Skip to main content

शेवग्याच्या शेंगा

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 09/10/2015 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
कडुसं पडत आलं तरीबी पारुबाय कुडाला पोतारा देत बसली व्हती. आता पतुर म्हागची दोन घरं पोतारुन झालती. म्होरलं वट्यापसलं भिताड तेवढं राहीलेलं. भाभीनं बादलीत पाणी आणुन पाटीत वतलं. "पारे, जायच्या आगुदर तीवडी भांडीपण घास बरका" एखादं लालुच दाखवल्यासारखं भाभी म्हणाली. "पल्लीला आणलं आसतं तर बर झालं आसतं आवं, तीवडीच भांडी घासु लागली आसती". पारुबायनं एक खडा टाकुन बघितला. "नगं ग बया, बर झालं न्हाय आणली, नस्ती ब्याद नकु आमाला" भाभी फणकाऱ्यानं म्हणत घरात शिरली. पारुबायनं आपलं हिरमुसलेपण लपवुन ठिवलं. आताशा पारुबायला आसली कामं व्हत न्हवती. ऊन्हातान्हात जिवाला तरास व्हायचा. पल्लीला घरी यीवुन म्हैना झाला. कुठल्यातरी रोगानं तिचा नवरा लगीन झाल्यावर चार दिसांतच खपलेला. अपशकुनी म्हणुन सासरची लोकं तिलाच दोष द्यायला लागली. पोर घरी एकटीच असायची. माणसांपासून लांब राहल्यामुळं येड्यावाणी करायची. कामाधंद्याच्या निमित्तानं तिला पुन्हा माणसात आणायला पारुबायची खटपट चाललेली. गावातल्या बायका बी तिचं नाव ऐकल्यावर कसनुसं करायच्या. पारुबाय आपलं दु:ख भेगाभेगात लिपवत चालली. जरावेळानं एक एक करत भाभीनं भांड्याकुंड्यांचा भला मोठा ढिगारा वट्यावर आणुन टाकला. पोतारा दिऊन झाल्यावर पारुबायनं भांडी घासायला घेतली.एक एक करत सगळी भांडीकुंडी खंगाळुन दिली. सगळं काम आवरल्यावर तिला बी जरा बरं वाटलं. "लय ऊशीर झाला बघा, पली इकटीच हाय घरी, कसं व्हायचं वं माझ्या पुरीचं?" जाता जाता पारुबायनं पुन्हा एकदा विषय काढायचा प्रयत्न केला. " ऊद्या गोधड्या न सतरंज्या ध्वायच्यात, जरा लवकर यी, आन इकटीच इगं बया" तिच्याकडं जराही लक्ष न देता भाभीनं दुसऱ्या दिवशीची कामं पुढं ठिवली. घरातनं दोन शेर जवारी आणून तिच्यापुढं ठिवली. ह्या दोन शेरात खरतर तिचं भागत न्हवतं, पण हाजरी वाढवुन मागायची ही वेळ न्हवती. पारुबाय कापडी पिशवीत जवारी भरुन घराकडं चालली. जाताना अंगणातल्या शेवग्याकडं बघत काहीतरी आठवल्यासारखं म्हणाली, " भाभी, तेवढ्या चार शेंगा न्हिवका कावं?, लिकीला लय आवडत्यात, कालपस्न म्हागं लागलीय" ............................................................................. (शब्दाचा पसारा मांडणे मला आवडत नाही. थोडक्यात बरचकाही सांगायचा नेहमी प्रयत्न करतो. कथा अर्धवट वाटू शकते, पण माझ्या दृष्टिने ती पुर्ण आहे)
लेखनविषय:

वाचने 8751
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

छानच लिहिता जव्हेरगंजभाऊ! पुलेशु! Sandy

चांगली.

तुमचे काही लेखन खरंच भारी असते. असेच लिहा. उगीच काहीबाही खरडत बसण्यात तुमची प्रतिभा वाया घालवू नका अशी विनंती.

जव्हेर भाऊ, कृपया शेवट समजावून सांगता का? बाकी तुमचे ग्रामीण भाषेतले लिखाण खूप आवडते. तुमच्या कथा वाचताना डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते.

खेड्यात कामवाली बाईकडून कमी पैशात जास्त काम करून घेतले जाते. त्यामानाने शहरातील कामवाली बाई हुशार झाली आहे. दिवाळी बोनस घेत आहे. एक टब भांडे व एक बादली कपडे धुतात. ही चांगली गोष्ट आहे. पैसे देतो म्हणजे कितीही काम करून घेता येते ही मानसिकता चुक आहे.

For रातराणी, नाव आडनाव, बजरबट्टू, अभिजीत अवलिया : 'शेवग्याच्या शेंगा हे फक्त निमीत होते, पारूबायला पल्लीचा उल्लेख जाता-जाताही करून भाभीच्या मनात तिच नाव घोळवतं ठेवायला!' जव्हेरगंजभौ, करेक्ट मी इफ आय ॲम रॉंग! Sandy

In reply to by चांदणे संदीप

कस काय सुचतं जव्हेरगंजभौंना? आणि कस काय जमतं सँडीदादांना? (प्यारेसिंग : तुम्हारा कमाल तुम जानो, मुझे तो सब कमाल लगता है! ब्र्रर्र्हा!!) -चोप्यपास्ते

In reply to by दिवाकर कुलकर्णी

धन्यवाद दिवाकरजी, ('खपले जाल' सारखे लेखन खरतर मिपावरच्या जिलबी मोडमध्ये अधुन मधुन लिहितो. तेवढीच गंमत.) बाकी ग्रामीण कथा आपल्याला लिहायला जाम आवडत्यात. सर्व प्रतिसादकांचे मन:पुर्वक आभार.

बायदवे शेवग्याच्या शेंगा पावरबाज असतात असे आमच्या आंध्रदेशीय मित्रवर्यांकडून ऐकले आहे. सदस्यांचे काय मत / अनुभव आहे?

शब्दांचा पसारा अजिबात न मांडता थोडक्यात बरंच काही सांगून गेलात! मस्त! आवडली कथा. जे.पी.