मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इंटरव्हेन्शन

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
बरेच लोक दारू पितात. दारू पिण्यात काहीच गैर नाही. मित्रांबरोबर दोनचार पेग घेतले, थोडी दंगामस्ती केली, अधूनमधून जरा जास्त देखील घेतली. आपणही कधी कधी असं करतो. प्रत्येकाचीच एक मर्यादा असते. बहुतांश वेळी बहुतेक लोक त्या रेषेच्या आत रहातात. कधी कधी एखादवेळी ती ओलांडलीही जाते. असं चालतंच. 'काहीतरी यडपटासारखं बरळेल. मग थोड्या वेळाने उलटी काढेल. उद्या दुखेल प्रचंड डोकं. पण नंतर येईल ताळ्यावर.' हे आपल्याला आपल्या अनेक मित्रांविषयी माहीत असतं. पण एखाद्या कोणाचीतरी कथा थोडी वेगळी व्हायला लागते. मित्रांबरोबरच नव्हे, तर सदासर्वकाळ दारू पिणं सुरू होतं. मैफिलीसाठी दारू न होता दारूसाठी मैफिली होतात. आणि नाहीत मैफिली तर नाहीत, पण दारू हवी. दारू हीच मैफील होते. मग तो त्या व्यसनाच्या गर्तेत बुडून जातो. सोन्यासारखं आयुष्य त्या खोल खोल गर्तेत बुडवून टाकतो. आपण त्याला अधूनमधून 'जरा बेताने बरं का' असा सल्ला दिलेला असतो. त्यावर 'अरे काही नाही रे. आपला कंट्रोल आहे.' असं जड जिभेने ऐकलेलंही असतं. आपल्याप्रमाणेच इतर मित्रही अधूनमधून सांगतात. पण सुधारणा होत नाही. आणि अचानक तो एकेकाळी धट्टाकट्टा दिसणारा, रोडावलेला दिसतो. आपण त्याला पुन्हा सांगून बघतो. पण नंतर संबंध तुटतो. आणि काही वर्षांनी अचानक तो दारूपायी गेल्याची बातमी येते. साला काय फास्ट बॉलिंग करायचा... डोळ्यात चमक होती त्याच्या, मी दोन वर्षांपूर्वी पाहिलं तेव्हा सगळी रया गेली होती... मी सांगण्याचा प्रयत्न केला, पण आपण किती करणार? नुसती हळहळ शिल्लक राहाते. दारूचं व्यसन ही फक्त एक प्रकारची गर्ता आहे. इतरही खोल खोल विहिरी, दऱ्या आहेत, ज्यात माणूस हळूहळू खेचला जातो. दलदलीत पाय रुतल्यावर शरीर सावकाश आत आत शिरत जावं तसा. कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते. पण तिच्याकडे लक्ष देण्यापलिकडे कान बधीर झालेले असतात. अशा व्यक्तीकडून 'मला काही प्रॉब्लेम नाही' हे विधान अतिशय ठामपणे येताना दिसतं. अशा गर्तेत बुडताना कधीकधी बाहेरून एखादा प्रचंड धक्का बसतो. आणि मग आत जाण्याचा वेग वाढतो. नोकरी जाणं, प्रेमभंग, प्रिय व्यक्तीचं निधन... अशी कुठचीही गोष्ट परिस्थितीवरचा ताबा घालवायला कारणीभूत ठरू शकते. बुडत्याचा काडीचाही आधार जातो. आणि गटांगळ्या सुरू होतात. बाहेर डोकं काढून हपापल्यासारखा श्वास घ्यायचा... मदतीसाठी हाक मारायची. कधी हे होतं, तर काही वेळा तेही होत नाही. प्रवाहाला शरण जाऊन भोवऱ्यात जाणं होतं. आणि आपण किनाऱ्यावर बसून बघत राहातो. पण अशा वेळी नक्की करायचं तरी काय? 'मी माझ्या मित्राला माझ्या परीने सांगून पाहिलं. उपयोग झाला नाही. याच्यापलिकडे मी काय करणार?' असं म्हणता येतं खरं. पण मी अजून काहीतरी करायला हवं होतं ही मनाला चुकचुक लागून राहाते. इंटरव्हेन्शन हा त्यावरचा एक उपाय आहे. जेव्हा एखाद्या रोग्याला त्याचा रोग इतका वेढून टाकतो की आपल्याला मदत हवी आहे याचीही जाणीव नाहीशी होते तेव्हा ती मदत पुरवण्याची जबाबदारी इतरांवर येते. आपल्या समोर कोणी गाडीखाली येऊन बेशुद्ध पडला असेल तर त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आपली. 'त्याच्या इच्छेवर अवलंबून राहून तो स्वतःला हवे तेव्हा हवे तसे उपचार करून घेईल', असा विचार करण्याची चैन परवडण्यासारखी नसते. वाहातं रक्त डोळ्यासमोर दिसत नसेल, हात-पाय मोडलेले दिसत नसतील तर प्रत्यक्ष उचलून हॉस्पिटलमध्ये टाकायची गरज तितक्या तीव्रतेने जाणवत नाही. पण मानसिक विकार किंवा व्यसन किंवा दुःख तितक्या पराकोटीला पोचतच नाही असं नाही. जेव्हा ते तसं झालेलं दिसतं तेव्हा तितक्याच तीव्रतेने आपल्याला त्यात सामील व्हावं लागतं. तितकीच जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. 'तुला मदतीची गरज आहे. आणि ती तू घ्यावीस यासाठी आम्ही पडेल ते करू' असं अनेक मित्र, सुहृद, आप्तेष्ट यांनी एकत्र येऊन सांगणं हा एक मार्ग असतो. यालाच इंटरव्हेन्शन असं म्हणतात. एखादा मित्र जेव्हा कळकळीने सांगतो तेव्हा त्याचा थोडा परिणाम होतो, नाही असं नाही. पण तो कदाचित पुरेसा नसतो. त्याऐवजी जर त्याचे जमतील तितके मित्र, नातेवाईक, त्याच्यावर प्रेम करणारे आणि त्याचं ज्यांच्यावर प्रेम आहे असे सगळेजण एकत्र येऊन त्यांनी ठामपणे सांगितलं तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीचं जीवन बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. मरण टाळण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. विकीपिडियावर http://en.wikipedia.org/wiki/Intervention_%28counseling%29 इंटरव्हेन्शनची व्याख्या अशी दिली आहे An intervention is an orchestrated attempt by one or many, people – usually family and friends – to get someone to seek professional help with an addiction or some kind of traumatic event or crisis, or other serious problem. The term intervention is most often used when the traumatic event involves addiction to drugs or other items. हे घडण्यासाठी त्या व्यक्तीला आडून आडून, गोड शब्दांत सल्ला देण्यापलिकडे जाऊन स्पष्ट, काहीशा कठोर शब्दांतच 'तुला मदतीची गरज आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. ती तू घेण्यासाठी आम्ही पडेल ते करू. ती घेण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ती घेताना जे अडथळे येतील त्यात आम्ही तुला मदत करू. पण तू ज्या मार्गावरून चालला आहेस त्यात तुझं भलं नाही.' असं सांगण्याची गरज असते. दलदलीत फसत जाणाऱ्याला, त्याच्या मनाविरुद्ध का होईना, दोऱ्या बांधून, सगळ्यांनी मिळून खेचून बाहेर काढण्याचा हा प्रयत्न असतो. या प्रयत्नांत अर्थातच दोरी गळ्याला लागून फास बसणार नाही याची काळजी घ्यायची असतेच - पण दोरी कंबरेला काचून जखमा होतील त्याची काळजी करायची नसते. सर्वसाधारणपणे लेख लिहिताना मी बराच जास्त अभ्यास करतो. पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे. तो चांगला झाला आहे की वाईट झाला आहे याची मला पर्वा नाही. हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे. तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, ज्यांना मदतीची गरज आहे तर जरूर धावा. तुमचं मन शुद्ध असेल की या माणसाला मी, आम्ही, सगळ्यांनी मदत करण्याची गरज आहे तर कोणाच्या भावनांची कदर करण्याच्या भानगडीत पडू नका. तात्काळ कृती करा. पण एकटे जाऊ नका. शक्य तितके सुहृद, मित्र, आप्तेष्ट, हितचिंतक गोळा करा. आणि सगळ्यांनी मिळून एकदिलाने त्या दलदलीत खचणाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध का होईना, बाहेर काढा. नंतर नुसती हळहळ शिल्लक ठेवायची की आत्ताच प्रयत्न करायचा हे आपणच ठरवायचं असतं.

वाचने 26793 वाचनखूण प्रतिक्रिया 94

यकु Sat, 06/02/2012 - 09:10
कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते.
नाथ, संदेश पावला.

आंबोळी Sat, 06/02/2012 - 09:42
खुपच छान! आवडले. नाथ, संदेश पावला. घासकडवी साहेब, तुम्ही वाचवायला टाकलेल्या दोर्‍यांच्या धक्क्याने हे आजुनच बुडायला लागल का काय? ;)

५० फक्त Sat, 06/02/2012 - 09:52
खरोखर उत्तम लिहिलं आहे, आता यापुढं हा ईंटर्व्हेंशनचा प्रयत्न करुन पाहेन, बराच वेळ दारु न पिता दारुच्या मैफिलिला बसणं म्हणजे उत्तम लाईव्ह करमणुक आहे असं मानतो, आता थोडा विचार बदलायला हवा.

यकु Sat, 06/02/2012 - 10:04
घासकडवी साहेब, तुम्ही वाचवायला टाकलेल्या दोर्‍यांच्या धक्क्याने हे आजुनच बुडायला लागल का काय?
पुरुषाने पुरुषाला उर्ध्वरेतन शिकवून पुरुषाला स्‍त्री च्या संगाची गरजच न ठेवणारा संप्रदाय 'नाथ' संप्रदाय म्हणून ओळखला जातो. म्हणून त्यांना नाथच म्हणायचं. वर कुमार गंधर्व गात असलेलं ऐकलं नाही का? नाद बिंदू से पिछे जमया पानी - मूलाधार चक्राच्या जवळच वीर्य कोशिका आहेत, गगन में आवाज हो रही झिनी - झिनी - हा अनाहत नाद आहे. माखन माखन संतो ने खाया - हे वीर्य सहस्रारात जाण्याचा संकेत आहे. पृथ्‍वीवरच्या अख्‍ख्‍या मानव वंशात कदाचित भारतातच उर्ध्वरेतनाद्वारे वीर्य स्वत:च्या सहस्रारात नेऊन योग सामर्थ्याच्या बळावर योगाभ्यासक हव्या त्या स्त्री च्या पोटी संतान उत्पन्न करु शकत. छाछ जगत बभ्राणी रे - सहस्रारात न जाता बाहेर पडलेल्या वीर्यातूनच जग फोफावतं.

In reply to by यकु

याचे लेख आणि प्रतिसाद फक्त मलाच कळत नाहीत की इतरांना पण कळत नाहीत ? प्लीज सांगा कुणीतरी, मला जाम न्यूनगंड येऊन राहिला आहे....

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

यक्कुचे प्रतिसाद आणि लेख हे 'कळणारे' असतात, हे तुम्हाला कोणत्या महाभागाने सांगीतले ते आधी सांगा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

बहुदा ती तो `एक्सप्लेन' करतोय म्हणजे त्यासाठी नक्की काय करायच ती प्रोसिजर सांगतोय (म्हणून `पुरुषाने पुरुषाला' असं स्पेसिफिक लिहिलय) ... असा आपला माझा समज आहे

In reply to by संजय क्षीरसागर

भरत कुलकर्णी Sat, 06/02/2012 - 18:42
छे, काहीतरीच. तसला काहीही अर्थ मग "करी स्वजन उपाधि भस्मलेप अंगा झोळीत भरीत तज्जन्ममरण पिंगा" याचाही लावता येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

यकु Mon, 06/04/2012 - 11:10
अर्थ: हा परमसनातन विश्वभरूनी उरलाऽऽऽ भरूनी उरला गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला स्मित रम्यवदन काषाय वसन धारी पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी निज भक्त कारणेऽऽऽऽ दंड त्रिशुळ धरिला बांधीला टोप मुरडून जटा मुकुटीऽऽऽऽ मुकुटी घातली गुरूने वनमाला कंठी ऽऽऽऽ कंठीऽऽऽ करिघृतडमरूतुनी उपजति ज्ञान कला मृगचर्म पांघरे माला कमंडलू हाती, कमंडलू हाती ऽऽऽ श्रुति श्वानरूप होऊनी पुढे पळती भूधेनू कली भये चाटीत चरणाला करिस्वजन उपाधि भस्मलेप अंगा ऽऽऽ झोळीत भरीत तज्जजन्ममरण पिंगा ऽऽ नारायण हृदयी रंग भरूनी गेलाऽऽऽ भरूनी गेलाऽऽऽ गुरू दत्तराज ऋषिकुळात अवतरला आणि कथा इथे: http://www.misalpav.com/node/15543

In reply to by यकु

५० फक्त Mon, 06/04/2012 - 17:06
पियुषयुक्त करी रत्नजडीत झारी - आयला ते जनसेवा मधल्या पियुषचा संदर्भ इथपासुन आहे का, बरं झालं कळालं ते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मन१ Sun, 06/03/2012 - 19:20
लोकांना यकुचं म्हणणं कळतय की नाही ह्याचा विचार केलात; पण लोकांचं म्हणणं यकुला समजतय की नाही ह्याचा कुणी विचार करतय का?

श्रावण मोडक Sat, 06/02/2012 - 10:20
सर्वसाधारणपणे लेख लिहिताना मी बराच जास्त अभ्यास करतो.
हं...
पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे.
पटलं. :-)
तो चांगला झाला आहे की वाईट झाला आहे याची मला पर्वा नाही.
हे उत्तम. निर्गुण, निराकार व्हावं माणसानं. भाव निर्माण होणं थांबवावं असं योगी-ऋषी सांगून गेले आहेतच. तेच तुम्ही सांगताहात वेगळ्या रीतीनं. :-)
हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे.
पोचली.
तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, ज्यांना मदतीची गरज आहे तर जरूर धावा.
धावतोच आहे. थांबता येईल अशी चिन्हं दिसत नाहीत. :-(
तुमचं मन शुद्ध असेल की या माणसाला मी, आम्ही, सगळ्यांनी मदत करण्याची गरज आहे तर कोणाच्या भावनांची कदर करण्याच्या भानगडीत पडू नका.
करत नाहीच. एरवीही आणि इथंही. :-)
तात्काळ कृती करा.
केली. करतो आहेच. वर म्हटलं तसं, धावणं थांबवता येईल अशी चिन्हं नाहीत. :-(
पण एकटे जाऊ नका. शक्य तितके सुहृद, मित्र, आप्तेष्ट, हितचिंतक गोळा करा. आणि सगळ्यांनी मिळून एकदिलाने त्या दलदलीत खचणाऱ्याला त्याच्या मनाविरुद्ध का होईना, बाहेर काढा.
अगदी, अगदी. सहमत होण्याशिवाय पर्यायच नाही. माणूस हा शेवटी 'समाजशील' प्राणीच आहे, असं म्हणतात. :-)
नंतर नुसती हळहळ शिल्लक ठेवायची की आत्ताच प्रयत्न करायचा हे आपणच ठरवायचं असतं.
अगदी खरंय. कमीतकमी अभ्यासातूनही कमाल सत्य मांडलं आहे तुम्ही. म्हणूनच वरच्या थत्तेचाचांच्या प्रतिसादाशी सहमत. :-) आता विकीच्या त्या व्याख्येकडं येतो.
An intervention is an orchestrated attempt by one or many, people – usually family and friends – to get someone to seek professional help with an addiction or some kind of traumatic event or crisis, or other serious problem. The term intervention is most often used when the traumatic event involves addiction to drugs or other items.
दोन कळीचे शब्द जाड ठशात टाकले आहेत. त्याच्यासंदर्भात तुमचे "पण हा लेख अपुऱ्या माहितीवर लिहितो आहे" हे वाक्य वाचता येते हे महत्त्वाचे. काय म्हणता?

In reply to by श्रावण मोडक

त्यांच्या भावना पाहा आणि इथे पब्लिकचे लगेच मनावर घेऊन (म्हणजे आपल्याला उद्देशूनच लेख असल्यासारखे) स्वजागृती करण्याचे प्रयत्न पाहा; व्याख्येपेक्षा भावना महत्त्वाची, काय बोलता?

हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे.
एकदम पोचली. :) सध्या स्वतःच स्वतः वरती इलाज करत आहे. लक्षणीय वाटावे इतके दारुपान कमी झालेले आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

निश Sat, 06/02/2012 - 12:31
परिकथेतील राजकुमार साहेब, माझ्या कडुनही धन्यवाद तुम्ही करत असलेल्या दारु कमी करण्याच्या प्रयत्नासाठी. मस्त प्रयत्न करत आहात व त्यात यशस्वी पण होत आहात तर दारू प्यावीशीच वाटणार नाही ह्यासाठी पण जरुर प्रयत्न करा. माझ्या कडुन तुम्हाला धन्यवाद व तुमच्या प्रयत्नाना माझा सलाम.

In reply to by निश

मस्त प्रयत्न करत आहात व त्यात यशस्वी पण होत आहात तर दारू प्यावीशीच वाटणार नाही ह्यासाठी पण जरुर प्रयत्न करा.
हे अंमळ अवघड आहे. दारुवरती आमचे नितांत प्रेम आहे बघा. पण तुमच्या सुचनेचा नक्की विचार केल्या जाईल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

निश Sat, 06/02/2012 - 12:41
परिकथेतील राजकुमार साहेब, अहो दारु पेक्षा जीवनाचे आयुष्याचे तुमच्या वर जास्त प्रेम आहे. मग त्या देवाने दिलेल्या सुंदर आयुष्यासाठी तरि प्रयत्न करुन बघा. तुम्ही नक्कि यशस्वी व्हाल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आणि "दारू प्यावीशीच वाटणार नाही " असला भारी डिसिजन घ्यायचा तर केवढी तरलता पायजेल काही हिशेब आहे का? काय करायच? घ्यायची का रिस्क, का चाललय ते बरंय ? जरा विचार कर, तू आपला लगेच ` थँक्यू' म्हणून मोकळा!

In reply to by कवितानागेश

निश Sat, 06/02/2012 - 18:17
दारू च प्रेम हे फक्त एकावरच असत. ते दोघही येतात बहुतेक जोडीनेच.. दारुच खर प्रेम असत फक्त आणी फक्त मरणा बरोबर. ति येते आणी सतत येतच राहते तेव्हा समजावा तिचा प्रियकर यायची वेळ आली म्हणुन.

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक Sat, 06/02/2012 - 12:50
लोकेशन मॅटर्स. आजकाल त्यातच बदल झालाय ना! रेंज असते म्हटल्यावर फोन लागतोच. त्यानंतर जे घडतं ते... जाऊ द्या... ;-)

In reply to by श्रावण मोडक

राजेश घासकडवी Sat, 06/02/2012 - 18:41
श्रामो, परा, एकंदरीत ही चर्चा टाइमपासकडे झुकत चाललेली दिसते आहे. हे सगळं करण्याचा तुम्हाला अधिकार आहे हे मला माहीत आहे. पण लेखाचा विषय गंभीर आहे. तेव्हा इथे भंकस करू नये अशी विनंती करतो. त्यासाठी इतर अनेक धागे आहेतच.

In reply to by नाना चेंगट

कसे आहे नानबा, आपण करतो ती चर्चा आणि लोकं करतात ती भंकस.
तेव्हा इथे भंकस करू नये अशी विनंती करतो.
आंतरजालावरती लेख टाकणे म्हणजे खिडकीत बसणे. अशावेळी खालून कोणी इशारे केल्यावरती पतीव्रतेचा आव आणू नये अशी विनंती. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाना चेंगट Mon, 06/04/2012 - 13:09
>>>आपण करतो ती चर्चा आणि लोकं करतात ती भंकस. हा हा हा अरे कधी मोठा होणार तु... सहस्त्रेषु पंडित: नाही नाही परार्धेषु विचारवंतः असते विसरु नकोस... :) तेव्हा विचारवंतांना आपण सोडून बाकीचे सगळे भंकस करतात असेच वाटते. तु नको मनावर घेऊस ! जे चालले आहे ते तसेच चालू ठेवायचे :) >>>आंतरजालावरती लेख टाकणे म्हणजे खिडकीत बसणे. अशावेळी खालून कोणी इशारे केल्यावरती पतीव्रतेचा आव आणू नये अशी विनंती. अगदी खरे. तसेच आम्ही मागे म्हणालो होतो तसेच लेख लिहिला की गंगार्पणमस्तु !! लोकांनी डोक्यावर घ्यावा, पायदळी तुडवावा, मखरात बसवावा वा फाट्यावर मारावा. लेखकाने अमुकच पद्धतीचे प्रतिसाद हवे नाहीतर आम्ही नाही लिहिणार जा असे म्हणू नये, तशीच इच्छा असली तर अक्षरांची टंकखाज भागवण्यासाठी वेगळी संकेतस्थळे आहेतच तिथे जाऊन शष्प कर्तन केंद्र चालू ठेवावे. कसे !! :) बाकी खालती पुपे म्हटला ते खरेच असावे असे वाटत आहे :) असो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कपिलमुनी Fri, 06/08/2012 - 14:56
>>आंतरजालावरती लेख टाकणे म्हणजे खिडकीत बसणे. अशावेळी खालून कोणी इशारे केल्यावरती पतीव्रतेचा आव आणू नये .. ह ह पु वा ..

In reply to by राजेश घासकडवी

श्रावण मोडक Sat, 06/02/2012 - 19:42
नाही, हे माहितीचे संकलन आहे. इंटरव्हेन्शन कसे असावे याचा अभ्यास चालू आहे. सहा तास मी शांत आहे तो त्यामुळेच. तेंव्हा याला टाइमपास म्हणू नये ही नम्र विनंती. :-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाना चेंगट Sat, 06/02/2012 - 14:38
>>सध्या स्वतःच स्वतः वरती इलाज करत आहे. लक्षणीय वाटावे इतके दारुपान कमी झालेले आहे. अच्छा ! कुणाच्या दृष्टीने लक्षणीय? ;) @लेखक'राव लेख चांगला

दादा कोंडके Sat, 06/02/2012 - 13:17
'त्याच्या इच्छेवर अवलंबून राहून तो स्वतःला हवे तेव्हा हवे तसे उपचार करून घेईल', असा विचार करण्याची चैन परवडण्यासारखी नसते.
बरोबर
पण मानसिक विकार किंवा व्यसन किंवा दुःख तितक्या पराकोटीला पोचतच नाही असं नाही. जेव्हा ते तसं झालेलं दिसतं तेव्हा तितक्याच तीव्रतेने आपल्याला त्यात सामील व्हावं लागतं. तितकीच जबाबदारी आपल्यावर येऊन पडते.
तितकीच नाही तर त्यापेक्षा जास्त जबाबदारी येते. महत्वाचा फरक म्हणजे, त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायला हवा. त्याला आपण खरोखरच मदत करीत आहोत असा त्याला विश्वास वाटायला हवा. त्याला जबरदस्तीनं पकडून वेड्यांच्या इस्पितळात दाखल करू नये. त्यासाठी आपलं इंटेशन चांगलं हवं. फक्त त्या व्यक्तीशी संवाद साधायला हवा. एकदा चार-चौघांसमोर त्या व्यक्तीला वेडं ठरवल्यावर ती व्यक्ती डिफेन्स मोडमध्ये जाते, आणि मग उपचार अवघड होउन बसतो. आणि महत्वाचं म्हणजे मानसिक विकार ओळखणं. एखादी व्यक्ती चार चौघांसारखं आयुष्य जगत नाही. पोरं पैदा करत नाही म्हणून त्याला मानसिक आजारी ठरवू नये. असो.

दारुचे फायदे तोटे दारु पिणार्‍याला चांगलेच माहीत असतात. दारु पिउन आपण आपले स्वतःचे आपल्या कुटुंबाचे नुकसान करतो आहोत हे दारुड्याला चांगले माहीत असते. तरी सुध्दा तो दारु पिणे सोडत नाही. त्यामुळे असल्या निर्बुध्द, कोडग्या आणि भिकारचोट लोकांच्या उगाच नादाला लागु नये. काहीसुध्दा फायदा होत नाही. लाखात एखादा दारु सोडु शकतो. बाकीचे प्रवचन ऐकुन तडक दारुचा अड्डा गाठतात आणि दारु पिउन आपलाच उध्दार करतात. कुटुंबातील एखादी व्यक्ती जर दारुडी असेल तर बाकिच्या कुटुंबाच्या मनःशांतीवर नक्कीच परीणाम होतो. रोजची कटकट, भांडणे, वादविवाद यात ते अकारण भरडले जातात. एखादा दारुडा / दारुडी जर मेला / मेली तर त्याचे कुटुंब अधिक सुखी होते. त्यांना निदान शांतपणे बाकी आयुष्य जगता येते. त्यामुळे असला भोचकपणा न करता त्या दारुड्याला जर दारु साठी पैसे कमी पडत असतील तर ते पुरवावे. विलायती पित असेल तर देशी पी असा आग्रह करावा. देशी पित असेल तर गावठीने कशी लवकर किक बसते हे सांगावे. ज्या मुळे तो जास्तीजास्त दारु पीउन लवकरात लवकर मरेल आणि त्याचे कुटुंबिय सुखी होतील. असला भोचकपणा करणे म्हणजे फार मोठी समाजसेवा जर कोणाला वाटत असेल तर देव त्याचे भले करो. स्वतःची लाल करुन घेण्याची खाज असलेले लोकच असले वांझोटे उद्योग करतात. त्यापेक्षा एखादा दारुडा लवकरात लवकर कसा मरेल हे पहाणे हीच खरी समाजसेवा आहे. एखादा दारुडा मेला तर त्याचे अजिबात वाईट वाटुन घेउ नये (तो आपला कितीही जवळचा असला तरी) मग असले काहीबाही मनात येत नाही. (ऱोखठोक)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तिमा Sat, 06/02/2012 - 16:46
बाईलवेड्यांना मदत करावी का ? म्हणजे ते रोग होऊन लौकर मरतील. इंटरनेट वेड्यांना आणखी संगणक घेऊन द्यावे का ? म्हणजे ते पूर्ण अ‍ॅडिक्ट होतील. भ्रष्टाचार्‍यांना पैसा पुरवावा का ? म्हणजे ते हा रोग पसरवून आपल्या देशाचे वाटोळे करतील.

In reply to by तिमा

बाईलवेड्यांना पण जरुर रोग होउन मरु द्यावे. हाच न्याय ईतर व्यसने करणार्‍यांनाही लावावा जसे चरस गांजा सिगारेट इत्यादी. असल्या लोकांना जगवुन तरी काय फायदा? एखादा विजय मल्ल्या किंवा आयटीसी यांना श्रीमंत करण्याशिवाय आणि कुटुंबियांना मनस्ताप देण्या पलीकडे हे लोक काय करतात? आम्ही दारु का पितो याचे मुर्खा सारखे समर्थन, दारु न पिणारा बावळट आणि मी कसा महान आहे या पलिकडे त्यांना बोलता देखील येत नाही. अशांना मरु द्यावे असे माझे स्पष्ट मत आहे. ईतर दोन उदाहरणे अप्रस्तुत वाटल्यामुळे त्या बद्दल कोणतीही टीपण्णी टाळतो.

In reply to by कवितानागेश

राजेश घासकडवी Sat, 06/02/2012 - 18:35
हा लेख फक्त दारूविषयी नाही. कुठचंही व्यसन, वागणूक, विचार यांच्या चक्रात अडकून पडायला होऊ शकतं. त्यात अडकल्यावर स्वतः होऊन त्यांना त्यांतून बाहेर येण्याची मानसिक शक्ती नसते. जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती तशी अडकलेली दिसते तेव्हा आपण काय करावं, याविषयी हा लेख आहे. एकंदरीत इंटरव्हेन्शन या प्रकाराची परिणामकारकता किती याचा एक अभ्यास इथे सापडेल. http://www.biomedcentral.com/1471-2458/10/538 विदा मागताना जीभ दाखवण्याचं कारण कळलं नाही. हा चेष्टेचा विषय नाही. तुम्हाला टाइमपासच करायचा असेल तर त्यासाठी इतर अनेक धागे उघडलेले आहेत.

In reply to by राजेश घासकडवी

कवितानागेश Sun, 06/03/2012 - 00:01
हा लेख फक्त दारूविषयी नाही. कुठचंही व्यसन, वागणूक, विचार यांच्या चक्रात अडकून पडायला होऊ शकतं. त्यात अडकल्यावर स्वतः होऊन त्यांना त्यांतून बाहेर येण्याची मानसिक शक्ती नसते. जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती तशी अडकलेली दिसते तेव्हा आपण काय करावं, याविषयी हा लेख आहे.> हा लेख फक्त दारूविषयी नाही हे नविन कळलं. दारु, सिगरेट शिवाय इतर कुठल्या व्यसनांनी/वागणूकीनी/विचारांनी (?) लिव्हर, फुप्फुस, हृद्य किंवा इतर महत्वाचे अवयव निकामी होतात? स्वतःची कुठलीही शरीरिक, मानसिक, वैचारिक बैठक बदलण्याची इच्छाच मूळात कुणालाही नसते. ज्यांना असते ते आपापला मार्ग बरोबर शोधतात. अस कुणाचाही सल्ला वगरै ऐकत बसत नाहीत. विशेषतः जे त्यांच्या 'बैठकीत' नाहीत अणि उलट अशी 'बैठक मांडणे' हानीकारक आहे असे सांगणार्‍यांचे तर बिल्कुलच नाही. मग तुमचे ते इन्टरव्हेन्शन करणार कसे? म्हणून मी विदा मागितला. आता बघते. तुम्ही नेहमी देता असा काहितरी विदा वगरै. मला वाटले यावेळी विसरलात. म्हणून मला गंमत वाटली तुमच्या विसरभोळेपणाची. आपोआपच जीभ बाहेर निघाली. ( यापुढे तुमच्यासमोर खेचरी मुद्रा करुन वर अडकवून ठेवेन जीभ) एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीत अडकलेली दिसली तर खरोखरच सांगून त्या व्यक्तीला ते पटते का, याबद्दल मला शंका आहे. आता मी तुम्हाला सांगितले, की, 'प्लीज गुर्जी, या सल्ला द्यायच्या चक्रातून बाहेर पडा. आम्हाला तुम्ही परत पुर्वीसारखे हवे आहात. आम्हाला तुमची गरज आही.... ब्ला ब्ला ब्ला ब्ला....'. तुम्ही ऐकाल का? तुम्हाला पटेल का? इथे वैयक्तिक रोख नाही. कुणालाही कुणाचीही कुठलीही गोष्ट चुकीची वाटू शकते याचे एक साधेसे उदाहरण आहे. हा पुर्वीप्रमाणेच अत्यंत गंभीर प्रतिसाद आहे. अवांतरः मी इतर धाग्यांपैकी फक्त प्रॉन्स बिर्याणीतल्या गुलकंदावर चेष्टा करु शकतेय. बाकी टाईमपास सारखे मला काही दिसले नाही.

In reply to by कवितानागेश

हा लेख फक्त दारूविषयी नाही हे नविन कळलं.
माऊ ताई, मूळ लेखात खालील वाक्य शोध. त्या पुढचा अख्खा भाग हा जनरल आहे. "दारूचं व्यसन ही फक्त एक प्रकारची गर्ता आहे. इतरही खोल खोल विहिरी, दऱ्या आहेत, ज्यात माणूस हळूहळू खेचला जातो."

In reply to by कवितानागेश

राजेश घासकडवी Sun, 06/03/2012 - 04:40
दारु, सिगरेट शिवाय इतर कुठल्या व्यसनांनी/वागणूकीनी/विचारांनी (?) लिव्हर, फुप्फुस, हृद्य किंवा इतर महत्वाचे अवयव निकामी होतात?
नेमके लिव्हर, फुप्फुस, हृदय हेच निकामी होतील असं नाही. पण खालील प्रकारच्या वागणुकींनी तशीच हानी पोचू शकते. १. जुगार खेळण्याचा नाद - तुमचं शरीर भले या नादापायी बिघडणार नाही, पण आयुष्य उध्वस्त होऊ शकतं. २. डिप्रेशन - ही वागणूक नाही, पण हा रोग जडलेला असेल तर आयुष्यच नकोसं होतं. जाऊन मदत घेण्याची इच्छा देखील नाहीशी होते. अशा वेळी थोड्या गोड शब्दांनी चुचकारून, कधी ठासून सांगून मदत घेण्यासाठी प्रवृत्त करता यावं.
स्वतःची कुठलीही शरीरिक, मानसिक, वैचारिक बैठक बदलण्याची इच्छाच मूळात कुणालाही नसते. ज्यांना असते ते आपापला मार्ग बरोबर शोधतात.
हे तुमचं वैयक्तिक निरीक्षण असावं. प्रस्थापित विज्ञान वेगळं सांगतं. मानसशास्त्र हे भौतिकशास्त्राइतकं तंतोतंत नसलं तरी बऱ्याच लोकांची वागणुक व वैचारिक बैठक एका मर्यादेपर्यंत बदलण्याचं तंत्र आत्मसात केलेलं आहे.
एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीत अडकलेली दिसली तर खरोखरच सांगून त्या व्यक्तीला ते पटते का, याबद्दल मला शंका आहे.
इंटरव्हेन्शनच्या बाबतीत म्हणावं तर या लिंकवर खालीलप्रमाणे म्हटलेलं आहे. ..an informal poll taken at the National Association of Independent Interventionists Conference (AIS) in 1995 revealed that 90% of professionally facilitated interventions resulted in the identified patient entering treatment as a direct result of the intervention. टाइमपाससाठी या धाग्यापेक्षा थोडे कमी गंभीर धागे आहेत - उदाहरणार्थ कुणाला मिपारत्न द्यावे, प्यार्टीसाठी मदत हवी आहे वगैरे. शोधा म्हणजे इतरही सापडतील कदाचित.

In reply to by राजेश घासकडवी

कवितानागेश Sun, 06/03/2012 - 14:43
माझा मुद्दा असा आहे, की मूळातच 'व्यसनी' माणूस हा एकटा पडलेला असतो, आणि हे खूप आधीच कधीतरी होउन मग तो व्यसनांच्या आहारी गेलेला असतो. तिथे त्याच्या आणि व्यसनाच्या मध्ये घुसून कुणी काही सांगू शकेल अशी व्यक्ती फार क्वचित शिल्लक असते. मग ज्या आजूबाजूच्या व्यक्ती शिल्लक आहेत, त्यांच्या सांगण्याचा उपयोग वरवरच्या मलमपट्टी सारखाच होइल. कायमचा होणे कठीण आहे. जोपर्यंत कुठल्यातरी क्षुल्लक वस्तूनी किंवा कृतीनी मिळणारा अशाश्वत आनंद माणसाला महत्त्वाचा वाटतोय, तोपर्यंत कुणीही माणूस कुठल्याही व्यसनाला बळी पडू शकतो. ज्याला एकंदरीत अस्तित्व, आयुष्य व परस्परसंबंध याबद्दल प्रेम आहे, असा मनुष्य घसरत नाही. बाकीची कुणीही कधीही घसरु शकतात. अवांतरः मी टाईमपास करावा यासाठी आग्रह का? मी गंभीरपणेच लिहित आहे. भले ती माझी वैयक्तिक मते आहेत, त्यामुळे 'प्रस्थापित' निष्कर्षांइतकी महत्त्वाची नाहीत. पण यापुढे चर्चा करणार नाही. फक्त 'वा, वा' म्हणेन.

In reply to by राजेश घासकडवी

टाइमपाससाठी या धाग्यापेक्षा थोडे कमी गंभीर धागे आहेत - उदाहरणार्थ कुणाला मिपारत्न द्यावे, प्यार्टीसाठी मदत हवी आहे वगैरे.
आपणहून मदत मागणारे धागे टाइमपास आणि कुणी शाट मदत मागीतली नसताना कळफलक बडवून लेख पाडणे म्हणजे गंभीरपणा ? फारच अवघड व्याख्या आहे बॉ. असो..
शोधा म्हणजे इतरही सापडतील कदाचित.
शोधायचे कशाला ? पल्याडच्या 'ऐसी भंकसे' का काय संस्थळावरील १०० पैकी ९९ धागे तसेच असतात की. बाकी श्री. घासकडवी हे सदस्यांना इतरांच्या लेखावरती टाइमपास / अवांतर / भंकस करण्यासाठी उघडपणे उद्युक्त करत आहेत ह्याची संपादक नोंद घेतील काय ?

रामदास Sat, 06/02/2012 - 18:51
विषय आवडला. काही विचार पटले. माझे काही प्रयोग यशस्वी झाले आहेत. पण अयशस्वी झालेल्या प्रयोगांची संख्या (वैयक्तिक अनुभवापर्यंत मर्यादीत) जास्त आहेत याचे वाईटही वाटते. पण त्यामुळे इंटरव्हेन्शन करणे बंद करीन / केले आहे असे नाही. ज्या संस्थळावर रहदारी भरपूर आहे तेथे हे लेखन केल्यामुळे जास्तीत जास्त वाचले जाईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.

राजेश घासकडवी Sat, 06/02/2012 - 20:26
ज्या संस्थळावर रहदारी भरपूर आहे तेथे हे लेखन केल्यामुळे जास्तीत जास्त वाचले जाईल अशी अपेक्षा आहे.
हा लेख मी फक्त मिसळपाववरच का लिहिला आणि आत्ताच का लिहिला याची बहुतेकांना कल्पना असावी. त्याचा रहदारीशी काडीइतका संबंध नाही.

In reply to by शुचि

काही अघटीत घटले आहे काय मिपा वरील कोण्या सदस्याबाबत? हो . भारतीय संस्कृतीमधील पुरातन गुरुशिष्य संबंध आणि त्याचे थोडे पैलु एका मिपाकराला अनुभवावयास मिळाल्याने सर्व साठोत्तरी पुरोगामी म्हणवणार्‍याना वैचारीक जुलाब सुरु झाले आहेत अशी आतली बातमी आहे. असो आपले सगळेच चुकीचे असे एक पहील्या धारेच औंषध त्या येशाला दिल्यावर लायनीवर येईल.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नाना चेंगट Mon, 06/04/2012 - 13:12
हो . भारतीय संस्कृतीमधील पुरातन गुरुशिष्य संबंध आणि त्याचे थोडे पैलु एका मिपाकराला अनुभवावयास मिळाल्याने सर्व साठोत्तरी पुरोगामी म्हणवणार्‍याना वैचारीक जुलाब सुरु झाले आहेत अशी आतली बातमी आहे. असो आपले सगळेच चुकीचे असे एक पहील्या धारेच औंषध त्या येशाला दिल्यावर लायनीवर येईल. अतिशय नेमके आणि परखड विश्लेषण.

In reply to by नाना चेंगट

यकु Mon, 06/04/2012 - 17:02
नानाना नाना , घासकडवींना हा मदतीचा लेख लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली हे त्यांना माहित नाही, त्यामुळं त्यांना बिलकुल दोष द्यायला नको. उलट मला हा लेख इथे प्रगटल्यानंतर जो मिळायचा तो संदेश मिळून गेला आहे, वर माझ्या प्रतिसादात माझ्या गुरुंनी घासकडवींमार्फत दिलेला संदेश वेगळा देखील काढला आहे - सो अल्टीमेटली राजेश घासकडवी इज ए गुड मॅन. घासकडवींना 'चेतना', 'जाणीव'वगैरेबद्दल खोलवर काहीही माहिती नसतानाही
कधी ही दलदल खूप उबदार असते. आत शिरण्याचा मोह आवरत नाही. बाहेरच्या कोरड्या शुष्क जगापेक्षा हीच ओल मनाला भावते. आत जाताना आधी पायांना, मग गुढग्यांना, त्यानंतर कंबरेला अतीव सुखदायक वाटतं. बाहेर पडायची इच्छाच होत नाही. कुठेतरी यात काहीतरी धोका आहे असं वाटत असलं तरी मन सांगत राहातं 'अजून थोडा वेळ. मला हवं तेव्हा मला बाहेर येता येईलच...' हीच खरी धोकादायक परिस्थिती असते. आतमध्ये कुठेतरी घण् घण् घण् धोक्याची घंटा वाजत असते.
हे त्यांच्यात लेखात कसं आलं? वर जे कोट केलंय त्याचे घासकडवींचे रेफरन्स पॉइंट काय असतील ते असो, पण माझे आणि माझ्या गुरुंचे वेगळे होते. पायांना, गुढघ्यांना आणि कंबरेला अतीव सुखदायक वाटतं हे उर्ध्वरेतनाशी संबंधीत आहे, मी ते करुन पहात होतो आणि ते होत नव्हतं तेव्हा मी पियूशाच्या कोड्याचं उत्तर लिहित असतानाच मी गुरुंना साद घातली, त्या माझ्या प्रतिसादाचा वेळ आणि घासकडवींचा हा लेख प्रकाशित होण्याचा वेळ ताडून पहा - फार अंतर असणार नाही, चेतना एक आहे आणि सिद्ध पुरुषांना ती हवी त्या व्यक्तीमध्‍ये त्या व्यक्तीला नेमकं काय चाललंय हे न कळू देताही ऑपरेट करता येते. सिद्धपुरुष अर्थातच आमचे गुरुदेव नवरत्न नाथ, एवढे सिद्ध की त्यांनी शिष्याला (म्हणजे मला) दोन स्थूल देहांमुळे समजून घ्‍यायला अवघड जातंय म्हणून देह देखील सोडला, आता हा देहच त्यांचा देह.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राजेश घासकडवी Mon, 06/04/2012 - 20:42
पुपे, तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय असं दिसतंय. आम्ही भारतीय संस्कृतीचे खंदे समर्थक आहोत. किंबहुना काही महिन्यांपूर्वी कोणी कवयित्रीने वटपौर्णिमेसारख्या परमपूज्य प्रथेची निंदा केली तेव्हा त्यांना जाब विचारणारा लेख आम्हीच लिहिला होता. तो तुम्ही वाचलेला दिसत नाही.

In reply to by रामदास

अस काय करता काका आज सुट्टीचा दिवस आहे तेव्हा गुर्जी ना वाटले आपल्या लेखाचे प्रयोजन ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठी हा लेख आणि ज्यांना ह्या लेखामागील कळकळ व तगमग कोणासाठी आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल तर सुट्टीचा अमुल्य दिवस खर्ची करून दोन चार खरडी व ३ चार व्यनी केले किंवा दूरध्वनी चा अथवा चेपू चा सुयोग्य उपयोग केला तर लेख कोणासाठी व आतच का लिहिला आहे ह्यामागील कारण कळेल. आणि ते कळले कि मला देखील कळवा. दिवसभर नुसती पावसाची रिपरिप चालू आहे. रविवार फुकट गेल्यात जमा आहे. ठराविक व्यक्तीसाठी हा लेख असेल तर व्यनी किंवा खर्डी चा उपयोग साधता आला असता. पण सत्यमेव जयतेचा बहुतेक परिणाम असावा म्हणून त्या निमित्ताने समाजप्रबोधन केले असावे. त्यात तुम्ही आम्ही सर्वांनी खारीचा वाटा उचलला आहे.

अल्कोहोलिझम-- मद्यपाश - आजाराची माहिती http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmedhealth/PMH0001940/ http://en.wikipedia.org/wiki/Alcoholism http://www.medicalnewstoday.com/articles/157163.php अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस--- बेवड्यांची आखरी अदालत- ए.ए. ए.ए. पुणे शाखा--- http://www.aagsoindia.org/pune.htm ए.ए. ची इतर माहिती--- http://www.aa.org/lang/en/subpage.cfm http://www.aa.org/?Media=PlayFlash बेवड्यांचा बेवड्यांनी मद्यमुक्तिसाठी शोधलेला एकमेव इलाज ए.ए. च्या मिटिंग,म्हणजेच--- अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस :-)

ओशोंच एक प्रसिद्ध वाक्य आहे: `सलाह दुनियाकी सबसे जादा दी जानेवाली और सबसे कम ली जानेवाली चीज है' याचं कारण असंय की जोपर्यंत बाधित व्यक्तीचा स्वत:चा काही स्टेक नाही तोपर्यंत मोफत इंटरवेनशनचा काही उपयोग नाही. स्वत:ला परिस्थितीतनं मार्ग काढायचा असेल तेव्हाच संबधित व्यक्तीचा इनिशिएटिव असतो, इतरांच्या सदिच्छा काही काम करत नाहीत. तुमच्या ओरिजिनल लिंकमधे पण `प्रोफेशनल हेल्प' असा शब्द आहे. फार सिरियस गोष्टी सोडा, साधं इंटरनेटचं बघा, नुसते प्रश्न मंडले जातात, बाकीचे सदस्य आपुलकीनं प्रतिसाद देतात पण एकही सदस्य पुढे काय झालं, उपयोग झाला की नाही याविषयी एक ओळ देखील लिहित नाही (आणि त्याला काही खर्च नसताना !) माझा तर आगदी दोन दिवसापूर्वीचा अनुभव आहे, तुमचं यावर काय म्हणणय?

दारू पिणे ही आवड तर पाजणे हा एकेकाळी आमच्या चरितार्थाचा भाग होता. म्हणून ह्याविषयावर हक्काने थोडेसे खरडतो.( एरवी सुद्धा खरडतो ......) एखादा माणूस दारू चे आचमन करत असेल तर अनुभवाने आम्ही (पाजणारे ) हा दारू पितोय का दारू ह्याला पीत आहे हे सांगू शकतो. येथे दारूला उगाच बदनाम करण्यात येत आहे. असे माझे स्पष्ट मत आहे. दारू हे केवळ एक निमित्त असते. मुळात व्यसनाधीन माणूस कोणत्याही व्यसनाच्या आधीन होण्याआधी त्यांच्या मानसिक दृष्ट्या कुठेतरी जबरदस्त कंपूवत असतो. कारणे जगात अनेक असतात पण त्या कारणांना वास्तविक आयुष्यात तोंड देणे विविध कारणास्तव शक्य झाले नाही. किंवा तोंड देण्याची मानसिकता नसेल तर मग आपले शरीर एखादे मृगजळ शोधते. मग त्यासाठी वास्तविक जगातील एखादे व्यसन उदा दारू हि त्या इसमास खर्या आयुष्यातून एखाद्या मोहमयी जादुई दुनियेत नेऊन ठेवते. तेथे मिळणारा क्षणिक आनंद व त्यात दुनियेत चालणारी आपली अधिसत्ता त्या दुनियेत आपल्याला सारखे रमण्यास प्रवृत्त करते ह्यालाच मग व्यसन लागणे असे म्हणतात. माझ्या पाहण्यात अनेक लोक आयुष्यात काहीतरी मोटीव. लक्ष्य ,उदिष्टाचा अभाव असल्याने दारूच्या आहारी नोकरी झाल्यावर संध्याकाळी काय करायचे ह्या विवंचनेत जातात. दारूचे काय किंवा अमली पदार्थांचे काय व्यसन हे केव्हाही वाईट. दारूपेक्षा सिगरेट चे व्यसन केव्हाही वाईट. हे व्यसन कुठेही सार्वजनिक जागी भागवता येत असल्याने ते लवकर लागते.दारू शिवाय एकादी व्यक्ती दिवसभर राहू शकते. मात्र सिगारेट पिणारी साधी व्यक्ती दिवसातून एकदा सुद्धा सिगारेट मिळाली नाही तर ...... कितीतरी माझ्या माहितीत असणारे सज्जन सिगारेट प्यायल्या शिवाय सकाळी संडास सुद्धा करू शकत नाही. माझ्या आयुष्यात आभासी जगत आणि त्यातील संस्थळ आल्यामुळे इतर कोणत्याही गोष्टी करण्यात फुरसत मिळत नाही. घराची कामे व त्यातून मिळालेल्या वेळात ह्या जगतात वाचन ,लिखाण करायला फुरसत नसते- एखाद्या दारूच्या व्यसनी माणसाने मिपावर एखाद्या कंपूशी पंगा घ्यावा मग कसा तो सतत आपले व्यनी किंवा आपल्या खरडी किंवा एखादे लेख त्यावरील प्रतिसाद किंवा स्वतःचे लेख त्यावरील प्रतिसाद ह्यावर व्यसन जडल्या सारखा जखडून जातो. सुरवातीला मला मिपाचे व्यसन म्हणावे इतके व्यसन लागले होते. मग मी काही दिवस दारूच्या आहारी गेलो आणि आता मद्य व मिपा असे दोन्ही मकारांमधील संतुलन सांभाळून जगत आहे. जय( मद्य मिपा )

In reply to by निनाद मुक्काम …

मुळात व्यसनाधीन माणूस कोणत्याही व्यसनाच्या आधीन होण्याआधी त्यांच्या मानसिक दृष्ट्या कुठेतरी जबरदस्त कंपूवत असतो. तुम्हाला कंपूचा लईच तिटकारा बॉ!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

माफ करा जरा शब्दांशी खेळलो हा द्वयर्थी शब्द असून तुम्ही म्हणता तसे दोन्ही अर्थ येथे अपेक्षित आहेत: म्हणजे दुबळा ह्या अर्थाने सुद्धा आणि आणि दारू पिण्यासाठी माणसाला सुरवातीला आवश्यक असतो तो म्हणजे दारू पिणाऱ्या मंडळींचा कंपू ह्या अर्थी कंपू असलेला :::: कारण एखादा निर्व्यसनी माणूस सुरवातील ह्या घोळक्यात आपल्या भाषेत वाचनमात्र असतो: मग हळूहळू ट्राय कर ; अरे होईल सवय अश्या वाक्यांनी एकच प्याल्याची सुरवात होते:

>>>>> हा लेख लिहिण्यामागे मला माझ्या मनातली कळकळ पोचवायची आहे. कळकळ जवळ जवळ पोहचली आहे. >>>>>>>तुम्हाला तुमच्या आसपास कोणी जर दिसत असेल, मला माझ्या आजूबाजूला असं कोणीही दिसत नाही. विनाकारण कोणाच्या आयुष्यात कोणत्याही अधिकारिक विदांशिवाय कोणत्याही किरकोळ गोष्टीवरुन एखादा व्यक्ती मला व्यसनी- आजारी वाटते अशा गोष्टींमधे कोणी कितीही जवळचा असला तरी कोणी मत विचारल्याशिवाय आणि मी एखाद्याच्या आयुष्यात माझ्या सल्ल्याने खरंच काही बदल होऊ शकतो अशी खात्री वाटली तर मी एखाद्याला सल्ला देईन, नसता कोणाच्या आयुष्यात मला दखल देणे गरजेचे वाटत नाही. तसंही कोणाच्याही सल्ल्याला काहीच किंमत नसते असं माझं मत आहे. जालावरील अशी प्रबोधन किती प्रामाणिक असतात त्यावर विश्वास नसल्यामुळे (आपल्याबद्दल नाही) अशा मताला-विचारांना काहीच किंमत नसते. '' स्वतःची कुठलीही शारीरिक, मानसिक , वैचारिक बैठक बदलण्याची इच्छाच मूळात कुणालाही नसते. ज्यांना असते ते आपापला मार्ग बरोबर शोधतात. अस कुणाचाही सल्ला वगरै ऐकत बसत नाहीत. लीमाउजेट च्या वरील दोन ओळीतून बरंच काही सांगितल्या गेलं आहे. दारु या व्यसनाच्या निमित्तानं लेखनातला पूर्वार्ध एकदम उत्तम होता पण पुढे तो घसरल्यासारखा वाटतो. आता हे असं का वाटतं हे मला कोणी कितीही खोदून खोदून विचारलं तरी ते मला कोणालाही सांगायचं नाही. मेरी मर्जी. बाकी, चालू द्या. -दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर Sun, 06/03/2012 - 17:13
लेखातील आदर्शवादी विचार आणि उदात्त हेतू मनाला पटतो पण प्रत्यक्षात कितपत अमलात आणता येईल ह्या बद्दल साशंकता आहे. माणसे दोन प्रकारात जर विभागली, १) त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून विचार करू शकणारी आणि २) स्वतःच्याच विचारात वाहून जाणारी तर पहिल्या प्रकारातील माणसे शक्यतो व्यसनाच्या आहारी जात नाहीत पण काही तात्कालिक कारणाने (जसे कोणा प्रिय व्यक्तिचा मृत्यू, व्यावसायिक अपयश तसेच अपरंपार यश, इप्सित ध्येयप्राप्ती इ.इ.) जरी व्यसनाकडे झुकली तरी त्यांचे योग्य ते समुपदेशन करून त्यांना पुन्हा मार्गावर आणता येते. पण दुसर्‍या प्रकारातील व्यक्ती स्वतःच्याच विचारांमध्ये वाहून जायच्या प्रवृत्तीच्या असल्याने दूसर्‍यांच्या विचारांना त्यांच्या जीवनात काही महत्त्व नसते. त्या आपल्या कृतीचे सोयिस्कर असे समर्थन शोधून स्वतःच्या व्यसनाला गोंजारत बसतात. अशी माणसे कोणाच्या सल्ल्याने (अगदी डॉक्टरच्याही) बदलत नाहीत तर व्यसनातून उद्भवणार्‍या शारीरिक क्लेषांना झाकण्यासाठी पुन्हा व्यसानाचाच आधार घेतात. ते स्वतःला जगापासून वेगळे करतात. त्यांची सुटका फक्त मृत्यूच करू शकतो. अशी माणसेही व्यसनमुक्त होऊ शकतात. पण फार फार विरळा. त्यांची स्वतःची योग्य विचार करण्याची यंत्रणा सुरू झाली (चमत्कार), आपलं चुकतंय हे जाणवलं आणि चुक सुधारण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तर आणि तरच अशी माणसे व्यसनमुक्त होऊ शकतात. पण पुन्हा, तीही स्वतःच्या विचारांनी. कोणाच्या सल्ल्याने नाही. स्वभावावर औषध नाही असे म्हणतात.'चिंता' आणि 'संशयाचे भूत' ह्या दोन मानसिक व्याधीही कुटुंबाचा सत्यानाश करू शकतात. ह्यासाठीही त्यांची स्वतःची योग्य विचार करण्याची यंत्रणा सुरू झाली (चमत्कार), आपलं चुकतंय हे जाणवलं आणि चुक सुधारण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तर आणि तरच ती बदलू शकतात. मानसोपचार तज्ज्ञ कदाचित मदत करू शकत असतीलही. पण त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची भेट घेणं, औषधोपचार करून घेणं ह्यासाठी मानसिक तयारी त्या 'रुग्णा'लाच करावी लागते. त्यासाठी आपण 'रुग्ण' आहोत हे स्विकारावे लागते. तेच स्विकारले नाही तर बाहेरचे सल्ले फोल ठरतात उलट 'मला वेडा समजतात' ह्या विचारांनी माणूस अजून कोषात जाऊन इतरांशी त्याचा संवाद संपर्क तुटतो. मनाला महासागराची उपमा दिली आहे. त्याच्या तळाशी काय चाललेलं असतं ते कधी कधी त्या व्यक्तिलाही कळत नाही. महासागरात मोती असतात तसेच अक्राळ विक्राळ जलचर प्राणीही असतात. त्याप्रमाणेच मनांत दडलेले स्वभाव सौंदर्याचे नमुने असतात तसेच अनेक जीवघेण्या व्याधीही असतात. कधी उपाय करता येतात तर कधी कधी त्या व्याधी त्या व्यक्तीला संपवून टाकतात. इतरांच्या हाती त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करणं एवढंच असतं. तो प्रयत्न आपण नेहमीच करत असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

वाटाड्या... Mon, 06/04/2012 - 22:04
फारच छान..अगदी मनातलं बोल्लात...पण शेवटी एकच म्हणावसं वाटतय...उम्मेद पे दुनिया कायम है..शेवटी व्यसन कुठलंही( काही अपवाद वगळतां) वाईटच...पण कोणाला त्यातुन बाहेर काढण्याची हौस सोडु नये... - वाट्या

मन१ Sun, 06/03/2012 - 19:45
चिंता पोचली. स्पष्ट लिहिल्याबद्दल कौतुक वाटलं.

दारू पिणे आणि त्याचे व्यसन असणे ह्यातही दोन प्रकार आहेत मान्य की दारू नियमितपणे पोटभरून पिणे हे शरीराला अपायकारक आहे. पण समाजातील प्रतिष्टीत मंडळी अगदी सिनेजगतातील अनेक मान्यवर अनेक वर्ष दारूची साथ लाभून सुद्धा आपल्या सामाजिक आर्थिक व व आरोग्याची स्थिती संभाळून समाजात वावरत असतात. तर एखद्या गरीब गरीब घरातील मनुष्य परिस्थितीला हार जाऊन दारूला शरण जातो. त्याचा मात्र दारू निकाल लावते. दारू आपण कोणत्या उद्देशाने आणि कशी पीत आहोत ह्यावर सुद्धा बरेच काही अवलंबून असते. उदा सिने सृष्टीतील कुत्ते कमीने असे पडद्यावर म्हणणारा ७० वर्षीय तरणाबांड म्हातारा आजही मदिरा नित्यनियमाने भरपेट पितो. मात्र कसरत व आहार व जीवनाकडे व दारूकडे पाहण्याचा निकोप दृष्टीकोन त्याला अजूनही ह्या वयात गब्रू जवान ठेवतात. आपला आहार व शारीरिक व्यायाम असेल तर दारू शरीराला सोसते. नियमित पिणाऱ्या लोकांचे सामाजिक , सार्वजनिक जीवन पाहून माझे हे मत बनले आहे. पण दारू कडे आयुष्याकडे पळवाट किंवा निराशावादी जीवनाला दारूची साथ लाभली की दारू ही गरज बनते. माणूस दारू पितो इथपर्यंत ठीक आहे पण दारूने माणसाला प्यायला सुरवात केली की आयुष्य खडतर बनते. चाळ नावाची वाचाळ वस्ती मध्ये चंदू पारखी ची दारू सोडवण्यासाठी सर्व चाळकरी माणसे त्यांच्या आयुष्यात इंटरव्हेन्शन करतात. आणि त्याची दारू सुटते. भारतीय समाज हा जास्त एकसंघ व कुटुंब प्रधान व समाजाला विशेतः आपल्या कम्युनिटी मधील लोक काय विचार करतील ह्याचा विचार करून आपले सामाजिक वर्तन ठरवतो. उदा मुलाने शिक्षण कोणते घ्यावे असे अनेक निर्णय तो आपल्या कम्युनिटी चा ट्रेंड पाहून ठरवतो. तेव्हा दारू पिण्याच्या समस्येवर गुर्जीचा उपाय निदान भारतात तरी चांगाच कारगीर ठरेल सोनाराने कान टोचलेले चांगले असतात भारतात काय नि मिपावर सोनारांना तोटा नाही. वानगीदाखल यक्कू ला पहा त्याच्या गुप्तकाशी च्या धाग्यावर त्याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कितीतरी सोनारांनी कान टोचले आहेत.

अमितसांगली Mon, 06/04/2012 - 10:19
व्यसनांच्या आहारी गेलेल्यांसाठी उपाय - विश्रांतवाडी पुणे येथे 'मुक्तांगण' व्यसनमुक्ती केंद्र आहे. तिथे आपलेपणाने सिगरेट, दारू, ड्रग्ज ते इंटरनेट अशा सर्व प्रकारच्या व्यसनांवर उपचार केला जातो. पण या संपूर्ण प्रोसेस मध्ये रूग्णाची व्यसन सोडायची इच्छाशक्ती खूप महत्वाची असते........अधिक माहितीसाठी मोदक यांना व्यनी करा.

मन१ Mon, 06/04/2012 - 16:31
काहिंना दारु न पिण्याचही व्यसन असतं की काय?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवती Mon, 11/19/2012 - 21:22
हे खरं आहे. पण आपण बरेचजण एकमेकांना जालावरच ओळखत असतो म्हणून सहसा पोहोचण्याचा प्रयत्न केला जात नाही. शी! काहीतरी विचित्र वाटतय. जे शक्य होतं पण झालं नाही हा विचार फार त्रासदायक आहे.

In reply to by रेवती

ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार नाही असं आपण मानतो, हे काही खोटं आहे असं नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्याच अखत्यारित अधिकारांचं उल्लंघन करावं का? शारीरिक व्याधी असणार्‍यांकडे आपण सहानुभूतीने पहातो, मानसिक व्याधी असणार्‍यांना अशीच वागणूक देत नाही. मानसोपचार आणि ते घेणार्‍यांकडे बघण्याची आपली दृष्टी मधुमेहाबद्दल आहे, तशी होणार का? यकु गेला. आपण त्याबद्दल आता काहीही करू शकत नाही. निदान पुढच्या वेळेस तरी ...

In reply to by रेवती

ओळखत नसतो, आपला तेवढा अधिकार नाही असं आपण मानतो, हे काही खोटं आहे असं नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्याच अखत्यारित अधिकारांचं उल्लंघन करावं का? शारीरिक व्याधी असणार्‍यांकडे आपण सहानुभूतीने पहातो, मानसिक व्याधी असणार्‍यांना अशीच वागणूक देत नाही. मानसोपचार आणि ते घेणार्‍यांकडे बघण्याची आपली दृष्टी मधुमेहाबद्दल आहे, तशी होणार का? यकु गेला. आपण त्याबद्दल आता काहीही करू शकत नाही. निदान पुढच्या वेळेस तरी ...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बंडा मामा Tue, 11/20/2012 - 01:48
झोप उडाली. सगळी रात्र जागावे लागणार ह्या विचाराने आता. त्या आत्मशुन्याशी संपर्क झाला का. त्याचीही अशीच भिती वाटते आता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषिकेश Tue, 11/20/2012 - 10:49
अगदी समहत.. हाच विचार सारखा डोक्यात येतोय.. ही बोच घेऊनच सगळ्यांनाच पुढे जावं लागणार आहे :(

श्रावण मोडक Mon, 11/19/2012 - 21:23
पूर्वीची चर्चा येथे पूर्ण दिसत नाही. त्यामुळे संदर्भहीन ठरणारे असे धागे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फाट्यावर मारून मागे टाकले जावेत. ते वर येणार नाहीत अशी व्यवस्था करावी, ही विनंती.

In reply to by श्रावण मोडक

रेवती Mon, 11/19/2012 - 21:27
हा धागा वर काढण्याची विनंती अदितीकडून झाली होती. धागा पूर्ववत, म्हणजेच पूर्ण दिसणारा करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतोय. सदयांनी एकमेकाला नावे न ठेवण्याचे ठरवले तर असे धागे चालून जावेत. निदान गेलेल्या माणसाच्या बाबतीत तरी हे ठरवण्यास हरकत नसावी.

अर्धवटराव Mon, 11/19/2012 - 23:03
वेळ निघुन गेल्यानंतर दु:ख व्यक्त करत बसण्यापेक्षा आवश्यक तिथे असे इंटर्व्हेन्शनचे प्रयत्न नक्कीच फलदायी असतात. गुर्जी झिंदाबाद. अर्धवटराव