असीर करके हमें क्यों रिहा किया सैयाद,
वो हमसफीर भी छूटे, वो बाग भी न मिला।
-'जलाल' लखनवी
एकटेपणाचे दु:ख अफाट असते आणि ते ओझे खांद्यावर घेउन आयुष्यभर वणवण भटकण्याची शिक्षा मृत्युपेक्षाही भयानक. लखनवी च्या शायरीमधला पक्षी म्हणुनच पारध्याला (सैयाद) म्हणतो आहे " बाबा रे कधी काळी मला कैद (असीर) केले होतेस ते होतेस पण आता असे एकट्याला सोडुन का देतो आहेस? जिथुन कैद केले होतेस ती बाग तर आता कोसो दूर आहे आणि ज्यांच्यासाठी जगायचे ते कोणी आसपास उरलेले नाही. (त्यापेक्षा सरळ मारुनच का टाकेनास?)
लखनवी च्या पक्ष्याचे आयुष्य नशीबी आलेली व्यक्ती म्हणजे महाभारतातला अश्वत्थामा. हा म्हणे जन्मल्या जन्मल्या घोड्यासारखा खिंकाळला म्हणुन याचे नाव अश्वत्थामा. आयुष्य पण याला घोड्यासारखे मिळाले. जन्मभर उभे राहण्याची शिक्षा दिल्यासारखे. एका ठिकाणी विश्रांती नाही. ज्याला अंत नाही आणि ज्याचा ठाव नाही अश्या रस्त्यावर चालत रहायचे. कपाळावरची भळभळणारी जखम तशीच घेउन. दारोदारी तेल मागत फिरायचे. मिळाले तर ठीक अन्यथा तो भेसूर एकटेपणा उराशी कवटाळुन पाय खुरडत चालत रहायचे. अमरत्वाचे वरदान म्हणायचे की एकटेपणाचा शाप? शापच तो. अमरत्वाचा गोडवा गोंजारण्यासाठी मनाला लागते ती शांती ते सौख्य उरलय कुठे? ते संपले रणांगणावरच. पित्याच्या मृत्युबरोबरच. कदाचित त्याच्याही आधी. नाही कदाचित पित्याच्या मृत्युबरोबर नाहितर घटोत्कचाला युद्धात अभयदान देउन "बाळा मागे फिर. माझ्यापुढे तुझा टिकाव नाही लागायचा" असा आपुलकीचा सल्ला देणारा यौद्धा एकाएकी एका परिवाराचा निर्वंश करण्यासाठी एवढा कृर होइल? अजुन न उमलेल्या कळीवर, एका गर्भावर मृत्युचे सावट सोडेल?
गर्भावर सोडलेल्या त्या एका अस्त्राने द्रोणांच्या या पोराला कायमस्वरूपी खलनायक ठरवुन टाकले. १८ दिवसांच्या त्या युद्धात कितीतरी हिडीस कृत्ये घडली. दुसर्याच्या आडुन बाण मारले गेले, मागुन बाण सोडुन हात छाटले गेले, ध्यानस्थ, पदस्थ यौद्ध्यांच्या माना छाटल्या गेल्या, गुऋचे ऋण त्याच्या जटा ओढुन मान कापुन फेडले गेले, भक्ष्यावर अनेक गिधाडे तुटुन पडावीत तसे अनेक यौद्धे कोवळ्या वीरांवर तुटुन पडले. पण या सर्वाची परमावधी गाठली गेली भृणहत्येने. ज्यावेळेस रणात धारातर्थी पडलेल्या यौद्ध्यांची कलेवरं गिधाडे लुचत होती तेव्हा त्याहुन घ्रूणास्पद कृत्य या भावी व्यासाकडुन घडावे याहुन मोठे दुर्दैव नाही. जी कल्पना कधी नियतेनेही केली नव्हती ते घडले.
अर्थात ज्याची कल्पना नियतीने केली नसेल अश्या बर्याच गोष्टी अश्वत्थ्याम्याने केल्या. एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेउन धर्म मात्र कधीच ब्राह्मणाचा जपला नाही. लहानपणापासून त्याला शास्त्रापेक्षा शस्त्र जास्त जवळचे वाटले. एक घोट दूधासाठी तहानलेला जीव तो. वाचेच्या बळावर अन्न मिळत नाही पण तलवारीच्या पात्यावर धन मिळते हे त्याला लहानपणीच कळाले. त्यातही पिता साक्षात परशुरामांकडुन अस्त्र विद्या शिकलेला, सर्व अस्त्रे जाणणारा. पुत्रावर अंमळ थोडे जास्तच आंधळे प्रेम असणारा. असेच आंधळे प्रेम हस्तिनापुरच्या युवराजाला त्याच्या आंधळ्या बापाकडुन मिळाले आणि अश्वत्थामाला त्याच्या बापाकडून. कदाचित हाच समान धागा पकडुन दोघांनीही एकमेकांना अंतापर्यंत साथ दिली.
युद्धात दुर्योधनाच्या बाजूने प्राणपणाने लढलेला हा एकमेव वीर. भीष्म दोलायमान तर द्रोण शत्रुलाच पक्षपाती, कर्णाला नुकत्याच गवसलेल्या ओळखीने संभ्रमात टाकलेले तर शल्य तर बोलुन चालुन शत्रुचाच आप्त. दुर्योधनाचा केवळे एक सेनापती त्यासाठी जीव ओतुन लढला आणी तो म्हणजे अश्वत्थामा. इतरांनी दुर्योधनासाठी लढताना प्राण दिले. कदाचित त्याच्या ऋणातुन मुक्त होणासाठी किंवा जिवंत राहुन पांडवांना हारवण्याऐवजी जीव देउन मध्यम मार्ग स्वीकरण्याचे आमीष स्वीकारुन. अश्वत्थामा मात्र लढला. भीष्म युद्धाआधी म्हणाले होते "हा आपल्या प्राणांना घाबरतो". माणूस असण्याचेच लक्षण आहे ना ते? मरणाला सगळेच घाबरतात. आणि कपटाने आपल्या आप्तांचे आपल्या गुरुचे बळी देणारे लोक समरात असताना आपल्या प्राणांची क्षिती बाळगणे अयोग्य थोडीच आहे? पण रणांगणावर दुर्योधनाच्या बाजूने लढणार्या त्या तमाम यौद्ध्यांमध्ये प्राणांची तमा बाळगुनही शिर हातावर घेउन लढणार्यात अश्वत्थामाही मागे नव्हताच की. काहितरी पळवाटा शोधुन शत्रुला मारणे टाळुन मृत्युला कवटाळण्याची अहमहिका लागलेला तमाम तथाकथित एकनिष्ठांच्या मांदियाळित केवळ राजाच्या चरणी आपल्या निष्ठा वाहुन मरु किंवा मारु या भूमिकेतुन लढलेला तो एकमेव तर होता.
कर्णाकडे अमोघ कवचकुंडले होती तर अर्जुनाकडे अमोघ अस्त्रे आणि अक्षय भाते पण केवळ युध्द्शास्त्रातल्या सर्वोत्तम ज्ञानाच्या आधारे २ अक्षौहिणीहुन जास्त सैन्य कापुन काढणार अश्वत्थामा अजेयच म्हणायचा. आख्या द्रुपद आणि पांडव कुळाला त्याने एका रात्रीत कापुन काढले. रात्रीत भक्ष्यावर हल्ला करणार्या घुबडाला बघुन म्हणे याला प्रेरणा मिळाली. पण हीच वृत्ती तुमच्या आमच्यात सगळ्यांच्यातच नाही का? रणांगणावर ध्यानस्थ बसलेल्या भुरिश्रवाला मारणार्या सात्यकी मध्ये ती नव्हती का? पुत्रशोकात मग्न असलेल्या निरस्त्र पदाती गुरुच्या जटा धरुन "थेरड्या मर आता" म्हणणार्या दृष्ट्यद्युम्नात ती नव्हती काय आणि त्यावर टाळ्या पिटुन हसणार्या भीमात नव्हती काय? कोवळ्या अभिमन्युवर एकत्र चाल करुन जाणार्या इतर ५ महारथ्यांमध्ये ती नव्हती काय? शत्रुची एक वीतभर भूमी मिळवण्यासाठी रात्र आणि दिवस न बघता समोरच्यावर चाल करुन जाणार्या आजच्या लष्करशहांमध्ये ती नाही आहे काय?
अश्वत्थ्यामाचा हा माणूस बनण्याचा प्रवास लहानपणीच सुरु झाला. पोटात वन्हीने असंगाशी संग करण्यास प्रवृत्त केले. आणि मग पित्याची सबुरीची शिकवण योग्य न वाटता कपटकारस्थानांची क्षात्र वृती योग्य वाटु लागली तर त्यात नवल ते काय? एकदा सख्य अधर्माशी केले की मग धर्माची वाट दाखवणारे हजारो भेटले जरी तरी काय उपयोग?
न आने दिया राह पर रहबरों ने,
किये लाख मंजिल ने हमको इशारे।
-'अर्श' मल्सियानी
महाभारतातला अश्वत्थामा हा असा आहे. मित्राच्या जीवाला जीव देणारा. वेळप्रसंगी नामोहरम यौद्ध्याला देखील दया दाखवुन परत पाठवणारा. महापराक्रमी पण उतावीळ. नारायणास्त्र, ब्रह्मशीर अस्त्र अशी सर्व मार्ग खुंटल्यावर वापरायची अस्त्रे त्याने बिनदिक्कत वापरली. संयम, सहनशीलता, प्रेम, नीरक्षीरविवेकबुद्धी या ब्रह्मचारी गुणांचा अभाव असुनही ब्रह्मशीर वापरले. मग ते परत घ्यायची ताकद होती कुठे? बर ते वळवले दूसरीकडे तेव्हासुद्धा अपमानाचे शल्य अजुन बाकी होते, सूडाचा विखार अजुन धगधगत होता. समस्त पांडवस्त्रियांच्या गर्भावरच त्याने हल्ला चढवला. पोटातले जीव मारले, सुवासिनींची प्रजननक्षमता मारली. आंधळा अहंकार आणि सूडाच अतिरेक जेव्हा मानवाच्या मनाचा ताबा घेतो तेव्हा त्याच्यातला राक्षस जागा होतो. अश्वत्थामा माणूसच होता पण त्याचा अंताला राक्षस झाला. तो परिणाम युद्धाने घडवला की शत्रुने हे गौण ठरते कारण क्रौर्यात पण बूज राखण्यात शत्रु यशस्वी ठरला पण अश्वत्थामा मात्र क्रौर्याची परिसीमा गाठुन मोकळा झाला.
म्हणुनच कृष्णाने त्याचा मणी काढुन घेतला. त्या मण्याच्या जागी झालेली भळभळती जखम घेउन अश्वत्थामा आजही हिंडतो आहे, कलीयुगाच्या अंती कलीला मदत करुन व्यासपदी पोचण्यासाठी आजही धडपडतो आहे. अमरत्वाचा शाप घेउन पाठीवर अपराध्याच्या कुबड्या वागवत, उषःकालाच्या प्रतिक्षेत... त्याचा धड ना सूड पुर्ण झाला ना आयुष्याचा फेरा
न इधर के रहे, न उधर के रहे,
न खुदा ही मिला, न विसाले-सनम।
सदसदविवेकबुद्धी, संयम, प्रेम जिव्हाळा गमावलेला प्रत्येक व्यक्ती असाच फिरत असतो, दिशाहीन, अर्थहीन, द्रुष्टीक्षेपात नसणार्या एका ध्येयाच्या शोधार्थ स्वतःच्या विश्वात असीर (बंदीवान) झालेला. बघा तुमच्यात एखादा अश्वत्थामा नाही ना दडलेला?
वेगळाच लेख आहे, मृत्युंजया.