णमस्कार्स लोक्स,
हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे. अजूनही बरेच श्लोक आहेत, तेही कधी प्रसंगोपात शेअर करेनच.
कस्येयं तरणि: प्रपा पथिक नः किं पेयमस्यां पयः |
धेनोर्वा उत माहिषं बधिर रे वारः कथं मंगल: |
भौमो वाऽथ शनेश्वरोऽमृतमिदं तत्तेऽधरे दृश्यते |
श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे, यद् रोचते तत्पिब ||
तर एक वाटसरू एका गावी आला आहे. त्याला तहान लागलीये. पण विहीर समोर दिसली तरी समोर एक तरुणी दिसल्यावर बोलायला काहीतरी निमित्त हुडकले तर पाहिजेच नैका? मग साहेबांनी विचारले,
"कस्येयं तरणि: प्रपा?-तहानेपासून तारणारी ही विहीर कुणाची आहे?"
"पथिक, नः- रे वाटसरू, आमची आहे."
"किं पेयं अस्यां? - यात पेय काय आहे?"
तरुणी मोठी सुंदर असावी. नपेक्षा आता यापुढे बोलण्यासारखे काही फारसे नसले तरी वाटसरू साहेब परत पीजे मारू लागले. ती काय दुधातुपाची विहीर थोडीच असणार होती? पण बोलायची हौस दांडगी ;)
"पयः-पाणी".
आता पय शब्दाची मजा अशी की त्याचा अर्थ दूध अन पाणी असा दोन्ही होतो. प्रवाश्याने दूध असा अर्थ घेऊन पुन्हा वेळ काढण्यासाठी पीजे मारणे सुरू केले.
"धेनोर्वा उत माहिषं?-गायीचं आहे की म्हशीचं?"
मुलगीही लगेच त्याची संभावना करते.
"बधिर रे, वारः- अरे बहिर्या, वार आहे ते!!!"
आता वार शब्दाची मजा अशी की वारि म्हंजे पाणी अन वार म्हंजे दिवस. [खरे तर व्याकरणदृष्ट्या श्लोकातले रूप चुकलेले आहे, पण कोटीच्या विनोदास्तव तिकडे जरा दुर्लक्ष करू.] मग प्रवासी तरुणाने अजून पीजे मारत संभाषण सुरू ठेवले.
"कथं मंगलः, भौमो वाऽथ शनेश्वरः?-वार म्हंजे काय मंगळवार आहे, रविवार आहे की शनिवार?"
आता मात्र तरुणीने सांगितले,
"अमृतमिदम्- अरे, हे अमृत आहे!"
आता इथे चांगला मौका मिळालासे पाहून तरुणाने चौका मारला-एकदम हेलिकॉप्टर शॉट!
"तत्तेऽधरे दृश्यते- ते तर तुझ्या ओठात दिसतंय" फुल्टू फ्लर्टिंग :D
आता या इतक्या बोल्ड उत्तरावर तरुणीची प्रतिक्रिया काय आहे?
"श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे- अरे विलासी प्रवासी मित्रा,
यद् रोचते तत्पिब- जे आवडते ते पी!!! " ;) ;)
फुल ऑन ग्रीन शिग्नलच दिला की हो एकदम तिने. यापुढे काय झाले हे कवी सांगत नाही, अन सांगायला तरी कशाला पाहिजे म्हणा. राजकन्येबरोबरच्या अशाच कैक अनुभवांवरती त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले, सुळावर जातानाही त्याला तेच आठवत होते म्हणे. तेव्हा राजाने सुळावरून त्याला उतरवले. ते नंतर कधीतरी शेअर अवश्य करेन. लै मसाला आहे त्यात ;)
अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त