Skip to main content

दुसरे महायुद्ध.....भाग-४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 18/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरे महायुद्ध भाग - १ दुसरे महायुद्ध भाग - २ दुसरे महायुद्ध भाग - ३ फिनलँड चे युद्ध. २४ ऑगस्ट १९३९ साली झालेल्या रशिया-जर्मन तहांच्या अटींने स्टॅलिनला उत्तर इटलीमधे अनिर्बंध अधिकार मिळाल्यामुळे त्यांनी लगेचच या संधीचा फायदा उचलला. स्टॅलिन आणि नाझी यांच्यामधे तह झालेला असला तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो या तत्वाला जागून स्टालिनने जर्मनीच्या भविष्यातील संभाव्य हल्ल्यापासून लेनिनग्राडचे संरक्षण करण्यासाठी फिनलॅंडचे आखात रशियाच्या युद्धनौकांसाठी निर्धोक करण्याची योजना आखली. या आखाताच्या उत्तरेचा किनारा फिनलॅंडचा होता आणि दक्षिणेचा इस्टोनियाचा. यांच्या विरोधाला न जुमानता हे प्रयत्न जारी ठेवण्यात आले. लॅटिव्हिया, इस्टोनिया आणि लिथुआनिया या छोट्या देशांवर दादागिरी करून त्यांना एका तहात भागीदार बनविण्यात आले आणि काही महत्वाच्या जागी लाल सैन्याला तैनात करायचे हक्क मिळवण्यात आले. १९४० साली शेवटी त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आलीच. तिन्ही बाजूला ताकदवान रशियाने वेढलेल्या या देशांना गप्प बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते पण फिनलॅंडची गोष्ट वेगळी होती. फिनलॅंडची सेना तुलनेने रशियाच्या सेनेपेक्षा कमी असली आणि दोन्ही देशाची सीमा मोठ्ठी असली तरी फिनलॅंडच्या वाटेला जायचे धाडस या वेळी रशियाने केले नाही. त्याच वर्षी स्टॅलिनने फिनलॅंडच्या प्रतिनिधीला मॉस्कोला रशियाच्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी बालोवले. फिनलॅंडने देशातील सोशल डेमॉक्रॅटीक पार्टीच्या अध्यक्षाला या कामासाठी पाठवले. या माणसाचे नाव होते व्हाईनो टॅनर. व्हाईनो टॅनर. हा एक आडमूठा, समोरच्यांचे ऐकून न घेणारा, रक्तपाताची तमा न बाळगणारा पण कावेबाज नाही असा माणूस होता. थोडक्यात तो अशा चर्चा करण्यासाठी योग्य माणूस नव्हता आणि स्टॅलिन आणि मोलोटोव्हशी तर नाहीच नाही. देश पणाला लागलेला असताना या माणसाला या चर्चेसाठी नियुक्त केलेले बघून जगभर आश्चर्य व्यक्त करण्यात आले. पण हा चर्चेला गेल्यावर फिनलॅंडने आपले सैन्याच्या हालचाली करायला सुरवात केली. इकडे चर्चेदरम्यान स्टॅलिनने फिनलॅंडकडे खालील मागण्या केल्या – १ केप हॅंकोवर तीस वर्षासाठी नौदलाचा तळ स्थापन करण्यासाठी भाडे करार २ उत्तर ध्रुवाच्या जवळचे पेटासॅमो नावाचे बंदर ३ त्या आखातातील तीन छोट्या बेटांचा ताबा. ४ कारेलिना येथे फिनलॅंडची सीमा रेषा अजून मागे हटविणे. आत्ता ती स्टॅलिनग्राडपासून फक्त १५ मैल होती. या वेळी चर्चेदरम्यान स्टॅलिन म्हणाला “ भुगोल ना मी बदलू शकतो ना तुम्ही. मला लेलिनग्राडचे संरक्षण करावे लागणार आहे. मी लेनिनग्राड हलवू शकत नाही पण आपण सीमारेषा हलवू शकतो” या बदल्यात रशिया फिनलॅंडला रशियन कॅरेलियाच्या रिपोला आणि पोराकोरपीच्या आसपासचा २१३४ चौरस मैल भूभाग देऊन टाकणार होता. वरवर बघता हा सौदा काही वाईट दिसत नव्हता. पण युद्ध्नीतीचा विचार केला तर स्टॅलिन जे भुभाग आणि सवलती मागत होत्या त्या बघता फिनलॅंडच्या स्वातंत्र्यावर केव्हाही गदा येऊ शकली असती. फिनलॅंडने या अटी स्विकारण्यापेक्षा युद्धाचा पर्याय स्विकारला. फिनलॅंडचा प्रतिनिधी टॅनर याने त्याच्या आणि स्टॅलिनच्या मेन्शेव्हिक भुतकाळाचा उल्लेख करून भावनिक आवाहन करायचा भाबडा प्रयत्नही केला पण त्याचा उपयोग झाला नाही. (रशियाची जी “रशियन सोशल डेमॉक्रेटीक लेबर पार्टी” होती तिच्या लेनिन व मार्टॉव्ह या दोन प्रमुख नेत्यांमधले वाद विकोपाला गेल्यावर त्यांचे दोन गट पडले जे बहुमतात होते त्यांना म्हणत – बोल्शेव्हिक आणि अल्पमतात जे होते त्यांना म्हणत मेंशेव्हिक. या दोनही रशियन शब्दाचा अर्थही तोच होतो.) २८ नोव्हेंबरला फिनलॅंडबरोबर पूर्वी झालेला अनाक्रमणाचा करार स्टॅलिनने कचर्‍याच्या टोपलीत फेकला आणि दोनच दिवसांनंतर युद्धाची कसलीही घोषणा न करता हेलसिंकीवर विमानांनी हल्ला चढवला. पाठोपाठ रशियाच्या १० लाखांच्या सैन्याने फिनलॅंडवर जमिनीवर हल्ला चढवला. आपल्या भूमीचे संरक्षण करण्याची फिनलॅंडच्या सैन्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हे युद्ध १०५ दिवस चालले. याला अधुनिक थर्मोपाईल अशी जी उपमा अनेकानी दिली ती खरोखरच योग्य म्हणावी लागेल. एका अजस्त्र कम्युनिस्ट शक्तीने एक छोटा देश गिळंकृत करण्यासाठी केलेले आक्रमण सारे जग निमुटपणे बघत होते. सगळा स्वार्थी कारभार ! फिनलॅंडकडे होत्या पायदळाच्या तीन डिव्हिजन्स व या प्रत्येक डिव्हजनमधे होत्या फक्त ३६ तोफा आणि त्यासुद्धा संग्रहालयात ठेवण्याच्या लायकीच्या. सोबतीला काही विमाने बस्स ! त्यांच्याकडे एक चांगले शस्त्र होते ते म्हणजे त्यांचे प्रसिद्ध सुओमी ९ एम.एम मशीन पिस्तोल. एका इतिहासकाराने त्या युद्धाचे वर्णन करताना म्हटले “ त्यांच्याकडे देशप्रेम, शिस्त आणि लढण्याचे धैर्य याशिवाय काहीही नव्हते” . त्याच्या विरूद्ध रशियाच्या पायदळाने हे आक्रमण १५०० रणगाडे, ३००० विमाने यांच्या सहाय्याने केले. पोलंडवर ज्या प्रमाणे त्यांनी विजय मिळवला होता त्याच प्रमाणे त्यांना याही विजयाची खात्रीच होती . लाल सैन्याने चार ठिकाणी हे आक्रमण करायचे ठरवले होते. ७ व्या आणि १३ व्या पायदळाला करेलिअन इस्थमसवर हल्ला करून फिनलॅंडच्या सेनेनी उभ्या केलेल्या मानर्हेम संरक्षणफळीला खिंडार पाडून व्हिबॉर्ग (व्हीपूरी) नावाचे दुसर्‍या क्रमांकाचे शहर काबीज करायचे होते. त्याचवेळी ८ वे पायदळ लागोडा तलावाच्या उत्तर काठावरून खाली उतरून याच शहरावर उत्तरेकडून हल्ला चढवणार होती. ९ व्या पायदळाला फिनलॅंडचा जो मधला चिंचोळा भाग आहे तेथे आक्रमण करून फिनलॅंडचे दोन तुकडे करायचे होते तर अतीउत्तरेकडे १४ व्या पायदळाला पेटासॅमो आणि नौत्सी नावाची दोन महत्वाची शहरे ताब्यात घ्यायचा आदेश होता. हे झाल्यावर फिनलॅंडचा उत्तरध्रूव समूद्राशी असणारा संपर्कही तुटणार होता. या सर्वकष युद्धव्युहाचे वर्णन एका लष्करी इतिहासकाराने “कल्पक, लवचिक पण वास्तवाशी पूर्णपणे फारकत घेणारे” असे केले. १४ व्या पायदळाने त्यांना नेमून दिलेले लक्ष पहिल्या १० दिवसातच पूर्ण केले पण पुढच्या दोन महिन्यात रशियन सेनेची आगेकूच रखडली. ७ व्या पायदळाला ज्याच्यात ७ इंन्फंट्री डिव्हिजन्स, ३ रणगाड्याच्या ब्रिगेडस, चिलखती गाड्यांची एक ब्रिगेड होती यांना त्या मानर्हेम फळीतून मुसंडी मारताना भयंकर अडचणी आल्या. एक तर घनदाट जंगल, काटेरी तारांची भेंडोळी आणि कुंपणे, योग्य ठिकाणी उभी केलेली तोफांची ठाणी, रणगाडाविरोधी “ड्रॅगन टीथ” चे जाळे, (खाली याचे चित्र दिले आहे. हे १/२ मिटरचे कॉंक्रीटचे दात एका अखंड कॉंक्रिटच्या पायावर उभे केलेले असतात. हा पाया २ मिटर जमिनीत खोल पुरलेला असतो, म्हणजे जमिनीखालून कोणी बोगदे खणून त्यातून जाऊ शकत नसे. मैलोन्‌मैल याच्या रांगा पसरलेल्या असायच्या. मागच्या रांगांची उंची जास्त असायची आणि मधे मधे ज्या जागा सोडल्या जायच्या त्यात, भूसुरूंग पेरलेले असायचे. या रांगामधून छद्मावरणीत कॉंक्रीटचे पिलबॉक्स असून ते अशा रितीने उभे केलेले असत की शत्रूचे सैन्य त्यांच्या गोळीबारात सहज सापडत असत. हे मुख्यतः रणगाड्यांना अडथळे म्हणून उभे केले जायचे.) ड्रॅगन टिथ या सगळ्यावर मात करणारे, त्वेषाने लढणारे फिनलॅंडचे सैनिक. यांच्याशी सामना करताना त्यांच्या नाकीनऊ आले. बर्फ गोठून इतका टणक झाला होता की रशियन सैन्याला खंदक खोदण्यासाठी अगोदर सुरुंगाचा वापर करावा लागे. फिनलॅंडच्या सेनेनी आजपर्यंत रणगाड्याचा सामना केला नव्हता, त्यांच्याकडे रणगाडाविरोधी कसलीही अस्त्रे नव्हती. त्यांनी रशियन सेनेकडून ती काबीज केल्यावर त्यांना ती वापरायचे ज्ञान झाले. पण याने डगमगून न जाता त्यांनी रणगाड्यांसाठी पेट्रोल बॉंबचा परिणामकारक वापर केला. त्यांनी त्याला हेटाळणीने मोलोटोव्हचे नाव दिले आणि तेच आता रुढ झालेले आपल्याला आढळते. मोलोटोव्ह कॉकटेल : या पेट्रोलबॉंबचा उगम स्पॅनिश सिव्हील वॉर मधे आहे. त्या काळात जेव्हा रणगाडे पायदळाच्या सोबतीने जात नसत, तेव्हा रणगाड्याच्या अगदी जवळ जात हे बाँब रणगड्यांच्या चाकावर फेकण्यात येत. त्याच्या बरोबर एक ब्लॅंकेटही फेकण्यात येई. ते ब्लॅंकेट त्या पट्ट्यात एकदा अडकले की खूप वेळ जळे आणि त्यातील चाकांच्या रबरी धावा वितळवून टाके. रेसिपी पाहिजे आहे का? मोलोटोव्ह कॉकटेल फिनलॅंडच्या त्या घनदाट जंगलात, लवकर अंधार पडायचा आणि त्यात या रणगाड्यांचा या मोलोटोव्ह कॉकटेल्सनी चांगलाच समाचार घेतला. रशियाच्या विरूद्ध चाललेल्या या लढाईचा नायक होता फिनलॅंडचा ७२ वर्षाचा सेनानी फिल्ड मार्शल बॅरन कार्ल फॉन मानर्हेम. फॉन मानर्हेम. याच्याच नावाने ती संरक्षक फळी ओळखली जाते. फिल्ड मार्शल बॅरन कार्ल फॉन मानर्हेमने आपली राखीव सेना दक्षिणेकडे एकवटली होती आणि त्याने रशियन सेनेच्या पुढच्या हालचालींचा बरोबर अंदाज बांधला होता. यालाही एक कारण होते. फिल्ड मार्शल बॅरन कार्ल फॉन मानर्हेमने रशियन झारच्या अधिपत्याखाली पहिले महायुद्ध लढले होते त्यामुळे त्याला रशियाच्या संपूर्ण युद्धनीतीची चांगलीच कल्पना होती. मुख्य म्हणजे रशियाचा असा अंदाज होता की फिनलॅंडचा कम्युनिस्ट पक्ष रशियन सेनेचे मुक्तिवाहिनी म्हणून स्वागत करेल पण जेव्हा सबंध फिनलॅंड त्यांच्या विरुद्ध उभा ठाकला तेव्हा रशियन सेनेला आश्चर्याचा धक्काच बसला. सगळ्यात जास्त हाल झाले ते मध्य फिनलॅंडमधे आक्रमण करणार्‍य रशियाच्या ९ व्या पायदळाच्या ५ डिव्हिजन्सचे. नकाशावर जरी हा चिंचोळा भाग आक्रमकांना सोयीचा वाटत असला तरी प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती भयंकर होती. घनदाट जंगले, त्यातील पाण्याची तळी यांनी रशियन सेनेला ठरावीक मार्गच वापरायला लावले, त्यामुळे शत्रूला घातपाती कारवाया करायला त्यांच्या हालचालींचे अचूक अंदाज बांधता येऊ लागले. त्यातच तापमान उणे ५० सेल्शियसवर घसरल्यावर त्यांचे फार हाल झाले. फिनलॅंडच्या सीमेवर पोहोचणासाठी लेनिनग्राड-मरमान्स्क या रेल्वे मार्गावर फक्त एकाच ठिकाणी फाटा होता त्यामुळे पुरवठ्यावर अत्यंत ताण आला. रशियन फौजांनी साला नावाचे छोटे शहर घेतले पण त्यांना लगेचच तेथून माघार घ्यायला लागली. फिनलॅंडच्या जनतेने रशियन फौजांना अत्यंत कडवा प्रतिकार केला. त्यांनी त्यांची शेते जाळली, घरे जाळली आणि रशियन सैन्याच्या उपयोगी पडेल अशी एकही वस्तू उभी ठेवली नाही. सगळे नष्ट केले. आपले स्किईंगचे सामान, कसब, आणि त्या प्रदेशाची माहिती याच्या बळावर त्यांनी मार्गावर ठिकठिकाणी सुरुंग पेरले ज्याच्यावर लवकरच बर्फाने आपली दुलई पसरली. बर्फात सहज ओळखू येऊ नये म्हणून त्यांनी पांढरेशूभ्र कपडे घालून घातपाती कारवाया केल्या ज्याला प्रचंड यश मिळाले. या तुकड्यांना लवकरच “पांढरे यमदूत” म्हणून ओळखले जाऊ लागले. पांढरे यमदूत दक्षिणेला रशियाच्या १६३ आणि ४४ या डिव्हिजन्सचा तर सुओमुस्साल्मी नावाच्या गावाजवळ नाश झाला. दुसर्‍या महायुद्धात जी अनेक युद्धे कडवेपणाने लढली गेली आणि युद्धव्युहासाठी ओळखली जातात त्यात या युद्धाची गणना करायला हरकत नाही, नव्हे केलीच जाते. हे मच्छीमारांचे व लाकूड तोड्यांचे २०० उंबरठ्यांचे गाव ९ डिसेंबरला रशियाच्या १६३-रायफल डिव्हिजनने काबीज केले होते पण फिनलॅंडच्या ९व्या ब्रिगेडने, ज्याचा प्रमुख होता कर्नल यालमार सिलासपूओ, या डिव्हिजनला वेढले आणि तिचा दक्षिणेकडचा मार्ग रोखला. सहज विजय मिळणार असे गृहीत धरून बरचसे रशियन सैन्य त्या भागात तसेच म्हणजे हिवाळी कपड्याविना पाठवण्यात आले होते. त्यांच्याकडे योग्य बूटही नव्हते. गंमत म्हणजे फिनलॅंडच्या सैन्याला हे सगळे रशियन बिनतारी संदेशाद्वारे जे संभाषण चालले होते त्यावरुन कळाले. ते संभाषणही सांकेतीक भाषेत न करता रशियन सैन्याने तसेच केले होते हेही एक आश्चर्यच म्हणायला हवे. दोन आठवड्यानंतर भयंकर अवस्थेत काढल्यानंतर ख्रिसमसच्या दिवशी रशियन सैन्याचे अवसान गळाले आणि ते उत्तरेला गोठलेल्या किआंतायार्व्ही नावाच्या तलावावरून पळाले. फिनलॅंडने हे बघून दोन ब्रिस्टॉल ब्रेनहेम जातीची दोन विमाने पाठवून त्या गोठलेल्या तलावावरील बर्फ उध्वस्त केला. वरच्या बर्फाला तडे गेल्यावर रणगाडे, घोडे, माणसे, ट्रक्स हे सगळे त्या थंडगार पाण्याच्या तळाशी गेले. (ते अजूनही तेथे आहेत असे गमतीने म्हटले जाते, पण ते खरेच तेथे आहेत). रशियाची ४४वी डिव्हिजन जी या डिव्हिजनच्या मदतीस आली होती त्यातील सैनिक या भीषण आपत्तीच्या हाकेच्या अंतरावर होते आणि त्यांना बुडणार्‍या सैनिकांचा आक्रोश ऐकू येत होता पण त्यांना तेथून न हालण्याचा हुकूम होता. हेही सैन्य नववर्षाच्या संध्याकाळी पारा शुन्याच्या खाली ३० सेल्शियस गेल्यावर, “पांढर्‍या यमदुतांच्या” कारवाईस बळी पडले. फिनीश सैन्याने जेवणाच्या वेळेच्या अगोदर एक दोन तास रशियन सैन्यावर सतत तोफा चालवून त्यांना गरम अन्न मिळणार नाही याची व्यवस्था केली आणि त्यांनी उष्णतेसाठी शेकोट्या पेटवल्यावर ते फिनीश स्नायपरच्या गोळ्यांना बळी पडू लागले. त्यातच रशियन सैनिकांची बोल्ट रायफल चालेना कारण त्यातील वंगणासाठी वापरलेले तेल -१५ सेल्शियस तापमानालाच गोठू लागले. ज्या मोठ्या गाड्या होत्या त्या परत न चालू होण्याच्या भीतीने दिवसरात्र महागडे इंधन वापरून चालू ठेवाव्या लागल्या. त्या अरुंद रस्त्यांवर असे एखादे वाहन बंद पडल्यावर तो रस्ता वाहतुकीसाठी बंद व्हायचा आणि ती वाहनांची रांग मग शत्रूसाठी आयतेच लक्ष व्हायची. फिनलॅंडचा एक जनरल कर्ट वालेनियस म्हणाला “आम्ही त्यांना विश्रांती घेऊ देत नाही, झोपू देत नाही. हे युद्ध त्यांची शक्ती आणि आमची बुद्धी यांच्यातील आहे”. रशियाच्या ४४-डिव्हिजनच्या सैनिकांना आता सगळ्यात जास्त गरज झोपेची होती आणि ती त्यांना मिळणे अशक्य होते. सतत चालू ठेवावा लागणार्‍या गाड्यांचा आवाज, उधळणारे घोडे आणि खेचरे, फिनलॅंडच्या स्नायपरांचा अचूक गोळीबार एवढेच नाही तर जिवनरस गोठताना होणारा मोठमोठ्या झांडांचा कडाडणारा आवाज या सगळ्यांनी त्यांच्या झोपेचे पार मातेरे करून टाकले. कितीही व्होडका प्यायली तरी सुरवातीला वाटणारी उब नष्ट होऊन ती गोठवणारी थंडी हाडात मुरायला लागायचीच. छोटीशी जखम जरी उघडी पडली तरी ती वरून गोठायची आणि आत गॅंग्रीनचे जंतूंचा शिरकाव झाला तरी कळायचे नाही. ५ जानेवारी पर्यंत १००० रशियन सैनिक युद्धकैदी झाले ७०० निसटून परत रशियन हद्दीत आले तर २७००० सैनिक मृत्यूमुखी पडले. या सगळ्याच्या बदल्यात फिनलॅंडने आपले फक्त ९००च्या आसपास सैनिक गमावले. एक फिनलॅंडचा अधिकारी म्हणाला “या थंडीत लांडग्यांना अन्नाचे दुर्भिक्ष जाणवणार नाही जसे जसे फिनलॅंडच्या सैन्याने रशियन सैन्याचा प्रतिकार थंड पाडला तसे तसे गोठलेल्या प्रेतांचे ढीग वाढायला लागले…… रशियाचा एक गोठलेला सैनिक तापमान = -४० युद्धविषयक लिहायचा कंटाळा आल्यामुळे आता हे लिखाण बंद करत आहे. जरा ललितकडे वळावे म्हणतो-जमेल तसे.... जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14268
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

तुम्ही काहीही लिहा, क्वालिटी अॅश्युअर्ड! ;-) या भागात युद्धाशी संबंधित खूपच मनोरंजक आणि नवी माहिती मिळाली. दोन्ही बाजूंनी सैन्यशक्ती कितीही जमवली तरी त्या दोघांचा निसर्ग हा तिसरा शत्रु जसा दिसला ते मस्तच ! असं लेखन जालावर सहज उपलब्ध असण्‍यापेक्षा त्याचं सिरीयस रिडींगसाठी पुस्तक झालं तर खूप आनंद होईल, म्हणजे ते फक्त जालावरच रहाणार नाही.

In reply to by यकु

हे ज्या पुस्तकाचर आधारित आहे, त्या लेखकाशी बोलणे झालेले आहे. पण मलाच खात्री नसल्यामुळे लिहावे की नाही या विचारात आहे.....१००० पाने.....:-)

In reply to by मुक्त विहारि

"जयंतकाकांचे लेख प्रेते फार" अशी म्हण पडायला नको.....:-) :-) खरेच युद्धांवर लिहून कंटाळा आला आहे.....

In reply to by जयंत कुलकर्णी

"जयंतरावांचे लेख अन वाचक्/श्रोते फार" अशी म्हण ऑलरेडी रूढ झाली आहे. युद्धावर लिहायचा कंटाळा आला असेल तर दुसरे काही लिहा, पण लिहिते रहा.

In reply to by तिमा

अगदी अगदी. "मी जर डॉन असतो तर..." असा निबंधाचा विषय नसल्याने बोलत नाहीये ;)

In reply to by जयंत कुलकर्णी

अहो लोक दोन्ही बाजुन्नी बोलतात.... आपण चान्गली बाजु बघावी.....(...म्हण्जे आपल्याला योग्य असेल ती..) आणि.... जर लिहायचा कन्टाळा आला असेल तर....पुस्तकाचे नाव जरी सान्गितले तरी चालेल...(मला पुस्तकाचे नाव मिळाले तरी चालते...)

In reply to by मनराव

स्टॉर्म ऑफ वॉर..... जरूर वाचा..म्हणजे मी पुढे लिहायचे ठरवले तर मला तुमचा उपयोग करून घेता येईल....

फिनलंडच्या लढ्याबद्दल वाचून फार बरं वाटलं. तुम्हाला सतत हे रक्तपात, लढाया याबद्दल लिहून कंटाळा आला असेल, तर जरूर विश्रांती घ्या. दुसरं काहीतरी लिहाल तोपर्यंत आमची काही तक्रार नाही!

ललितही लिहा. तेही अवश्य वाचले जाइलच. वाट पहातोय.

वाचनाची चांगली लिंक लागली होती.. :-( एक सुचवू का..? इतिहासातील एक एक घटना घेवून त्यावर लिहायला सुरू करा.. बर्‍याच ऐतीहासीक घटना आहेत (बर्लीन वॉल).. कमांडो ऑपरेशन्स आहेत (Wrath of God).. संशोधन / विज्ञानातील टप्पे आहेत.. (रोनॉल्ड रॉस ने लावलेला लसीचा शोध, न्यूटन च्या समोर पडलेले सफरचंद..) ललीतच लिहायचे तर चार्ली चॅप्लीनचे चरित्र आहेच (पण शेवटी खूप अंतर्मुख व्हायला होते. :-(). अलिकड्च्या दशकातील कांही घटना आहेत.. (बिल गेट्स वर चाललेला खटला) असे वेगवेगळे विषयांवर ही लिहा.. (तुमचा फ्यान) मोदक

मार्ग आहे. युद्धविषयक लिहायचा कंटाळा आल्यामुळे आता हे लिखाण बंद करत आहे. जरा ललितकडे वळावे म्हणतो-जमेल तसे.... नाही पटले. युद्धविषयक लिखाणाची ज्याला आवड आहे तो या विषयाला कधी कंटाळत नाही. हे ज्या पुस्तकाचर आधारित आहे, त्या लेखकाशी बोलणे झालेले आहे. पण मलाच खात्री नसल्यामुळे लिहावे की नाही या विचारात आहे.....१००० पाने..... हे काही पटले नाही बुवा. जसेच्या तसे छापायचे असेल किंवा भाषांतर करायचे असेल तर लेखकाची परवानगी लागते. एखाद्या लेखाचा किंवा लेखमालेचा संदर्भ म्हणून वापरायला नाही. असा लेख/लेखमाला ही त्या पुस्तकाची फुकटची जाहिरातच ठरते. तेव्हा ही लेखमाला जरूर पूर्ण करावी अशी नम्र विनंती.

In reply to by सुधीर कांदळकर

. युद्धविषयक लिखाणाची ज्याला आवड आहे तो या विषयाला कधी कंटाळत नाही.
सहमत आहे युद्धस्य कथा रम्य:' माझ्या मते कुलकर्ण्यांना मागे एकदा त्यांच्या लेखमालेत वाचक कमी झाल्याच्या घोर लागला होता. व हा मनीचा सल त्यांनी प्रतिसादात बोलून दाखवला होता त्यांना त्यांच्या आवडत्या विषयावर साहित्यिक वैराग्य आले. त्यांना त्यांचे वाचक अगदी मी सुद्धा लिहित रहा अशी आर्जवे करत आहोत. तेव्हा लवकरच आपण सर्व वाचक वर्ग त्यांचे हदय परिवर्तन घडवून आणू अशी आशा करतो

In reply to by निनाद मुक्काम …

अहो निनाद, तुमचे वाचून कोणाला वाटेल की मी म्हणजे कोणी मोठा लेखक आहे ..... मी एक साधासुधा माणूस आहे आणि मनात येईल ते येथे लिहितो हे मात्र खरे.....असो. बाकीचे लिहिणार आहेच ना....... सर्वांचे माझे लेखन आवडते हे कळवल्याबद्दल आभार मानतो.

असे मध्यभागी कोणी बंद करते का?????? अहो दोन्ही चालू ठेवा........ दुसरे महायुद्ध तुमच्या लिखाणातून वाचताना फार भेदक वाटते. ललित वगैरे सुद्धा लिहा पण त्यासाठी हे बंद नका करू

ओ जयंत कुलकर्णी काका.........असं चांगलं वाचायची सवय लावुन उगाच मालिका अर्धवट सुडुन गेलेलं खपणार नाय..... हि मालिका पुर्ण झालिच पाहिजे...

सहजच Enemy at the gates मधील अनेक प्रसंग डोळ्यासमोर आले.

तरी आमच्या इतिहासाच्या बाई सांगायच्या, 'इतिहासाचं पुस्तक अभ्यासाचं म्हणून वाचू नका, गोष्टीचं असल्यासारखं वाचा.' पण धड्याखाली असणार्‍या प्रश्नांमुळे आणि बाईंनीच दिलेल्या गृहपाठामुळे अभ्यासाशिवाय कशासाठीच इतिहासाचं पुस्तक उघडलं नाही. त्यामुळेच तो फारसा लक्षातही राहिला नाही. आज अभ्यासाच्या टेंशनशिवाय वाचायला इतिहासही किती मनोरंजक वाटतो!