त्यांच्या स्वास्थ्याकरता खाद्यातून प्रतिजैविके जेव्हां दिली जातात तेव्हांही उद्भवते. "जीवो जीवस्य जीवनम" हा जीवन नियम ज्या काळांत लिहिला गेला त्यानंतर ज्ञानात बरीच भर पडली आहे. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या पेशींची रचना वेगवेगळी असल्याने आता हे लक्षात येते की वनस्पती सहसा बाहेरच्या सूक्ष्म जीवांना अवास्तव वाढू देण्याइतपत जीवनाधार देऊ शकत नाहीत (जर कीड लागलीच तर ती त्या वनस्पतीला संपवून टाकते आणि त्या नंतर तिला दुसरे "घर" बघावे लागते) पण प्राणी अनेक सूक्ष्म जीवांना "बाळगून" राहू शकत असल्याने अनेक निरुपद्रवी सूक्ष्म जीवांना त्यांचे "घर" बनलेल्या प्राण्याच्या आधाराने फोफावता येते किंवा उपद्रवी स्वरूपात बदलताही येते. असा प्राणी मग ज्याचे भक्ष्य बनेल त्याच्या पेशीना असे आगंतुक जर काबूत ठेवता आले नाहीत तर "शिकार करने को आये, शिकार हो के चले" असा प्रकार होतो. त्यामुळे जरी वनस्पतींवर कीटकनाशकाची वगैरे फवारणी झालेली असेल, त्या घाणेरड्या पाण्यात वाढवलेल्या असल्या किंवा जरी त्यांना कीड लागलेली असली तरी स्वच्छ धुवून, व्यवस्थित चिरून खराब दिसणारा/वाटणारा भाग काढून टाकून नीट शिजवलेले वनस्पतीजन्य अन्नपदार्थ सहसा धोकादायक ठरत नाहीत. पण असेच उपाय केल्यावरही प्राणिज पदार्थांची खात्री बाळगता येणे कठीण ठरते. तेव्हा आज काय बरे खावे - सामिष का निरामिष या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. कुठलाच जैविक धोका पत्करायचा नसेल तर (स्वच्छ धुतलेला) पुठ्ठा किंवा गवतच बरे ! ! जिज्ञासूनी जास्त माहिती करता पहावे : https://www.uaex.edu/publications/pdf/FSA-8007.pdf http://envirocancer.cornell.edu/factsheet/diet/fs37.hormones.cfm http://www.petaindia.com/issues/animals-used-for-food/vegetarian-vegan-starter-kit-2/chickens/ https://www.aspca.org/fight-cruelty/farm-animal-cruelty/chicken-faq https://thetruthaboutag.wordpress.com/2014/11/13/the-truth-about-hormone-free-chickens https://thetruthaboutag.wordpress.com/2014/12/29/the-truth-about-antibiotics-in-chickens https://en.wikipedia.org/wiki/Bovine_spongiform_encephalopathy http://www.eoearth.org/view/article/154624/ https://en.wikipedia.org/wiki/Minamata_disease http://www.petaindia.com/issues/animals-used-for-food/vegetarian-vegan-starter-kit-2/deadly-poisons-sea/ http://cspinet.org/foodsafety/riskymeat.html http://www.globalmeatnews.com/Industry-Markets/Indian-poultry-farmers-continue-use-of-growth-promoters-despite-official-ban http://www.dailymail.co.uk/news/article-2388444/How-drugs-pumped-supermarket-chickens-pose-terrifying-threat-health.html http://www.huffingtonpost.com/2011/01/31/hormones-in-food-should-y_n_815385.html?ir=India&adsSiteOverride=in http://articles.mercola.com/sites/articles/archive/2008/11/29/you-need-to-know-this-if-you-eat-tyson-chicken.aspx http://www.reuters.com/article/2014/07/17/us-money-chicken-organic-idUSKBN0FM24Q20140717 http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:I7IfPr8YmrIJ:www.cseindia.org/userfiles/Antibiotics%2520in%2520Chicken_Lab%2520Report_Final%252029%2520July.pdf+&cd=19&hl=en&ct=clnk&gl=in https://en.wikipedia.org/wiki/Bovine_spongiform_encephalopathy http://www.nytimes.com/2015/10/29/science/though-labeled-wild-that-serving-of-salmon-may-be-farmed-or-faux.html?_r=0 https://en.wikipedia.org/wiki/Pollution_of_the_Hudson_River http://www.petaindia.com/issues/animals-used-for-food/vegetarian-vegan-starter-kit-2/dark-truth-behind-milk-myth/ http://cspinet.org/foodsafety/abr.html http://cspinet.org/new/pdf/outbreaks_antibiotic_resistance_in_foodborne_pathogens_2013.pdf http://cspinet.org/reports/chemcuisine.htm https://en.wikipedia.org/wiki/Salmonellosis https://www.aspca.org/fight-cruelty/farm-animal-cruelty/factory-farmed-chicken-issues-and-alternatives http://edition.cnn.com/2015/11/04/health/california-crab-warning/index.html?iid=ob_article_organicsidebar_expansion&iref=obnetwork https://www.facebook.com/gary.yourofsky/videos/897708256951090/?fref=nf http://www.fao.org/3/a-a0282e.pdf (क्रमशः)

वाचने 25530 वाचनखूण प्रतिक्रिया 64
विषय तोच पण वेगळा अँगल आवडला. गोदरेज रियलगुड, वेंकीज वगैरे सेफ असल्याने ते खाल्लयास नो हार्म इज कॉज्ड इ.इ. असं म्हणत यापुढे रस्सा ओरपला जाईल. दिलके खुश रखने के लिए ए गालिब..!!

नाखु 24/11/2015 - 10:32
लेख आहे. अता म्हणू शकतो की दाने दाने पे लिखा है, खानेवाले का नाम (विथ सूक्ष्म जीवांसकट अनाव्श्यक घटक)

मृत्युन्जय 24/11/2015 - 10:36
लेख आवडला. शाकाहारी असल्याने मला काही धोका नाही असे मानून खुष होण्यात काही अर्थ नाही असे वाटते कारण या प्रदूषणाचा दुष्परिणाम जसा प्राण्यांवर होतो आहे तसा भाज्यांवर आणि फळांवर देखील होत असणार.

In reply to by मृत्युन्जय

गवि 24/11/2015 - 11:37
अगदी अगदी. वर वेगळा अँगल आवडला असं जे मी म्हटलं ते यासाठी की "शुद्ध शाकाहारी" विचाराचा प्रसार प्रचार करण्याचा (आर्थिक कारणांनी किंवा तत्सम फायद्यासाठी नव्हे, एक पटलेली विचारसरणी म्हणूनही का होईना) हा एक वेगळा "पिचिंग"चा प्रकार आवडला. नेहमीचे पिचिंग अँगल्स खालीलपैकी एक किंवा त्यापैकी काहींचं मिश्रण असतं: १. मानवाची शरीररचनाच मुळी शाकाहारासाठी बनलेली आहे. २. क्रूरतेचा अँगल. प्राणी मारण्याच्या क्रूर पद्धती. स्टँडर्ड्स न पाळणार्‍या कत्तलखान्यांमधे जाऊन काढलेले किंवा कदाचित मुद्दाम नॉन स्टँडर्ड पण क्रूर दिसणार्‍या पद्धतीने प्राणी मारायला लावून शूटिंग केलंय की काय असं वाटणारे व्हिडीओ. कसाई मुळात सॅडिस्ट असतात आणि मरण्यापूर्वी प्राण्यांचा अधिकाधिक छळ करण्याने त्यांना अधिकच मनोरंजन मिळतं असं वाटायला लावणारे व्हिडीओ. ३. खाणं आणि स्वभाव यांचा मेळ घालणारा एक अँगल वापरला जातो. जे खाल तसे व्हाल. शाकाहारी = शांत, सात्विक अहिंसक मन, मांसाहार = हिंस्र, तामसी वखवखलेलं मन. ४. शास्त्रीय / ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनः प्राणी हे गवत, वनस्पती खातात आणि मग आपण त्यांना खातो. म्हणजे मधे एक एजंट आला, त्यापेक्षा थेट शाकाहार (गवत!!?, वनस्पती) खाल्ल्यास जास्त अन्न मिळेल. नासाडी टळेल. आणखीही अनेक दिशांनी अपील्स केली जातात. प्रत्येक प्रकारच्या ऑडियन्सला एकतरी भिडतंच. इथे प्राणीजन्य रोगांचा अँगल घेऊन बाकी सर्व अँगल टाळण्याचा नवीन अप्रोच आवडला. "जिवाणूंचे विषाणू होणे" इत्यादिने सुरु होऊन निवडक जागतिक मार्केट्समधली फॉर्मॅलिनयुक्त कोंबड्या, पारायुक्त मिनिमाटा वगैरे भयपेरणीयोग्य उदाहरणं घेऊन शेवटी जिज्ञासूंसाठी दिलेल्या लिंक्समधे अधेमधे एखाददोन "क्रौर्य' वगैरे मूळ लेखात उल्लेख टाळलेल्या गोष्टी एम्बेड करुन एकूण निर्णय वाचकावर सोडणं यामधे मांसाहारविरोधाचा अधिक नीटनेटका आणि इफेक्टिव्ह प्रयत्न जाणवतो. क्रौर्य हा मुद्दा मूळ लेखात सरळच आणला असता तर जास्त आवडलं असतं. असं मी का म्हणतो याचं कारण म्हणजे, हा लेख सुटा वाचणार्‍याला काय दिसतं? लेखात मांसाहारातून होऊ शकणारे भयंकर रोग, विषबाधा, दुष्परिणाम काही उदाहरणांतून सांगितले आहेत (मॅड काऊ, फॉर्मॅलिन, मिनिमाटा डिसीज वगैरे).. पण मांसाहारात मिळणार्‍या कोणत्याही आवश्यक घटकांबद्दल उल्लेख नाही. जगभरात मांसाहार हा शाकाहारापेक्षा जास्त उदंड असूनही जगाचा रोगराईने किंवा विषबाधेने गेल्या शंभर वर्षांत (इंडस्ट्रियल पोल्युशन सुरु झाल्यापासून.. आणि पारा वगैरेचा विधिनिषेध नसणार्‍या सुरुवातीच्या अनेक वर्षांमधे) जग अर्धंअधिक नष्ट का झालं नाही? बी कॉम्प्लेक्स, आयर्न, प्रोटीन्स यांचे रिच सोर्सेस म्हणून मांसाहार शाकाहारापेक्षा काही बाबतीत सरस ठरतो. शाकाहार वाईट नाही, पण तो मांसाहाराने कॉम्प्लिमेंट केला तर अधिक चौरस आहार बनतो. मॉडर्न मेडिसिन, आहारशास्त्र हे कधीही मांसाहाराला असे सरसकट बाद करत नाहीत. एका बाजारात फॉर्मॅलिन टोचून टिकवलेल्या कोंबड्यांविषयी लिहीताना कोंकणात किंवा अन्यत्र अनेक ठिकाणी घातक रसायनांच्या वापराने लवकर पिकवलेले आंबे अस्तित्वातच नसतात. मुंबईच्या रेल्वेकडेला पिकणारी आणि गटारांच्या पाण्यात धुतली जाणारी पालेभाजी पूर्ण अनुल्लेखित राहते. इथे उल्लेख नसला तरी (लिंक्समधे क्रूरतेचं एलेमेंट आणलेलं आहे) समजा अपुर्‍या वाढीच्या पिल्लांना डेलिकसीजसाठी मारलं जातं. हो.. जात असेल. पण मेथीची दोनदोन पानं उगवलेली छोटी रोपं खास कोवळी भाजी म्हणून वेगळी नाही विकत घेतली जात? आख्खं झाड/झुडुप बनण्याची क्षमता असलेलं बी (पावटा, चवळी, मटकी)अंकुरण्याआधीच उकळून त्याची उसळ नाही करत? मोड आणून बिरड्यांची उसळ करताना तर अंकुरही फुटू दिला जातो. आणि त्या बीजाने नव्या जोमाने एक वनस्पती बनण्याची सुरुवात करताक्षणी त्या अंकुरांसकट कढईत फोडणी नाही दिली जात? मटकीची रोपं उगवून पूर्ण मोठी जून झाली की मग त्याच्या पेंढ्या उकडून का नाही खात? हे फक्त उदाहरण आहे. प्रचार करताना असा बायस सर्वत्र असतोच. "मांसाहार की शाकाहार" असा दोन्ही बाजू इन्क्लूड करणारा प्रश्न / शीर्षक असताना केवळ एकाच बाजूचे एकाच प्रकारचे दोष दाखवून दुसर्‍या बाजूच्या आहारपद्धतीला आपोआप सरस भासवण्यात न्युट्रॅलिटीचा अभाव जाणवतो. सर्व माहिती रोचक आणि उत्तम असूनही शेवटी मांसाहार भीतीपोटी समूळ टाळण्याकडे निर्देश करण्याऐवजी जर मांसाहार करताना काय काळजी घ्यावी (मासळी खातानाची योग्य फ्रीक्वेन्सी-पार्‍याची पातळी सेफ राहण्यासाठी, मांस कच्चे न खाणे-पूर्ण शिजवणे-जिवाणूजन्य रोग टाळण्यासाठी, ताजे मांसच खरेदी करणे-ताजे समोरासमोर किंवा कायदेशीररित्या बंधनं पाळणार्‍या कंपन्यांचं सीलबंद फ्रोझन मांस) असे काही खबरदारीचे उपाय सुचवले असते तर जास्त बरं वाटलं असतं.

In reply to by गवि

एका बाजारात फॉर्मॅलिन टोचून टिकवलेल्या कोंबड्यांविषयी लिहीताना कोंकणात किंवा अन्यत्र अनेक ठिकाणी घातक रसायनांच्या वापराने लवकर पिकवलेले आंबे अस्तित्वातच नसतात. मुंबईच्या रेल्वेकडेला पिकणारी आणि गटारांच्या पाण्यात धुतली जाणारी पालेभाजी पूर्ण अनुल्लेखित राहते.
झालस्तर सफरचंद चमकवण्यासाठी आणि कोरडी न पडण्यासाठी केलेलं वॅक्स कोटिंग, पिकांवरची रासायनिक फवारणी, गोदामांतल्या पोत्यांतली उंदरांची घुसखोरी आणि वीण, ज्या गोदामांमधे गेल्या आठवड्यात घातक रसायनं होती त्याच गोदामात गव्हाची पोती येऊन पडणं वगैरे व्यापारातल्या वेगवेगळ्या स्टेजला होणारे शाकाहारी अत्याचार राहिलेच.

In reply to by गवि

मूळ लेखातला हा परिच्छेदः
जरी वनस्पतींवर कीटकनाशकाची वगैरे फवारणी झालेली असेल, त्या घाणेरड्या पाण्यात वाढवलेल्या असल्या किंवा जरी त्यांना कीड लागलेली असली तरी स्वच्छ धुवून, व्यवस्थित चिरून खराब दिसणारा/वाटणारा भाग काढून टाकून नीट शिजवलेले वनस्पतीजन्य अन्नपदार्थ सहसा धोकादायक ठरत नाहीत. पण असेच उपाय केल्यावरही प्राणिज पदार्थांची खात्री बाळगता येणे कठीण ठरते.
बाहेरुन लागलेली घाण (सांडपाणी, अस्वच्छ घटक वगैरे) स्वच्छ धुतल्याने जितकी भाज्यांची निघते तितकीच मांसाचीही निघते. वनस्पती, भाज्या यांमधे धुवून अधिक पूर्ण आतपर्यंत स्वच्छ होण्याची कोणती खास प्रॉपर्टी आहे? विषारी पदार्थ (जमिनीतून भाजीच्या रोपाने शोषलेली विद्राव्य घातक रसायने, वरुन पडलेली प्रदूषिते, फवारे, मासोळीने स्वाहा केलेला पार्‍याचा अंश, कोंबडीत टोचलेला फॉर्मॅलिनचा अंश इ.इ.) हे शिजवून नष्ट होणार नाहीत. हे मांस आणि भाज्या दोन्हींना लागू आहे. घातक जंतू, जीवाणू इत्यादि पुरेसे नीट शिजवल्याने नष्ट होतात. मांस पूर्ण नीट शिजवल्यानेही आणि भाजी पूर्ण नीट शिजवल्यानेही. तेव्हा निरामिष पदार्थाबाबत खात्री देता येत नाही आणि शाकाहारीमात्र गॅरंटीड स्वच्छ होतात हे विधान योग्य वाटलं नाही.

In reply to by गवि

म्हणुन तिथे विषाणुंची वसाहत जास्त चिवटपणे बहरते (असं लेखात म्हटलं आहे) म्हणुन कदाचीत निरामिष पदार्थ कंपॅरीटीव्हली जास्त स्वच्छ होत असावेत.

In reply to by अर्धवटराव

पदार्थ पूर्ण शिजवला की त्यात जिवाणू किती (तुलनात्मक) कमीजास्त जोमात बहरत होते याला काय अर्थ उरतो?

In reply to by गवि

अर्धवटराव 24/11/2015 - 12:48
किती जोमाने बहरत होते म्हणजेच त्यातले किती बचेंगे तो और भी लडेंगे ?? पूर्ण शिजवल्यानंतर जर जीवाणूंचा १००% खात्मा शक्य असेल तर मग कुठल्याच काळजीची गरज नाहि.

In reply to by गवि

शेखरमोघे 24/11/2015 - 21:19
बाहेरुन लागलेली घाण (सांडपाणी, अस्वच्छ घटक वगैरे) स्वच्छ धुतल्याने जितकी भाज्यांची निघते तितकीच मांसाचीही निघते. वनस्पती, भाज्या यांमधे धुवून अधिक पूर्ण आतपर्यंत स्वच्छ होण्याची कोणती खास प्रॉपर्टी आहे? जेव्हा मांसासारख्या पदार्थाना बाहेरुन सांडपाणी वगैरे सारखी घाण लागते, तेव्हा त्या घाण पाण्यातील जन्तू मांसामध्ये भाजीपेक्षा जास्त प्रमाणात आणि जास्त लौकर वाढतात आणि रूप बदलल्याने (mutation) घातक होतात. भाज्या इतका "जीवनाधार" देऊ शकत नसल्याने (वरकरणी) दोन्हीही स्वच्छ धुतल्यानन्तरसुद्धा मांसामध्ये भाजीपेक्षा जास्त जन्तू शिल्लक रहाण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी मांसाकरता सदैव शीतपेटीची जरूर असते (कमी तपमानात जन्तू वाढू शकत नाहीत) पण ते सगळीकडेच/नेहमीच शक्य नसते. विषारी पदार्थ (जमिनीतून भाजीच्या रोपाने शोषलेली विद्राव्य घातक रसायने, वरुन पडलेली प्रदूषिते, फवारे, मासोळीने स्वाहा केलेला पार्‍याचा अंश, कोंबडीत टोचलेला फॉर्मॅलिनचा अंश इ.इ.) हे शिजवून नष्ट होणार नाहीत. हे मांस आणि भाज्या दोन्हींना लागू आहे. भाजीच्या रोपाने जर विद्राव्य घातक रसायने जमिनीतून शोषली तर त्या रसायनाना "वागवण्याची" या रोपान्ची शक्ती प्राण्यापेक्षा कमी असल्याने थोड्याच मात्रेत रोपे शुष्क होतील, कोमेजतील आणि हा परिणाम लक्षात आल्याने अशी रोपे खाण्यातून वगळली जतील. असाच प्रकार फवारलेली रसायने आणि प्रदूषिते यान्च्याबद्दल होईल. मासोळीने स्वाहा केलेला पार्‍याचा अंश, कोंबडीत टोचलेला फॉर्मॅलिनचा अंश इ.इ. हे धुवून/शिजवून नष्ट होणार नाहीत, पण भाज्या अशा रसायनान्चा प्रयोग झाल्यास नष्ट झाल्याने खाण्याची वेळच येणार नाही. मांस आणि भाज्या दोन्हीं "सजीव" असल्या तरी भाज्यान्ची जन्तू, रसायने आणि इतर अशाच द्रव्याना सामावून घेण्याची शक्ती कमी असल्याने, अशा "कमी मात्रेत बाधित" भाज्या व्यवस्थित धुवून/शिजवून वापरल्याने जितक्या मानवी उपयोगाकरता "सुसह्य" होतील, तसेच मांसही होईल असे निश्चितपणे सान्गता येणार नाही. तुलना जिवन्त प्राणी (ज्यापासून विकण्याकरता मांस उपलब्ध होते) आणि जिवन्त वनस्पती (ज्यातून भाजी मिळते) या दोन वेगवेगळ्या सजीव गोष्टीनी रसायने किन्वा जन्तूमय घाणीला दिलेली दोन वेगवेगळ्या तर्‍हेची प्रतिक्रिया याची आहे.

In reply to by शेखरमोघे

या भागाचं स्पष्टीकरण पटतंय. धन्यवाद. अर्थातच मांस खरेदी करताना खबरदारी जास्त घेतली पाहिजे हे मान्य. बादवे: मासा अन्नसाखळीत जितका वर तितके हेवी मेटल्स अधिक अॅक्युम्युलेट होतात हे लक्षात घेऊन माशाच्या जातीनुसार आठवड्यात कितीवेळा खावा हे ठरवावं.

In reply to by गवि

१. जर वनस्पतींनाही जीव असतो तर मग शाकाहार- मांसाहार आणि शाकाहारी - मांसाहारी असा भेद कसा काय होऊ शकतो? शुद्ध शाकाहारी माणूसही कुणाला तरी मारूनच खातो. २. जगातल्या जंगल:शेतजमिनी या गुणोत्तराला मांसाहारी लोकांनीच सांभाळले आहे. जर सगळेच शाकाहारी झाले तर अन्नधान्याची गरज प्रचंड वाढेल. त्याच्यासाठी शेतजमिनी लागताइल. त्याच्यासाठी जंगलं तोडून शेती करावी लागेल. त्यामुळे पर्यावरणाची वाट लागेल. म्हणजेच शुद्ध शाकाहार हा एक प्रकारे पर्यावरणाला घातक आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला जर आपल्याला त्यातल्या त्यात स्वच्छ पर्यावरण द्यायचं असेल तर मांसाहार केल्याशिवाय पर्याय नाही. ;)

In reply to by बोका-ए-आझम

शेखरमोघे 25/11/2015 - 13:44
जगातल्या जंगल:शेतजमिनी या गुणोत्तराला मांसाहारी लोकांनीच सांभाळले आहे. जर सगळेच शाकाहारी झाले तर अन्नधान्याची गरज प्रचंड वाढेल. त्याच्यासाठी शेतजमिनी लागताइल. त्याच्यासाठी जंगलं तोडून शेती करावी लागेल. त्यामुळे पर्यावरणाची वाट लागेल. म्हणजेच शुद्ध शाकाहार हा एक प्रकारे पर्यावरणाला घातक आहे. मांसाहारी लोकांची मांसाची जरूर आणि त्याकरता लागणार्‍या जमिनीची गरज या गुणोत्तराचा जर जास्त विचार केला तर हे लक्षात येईल की मांसाहारी लोकांना जितके "सामिष खाद्य" लागेल, ते "बनवण्याकरता" म्हणजे गायी, बैल, शेळ्या, मेन्ढ्या, कोम्बड्या याना लागणारा आहार - जो शेवटी वेगवेगळ्या वनस्पती आहे - आणि त्या उगवण्याकरता जमीनच लागते, जन्गल नव्हे. याकरता "Feed Conversion Ratio" (एक किलो वजन वाढण्याकरता पुरवावे लागणारे खाद्य) जर पाहिला तर कोम्बडी आणि मासे यान्च्याकरता एक किलो वजन वाढण्याकरता १.५ ते २ किलो खाद्य पुरवावे लागते तर मेन्ढया आणि गाय-बैल यान्च्याकरता ५-२० किलो खाद्य लागते. असे खाद्य (गवत, मका/इतर धान्याची भरड, सरकी, प्रथिने आणि इतर खाद्यान्न) शेवटी जमिनीतच उगवावे लागते, की जिथे माणसाच्या खाण्याकरता उपयोगी धान्यही उगवू शकते. जर सगळेच शाकाहारी झाले तर उलट शेती करून्/जमीन वापरून उगवलेले धान्य जास्त efficiently वापरले जाईल आणि जास्त लोकान्चे कमी जमीन वापरून पोट भरेल. याला अपवाद ठरेल मासेमारी - पण सध्याच समुद्राचा तळ देखील खरवडून मासे गोळा केले जात आहेत आणि अनेक ठिकाणी जननक्षम मासे खाऊन नष्ट केल्याने depletion of fishing sites चा धोका निर्माण झाला आहे. जर वनस्पतींनाही जीव असतो तर मग शाकाहार- मांसाहार आणि शाकाहारी - मांसाहारी असा भेद कसा काय होऊ शकतो? शुद्ध शाकाहारी माणूसही कुणाला तरी मारूनच खातो. इथे मारून खाणे किन्वा न मारता खाणे याचा विचार नसून काय खाल्ले जाते याचा आहे - वनस्पतिजन्य का प्राणिजन्य.

In reply to by शेखरमोघे

तरी निदान असहमत तरी नाही पण
जर सगळेच शाकाहारी झाले तर उलट शेती करून्/जमीन वापरून उगवलेले धान्य जास्त efficiently वापरले जाईल आणि जास्त लोकान्चे कमी जमीन वापरून पोट भरेल.
हा भाग पटला नाही. शेतीतलं उत्पादन हे घटत्या दराने वाढतं. म्हणजेच ते एका मर्यादेपर्यंतच वाढू शकतं. शिवाय त्या जमिनीचा कस प्रचंड प्रमाणात उतरेल आणि त्यामुळे उत्पादन कमी होईल. शिवाय उगवलेले धान्य हे efficiently कसे वापरले जाईल? जे लोक मांसाहारी आहेत ते शाकाहारी पदार्थही खातात. उदाहरणार्थ एखादा शाकाहारी माणूस अाणि मांसाहारी माणूस हे दोघेही भात आणि चपाती/भाकरी किंवा त्यांच्या संस्कृतीत जे काही असेल ते खाणारच आहेत, जी परिस्थिती आता आहे आणि आताच अन्नधान्याचं वाटप व्यवस्थित न झाल्यामुळे किंमती वाढत आहेत (हे एक कारण आहे, एकमेव नव्हे) म्हणजे वाटप efficient नाहीये. मग जर सगळेजण शाकाहारी झाले तर ते efficient कसं होणार?
डोळे, कान, तोंड आणि बरच काहि "आ वाचुन उघडणे"च्या प्रत्यय येतोय. त्यालाच काहिसा पूरक हा लेख. जाम टरकली आहे राव.

कैलासवासी सोन्याबापु 24/11/2015 - 12:26
तुम्ही सांगितलेले मांसहाराचे धोके हे बहुतकरुन मान्य तरीही एक नमूद करू इच्छितो ते म्हणजे हे धोके पाश्चात्य जनतेला जास्त आहेत कारण १ फॅक्टरी फार्मिंग २ मांस न शिजवता खायची पद्धत, ह्या पद्धतीला कोल्ड कट्स कुझीन म्हणतात, ह्यात फ्रेश अन लुसलुशीत असणाऱ्या मांसाला शिजवण्यापेक्षा ते लोक ड्राय एंड ऐज करून क्योर करून कच्चेच खातात, पातळ स्लाइसेस करून वगैरे हे कोल्डकट्स खाल्ले जातात असला धोका माझ्यामते भारतीय अन मिडल ईस्टर्न कुझीन मधे जवळपास नगण्य आहे किंवा नाहीच अजिबात, तसेच ते फार ईस्टर्न कुझीन मधे सुद्धा जास्त आहे कारण जापान कोरिया वगैरे देशात टूना किंवा तत्सम फ्रेश कैच असलेली मासळी ही कच्ची उर्फ़ रॉ प्रकारे खाल्ली जाते (पातळ स्लाइसेस करुन विविध सॉस मधे बुडवून) म्हणून त्या लोकांस सी फ़ूड संबंधी मर्क्युरी पॉइसोनिंग (तुम्ही दिलेल्या केस नुसार फॅक्टरी अफ़्फ़्लुएंट्स मुळे) किंवा मासे कच्चे खाल्ल्याने होणाऱ्या हेवी मेटल पॉइसोनिंग ची शक्यता जास्त असते, भारत मुळात ट्रॉपिकल वातावरण असलेला देश असल्यामुळे इकडे आपल्याकडे मासळी सुकवलेली असली तरी ती वापरायच्या अगोदर भिजवुन नीट स्वच्छ करून व्यवस्थित शिजवुन खाल्ली जाते म्हणून हा धोका कमी संभावतो असे वाटते मला

मार्मिक गोडसे 24/11/2015 - 12:31
मधुमक्षिका पालनातही प्रतिजैविकांचा वापर केला जातो, त्यामुळे मधही तेव्हडेच धोकादायक झाले आहे. एका शेती सेमिनार मध्ये तेथील शेतीतज्ञाने किडका फ्लॉवर,कोबी खाण्यात धोका कमी असतो असे सांगितले होते, कारण त्यावर पेस्टीसाइडचा अंश कमी प्रमाणात असतो. बाकी ऑरगॅनीक फूड ही फसवेगीरी आहे.

संदीप डांगे 24/11/2015 - 12:41
दृष्टीआड सृष्टी असा सर्व प्रकार आहे. सध्या शेतीसाठी जैविक/सेंद्रिय औषधे व किटकनाशके बनवणार्‍या कंपन्यांसाठी काम करत असल्याने अनेक भीतीदायक गोष्टी कळतात. मंडईत मिळणारा ८०% माल खात्रीलायकपणे धोकादायक आहे. याबद्दल कुठेही काहीही सिद्ध होऊ शकत नाही. पण मानवजातीवर दूरगामी परिणाम होतील. अमूक एक खाल्ल्यानेच हा कॅन्सर, तो अमूकतमूक रोग झाला असे काही कार्यकारणभाव कळत नसल्याने आपण सर्व जीवंत राहण्यासाठी पोटात विष ढकलत आहोत एवढे मात्र खरे. एकिकडे अन्नधान्याचा कस कमी झाला त्यात अधिकचे रसायनांचे रेसिड्युअल खाल्ल्या जात आहे. मला ह्या काही नवीन मित्रांनी भाजीपाल्याविषयी काही महत्त्वपूर्ण सल्ले दिलेत. ते एकदा योग्यतर्‍हेने संग्रहित करून लेख टाकिन. त्यातल्या त्यात एक मोठा आणि महत्त्वाचा सल्ला म्हणजे होईल तितके ताज्या हिरव्या भाज्या घरातच पिकवणे हा आहे. वांग्याला कापणीपूर्वी २४ तास आधी एक औषध दिले जाते, त्याचा रेसिड्यु उतरायला सुमारे साठ दिवस लागतात. मंडईत ताजी वांगी बघून हिरीरीने घेणारे प्रत्यक्ष रसायनच घेत असतात. फळांमधे जी फळे नैसर्गिकरित्या वाढतात तीच खावीत. एकदा मला उत्तम वाणाची, जैविक व सेंद्रिय खतपद्धतीने पिकवलेली तीन किलो द्राक्षे भेट मिळाली होती. त्याचा दर्जा सांगण्यासाठी मी इतकंच सांगेन की माझा मुलगा, जो बाजारातल्या द्राक्षाचा एक दाणाही तोंडात धरत नाही, त्याने त्यातली एक किलो एका दिवसात फस्त केली! आम्ही त्यानंतर बाजारात मिळणार्‍या वेगवेगळ्या जाती ट्राय केल्या पण मुलगा कुठलंही द्राक्षं एक दाणा सुद्धा खात नाही. आम्हाला त्याच्या फळं न खाण्याचं कारण कळलं ते असं की तो फक्त उत्तम दर्जाचीच फळे खातो. बाकींना तोंडसुद्धा लावत नाही. जबरदस्ती दिलं तर थुंकून टाकतो. हे सगळं सांगायचं कारण एकच. की पक्षी-प्राण्यात असते तशी मनुष्यातसुद्धा जन्मजात चांगलं काय ते ओळखायची सिस्टीम असते. बर्‍याच कारणांनी आपण ती दडपून टाकतो. थोडा त्रास होईल पण घरीच स्वतःपुरती जमेल तितकी शेती करणे किंवा खर्‍या अर्थाने ऑर्गनिक आहार (वेज/नॉनवेज) घेणे आरोग्याच्या दृष्टीने परमआवश्यक होत जाणार आहे.

देश 24/11/2015 - 17:38
लेख नक्कीच अभ्यासपुर्ण आहे मात्र केवळ मांसाहारातीलच धोके अधोरेखित केले आहेत. वर गाविंनी म्हटल्याप्रमाणे शाकाहारातील धोकेपण अधोरेखित केले असते तर लेख संतुलित झाला असता. देश

In reply to by देश

शेखरमोघे 24/11/2015 - 21:37
शाकाहारातील धोकेपण अधोरेखित केले असते.... "वरकरणी चान्गले दिसणारे" प्राणिज अन्न तसेच वनस्पतिज अन्न जर तसे खरोखरच नसेल तर त्यातले तुलनात्मक धोके काय असतील हे दाखवताना हे ही सान्गण्याचा प्रयत्न आहे की फसगत जर वनस्पतिज अन्नात झाली तर "दिसते तसे नसण्याचा धक्का" जरा मर्यादितच असेल पण जर प्राणिज अन्न असेल तर जास्त खोलात जाऊन बघावे लागेल. जर कायदेकानू व्यवस्थित ठरवले व पाळले गेले तर "दिसते तसेच असण्याची" जास्त खात्री बाळगता येईल.

In reply to by शेखरमोघे

संदीप डांगे 25/11/2015 - 22:21
फसगत जर वनस्पतिज अन्नात झाली तर "दिसते तसे नसण्याचा धक्का" जरा मर्यादितच असेल पण जर प्राणिज अन्न असेल तर जास्त खोलात जाऊन बघावे लागेल
हे विधान आपला बायस अधिक स्पष्ट करत आहे असे वाटते.

पैसा 24/11/2015 - 19:10
मांसाहारी जेवणात विषाणू असू शकतात हा एक प्रकार झाला आणि शाकाहारी जेवणात ते रसायने टोचलेली फळे, आणि जेनेटिकली मॉडिफाईड भाज्या वगैरे असतात. नक्की काय खावे तेच कळत नाही!

In reply to by पैसा

संदीप डांगे 24/11/2015 - 19:22
रसायने फळांमधे टोचल्या जात नाहीत. कुठल्यातरी क्रियेटीव आर्टीस्टने ह्या संज्ञेच्या इलस्ट्रेशनसाठी फळात इंजेक्शनची आयडीया काढली. खरेतर प्रत्येक फळात असं औषध टोचणे शक्य नाही. पण पाण्यातून दिली जाणारी काही औषधे फळांवर रंग धरण्यासाठीही सोडली जातात.

अजया 24/11/2015 - 19:48
लेख वाचताना आईसक्रीममधुन होणारे साल्मोनेला कंटामिनेशन डोक्यात येऊन गेले. आमच्या लहानशा गावात मोठ्या प्रमाणात लोड शेडिंगचा त्रास आहे.या स्थितीत आईस्क्रिम पार्लरचा फ्रिझर चांगला नसेल तर वारंवार होणाऱ्या तापमानाच्या फरकाने साल्मोनेलाचे जिवाणू वाढून टायफॉईडची साथच येऊ शकते.त्यामुळे ज्या गावात सातत्याने विजपुरवठा अनियमित असतो त्यांनी फ्रिझरची खात्री असल्याशिवाय शक्यतो गावात आईस्क्रिम खाऊ नये. तसेच पनीरपण फ्रिझरमधून दुकानदार काढून देतो तेव्हा ते चांगले कडक लागायला हवे हाताला.ते मऊ असल्यास फ्रिझरचा दोष असू शकतो.माझ्या क्लिनिकशेजारी अमूल पार्लर आहे .शुक्रवारी हमखास लाईट नसतात.सहज पनीर घ्यायला गेले असता ते हाताला मऊ लागल्याने त्याची नीट चौकशी केली असता फ्रिझर बिघडला आहे.चार तासावर फ्रिझिंग होतच नाही अशी धक्कादायक माहिती मिळाली.याच फ्रिझरमध्ये फ्रोझन मटाराचे पॅक,आईसक्रिमचे फॅमिली पॅक असतात. या गोष्टी जरुर चेक करुन घेत जावे .

सायकलस्वार 25/11/2015 - 00:42
या भागात दुर्दैवाने थोडा प्रपोगांडा दिसतो आहे. सांडपाण्यात वाढलेल्या भाज्या अपायकारक नसतात आणि मांस मात्र त्याचा प्रत्यक्ष दूषित घटकांशी संबध न येताही समहाऊ जास्त अपायकारक असतं या विधानाच्या स्पष्टिकरणासाठी दिलेली कारणे स्युडोसायंटिफिक आहेत. 'मानवी आतड्याची रचना शाकाहारासाठी बनली आहे' वगैरे धादांत चुकीची माहिती अजेंडाप्रेरितांकडून पुरवली जाते त्याच धर्तीचं हे स्पष्टिकरण वाटतं. इथे हे नमूद करायलाच हवं की धागाकर्त्याचं आधीचं लेखन पाहता त्यांचा उद्देश प्रामाणिक असल्याबद्दल यत्किंचित शंका नाही, परंतु या भागातले लिखाण हे थोडे अजेंडाप्रेरित स्रोतांच्या वाचनामुळे 'ढगाळ' झाल्यासारखे वाटते. भक्ष्याला होणार्‍या रोगांपासून भक्षक सहसा इम्युन असतो, ही सोय निसर्गानेच केली आहे. (मॅड काऊ सारखे अपवाद वगळता) त्यामुळे लेखात दिल्याप्रमाणे जसे वनस्पतींचे रोग आपल्याला होत नाहीत, तोच न्याय मांसाला देखिल लावता येतो. गायी, बकर्‍यां, कोंबड्या यांना होणार्‍या रोगांपैकी कितीसे रोग माणसांनाही होतात याबद्दलचा विदा कोणाकडे आहे का?
त्यामुळे जरी वनस्पतींवर कीटकनाशकाची वगैरे फवारणी झालेली असेल, त्या घाणेरड्या पाण्यात वाढवलेल्या असल्या किंवा जरी त्यांना कीड लागलेली असली तरी स्वच्छ धुवून, व्यवस्थित चिरून खराब दिसणारा/वाटणारा भाग काढून टाकून नीट शिजवलेले वनस्पतीजन्य अन्नपदार्थ सहसा धोकादायक ठरत नाहीत. पण असेच उपाय केल्यावरही प्राणिज पदार्थांची खात्री बाळगता येणे कठीण ठरते.
बाकी मानवाला हानिकारक जंतू भक्ष्याकडून वाहकरुपातून येण्याबद्दल- डुक्कर तर विष्ठा भक्षण करते, पण त्या विष्ठेतले ई-कोलाय आदि जंतू त्याच्या स्वतःच्या मांसापर्यंत (मनुष्यांसाठी खाद्य असलेल्या) पोहोचत नाहीत. त्यातला नकोसा भाग काढून घेऊन निसर्ग त्यापासून चविष्ट हॅम, बेकन आदि तयार करतो (तोंडाला पाणी सुटलं आत्ताच...) त्याउलट घाणीत वाढलेल्या पाल्याचा दूषित भाग आणि खाद्य भाग एकच असतो. त्यामुळे शाकाहारातून जंतूसंसर्ग होण्याची शक्याता जास्त असायला हवी. मी गेल्या काही वर्षातल्या इ-कोलाय आउटब्रेकच्या अमेरिकेतल्या जितक्या घटनांबद्दल वाचलं त्यात मांसाइतकेच शाकाहारी सोर्सेसही (स्पिनॅच, सिलॅंट्रो, टोमॅटो, आईसक्रीम आदि) कारणीभूत होते. कत्तलखान्यात जनावरांच्या आतड्याचे आणि खाद्य(खाण्यायोग्य)मांसाचे काँटॅमिनेशन होऊ न देण्याची काळजी घेऊन असे जंतूसंसर्ग टाळण्याची खबरदारी घेता येते. पण ज्या कोथिंबिरीच्या रोपावर एखादा प्राणी देहधर्म करून गेला आहे, जी पालकची जुडी रेल्वे रुळांशेजारी, 'जाणार्‍या' लोकांच्या जवळपास वाढली आहे, ती किती आणी कशी धुतल्यावर निर्जंतुक होणार?
दोन्हीही स्वच्छ धुतल्यानन्तरसुद्धा मांसामध्ये भाजीपेक्षा जास्त जन्तू शिल्लक रहाण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी मांसाकरता सदैव शीतपेटीची जरूर असते (कमी तपमानात जन्तू वाढू शकत नाहीत) पण ते सगळीकडेच/नेहमीच शक्य नसते.
हे खरं आहे, पण म्हणूनच मांसाहार करणारे मांसाच्या ताजेपणाबद्दल जास्त जागरूक असतात. कच्चे चिकन, अंडी वगैरे पदार्थ जरादेखिल खराब झाल्याची शक्यता वाटल्यास टाकून दिले जातात. त्याउलट भाज्या,फळे अगदी खराब होऊ लागेपर्यंत ठेवली जातात. धुळीचा थर बसलेली कोथिंबिर सहज चिरून पदार्थावर पसरली जाते... कारण भाज्या धोकादायक नसतातच! आईसक्रीम तर सदैव शीतपेटीत असतं ना? मग काही महिन्यांपूर्वी आईसक्रीम खाऊन लिस्टेरियाचा प्रादुर्भाव होऊन अमेरिकेत काही लोक मेले महाराजा!
जगातल्या वाढत्या hormones शी संबंधित आजारांचा/समस्यांचा (जसे मुली ९ -१० व्या वर्षीच वयात येणे) अशा "औषधीयुक्त" कोंबड्या आहारात असण्याशी काही संबंध आहे का?
??? मी तर ऐकलं होतं की मुलींच्या लवकर वयात येण्याचा संबंध गाईंच्या दुधाशी आहे म्ह्णून (गाईंना जास्त दूध देण्यासाठी दिल्या जाणार्‍या होर्मोन्स मुळे) rBST milk बद्दल जाणकारांना माहिती असेलच. बिचार्‍या कोंबड्याना कशाला मध्ये ओढता! (कोंबडी जाते जिवानिशी... आठवलं उगीच) ******* लेखमालिका चांगली आहे, लिखाणात समतोल राखल्यास उत्तम व्हावे.

शेखरमोघे 25/11/2015 - 09:08
माझा कुठलाही प्रचार करण्याचा हेतू नाही. "दृष्टी आडच्या सृष्टी" मध्ये काय झाले याचा फक्त एक विहन्गम आढावा. गणिती भाषेत सामिष आहारातली समिकरणे मान्डताना अज्ञात पदे आणि त्यान्चे एकमेकान्शी आणि परिणामाशी असलेले सम्बन्ध निरामिष आहारातील अशाच समिकरणापेक्षा जास्त गुन्तागुन्तीचे आहेत हे लक्षात असावे एव्हढाच उद्देश.

In reply to by शेखरमोघे

संदीप डांगे 25/11/2015 - 10:13
पुर्ण आदर राखून तुमच्या मताशी असहमत. दोन्ही आहारविशेषांमधे तुलना चुकीची आहे असे नमूद करू इच्छितो. जेनेटिकली मॉडिफाईड, हायब्रीड, रसायनसंपृक्त शाकाहार मांसाहारापेक्षा 'विषाणूसंक्रमणाच्या' बाबतीत कमी धोकादायक आहे असे मानणे चुकीच्या गृहितकावर आधारलेले आहे असे वाटते. ताजी कोंबडी कापून नीट शिजवून खाणे आणि शेतातला ताजा पालक उपटून कच्चाच खाणे यात धोक्याची तुलना होऊ शकत नाही. फक्त विषाणूंचाच विचार होत असेल तर भाग वेगळा, पण मानवी आरोग्याच्या संदर्भात असे संकुचित राहून चालणार नाही हे महत्त्वाचे.

मार्मिक गोडसे 25/11/2015 - 11:42
बाकी मानवाला हानिकारक जंतू भक्ष्याकडून वाहकरुपातून येण्याबद्दल- डुक्कर तर विष्ठा भक्षण करते, पण त्या विष्ठेतले ई-कोलाय आदि जंतू त्याच्या स्वतःच्या मांसापर्यंत (मनुष्यांसाठी खाद्य असलेल्या) पोहोचत नाहीत.
परंतू टेपवर्म सारखे परजीवी डुकराच्या मांसात असतात असे मांस व्यवस्थीत शिजवून न खाल्यास टेपवर्मचे इन्फेक्शन होउ शकते.
? मी तर ऐकलं होतं की मुलींच्या लवकर वयात येण्याचा संबंध गाईंच्या दुधाशी आहे म्ह्णून (गाईंना जास्त दूध देण्यासाठी दिल्या जाणार्‍या होर्मोन्स मुळे) rBST milk बद्दल जाणकारांना माहिती असेलच. बिचार्‍या कोंबड्याना कशाला मध्ये ओढता
पोल्ट्रीत कोंबड्यांची झटपट वाढ होण्यासाठीही OXYTOCIN हार्मोनचा वापर केला जातो.

In reply to by मार्मिक गोडसे

सायकलस्वार 25/11/2015 - 20:10
मुलींच्या वयात येण्याचा नेमका अर्थ समजून घ्या. काही लोकांच्या दाव्यानुसार आजकाल मुलींना म्हणे लवकर पाळी येते व त्यांचे अवयव लहान वयातच वाढू लागतात, आणि यासाठी गायींना जास्त दूध येण्यासाठी दिलं जाणारं rBST हे होर्मोन कारणीभूत आहे हा त्यांचा दावा आहे. (याचं खरं कारण आरबीएसटी हे स्युडोपर्यावरणवाद्यांचा आवडता फ्लॉगिंग हॉर्स - मॉन्सॅंटो - चं उत्पादन आहे हे आहे) जो तो आपापल्या अजेंड्याप्रमाणे सत्य वाकवू पहात आहे. जीएमओ(=मॉन्सॅंटो) विरोधकांच्या मते याला दूधातली होर्मोन्स जबाबदार आहेत. आता कोंबड्यांच्या मांसातल्या स्टेरॉईड्स याला जबाबदार हा नवीन शोध ऐकला. स्टेरॉईड्सनी फारतर मुली आणि मुलं लठ्ठ होतील. पाळी येण्याचा यात काय संबध? मुळात मुलींना आजकाल खरंच लवकर पाळी येते का, किंवा याला दुधातली होर्मोन्स जबाबदार आहेत का? - सिद्ध झालेले नाही. अर्थात कुठल्याही प्राण्याला ग्रोथ होर्मोन्स टोचणे हा प्रकार मलाही एकंदरीत अनैतिक वाटतो.

अभिजीत अवलिया 25/11/2015 - 18:49
लेख वाचून टेन्शन आलेले आहे. कोणतीही गोष्ट खाताना आता डोक्यात किडा वळवळेल. संदीप डांगे ह्यांनी सुद्धा उत्तम माहिती दिलेली आहे.

शब्दबम्बाळ 25/11/2015 - 21:07
अगदीच एकांगी वाटला हा लेख! (मी इतर लेख अजून वाचले नाहीत) म्हणजे वाईट काम करू नको नाहीतर बाप्पा शिक्षा करेल टाईप! मला तरी शाकाहार आणि मांसाहार हा फरक फारसा पटत नाही. या लेखात तरी शाकाहार कसा सात्विक आणि अहिंसक वगैरे हे लिहिलेलं नाही त्यामुळे धन्यवाद! मुद्देही शास्त्रीय आहे, पण फक्त एकच बाजू दाखवली आहे असे वाटते. पण तरीपण प्रश्न पडतो, समजा जर झाडे "थोडीशी" जरी इकडे तिकडे चालत असती तर आपण सगळ्यांनी ती हि सजीव आहेत हे मान्य केल असत का? आणि हा भेद ठेवला असता का? झाडे हळूहळू वाढतात आणि एकाच जागी असतात म्हणून त्यांना मारून खाणे हे योग्य का? अहिंसक का?

आनंदी गोपाळ 25/11/2015 - 21:57
१.
माझ्या एका आशियाई देशातल्या वास्तव्यात एकदा शहरातल्या मंडईवर देखरेख करणाऱ्या विभागाच्या लक्षात आले की सोललेल्या कोंबड्या विकणाऱ्या दुकानांत विकायला असलेल्या कोंबड्यांना formalin (जे मयत व्यक्तीचे शरीर दफ़नाच्या वेळेपर्यंत टिकवण्याकरता वापरले जाते) टोचून "चिरयौवना" (विकल्या जाईपर्यंत) ठेवले जात होते. त्यावर बराच आरडाओरडा झाला तरी अशा चिरयौवना कोंबड्या ओळखण्याची सहज सोपी पध्दत न मिळाल्यामुळे विकायला असलेल्या सर्व कोंबड्या जप्त करून त्यांची तपासणी केल्याखेरीज कोंबड्यांना formalin टोचल्याचे सिद्ध करणे शक्य नव्हते.
महोदय, सोपी पद्धत? लै वास मारतं हो ते.. फॉर्म्यालीन टोचून टिकवलेले कोणत्याही प्रकारचे मृत शरीर आपण कधी पाहिले/हाताळले आहेत काय? किंवा फॉर्म्यालीन नामक प्रक्रणाचा वास तरी कधी घेतला आहे का? बिलीव्ह मी, फर्स्ट एम्बीबीएसचे संपूर्ण दीड वर्ष, फॉर्मॅलीन टोचून टिकवलेले अख्खे मनुष्य शरीर खिमा होईपर्यंत कापण्याचा प्रकार मी स्वतः (सर्वच डॉक्टर्स करतात तसा) केलेला आहे. डिसेक्क्षन नंतर ताबडतोब लंच अवर असे. खूप वेळा हात धुवूनही तो वास जात नाही. हळूहळू नाक मेल्यानंतर जेवण करणं जमतं, पण तोपर्यंत काय काय होतं, ती वेगळी गम्मत आहे. तेव्हा, फॉर्मॅलिन टोचून कोंबड्या टिकवणे, हा प्रकार निव्वळ भूलथापा आहे, असे नम्रपणे नमूद करतो. फॉर्मॅलीन "टोचून" बॉडी टिकवली तर ती कशी दिसेल, ते एकदा पाहिलं तर चिरयौवन वगैरे गेले तेल लावत, 'दिसायला' इजिप्शियन लोकांनी टिकवलेल्या ममीज जास्त सुंदर दिसतात, अन बाटाच्या दुकानातले चामडे जास्त नरम लागेल खायला. फॉर्मॅलीन टोचताना, ते कसे व कुठे "टोचतात" याबद्दलही थोडी माहीती घेतलीत तर बरे होईल. २.
मांसाहारी लोकांची मांसाची जरूर आणि त्याकरता लागणार्‍या जमिनीची गरज या गुणोत्तराचा जर जास्त विचार केला तर हे लक्षात येईल की मांसाहारी लोकांना जितके "सामिष खाद्य" लागेल, ते "बनवण्याकरता" म्हणजे गायी, बैल, शेळ्या, मेन्ढ्या, कोम्बड्या याना लागणारा आहार - जो शेवटी वेगवेगळ्या वनस्पती आहे - आणि त्या उगवण्याकरता जमीनच लागते, जन्गल नव्हे.
शाकाहारी फक्त ताट भरून शाकाहारी जेवण करतात, तसे मांसाहारी फक्त (कच्चेच) मांस अंडी मासे ताट भरून (शाकाहारी जेवणाच्या प्रमाणात) खातात, अशी महोदयांची कन्सेप्ट दिसते आहे. म्हणजे चिकनच्या रस्श्यात कांदा/लसूण्/आलं/कोथिंबीर इ. काहीही घालायचं नाहीच, शिवाय सोबतीला अंड्याचीच पोळी लावून खायची बर्का लोखो. * बाकी मुद्द्यांचा प्रतिवाद वर आलेला आहेच. तेव्हा, लेखन शाखारी अजेंडाप्रणित आहे, असेच खेदाने नमूद करू इच्छितो.

In reply to by आनंदी गोपाळ

शेखरमोघे 25/11/2015 - 22:23
कृपया वाचा: http://www.antaranews.com/en/news/74626/formaldehyde-laced-foods-reemerge-in-indonesian-markets मी आधी म्हटल्याप्रमाणे माझ्या लिखाणात कुठलाही प्रचार नाही - शेवटी "पसन्द अपनी अपनी".

In reply to by आनंदी गोपाळ

शेखरमोघे 25/11/2015 - 22:32
कृपया वाचा आणि आपणच ठरवा: http://www.fao.org/newsroom/en/News/2006/1000448/index.html http://www.onegreenplanet.org/animalsandnature/facts-on-animal-farming-and-the-environment/ http://www.smithsonianmag.com/travel/is-the-livestock-industry-destroying-the-planet-11308007/?no-ist

आनंदी गोपाळ 25/11/2015 - 22:05
आशियाई देशातल्या वास्तव्यात एकदा शहरातल्या मंडईवर देखरेख करणाऱ्या विभागाच्या लक्षात
आशियाई देशांत मंडईवर देखरेख करणारा विभाग?? भरून आलं हो.. सदगदीत झालो. असा विभाग कोणत्या अशियाई देशात असतो? कुठल्याही मंडईत अन आजूबाजूला सडत पडलेल्या भाज्याच्या चिखलातून वाट काढण्याचा प्रकार कधी केलाय का?

In reply to by शेखरमोघे

आनंदी गोपाळ 25/11/2015 - 23:25
अहो साहेब, इंटरनेटवर कुणीही आपली साईट काढून मी तज्ञ असे सांगू शकतो. यातल्या प्रोपोगंडा साईट्सचा रेफरन्स लिंकवून माझेच कसे खरे हे देखिल सांगू शकतो. जरा कुठल्याही दवाखान्यात *जिथे ऑपरेशन थिएटर आहे* जाऊन फॉर्म्यालीनचा वास घेऊन पहा की?

In reply to by शेखरमोघे

आनंदी गोपाळ 25/11/2015 - 23:44
"After we tested the noodles, we found that they contained formalin and the we confiscated them," Illiza said in Banda Aceh recently.
हे त्या तुमच्या आंतरान्यूजवरून. फॉर्मॅलिन फ्युमिगेशन करण्यासाठी, अर्थात जंतू मारण्यासाठी वापरतात. फ्युमिगेशन केल्यानंतर त्या खोलीत, उदा. ऑपरेशन थिएटर, खाटिकखान्यामधे इ. फॉर्मॅलिन सापडणारच. यावरून कुणी ट्रिगरहॅपी पत्रकार फॉर्मॅलिन इंजेक्शनने नूडल्स टिकवतात असा जावाईशोध लावू लागला, अन तुम्ही त्यावर लेख पाडून लोकांची दिशाभूल करू लागलेत, तर कसे करावे?

आनंदी गोपाळ 25/11/2015 - 23:31
प्राण्याना देण्यात येणाऱ्या खाद्यात जर प्राणिज आणि दूषित अन्न (जसे दळलेले वाळवलेले प्राण्यांचे मांस/हाडे/रक्त ज्यातून सगळे सजीव जीवाणू काढले गेलेले नाहीत) मिसळले गेले असेल तर ते
सजीव जीवाणू नंतर "विषाणू" मध्ये बदलू शकतात.
असे विषाणू गायी-बैलाना "वेडे" (म्हणून mad cow हे रोगाचे नाव - ज्याला वैज्ञानिक नाव आहे Bovine Spongiform Encephalopathy) करू शकतात
माझ्या मराठी मेडियम बायोलॉजीमधे जीवाणू = Bacteria व विषाणू = virus असे शिकविले होते. तुमच्या अगाध बुद्धीमत्तेनुसार, कोणत्याही जादूटोण्याने, जगातले कोणतेही जीवाणू विषाणूंत बदलतात असा निर्बुद्ध शोध लागत असेल, तर शिंच्या त्या बायोलॉजीला समुद्रात बुडवून टाकायला हवं. एकाद्या आजाराचं नांव विकीपेडियात शोधून बोव्हाइन स्पाँजीफॉर्म एन्केफॅलोपथी असं लिहिलं म्हणजे तुम्ही मॅडकाऊ डिसीजबद्दलचे तज्ज्ञ झालात असे नव्हे. या वर क्वोट केलेल्या वाक्यात तोडलेले शास्त्रीय ज्ञानाचे तारे पाहूनच मला माझी सर्जरीची डिग्री चोरबाजारात विकायला काढाविशी वाटायला लागली आहे.

In reply to by आनंदी गोपाळ

अर्धवटराव 26/11/2015 - 00:10
या वर क्वोट केलेल्या वाक्यात तोडलेले शास्त्रीय ज्ञानाचे तारे पाहूनच मला माझी सर्जरीची डिग्री चोरबाजारात विकायला काढाविशी वाटायला लागली आहे.
=)) हा लेख वाचल्यापासुन कोंबड्या-बकर्‍यांना सद्गती देताना थोडं साशंक होतं मन... कुणितरी शास्त्रीय प्रतिवाद करुन हे मळभ दूर करावं असं वाटत होतं. या विकांतापुरतं तरी निवांत झालो आता :)

In reply to by आनंदी गोपाळ

शब्दबम्बाळ 26/11/2015 - 01:29
जर या लेखात दिलेल्या वरून वैज्ञानिक वाटणाऱ्या गोष्टी खोट्या असतील किंवा चुकीच्या स्त्रोतांकडून मिळवल्या असतील तर हा लोकांची अत्यंत दिशाभूल करणारा आणि त्यांच्यात अनाठायी भीती निर्माण करणारा लेख आहे. ज्याचा निषेध व्हायला हवा! आनंदी गोपाळ हे डॉक्टर असावेत हे मानतो(माफ करा! आंतरजालावर लगेच विश्वास ठेवणे कठीणच नाही का! ) त्यांनी घेतलेल्या आक्षेपांना योग्य उत्तरे द्या. तसेच लोकांच्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या गोष्टी लिहिणारा माणूस त्या क्षेत्रातला तज्ञ असला पाहिजे. लेखकांनी कृपया स्वतःची या क्षेत्रातली पात्रता दाखवून द्यावी. अन्यथा हा देखील सुडो साइण्टिफ़िक लेख आहे हे मान्य करावे.

रामपुरी 26/11/2015 - 01:56
" माझी सर्जरीची डिग्री चोरबाजारात विकायला काढाविशी वाटायला लागली आहे" हरकत नाही. काढाच विकायला. फक्त याच धाग्यावरचा नव्हे पण एकंदरच तुमचा प्रत्येक प्रतिसादातला थयथयाट बघता तुमच्यासारखा वैद्य नसलेलाच बरा. https://www.washingtonpost.com/news/to-your-health/wp/2015/10/26/hot-dogs-are-now-considered-carcinogens-here-are-roughly-480-other-things-the-who-says-might-cause-cancer/

In reply to by रामपुरी

आनंदी गोपाळ 26/11/2015 - 20:47
रच्याकने. मी नेहेमी इथे लिहित नाही, पण माझा तो थयथयाट, अन तुमचा तो पदन्यास, हे अंमळ करमणूकप्रधान वाटलं. कार्सिनोजेन्सबद्दल अधिक शास्त्रिय ज्ञान कुठे मिळेल त्याबद्दल सांगू शकतो, पण तुम्हाला ते सांगून उपयोग नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 26/11/2015 - 20:53
वरच्या प्रतिसादात,
हरकत नाही. काढाच विकायला.
याला उत्तर राहिले होते. ;) तर उत्तर : विकायला हवी तेव्हा काढू शकतो. स्वकमाईची आहे. घेण्याची ऐपत आहे का?

डॉ सुहास म्हात्रे 26/11/2015 - 02:17
मोघेसाहेब, या मालिकेतले तुमचे अगोदरचे लेख ऐतिहासिक/शास्त्रिय सत्यांवर आधारलेले होते. आवडलेही. मात्र या लेखात अनेक दाव्यांत शास्त्रीय गडबड झालेली आहे. विषेशतः खालील मुद्दे लक्ष देण्यायोग्य आहेत... १. जीवाणू-विषाणूंच्या व्याख्या व त्यासंबंधीचे दावे शास्त्रीय नाहीत. २. फॉर्मॅलीनचा वास इतका उग्र (पंजंट) असतो की त्याचा उपयोग माणसांनी खाण्यासाठी मारलेल्या कोंबड्यांत करण्यासंबंधी तुम्ही दिलेल्या दुव्याच्या वार्ताहराचा नक्की काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. ३. mercury poisoning फार प्राचीन कालापासून माहित आहे. आधुनिक शास्त्रालाही त्याची ओळख जपानी उदाहरणाच्या फार अगोदरपासून आहे. ४. पाण्यात / जमिनीत असलेल्या रासायनिक तत्वे प्राणी व वनस्पती या दोन्हीही प्रकारच्या जीवांत जातात आणि त्यांना खाणार्‍या माणसांना त्यापासून धोका होऊ शकतो... यात मांसाहारी / शाकाहारी यांच्यामध्ये फार फरक करता येत नाही. तसेच वनस्पतीने शोषलेली रासायनीक तत्वे अथवा तिच्यातील जीवाणू-विषाणू वनस्पतीचा एखादा भाग कापून दूर होत नाहीत. ५. अन्नतील जंतूंच्या बाबतीत म्हणायचे झाले तर मांस शिजवल्यावर (विषेशतः भारतात तर मांस उत्तम शिजवल्याशिवाय) त्यातले बहुतेक सर्व जंतू व विषाणू (बर्ड फ्लू चेही) मरतात व रोगकारक राहत नाहीत. मात्र अनेक शाकाहारी पदार्थ (फळे, भाज्या, इ) कच्च्या स्वरूपात नेहमीच खाल्ल्या जातात. त्यामुळे जंतूंमुळे होणाया अन्न्संसर्गाचे प्रमाण शाकाहारी पदार्थांत जास्त असून शकते. मात्र काही जंतूंनी तयार केलेले विषारी पदार्थ शिजवून नष्ट होत नाहीत व त्यापासून विषबाधा होऊ शकते. ६. "जीवो जीवस्य जीवनम" ने सुरु होणर्‍या पॅराग्राफमध्ये लिहिलेले दावे शास्त्रिय नाहीत, कारण... (अ) उत्तम परजीवी तोच जो आपल्या पालक जीवाचे आयुष्य धोक्यात आणत नाही. अश्या तर्‍हेने पालक जीव जास्त वेळ जिवंत राहिल्याने परजिवीही जास्त वेळ जिवंत राहतो व पालक जीवाच्या जीवावर मजा करू शकतो ! जे परजीवी आपल्या पालक जीवांना लवकर मारतात किंवा खूप त्रास देतात त्यांना एकतर पालक जीव मेल्यामुळे अथवा पालक जीवाने उपाय केल्याने दुसरा पालक जीव शोधत फिरावे लागते. (आ) वरचे ४. मध्ये दिलेले कारण, इत्यादी. असो. या मालिकेतले तुमचे अगोदरचे लेख बर्‍यापैकी ऐतिहासिक/शास्त्रिय सत्यांवर आधारलेले होते. आवडलेही. आताही तुमच्या हेतुबद्दल अजिबात संशय नाही पण संदर्भ शोधताना त्यांच्या सबळतेची व विश्वासार्हतेची खात्री केली असतीत तर ह्या लेखाचा विषयही एका उत्तम लेखाचे कारण बनून तुमच्या एकंदर मालिकेत शोभून दिसला असता. तसा तो नाही याचे सखेद आश्चर्य आहे. हा प्रतिसाद केवळ मानवी अन्नासारख्या अत्यंत महत्वाच्या व रोजच्या आयुष्याशी संबंधीत विषयाबद्दल गैरसमज टाळावे यासाठीच लिहिला आहे.

शेखरमोघे 26/11/2015 - 22:40
१. जीवाणू-विषाणु : कदाचित standard/consistent परिभाषा न वापरल्याचा परिणाम म्हणून गोन्धळ झाला आणि वाढला. विस्तारित अर्थ "हानिकारक सूक्ष्म जीव" असा घेतल्याने हा गोंधळ कमी/दूर व्हावा. २. कोम्बड्यात टोचलेले फॉर्मॅलीन : गैरसमज ? मी २००६ मध्ये जकार्ता, इंडोनेशियामध्ये प्रत्यक्ष अनुभवलेली घटना-शृंखला अशी होती : बऱ्याच wet markets (मी ज्या करता मंडई हा शब्द वापरला आहे, या जागा - भारतातील अनुभवावर जाऊ नका - बऱ्याच स्वच्छ असतात - मध्ये जी जिवंत/सोललेली कोंबडी विकतात, त्याकरता शीतपेट्या वापरत नाहीत, कारण त्यांच्याकडे फारसा "माल" फार वेळ साठवला जात नाही) वर Public Health Dept /पोलिस यांनी धाड घालून "for violation of food safety" कोंबड्या जप्त केल्यावर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यानुसार या कोंबड्यांमध्ये "formalin" असल्यामुळे त्या विकण्यावर निर्बंध असल्याबद्दल कळले. फॉर्मालीन नसल्याचे कसे ओळखावे हा नुस्खा street level local talks मधून मिळाला. बरेच (including most expatriates) मग super markets कडे वळले आणि wet markets मध्ये कोंबड्या खरिदणारे एकदम कमी झाल्याने काही काळ त्यांना हा धंदा बंद ठेवावा लागला. अर्थात गाडी काही महिन्यांनी काही प्रमाणात मूळ पदावर आलीच पण पुन्हा फॉर्मालीन वापारले जाऊ लागले का हे कळणार नाही. हा माझा कल्पनेचा खेळ किंवा गैरसमजूत असे काही नाही हे पुढील बातम्यात दिसेलच (एक ऑस्ट्रेलियात प्रकाशित आणि दुसरी जकार्तातील expatriate forum मधील) http://www.smh.com.au/news/World/Formaldehyde-food-scare-in-Indonesia/2006/01/09/1136771495164.html http://www.livinginindonesiaforum.org/showthread.php/20017-Formaldehyde-use-as-food-preservative मी आधी दिलेल्या २०११ मधल्या इंडोनेशियातील बातमीत "असे जे आधी व्हायचे, ते पुन्हा होते आहे" अशा स्वरूपात ती बातमी दिली आहे. आणखीही एका इंडोनेशियन "local" आणि "natural" कोंबड्या विकणाऱ्या कंपनीने "इतर लोक काय करतात" याची माहिती देताना "असे होते" या प्रकारातही ही माहिती दिली आहे (इंग्रजी यथातथाच असले तरी मतितार्थ लक्षात येईल) http://natural-poultry.com/en/frozen-chicken-more-safe/ इण्डोनेशियातील एका विश्वविद्यालयाने केलेला एक study दिलेला आहे http://faperta.unsoed.ac.id/content/studi-kandungan-formalin-pada-daging-ayam-segar-di-pasar-kliwon-kabupaten-temanggung या स्थळी (स्थानिक भाषेत, पण abstract इंग्रजीत दिला आहे), ज्यात दिसले की The results of the study showed that 21 samples (63.6%) out of 33 samples of chicken meat which sold in the Kliwon market Temanggung positive contain formaldehyde 10.003 to 20.202 ppm (mg / L). इतर देशांबद्दल फॉर्मालीनचा वापर होण्याच्या संदर्भात अशीच माहिती इथे दिली आहे आशिया खंड आणि वेगवेगळे अन्न पदार्थ ज्यात कोम्बडीही आहे:http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2007/06/16/AR2007061600535.html नायजेरिया व आजूबाजूचे आफ्रिकन देश: http://osesistalking.blogspot.in/2013/11/formalin-problem-with-frozen.html "ASEAN देशांत असे होते" या संदर्भात फॉर्मालीनच्या अवैध आणि धोकादायक उपयोगाबद्दल माहिती इथे दिली आहे (FAO हा माहितीस्रोत जगन्मान्य असावा). http://www.fao.org/docrep/015/i2448e/i2448e00.pdf (pages 4, 12 & 13) आनंदी गोपाळरावाना (आणि इतर काहीना देखील) "हे शक्यच कसे आहे?" असे वाटत असले तरी "हे असे होऊ शकते" किंवा "झालेही असेल" हे खळखळ करत का होईना पण मान्य व्हायला हरकत नसावी, मी स्वतः डॉक्टर नसलॊ तरी. ३. mercury poisoning : जरी mercury poisoning प्राचीन कालापासून माहित असले तरी "मिनामाता" इथे १९५६ पासून पासून होत असलेले "रोग" एका अन्न- साखळीत (समुद्राच्या पाण्यात कारखान्यातील उत्सर्ग सोडला जाणे, त्यातील पारा असलेली द्रव्ये माशांच्या खाण्यात येणे आणि नंतर ते मासे माणसांच्या खाण्यात येणे) नकळत झालेल्या पाऱ्याच्या प्रवेशामुळे होत असल्याचे नक्की कळायला काही वर्षे लागली. १९५९ साली काही नुकसान भरपाई मिळण्याच्या शक्यतेमुळे उपाय शोधण्याबद्दल चाललेली चळवळ मन्दावली. १९६५ मध्ये निईगाता प्रांतात "शोवा डेङ्को"च्या कारखान्याजवळ पुन्हा तसाच प्रकार होऊ लागल्यावर स्थानिक दबावामुळे "काही तरी करायला हवे" असे म्हणत कोर्टात गेलेल्या लोकाना चिसो कंपनीकडून नुकसान भरपाई १९७३ साली तर शोवा डेङ्को कंपनीकडून नुकसान भरपाई १९७१ साली मिळण्याकरता कोर्टाने निर्णय दिले. या जपानी उदाहरणातून दिसेल की एक तर असे जिथे होईल तिथे लोकांना होणारा त्रास आणि त्याचे मूळ कारण यांचा संबंध प्रस्थापित करणे कठिण असेल आणि त्यानंतर असा उपद्रव थांबणे (आणि त्या करता काहीतरी शिक्षा होणे आणि/किंवा नुकसान भरपाई द्यावी लागणे) याला आणखीनच वेळ लागेल आणि तोपर्यंत समुद्राचे आणि लोकांच्या जीवनातले "प्रदूषण" आणि त्या अनुषंगाने होणारे आजार आणि मृत्यू चालूच रहातील. तर मुद्दा हा की समस्येची जाणीव/ज्ञान कितीही अगोदरपासून असले तरी समस्येचे निराकरण होईपर्यंत जो वेळ लागेल त्या काळात अनेकांचे जीवन (आणि जेवण) धोक्यात येऊ शकते आणि जितक्या नवीन रसायनांची समुद्रातल्या (आधीच असलेल्या) कचऱ्यात भर पडेल तितके असलेले ज्ञान तोकडे ठरत जाईल. ४. पाण्यात / जमिनीत असलेल्या रासायनिक तत्वे प्राणी व वनस्पती या दोन्हीही प्रकारच्या जीवांत जातात आणि त्यांना खाणार्‍या माणसांना त्यापासून धोका होऊ शकतो हे जरी मान्य असले तरी प्राणी व वनस्पती या दोघांच्या tolerance मध्ये फरक असल्याने त्यांना खाणार्‍या माणसांना हे लक्षात ठेवायला हवे की प्राणी वनस्पतीपेक्षा जास्त प्रमाणात रासायनिक तत्वे "बाळगून" असू शकेल. ५. उत्तम परजीवी तोच जो आपल्या पालक जीवाचे आयुष्य धोक्यात आणत नाही. अश्या तर्‍हेने पालक जीव जास्त वेळ जिवंत राहिल्याने परजिवीही जास्त वेळ जिवंत राहतो व पालक जीवाच्या जीवावर मजा करू शकतो ! जे परजीवी आपल्या पालक जीवांना लवकर मारतात किंवा खूप त्रास देतात त्यांना एकतर पालक जीव मेल्यामुळे अथवा पालक जीवाने उपाय केल्याने दुसरा पालक जीव शोधत फिरावे लागते. हे तत्व बरोबर असले तरी जोपर्यंत host जिवंत आहे तोपर्यंतच लागू पडेल. जर व्यवस्थित काम करणारी शीतपेटी उपलब्ध नसेल तर प्राणी कापून साफ-बीफ केल्यानंतर सहा तास शीतपेटीखेरीज राहिलेले प्राणिज अन्न आणि वनस्पती कापून साफ-बीफ केल्यावर सहा तास शीतपेटीबाहेर राहिलेले वनस्पतिजन्य अन्न या दोन्हीपैकी कशात जास्त हानिकारक सूक्ष्म जीव असतील? हीच तुलना आठ तासानंतर कशी होईल? दहा तासानंतर? उन्हाळ्याच्या दिवसात ? ६. काही काही प्रतिसादात "हाय, उस कम्बख्त ने कभी पी ही नही और फिर लगा है… (इथे अगदी "उंट पर से शेळ्या हाकने" पासून " हमें सिखाने" पर्यंत आपल्या पसंतीचा मजकूर टाका)" असा ध्वनी आहे. मी स्वतः साधारण १९७२ ते १९९२ पर्यंत आशिया खंडात काम करताना आणि फिरताना मुंबई पासून टोकिओ पर्यंतच्या अनेक उत्तमोत्तम ठिकाणी अनेक आशियाई आणि पाश्चिमात्य तऱ्हेचे आणि घरगुती किंवा ढाब्यापासून पंचतारांकित दर्जाचे सामिष अन्न खाल्लेले आहे. काही कारणाने जेव्हां ताटात येण्याआधीच्या काही टप्प्यांत आपले अन्न कसे असते ते वेगवेगळ्या देशात "देखल्या डोळा" पाहण्याची वेळ आली तेव्हां माझी ताटातल्या अन्नाकडे बघण्याची आणि त्याचा विचार करण्याची दृष्टी बदलत गेली. पुनः लिहावेसे वाटते आहे - शेवटी "पसंद अपनी अपनी". हे चांगले किंवा ते वाईट असे मुळीच काही नसते.

In reply to by अर्धवटराव

साती 27/11/2015 - 12:21
लिंकाना बळी पडू नका हो. या लिंका म्हणजे असा प्रकार आहे- १.एम्बाल्मिंग करायला फॉर्मॅलिन वापरतात २. मीटमध्ये १० पार्ट पर मिलीयन (!)फॉर्मॅलिन सापडले ३. म्हणून कोंबडी एंबाल्मिंग केलीय असे म्हणणे म्हंजे- १. मला दोन डोळे आहेत. (चार पाच लिंका) २. गाढवाला दोन डोळे आहेत.(चार पाच लिंका) ३. मी गाढव आहे. बरं तिथे कोंबड्या इतक्या फटाफट विकतात की माल जास्तवेळ उरतच नाही. मग एंबाल्मिंगची गरज काय म्हणे? एंबाल्मिंग केल्यावर किती प्रमाणात फॉर्मॅलिन सापडू शकतं म्हणे? एंबाल्मिंग केलेलं मांस खाल्लं तर किती वेळ खाणारा जीवंत राहिल म्हणे. १० ते २० पार्ट पर मिलीयन एवढं फॉर्मॅलिन स्लॉटर हाऊस फ्यूमिगेट (निर्जंतुक करताना) रहात असेल. ते आपल्या स्वस्थ्यासाठीच निर्जंतुक करतात. एका ठराविक मात्रेपेक्षा जास्त फॉर्मॅकिन सापडणं एकवेळ फ्युमिगेशनच्या फॉर्मॅलिनचे अंधुकसे ट्रेसेस म्हणू शकतो आपण. (एक ग्लास सफरचंदाच्या ज्यूसमधून किती फॉर्मॅल्डिहाईड मिळतं ते गुगलून पहाणे) पण कोंबड्याच एंबाल्मिंग केलेत म्हणणे म्हणजे का हि ही! :)

In reply to by साती

बिनतोड. फॉर्मॅलिन म्हटल्यावर ते खाणारे लोक जिवंत कितीवेळ राहतील हाच विचार आला होता. शिवाय ते फॉर्मॅलिन जे लॅबमधे येतं त्यात फॉर्माल्डिहाईड+मिथेनॉलही असतं असं वाटतं. पण बायॉलॉजी विषय सोडलेला असल्याने जास्ती केमिकल शंका काढल्या नव्हत्या. मुळात जे काही टोचलं ते जगात सर्वत्र कॉमन आहे का? हाही प्रश्न आहेच. शिवाय पेटा, फार्म अशा क्रौर्यवाल्या लिंक्सही दिल्या आहेत. त्यामुळे शाकाहाराकडे वळवण्याचा उद्देश लिखाणात आहे हे दिसतं आहे. ते स्पोर्टिंगली मान्य केल्यास मुळात त्यात काही अयोग्य नाहीच. पण लेखकाने साफ इन्कार केल्याने पडदा पाडून पुढील उत्तम लेखमालेची वाट पाहू...!!

शेखरमोघे 27/11/2015 - 16:31
१. मी म्हणतो की जगातल्या काही बाजारात विकायला ठेवलेल्या सोललेल्या कोम्बड्यात फॉर्मालिन असल्याच्या सन्शय आल्याने त्या बाजारातून हटवल्या गेल्या. २. FAO आणि इतर अनेक सन्स्था/व्यक्ती म्हणतात की जगातल्या अनेक बाजारात विकायला ठेवलेल्या सोललेल्या कोम्बड्यात फॉर्मालिन असल्याच्या सन्शय अनेक वेळा आम्हाला आलेला आहे, तेव्हा तुम्ही जेव्हा सोललेल्या कोम्बड्या विकत घ्याल तेव्हा त्यात फॉर्मालिन नसल्याची तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने खात्री करून घ्या. ३. काही लोकाना वाटते " अस कधी कुठ होत का? जगात कुठेही होत असल तरी आमच्याकडे नाही होत. आमचा कोम्बडेवाला ना, अग्गद्दी छ्छान आहे, तो कध्धी कध्धी अस्स मुळ्ळिच करणार नाही, इतकी वर्ष आम्ही त्याच्याकडे नाक, कान, डोळे आणि तोन्ड बन्द करून खरेदी केली ते गेले कुठेच. आमची अगदी जाम खात्री आहे की तो कध्धी कध्धी कध्धी अस्स मुळ्ळिच करणार नाही, तो वाटल तर अगदी गळ्ळ्याच्ची शप्पथ्थ सुध्धा घेइल". ४. मी येव्हढेच म्हणेन "अरे वा, फार छान".

In reply to by शेखरमोघे

साती 27/11/2015 - 17:04
तुम्ही आता म्हणता सोललेल्या कोंबडीत फॉर्मॅलिन असण्याचा संशय आहे. असं म्हणतात. खात्री नाही. टेस्ट करावी. तुम्ही लेखात म्हणालात फॉर्मॅलिनने एम्बाल्म करून कोंबड्या चिरयौवना ठेवल्या जातात इतकेच नव्हे तर त्यांचे वजनही वाढवले जाते. आम्ही आता म्हणतो, ' अरे वा, फारच छान!' :)

In reply to by शेखरमोघे

डॉ सुहास म्हात्रे 28/11/2015 - 19:02
इथे तुम्हाला कोंबडी उद्योगात फॉर्मॅलिन (फॉर्मॅल्डिहाईड) कसे आणि किती वापरायला परवानगी आहे त्याचा सबळ व शास्त्रिय पुरावा दिसेल : FORMALDEHYDE IN POULTRY FEED त्यातला कोंबडीच्या शरीरात तडक जाऊ शकेल असे फॉर्मॅलीन कसे जाऊ शकते याबद्दलचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे : "The U.S. Food and Drug Administration have amended their regulations to provide for the use of formaldehyde (37% aqueous solution) at the rate of 2.5 kg. per ton of feed as an antimicrobial feed additive for maintaining complete poultry feeds salmonella negative for up to 14 days." या फॉर्मॅलिनचे रासायनिक परिक्षेत सापडणारे पण धोकादायक प्रमाणात नसणारे अत्यंत कमी अंश कोंबड्यांच्या मांसात असू शकतात. मात्र, मांस टिकवायला (म्हणजे सगळे जंतू मारून शरीर टिकवायला) जेवढ्या प्रमाणात फॉर्मॅलिन लागते ते नक्कीच कोंबडीला व ते मांस खाणार्‍या माणसाच्या जीवाला घातक ठरू शकते. त्याशिवाय, तेवढ्या परिणामात फॉर्मॅलिनचा अत्यंत तीव्र वास त्याची सवय नसलेल्या माणसाला (पर्यायाने गिर्‍हाईकाला) जवळ उभे राहणे केवळ अशक्य करेल. त्यामुळे तशी कोंबडी विकले जाणे अशक्य आहे. हे केवळ शास्त्रिय सत्यच म्हणून नव्हे तर मानवी शरीराचे डिसेक्शन करण्याच्या दीड वर्षांच्या अनुभवाने खात्रीने सांगत आहे.

कवितानागेश 29/11/2015 - 13:12
फोर्मलिन मध्ये कुठलीही डेड बॉडी बुडवून ठेवतात तेंव्हा भयानक वास येत असतो हे अनुभवले आहेच. पण ते रूम टेम्परेचर ला. फ्रीझ केल्यावरही वास शिल्लक राहतो का? शिवाय फोर्मलिन मध्ये बुडवने आणि ते इंजेक्ट करणे या २ वेगळ्या गोष्टी आहेत. इंजेक्ट केल्यावर आणि फ्रीझ केल्यावर कदाचित वास येत नसेल. एक शंका म्हणून विचारतेय.

In reply to by कवितानागेश

डॉ सुहास म्हात्रे 29/11/2015 - 13:29
फॉर्मॅलिन शिरेतून टोचून ते शरीरभर पसरवणे हे शरीरांतर्गत जंतूंनी कुजण्याची प्रक्रिया सुरू करू नये यासाठी आवश्यक असते. हे नेहमीच करतात, पण व्यक्ती / प्राणी मृत होऊन बराच वेळ झाल्यावर आणि रक्तवाहिन्यांतले रक्त साकळल्यानंतर त्याची परिणामकारकता (मृत्युनंतर झालेल्या वेळेवर अवलंबून) बरीच कमी ते शून्य होते. मृत शरीर / अवयव दोन एक दिवसांपेक्षा जास्त दिवस राखून ठेवायचे असतील तरच ते फॉर्मॅलिनच्या द्रावणात बुडवून ठेवतात... उदा: कायदेशीर (मेडिकोलिगल) कारणे, वैद्यकीय महाविद्यालयातील डिसेक्शन / इतर शिक्षण, इ. या सर्व प्रकारात कमी-जास्त पण सर्वसामान्य माणसाच्या नाकाला चांगलाच झोंबेल असा वास येतोच.

शेखरमोघे 21/08/2017 - 11:30
फॉर्मालिन …… पुढे चालू (च) मी लिहिलेले लिखाण आणि त्यावरच्या प्रतिक्रिया पुन्हा अभ्यासल्यावर वाटले की माझ्या लिहिण्याचा अनेकांनी (त्यात डॉक्टर आणि डॉक्टरीणबाई आहेत) असा अर्थ लावलेला दिसतो आहे. १. कोणीतरी मूर्ख कोंबडीविके, सोललेल्या कोबड्या घेतात आणि विकण्या आधी बादलीभर फॉर्मालिनमध्ये बुचकळत बुचकळत त्या कोंबड्यांची अवस्था cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे त्यासारखी करून टाकतात. २. हे मूर्ख कोंबडीविके त्यानंतर अशी कोंबड्यासारखीच वाटणारी cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे, ते विकत घेणारी भोट माणसे भेटतील आणि हा "माल" विकत घेतील अशी वाट बसतात. ३. या मूर्ख कोंबडीविक्याना अशी भोट गिऱ्हाईके मिळतात देखील आणि अशी कोंबड्यासारखीच वाटणारी cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे अशा वस्तू ते कोंबडी म्हणून बिनबोभाट विकत घेतात. मी लिहिलेले लिखाण आणि त्यावरची टिप्पणी वाचल्यावर असा मतितार्थ लक्षात यायला हवा. १. कोणीही मूर्ख नसतो - ना कोंबडीविके ना विकत घेणारे. जिथे कोम्बडीविक्याला refrigeration ची मदत नसते आणि सोललेल्या कोबड्या काही तास विकल्या न जाण्याची धास्ती असते, तेव्हां त्याला त्याचे होणारे नुकसान टाळण्याकरता "काही तरी" करण्याची जरूर वाटते. त्याने खरोखरच बादलीभर फॉर्मालिनमध्ये बुचकळत बुचकळत त्या कोंबड्यांची अवस्था cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे त्यासारखी करून टाकली आणि त्यामुळे कोंबड्या indefinitely टिकवल्या तर त्या कोणीच घेणार नाही हे त्याला नक्की माहीत असते. त्याला फक्त preservative वापरून त्याचा "माल" विकण्यासारख्या अवस्थेत काही तास ठेवण्याची तजवीज करायची असते. २. हे कोम्बडीविके अशी तजवीज करण्याकरता फॉर्मालिन वापरून जॆ काही करतात ( म्हणजे काय/ कसे याबद्दलचा माझा शोध चालू, संपल्यावर details देईन) ते त्यांच्याकडच्या unrefrigerated विकाऊ कोंबड्या साधारण इतर कोंबड्यासारख्याच वाटतील आणि विकत घेणारी माणसे फ़सतील इतपतच असते. ३. या तऱ्हेची फसवणूक चालते (कधी कधी न जमल्याने उजेडातही येते) हा इशारा मी दिलेल्या वेगवेगळ्या स्रोतात आहे. "मिपा" हा मंच कोण मूर्ख आणि कोण गाढव या शोधाकरता नसून आपले अनुभव आणि विचार यांची देवाण घेवाण करण्याकरता आहे अशी माझी धारणा आहे. पुढील संदर्भ आणखी अशाच तऱ्हेची माहिती देतात - आखिर पसंद अपनी अपनी. https://en.wikipedia.org/wiki/Roxarsone http://womansenergy.com/fda-finally-proved-that-the-chicken-meat-contains-arsenic-that-causes-cancer/?t=ha https://www.bloomberg.com/news/articles/2017-07-20/poultry-farms-in-india-resemble-superbug-reservoirs-study-finds काही काळ स्थगित असलेली "अन्नदाता सुखी भव" ही मालिका पुन्हा सुरु करण्याचा बेत आहे - कालोद्भवाणि पुष्पाणि समर्पयामि I

शेखरमोघे 21/08/2017 - 11:30
फॉर्मालिन …… पुढे चालू (च) मी लिहिलेले लिखाण आणि त्यावरच्या प्रतिक्रिया पुन्हा अभ्यासल्यावर वाटले की माझ्या लिहिण्याचा अनेकांनी (त्यात डॉक्टर आणि डॉक्टरीणबाई आहेत) असा अर्थ लावलेला दिसतो आहे. १. कोणीतरी मूर्ख कोंबडीविके, सोललेल्या कोबड्या घेतात आणि विकण्या आधी बादलीभर फॉर्मालिनमध्ये बुचकळत बुचकळत त्या कोंबड्यांची अवस्था cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे त्यासारखी करून टाकतात. २. हे मूर्ख कोंबडीविके त्यानंतर अशी कोंबड्यासारखीच वाटणारी cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे, ते विकत घेणारी भोट माणसे भेटतील आणि हा "माल" विकत घेतील अशी वाट बसतात. ३. या मूर्ख कोंबडीविक्याना अशी भोट गिऱ्हाईके मिळतात देखील आणि अशी कोंबड्यासारखीच वाटणारी cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे अशा वस्तू ते कोंबडी म्हणून बिनबोभाट विकत घेतात. मी लिहिलेले लिखाण आणि त्यावरची टिप्पणी वाचल्यावर असा मतितार्थ लक्षात यायला हवा. १. कोणीही मूर्ख नसतो - ना कोंबडीविके ना विकत घेणारे. जिथे कोम्बडीविक्याला refrigeration ची मदत नसते आणि सोललेल्या कोबड्या काही तास विकल्या न जाण्याची धास्ती असते, तेव्हां त्याला त्याचे होणारे नुकसान टाळण्याकरता "काही तरी" करण्याची जरूर वाटते. त्याने खरोखरच बादलीभर फॉर्मालिनमध्ये बुचकळत बुचकळत त्या कोंबड्यांची अवस्था cadaver किंवा जे जे काही फक्त specimen jar मध्ये ठेवण्यासारखे आहे त्यासारखी करून टाकली आणि त्यामुळे कोंबड्या indefinitely टिकवल्या तर त्या कोणीच घेणार नाही हे त्याला नक्की माहीत असते. त्याला फक्त preservative वापरून त्याचा "माल" विकण्यासारख्या अवस्थेत काही तास ठेवण्याची तजवीज करायची असते. २. हे कोम्बडीविके अशी तजवीज करण्याकरता फॉर्मालिन वापरून जॆ काही करतात ( म्हणजे काय/ कसे याबद्दलचा माझा शोध चालू, संपल्यावर details देईन) ते त्यांच्याकडच्या unrefrigerated विकाऊ कोंबड्या साधारण इतर कोंबड्यासारख्याच वाटतील आणि विकत घेणारी माणसे फ़सतील इतपतच असते. ३. या तऱ्हेची फसवणूक चालते (कधी कधी न जमल्याने उजेडातही येते) हा इशारा मी दिलेल्या वेगवेगळ्या स्रोतात आहे. "मिपा" हा मंच कोण मूर्ख आणि कोण गाढव या शोधाकरता नसून आपले अनुभव आणि विचार यांची देवाण घेवाण करण्याकरता आहे अशी माझी धारणा आहे. पुढील संदर्भ आणखी अशाच तऱ्हेची माहिती देतात - आखिर पसंद अपनी अपनी. https://en.wikipedia.org/wiki/Roxarsone http://womansenergy.com/fda-finally-proved-that-the-chicken-meat-contains-arsenic-that-causes-cancer/?t=ha https://www.bloomberg.com/news/articles/2017-07-20/poultry-farms-in-india-resemble-superbug-reservoirs-study-finds काही काळ स्थगित असलेली "अन्नदाता सुखी भव" ही मालिका पुन्हा सुरु करण्याचा बेत आहे - कालोद्भवाणि पुष्पाणि समर्पयामि I