Skip to main content

जशी रंग बोटांवर ठेवून... - ४

जशी रंग बोटांवर ठेवून... - ४

Published on गुरुवार, 08/03/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
जशी रंग बोटांवर ठेवून... - १ जशी रंग बोटांवर ठेवून... - २ जशी रंग बोटांवर ठेवून... - ३ पितृपक्षाचा पंधरवडा सुरु झाला होता. त्यामुळे पितृपक्षाचे पंधरा दिवस, नंतर नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी असा अजूनही जवळपास एक महिना जाणार होता. दिवाळी येण्याची वाट पाट पाहणे एव्हढंच अश्विन करु शकत होता. नाही म्हणायला तो अधूनमधून मॅट्रीमोनी साईटवर लॉगिन करत असे श्रेयाला एकतर ऑनलाईन किंवा नुकतीच ऑफलाईन झालेली पाहून उसासा टाकत असे. एक दिवस सहज म्हणून त्याने श्रेयाला "हाय, हाऊ आर यू?" एव्हढा एका ओळीचाच मेसेज केला. आणि काय आश्चर्य, श्रेयाने चक्क त्याला उत्तरही दिलं. त्यानंतरही दोन तीन वेळा त्याने श्रेयाला मेसेज केले. तिनेही लगेच रीप्लाय केले. याचा अश्विनला अर्थातच आनंद झाला होता. परंतू एका गोष्टीचं त्याला वाईटही वाटत होतं, ते म्हणजे श्रेया स्वतःहून कधी मेसेज करत नव्हती. दसर्‍याचा दिवस उजाडला. रात्री ऑनलाईन टाईमपास करत उशिरा झोपल्यामुळे अश्विनने उठायलाही उशीर केला. नेहमीच्या सवयीनूसार त्यान डोळे चोळत, आळोखेपिळोखे देत मोबाईल पाहिला. आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क श्रेयाने त्याला दसर्‍याच्या शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला होता. अश्विनच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानेही पटकन रीप्लाय केला. अजून दोन तीन दिवस असेच गेले. रविवारी संध्याकाळी तो सहज म्हणून मित्रासोबत तलावपाळीला फीरायला गेला. इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा सुरु असतानाच मोबाईलने दोनदा बीप केलं. आता कुणाचा बरे मेसेज आला म्हणून पाहतो तर काय, चक्क श्रेयाने मेसेज केला होता. कसा आहेस, काय करतोयस, आई बाबा कसे आहेत असे दोन तीन प्रश्न विचारले होते तिने. अश्विनला तिथेच आनंदाने बेभान होऊन नाचावसं वाटत होतं. त्याचं स्टॅटीस्टीकल अ‍ॅनालिसिस अचूक ठरल्यात जमा होतं. श्रेयाने स्वतःहून मेसेज करुन त्याची, त्याच्या घरच्यांची चौकशी करणे याचाच दुसरा अर्थ होता, श्रेया आणि तिच्या घरच्यांनी अश्विनला होकार दिला होता. आता तिच्या घरच्यांनी दिवाळीत ठाण्याला त्याचं घर पाहायला येणं ही केवळ औपचारीकता होती. अश्विन तर चक्क हवेत तरंगत होता. त्याने मॅट्रीमोनी प्रोफाईलवरुन डाऊनलोड केलेले श्रेयाचे फोटो टक लावून पाहत होता. मनात तिच्यासोबतच्या आयुष्याची स्वप्नं पाहत होता. एव्हाना त्याने तिला एकदा संध्याकाळच्या वेळी फोनही केला होता. ती ही मनमोकळेपणाने बोलली होती. आणि कशी कोण जाणे कुठेतरी माशी शिंकली. त्यानंतर अश्विनने केलेल्या मेसेजना श्रेयाने रीप्लाय करणं बंद केलं. काहीतरी गडबड आहे हे अश्विनला जाणवलं. तिनं आपल्या मेसेजला रीप्लाय न करण्यासारखं आपल्याकडून काही झालं का याचा विचार अश्विन करु लागला. पण तसं काहीच झालं नव्हतं. शेवटी न राहवून अश्विनने तिला मेसेजमधून अगदी स्पष्ट शब्दांत "काही झालंय का? माझं काही चुकलं का?" असं विचारलं. त्याच मेसेजमध्ये त्याने तिला हे हे समजावण्याचा प्रयत्न केला की मोकळेपणाने बोलणं हा कुठल्याही नात्याचा पाया असतो. या मेसेजला मात्र श्रेयाने उत्तर दिलं, की तसं काही नाही. घरी थोडं टाईल्सचं काम चालू असल्यामुळे त्याच्या मेसेजेसना उत्तर देणं तिला जमलं नाही. अर्थात तिच्या या उत्तराने अश्विनचे समाधान झाले नाही. दिवाळी झाल्या झाल्या श्रेयाची माणसे ठाण्याला त्याचं घर पाहायला येण्याआधी त्याने पुण्याला जाऊन तिला भेटून या सगळ्या गोष्टींचा उलगडा करायचे ठरवले. अगदी कुठल्या दोन दिवसांची सुट्टी घ्यायची, किती वाजताच्या शिवनेरीने पुण्याला जायचं याचंही प्लानिंग त्याने केलं. दिवाळी एक दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. दिवाळीला पुण्यात श्रेयाला भेटायला जाणे शक्य नव्हतं. ते ठीकही दिसलं नसतं, म्हणून अश्विनने एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलवरुन तिच्या घरी दिवाळीची भेट पाठवली. पण या भेटीची ना त्या ऑनलाईन पोर्टलकडून डीलीवरीची पोच मिळाली, ना श्रेयाने त्याबद्दल काही मेसेज केला. शेवटी न राहवून अश्विननेच त्या ऑनलाईन पोर्टलच्या कस्टमर सर्विसला फोन केला. आपला ऑर्डर क्रमांक दिला आणि डीलीवरीसंबंधी विचारणा केली. त्यांनी ती ऑर्डर डीलीव्हर केली आहे असं सांगितलं, रिसिव्ह कुणी केली असं विचारलं असता श्रेया असं नाव सांगितलं. क्षणभर अश्विनला काही सुचेना. काहीतरी गडबड आहे. श्रेयाला घातलेल्या मागणीचा आणि नंतर घडलेल्या घटनांचा एकदा नव्याने विचार करण्याची गरज आहे हे त्याला जाणवलं. बाकी काहीही असो, श्रेयाने ते गिफ्ट रिसीव्ह केल्यानंतर त्याचे आभार मानणारा निदान दोन शब्दांचा तरी मेसेज पाठवायला हवा होता असं त्याला राहून राहून वाटत होतं. या झाल्या प्रकारावरून पुढे काय होणार याचा अंदाज अश्विनला आला होता. त्याचं मॅट्रीमोनी प्रोफाईल्स संदर्भातलं स्टॅटीस्टीकल अ‍ॅनालिसिस जरी अगदी अचूक ठरलं असलं तरी त्याच्यावरुन पुढे काय होईल याबद्दलचा अश्विनचा अंदाज पार चुकला होता. श्रेया अजूनही मॅट्रीमोनी पोर्टलवर अधूनमधून ऑनलाईन असायची म्हणजे अजूनही अश्विनपेक्षा उजवं स्थळ सापडलं नव्हतं. पण श्रेयाने हल्ली हल्ली ज्या पद्धतीने वागत होती त्यावरुन श्रेयाच्या घरचे अश्विनलाही होकार देतील अशी अजिबात शक्यता वाटत नव्हती. अश्विनने आपल्या दिवाळीनंतर श्रेयाला भेटायला जायचा विचार निकालात काढला. कशाला जायचं, असं तो स्वतःलाच विचारू लागला होता. तिचे आई बाबा शिक्षक आहेत, आजी निवृत्त मुख्याध्यापिका आहे, आणि अशा सुशिक्षीत लोकांनी हे असं "स्थळाचं पॅरलल प्रोसेसिंग" करावं हे त्याला अजिबात पटलं नव्हतं. पण तरीही ते सारे मागच्या जनरेशनचे आहेत, आपल्या उच्चशिक्षीत, उच्चपदस्थ आणि चांगला पगार घेणार्‍या मुलीला चांगला मुलगा नवरा म्हणून मिळावा या भावनेने असा स्वार्थी विचार त्यांनी केला असेलही. पण श्रेयाला कळत नाही का? ती तर आजच्या पीढीची आहे. आपल्याला कुणी मुलगा लग्नासाठी मागणी घालून गेला आहे, तो आपल्यात हळूहळू गुंतत चालला आहे याचं भान तिला असायला नको का? काही कारणास्तव तिचा किंवा तिच्या घरच्यांचा अश्विनला नकार असेल तर तिने त्याची घरच्यांशी चर्चा करुन ठामपणे काहीतरी निर्णय घ्यायला नको का? असे एक ना अनेक विचार अश्विनच्या डोक्यात पिंगा घालू लागले. दिवाळी संपली. उत्तर काय येणार हे माहिती असूनही अश्विनने बाबांना श्रेयाच्या घरी फोन करायला सांगितलं. यावेळीसुद्धा श्रेयाच्या आईने कधी येणार आहात ठाण्याला या प्रश्नाला "आमचं अजून काही ठरलं नाही" असंच उत्तर दिलं. त्याच्या आई बाबांना असं काहीतरी होऊ शकेल असा अंदाज आधीच आला होता. श्रेयाच्या उलट सुलट वागण्याने अश्विनही मानसिकरीत्या या निर्णयासाठी तयार झाला होता. त्यामुळे मनातून कितीही वाईट वाटत असलं तरी, श्रेया हा विषय त्याने तिथेच संपवला होता. अगदी "नेमकं काय झालं असेल" हा मनात वळवळणारा किडाही त्याने झटकून टाकला. ... आणि आता अचानक त्याच्या वाढदिवसाला श्रेयाचा मेसेज आल्याने त्या आठवणी मनाचे कप्पे उलगडून बाहेर पडत होत्या. कॉलेजमध्ये कधीतरी ऐकलेली ती चारोळी त्याला आता आठवत होती, काही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- संपली कथा. अर्थात ही कथा नसून सत्यकथा आहे हे एव्हाना मायबाप वाचकांच्या लक्षात आले असेलच. काही जास्तच संवेदनशील चेतना असलेल्या साहित्यिक सरंजामदारांनाही हे ही कळले असेल की सार्‍या कथा या कथा नसतात, तर काही कथा सत्यकथा असतात. आणि सत्यकथांचा शेवट सहसा "आणि मग शेवटी समेत होऊन शेवट "जिलेबी" सारखा गोड होतो..आणि ह्या कथानकात अनेक जन आपल्याला पाहून मोरपीस अंग्वरून फिरवल्याचा आनंद लुटतात..." असा होत नाही हे ही त्यांना जाणवले असेल. असो. मागच्या तीनेक वर्षांत "फ्लॅट पाहावा घेऊन आणि स्थळ पाहावे शोधून" या म्हणीचा आम्ही चांगलाच अनुभव घेतला. अर्थात फ्लॅटची भानगड आम्ही "तिकडे" असल्यामुळे नात्याने सख्ख्या काकीचा सख्खा भाऊ असलेल्या आमच्या एका जिवलग मित्राने निस्तरली. मात्र स्थळ पाहणे या गोष्टीने आमची दोन वर्ष अगदीच वाया घालवली नसली तरी दोन वर्ष घेतली म्हणायला हरकत नाही. या दोन वर्षांत आम्हाला तर्‍हेतर्‍हेचे अनुभव आले. याच वेळी आमचे इतरही काही मित्र मांडवाखालून जायच्या तयारीत होते. आणि त्यांचे अनुभवही अगदी मासलेवाईक होते. उपरोल्लिखित अनुभव असाच एका मित्राचा अनुभव आहे. समदु:खी असल्याने त्या तीन महिन्यांमधील प्रत्येक "डेव्हलपमेंट"बद्दल तो आम्हाला सांगत असे. हा अनुभव लिहिताना आम्ही अस्मादिकांचेच दैनंदिन जीवन कथेच्या वातावरण निर्मितीसाठी वापरले. त्यामुळे आम्हाला वैयक्तिकरीत्या ओळखणार्‍या आमच्या सृहदांना ही आमचीच गोष्ट आहे असं वाटणं साहजिक होतं. त्यामुळेच कथेमध्ये विमे, वल्ली आणि अन्याने प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे पुण्याचे ठाणे, अमेरिकेचे ऑस्ट्रेलिया आणि आय टेनचे स्विफ्ट डीझायर केले आहे असे वाटेल. अर्थात ही कुणाची कथा आहे याने वस्तूस्थितीत फारसा फरक पडत नाही. "पॅरलल प्रोसेसिंग" हा आजच्या लग्न जमवण्याच्या प्रोसेसमधील एक भाग झाला आहे. आणि ते कधी मुलाकडून तर कधी मुलीकडून होतं. आणि मग "समोरच्या पार्टीला" त्याचा नाहक ताप होतो. बाकी या कथेत कुणाचं चुकलं हे ते तुमचं तुम्हीच ठरवा.
लेखनप्रकार

याद्या 7269
प्रतिक्रिया 36

प्रत्येक घोडं गंगेतच न्हालं पाहिजे असे नाही. यमुना कावेरी गोदावरी तापी नर्मदा तुंगभद्रा कृष्णा कोयना वेण्णा सतलज बियास रावी तवी मुळा मुठा भीमा इथे न्हायले तरी चालते

फार मोठी शिकवण पण अंमळ १० वर्षे उशीरा मिळाली, असो. कथा छान जमवली होती. मागच्या एका भागावर एक प्रतिसाद दिलेला होताच. असो, आता हा झाला ३ वर्षातला एक अनुभव, इतर अनुभवांबद्दल ही लिहा.

छान लिहिलीस कथा. ५० रावांशी बाडिस. पुढचे अनुभव पण येऊ द्यात आता.

सगळे भाग एका दमात वाचले ... मुलगी/वधूपक्ष झुलवत आहे आणि मुलगा आस्ते कदम डेस्पो होत चालला आहे/होता असे वाटते.

या भागात शेवट केल्याबद्दल प्रथम धन्यवाद! ;-) ठरवून लग्न करण्याच्या पद्धतीचा बाजार झाला आहे हे अनेक वेळा अनेकांनी म्हणून झाले आहे. आता या बाजारात "परचेस ऑप्शन" वगैरे सारखे कायदेशीर मार्ग यायला हवेत की काय असा विचार मनाला शिवून गेला. असो. तुमच्या मित्राचा बहुमोल वेळ वाया गेला याबद्दल सहानुभूति आहेच, पण असं एक-दोनदा पाहिलेल्या मुलीत गुंतणे बरोबर नाही असेही वाटून गेले. बरं, गुंतला तर गुंतला मग त्यावरही काहीच कृती केली नाही. "प्रेम कर भिल्लासारखं.." ही कविता वाचली नव्हती वाटतं त्याने. एवढा मुलीचा मोबाईल नंबर असताना सरळ फोन करून "हालेदिल" ऐकवण्यात काय अडचण होती? की तुमचा मित्रही 'तितकासा शुअर' नव्हता? :) असो. चूक-बरोबर कोणीच नाही, बडे-बडे बाजारोंमें ऐसी छोटी-छोटी बातें होती ही रहतीं हैं|

In reply to by नगरीनिरंजन

पण असं एक-दोनदा पाहिलेल्या मुलीत गुंतणे बरोबर नाही असेही वाटून गेले पूर्णपणे सहमत. बाकी अनुभव कथन छाना केलतं. अमृत

छान लीहीलेस धना :) मला माझ्या भावाच्या लग्न जमवण्याच्या वेळेस मुली पहायला जायचो ते दिवस आठवले मी अन त्याने मिळुन त्याचे प्रोफाईल ४-४ साईटवर क्रिएट केले होते रोज आमचा रात्री १२ पर्यन्त हाच उद्योग चालायचा मेसेज चेक कर ,लिस्ट चेक कर ,नविन कोण जॉइन झालेय का ? अन कधी त्याला नाइट शिफ्ट असली की तो हापिसात बसुन प्रोफाईल चेक करायचा अन मला घरी आल्यावर सान्गायचा अरे अमुक अमुक अशी मुलगी आहे वैगेरे वैगेरे ........ एकदा अशीच आमच्या शहरातल्याच एका मुलीचा फोटो अन प्रोफाइल त्याला अन मला दोघानाही आवड्ले , पण जीचा फोटो होता ती पेड मेम्बर नव्ह्ती अन तिचा काही कॉन्ट्क्ट नमबरही नव्हता साईटवर फक्त तीच नाव अन ती एका प्रख्यात कॉन्वेन्ट मध्ये टिचर आहे इतकच पण भावाला ती मुलगी आवड्ल्यामुळ शोधन भाग होत त्यावेळेस कीती शाळा पालथ्या घातल्यात उन्हातान्हात्,किती शाळाच्या बाहेर उभे राहिलोय, कीती लोकाना बन्ड्ला मारल्यात की मला ट्यूशन लावायची आहे म्हणूण ,बाप रे ,शेवटी कसा तरी तपास लागलाच ,एका शिपायाकडुण तीचा नम्बर घेतला अन लगेच कॉन्ट्क्ट केला ,नेमका दिलेला नम्बर तिच्या आइचा होता ,( आइ अन लेक एकाच शाळेत शिकवित होत्या) आइने मी बाहेरगावी असल्याच सान्गितल घरी जाउन मुलिच्या बाबाना विचारुन सान्गते अस उत्तर दिले ,पुन्हा दुसर्या दिवशी फोन केला तर मी थोडी बिजी आहे ,सन्ध्याकाळी सान्गते अस करुन ८- १० दिवस गेले आम्ही फोनची वाट पाहत बसलो ,बयेने काही फोन केला नाही ,भावाची निराशा झाली होती थोडि म्हनुन मीच हिम्मत करुन पुन्हा फोन लावला तर उत्तर मिळाले " आमच्या मुलीला एन्.आर्.आय मुलगा हवाय " म्हनुन बाकी बोलण तिथेच सम्पल " एक घाव दोन तुकडे न करता ताटकळ्त ठॅवल याचच ते वाइट वाट्ल बस्स !!! हे सगळ सगळ आठ्वल तुमच्या लेखामुळे भावाच लग्न झालय मागल्याच वर्षी :)अन "त्या " मुलीपेक्षाही सुन्दर अन सुस्वरुप वहीनी मिळालीइये मला ;)

कथा/अनुभव खूप छान सांगितली आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत होणारी मनस्थिती सुद्धा योग्य रितीने मांडली आहे. ती योग्य वेळेत संपवल्याबद्दल आणखी आवडली :) एकेकाळी स्वतः लग्नाच्या बाजारात असतानाचे आणि आता तिथे असणार्‍या नात्यातल्या मुलामुलींचे अनुभव बघून आमचे मतः लग्नाच्या बाजारात 'समोरच्या पार्टि'ला झुलवत ठेवून आपण सेफ झोनमधे राहण्याला जास्त लोक प्राधान्य देतात. यात मुलगा आणि मुलगी दोन्हीकडून सारखेच असते, फक्त आपण/आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक असे वागलेले आपल्या लक्षात येत नाही ;) स्पष्ट नकार दिलेला नसल्याने अपेक्षेनुसार कोणीच मिळाले नाही तर अश्या ऑप्शनला टाकलेल्या स्थळाकडे जायचा मार्ग मोकळाच राहतो. पण वेळकाढू उत्तरं, स्पष्ट बोलायला टाळाटाळ म्हणजेच नकार हे या बाजारतले प्रोटोकॉल्स आहेत. त्यामुळे लग्न ठरेपर्यंत त्या मुलीत (किंवा मुलात) न गुंतणे हे सर्वात महत्त्वाचे. अर्थात हे इथे लिहिणे जेवढे सोपे आहे तेवढे प्रत्यक्षात आचरणात आणायला सोपे नाही.

त्यावेळेस कीती शाळा पालथ्या घातल्यात उन्हातान्हात्,किती शाळाच्या बाहेर उभे राहिलोय, कीती लोकाना बन्ड्ला मारल्यात की मला ट्यूशन लावायची आहे म्हणूण ,बाप रे ,शेवटी कसा तरी तपास लागलाच ,एका शिपायाकडुण तीचा नम्बर घेतला अन लगेच कॉन्ट्क्ट केला
पूर्वी म्हणे मुलींच्या बापांना मुलीचं लग्न ठरवण्यासाठी जोडे झिजवावे लागायचे. हल्ली मुलांच्या बहिणींना सँडल्स झिजवाव्यात लागतात. कालचक्र उलटं फिरलंय म्हणा ना. ;)

In reply to by धन्या

पूर्वी म्हणे मुलींच्या बापांना मुलीचं लग्न ठरवण्यासाठी जोडे झिजवावे लागायचे. हल्ली मुलांच्या बहिणींना सँडल्स झिजवाव्यात लागतात. कालचक्र उलटं फिरलंय म्हणा ना. ह्या ह्या ह्या ........... कलियुग कलियुग ते हेच ;)

हल्लीच्या विवाहोत्सुक तरूणांची (स्वतः कोणतीही तडजोड न करता) बोह्ल्यावर चढण्याची वखवखलेली घाई आणि त्यामुळे होणारी मानसीक घुसमट छान व्यक्त केलिये!

अरे रे ...खेद जनक आहे तुमच्या दोस्ताची कहाणी.. असो... अर्ध्या हळकुंडाने पिवळे ...आपले ..एक -दोन समस ने प्रेमात एवढे गुलाबी होऊ नये हा धडा नक्कीच घेतला असेल तुमच्या फ्रेंड ने... बाकी होळीच्या दिवशी भरल्या पोटी पुरण पोळी सारखा गोड शेवट नाही झाला म्हणून पोटाला नाही तर मनाला नक्कीच बुरे वाटले..

कथेतल्या तपशीलावरुन मलाही ही सत्य घटना आहे असेच वाटत होते. अनुभव छान मांडला आहे, साध्या शब्दात, दैनंदीन वापरल्या जाणार्‍या भाषेत. :)

यातुन बोध घेउन पावले टाकावीत म्हणतो...

ती मुलगी झुलवतेय हे तुमच्या मित्राच्या उशीरा लक्षात आलं पण लक्षात आलं हे चांगलं झालं. मात्र आता ती मुलगी आपणहून संपर्क ठेवू पाहतेय, तर तुमचा मित्र विरघळेल की आपली चाल खेळेल याचा विचार करतेय. लग्न हा बाजार आहे खराच. सगळ्याच प्रकारचे ग्राहक आणि विक्रेते भेटू शकतात. हम्म. माझ्या एका कलिगच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीसाठी तो ३ वर्षं स्थळं शोधत होता. शेवट जावई सापडला तो ४ बिल्डिंग सोडून पलीकडच्या सोसायटीत म्हणजे तसा शेजारी रहाणाराच. अर्थात मुंबईत रहात असल्यामुळे त्यांनी एवढ्या वर्षात एकमेकाना कधी पाहिलेही नव्हते यात काही नवल नाही!

In reply to by पैसा

माझ्या एका कलिगच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीसाठी तो ३ वर्षं स्थळं शोधत होता. शेवट जावई सापडला तो ४ बिल्डिंग सोडून पलीकडच्या सोसायटीत म्हणजे तसा शेजारी रहाणाराच. अर्थात मुंबईत रहात असल्यामुळे त्यांनी एवढ्या वर्षात एकमेकाना कधी पाहिलेही नव्हते यात काही नवल नाही!
बडे बडे महानगरोंमे ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं. कभी मुंबई कभी पुणे ;)

In reply to by धन्या

पैसातै, असा बाण मारलाय ना की काही बोलायची सोय उरली नाही, तो बाण नुसता समोरच्या पक्षाच्या डोळ्यालाच नाय तर त्याच्यातल्या मोतिबिंदुला जाउन लागला थेट.

धन्या, आवडली लेखमाला.. कुठेही मेलोड्रामाटीक न होता अगदी वास्तव अनुभव चांगला मांडलाय..

हम्म्म... वाईट वाटले पण वर स्मिताने लिहिल्याप्रमाणे लग्नाच्या 'बाजारात' स्प्ष्ट होकार्/नकार देणे फारसे घडत नाही. एकदा नकार दिल्यावर पुन्हा त्या स्थळाकडे गेल्यास मानहानी, अपमान होतो असे कोणीच मानले नाही तर मात्र थोडा फरक पडेल. मुलाला/मुलीला न गुंतता राहणेही अवघड जात असावे.

हुरहूर असते हीच ऊरी सगळ्या भावना एकदम तरलपणे व्यक्त केल्या आहेस रे... अत्यंत नाजूक मनस्थिती तितक्याच तीव्रतेने कागदावर उतरली आहे. सुंदर लेखन. (बादवे - सखू बद्दल लिहीणारा धन्या हाच का..? ;-))

कथा आवडली. इनफॅक्ट कथा आवडली म्हणण्यापेक्षा त्या माध्यमातुन जे सांगायचे होते ते प्रभावीपणे पोहचले आहे हे जास्त आवडले. त्याहुन आवडलेली गोष्ट म्हणजे ह्यातुन कसलाही निष्कर्ष न काढता जे आहे ते समोर ठेऊन योग्य्/अयोग्य ठरवण्याची जबाबदारी त्या-त्यावर सोपवावी हा विचार आश्वासक वाटला. - छोटा डॉन

कथा फारच आवडली...पूर्णपणे एकरूप झालो होतो वाचताना...असाच अनुभव येईल असे सारखे वाटत आहे........

In reply to by अमितसांगली

असाच अनुभव येईल असे सारखे वाटत आहे........
दुर्दैवाने असे अनुभव येतात हे वास्तव आहे. अर्थात ते आपल्याबाबतीत होणार असेल तर वेळीच सावध होऊन "हो कींवा नाही" इतकं स्पष्ट उत्तर घेऊन आपण आपल्या वाटेला लागायचं. :)

प्रभावी झालयं कथन!शेवटी लग्नाच्या बाजारातले अनुभव!! "पॅरलल प्रोसेसिंग" उदाहरण डोळ्यादेखत पाहिलयं पण ते मुलाच्या पार्टीकडून केल जात होतं त्यात अशी मनं गुंतली नव्हती (म्हणजे भावनिक त्रास वाचला हो मुलीचा! ;) ) राग येतो शेवटी मग तो थोडा का असेना!

In reply to by पिंगू

इतकं स्पष्ट कळलं असेल तर खुप सोपं आहे. होकार किंवा नकार जे काही असेल ते स्पष्टपणे विचारायचं आणि मोकळं व्हायचं. :)