✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज काय बरे खावे - सामिष का निरामिष? का पुठ्ठा किंवा गवतच बरे ?

श
शेखरमोघे यांनी
Mon, 11/23/2015 - 21:52  ·  लेख
लेख
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 भाग ५: http://www.misalpav.com/node/33371 शीर्षकच गोन्धळवून टाकणारे वाटते ना ? बरोबर - कारण आता कोणीच सामिष किंवा निरामिष खात नाही (बंगाली सोडून - ते मात्र अजूनही हे शब्द रोजच्या जीवनात वापरतात), आता तर कोणीच "शाकाहारी" किंवा "मांसाहारी" सुद्धा नसतात तर "व्हेज्ज" (बहुशः "प्युव्वर व्हेज्ज") किंवा "नॉन व्हेज्ज"च असतात, कदाचित "शाकाहारी" किंवा "मांसाहारी" असणे हे out of fashion झाले असावे किंवा मांसाहारी न म्हणता "नॉन व्हेज्ज" म्हटल्याने हा महामानव नुकताच आकाशातल्या बापाशी हस्तांदोलन करून आला असावा असा ग्रह करून देणे सोपे जात असावे (बहुशः "प्युव्वर व्हेज्ज" म्हणणारे "असा कसा हा नॉन व्हेज्ज नाही" ही टीका चुकवायला बघत असावेत). असो : मला काही काळ प्रश्न पडला आहे - का बरे "सामिष" या शब्दात काहीतरी "आमिष" सामील केले गेले असावे - जसे मासा गळाला लागण्याकरता लावावे लागते? असे आमिष नसेल तर "सामिष" पदार्थाना थारा न मिळता म्हणून? मला असे वाटायला प्रथम लागले ते साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी - जेव्हां "mad cow' रोग (जो गायी-बैलाना होतो) आणि त्यानंतर Creutzfeldt–Jakob disease (vCJD or nvCJD, जो माणसाना होऊ शकतो) या बद्दलची माहिती पहिल्यांदा माझ्या वाचण्यात आली. प्राण्याना देण्यात येणाऱ्या खाद्यात जर प्राणिज आणि दूषित अन्न (जसे दळलेले वाळवलेले प्राण्यांचे मांस/हाडे/रक्त ज्यातून सगळे सजीव जीवाणू काढले गेलेले नाहीत) मिसळले गेले असेल तर ते सजीव जीवाणू नंतर "विषाणू" मध्ये बदलू शकतात. असे विषाणू गायी-बैलाना "वेडे" (म्हणून mad cow हे रोगाचे नाव - ज्याला वैज्ञानिक नाव आहे Bovine Spongiform Encephalopathy) करू शकतात म्हणजेच अशा "आजारी" झालेल्या गायी-बैलाना हळू हळू स्वतःचे जीवन चालू ठेवण्यास जरूर असणारे खाणे पिणे देखील न जमता काहीतरी लहानशा कारणानेही ती उधळतात, बिथरतात, धडपडतात आणि काहीही व्यवस्थित करणे जमत न राहील्याने खंगून मरतात. अशा रोगाने बाधित गायी-बैलांचे मांस माणसांच्या खाण्यात आल्यास त्यांना Creutzfeldt–Jakob disease (vCJD or nvCJD) होऊ शकतो ज्यामध्ये माणसांची देखील परिस्थिती "mad cow" सारखी होऊन त्यातून फक्त मृत्यूनेच सुटका शक्य होते. अमेरिकेत गायी बैलांच्या खाण्यातील प्रथिने वाढवण्याकरता सोयाबीन, शेंगदाणा असे वनस्पतीजन्य पदार्थ उपलब्ध असल्याने प्राणिज पदार्थ फारसे वापरले जात नसत. युरोपात, विशेषतः इंग्लंडमध्ये तसे नसल्याने, ही समस्या तेथे गंभीर होती. जरी या रोगाने जगभरात ५०० पेक्षा कमी माणसे मृत्युमुखी पडली तरी हा रोग आटोक्यात आणण्याकरता इंग्लंडमधील mad cow आजाराची लागण झाल्याची शंका असलेल्या सुमारे ५ लाख गायी-बैलाना आणि इतर जगातील सुमारे तेव्हढ्याच गायी-बैलाना मारून त्यांचे मांस आणि सर्व अवयव जाळून टाकावे लागले. या रोगांना कारणीभूत असणारे विषाणू हे "virus" असावेत का एखाद्या तऱ्हेचे प्रथिन की ज्यामुळे मेंदूच्या क्रियेत उलथापालथ होऊ शकते, हे निश्चित होऊ न शकल्याने काही काळ "गायी बैलांचे मांस खाणे टाळा" असाच फक्त उपाय Creutzfeldt–Jakob disease टाळण्याकरता उपलब्ध होता. आता प्रगत देशातले कायदेकानू काटेकोरपणे जनावरांच्या खाद्यान्नात प्राणिज पदार्थांचे प्रमाण किती असावे हे ठरवतात आणि त्याची अंमलबजावणी करतात आणि म्हणून गायी बैलांच्या मांसाचा पुरवठा करणारे त्यांच्या "माला"ची खात्री देतात. पण असे काटेकोर कायदेकानू आणि त्यांची अंमल बजावणी नसलेल्या इतर देशातल्या गायी बैलांच्या मांसाबद्दल काय खात्री धरावी? त्या आधी १९५६ सालापासून जपानमधल्या मिनामाता या बंदरातल्या रहिवाशांना (मुख्यतः मासेमारी करणारे कोळी) आणि विशेषतः तेथील वाढत्या वयाच्या मुलामुलीना तसेच अनेक घरगुती जनावरांना (जसे मांजरे किंवा कुत्री, जी माणसांचे उरलेले अन्न खातात), हातापायातील संवेदना जाणे, हातापायाची बोटे वाकडी होऊन चालता फिरता न येणे अशी सुरवात होत शेवटी जगायला लागणाऱ्या अनेक हालचाली करता न येण्याने मृत्यू अशा अनेक अनाकलनीय तक्रारींने अनेक वर्षे ग्रासले होते. या तक्रारींचे कारण शोधताना लक्षात आले की त्यांच्या खाण्यात आलेल्या सागरी अन्नपदार्थात (मासे, कालवे, खेकडे इ. इ.) कारखान्यांतून समुद्राच्या पाण्यात सोडलेल्या उत्सर्गातून समुद्रात आलेला पारा साठलेला असे आणि असा त्यांच्या खाण्यात - अति सूक्ष्म प्रमाणात - आलेला पारा त्याना होणाऱ्या सर्व त्रासाचे मूळ होते. सुमारे ३० वर्षे चाललेल्या संशोधनानंतर या सर्व प्रकाराचे मूळ चिसो नांवाच्या कंपनीच्या कारखान्यातून पारा असलेल्या द्रव्यांच्या समुद्रात होणाऱ्या उत्सर्गात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा कारखाना बंद करण्यात आला. "mercury poisoning" हा एक नवा शब्द जो शब्दकोषात त्यानंतर आला त्याचा अर्थ कदाचित "मानवाने रत्नाकरावर केलेल्या अत्याचारांचे उट्टे काढण्याचा समुद्राने केलेला प्रयत्न" म्हणून देणे उचित ठरेल. इतरत्र अशा रोगाचा अजून तरी प्रादुर्भाव झाल्याचे आढळलेले नाही. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतल्या हडसन नदीत दिसून आला - जनरल इलेक्ट्रिक या कंपनीने नदीत सोडलेल्या Polychlorinated Biphenyls (PCB) या कर्करोगजनक रसायनाचा लहान माशांच्या शरीरात प्रादुर्भाव झाल्यावर हे मासे खाणाऱ्या मोठ्या माशांच्या शरीरातही हे रसायन जमा होत राहिल्याचे आढळून येऊ लागले. त्यामुळे हडसन नदीत सुमारे ३०० मैलाच्या टापूत मासेमारीला बंदी घालण्यात आली आणि नदीच्या पाण्याची सफाई करण्याचे अत्यंत खर्चिक काम अजूनही चालू आहे. अमेरिकेतल्या इतर अनेक नद्यात आढळात आलेले लिंगभेदरहित/द्विलिंगी (hermaphrodite) बेडूक किंवा मासे अशा घातकी रसायनांच्या परिणामाने झाले असावेत. अमेरिकेतील उदाहरणे देण्याचे कारण एव्हढेच की इतरत्र अशा अनैसर्गिक चमत्कृतींचा फारसा अभ्यास आणि पाठपुरावा केला जात नाही आणि त्यामुळे असेच इतरत्रही घडत असल्यास त्याबद्दलची माहिती सहजी मिळत नाही. मुंबई किंवा इतर तत्सम दाट लोकवस्ती, जहाजांची ये-जा आणि कारखान्यांचा उत्सर्ग असलेल्या शहरांजवळच्या समुद्रात ज्या ज्या वस्तू, रसायने, कचरा, जहाजातून गळणारे तेल आणि मानवी सांडपाणी/ मैला इ. इ. फेकले जाते त्यांचा तिथल्या समुद्री जीवांवर काय परिणाम होतो, त्या पाण्यातले कुठले घातक भाग अशा सागरी जीवांच्या शरीरात साठून राहू शकतात आणि त्यानंतर अशा "बाधित" जीवांना आपल्या उदरात नियमित आश्रय देणाऱ्या "नॉन व्हेज्ज" महात्म्यांवर त्या सगळ्या समुद्री कचऱ्याचा दीर्घकाळचा परिणाम काय असू शकतो हे कोणीही संकलित करत नसल्याने सध्यातरी गूढच आहे. त्याचप्रमाणे नदीकाठच्या दाट लोकवस्ती आणि कारखान्यांचा उत्सर्ग असलेल्या पाण्यात जी रसायने, कचरा आणि मानवी सांडपाणी/ मैला इ. इ. फेकले जाते त्यांचा तिथल्या नदीच्या पाण्यातल्या जीवांवर (की जे माणसाच्या अन्नसाखळीचा भाग होऊ शकतात) काय परिणाम होतो हे देखील तपासण्याची जरूर आहे. . थोडाबहुत हाच प्रकार मानवी नियंत्रणाखाली वाढवल्या जाणाऱ्या इतर "नॉन व्हेज्ज" कच्च्या मालाच्या बाबतीत होतो. मागणीप्रमाणे जिवंत/ "fresh" सोललेल्या कोंबड्या विकणाऱ्या दुकानांच्या जवळपासची कोंबड्यांची खुराडी जर रस्त्यालगत कुठे असली तर तिथून जाताना काही मिनिटे आजूबाजूच्या वातावरणातल्या उडत्या पिसांच्या आणि पांढऱ्या, पिवळ्या आणि तांबड्या अशा विविध रंगाच्या आणि वासाच्या भुकटीच्या वर्षावात नाक बंद करून पुढे वाट काढावी लागत असतानासुद्धा तिथे असलेली गिऱ्हाईकांची गर्दी बघून "नॉन व्हेज्ज" खाणारे लोक निधड्या छातीचे असतात कां (स्वतःच्या तसेच घरच्या इतरांच्या) जीवावर उदार असतात हे मला ठरवता आलेले नाही. आंतरराष्ट्रीय कुक्कुट पुराण आणखीनच घोळ घालते - तज्ञाना अजून हे ठरवता आलेले नाही की मागच्या काही वर्षांत कोंबडीचा आकार सतत का वाढतो आहे ? चांगल्या पैदाशीमुळे का वेगवेगळी औषधे (जसे antibiotics आणि growth hormones) वापरल्यामुळे? जगातल्या वाढत्या hormones शी संबंधित आजारांचा/समस्यांचा (जसे मुली ९ -१० व्या वर्षीच वयात येणे) अशा "औषधीयुक्त" कोंबड्या आहारात असण्याशी काही संबंध आहे का? माझ्या एका आशियाई देशातल्या वास्तव्यात एकदा शहरातल्या मंडईवर देखरेख करणाऱ्या विभागाच्या लक्षात आले की सोललेल्या कोंबड्या विकणाऱ्या दुकानांत विकायला असलेल्या कोंबड्यांना formalin (जे मयत व्यक्तीचे शरीर दफ़नाच्या वेळेपर्यंत टिकवण्याकरता वापरले जाते) टोचून "चिरयौवना" (विकल्या जाईपर्यंत) ठेवले जात होते. त्यावर बराच आरडाओरडा झाला तरी अशा चिरयौवना कोंबड्या ओळखण्याची सहज सोपी पध्दत न मिळाल्यामुळे विकायला असलेल्या सर्व कोंबड्या जप्त करून त्यांची तपासणी केल्याखेरीज कोंबड्यांना formalin टोचल्याचे सिद्ध करणे शक्य नव्हते. बिरबलाच्या तोडीच्या कुणातरी महात्म्याच्या लक्षात एक युक्ती आली - ज्या कोंबड्यांना formalin टोचण्यात आलेले असे त्यांच्या जवळपास सुद्धा माशा फिरकत नसत मात्र ज्या कोंबड्या अशा "दिखाऊ" तयार केलेल्या नसत त्यांच्यावर मात्र माशा घोंघावत. विकत घेणारे मात्र धर्मसंकटात - formalin ने सजवलेली (आणि सुजवलेली - कारण जितके हे द्रव्य टोचले गेलेले असेल तितके कोंबडीचे वजनही वाढले) कोंबडी घ्यावी का माशा घोंघावणारी? मानवी नियंत्रणाखाली वाढवल्या जाणाऱ्या ("aquaculture") कोळंबी, वेगवेगळ्या तऱ्हेचे मासे अशा जलचरांच्या बाबतीत तर प्रश्न आणखीनच जटिल होतो कारण या बंदिस्त पाण्यात वाढवल्या जाणाऱ्या जातीना त्यांच्या स्वास्थ्याकरता खाद्यातून प्रतिजैविके (antibiotics) दिली जातात. या प्रतिजैविकांची मात्रा कायद्याने कितीही नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी प्रत्यक्षात (खर्च कमी करण्याकरता) ही मात्रा जरूरीपेक्षा कमी असेल तर अशा जलचरांना त्यांच्या शरीरांत वाढणाऱ्या salmonella सारख्या सूक्ष्म जीवांना (micro-organisms) रोखणे कठीण होते आणि मग असे सूक्ष्म जीव या जलचरांच्या माध्यमातून मानवी शरीरातही प्रवेश मिळवू शकतात. पण गंमत ही की ही मात्रा जरूरीपेक्षा जास्त किंवा कमी कशीही असेल तरी अशा जलचरांच्या शरीरांत वाढणाऱ्या सूक्ष्म जीवांना विविध प्रतिजैविकांची इतकी सवय होऊ शकते की असे सूक्ष्म जीव मग बऱ्याच प्रतीजैविकाना दाद देत नाहीत. असे सूक्ष्म जीव व्यवस्थित शिजवल्याने जरी नाश पावत असले तरी शिजवण्याआधी "normal" (म्हणजे ज्यांना प्रतिजैविके मारू शकतात) किंवा प्रतिजैविकाना दाद न देणाऱ्या अशा कुठल्याही तऱ्हेच्या सूक्ष्म जीवांचा उपसर्ग माणसाना होऊ शकतो. मर्यादित प्रमाणात झालेला "normal" सूक्ष्म जीवांचा उपसर्ग औषधोपचाराने बरा होऊ शकला तरी जास्त गंभीर उपसर्ग जीवावर बेतू शकतो. प्रतिजैविकाना दाद न देणाऱ्या सूक्ष्म जीवांचा उपसर्ग झालेल्या माणसाना जरूर असेल तेव्हां प्रतिजैवके लागू न पडण्याचा (जसे इतर जीवावरच्या दुखण्यात) आणि त्यामुळे मृत्यू ओढवण्याचा धोका असतो. अशा super (प्रतिजैविकाना दाद न देणाऱ्या) सूक्ष्म जीवांचे अजाणते उत्पादक या रूपांत कांही व्यक्ती इतरांकरता धोकादायक ठरू शकतात . अशीच समस्या जनावरांना त्यांच्या स्वास्थ्याकरता खाद्यातून प्रतिजैविके जेव्हां दिली जातात तेव्हांही उद्भवते. "जीवो जीवस्य जीवनम" हा जीवन नियम ज्या काळांत लिहिला गेला त्यानंतर ज्ञानात बरीच भर पडली आहे. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या पेशींची रचना वेगवेगळी असल्याने आता हे लक्षात येते की वनस्पती सहसा बाहेरच्या सूक्ष्म जीवांना अवास्तव वाढू देण्याइतपत जीवनाधार देऊ शकत नाहीत (जर कीड लागलीच तर ती त्या वनस्पतीला संपवून टाकते आणि त्या नंतर तिला दुसरे "घर" बघावे लागते) पण प्राणी अनेक सूक्ष्म जीवांना "बाळगून" राहू शकत असल्याने अनेक निरुपद्रवी सूक्ष्म जीवांना त्यांचे "घर" बनलेल्या प्राण्याच्या आधाराने फोफावता येते किंवा उपद्रवी स्वरूपात बदलताही येते. असा प्राणी मग ज्याचे भक्ष्य बनेल त्याच्या पेशीना असे आगंतुक जर काबूत ठेवता आले नाहीत तर "शिकार करने को आये, शिकार हो के चले" असा प्रकार होतो. त्यामुळे जरी वनस्पतींवर कीटकनाशकाची वगैरे फवारणी झालेली असेल, त्या घाणेरड्या पाण्यात वाढवलेल्या असल्या किंवा जरी त्यांना कीड लागलेली असली तरी स्वच्छ धुवून, व्यवस्थित चिरून खराब दिसणारा/वाटणारा भाग काढून टाकून नीट शिजवलेले वनस्पतीजन्य अन्नपदार्थ सहसा धोकादायक ठरत नाहीत. पण असेच उपाय केल्यावरही प्राणिज पदार्थांची खात्री बाळगता येणे कठीण ठरते. तेव्हा आज काय बरे खावे - सामिष का निरामिष या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. कुठलाच जैविक धोका पत्करायचा नसेल तर (स्वच्छ धुतलेला) पुठ्ठा किंवा गवतच बरे ! ! जिज्ञासूनी जास्त माहिती करता पहावे : https://www.uaex.edu/publications/pdf/FSA-8007.pdf http://envirocancer.cornell.edu/factsheet/diet/fs37.hormones.cfm http://www.petaindia.com/issues/animals-used-for-food/vegetarian-vegan-starter-kit-2/chickens/ https://www.aspca.org/fight-cruelty/farm-animal-cruelty/chicken-faq https://thetruthaboutag.wordpress.com/2014/11/13/the-truth-about-hormone-free-chickens https://thetruthaboutag.wordpress.com/2014/12/29/the-truth-about-antibiotics-in-chickens https://en.wikipedia.org/wiki/Bovine_spongiform_encephalopathy http://www.eoearth.org/view/article/154624/ https://en.wikipedia.org/wiki/Minamata_disease http://www.petaindia.com/issues/animals-used-for-food/vegetarian-vegan-starter-kit-2/deadly-poisons-sea/ http://cspinet.org/foodsafety/riskymeat.html http://www.globalmeatnews.com/Industry-Markets/Indian-poultry-farmers-continue-use-of-growth-promoters-despite-official-ban http://www.dailymail.co.uk/news/article-2388444/How-drugs-pumped-supermarket-chickens-pose-terrifying-threat-health.html http://www.huffingtonpost.com/2011/01/31/hormones-in-food-should-y_n_815385.html?ir=India&adsSiteOverride=in http://articles.mercola.com/sites/articles/archive/2008/11/29/you-need-to-know-this-if-you-eat-tyson-chicken.aspx http://www.reuters.com/article/2014/07/17/us-money-chicken-organic-idUSKBN0FM24Q20140717 http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:I7IfPr8YmrIJ:www.cseindia.org/userfiles/Antibiotics%2520in%2520Chicken_Lab%2520Report_Final%252029%2520July.pdf+&cd=19&hl=en&ct=clnk&gl=in https://en.wikipedia.org/wiki/Bovine_spongiform_encephalopathy http://www.nytimes.com/2015/10/29/science/though-labeled-wild-that-serving-of-salmon-may-be-farmed-or-faux.html?_r=0 https://en.wikipedia.org/wiki/Pollution_of_the_Hudson_River http://www.petaindia.com/issues/animals-used-for-food/vegetarian-vegan-starter-kit-2/dark-truth-behind-milk-myth/ http://cspinet.org/foodsafety/abr.html http://cspinet.org/new/pdf/outbreaks_antibiotic_resistance_in_foodborne_pathogens_2013.pdf http://cspinet.org/reports/chemcuisine.htm https://en.wikipedia.org/wiki/Salmonellosis https://www.aspca.org/fight-cruelty/farm-animal-cruelty/factory-farmed-chicken-issues-and-alternatives http://edition.cnn.com/2015/11/04/health/california-crab-warning/index.html?iid=ob_article_organicsidebar_expansion&iref=obnetwork https://www.facebook.com/gary.yourofsky/videos/897708256951090/?fref=nf http://www.fao.org/3/a-a0282e.pdf (क्रमशः)

Book traversal links for अन्नदाता सुखी भव भाग ६ - आज काय बरे खावे - सामिष का निरामिष? का पुठ्ठा किंवा गवतच बरे ?

  • ‹ अन्नदाता सुखी भव भाग ५ - नव विचार
  • Up
  • अन्नदाता सुखी भव (क्रमशः) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
25338 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

वा सुंदर लेख!!!

राघवेंद्र
Mon, 11/23/2015 - 22:09 नवीन
बरिच नवीन माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments

लिहित रहा....

गणपा
Tue, 11/24/2015 - 07:55 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

विषय तोच पण वेगळा अँगल आवडला.

गवि
Tue, 11/24/2015 - 08:19 नवीन
विषय तोच पण वेगळा अँगल आवडला. गोदरेज रियलगुड, वेंकीज वगैरे सेफ असल्याने ते खाल्लयास नो हार्म इज कॉज्ड इ.इ. असं म्हणत यापुढे रस्सा ओरपला जाईल. दिलके खुश रखने के लिए ए गालिब..!!
  • Log in or register to post comments

तुमचे सगळे लेख खास असतात.

प्रमोद देर्देकर
Tue, 11/24/2015 - 10:14 नवीन
तुमचे सगळे लेख खास असतात. हाही नेहमीप्रमाणेच एक वेगळाच माहितीपुर्ण लेख.
  • Log in or register to post comments

+१ भारी

नाखु
Tue, 11/24/2015 - 10:32 नवीन
लेख आहे. अता म्हणू शकतो की दाने दाने पे लिखा है, खानेवाले का नाम (विथ सूक्ष्म जीवांसकट अनाव्श्यक घटक)
  • Log in or register to post comments

लेख आवडला. शाकाहारी असल्याने

मृत्युन्जय
Tue, 11/24/2015 - 10:36 नवीन
लेख आवडला. शाकाहारी असल्याने मला काही धोका नाही असे मानून खुष होण्यात काही अर्थ नाही असे वाटते कारण या प्रदूषणाचा दुष्परिणाम जसा प्राण्यांवर होतो आहे तसा भाज्यांवर आणि फळांवर देखील होत असणार.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी.

गवि
Tue, 11/24/2015 - 11:37 नवीन
अगदी अगदी. वर वेगळा अँगल आवडला असं जे मी म्हटलं ते यासाठी की "शुद्ध शाकाहारी" विचाराचा प्रसार प्रचार करण्याचा (आर्थिक कारणांनी किंवा तत्सम फायद्यासाठी नव्हे, एक पटलेली विचारसरणी म्हणूनही का होईना) हा एक वेगळा "पिचिंग"चा प्रकार आवडला. नेहमीचे पिचिंग अँगल्स खालीलपैकी एक किंवा त्यापैकी काहींचं मिश्रण असतं: १. मानवाची शरीररचनाच मुळी शाकाहारासाठी बनलेली आहे. २. क्रूरतेचा अँगल. प्राणी मारण्याच्या क्रूर पद्धती. स्टँडर्ड्स न पाळणार्‍या कत्तलखान्यांमधे जाऊन काढलेले किंवा कदाचित मुद्दाम नॉन स्टँडर्ड पण क्रूर दिसणार्‍या पद्धतीने प्राणी मारायला लावून शूटिंग केलंय की काय असं वाटणारे व्हिडीओ. कसाई मुळात सॅडिस्ट असतात आणि मरण्यापूर्वी प्राण्यांचा अधिकाधिक छळ करण्याने त्यांना अधिकच मनोरंजन मिळतं असं वाटायला लावणारे व्हिडीओ. ३. खाणं आणि स्वभाव यांचा मेळ घालणारा एक अँगल वापरला जातो. जे खाल तसे व्हाल. शाकाहारी = शांत, सात्विक अहिंसक मन, मांसाहार = हिंस्र, तामसी वखवखलेलं मन. ४. शास्त्रीय / ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनः प्राणी हे गवत, वनस्पती खातात आणि मग आपण त्यांना खातो. म्हणजे मधे एक एजंट आला, त्यापेक्षा थेट शाकाहार (गवत!!?, वनस्पती) खाल्ल्यास जास्त अन्न मिळेल. नासाडी टळेल. आणखीही अनेक दिशांनी अपील्स केली जातात. प्रत्येक प्रकारच्या ऑडियन्सला एकतरी भिडतंच. इथे प्राणीजन्य रोगांचा अँगल घेऊन बाकी सर्व अँगल टाळण्याचा नवीन अप्रोच आवडला. "जिवाणूंचे विषाणू होणे" इत्यादिने सुरु होऊन निवडक जागतिक मार्केट्समधली फॉर्मॅलिनयुक्त कोंबड्या, पारायुक्त मिनिमाटा वगैरे भयपेरणीयोग्य उदाहरणं घेऊन शेवटी जिज्ञासूंसाठी दिलेल्या लिंक्समधे अधेमधे एखाददोन "क्रौर्य' वगैरे मूळ लेखात उल्लेख टाळलेल्या गोष्टी एम्बेड करुन एकूण निर्णय वाचकावर सोडणं यामधे मांसाहारविरोधाचा अधिक नीटनेटका आणि इफेक्टिव्ह प्रयत्न जाणवतो. क्रौर्य हा मुद्दा मूळ लेखात सरळच आणला असता तर जास्त आवडलं असतं. असं मी का म्हणतो याचं कारण म्हणजे, हा लेख सुटा वाचणार्‍याला काय दिसतं? लेखात मांसाहारातून होऊ शकणारे भयंकर रोग, विषबाधा, दुष्परिणाम काही उदाहरणांतून सांगितले आहेत (मॅड काऊ, फॉर्मॅलिन, मिनिमाटा डिसीज वगैरे).. पण मांसाहारात मिळणार्‍या कोणत्याही आवश्यक घटकांबद्दल उल्लेख नाही. जगभरात मांसाहार हा शाकाहारापेक्षा जास्त उदंड असूनही जगाचा रोगराईने किंवा विषबाधेने गेल्या शंभर वर्षांत (इंडस्ट्रियल पोल्युशन सुरु झाल्यापासून.. आणि पारा वगैरेचा विधिनिषेध नसणार्‍या सुरुवातीच्या अनेक वर्षांमधे) जग अर्धंअधिक नष्ट का झालं नाही? बी कॉम्प्लेक्स, आयर्न, प्रोटीन्स यांचे रिच सोर्सेस म्हणून मांसाहार शाकाहारापेक्षा काही बाबतीत सरस ठरतो. शाकाहार वाईट नाही, पण तो मांसाहाराने कॉम्प्लिमेंट केला तर अधिक चौरस आहार बनतो. मॉडर्न मेडिसिन, आहारशास्त्र हे कधीही मांसाहाराला असे सरसकट बाद करत नाहीत. एका बाजारात फॉर्मॅलिन टोचून टिकवलेल्या कोंबड्यांविषयी लिहीताना कोंकणात किंवा अन्यत्र अनेक ठिकाणी घातक रसायनांच्या वापराने लवकर पिकवलेले आंबे अस्तित्वातच नसतात. मुंबईच्या रेल्वेकडेला पिकणारी आणि गटारांच्या पाण्यात धुतली जाणारी पालेभाजी पूर्ण अनुल्लेखित राहते. इथे उल्लेख नसला तरी (लिंक्समधे क्रूरतेचं एलेमेंट आणलेलं आहे) समजा अपुर्‍या वाढीच्या पिल्लांना डेलिकसीजसाठी मारलं जातं. हो.. जात असेल. पण मेथीची दोनदोन पानं उगवलेली छोटी रोपं खास कोवळी भाजी म्हणून वेगळी नाही विकत घेतली जात? आख्खं झाड/झुडुप बनण्याची क्षमता असलेलं बी (पावटा, चवळी, मटकी)अंकुरण्याआधीच उकळून त्याची उसळ नाही करत? मोड आणून बिरड्यांची उसळ करताना तर अंकुरही फुटू दिला जातो. आणि त्या बीजाने नव्या जोमाने एक वनस्पती बनण्याची सुरुवात करताक्षणी त्या अंकुरांसकट कढईत फोडणी नाही दिली जात? मटकीची रोपं उगवून पूर्ण मोठी जून झाली की मग त्याच्या पेंढ्या उकडून का नाही खात? हे फक्त उदाहरण आहे. प्रचार करताना असा बायस सर्वत्र असतोच. "मांसाहार की शाकाहार" असा दोन्ही बाजू इन्क्लूड करणारा प्रश्न / शीर्षक असताना केवळ एकाच बाजूचे एकाच प्रकारचे दोष दाखवून दुसर्‍या बाजूच्या आहारपद्धतीला आपोआप सरस भासवण्यात न्युट्रॅलिटीचा अभाव जाणवतो. सर्व माहिती रोचक आणि उत्तम असूनही शेवटी मांसाहार भीतीपोटी समूळ टाळण्याकडे निर्देश करण्याऐवजी जर मांसाहार करताना काय काळजी घ्यावी (मासळी खातानाची योग्य फ्रीक्वेन्सी-पार्‍याची पातळी सेफ राहण्यासाठी, मांस कच्चे न खाणे-पूर्ण शिजवणे-जिवाणूजन्य रोग टाळण्यासाठी, ताजे मांसच खरेदी करणे-ताजे समोरासमोर किंवा कायदेशीररित्या बंधनं पाळणार्‍या कंपन्यांचं सीलबंद फ्रोझन मांस) असे काही खबरदारीचे उपाय सुचवले असते तर जास्त बरं वाटलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

एका बाजारात फॉर्मॅलिन टोचून

गवि
Tue, 11/24/2015 - 11:44 नवीन
एका बाजारात फॉर्मॅलिन टोचून टिकवलेल्या कोंबड्यांविषयी लिहीताना कोंकणात किंवा अन्यत्र अनेक ठिकाणी घातक रसायनांच्या वापराने लवकर पिकवलेले आंबे अस्तित्वातच नसतात. मुंबईच्या रेल्वेकडेला पिकणारी आणि गटारांच्या पाण्यात धुतली जाणारी पालेभाजी पूर्ण अनुल्लेखित राहते.
झालस्तर सफरचंद चमकवण्यासाठी आणि कोरडी न पडण्यासाठी केलेलं वॅक्स कोटिंग, पिकांवरची रासायनिक फवारणी, गोदामांतल्या पोत्यांतली उंदरांची घुसखोरी आणि वीण, ज्या गोदामांमधे गेल्या आठवड्यात घातक रसायनं होती त्याच गोदामात गव्हाची पोती येऊन पडणं वगैरे व्यापारातल्या वेगवेगळ्या स्टेजला होणारे शाकाहारी अत्याचार राहिलेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मूळ लेखातला हा परिच्छेदः

गवि
Tue, 11/24/2015 - 12:00 नवीन
मूळ लेखातला हा परिच्छेदः
जरी वनस्पतींवर कीटकनाशकाची वगैरे फवारणी झालेली असेल, त्या घाणेरड्या पाण्यात वाढवलेल्या असल्या किंवा जरी त्यांना कीड लागलेली असली तरी स्वच्छ धुवून, व्यवस्थित चिरून खराब दिसणारा/वाटणारा भाग काढून टाकून नीट शिजवलेले वनस्पतीजन्य अन्नपदार्थ सहसा धोकादायक ठरत नाहीत. पण असेच उपाय केल्यावरही प्राणिज पदार्थांची खात्री बाळगता येणे कठीण ठरते.
बाहेरुन लागलेली घाण (सांडपाणी, अस्वच्छ घटक वगैरे) स्वच्छ धुतल्याने जितकी भाज्यांची निघते तितकीच मांसाचीही निघते. वनस्पती, भाज्या यांमधे धुवून अधिक पूर्ण आतपर्यंत स्वच्छ होण्याची कोणती खास प्रॉपर्टी आहे? विषारी पदार्थ (जमिनीतून भाजीच्या रोपाने शोषलेली विद्राव्य घातक रसायने, वरुन पडलेली प्रदूषिते, फवारे, मासोळीने स्वाहा केलेला पार्‍याचा अंश, कोंबडीत टोचलेला फॉर्मॅलिनचा अंश इ.इ.) हे शिजवून नष्ट होणार नाहीत. हे मांस आणि भाज्या दोन्हींना लागू आहे. घातक जंतू, जीवाणू इत्यादि पुरेसे नीट शिजवल्याने नष्ट होतात. मांस पूर्ण नीट शिजवल्यानेही आणि भाजी पूर्ण नीट शिजवल्यानेही. तेव्हा निरामिष पदार्थाबाबत खात्री देता येत नाही आणि शाकाहारीमात्र गॅरंटीड स्वच्छ होतात हे विधान योग्य वाटलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सामिष पदार्थ विषाणुंना सब्सीडाइज्ड रेट वर लीज देतात

अर्धवटराव
Tue, 11/24/2015 - 12:12 नवीन
म्हणुन तिथे विषाणुंची वसाहत जास्त चिवटपणे बहरते (असं लेखात म्हटलं आहे) म्हणुन कदाचीत निरामिष पदार्थ कंपॅरीटीव्हली जास्त स्वच्छ होत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पदार्थ पूर्ण शिजवला की त्यात

गवि
Tue, 11/24/2015 - 12:40 नवीन
पदार्थ पूर्ण शिजवला की त्यात जिवाणू किती (तुलनात्मक) कमीजास्त जोमात बहरत होते याला काय अर्थ उरतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

रेसिड्युज् ???

अर्धवटराव
Tue, 11/24/2015 - 12:48 नवीन
किती जोमाने बहरत होते म्हणजेच त्यातले किती बचेंगे तो और भी लडेंगे ?? पूर्ण शिजवल्यानंतर जर जीवाणूंचा १००% खात्मा शक्य असेल तर मग कुठल्याच काळजीची गरज नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बाहेरुन लागलेली घाण (सांडपाणी

शेखरमोघे
Tue, 11/24/2015 - 21:19 नवीन
बाहेरुन लागलेली घाण (सांडपाणी, अस्वच्छ घटक वगैरे) स्वच्छ धुतल्याने जितकी भाज्यांची निघते तितकीच मांसाचीही निघते. वनस्पती, भाज्या यांमधे धुवून अधिक पूर्ण आतपर्यंत स्वच्छ होण्याची कोणती खास प्रॉपर्टी आहे? जेव्हा मांसासारख्या पदार्थाना बाहेरुन सांडपाणी वगैरे सारखी घाण लागते, तेव्हा त्या घाण पाण्यातील जन्तू मांसामध्ये भाजीपेक्षा जास्त प्रमाणात आणि जास्त लौकर वाढतात आणि रूप बदलल्याने (mutation) घातक होतात. भाज्या इतका "जीवनाधार" देऊ शकत नसल्याने (वरकरणी) दोन्हीही स्वच्छ धुतल्यानन्तरसुद्धा मांसामध्ये भाजीपेक्षा जास्त जन्तू शिल्लक रहाण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी मांसाकरता सदैव शीतपेटीची जरूर असते (कमी तपमानात जन्तू वाढू शकत नाहीत) पण ते सगळीकडेच/नेहमीच शक्य नसते. विषारी पदार्थ (जमिनीतून भाजीच्या रोपाने शोषलेली विद्राव्य घातक रसायने, वरुन पडलेली प्रदूषिते, फवारे, मासोळीने स्वाहा केलेला पार्‍याचा अंश, कोंबडीत टोचलेला फॉर्मॅलिनचा अंश इ.इ.) हे शिजवून नष्ट होणार नाहीत. हे मांस आणि भाज्या दोन्हींना लागू आहे. भाजीच्या रोपाने जर विद्राव्य घातक रसायने जमिनीतून शोषली तर त्या रसायनाना "वागवण्याची" या रोपान्ची शक्ती प्राण्यापेक्षा कमी असल्याने थोड्याच मात्रेत रोपे शुष्क होतील, कोमेजतील आणि हा परिणाम लक्षात आल्याने अशी रोपे खाण्यातून वगळली जतील. असाच प्रकार फवारलेली रसायने आणि प्रदूषिते यान्च्याबद्दल होईल. मासोळीने स्वाहा केलेला पार्‍याचा अंश, कोंबडीत टोचलेला फॉर्मॅलिनचा अंश इ.इ. हे धुवून/शिजवून नष्ट होणार नाहीत, पण भाज्या अशा रसायनान्चा प्रयोग झाल्यास नष्ट झाल्याने खाण्याची वेळच येणार नाही. मांस आणि भाज्या दोन्हीं "सजीव" असल्या तरी भाज्यान्ची जन्तू, रसायने आणि इतर अशाच द्रव्याना सामावून घेण्याची शक्ती कमी असल्याने, अशा "कमी मात्रेत बाधित" भाज्या व्यवस्थित धुवून/शिजवून वापरल्याने जितक्या मानवी उपयोगाकरता "सुसह्य" होतील, तसेच मांसही होईल असे निश्चितपणे सान्गता येणार नाही. तुलना जिवन्त प्राणी (ज्यापासून विकण्याकरता मांस उपलब्ध होते) आणि जिवन्त वनस्पती (ज्यातून भाजी मिळते) या दोन वेगवेगळ्या सजीव गोष्टीनी रसायने किन्वा जन्तूमय घाणीला दिलेली दोन वेगवेगळ्या तर्‍हेची प्रतिक्रिया याची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

या भागाचं स्पष्टीकरण पटतंय.

गवि
Tue, 11/24/2015 - 21:38 नवीन
या भागाचं स्पष्टीकरण पटतंय. धन्यवाद. अर्थातच मांस खरेदी करताना खबरदारी जास्त घेतली पाहिजे हे मान्य. बादवे: मासा अन्नसाखळीत जितका वर तितके हेवी मेटल्स अधिक अॅक्युम्युलेट होतात हे लक्षात घेऊन माशाच्या जातीनुसार आठवड्यात कितीवेळा खावा हे ठरवावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

सहमती...

राही
Tue, 11/24/2015 - 12:56 नवीन
सहमती, अनुमोदन आणि समर्थन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मांसाहारी व्यक्तींसाठी दोन तुकडेमोड आर्ग्युमेंट्स -

बोका-ए-आझम
Wed, 11/25/2015 - 09:29 नवीन
१. जर वनस्पतींनाही जीव असतो तर मग शाकाहार- मांसाहार आणि शाकाहारी - मांसाहारी असा भेद कसा काय होऊ शकतो? शुद्ध शाकाहारी माणूसही कुणाला तरी मारूनच खातो. २. जगातल्या जंगल:शेतजमिनी या गुणोत्तराला मांसाहारी लोकांनीच सांभाळले आहे. जर सगळेच शाकाहारी झाले तर अन्नधान्याची गरज प्रचंड वाढेल. त्याच्यासाठी शेतजमिनी लागताइल. त्याच्यासाठी जंगलं तोडून शेती करावी लागेल. त्यामुळे पर्यावरणाची वाट लागेल. म्हणजेच शुद्ध शाकाहार हा एक प्रकारे पर्यावरणाला घातक आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला जर आपल्याला त्यातल्या त्यात स्वच्छ पर्यावरण द्यायचं असेल तर मांसाहार केल्याशिवाय पर्याय नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

जगातल्या जंगल:शेतजमिनी या

शेखरमोघे
Wed, 11/25/2015 - 13:44 नवीन
जगातल्या जंगल:शेतजमिनी या गुणोत्तराला मांसाहारी लोकांनीच सांभाळले आहे. जर सगळेच शाकाहारी झाले तर अन्नधान्याची गरज प्रचंड वाढेल. त्याच्यासाठी शेतजमिनी लागताइल. त्याच्यासाठी जंगलं तोडून शेती करावी लागेल. त्यामुळे पर्यावरणाची वाट लागेल. म्हणजेच शुद्ध शाकाहार हा एक प्रकारे पर्यावरणाला घातक आहे. मांसाहारी लोकांची मांसाची जरूर आणि त्याकरता लागणार्‍या जमिनीची गरज या गुणोत्तराचा जर जास्त विचार केला तर हे लक्षात येईल की मांसाहारी लोकांना जितके "सामिष खाद्य" लागेल, ते "बनवण्याकरता" म्हणजे गायी, बैल, शेळ्या, मेन्ढ्या, कोम्बड्या याना लागणारा आहार - जो शेवटी वेगवेगळ्या वनस्पती आहे - आणि त्या उगवण्याकरता जमीनच लागते, जन्गल नव्हे. याकरता "Feed Conversion Ratio" (एक किलो वजन वाढण्याकरता पुरवावे लागणारे खाद्य) जर पाहिला तर कोम्बडी आणि मासे यान्च्याकरता एक किलो वजन वाढण्याकरता १.५ ते २ किलो खाद्य पुरवावे लागते तर मेन्ढया आणि गाय-बैल यान्च्याकरता ५-२० किलो खाद्य लागते. असे खाद्य (गवत, मका/इतर धान्याची भरड, सरकी, प्रथिने आणि इतर खाद्यान्न) शेवटी जमिनीतच उगवावे लागते, की जिथे माणसाच्या खाण्याकरता उपयोगी धान्यही उगवू शकते. जर सगळेच शाकाहारी झाले तर उलट शेती करून्/जमीन वापरून उगवलेले धान्य जास्त efficiently वापरले जाईल आणि जास्त लोकान्चे कमी जमीन वापरून पोट भरेल. याला अपवाद ठरेल मासेमारी - पण सध्याच समुद्राचा तळ देखील खरवडून मासे गोळा केले जात आहेत आणि अनेक ठिकाणी जननक्षम मासे खाऊन नष्ट केल्याने depletion of fishing sites चा धोका निर्माण झाला आहे. जर वनस्पतींनाही जीव असतो तर मग शाकाहार- मांसाहार आणि शाकाहारी - मांसाहारी असा भेद कसा काय होऊ शकतो? शुद्ध शाकाहारी माणूसही कुणाला तरी मारूनच खातो. इथे मारून खाणे किन्वा न मारता खाणे याचा विचार नसून काय खाल्ले जाते याचा आहे - वनस्पतिजन्य का प्राणिजन्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बाकी सगळ्या मुद्द्यांशी सहमत नसलो

बोका-ए-आझम
Wed, 11/25/2015 - 18:23 नवीन
तरी निदान असहमत तरी नाही पण
जर सगळेच शाकाहारी झाले तर उलट शेती करून्/जमीन वापरून उगवलेले धान्य जास्त efficiently वापरले जाईल आणि जास्त लोकान्चे कमी जमीन वापरून पोट भरेल.
हा भाग पटला नाही. शेतीतलं उत्पादन हे घटत्या दराने वाढतं. म्हणजेच ते एका मर्यादेपर्यंतच वाढू शकतं. शिवाय त्या जमिनीचा कस प्रचंड प्रमाणात उतरेल आणि त्यामुळे उत्पादन कमी होईल. शिवाय उगवलेले धान्य हे efficiently कसे वापरले जाईल? जे लोक मांसाहारी आहेत ते शाकाहारी पदार्थही खातात. उदाहरणार्थ एखादा शाकाहारी माणूस अाणि मांसाहारी माणूस हे दोघेही भात आणि चपाती/भाकरी किंवा त्यांच्या संस्कृतीत जे काही असेल ते खाणारच आहेत, जी परिस्थिती आता आहे आणि आताच अन्नधान्याचं वाटप व्यवस्थित न झाल्यामुळे किंमती वाढत आहेत (हे एक कारण आहे, एकमेव नव्हे) म्हणजे वाटप efficient नाहीये. मग जर सगळेजण शाकाहारी झाले तर ते efficient कसं होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

सध्या अतिबलाढ्यअशा अमेरीकन फूड इंडस्ट्रीवर आधारीत मालिका बघतोय

अर्धवटराव
Tue, 11/24/2015 - 11:48 नवीन
डोळे, कान, तोंड आणि बरच काहि "आ वाचुन उघडणे"च्या प्रत्यय येतोय. त्यालाच काहिसा पूरक हा लेख. जाम टरकली आहे राव.
  • Log in or register to post comments

तुम्ही सांगितलेले मांसहाराचे

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 11/24/2015 - 12:26 नवीन
तुम्ही सांगितलेले मांसहाराचे धोके हे बहुतकरुन मान्य तरीही एक नमूद करू इच्छितो ते म्हणजे हे धोके पाश्चात्य जनतेला जास्त आहेत कारण १ फॅक्टरी फार्मिंग २ मांस न शिजवता खायची पद्धत, ह्या पद्धतीला कोल्ड कट्स कुझीन म्हणतात, ह्यात फ्रेश अन लुसलुशीत असणाऱ्या मांसाला शिजवण्यापेक्षा ते लोक ड्राय एंड ऐज करून क्योर करून कच्चेच खातात, पातळ स्लाइसेस करून वगैरे हे कोल्डकट्स खाल्ले जातात असला धोका माझ्यामते भारतीय अन मिडल ईस्टर्न कुझीन मधे जवळपास नगण्य आहे किंवा नाहीच अजिबात, तसेच ते फार ईस्टर्न कुझीन मधे सुद्धा जास्त आहे कारण जापान कोरिया वगैरे देशात टूना किंवा तत्सम फ्रेश कैच असलेली मासळी ही कच्ची उर्फ़ रॉ प्रकारे खाल्ली जाते (पातळ स्लाइसेस करुन विविध सॉस मधे बुडवून) म्हणून त्या लोकांस सी फ़ूड संबंधी मर्क्युरी पॉइसोनिंग (तुम्ही दिलेल्या केस नुसार फॅक्टरी अफ़्फ़्लुएंट्स मुळे) किंवा मासे कच्चे खाल्ल्याने होणाऱ्या हेवी मेटल पॉइसोनिंग ची शक्यता जास्त असते, भारत मुळात ट्रॉपिकल वातावरण असलेला देश असल्यामुळे इकडे आपल्याकडे मासळी सुकवलेली असली तरी ती वापरायच्या अगोदर भिजवुन नीट स्वच्छ करून व्यवस्थित शिजवुन खाल्ली जाते म्हणून हा धोका कमी संभावतो असे वाटते मला
  • Log in or register to post comments

मधुमक्षिका पालनातही

मार्मिक गोडसे
Tue, 11/24/2015 - 12:31 नवीन
मधुमक्षिका पालनातही प्रतिजैविकांचा वापर केला जातो, त्यामुळे मधही तेव्हडेच धोकादायक झाले आहे. एका शेती सेमिनार मध्ये तेथील शेतीतज्ञाने किडका फ्लॉवर,कोबी खाण्यात धोका कमी असतो असे सांगितले होते, कारण त्यावर पेस्टीसाइडचा अंश कमी प्रमाणात असतो. बाकी ऑरगॅनीक फूड ही फसवेगीरी आहे.
  • Log in or register to post comments

दृष्टीआड सृष्टी असा सर्व

संदीप डांगे
Tue, 11/24/2015 - 12:41 नवीन
दृष्टीआड सृष्टी असा सर्व प्रकार आहे. सध्या शेतीसाठी जैविक/सेंद्रिय औषधे व किटकनाशके बनवणार्‍या कंपन्यांसाठी काम करत असल्याने अनेक भीतीदायक गोष्टी कळतात. मंडईत मिळणारा ८०% माल खात्रीलायकपणे धोकादायक आहे. याबद्दल कुठेही काहीही सिद्ध होऊ शकत नाही. पण मानवजातीवर दूरगामी परिणाम होतील. अमूक एक खाल्ल्यानेच हा कॅन्सर, तो अमूकतमूक रोग झाला असे काही कार्यकारणभाव कळत नसल्याने आपण सर्व जीवंत राहण्यासाठी पोटात विष ढकलत आहोत एवढे मात्र खरे. एकिकडे अन्नधान्याचा कस कमी झाला त्यात अधिकचे रसायनांचे रेसिड्युअल खाल्ल्या जात आहे. मला ह्या काही नवीन मित्रांनी भाजीपाल्याविषयी काही महत्त्वपूर्ण सल्ले दिलेत. ते एकदा योग्यतर्‍हेने संग्रहित करून लेख टाकिन. त्यातल्या त्यात एक मोठा आणि महत्त्वाचा सल्ला म्हणजे होईल तितके ताज्या हिरव्या भाज्या घरातच पिकवणे हा आहे. वांग्याला कापणीपूर्वी २४ तास आधी एक औषध दिले जाते, त्याचा रेसिड्यु उतरायला सुमारे साठ दिवस लागतात. मंडईत ताजी वांगी बघून हिरीरीने घेणारे प्रत्यक्ष रसायनच घेत असतात. फळांमधे जी फळे नैसर्गिकरित्या वाढतात तीच खावीत. एकदा मला उत्तम वाणाची, जैविक व सेंद्रिय खतपद्धतीने पिकवलेली तीन किलो द्राक्षे भेट मिळाली होती. त्याचा दर्जा सांगण्यासाठी मी इतकंच सांगेन की माझा मुलगा, जो बाजारातल्या द्राक्षाचा एक दाणाही तोंडात धरत नाही, त्याने त्यातली एक किलो एका दिवसात फस्त केली! आम्ही त्यानंतर बाजारात मिळणार्‍या वेगवेगळ्या जाती ट्राय केल्या पण मुलगा कुठलंही द्राक्षं एक दाणा सुद्धा खात नाही. आम्हाला त्याच्या फळं न खाण्याचं कारण कळलं ते असं की तो फक्त उत्तम दर्जाचीच फळे खातो. बाकींना तोंडसुद्धा लावत नाही. जबरदस्ती दिलं तर थुंकून टाकतो. हे सगळं सांगायचं कारण एकच. की पक्षी-प्राण्यात असते तशी मनुष्यातसुद्धा जन्मजात चांगलं काय ते ओळखायची सिस्टीम असते. बर्‍याच कारणांनी आपण ती दडपून टाकतो. थोडा त्रास होईल पण घरीच स्वतःपुरती जमेल तितकी शेती करणे किंवा खर्‍या अर्थाने ऑर्गनिक आहार (वेज/नॉनवेज) घेणे आरोग्याच्या दृष्टीने परमआवश्यक होत जाणार आहे.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

जेपी
Tue, 11/24/2015 - 17:18 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

एकांगी लेखन

देश
Tue, 11/24/2015 - 17:38 नवीन
लेख नक्कीच अभ्यासपुर्ण आहे मात्र केवळ मांसाहारातीलच धोके अधोरेखित केले आहेत. वर गाविंनी म्हटल्याप्रमाणे शाकाहारातील धोकेपण अधोरेखित केले असते तर लेख संतुलित झाला असता. देश
  • Log in or register to post comments

शाकाहारातील धोकेपण अधोरेखित

शेखरमोघे
Tue, 11/24/2015 - 21:37 नवीन
शाकाहारातील धोकेपण अधोरेखित केले असते.... "वरकरणी चान्गले दिसणारे" प्राणिज अन्न तसेच वनस्पतिज अन्न जर तसे खरोखरच नसेल तर त्यातले तुलनात्मक धोके काय असतील हे दाखवताना हे ही सान्गण्याचा प्रयत्न आहे की फसगत जर वनस्पतिज अन्नात झाली तर "दिसते तसे नसण्याचा धक्का" जरा मर्यादितच असेल पण जर प्राणिज अन्न असेल तर जास्त खोलात जाऊन बघावे लागेल. जर कायदेकानू व्यवस्थित ठरवले व पाळले गेले तर "दिसते तसेच असण्याची" जास्त खात्री बाळगता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देश

फसगत जर वनस्पतिज अन्नात झाली

संदीप डांगे
Wed, 11/25/2015 - 22:21 नवीन
फसगत जर वनस्पतिज अन्नात झाली तर "दिसते तसे नसण्याचा धक्का" जरा मर्यादितच असेल पण जर प्राणिज अन्न असेल तर जास्त खोलात जाऊन बघावे लागेल
हे विधान आपला बायस अधिक स्पष्ट करत आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

बापरे

पैसा
Tue, 11/24/2015 - 19:10 नवीन
मांसाहारी जेवणात विषाणू असू शकतात हा एक प्रकार झाला आणि शाकाहारी जेवणात ते रसायने टोचलेली फळे, आणि जेनेटिकली मॉडिफाईड भाज्या वगैरे असतात. नक्की काय खावे तेच कळत नाही!
  • Log in or register to post comments

रसायने फळांमधे टोचल्या जात

संदीप डांगे
Tue, 11/24/2015 - 19:22 नवीन
रसायने फळांमधे टोचल्या जात नाहीत. कुठल्यातरी क्रियेटीव आर्टीस्टने ह्या संज्ञेच्या इलस्ट्रेशनसाठी फळात इंजेक्शनची आयडीया काढली. खरेतर प्रत्येक फळात असं औषध टोचणे शक्य नाही. पण पाण्यातून दिली जाणारी काही औषधे फळांवर रंग धरण्यासाठीही सोडली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लेख विचारात पाडून गेला.आवडला.

अजया
Tue, 11/24/2015 - 19:27 नवीन
लेख विचारात पाडून गेला.आवडला.
  • Log in or register to post comments

लेख वाचताना आईसक्रीममधुन

अजया
Tue, 11/24/2015 - 19:48 नवीन
लेख वाचताना आईसक्रीममधुन होणारे साल्मोनेला कंटामिनेशन डोक्यात येऊन गेले. आमच्या लहानशा गावात मोठ्या प्रमाणात लोड शेडिंगचा त्रास आहे.या स्थितीत आईस्क्रिम पार्लरचा फ्रिझर चांगला नसेल तर वारंवार होणाऱ्या तापमानाच्या फरकाने साल्मोनेलाचे जिवाणू वाढून टायफॉईडची साथच येऊ शकते.त्यामुळे ज्या गावात सातत्याने विजपुरवठा अनियमित असतो त्यांनी फ्रिझरची खात्री असल्याशिवाय शक्यतो गावात आईस्क्रिम खाऊ नये. तसेच पनीरपण फ्रिझरमधून दुकानदार काढून देतो तेव्हा ते चांगले कडक लागायला हवे हाताला.ते मऊ असल्यास फ्रिझरचा दोष असू शकतो.माझ्या क्लिनिकशेजारी अमूल पार्लर आहे .शुक्रवारी हमखास लाईट नसतात.सहज पनीर घ्यायला गेले असता ते हाताला मऊ लागल्याने त्याची नीट चौकशी केली असता फ्रिझर बिघडला आहे.चार तासावर फ्रिझिंग होतच नाही अशी धक्कादायक माहिती मिळाली.याच फ्रिझरमध्ये फ्रोझन मटाराचे पॅक,आईसक्रिमचे फॅमिली पॅक असतात. या गोष्टी जरुर चेक करुन घेत जावे .
  • Log in or register to post comments

या भागात दुर्दैवाने थोडा

सायकलस्वार
Wed, 11/25/2015 - 00:42 नवीन
या भागात दुर्दैवाने थोडा प्रपोगांडा दिसतो आहे. सांडपाण्यात वाढलेल्या भाज्या अपायकारक नसतात आणि मांस मात्र त्याचा प्रत्यक्ष दूषित घटकांशी संबध न येताही समहाऊ जास्त अपायकारक असतं या विधानाच्या स्पष्टिकरणासाठी दिलेली कारणे स्युडोसायंटिफिक आहेत. 'मानवी आतड्याची रचना शाकाहारासाठी बनली आहे' वगैरे धादांत चुकीची माहिती अजेंडाप्रेरितांकडून पुरवली जाते त्याच धर्तीचं हे स्पष्टिकरण वाटतं. इथे हे नमूद करायलाच हवं की धागाकर्त्याचं आधीचं लेखन पाहता त्यांचा उद्देश प्रामाणिक असल्याबद्दल यत्किंचित शंका नाही, परंतु या भागातले लिखाण हे थोडे अजेंडाप्रेरित स्रोतांच्या वाचनामुळे 'ढगाळ' झाल्यासारखे वाटते. भक्ष्याला होणार्‍या रोगांपासून भक्षक सहसा इम्युन असतो, ही सोय निसर्गानेच केली आहे. (मॅड काऊ सारखे अपवाद वगळता) त्यामुळे लेखात दिल्याप्रमाणे जसे वनस्पतींचे रोग आपल्याला होत नाहीत, तोच न्याय मांसाला देखिल लावता येतो. गायी, बकर्‍यां, कोंबड्या यांना होणार्‍या रोगांपैकी कितीसे रोग माणसांनाही होतात याबद्दलचा विदा कोणाकडे आहे का?
त्यामुळे जरी वनस्पतींवर कीटकनाशकाची वगैरे फवारणी झालेली असेल, त्या घाणेरड्या पाण्यात वाढवलेल्या असल्या किंवा जरी त्यांना कीड लागलेली असली तरी स्वच्छ धुवून, व्यवस्थित चिरून खराब दिसणारा/वाटणारा भाग काढून टाकून नीट शिजवलेले वनस्पतीजन्य अन्नपदार्थ सहसा धोकादायक ठरत नाहीत. पण असेच उपाय केल्यावरही प्राणिज पदार्थांची खात्री बाळगता येणे कठीण ठरते.
बाकी मानवाला हानिकारक जंतू भक्ष्याकडून वाहकरुपातून येण्याबद्दल- डुक्कर तर विष्ठा भक्षण करते, पण त्या विष्ठेतले ई-कोलाय आदि जंतू त्याच्या स्वतःच्या मांसापर्यंत (मनुष्यांसाठी खाद्य असलेल्या) पोहोचत नाहीत. त्यातला नकोसा भाग काढून घेऊन निसर्ग त्यापासून चविष्ट हॅम, बेकन आदि तयार करतो (तोंडाला पाणी सुटलं आत्ताच...) त्याउलट घाणीत वाढलेल्या पाल्याचा दूषित भाग आणि खाद्य भाग एकच असतो. त्यामुळे शाकाहारातून जंतूसंसर्ग होण्याची शक्याता जास्त असायला हवी. मी गेल्या काही वर्षातल्या इ-कोलाय आउटब्रेकच्या अमेरिकेतल्या जितक्या घटनांबद्दल वाचलं त्यात मांसाइतकेच शाकाहारी सोर्सेसही (स्पिनॅच, सिलॅंट्रो, टोमॅटो, आईसक्रीम आदि) कारणीभूत होते. कत्तलखान्यात जनावरांच्या आतड्याचे आणि खाद्य(खाण्यायोग्य)मांसाचे काँटॅमिनेशन होऊ न देण्याची काळजी घेऊन असे जंतूसंसर्ग टाळण्याची खबरदारी घेता येते. पण ज्या कोथिंबिरीच्या रोपावर एखादा प्राणी देहधर्म करून गेला आहे, जी पालकची जुडी रेल्वे रुळांशेजारी, 'जाणार्‍या' लोकांच्या जवळपास वाढली आहे, ती किती आणी कशी धुतल्यावर निर्जंतुक होणार?
दोन्हीही स्वच्छ धुतल्यानन्तरसुद्धा मांसामध्ये भाजीपेक्षा जास्त जन्तू शिल्लक रहाण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी मांसाकरता सदैव शीतपेटीची जरूर असते (कमी तपमानात जन्तू वाढू शकत नाहीत) पण ते सगळीकडेच/नेहमीच शक्य नसते.
हे खरं आहे, पण म्हणूनच मांसाहार करणारे मांसाच्या ताजेपणाबद्दल जास्त जागरूक असतात. कच्चे चिकन, अंडी वगैरे पदार्थ जरादेखिल खराब झाल्याची शक्यता वाटल्यास टाकून दिले जातात. त्याउलट भाज्या,फळे अगदी खराब होऊ लागेपर्यंत ठेवली जातात. धुळीचा थर बसलेली कोथिंबिर सहज चिरून पदार्थावर पसरली जाते... कारण भाज्या धोकादायक नसतातच! आईसक्रीम तर सदैव शीतपेटीत असतं ना? मग काही महिन्यांपूर्वी आईसक्रीम खाऊन लिस्टेरियाचा प्रादुर्भाव होऊन अमेरिकेत काही लोक मेले महाराजा!
जगातल्या वाढत्या hormones शी संबंधित आजारांचा/समस्यांचा (जसे मुली ९ -१० व्या वर्षीच वयात येणे) अशा "औषधीयुक्त" कोंबड्या आहारात असण्याशी काही संबंध आहे का?
??? मी तर ऐकलं होतं की मुलींच्या लवकर वयात येण्याचा संबंध गाईंच्या दुधाशी आहे म्ह्णून (गाईंना जास्त दूध देण्यासाठी दिल्या जाणार्‍या होर्मोन्स मुळे) rBST milk बद्दल जाणकारांना माहिती असेलच. बिचार्‍या कोंबड्याना कशाला मध्ये ओढता! (कोंबडी जाते जिवानिशी... आठवलं उगीच) ******* लेखमालिका चांगली आहे, लिखाणात समतोल राखल्यास उत्तम व्हावे.
  • Log in or register to post comments

माझा कुठलाही प्रचार करण्याचा

शेखरमोघे
Wed, 11/25/2015 - 09:08 नवीन
माझा कुठलाही प्रचार करण्याचा हेतू नाही. "दृष्टी आडच्या सृष्टी" मध्ये काय झाले याचा फक्त एक विहन्गम आढावा. गणिती भाषेत सामिष आहारातली समिकरणे मान्डताना अज्ञात पदे आणि त्यान्चे एकमेकान्शी आणि परिणामाशी असलेले सम्बन्ध निरामिष आहारातील अशाच समिकरणापेक्षा जास्त गुन्तागुन्तीचे आहेत हे लक्षात असावे एव्हढाच उद्देश.
  • Log in or register to post comments

पुर्ण आदर राखून तुमच्या मताशी

संदीप डांगे
Wed, 11/25/2015 - 10:13 नवीन
पुर्ण आदर राखून तुमच्या मताशी असहमत. दोन्ही आहारविशेषांमधे तुलना चुकीची आहे असे नमूद करू इच्छितो. जेनेटिकली मॉडिफाईड, हायब्रीड, रसायनसंपृक्त शाकाहार मांसाहारापेक्षा 'विषाणूसंक्रमणाच्या' बाबतीत कमी धोकादायक आहे असे मानणे चुकीच्या गृहितकावर आधारलेले आहे असे वाटते. ताजी कोंबडी कापून नीट शिजवून खाणे आणि शेतातला ताजा पालक उपटून कच्चाच खाणे यात धोक्याची तुलना होऊ शकत नाही. फक्त विषाणूंचाच विचार होत असेल तर भाग वेगळा, पण मानवी आरोग्याच्या संदर्भात असे संकुचित राहून चालणार नाही हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

बाकी मानवाला हानिकारक जंतू

मार्मिक गोडसे
Wed, 11/25/2015 - 11:42 नवीन
बाकी मानवाला हानिकारक जंतू भक्ष्याकडून वाहकरुपातून येण्याबद्दल- डुक्कर तर विष्ठा भक्षण करते, पण त्या विष्ठेतले ई-कोलाय आदि जंतू त्याच्या स्वतःच्या मांसापर्यंत (मनुष्यांसाठी खाद्य असलेल्या) पोहोचत नाहीत.
परंतू टेपवर्म सारखे परजीवी डुकराच्या मांसात असतात असे मांस व्यवस्थीत शिजवून न खाल्यास टेपवर्मचे इन्फेक्शन होउ शकते.
? मी तर ऐकलं होतं की मुलींच्या लवकर वयात येण्याचा संबंध गाईंच्या दुधाशी आहे म्ह्णून (गाईंना जास्त दूध देण्यासाठी दिल्या जाणार्‍या होर्मोन्स मुळे) rBST milk बद्दल जाणकारांना माहिती असेलच. बिचार्‍या कोंबड्याना कशाला मध्ये ओढता
पोल्ट्रीत कोंबड्यांची झटपट वाढ होण्यासाठीही OXYTOCIN हार्मोनचा वापर केला जातो.
  • Log in or register to post comments

मुलींच्या वयात येण्याचा नेमका

सायकलस्वार
Wed, 11/25/2015 - 20:10 नवीन
मुलींच्या वयात येण्याचा नेमका अर्थ समजून घ्या. काही लोकांच्या दाव्यानुसार आजकाल मुलींना म्हणे लवकर पाळी येते व त्यांचे अवयव लहान वयातच वाढू लागतात, आणि यासाठी गायींना जास्त दूध येण्यासाठी दिलं जाणारं rBST हे होर्मोन कारणीभूत आहे हा त्यांचा दावा आहे. (याचं खरं कारण आरबीएसटी हे स्युडोपर्यावरणवाद्यांचा आवडता फ्लॉगिंग हॉर्स - मॉन्सॅंटो - चं उत्पादन आहे हे आहे) जो तो आपापल्या अजेंड्याप्रमाणे सत्य वाकवू पहात आहे. जीएमओ(=मॉन्सॅंटो) विरोधकांच्या मते याला दूधातली होर्मोन्स जबाबदार आहेत. आता कोंबड्यांच्या मांसातल्या स्टेरॉईड्स याला जबाबदार हा नवीन शोध ऐकला. स्टेरॉईड्सनी फारतर मुली आणि मुलं लठ्ठ होतील. पाळी येण्याचा यात काय संबध? मुळात मुलींना आजकाल खरंच लवकर पाळी येते का, किंवा याला दुधातली होर्मोन्स जबाबदार आहेत का? - सिद्ध झालेले नाही. अर्थात कुठल्याही प्राण्याला ग्रोथ होर्मोन्स टोचणे हा प्रकार मलाही एकंदरीत अनैतिक वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

लेख वाचून टेन्शन आलेले आहे.

अभिजीत अवलिया
Wed, 11/25/2015 - 18:49 नवीन
लेख वाचून टेन्शन आलेले आहे. कोणतीही गोष्ट खाताना आता डोक्यात किडा वळवळेल. संदीप डांगे ह्यांनी सुद्धा उत्तम माहिती दिलेली आहे.
  • Log in or register to post comments

अगदीच एकांगी वाटला हा लेख!

शब्दबम्बाळ
Wed, 11/25/2015 - 21:07 नवीन
अगदीच एकांगी वाटला हा लेख! (मी इतर लेख अजून वाचले नाहीत) म्हणजे वाईट काम करू नको नाहीतर बाप्पा शिक्षा करेल टाईप! मला तरी शाकाहार आणि मांसाहार हा फरक फारसा पटत नाही. या लेखात तरी शाकाहार कसा सात्विक आणि अहिंसक वगैरे हे लिहिलेलं नाही त्यामुळे धन्यवाद! मुद्देही शास्त्रीय आहे, पण फक्त एकच बाजू दाखवली आहे असे वाटते. पण तरीपण प्रश्न पडतो, समजा जर झाडे "थोडीशी" जरी इकडे तिकडे चालत असती तर आपण सगळ्यांनी ती हि सजीव आहेत हे मान्य केल असत का? आणि हा भेद ठेवला असता का? झाडे हळूहळू वाढतात आणि एकाच जागी असतात म्हणून त्यांना मारून खाणे हे योग्य का? अहिंसक का?
  • Log in or register to post comments

१.

आनंदी गोपाळ
Wed, 11/25/2015 - 21:57 नवीन
१.
माझ्या एका आशियाई देशातल्या वास्तव्यात एकदा शहरातल्या मंडईवर देखरेख करणाऱ्या विभागाच्या लक्षात आले की सोललेल्या कोंबड्या विकणाऱ्या दुकानांत विकायला असलेल्या कोंबड्यांना formalin (जे मयत व्यक्तीचे शरीर दफ़नाच्या वेळेपर्यंत टिकवण्याकरता वापरले जाते) टोचून "चिरयौवना" (विकल्या जाईपर्यंत) ठेवले जात होते. त्यावर बराच आरडाओरडा झाला तरी अशा चिरयौवना कोंबड्या ओळखण्याची सहज सोपी पध्दत न मिळाल्यामुळे विकायला असलेल्या सर्व कोंबड्या जप्त करून त्यांची तपासणी केल्याखेरीज कोंबड्यांना formalin टोचल्याचे सिद्ध करणे शक्य नव्हते.
महोदय, सोपी पद्धत? लै वास मारतं हो ते.. फॉर्म्यालीन टोचून टिकवलेले कोणत्याही प्रकारचे मृत शरीर आपण कधी पाहिले/हाताळले आहेत काय? किंवा फॉर्म्यालीन नामक प्रक्रणाचा वास तरी कधी घेतला आहे का? बिलीव्ह मी, फर्स्ट एम्बीबीएसचे संपूर्ण दीड वर्ष, फॉर्मॅलीन टोचून टिकवलेले अख्खे मनुष्य शरीर खिमा होईपर्यंत कापण्याचा प्रकार मी स्वतः (सर्वच डॉक्टर्स करतात तसा) केलेला आहे. डिसेक्क्षन नंतर ताबडतोब लंच अवर असे. खूप वेळा हात धुवूनही तो वास जात नाही. हळूहळू नाक मेल्यानंतर जेवण करणं जमतं, पण तोपर्यंत काय काय होतं, ती वेगळी गम्मत आहे. तेव्हा, फॉर्मॅलिन टोचून कोंबड्या टिकवणे, हा प्रकार निव्वळ भूलथापा आहे, असे नम्रपणे नमूद करतो. फॉर्मॅलीन "टोचून" बॉडी टिकवली तर ती कशी दिसेल, ते एकदा पाहिलं तर चिरयौवन वगैरे गेले तेल लावत, 'दिसायला' इजिप्शियन लोकांनी टिकवलेल्या ममीज जास्त सुंदर दिसतात, अन बाटाच्या दुकानातले चामडे जास्त नरम लागेल खायला. फॉर्मॅलीन टोचताना, ते कसे व कुठे "टोचतात" याबद्दलही थोडी माहीती घेतलीत तर बरे होईल. २.
मांसाहारी लोकांची मांसाची जरूर आणि त्याकरता लागणार्‍या जमिनीची गरज या गुणोत्तराचा जर जास्त विचार केला तर हे लक्षात येईल की मांसाहारी लोकांना जितके "सामिष खाद्य" लागेल, ते "बनवण्याकरता" म्हणजे गायी, बैल, शेळ्या, मेन्ढ्या, कोम्बड्या याना लागणारा आहार - जो शेवटी वेगवेगळ्या वनस्पती आहे - आणि त्या उगवण्याकरता जमीनच लागते, जन्गल नव्हे.
शाकाहारी फक्त ताट भरून शाकाहारी जेवण करतात, तसे मांसाहारी फक्त (कच्चेच) मांस अंडी मासे ताट भरून (शाकाहारी जेवणाच्या प्रमाणात) खातात, अशी महोदयांची कन्सेप्ट दिसते आहे. म्हणजे चिकनच्या रस्श्यात कांदा/लसूण्/आलं/कोथिंबीर इ. काहीही घालायचं नाहीच, शिवाय सोबतीला अंड्याचीच पोळी लावून खायची बर्का लोखो. * बाकी मुद्द्यांचा प्रतिवाद वर आलेला आहेच. तेव्हा, लेखन शाखारी अजेंडाप्रणित आहे, असेच खेदाने नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments

कृपया वाचा: http://www

शेखरमोघे
Wed, 11/25/2015 - 22:23 नवीन
कृपया वाचा: http://www.antaranews.com/en/news/74626/formaldehyde-laced-foods-reemerge-in-indonesian-markets मी आधी म्हटल्याप्रमाणे माझ्या लिखाणात कुठलाही प्रचार नाही - शेवटी "पसन्द अपनी अपनी".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

कृपया वाचा आणि आपणच ठरवा:http

शेखरमोघे
Wed, 11/25/2015 - 22:32 नवीन
कृपया वाचा आणि आपणच ठरवा: http://www.fao.org/newsroom/en/News/2006/1000448/index.html http://www.onegreenplanet.org/animalsandnature/facts-on-animal-farming-and-the-environment/ http://www.smithsonianmag.com/travel/is-the-livestock-industry-destroying-the-planet-11308007/?no-ist
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

आशियाई देशातल्या वास्तव्यात

आनंदी गोपाळ
Wed, 11/25/2015 - 22:05 नवीन
आशियाई देशातल्या वास्तव्यात एकदा शहरातल्या मंडईवर देखरेख करणाऱ्या विभागाच्या लक्षात
आशियाई देशांत मंडईवर देखरेख करणारा विभाग?? भरून आलं हो.. सदगदीत झालो. असा विभाग कोणत्या अशियाई देशात असतो? कुठल्याही मंडईत अन आजूबाजूला सडत पडलेल्या भाज्याच्या चिखलातून वाट काढण्याचा प्रकार कधी केलाय का?
  • Log in or register to post comments

कृपया वाचा: http://www

शेखरमोघे
Wed, 11/25/2015 - 22:34 नवीन
कृपया वाचा: http://www.antaranews.com/en/news/74626/formaldehyde-laced-foods-reemerg...
  • Log in or register to post comments

अहो साहेब,

आनंदी गोपाळ
Wed, 11/25/2015 - 23:25 नवीन
अहो साहेब, इंटरनेटवर कुणीही आपली साईट काढून मी तज्ञ असे सांगू शकतो. यातल्या प्रोपोगंडा साईट्सचा रेफरन्स लिंकवून माझेच कसे खरे हे देखिल सांगू शकतो. जरा कुठल्याही दवाखान्यात *जिथे ऑपरेशन थिएटर आहे* जाऊन फॉर्म्यालीनचा वास घेऊन पहा की?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

"After we tested the noodles,

आनंदी गोपाळ
Wed, 11/25/2015 - 23:44 नवीन
"After we tested the noodles, we found that they contained formalin and the we confiscated them," Illiza said in Banda Aceh recently.
हे त्या तुमच्या आंतरान्यूजवरून. फॉर्मॅलिन फ्युमिगेशन करण्यासाठी, अर्थात जंतू मारण्यासाठी वापरतात. फ्युमिगेशन केल्यानंतर त्या खोलीत, उदा. ऑपरेशन थिएटर, खाटिकखान्यामधे इ. फॉर्मॅलिन सापडणारच. यावरून कुणी ट्रिगरहॅपी पत्रकार फॉर्मॅलिन इंजेक्शनने नूडल्स टिकवतात असा जावाईशोध लावू लागला, अन तुम्ही त्यावर लेख पाडून लोकांची दिशाभूल करू लागलेत, तर कसे करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

प्राण्याना देण्यात येणाऱ्या

आनंदी गोपाळ
Wed, 11/25/2015 - 23:31 नवीन
प्राण्याना देण्यात येणाऱ्या खाद्यात जर प्राणिज आणि दूषित अन्न (जसे दळलेले वाळवलेले प्राण्यांचे मांस/हाडे/रक्त ज्यातून सगळे सजीव जीवाणू काढले गेलेले नाहीत) मिसळले गेले असेल तर ते
सजीव जीवाणू नंतर "विषाणू" मध्ये बदलू शकतात.
असे विषाणू गायी-बैलाना "वेडे" (म्हणून mad cow हे रोगाचे नाव - ज्याला वैज्ञानिक नाव आहे Bovine Spongiform Encephalopathy) करू शकतात
माझ्या मराठी मेडियम बायोलॉजीमधे जीवाणू = Bacteria व विषाणू = virus असे शिकविले होते. तुमच्या अगाध बुद्धीमत्तेनुसार, कोणत्याही जादूटोण्याने, जगातले कोणतेही जीवाणू विषाणूंत बदलतात असा निर्बुद्ध शोध लागत असेल, तर शिंच्या त्या बायोलॉजीला समुद्रात बुडवून टाकायला हवं. एकाद्या आजाराचं नांव विकीपेडियात शोधून बोव्हाइन स्पाँजीफॉर्म एन्केफॅलोपथी असं लिहिलं म्हणजे तुम्ही मॅडकाऊ डिसीजबद्दलचे तज्ज्ञ झालात असे नव्हे. या वर क्वोट केलेल्या वाक्यात तोडलेले शास्त्रीय ज्ञानाचे तारे पाहूनच मला माझी सर्जरीची डिग्री चोरबाजारात विकायला काढाविशी वाटायला लागली आहे.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

अर्धवटराव
गुरुवार, 11/26/2015 - 00:10 नवीन
या वर क्वोट केलेल्या वाक्यात तोडलेले शास्त्रीय ज्ञानाचे तारे पाहूनच मला माझी सर्जरीची डिग्री चोरबाजारात विकायला काढाविशी वाटायला लागली आहे.
=)) हा लेख वाचल्यापासुन कोंबड्या-बकर्‍यांना सद्गती देताना थोडं साशंक होतं मन... कुणितरी शास्त्रीय प्रतिवाद करुन हे मळभ दूर करावं असं वाटत होतं. या विकांतापुरतं तरी निवांत झालो आता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

अरे देवा!

शब्दबम्बाळ
गुरुवार, 11/26/2015 - 01:29 नवीन
जर या लेखात दिलेल्या वरून वैज्ञानिक वाटणाऱ्या गोष्टी खोट्या असतील किंवा चुकीच्या स्त्रोतांकडून मिळवल्या असतील तर हा लोकांची अत्यंत दिशाभूल करणारा आणि त्यांच्यात अनाठायी भीती निर्माण करणारा लेख आहे. ज्याचा निषेध व्हायला हवा! आनंदी गोपाळ हे डॉक्टर असावेत हे मानतो(माफ करा! आंतरजालावर लगेच विश्वास ठेवणे कठीणच नाही का! ) त्यांनी घेतलेल्या आक्षेपांना योग्य उत्तरे द्या. तसेच लोकांच्या आरोग्याशी निगडीत असणाऱ्या गोष्टी लिहिणारा माणूस त्या क्षेत्रातला तज्ञ असला पाहिजे. लेखकांनी कृपया स्वतःची या क्षेत्रातली पात्रता दाखवून द्यावी. अन्यथा हा देखील सुडो साइण्टिफ़िक लेख आहे हे मान्य करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

" माझी सर्जरीची डिग्री

रामपुरी
गुरुवार, 11/26/2015 - 01:56 नवीन
" माझी सर्जरीची डिग्री चोरबाजारात विकायला काढाविशी वाटायला लागली आहे" हरकत नाही. काढाच विकायला. फक्त याच धाग्यावरचा नव्हे पण एकंदरच तुमचा प्रत्येक प्रतिसादातला थयथयाट बघता तुमच्यासारखा वैद्य नसलेलाच बरा. https://www.washingtonpost.com/news/to-your-health/wp/2015/10/26/hot-dogs-are-now-considered-carcinogens-here-are-roughly-480-other-things-the-who-says-might-cause-cancer/
  • Log in or register to post comments

हसून झालं माझं.

आनंदी गोपाळ
गुरुवार, 11/26/2015 - 20:47 नवीन
रच्याकने. मी नेहेमी इथे लिहित नाही, पण माझा तो थयथयाट, अन तुमचा तो पदन्यास, हे अंमळ करमणूकप्रधान वाटलं. कार्सिनोजेन्सबद्दल अधिक शास्त्रिय ज्ञान कुठे मिळेल त्याबद्दल सांगू शकतो, पण तुम्हाला ते सांगून उपयोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

माफ करा, स्वयंसंपादन इथे उपलब्ध नाही.

आनंदी गोपाळ
गुरुवार, 11/26/2015 - 20:53 नवीन
वरच्या प्रतिसादात,
हरकत नाही. काढाच विकायला.
याला उत्तर राहिले होते. ;) तर उत्तर : विकायला हवी तेव्हा काढू शकतो. स्वकमाईची आहे. घेण्याची ऐपत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा