रावडी राठोड
रावडी राठोड ह्या चित्रपटाच्या नावातच फक्त दम आहे. हे येवढे वाक्य सांगून खरेतर चित्रपटाचे परीक्षण मांडता येईल इतका हा चित्रपट डोक्याला शॉट आहे. सध्या आपल्याकडे साऊथच्या चित्रपटांच्या रिमेकची एक लाटच आली आहे, त्यातले काही चित्रपट चांगला पैसा मिळवण्यात यशस्वी देखील झाले आहेत. ह्याच वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचा प्रभुदेवा आणि संजय लीला भन्साळीचा प्रयत्न म्हणजे रावडी राठोड. हा चित्रपट रवी तेजा च्या गाजलेल्या विक्रमार्कूडू चा हिंदी रीमेक आहे. आपल्याकडे साऊथचे जे गाजलेले रीमेक झाले मग ते अॅक्शन असो वा कॉमेडी त्या मध्ये संगीत, अॅक्शन, कथा इ. माल मसाला भलेही साऊथ मधला उचललेला असला तरी हीरो, हिरॉईन, नाच, संवाद ह्यांना एक टिपीकल बॉलीवूड टच होता. जो आपला वाटला आणि ही भेळ लोकांनी उचलून घेतली. रावडी राठोड मध्ये मात्र फ्रेम टू फ्रेम पासून ते अक्षय कुमारच्या रंगीबेरंगी कपड्यांपर्यंत सगळीच उचलेगिरी केलेली असल्याने ती असह्य होते.
रवी तेजाचा चित्रपट हा चंबळ- हैदराबाद असा फिरतो, तर अक्षयचा रावडी पटणा - मुंबई असा फिरतो. चित्रपटात अक्षयची दुहेरी भूमिका असल्याने अंमळ त्रास देखील दुहेरी सहन करावा लागतो. शिवा (अक्षयकुमार) हा एक नाना उचापत्या करत चोर्या करणारा मनुष्य. त्याच्या जोडीला विनोदासाठी २जी (परेश गणात्रा) हे अजून एक पात्र दिलेले आहे. ह्या शिवाचे पहिल्याच नजरेत पारो (सोनाक्षी सिन्हा) प्रेम बसते. मग तिचे देखील अगदी टिपीकल मसालापटा प्रमाणे ह्याच्यावरती भेटल्या भेटल्या प्रेम बसते. हा तिला प्रामाणिकपणे आपण चोर आहोत असे सांगतो आणि तिच्या विनंतीवरून वाईट रस्ता सोडायचे देखील कबूल करतो. अर्थात त्या आधी एक मोठा हात मारून लाईफ सेटल करायचे असे ही मित्रांची जोडी ठरवते आणि मग खर्या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते.
मी चित्रपटाला सुरुवात होते असे म्हणतोय खरे, पण तोवर ४३ मिनिटे, असंख्य भिकार विनोदी दृश्ये आणि २ गाणी होऊन गेल्याने आपण जागे नसल्यास खरा चित्रपट सुरू झाला आहे हे देखील लक्षात येणे अवघड. मोठा हात मारण्याच्या नादात ही जोडगोळी रेल्वे स्टेशनवरून एका धनवान स्त्री ची (गुरदीप कोहली) मोठी पेटी पळवून आणतात. ह्या पेटीत एका इन्सपेक्टरच्या (यशपाल शर्मा) छोटी मुलगीच निघते आणि ती 'पापा' म्हणत अक्षयच्या गळ्यालाच मिठी मारते. आता इन्स्पेक्टर समोर ती आपलीच मुलगी आहे हे कबूल केल्याने अर्थातच तिची जबाबदारी पत्करणे अक्षयला भाग पडते. त्याच ट्रंकेत अक्षयला आपल्या सारख्याच दिसणार्या एका माणसाबरोबरचा त्या मुलीचा चिंकीचा फोटो पाहून त्याला धक्काच बसतो. चिंकीच्या वडलांचा शोध तो सुरू करतो आणि अचानक त्याच्यावरती हल्ले व्हायला सुरुवात होतात.
गोंधळलेल्या अक्षयवरच्या अशाच एका हल्ल्याच्या वेळेस त्याला वाचवण्यासाठी इन्स्पेक्टर, ती धनवान स्त्री, एक लंगडा माणूस आणि स्वतः अक्षय सारखाच दिसणारा तो इसम असे सगळे हजर होतात आणि अक्षय अजूनच गोंधळून जातो. ह्या हल्यातून अक्षयला वाचवताना दुसरा अक्षय अर्थात ए. एस. पी. विक्रम राठोड गंभीररीत्या जखमी होतो. त्याला हॉस्पिटलात हालवले जाते आणि मग तिथेच इन्सपेक्टर शर्मा आणि ती धनवान स्त्री अर्थात इन्सपेक्टर रजीया खान ह्यांच्याकडून शिवाला विक्रम राठोडचा भूतकाळ, त्याची हुशारी, ताकद, अन्याया विरुद्धची चीड, त्याचे फेमस डॉयलॉग असे सर्व सर्व समजते. हे सगळे त्याला समजल्यावरती विक्रम राठोड समजूतदारपणे मरून जातो आणि मग त्याची जागा शिवा घेतो. आता तो आपल्या परीने विक्रम राठोडचे राहिलेले कार्य पूर्ण करायची प्रतिज्ञा करतो. तो ते कसे करतो हे पाहायचे असेल तर (पाहायचे आहेच का?) चित्रपट पाहण्या शिवाय पर्याय नाही.
चित्रपटात त्रुटी बघायला गेलो तर भरपूर आहेत. मुळात चित्रपटाची सुरुवात अतिशय संथ आहे. चित्रपटाची कथा सुरू होण्या आधीच घुसडलेले काही प्रसंग वात आणतात. संगीत, नृत्य, गाणी ह्या सगळ्या पातळीवरच चित्रपट साफ झोपला आहे. अक्षय कुठल्या प्रसंगात काय चेहरा करावा हेच समजत नसल्या सारखा वावरला आहे. कधीकाळी अॅक्शन दृश्ये सुंदरतेने साकारणारा अक्षय आजकाल प्रत्येक अॅक्शन दृश्यात उगाच विनोदी चेहरे अथवा हावभाव करून जॅकी चॅन होण्याचा प्रयत्न का करतो हे एक न उलगडणारे कोडे आहे. सोनाक्षी सिन्हा ही आमच्या आवडत्या स्त्रियांपैकी एक असली, तरी ह्या चित्रपटात ती 'जादू' ज्या मख्ख चेहर्याचे 'कोयी मिल गया' मध्ये वावरला आहे अगदी तशी वावरली आहे. अनंत जोग ह्यांची मिनिस्टरची भूमिका तर 'सिंघम' मधून कापून इथे चिकटवल्यासारखी वाटते. बाकी कलाकार 'चित्रपटात आहेत' ह्या दोन शब्दातच त्यांचे कौतुक पूर्ण होण्यासारखे आहे. खास करून ज्या स्टंट्स साठी हे रीमेक बघितले जातात ते तर इतके बालिश घेतले आहेत, की छोटा चेतन आणि अलीबाबा हे चित्रपट त्या समोर टायटॅनिक वाटतात.
एकुणात काय तर अगदीच काही टाईमपास नसेल आणि २/२.१५ तास हालती चित्रच बघण्याचा अट्टहास असेल तर मग रावडीला हजेरी लावावी. मात्र मेंदू, भावना, आशा, अपेक्षा हे जाताना घरी सोडून जावे.
वाचने
10141
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
" जो मै बोलता हु वो मै करता हुं ,और जो मै नही बोलता वो तो मै जरुर करता हुं " ;)
एकदा का हीट फॉर्मुला मिळाला की तोच ट्रेंड सेट होतो ,अर्थात प्रेक्षकांची आवड ध्यानात घेउनच :)
सलमान,अजय देवगण अन आता अक्षय बाबा ;)
एक गाण सोडल तर बाकी काही विशेष आवडल नै.
छ्या मज्जा नाय आली. टिपिकल वर्तमानपत्रातलं परिक्षण वाचतोय असं वाटलं. परा इफेक्ट कुठेच जाणवला नाही.
मनीच्या बाता : गण्या हा परा नक्कीच वर्तमान पत्रासाठी परिक्षण लिहायचे काम करायला लागलाय आणि तिथल्या संपादकाच्या सांगण्यावरुन असं गोग्गोड लिहुन र्हायलाय.
In reply to छ्या मज्जा नाय आली. टिपिकल by गणपा
@परा इफेक्ट कुठेच जाणवला नाही.+++111
In reply to छ्या मज्जा नाय आली. टिपिकल by गणपा
तिथल्या संपादकाच्या सांगण्यावरुन असं गोग्गोड लिहुन र्हायलाय>>
अशी दादागिरी करतात काय संपादक?
संपादकांचा निषेध वगरै काय काय सगळे....असो! ;)
In reply to तिथल्या संपादकाच्या by कवितानागेश
तिथल्या संपादकाच्यारंगीत शब्दाला वजन आहे हो. इथे कुणी भिक घालत नाही. ;)
एकुणात काय तर अगदीच काही टाईमपास नसेल आणि २/२.१५ तास हालती चित्रच बघण्याचा अट्टहास असेल तर मग रावडीला हजेरी लावावी. मात्र मेंदू, भावना, आशा, अपेक्षा हे जाताना घरी सोडून जावे.
मग असला चित्रपट पाहण्यात काय हशील? फार तर टिव्ही सिरीयल चा एखादा रडवा पार्ट पाहू टाईम्पास साठी!! ;)
कधी टिव्ही वर आला तर पाहू. बाकी मुद्दाम पैसे घालून नाही पाहणार!!
:)
अरे किती तरी गोष्टींचा उल्लेख राहून गेला.
वर पिवशीने लिहिलेला डायलॉक आणि ते कुठल्याही पृष्ठभागावर हाताच्या मुठीने वाजवलेले ठेक्याचे संगीत आणि त्यावर भान विसरून नाचणार्या स्त्रिया (अगदी ड्युटीवर असलेली पोलीस इन्स्पेक्टरसुद्धा!) हे तर त्या चित्रपटाची असली-नसली 'जान' आहेत.
नाही म्हणायला ती इन्स्पेक्टरची मुलगी फार गोड आहे.
तेव्हा त्यच्या सिनेमात पोरकट दृश्य असणारच :-) बाकी सोनाक्षी तशीही आवडत नाही. जमल्यास मूळ चित्रपट बघा (काही नाही तर अनुश्कातरी नक्कीच आवडेल :-)
अआ व गणपाशी सहमत -- परा इफेक्ट कुठे आहे????
अमृत
पैसे फार झालेत का रे? नाही म्हणजे असल्या चित्रपटांवर वाया घालवतोय्स म्हणून म्हटलं. जास्त झाले असतील तर मला फायनान्स कर बघू, सध्या एखाद्या पोशिंद्याची गरज आहे मला.
In reply to परा by रमताराम
प्रभातला येत असाल तर नक्कीच तुमचं पण तिकीट काढून ठेवतो.. ;)
- पिंगू
बरं झालं परीक्षण वाचले... वेळ वाचला!!
अशा नावाचा शिनूमा आहे ही माहिती तुझ्या ह्या परिक्षणाने मिळाली.
असले सिनेमे वेळ अगदीच जात नसेल तर बघावा ह्याच्याशी अगदी सहमत रे..
स्वाती
In reply to रावडी राठोड by स्वाती दिनेश
उलट मी म्हणेन की असे चित्रपट १५-२० वर्षां नंतर आवर्जुन पहावे.
जे सुख आत्ता मिठुनदाचे चित्रपट पाहुन मिळते ते कदाचीत तेव्हा मिळुन जाईल. ;)
कदाचीत अॅड्याला भविष्यकालात माल मिळावा म्हणुन सध्या असे चित्रपट मुद्दाम काढले जात असतील.
हा पिक्चर पाहण्याच्या लायकीचा असूच शकत नाही!
तुझं परीक्षण खूपच सोज्ज्वळ वाटलं ह्या वेळी ;)
काय रे? तब्येत ठिक ना?
असा चित्रपट थेट्रात बघितलास म्हणून इचारले
आधीच्या सिनुमात अंमळ लठ्ठ होती
सगळ्यानी सगळं बोलून झालंय! आता मी काय बोलू?
पराशेठ, तुम्ही आमचा मुड घालवलात राव !
आम्हाला वाटले की 'रावडी राठोड' ही टिपिकल देमार पिक्चर आहे व तो आम्हाला आवडेल, आम्हाला वाँटेड आणि दबंग असाच आवडला होता.
इन्फॅक्ट हा पिक्चर बघायला जायचे म्हणुन आम्ही मिश्याही ठेवायला सुरवात केली होती, आता त्याला चाट द्यावी लागेल.
- (मॅनेज्ड निगेटिव्ह पब्लिसिटीवर नाराज) छोटा डॉन
लहानपणी ऐकलेली म्हण -
गाढवाला गुळाची चव काय ?
काल ऑफिसात फारच पकलो. जाम बोअर झाल्यावर मला अत्यंत टुकार, बंडलबाज, फालतू सिनेमे बघायला आवडतं. आजकाल बहुतेक हिंदी सिनेमा च्यानल्सवर संध्याकाळी टिपिकल दक्षिण भारतीय सिनेमे हिंदीत डब करून माझ्यासारख्यांसाठीच असतात! पण, काल जरा जामच पकलो होतो म्हणून म्हटलं आज काही तरी वेगळं करू. आज पैसे देऊन फालतू सिनेमा बघू! पेपर बघितला. त्यातल्या त्यात 'फिल्मी' सिनेमा निवडला. शोचं टायमिंगही सोयीस्कर होतं. बास्स.. बाईकवर टांग टाकली आणि थेट थेटरात पोहोचलो ! ती संध्याकाळ होती 'राउडी राठोड' ची.. समोर लावलेलं अक्षय कुमारचं पोस्टर सिनेमा कस्स्सला 'फिल्मी' असणार आहे, ह्याची कल्पना देत होतं आणि भोवतालचं पब्लिकही एकदम 'डोंट अँग्री मी' टाईप छपरी होतं. मला माझ्या मनोरंजनाची खात्री मिळाली. सिनेमा नक्कीच टुक्कार असणार, ह्या विचाराने मला गुदगुल्या होत होत्या.
-------- हे असं सगळं मी केलं असेल, असं जर तुम्हाला खरोखर वाटलं असेल तर तसं नाहीये !! प्रभुदेवा हा एक बरा दिग्दर्शक आहे (असं ऐकलं होतं), भन्साळीची निर्मिती म्हणजे अगदीच 'गेला बाजार' नसेल (असं वाटलं होतं) आणि अक्षय कुमार विचार करून सिनेमे निवडत असतो (असा गैरसमज होता) म्हणून मी सिनेमाला गेलो. (खरं तर मला प्रभूदेवाचा 'वाँटेड' आवडला होता. फुल्ल टाईमपास होता आणि हा 'राठोड'ही त्याच पठडीतला असेल अशीही एक अवास्तव अपेक्षा होती.) असो. आता, शेण तर खाल्लं. ते का खाल्लं, ह्याला काही अर्थ नाही. खाल्लं हेच महत्त्वाचं! त्यामुळे मी माझ्या ह्या मूर्खपणासाठी स्वत:ला मोठ्या मनाने क्षमा करतो आणि माझा गुन्हा विस्तृतपणे इथे विषद करतो.
ही कथा आहे शिवा आणि विक्रम राठोड ह्या एकसारख्या दिसणाऱ्या दोन 'राउडीं'ची. शिवा एक पट्टीचा चोर आहे आणि विक्रम राठोड हा एक कर्तव्यदक्ष, शूरवीर व चाणाक्ष पोलीस ऑफिसर (ए. एस. पी.) शिवा मुंबईत तर राठोड उत्तर प्रदेशातील 'देवगढ' ह्या भागात. देवगढमध्ये 'बाबजी' ह्या गुंडाची हुकुमत चालत असते. तोच तिथलं सरकार असतो. पोलीस, सरकारी यंत्रणा सगळ्या त्याच्या टाचेखाली असतात. बाबजी, त्याचा मंद मुलगा आणि बलदंड भाऊ (टिटला) देवगढवासियांवर अनन्वित अत्याचार करीत असतात. लुटमार, हफ्ता वसुली, बायका पळवणे, खून, बलात्कार सगळं सगळं अगदी बिनधास्त उघड उघड चालत असतं. अश्या ह्या अराजक माजलेल्या भागात नवीन ए. एस. पी. म्हणून विक्रम राठोड येतो आणि अर्थातच बाबजीला भिडतो. टिटला राठोडवर प्राणघातक हल्ला करून त्याला डोक्यात गोळी मारतो आणि त्याला अख्ख्या गावासमोर लटकवून आपली दहशत अजून वाढवतो. पण डोक्यात गोळी जाऊनही राठोड मरत नाही! राठोडचे कनिष्ठ पोलीस साथीदार ही गोष्ट गुप्त ठेवून त्याच्यावर उपचार करवतात आणि तो बरा होतो. उपचारासाठी राठोडला मुंबईत आणलं जातं आणि तो जिवंत आहे हे बाबजीला कळतं. राठोडला मारण्यासाठी गुंडांची फलटण पाठवली जाते.
तत्पूर्वी, आजारी राठोडच्या लहान मुलीची देखरेख करणे खूप कठीण होऊन बसल्याने आणि योगायोगाने राठोडचा डुप्लिकेट 'शिवा' नजरेस पडल्याने राठोडचे साथीदार मोठ्या शिताफीने राठोडच्या मुलीला शिवापर्यंत पोहचवतात आणि अशी परिस्थिती निर्माण करतात की शिवाला तिचा स्वीकार करावाच लागतो.
पण, राठोडला मारण्यासाठी मुंबईला आलेल्या गुंडांच्या तावडीत शिवा सापडतो. मग त्याला वाचवायला खुद्द राठोड प्रकटतो. रक्तरंजित हाणामारीत तो किमान ३० एक जणांना ठार मारतो आणि स्वत:ही जबर जखमी होऊन नंतर मरतो!
शूरवीर राठोडची कहाणी समजल्यावर शिवा गेट्स इम्प्रेस्ड ! तो राठोड बनून देवगढला येतो आणि बाबजी व त्याच्या साम्राज्याला संपवतो. (तेही फक्त शेवटच्या अर्ध्या तासात!)
असं सगळं घडल्यावर एकदाचा हा रद्दड राठोड संपतो आणि सुटकेचा निश्वास घेण्यासाठी EXIT लिहिलेल्या पाटीकडे प्रेक्षक जीव मुठीत घेऊन पळत सुटतो. अनेक दिवसांनंतर इतका बंडल सिनेमा बनला असावा की ज्यात काही म्हणता काहीही चांगलं सांगता येणार नाही! संगीत तर इतकं टुकार की साजीद-वाजीद ला आजीवन प्रतिबंधित करावं. पटकथाकाराचं नाव दिसलं नाही. बहुतेक असा कुणी माणूस नेमलाच नसावा. प्रभूदेवाचा अभिनय त्याच्या दिग्दर्शनापेक्षा बरा आहे. (ह्याहून वाईट प्रतिक्रिया सुचली नाही.) सोनाक्षी सिन्हा नामक दांडोबाने पुढील सिनेमा (मिळाल्यास) 'हिरो' म्हणून करावा. तिची धटिंगण शरीरयष्टी 'हिरो' म्हणूनच शोभून दिसेल. खरं तर तिच्यापेक्षा एखादा ओंडका उभा केला असता तर त्यानेही जरासा अभिनय केला असता आणि जो काही नाच-बीच केला आहे, तेव्हढा त्या ओंडक्याकडून प्रभुदेवा व अक्षयकुमारने करवून घेतला असता. ह्या चौघांना (आणि पटकथाकार असल्यास तो पाचवा) गळ्यात धोंडा बांधून विहिरीत टाकावं, असा एक खुनशी विचार माझ्या मनातून काही केल्या जात नाहीये. त्यातल्या त्यात अक्षय कुमार (आता इतक्या वर्षांचा अनुभव आहे म्हटल्यावर) सुसह्य वाटतो. अन्यथा सिनेमा सहनशक्तीचा अंत पाहणाराच आहे. भन्साळीने शरमेने खजील होऊन कुठे तरी तोंड लपवून बसावं की इतक्या रद्दड सिनेमाशी त्याचं नाव जोडलं गेलं आहे..
हा सिनेमा मी थेटरात जाऊन पाहिला. ह्याचं प्रायश्चित्त म्हणून मी येत्या सुट्टीच्या दिवशी घरात बसून डीव्हीडीवर लागोपाठ तीन वेळा "बॉडीगार्ड" सिनेमा बघणार आहे. (भोग मेल्या आपल्या कर्माची फळं.. बघशील ? बघशील परत असला सिनेमा..? बघशील ?) (रामदासांनी त्यांची बासुंदीची वासना कशी मारली होती? तसंच काहीसं!)
आता इतकं सगळं वाचल्यावर मी ह्या सिनेमाला दर्जात्मक रेटिंग वगैरे देईन, असं काही तुम्हाला वाटलं नसेल; ही अपेक्षा करतो.
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/rowdy-rathore-review.html
In reply to काल ऑफिसात फारच पकलो. जाम by रसप
=))))))))))))) कड्डक!
चित्रपटाची कथा सुरू होण्या आधीच घुसडलेले काही प्रसंग वात आणतात. संगीत, नृत्य, गाणी ह्या सगळ्या पातळीवरच चित्रपट साफ झोपला आहे. >>>>
अनुमोदन !!
चुकून दोन वेळा प्रतिसाद आल्याने काढून टाकला.
ह्म्म... चित्रपटात "दम" नसणार हे ट्रेलर पाहुन कळलं होतच म्हणा !
बाकी... आ रे प्रितम प्यारे या गाण्यात ललनांनी त्यांच्या उरोजाची केलेली धडधड आणि नितंबांची केलेली थरथर पाहुन त्यांच्या "योगा"च्या सिडीज लवकरच बाजारात येतील की काय ? असा प्रश्न मनात येउन गेला. ;)
बाकी परिक्षण छानच !
आयला हा परा म्हणजे `नक्की बघू का नको?' आणि `शेवट काय झाला ' याचा जाम पत्ता लागू देत नाही.
परा इतकं सुरेख परिक्षण लिहितोस तर पुढल्या वेळी आमच्यासाठी या दोन गोष्टी पण लिही.
ओळीने ३/४ शिणुमे असलेच बघितलेस म्हणून विचारते!
परा गुरुजी व रसप यांची परीक्षणे वाचून खूप बरे वाटले व मनावरचा ताणही हलका झाला. आपणास साष्टांग दंडवत.
कारण कर्मधर्मसंयोगाने अथवा पूर्वजन्मीच्या पापकर्मामुळे या चित्रपटाचा प्रथम दिवस प्रथम खेळ गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहात जाऊन पाहिला.
स्वेच्छेने पाहिला नव्हताच, पण पाहावा लागलाच. मूळ चित्रपटाचे असे काही कौतुक करण्यात आले होते की तो न पाहून मी फारच मोठे पाप केले होते. अन या पापक्षालनासाठी रा. रा. पाहणे तोही प्रथम दिवस - प्रथम खेळ या तत्त्वावर हा एकमेव उपाय आहे असे सूचित केले गेले होते.
याहून मोठी मजबूरी म्हणजे निम्म्यातून पळून येणेही या दुर्दैवी जीवास शक्य नव्हते. काहीतरी अघटित घडून वीज वगैरे जावी अशी मनोमन प्रार्थना करीत होतो पण तसेही घडले नाही.
वेळ - इंधन - पैसे (अर्थातच ऊर्जाही) वाया गेल्याच दुःख आहेच पण काळ (टॉलीवूड रुपी) काळ सोकावतो आहे याचे अतीव वाईट वाटते.
काही महिन्यांपूर्वी देऊळ चित्रपटाचा चित्रपटगृहातील एकमेव खेळ मी न पाहणे व रा. रा. मला प्र. दि. प्र. खे. पाहावा लागणे यात नक्कीच कुठेतरी नियतीचा खेळ असावा.
अशी वेळ या पुढे या निरागस बालकावर न येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
सोणाक्षी चे नाक अण्णा हजारे यांच्या नाका सारखे खालच्या बाजुला झुकलेले आहे..{ठेवण]


In reply to सोणाक्षी चे नाक अण्णा हजारे by अविनाशकुलकर्णी
सोणाक्षी चे नाक अण्णा हजारे यांच्या नाका सारखे खालच्या बाजुला झुकलेले आहे..{ठेवण]सहमत .. टू ---अ.कु.'जी... फक्त आण्णांच्या नाकाची म्हातारपणामुळे खालच्या बाजूने कळशी झाली आहे. ;) =)) =)) बाकी सोनाक्षी'च्या अतिभव्य कपाळामुळे कधीकधी ती टकली असल्यासारखे वाटते..... द्या रे .. कुणीतरी तिला कंगना राणावत'चा कुरळ्या केसांचा ओरिजिनल विग!!!! ;) ;) आणि अॅक्टिन्ग'च्या बाबतीतही सोनाक्षी अजून तरी 'कच्चं मडकं'च आहे.... ;) ;) हाहा!.. "दबन्ग'मध्ये जर एक पक्के मडके- ५०० रुपयांना, तर एक कच्चे मडके..... कितीला असेल बरे? ;)
:P
दचकलात ना ? :D
अहो माझा पावने दोन वर्षांचा भाचा ह्या रावडी राठोड चा जाम दीवाना आहे ,
आपल्या ( अजुन अस्तित्वाच्या खानाखुनाहि नसलेल्या ) मिश्याना बोटाच्या चिमटीने पिळुन
जाडा भरडा ,घोगरा आवाज काढत " रा व डी रा ठो ड " अस बोलुन भुवया ताणतो . :D
दिवसभर तो रावडी राठोडच बनुन फिरतो .
मजा येते ते ऐकायला आणि बघायला ...बास्स :)
आम्हाला ह्या रावडी राठोडचा तेवढाच काय तो उपयोग आणि आमची तेवढीच काय ती सुंदर ओळख
:)
न काढलेल्या तिकीटाच्या पैश्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आलीय ;)
ट्रेलरचा व्हीडो पाहीला..एक्दम मजेदार.
एक गुद्दा मारल्यावर माणसं हवेत काय उडतात, गाडयांखाली स्फोट होउन सगळ्या इष्टाइलित हवेत काय उडतात, सिमेंटचा खांब मारल्यावर तो खांबच कसा तुटतो हे सगळं बघणेबल असताना असं दुष्टासारखं परीक्षण लिहुन पर्याने दक्षिण भारतीय प्रभुदेवावर अन्याय केला आहे असं आमचं मत आहे.
हुस्शा पैसे वाचले?
अवांतरः खरेच वाचले का? कारण हे परीक्षण वाचुनही मी पदरचे पैसे मोडुन हा चित्रपट बघणार नाही याची माझी मलाच खात्री नाही :)
वॉण्टेड, दबंग आणि सिंघम सारखा जबराट असेल असे वाटले होते.. साफ निराशा.
पण रसप चे परिक्षण रावडी आहे :-)

उद्याच्या रविवारी हा चित्रपट पाहण्याचं ठरलं होतं!
त्यापेक्षा जाऊन Madagascar 3 पाहणे परवडेल मग..
आभारी आहे राजकुमार आणि रसप :)
" जो मै बोलता हु वो मै करता