Skip to main content

श्रद्धांजली...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 30/01/2013 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
. नक्कीच मोठा माणूस... फार मोठा... इतका मोठा की विरोधकांनाही नीटसा कळला नाही, आणि अनुयायांनाही... 'माणूस' होता म्हणूनच बर्‍यावाईटाचं मिश्रण होतं... आणि 'मोठा' होता म्हणून हे वास्तव (बर्‍यावाईटाचं मिश्रण असणं) स्वीकारण्याची आणि जाहिरपणे मान्य करायची हिंमत होती... गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो... श्रद्धांजली!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15085
प्रतिक्रिया 69

प्रतिक्रिया

हा माणूस आपल्याला कळला नाही हे सहमत. त्यानी केलेल्या चुका पोटात घेऊन पण हा माणूस खूप मोठा होता. एकवेळ ते आवडत नाहीत हे समजू शकतो पण त्यांचाबाद्दल जो पराकोटीचा तिरस्कार काही लोकांमध्ये आढळतो त्याने आश्चर्य व्हयला होत.

बापूंना श्रद्धांजली. लोकसत्तेतील लेखही फार आवडला. गांधींची ही जाहिरात मला आवडते. (एका टेलिकॉम कंपनीने स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी गांधींचा वापर करुन घेतला असला तरी)

नक्कीच मोठा माणूस... फार मोठा... इतका मोठा की विरोधकांनाही नीटसा कळला नाही, आणि अनुयायांनाही... 'माणूस' होता म्हणूनच बर्‍यावाईटाचं मिश्रण होतं... आणि 'मोठा' होता म्हणून हे वास्तव (बर्‍यावाईटाचं मिश्रण असणं) स्वीकारण्याची आणि जाहिरपणे मान्य करायची हिंमत होती... गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो...
शब्दाशब्दाशी सहमत! अवांतर- मिपावर असा धागा येऊ शकेल असे वाटत नव्हते! मिपा नक्कीच प्रगल्भ होत चालले आहे, यात शंका नाही.

In reply to by सुनील

अवांतर- मिपावर असा धागा येऊ शकेल असे वाटत नव्हते! मिपा नक्कीच प्रगल्भ होत चालले आहे, यात शंका नाही. उगाच जाता जाता जेथे लिहीत आहात त्याच संस्थळास आणि तेथील सभासदांना सरसकट टोमणा मारल्याचे पाहून आश्चर्य म्हणत नाही पण हसण्यासारखे नक्कीच वाटले. कारण समयोचित लेख असा तुम्ही स्वतःच गांधी पुण्यतिथीनिमित्ताने... या लेखात २०११ साली प्रतिसाद दिलेला आठवला म्हणून. असो. बाकी काही नाही तरी मिपाकडे मोकळ्या मनाने बघण्याची प्रगल्भता येऊ लागली हे काही कमी नाही. :-)

In reply to by विकास

तात्यांच्या काळात असा धागा आला असता का आणि टिकला असता का ?? त्या काळी मी सभासद नव्हतो पण गोष्टी ऐकल्या आहेत जुन्या. सुनील यांचा रोख त्या दिशेने असावा. त्यात संस्थळाला आणि सभासदांना कसला आलाय टोमणा ?? हां आता मला माहित नसलेला काही इतिहास असेल तुमच्या विधानामागे तर माहित नाही.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तात्यांच्या काळात असा धागा आला असता का आणि टिकला असता का ?? त्या काळी मी सभासद नव्हतो पण गोष्टी ऐकल्या आहेत जुन्या. हा हा! हे बाकी बरे बोललात! म्हणजे सभासद नसताना ऐकीव गोष्टींवरून तात्याच्या काळात काय झाले असते यावर मतप्रदर्शन करत मलाच नकारार्थी उत्तर द्यावा लागणारा प्रश्न विचारत आहात. तरी देखील माझे उत्तर अगदी स्पष्ट आहे: तात्याची स्वतःची काय मते आहेत हे जगजाहीर आहे पण हो टिकला असा धागा टिकला असता, नव्हे अनेक टिकले आहेत. तरी देखील जेंव्हा प्रगल्भता वगैरे वाचले तेंव्हा विचार आला, खरेच असे होते का? म्हणून जरा शोधले... त्यातून मिळालेले काही तुम्हाला माहीत नसलेल्या इतिहासाचे ऐतिहासिक दाखले. :-) आणि हो हे सर्व "तात्या" आयडी / व्यक्ती या संस्थळावर सक्रीय असतानाचे धागे आहेत. अजूनही नंतरच्या काळात गांधीजींवर धागे आहेत. गांधी जी प्रेषक, विकास, Tue, 02/10/2007 - 10:18 गांधी. प्रेषक, कलंत्री, Sun, 14/12/2008 - 23:43 महात्मा गांधी जयंती प्रेषक, छोटुली, Thu, 02/10/2008 - 10:05 गांधी जयंति निमित्ताने (आम्हि कपाळ करंटे महात्माजींची क्षमा मागतो) प्रेषक, चन्द्रशेखर गोखले, Thu, 02/10/2008 - 11:09 आणि हो, त्यात तात्याच्या देखील प्रतिक्रीया आहेत. पण एका धाग्याचा अपवाद सोडता सुनील यांच्या प्रतिक्रीया नाहीत. बरं त्यांनी कधी गांधीजींबद्दल स्वतःहून लिहील्याचे आठवत नाही अथवा पटकन मिळाले देखील नाही... आणि म्हणूनच त्यांनी जेंव्हा, "मिपा नक्कीच प्रगल्भ होत चालले आहे, यात शंका नाही." असे म्हणले तेंव्हा त्यात टोमणाच दिसला... वास्तवीक हे काही मला व्यक्तीगत करायचे नव्हते, सेटींग दी रेकॉर्ड स्ट्रेट म्हणून आधीचा प्रतिसाद देऊन माझ्या दृष्टीने मुद्दा संपला होता. पण आता तुमच्या प्रतिसादामुळे अधिक लिहीणे भाग पडले इतकेच. अजून काही प्रश्न असल्यास अवश्य विचारा.

In reply to by विकास

त्या चर्चा त्यावेळीही वाचल्या होत्या व आताही पुन्हा वाचून काढल्या. त्यावरुन असे दिसते की त्या चर्चांवरील बरेच प्रतिसाद हे हिणकस होते, (उदा. पोटातील जंतूंविरोधात मी सत्याग्रह करतो. आता माझी शेळीचे दूध पिण्याची वेळ झाली वगैरे वगैरे). तितके हिणकस प्रतिसाद एवढ्या मोठ्या संख्येने आता दिसत नाहीत, त्यादृष्टीने सुनील यांना प्रगल्भतेबाबत टिप्पणी करावीशी वाटली असावी.

In reply to by आजानुकर्ण

हिणकसपणा हा केवळ गांधीजींवर आलेल्या आक्षेपार्ह प्रतिसादातच असतो आणि ते देखील मिपावरच, असे आपले म्हणणे आहे का? शिवाय प्रश्न होता, "तात्यांच्या काळात असा धागा आला असता का आणि टिकला असता का ??" त्याला उत्तर होते टिकले होते. आणि चर्चाप्रस्ताव नक्कीच हिणकस नव्हते.

In reply to by विकास

हिणकसपणा फक्त गांधींवर आलेल्या प्रतिसादांत नसतो. सुनील यांचा मुद्दा गांधीविषयीच्या चर्चेचा होता म्हणून मी तेवढेच संदर्भ दिले. त्या काळात असे धागे आले आणि टिकले असले तरी तत्कालीन चर्चा आणि सध्याच्या चर्चा यात थोडा फरक आहे. दुसरे एक कारण हे की, तत्कालीन मालकांनी 'मोहनदास करमचंद गांधी ज्यांना महात्मा म्हणून ओळखले जाते, त्यांच्यासंदर्भात कोणतीही चर्चा करण्यास बंदी आहे' वगैरे स्वरुपाची अधिकृत घोषणा मिपाच्या मुखपृष्ठावर टाकली होती. दुर्दैवाने तो धागा काढून टाकला असावा व मुखपृष्ठावरील लेखनही बदलत जाते.

In reply to by आजानुकर्ण

तत्कालीन मालकांनी 'मोहनदास करमचंद गांधी ज्यांना महात्मा म्हणून ओळखले जाते, त्यांच्यासंदर्भात कोणतीही चर्चा करण्यास बंदी आहे' वगैरे स्वरुपाची अधिकृत घोषणा मिपाच्या मुखपृष्ठावर टाकली होती. दुर्दैवाने तो धागा काढून टाकला असावा का बरं? त्यात दुर्दैव कसले? चांगले नाही का झाले? तसे ते मालक असतानाच त्यांना करावे लागले यातच सर्व आले, अर्थात ते पहाण्याची इच्छा पाहीजे...

In reply to by विकास

माझ्या एका अवांतर टिपणीवर उप-चर्चा झडल्याचे पाहून ड्वाले पाणावले! ;) असो, गांधीवरील सकारात्मक लेख/प्रतिक्रियांपेक्षा नकारात्मक वा हिणकस प्रतिक्रियांची संख्या बरीच जास्त भासते, हे माझे म्हणणे सदर उप-चर्चेच्या ओघात आलेच आहे. तेव्हा माझ्याकडून पूर्णविराम.

In reply to by आजानुकर्ण

गंमत म्हणून प्रगल्भ मराठी संस्थळे पाहीली तेंव्हा वाटले की गांधी पुण्यतिथीची तेथे कुणालाच आठवण नसावी. :-)

In reply to by आजानुकर्ण

मिपाच्या मुखपृष्ठावर दारुबद्द्ल विजय मल्ल्या नि महात्मा गांधी ह्यांची मते एकाखाली एक का काय्शी तात्यानं टाकली म्हणून बराच आरडाओरडा झाला होता. तेव्हा आजच्यापेक्षाही अधिक व्यस्त असल्याने ती चर्चा नीट पाहू शकलो नव्हतो. पण त्यासही काही जणांनी हिणकस म्हटले होते.

खरे आहे गांधीजीं कोणालाच नीट कळलेच नाहीत. त्या गोष्टीतल्या त्या चार अंधळ्यांनी जसे हत्तीचे वर्णन केले तसेच काहीसे गांधीजींबद्दल ऐकायला / वाचायला मिळते. त्या मुळे सगळेच जण गोंधळात पडतात.त्यांच्या सोयीच्या गोष्टी तेवढ्या उचलल्या गेल्या, आणि गैरसोयीच्यां गोष्टींकडे सोईस्कर दुर्लक्ष केले गेले. आपल्या राज्य कर्त्यांनी तर गांधीजींचा फक्त ढाली सारखा वापर करुन घेतला. माझ्या मते चलनी नोटांवर गांधीजींचा फोटो छापण्या सारखा दुसरा मोठा अपमान त्यांचा कोणीही केला नसेल. मी काही वर्षांपुर्वी पर्यंत गांधीजींचा प्रचंड व्देष करत होतो. पण कधितरी त्यांचे "माझे सत्याचे प्रयोग" वाचण्यात आले. त्या नंतर हळु हळु समजायला लागले की गांधीजी म्हणजे काय चीज होती ते. गांधी आपल्याला समजलेच नाहीत आणि समजावुनही घ्यायचे नाहीत हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. या थोर महात्म्याला विनम्र आदरांजली. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मी काही वर्षांपुर्वी पर्यंत गांधीजींचा प्रचंड व्देष करत होतो. पण कधितरी त्यांचे "माझे सत्याचे प्रयोग" वाचण्यात आले. त्या नंतर हळु हळु समजायला लागले की गांधीजी म्हणजे काय चीज होती ते.
महात्मा गांधींनी नक्की काय म्हटले आहे, त्यांचे विचार काय होते, त्यामागचा हेतू काय होता इत्यादी गोष्टींचा अभ्यास करायची तसदी घेणार्‍या प्रत्येक माणसाला अगदी असाच अनुभव येईल.फक्त 'काही वर्षे' म्हणजे नक्की किती हे प्रत्येक माणसागणिक बदलेल. 'अशा माणसाचे पाय या भूतलाला लागले होते यावर भावी पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत' या शब्दात आईनस्टाईनने ज्यांना आपली आदरांजली अर्पणमानले, नेल्सन मंडेला,मार्टिन लूथर किंग, बराक अनेका, आँग सू की इत्यादी अनेकांनी ज्यांना गुरूस्थानी मानले त्या महात्मा गांधींना आदरयुक्त श्रध्दांजली.

गांधीजींबद्दल दिवसेंदिवस आदर वाढत जात आहे. गांधीजींना नव्याने समजून घेताना अनेकदा त्यांच्या स्वतःच्या वागण्याती चमत्कारीकपणा (खरं तर चक्रमपणा) म्हणून जो वाटायचा त्यामागे त्यांची स्वतःची अशी वैचारिक बैठक आहे आणि ती समजून घेता आल्यापासून तर बापुंबद्दल आदर वाढत गेलाय. केवळ राष्ट्रपिता म्हणुनच नव्हे तर शतकाचा नायक म्हणूनही बापू मोठे आहेत. वर बिपीनदा म्हटल्याप्रमाणे "गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो" हे अगदी खरं आहे. - नीलकांत

गांधींशी मतभेद जवळजवळ नाहीतच.आहे ती गांधी नावाचे गूढ उकलून आणि समजून घेण्यातली स्वतःची कमतरता. "गांधी नावाचा हाडामासाचा माणूस या भूतलावर कधीकाळी होऊन गेला यावर पुढच्या पिढ्या विश्वासच ठेवणार नाहीत." "उचललेस तू मीठ मूठभर,साम्राज्याचा खचला पाया" या अन अशा अनेक अवतरणांच्या अंमळ पलीकडेच असलेल्या त्या महात्म्यास आदरांजली

महात्मा गांधींना विनम्र आदरांजली... स्वातंत्र्यानंतर बापूंना दीर्घायुष्य लाभते तर भारताची आजच्यासारखी अवस्था दिसली नसती. स्वयंपूर्ण ग्रामीण भारताचे त्यांचे स्वप्न साकारले नाही. गांधीजींचा खून करणारे जितके दोषी आहेत तितकेच त्यांच्या विचारांचा खून करणारेही दोषी आहेत. अन्यथा 'नियतीशी केलेला करार' इतक्या लवकर मोडला गेला नसता.. गांधीजींचे विचार पुन्हा एकदा जागवण्याची वेळ आली आहे इतकंच...

मतभेद हे अर्थातच मताशी/कृत्याशी/ विचारसरणीशी असतात, व्यक्तिशी नाही. हे व्यक्तिमत्व महान होते आणि या महान व्यक्तिमत्वास आदरांजली.

अनेक कृती पटल्या नाहीत. इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वातल्या थोड्या खुज्या बाबी खुपल्या. कदाचित इतक्या मोठ्या मनुष्याकडून अपेक्षा खूप जास्त असतात. पण आदर कायमच राहील आणि वाढतोच आहे.

या वाक्याशी शतप्रतिशत सहमत ! त्यांनी राजकारण आणि संतत्व याचे गल्लत केली .. केली म्हणण्यापेक्शा झाली असे म्हणणे योग्य होईल. गांधीजींचा फार मोठा गैरफायदा घेतला केला. ९० च्या दश्कापूर्वी भारताबाहेर " गांधीजी" हीच भारताची ओळख होती. सहज आठवले म्हणून सांगतो .. गोतेनबर्ग ( स्वीडन ) शहरात " गांधी" नावाचे भारतीय रेस्तरां आहे ( १९९७ मध्ये तर होते ) या रेस्तरा मध्ये सारे भारतीय पदार्थ मिळत पण मागणी सारी सामिष पदार्थांना ! असे उगाचच वाटे की या नावाच्या रेस्तरां मध्ये फक्त शाकाहारी पदार्थच मिळावेत, तसा मालकाशी - सरदारजीशी वाद ही घातला होता .. पण त्याचे बिचार्याचे साधे सोपे व्यायसायिक गणित होते. He was exploited by his own party men.during his tenure and more after his assassination ! विनम्र श्रद्धांजली !

महात्मा गांधींना विनम्र आदरांजली...

अवांतर- मिपावर असा धागा येऊ शकेल असे वाटत नव्हते! मिपा नक्कीच प्रगल्भ होत चालले आहे, यात शंका नाही. गांधींशी मतभेद जवळजवळ नाहीतच.आहे ती गांधी नावाचे गूढ उकलून आणि समजून घेण्यातली स्वतःची कमतरता

या महानायकाला श्रध्दांजली बाकी हे प्रतिसाद वाचुन थोडेसे हसु आले अवांतर- मिपावर असा धागा येऊ शकेल असे वाटत नव्हते! मिपा नक्कीच प्रगल्भ होत चालले आहे, यात शंका नाही. गांधींशी मतभेद जवळजवळ नाहीतच.आहे ती गांधी नावाचे गूढ उकलून आणि समजून घेण्यातली स्वतःची कमतरता

गांधींना मी कधीच माफ केलय. *करणार काय तिच्यायला. अजूनही पुरेसं विषयांतर होत नाही म्हटल्यावर मलाच पुढाकार घ्यावास वाटतोय. * *तुझा पगार किती, तू बोलतोस किती; ही सार्थ उक्तीही ध्यानी आहे. काडी टाकणे इतकाच उद्देश*

म. गांधीजी बददल लोकांच्या मध्ये आदर वाढीस लागला असेल तर त्याचे स्वागत आहे. ज्या तथाकथित उजव्या विचारसरणीचा मी पुरस्करता आहे त्यामध्ये गान्धीजीन्विश्यी अप्रीती , अनादर , द्वेष ई भावना कमी अधिक प्रमाणात दिसतात. गांधीजींच्या विचारांचाच तो भाग आहे असे मला वाटते. स्वयंपूर्ण खेडी , छोटे ओद्योगिक प्रकल्प , स्वदेशी हया विचारामध्ये गांधी आणि रा.स्व.संघ यामध्ये कमालीचे साधर्म्य आहे . फाळणी , मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण , शस्त्रसज्जता , शेजारी राष्ट्रावर आंधळा विश्वास हया काही विरोधी बाजू आहेत. एकुणात काय तर पुण्यतिथीला / जयंतीला जरूर आदरांजली वाहावी पण त्यांच्या विचारांची विषवल्ली कांग्रेस आणि इतर पक्ष यांच्या रुपाने फोफावते आहे. जुन्या जाणत्या लेखाकडून मोठा लेख अपेक्षित होता हे उगाचच ! म्.गांधीना सादर श्रद्धांजली .

विचार न पटणं आणि त्या व्यक्तीचा ते विचार राबवण्यामागचा उद्देश शुद्ध नसणं या दोन फार भिन्न गोष्टी आहेत. गांधीजींचे अनेक विचार सर्वच मनांना पटण्यासारखे नसतीलही, पण त्यांचे उद्देश स्पष्ट आणि स्वच्छ होते याविषयी शत्रूंनीदेखील शंका घेऊ नये. त्यामुळे एक व्यक्तिमत्व म्हणून म. गांधी हे नेहमीच आदरणीय म्हणून समजले गेले पाहिजेत.

म.गांधीना श्रद्धांजली. नेमके आजच गोपाळराव कुळकर्णी यांचे १९४४ ल प्रकाशित झालेले "गांधीवादावरील काही आक्षेप" नावाचे पुस्तक वाचायला मिळाले.एकूणच आक्षेप आणि त्याचे खंडन हे अशा स्वरुपातील हे पुस्तक अत्यंत सुंदर आणि वाचनीय आहे.त्याची जालावर सुद्धा प्रत उपलब्ध आहे. http://www.scribd.com/doc/84792636/Gandhivadavaril-kahi-aakshep

विनम्र आदरांजली गांधीजी यांची एक वेगळीच कलात्मक ओळख अरुण खोपकर यांनी एका लेखातून करुन दिली आहे. जरुर वाचावा असा लेख- अम्हास आम्ही पुन्हा पहावे, काढूनी चष्मा डोळ्यावरचा (दुवा सौजन्य - चिंतातूर जंतू)

गांधी हे संत* होते या समजामुळे त्यांच्या कृत्यांबद्दल काही अवास्तव अपेक्षा निर्माण झाल्या. ते एक बॅरिस्टर - राजकारणी होते असे मानून विचार केला तर त्यांना समजून घेणे कदाचित सोपे जाईल. जमेल तेवढी त्यांनी आपल्याला योग्य वाटणार्‍या तत्त्वांशी निष्ठा ठेवली आणि जमेल तितके आचरणात आणले. He was a smart and hard negotiator. अखंड भारत ठेवू आणि जीनांना पंतप्रधान करू अशी ऑफर त्यांनी जीनांना दिली पण त्यावेळी परिस्थिती जीनांनी ही ऑफर स्वीकारण्याच्या पलिकडे गेली होती याची त्यांना खात्री असावी. *संत नव्हते असं म्हटलं तर महात्मा ही पदवी कदाचित गैर वाटेल.

In reply to by नितिन थत्ते

ते एक बॅरिस्टर - राजकारणी होते असे मानून विचार केला तर त्यांना समजून घेणे कदाचित सोपे जाईल.
१००% सहमत.. आपल्या विचारांशी अत्यंत प्रामाणिक असलेला राजकारणी, ही गांधीजींची एक महत्वाची बाजू आहे असं मला वाटते.. त्यांच्या योगदानाची/ कारकिर्दीची चिरफाड करतांना, विशेषतः चौरीचौरा घटना आणि गांधी-इरविन पॅक्टच्या वेळची त्यांची भुमिका, त्यांच्या 'मतलबीपणा'वर टीका केली जाते.. पण एक गोष्ट सोयिस्कररीत्या विसरली जाते, की आपल्या तत्वांवर आणि त्याच्या प्रभावीपणावर दृढ विश्वास आणि प्रामाणिकपणा असल्या शिवाय "सत्याग्रह" यशस्वी होत नसतो. पठाणांसारख्या कडव्या आणि आपल्या युद्ध-इतिहासाचा अपार अभिमान असणार्‍या जातीतले "अहिंसावादी" निर्माण केले बापूंनी.. बिका, अत्यंत सुंदर श्रद्धांजली..

जनसामानय्ांना राष्ट्रधारेत आणणार्या नेत्यास आदरांजली

भारताच्या स्वतंत्र्यलढ्यात अत्यंत महत्वपुर्ण भूमिका निभावणार्या कर्ततबतबगारीच्गा जित्यायाजागत्या उदाहरणाला सलाम! देशाच्या सुटकेसाठी लढायचं,तर हाती शस्त्र घेऊन, घरादारावर इंग्रजी अंमलाचा गाढवाचा नांगर फिरवून घेऊन देशोधडीला लागणे ह्या पर्यायामुळे जी जनशक्ती लढ्यात उतरु शकत नव्हती त्यांनाही प्रवाहात सामिल करुन घेऊन जनरेट्याचा मोठा दबाव इंग्रजी सत्तेवर आणण्याचं मोठं कार्य घडवून गांधीजींनी कित्येक देशभक्तांना संधी दिली. बाकी मतभेद असतच राहतील न राहतील... देशकार्यामध्ये गांधी ह्या जादुई अस्तित्वाचा वाटा वादातीत आहे. स्वतंत्र्यलढ्याच्या ह्या एका सेनानीस प्रणाम!

महामानवाला श्रद्धांजलि. सामान्य आणि असामान्य यात फरक फक्त एक पाऊल उचलण्याचा असतो आणि गांधीजींनी ते उचललं होतं. केवळ यासाठीही ते आदरणीय आहेत. त्यांच्या इतर राजकारण आणि समाजकारणाबद्दल आम्ही सामान्यांनी काय बोलावे! गांधीजींच्या विचारांचा पराभव त्यांच्या अनुयायांनीच जास्त मोठ्या प्रमाणात केला आणि त्यांना भिंतीवरच्या तसबिरीत बंद करून ठेवले, कारण ते सर्वांनाच सोयीचे आणि सोपे होते. गांधीजींना तसबिरीत बंद करून त्यांची पूजा करण्यापेक्षा एक सतत स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर बर्‍याच प्रश्नांना आणि आक्षेपांना उत्तरे मिळतील.

जसे वाचले तसे गांधीजींबद्दल आदर वाढतच गेला. थत्ते यांचे म्हणणे की गांधी निगोशिएटर होते हे पटण्यासारखे आहे. एवढ्या अवाढव्य देशातले विविध कॉन्फ्लिक्ट मॅनेज करणे हे साधे काम कधीच नव्हते/ नसावे. गांधीजींना देवतास्वरूप ठरवून आपण त्यांचे नीट मूल्यमापन करत नाही असे वाटते. देवता काहीच करत नाहीत, गांधीजींनी बरेच काही घडवले, विचारांना दिशा दिली. तत्कालिन राजकारण्यांपासून आणि राजकारणापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे. गांधीजींना श्रद्धांजली.

सतत गांधी समजून घेण्याची प्रक्रिया चालु आहे. लहानपणापासून भोवतालच्या समाजातून कळत/नकळत झालेले गांधीद्वेषाचे 'कंडिशनिंग' उतरू लागले की आपले आपल्यालाच 'कळत्या वयात' आल्यासारखे वाटु लागते याचा स्वानुभव आहे. राहि म्हणतात तसे स्वत:तील दोष काढून गांधी आचरणं सोडा समजायला जरी सुरवात झाली तरी सार्थक झालं असे समजेन गांधींची गरज आजच्या इतकी कधीही नव्हती असं ते गेल्यानंतर प्रत्येक काळातील लोकांना वाटलं असेलच.. अर्थात मलाही ते अव्याहत वाटत असतं! त्यांना श्रद्धांजली

बिका: समायोचित टिपण

महात्मा गांधींना......श्रध्दांजली !! आभाळा एवढा माणुस ! भारतीय स्वातंत्र लढ्यातील योगदान केवळ अतुलनीय ! गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो. आदरच ....

In reply to by प्रसाद गोडबोले

आदरच...
या निमित्ताने या धाग्यावर पण त्या पंचाक्षरी शब्दातला मधला भाग हायलाईट करून लिहलाय काय. कोणत्याही जातीय, भाषिक, प्रांतिय, धार्मिक अस्मितेत गुंतून न पडता स्वदेशाचा ध्यास घेतलेला अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा गांधींइतक "सेफ" नाव दुसरं कोणतं नाही. महात्मा गांधींना श्रध्दांजली!!

In reply to by दादा कोंडके

दादा कोंडके , आपणे घेतलेले नाव एकदम सार्थ आहे =)) गैरसमज नको म्हणुन क्ल्यॅरीफिकेशन : एक माणुस म्हणुन प्रचंड आदर आहे महात्मागांधींविषयी !! ( महात्मा , बापुं ह्या शब्दांना कोठेही हरकत नाहीये हो . केवळ एका संबोधनाला हरकत आहे ,तेही देशापेक्षा मोठ्ठे असा अर्थ लागतो म्हणुन , त्यावर तिकडे सेन्चुरी झालीच आहे ...तो चिखल इथे नको :) )

का कोणास ठाऊक पण केवळ गांधीजींच्याच बाबतीत नाही तर कुठल्याही मृत व्यक्तीच्या बाबतीत अनेक वर्षांनी त्यांच्या पुण्यतिथीस श्रद्धांजली हा शब्द वापरणे मला तितकेसे भावत नाही. तो शब्द भाषाशास्त्राप्रमाणे योग्य - अयोग्य वगैरे मुद्दे इतरांनी येथे आणू नयेत ही विनंती. फक्त अचानक बिका लिहीते होतात आणि नवीन लेखनात, "श्रद्धांजली" मथळ्याखाली धागा दिसतो, त्यामुळे उगाच चर्र झाले. असो. म्हणून गांधीजींना सादर प्रणाम इतकेच म्हणतो! नक्कीच मोठा माणूस... फार मोठा... इतका मोठा की विरोधकांनाही नीटसा कळला नाही, आणि अनुयायांनाही... 'माणूस' होता म्हणूनच बर्‍यावाईटाचं मिश्रण होतं... आणि 'मोठा' होता म्हणून हे वास्तव (बर्‍यावाईटाचं मिश्रण असणं) स्वीकारण्याची आणि जाहिरपणे मान्य करायची हिंमत होती... या विचारांशी सहमत आणि म्हणूनच गांधीजींबद्दल आदरही वाटतो. बाकी बर्‍याचदा मला असे वाटते की अनेकांमध्ये असलेलू गांधीजींबद्दलची अनादराची भावना ही वास्तवीक, प्रत्यक्षात गांधीजींच्या बद्दल असण्यापेक्षा तथाकथीत गांधीसमर्थकांमुळे (गांधीवादी देखील नाही) आणि त्यांच्या एकंदरीत वर्तनामुळे झालेली आहे. तुर्तास इतकेच.

In reply to by विकास

बाकी बर्‍याचदा मला असे वाटते की अनेकांमध्ये असलेलू गांधीजींबद्दलची अनादराची भावना ही वास्तवीक, प्रत्यक्षात गांधीजींच्या बद्दल असण्यापेक्षा तथाकथीत गांधीसमर्थकांमुळे (गांधीवादी देखील नाही) आणि त्यांच्या एकंदरीत वर्तनामुळे झालेली आहे.
हांगाश्शी!!!! सेम ऐसेच वाटते मलाही. :)

थोर व्यक्तींची किंमत लोकांना त्यांच्या मृत्युनंतरच कळते,असे म्हणतात. गांघीजी हे महान होते. पण काँग्रेसने त्यांच्या पश्चात त्यांच्या नांवाचा फार गैरवापर करुन घेतला.

In reply to by तिमा

काँग्रेसवाल्यांनी नक्कीच केला. आणि गांधीच्या नावाचा गैरवापर बीजेपीवाल्यांनीही(रीड संघवाल्यांनीही) करुन घेतलाच. कुणी गांधी विचारांना समर्थन देत करुन घेतला; कुणी विरोध करण्याच्या निमित्तानं(त्यांच्या विरोधामुळं अधिकच प्रचार होतो असं आता वाटतय.) करुन घेतला. . पण असा वापर कोण कुणाचा करुन घेत नाही? "शिवाजी महाराज" ह्या नावाचा (गैर?) वापरही होतोच की. कधीकधी ते मराठी अस्मितेचे आयडॉल असतात, तर कधी प्रखर हिंदुत्वाचे. कधी कधी ते चक्क आद्य सेक्युलारिस्ट आणि कट्टर गांधीभक्तही(!!) ठरवले जातात निधर्मीवाल्यांकडून. .

१. अस्पृश्यता आणि जातीभेद निर्मूलन २. स्त्री-पुरुष समानता, बुरखा पद्धत विरोध ३. दारुबंदी ४. आरोग्य, गोरगरीब/ दुर्गम भागातील रहिवाशांना वैद्यकीय सेवा ५. स्वच्छता - (सॅनिटेशन) ६. साक्षरता आणि शिक्षण - नयी तालीम ७. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम, स्वदेशी एखाद्या राजकीय (किंवा कोणत्याही क्षेत्रातील) नेत्याने एकाच वेळी एवढ्या महत्वाच्या बाबींचा विचार करुन कृती कार्यक्रम अंमलात आणणे, त्यासाठी प्रचंड प्रमाणात मोबिलायझेशन करुन देश ढवळून काढणे, आणि तेही देशात याविषयी कसलीही "लीगसी" नसताना, विसाव्या शतकाच्या तिसर्‍या दशकात, हे गांधीजींच्या पूर्वीही घडले नव्हते, नंतरही घडलेले नाही. भारतातही नाही. जगात इतरत्रही नाही. आख्खे सरकार हा एवढा कार्यक्रम आखण्यासाठी (१९२० संपून १०० वर्षे होत आली तरीही) अजून धडपडतंय, चाचपडतंय. सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी एक हट्टी म्हातारा आपल्या (बेरकी) राजकारणाला सांभाळून आणि स्वतःच्या आयुष्यात निरनिराळे प्रयोग करत आणखी वर हेही सगळे करत होता. खरं नाही वाटत. यातली एक गोष्ट जरी एखाद्यानं एखाद्या अंशानंही केली तरी त्यासाठी त्याला आपण भारतरत्न मिळालेल्या मंडळींच्या रांगेत बसवू. महात्मा मोहनदास गांधी हे एक आश्चर्य आहे.

In reply to by आळश्यांचा राजा

मोजक्या शब्दांत नेमके विश्लेषण. स्त्री-शूद्र उन्नयनाचे त्यांचे एकच कार्यदेखील महात्मापद त्यांच्याकडे चालून येण्यास पुरेसे आहे.

In reply to by आळश्यांचा राजा

+१ साधी राहणी, अंगिकारलेला सत्याचा मार्ग हेही काही त्यांच्या व्यक्तिमत्वातले भावलेले पैलू. खरच गांधींचे आकलन ही काही साधी गोष्ट नाही. सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन कोणत्याही शस्त्राशिवाय एक मोठी क्रांती घडवून आणणं,ही एक कल्पनातीत गोष्ट आहे. भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार महात्मा गांधींना श्रध्दांजली.

गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो.
ह्याच्याशी सहमत.

गांधीवाद हे केवळ तत्वज्ञान नसुन ती एक जीवनपद्धती आहे.. जन्मापासुन फक्त भौतिकतेच्या पाण्यावरच जगलेल्यांना हे 'अहिंसा, सत्य' म्हणजे बावळटपणा वाटत असला तरी आज अख्ख्या जगासमोर आज ज्या समस्या आ वासुन उभ्या आहेत त्यावर "समग्र जीवनपद्धती" हे एकमेव उत्तर आहे.. महात्मा गांधींना भावपूर्ण श्रद्धांजली!!

आ.रा यांच्याशी पूर्ण सहमत. गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो... त्यांच्याशी असहमती, ते ( त्यांचे लेखन / विचार ) न समजू शकल्यामुळे असेल काय असे मी स्वतःला अनेकदा विचारले आहे. In the context of his time, his ideas were undoubtedly great and his understanding of the Indian psyche unparalleled ( then, now and ever), असे मला वाटते. त्यांना परत एकदा सादर प्रणाम आणि आदरांजली.

मिपाच्या वाचकांनी दिलेल्या इतक्या प्रतिसादांमधून महात्मा गांधीजींना श्रध्दांजली देऊन झाली आहेच, त्याच्या स्मृतीला माझेही प्रणाम. मिसळपाववरले वातावरण नक्कीच थोडे तरी बदललेले आहे. तात्यांच्या काळात लिहिलेल्या "मिसळपाववरील पहिले वर्ष" या लेखात मी असे लिहिले होते, बहुतेक उडप्यांच्या हॉटेलात दारापाशीच एका चांदीच्या चकाकणार्‍या देव्हार्‍यात एक सुंदर मूर्ती ठेवलेली असते किंवा एका स्वामीचा फोटो लावून त्याला ताज्या फुलांचा हार भक्तीभावाने घातलेला दिसतो. मिसळपावच्या मुखपृष्ठावर सुध्दा आराध्य दैवतांची किंवा साधुसंतांची सुंदर चित्रे लावून ते मंगलमय केलेले असते. पण मधूनच कोणी भाबडा (वाटणारा) भक्त एका जगद्वंद्य महात्म्याचा फोटो एका भिंतीला चिकटवून त्याला उदबत्ती ओवाळतो. त्यानंतर दोघेतीघे येतात आणि हिरव्या मिरचीची चटणी, चिंचेचा घोळ, हॉट अँड सॉवर सॉस वगैरेमध्ये बुडवलेली बोटे त्या चित्राला पुसतात. ते पहायलाही कांही लोकांना मजा वाटते. "पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना" असे म्हणतात ना! या लेखाला तात्यांनी दिलेली दाद आता वाचता येत नाही, पण ती सकारात्मक होती. त्यांनी माझे वाक्य कापले नव्हते किंवा त्याला विरोधही केला नव्हता. यावरून ४ वर्षांपूर्वीचे मिपा आणि तेंव्हा ते चालवणारे तात्या या दोन्हींची कल्पना येते.