मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अफझलखान वध !!!

मालोजीराव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
युद्धाची पार्श्वभूमी आणि शिवरायांची धामधूम: शिवरायांनी शके १५७७ पौष महिन्यात जावळी जिंकली.हाती लागतील तेवढे मोरे कापले. चंद्रराव,हणमंतराव,बाजीराव,कृष्णराव या मोरे बंधूंना मारण्यात आले. पुढेमागे जावळीत गडबड होऊ नये म्हणून खबरदारी साठी जावळीच्या वरच्या अंगाला असलेल्या 'ढोपर्या ' डोंगरावर किल्ला बांधला,प्रतापगड ऎसे नाव दिले. नंतर जुन्नर आणि नगर कडे शिवरायांनी मोर्चा वळवला,बरीच धुमाळी झाली पण फारसे यश लाभले नाही.या भागात युवराज औरंगजेबाने नौसीर खान नावाचा सुभेदार ठेवला होता तसेच बंदोबस्तहि चोख होता त्यामुळे माघार घेऊन तहाची बोलणी करावी लागली.रघुनाथ बल्लाळ यांच्या हस्ते औरंगजेबाला पत्र पाठवले त्याचे उत्तर असे आले. "तुमच्या पेश्जीच्या गोष्टी विसराव्याजोग्या नाहीत, तथापि तुम्ही तुमच्या कृतकृत्यांचा पश्चाताप केला असे समजोन पूर्वकृत्य मनात आणत नाही " असे सांगून ५०० घोडेस्वार देत बादशाही नोकरीत आमंत्रित करत शिवरायांना ऑफर लेटर देऊन तो लगबगीने (शहाजहान आजारी असल्याने) उत्तरेस गेला .तरीसुद्धा जाताजाता त्याने मीर जुमला(शाही सरदार) व अली आदिलशाहास तंबी दिली कि "शिवाजीवर लक्ष ठेवा,तुमचे किल्ले त्याने बळकाविले आहेत ते सोडवा अथवा तुम्हास त्याच्या नोकरीची अपेक्षा असेल तर त्यास दक्षिणेस पाठवा". बादशहाची करडी नजर राहू नये म्हणून शिवरायांनी १६५९ जून मध्ये औरंगजेब गादीवर बसला तेव्हा सोनोपन्तांबरोबर एक अर्जदास्त राज्यारोहण प्रसंगी पाठवली त्यास उत्तर म्हणोन उंची पोशाख आणि उत्तर पाठवले. औरंगजेबाने दिलेली तंबी आदिलशहाने बरीच मनावर घेतली कारण बरेच सरदार दरबारात शिवरायांविषयी कागाळ्या करत यात अफझल आघाडीवर होता,वाई प्रांत आणि आसपासचा मुलुख सर्वात जास्त शिवरायांकडून प्रभावित होता...येथील वतनदार राजांच्या बाजूने फिरले त्यामुळे महसूल नीट येत नव्हता,तसेच राजांच्या सैन्याचा वारंवार त्रास होत असे.वळवाचा पाउस येतो तशी शिवाजीची माणसे येतात आणि जातात हाती कोणी लागत नाही त्यामुळे हे काम पत्करण्यास कोणीही तयार नव्हते.वाईचा सुभेदार म्हणून हि कामगिरी अफझलखानच्याच माथ्यावर आली तो कबूल हि झाला. मोहिमेला जाण्यापूर्वी तो आपल्या कोणी अवलिया फकिराला भेटायला गेला होता तेथे फकिराने त्यास अनिष्ट होईल असे सांगितले म्हणतात. स्वारीवर जाण्यापूर्वी निर्वाणीचे उपाय म्हणून त्याने आपल्या ६३ बायकांना जीवे मारले...हाच आकडा काहीजण २०० हि सांगतात नक्की माहिती नाही. स्त्रियांना मारायचे कारण असे कि आपल्या नंतर त्यांनी काही बदमामल करू नये किंवा दुसर्या पुरुषास आपले सुखाचा वारीस करून आपल्या नावास बट्टा लावू नये. या कबरी विजापूर जवळील अफजलपूर येथे पहावयास मिळतात. अफझलखानाचा मोहीम मार्ग विजापूर -तोरवे-डोन-माणकेश्वर-करकंवभोस-शंभू महादेव-मलवडी-रहिमतपूर (भोसले बखर मध्ये खान भिमतीरी होता असा उल्लेख आहे, खानाने तुळजाभवानी ची मूर्ती जात्यात भरडली,पांडुरंगाची मूर्ती फोडली असे बखरकार सांगतात परंतु त्यास तत्कालीन पुरावे नाहीत) अफझलखान हा १२-१५ वर्षे वाई चा सुभेदार होता,याने परगण्यातील कित्येत देवळांना,पुजार्यांना तसेच पूजेअर्चेसाठी सनदा दिल्याचे पुरावे आहेत.त्यातीलच एक हा वरील पुरावा. नरसोभट बिन रंगभट चीत्राऊ यास वडिलोपार्जित धर्मादाय सनद दिली...ती अफझलखानने पुन्हा नवी (renew) करून दिली ! युद्धानंतर कारागीर तुळजापूर ला पाठवून तुळजाभवानी प्रमाणेच मूर्ती प्रतापगडावर घडविण्यास महाराजांनी सांगितले होते,यावरून असे म्हणण्यास जागा आहे कि भवानीची मूर्तीला अपाय झाला नसावा. शिवराय आणि खानाची सरदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी केलेली मुत्सद्देगिरी: पांढरे,घाटगे,घोरपडे,इंगळे हे लोक तर खानच्या बरोबर होतेच त्या बरोबरच खानाने मोठी गौरवाची पत्रे लिहून मावळातील लोक आपल्या बाजूने वळविण्यास सुरुवात केली.शिळीमकर,जेधे ,बांदल,जगदाळे,धुमाळ इ. लोकास आपल्या हस्तका मार्फत आपल्या बाजूने घेण्यास सुरुवात केली.शीळींमकरांचा तंटा शिवाजीने सोडवला होता त्यामुळे ते २ भाऊ शिवाजीच्या बाजूने आले तर विठोजी नाईक खानच्या बाजूला गेला. तसेच मंबाजी भोसले ला खानाने ओढला तर बाबाजी भोसले ला चिठ्ठी लिहून शिवरायांनी बोलावून घेतले. अशी हि ओढाओढी दोन्ही बाजूने चालू होती पासलकर,ढोर (धुमाळ),मरळ,बांदल ,ढमाले यांना आपल्या बाजूने वळवून शिवाजीने त्यांस कडून शपथा घेतल्या ! क्रमश:

वाचने 14816 वाचनखूण प्रतिक्रिया 37

In reply to by प्रचेतस

मिपावरचे इंडीयाना जोन्स आले ;) येस्स मित्रा ... पण प्रतापगडामुळे हा भोरप्याही अजरामर झाला गड काय सुंदर आहे यार. मी पाहिलेल्या सर्व गडांत मला हा गड खूप आवडतो. अगदी मोक्याच्या ठिकाणी हा प्रतापगड आहे

In reply to by सागर

प्रचेतस 29/02/2012 - 21:53
अगदी अगदी पसरणी घाट चढल्यावर महाबळेश्वरातून लगेच उतरणारा तीव्र रडतोंडी घाट, जावळीचं घनदाट जंगल, मागे सह्याद्रीच्या खोल दर्‍या, समोर महाबळेश्वराचे खडे पहाड. युद्धशास्त्रीय दृष्ट्या अगदी अचूक ठिकाण निवडले होते महाराजांनी.

In reply to by प्रचेतस

मालोजीराव 01/03/2012 - 10:49
होय वल्लीशेठ भोर्प्याच असावा...खालच्या 'पार' गावाच्या लोकांच्या तोंडूनही हेच ऐकलं, जुन्या कागदपत्रात ढोपर्या उल्लेख आल्याने तसाच टाकला ! - मालोजीराव

अन्या दातार 29/02/2012 - 16:08
मागच्या लेखाचा आणि तुझ्या ज्ञानाचा, संदर्भांचा आवाका पाहता लेख खुपच छोटा वाटला रे! आणि ते क्रमशः पण खटकले.

In reply to by अन्या दातार

मालोजीराव 29/02/2012 - 16:16
अरे अन्या गडबड झाली ....चुकून 'प्रकाशित करा' दाबले गेले ....लेख मोठाच टाकायचा होता ! - मालोजीराव

प्रसाद प्रसाद 29/02/2012 - 16:42
सुंदर लेख आहे. स्वारीवर जाण्यापूर्वी निर्वाणीचे उपाय म्हणून त्याने आपल्या ६३ बायकांना जीवे मारले...हाच आकडा काहीजण २०० हि सांगतात नक्की माहिती नाही. स्त्रियांना मारायचे कारण असे कि आपल्या नंतर त्यांनी काही बदमामल करू नये किंवा दुसर्या पुरुषास आपले सुखाचा वारीस करून आपल्या नावास बट्टा लावू नये. ह्याविषयी माहित नव्हते, नव्याने कळले.

In reply to by प्रसाद प्रसाद

मृगनयनी 29/02/2012 - 19:44
अफझलखानाने त्याच्या ६३ बायकांची कत्तल केली... ६४वी बायको / बेगम मात्र खूप हुशारीने निसटली... या बद्दल काल- परवा "सकाळ " मध्ये वाचल्याचे स्मरते.- "सतीच्या कबरी" की असंच काहीसं हेडिन्ग होतं.... :)

In reply to by मृगनयनी

मालोजीराव 01/03/2012 - 11:51
या भागाला 'साठ कबरी' असेही म्हणतात ! काही जणांच्या मते त्याने आपल्या २०० बायकांना मारले...याला आधार असा कि आजूबाजूच्या शेतात सुद्धा अशाच प्रकारच्या कबरी पसरलेल्या आहेत...त्याही अफझल खानच्या बायकांच्याच आहेत असे स्थानिक गावकरी सांगतात. - मालोजीराव

गणेशा 29/02/2012 - 17:05
पुढे वाचण्यास उत्सुक . छान माहिती.. पुढील लिखानास शुभेच्छा ! आणि त्यात पुढचा ट्रेक प्रतापगडच असल्याने आनखिनच छान वाटले.

मालोजीराव 29/02/2012 - 17:07
वरील लेख चुकून 'पूर्वदृश्य' च्या ऐवजी 'प्रकाशित करा' दाबले गेल्याने अर्धवट आला आहे तसेच महाराजांचा काही ठिकाणी एकेरी उल्लेख आला आहे....त्याबद्दल क्षमा असावी... लेख कसा काढता येईल किंवा अपडेट करता येईल ? - मालोजीराव

In reply to by मालोजीराव

सागर 29/02/2012 - 17:18
हा लेख डिलिट करायची संपादक मंडळाला विनंती करा आणि नवीन धागा काढा :) बाकी लेख फक्कड जमला आहे मालोजीराव. आवडीचा विषय आहे माझा हा सगळा लेख टाकला की सविस्तर लिहिन धन्यवाद

In reply to by मालोजीराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 29/02/2012 - 18:34
आपण पूर्ण लिहिलेला लेख इथे प्रतिसादात डकवा. किंवा संपादक मंडळ या आयडीला किंवा, पैसा,गणपा,विकास, रेवती, किंवा मलाही व्य.नि. करा. आपल्या लेखाची संपूर्ण सुधारित आवृत्ती याच धाग्यात टाकुन देतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालोजीराव 01/03/2012 - 10:53
धन्यवाद बिरुटेसर, माझा जीमेल चा ड्राफ्ट पण उडालाय या गोंधळात त्यामुळे, शक्यतो भाग २ टाकण्याचा प्रयत्न करेन...काही मदत लागली तर नक्की व्य नि करेन :) - मालोजीराव

मोझेस 29/02/2012 - 17:40
स. न. बरेच नवे संदर्भ या लेखात मिळाले. फोटोतुन तत्कालिन वातावरणनिर्मिती होते. परदेशात जूलूम करून नंतर तेथील स्थानिक लोकाना सनदा देणे ही मध्यपुर्वेतिल अरबी-मोगली प्रथा आहे. जेणेकरून सत्तेवर राहाणे सोपे जाते. अफजलखानाची जागा अफगाणीस्तानात होती. ती त्याने सोडली नसती तर त्यात त्याचेच भले होते.

JAGOMOHANPYARE 01/03/2012 - 10:46
अरेरेरेरे ! बिच्चारा अफजलखान.. मेल्यावरही बिचार्‍याला मुक्ती नाही! बादशहाच्या दरबारात पोटापाण्यासाठी नोकरी करत होता.. बादशहाने सांगितले अमूक भाग लूट, की याने लुटला, अमूक देऊळ पाड की याने पाडला...... तो बादशहा मात्र निवांत चैनीत राहिला.. त्याच्या नावानं कसला लेख नाही की कसलं पोस्टर नाही.. आणि हे बिचारं! अजून चित्रात आणि पोस्टरवर पोट फाडूण घेतय! बाकी, अफजलखान आणि हिरण्यकश्यपु यांची तुलना बघून छान मनोरंजन झाले.

अर्धवटराव 01/03/2012 - 09:27
मस्त झालाय लेख. येउ देत पुढील भाग लवकर... बाबासाहेब पुरंदरेंच्या "राजा शिवछत्रपती" मध्ये अफझल खानाने तुळजापुरच्या मंदीराला उपद्रव केल्याचा उल्लेख आहे. पण त्याने असे शिवाजीला जावळी सोडुन मोकळ्या मैदानावर येण्यासाठी डिचवायला केले असं म्हणतात पुरंदरे. शिवाय आपल्या सुभ्यात अफझल खान बराच "सेक्युलर" होता, प्रजाहीत दक्ष होता असंही त्याच्या पत्रांवरुन दाखला दिला जातो. बाकी माणुस भारी असणार हा खान... औरंगजेबाला ऑलमोस्ट कैद केलं होतं त्याने... अर्धवटराव

सोत्रि 01/03/2012 - 09:59
अफजल खानाचा वध हे प्रकरण एका लेखात संपवणे अशक्य आहे. त्यामुले क्रमश: खटकला नाही, किंबहूना तो अपेक्षितच होता. पुभाप्र - (पूर्वजन्मीचा मावळा) सोकाजी

मराठमोळा 01/03/2012 - 11:04
लेख अतिशय माहितीपुर्ण आहेत मालोजीराव तुमचे.. आवडीने वाचतो आहे.. ईतिहासात मी अतिशय कच्चा होतो त्यामुळे शाळेत जे काही शिकलो होतो ते देखील विसरून गेलो आहे. :)

चिगो 01/03/2012 - 12:00
चांगला अभ्यासपुर्ण लेख.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

स्वातीविशु 01/03/2012 - 12:20
अफजलखानाच्या वधाचे चित्र अतिशय आवडले. शिवरायांचे चरित्र जेवढे वाचेल तेवढे कमीच वाटते. :) पुढचा भाग अधिक विस्ताराने लवकर टाका.

गणपा 01/03/2012 - 12:47
माझा (मुळात नसलेला) अभ्यास वाढवतोय. :)

रणजित चितळे 01/03/2012 - 14:09
माझ्या मुलाला वाचून दाखवत आहे छान मस्त

In reply to by रणजित चितळे

मालोजीराव 01/03/2012 - 14:32
धन्यवाद चितळे साहेब, आपण मराठी माणसे फार भाग्यशाली आहोत...मुलांना नितीमत्ता,राजकारण,पराक्रम,बुद्धीमत्ता,दूरदर्शीपणा,संयमशीलता,संघबांधणी,व्यवस्थापन,निसर्गप्रेम या गोष्टी शिकवताना आपल्याला निरनिराळ्या व्यक्तींचे दाखले देण्याची गरज पडत नाही.....सगळ्या गोष्टी 'शिवराय' या एका व्यक्तीमध्येच सामावल्या आहेत ! -मालोजीराव

परिकथेतील राजकुमार 01/03/2012 - 14:37
बर्‍याच दिवसांनी मिपावर काहितरी वाचनीय आणि अभ्यासपूर्ण वाचायला मिळत आहे. धन्यवाद. पु.भा.प्र.
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला ... दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या, केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.|| वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी, प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी , हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||१|| खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती, उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती ! टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ||२|| तुळजापुरची भवानी माय महान मंगला, राउळात आदमखान दैत्यासह पोचला, मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ||3|| श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले, रक्त तापले करात खडग सिध्द जाहले, देउनी बळी अदास तोशवी भवानीला ||४|| सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !! काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही, मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ||५|| केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला (वीरश्रीयुक्त रचना असल्याने काही संदर्भ 'इकडचे तिकडे' असू शकतात, वीररसातील काव्य याच दृष्टीने बघा.:-))