राजगड संवर्धन मोहीम २०१२

धमाल मुलगा जनातलं, मनातलं
रामराम मंडळी, राजगड! श्री शिवछत्रपतिंची प्रथम राजधानी! नावाप्रमाणेच असलेल्या ह्या राजगडाची आज अवस्था मोठी वाईट आहे. पडझड, रानगवत, पर्यटकांनी केलेला कचरा अशा निरनिराळ्या अडचणींनी हा गड आपलं मुळचं वैभव हरवून बसला आहे. गडाची देखभाल तसेच दुरुस्ती करुन हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. काही दुर्गप्रेमी..खरेतर गड-किल्लेवेड्या मित्रांनी एकत्र येऊन अशाच निरनिराळ्या गड-किल्ल्यांची, लेण्यांची गुहांची दुरवस्था न पहावून ह्या ऐतिहासिक ठेव्यांचे संगोपनाचे शक्य तितके वैयक्तिक प्रयत्न सुरु केले. वैयक्तिक पातळीवर सुरु झालेल्या ह्या प्रयत्नांचे रुपांतर कामे आणि समविचारी लोक वाढत गेल्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेत झाले. हीच ती 'श्री शिवदुर्ग संवर्धन' संस्था. श्री शिवदुर्ग संवर्धन वेळोवेळी निरनिराळ्या गडांवर साफसफाई, डागडुजीचे काम करत असते. ह्यातीलच एक उपक्रम येत्या शिवजयंतीच्या काळात पहिल्या राजधानीच्या - राजगडाच्या संवर्धनाचा आहे. त्याबद्दलची माहती मिपाकरांना द्यावी म्हणुन हा लेखनप्रपंच. ----------------------
राजगड संवर्धन मोहीम २०१२
शिवदुर्ग संवर्धन ही ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम करणारी नोंदणीकृत स्वयंसेवी संथा आहे. सध्या आम्ही राजगड,तुंग,तिकोना,रोहीडा आणि रायरेश्वर या किल्ल्यांवर पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परवानगीने आणि देखरेखीखाली काम करत आहोत. राजगडाच्या संवर्धनासाठी आम्ही २०१० पासून कार्यरत आहोत.या अंतर्गत आम्ही राजगडाच्या बालेकिल्ला तसेच पालीगाव ते पाली दरवाजा या मार्गाच्या संवर्धनाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या कामाचा विस्तार आणि गरज लक्षात घेऊन आम्ही राजगड संवर्धनाची महत्वाकांक्षीमोहीम हाती घेतली आहे आणि यासाठी आपल्या मदतीची तसेच सहभागाची गरज आहे. राजगड संवर्धन मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन आम्ही आपल्याला करत आहोत. ही मोहीम शनिवार १८/०२/२०१२ तेसोमवार २०/०२/२०१२ या तीन दिवसात राबवली जाईल. उद्देश व कामाचे स्वरुप :- संजीवनी माची : संजीवनी माची वरील चिलखती तटबंदी हा बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे.सध्या या दुहेरी तटबंदीवर रानटी झाडे तसेच वेली वाढलेल्या आहेत व दुहेरी तटबंदीतील मधल्या जागेत दगड व माती साचून मार्ग बंद झालेला आहे. मोहीमेअंतर्गत आपण या तटबंदीच्या संवर्धनाचे काम हाती घेणार आहोत. पद्मावती माची :- नैसर्गिक कारणांमुळे तसेच उपद्रवी पर्यटकांच्यामुळे पद्मावती माची व त्यावरील पाण्याच्या टाक्या अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत. या माचीच्या स्वच्छता व संवर्धनाचे काम आपण पार पाडणार आहोत. सहभाग व नोंदणी :- या मोहीमेत आपण १८ ते२० फेब्रुवारी किंवा यापैकी कोणत्याही दिवशी आपल्या सोयीनुसार सहभागी होऊ शकता. स्वयंसेवकांनी नावनोंदणी दि.१६ फेब्रुवारी २०१२ पूर्वी करणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क रु. १००/- राहील. मोहीमेदरम्यान आपल्या भोजन व निवासाची सोय संथेमार्फत करण्यात येईल. नोंदणीसाठी संपर्क : info@shrishivdurgasamvardhan.org यावरती इ-पत्र पाठवा, अथवा खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. ९८२३१६७०७८ - कोथरुड /९४२२३०५२७९ - हडपसर व नगर रोड / ९८५०५२००५८ - शनिवारपेठ / ९४०४९६३९७३ पिंपरी चिंचवड / ९८२३४५७०६० सिंहगड रोड. ऐच्छिक देणगी :- कामाचे स्वरुप तसेच आवाका पाहता, श्रमदानासोबतच ह्या प्रकल्पाला आर्थिक मदतीचेही पाठबळ मिळाल्यास कार्य उत्तमरित्या पार पडेल. ज्यांना श्रमदान करण्यासाठी येणे काही कारणांनी शक्य नाही, परंतु ह्या मोहिमेला हातभार लावण्याची इच्छा आहे, ते संस्थेला कार्याकरिता देणगी देऊ शकतात. श्री शिवदुर्ग संवर्धन. पुणे ह्यांच्या राजगड संवर्धन मोहिमेची विस्तृत माहिती , वेळापत्रक आणि देणगीसाठी लागणारी माहिती ह्या दुव्यावर मिळेल. ---------------------- मित्रांनो, एक शनिवार-रविवार श्रीशिवबाराजे आन् राजगडाला देऊया! जास्तीत जास्त हात ह्या कामासाठी झटावेत. ज्यांना गडावर येणे शक्य नाही, त्यांनी आर्थिक हातभार लावावा आणि ही मोहिम यशस्वी करण्यात सिहाचा वाटा उचलावा अशी मी सर्वांना विनंती करतो. भेटूच राजगडावर. तोवर, जय भवानी! ---------------------------------------------------------------------------------------- टीपः सदर प्रकल्प तसेच सदर संस्था ह्यांच्या आर्थिक व्यवहारांशी मिसळपाव.कॉम, मिसळपाव.कॉम व्यवस्थापन ह्यांचा कोणताही संबंध नाही.

38 टिप्पण्या 7,149 दृश्ये

Comments

वपाडाव नवीन

In reply to by पियुशा

कष्ट कराय नगु वाटत असंन तर कमीत कमी तिथं युन समद्या कष्टकरी लोकाइला यकादा चांगला पदार्थ तर खौ घाला... तितकीच राजाची सेवा हुइल... पुण्ण लागंन थोडिक...

वपाडाव नवीन

मालक, ही अनमोल माहिती आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आपले लै लै आभार.... बाकी, खरडवहीत...

चिंतामणी नवीन

असे ज्याचे वर्णन केले आहे असा हा अजोड किल्ला. मोहीमेला शुभेच्छा. वैयक्तीक संपर्क साधुन येण्याचे ठरवीन.

जिप्सी नवीन

राम राम मंडळी ! फार दिवसांनी आलो, पण ज्यावेळी मदत लागती त्यावेळीच आपल्या माणसांची आठवण येती. गेली २ वर्षे हे काम चालू आहे, आता वाढत्या कामाला आपल्या हातभाराची गरज आहे. तुम्हा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण. आपापल्या कामातून वेळात वेळ काढून जरूर या ! कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी मला संपर्क करू शकता. भ्रमणध्वनी आहे :- ९८२३४५७०६० (यशोधन जोशी.) या कामाला मिपाचे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल आमचे मित्र धमालराव यांचे अनेक आभार ! गडावर भेटूच !

धमाल मुलगा नवीन

In reply to by जिप्सी

साक्षात म्यानेजमेंट कमिटीच्या म्येंब्रांनाच टैम घावला म्हणताना, आम्ही बनघोर झालो. :) ज्यांना काही शंका असतील, माहिती हवी असेल तर जिप्सीने वर फोन नंबर दिलेला आहेच. सर्व शंका निरसनार्थ फोनाफोनी करुन त्यांना काव आणणे. :) >>या कामाला मिपाचे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल आमचे मित्र धमालराव यांचे अनेक आभार काडा त्ये पायताण अन हाणा आमच्या टाळक्यात आता. आभार मानत्यात!

मालोजीराव नवीन

अतिशय स्तुत्य प्रकल्प ... हे किल्ले म्हणजे दगडमाती नव्हेत...धारातीर्थी पडलेल्या आणि लढलेल्या प्रत्येक मराठ्याचा श्वास कोंडलाय या दगडात,बुरुजात ! हळूहळू हि जाणीव तयार होऊ लागलीये हि खरच आनंदाची गोष्ट आहे. राजगड,सुधागड,सोनोरी,पुरंधर,कोरीगड,विचित्रगड इ. बर्याच ठिकाणी स्वयंसेवी संस्था आणि ग्रुप्स स्वखर्चाने काम करताना दिसतायेत ! || राजगडावर खडे पसरले, शिवरायांच्या पायी, हिरे माणके, ती आम्हाला, दुसरी दौलत नाही || -मालोजीराव

गवि नवीन

अतिशय कौतुकास्पद आहे हे..अशा रितीने नेक कामासाठी लोक एकत्र येणं ही अतिशय आनंददायक घटना आहे.. संबंधित पण अवांतरही: आधी ऐकताना विचित्र वाटलेली एक गोष्ट म्हणजे किल्ल्यातच हॉटेल / रिझॉर्ट वगैरे. इमोशनली हा भाग खूप गलिच्छ वाटू शकतो.. पण अशीच वाईट भावना मनात घेऊन तेरेखोल, जाधवगड किंवा रायगड रोपवे रिसॉर्ट वगैरे पाहिल्यावर असं वाटायला लागलं की कमर्शियल का होईना पण कायमस्वरूपी टिकाव आणि स्वच्छता यांसाठी खाजगीकरण आणि पर्यटकीकरण (शब्द चुकला असेल कदाचित) करावे की काय? राजस्थानातही काही जुने किल्ले असे ५ स्टार हॉटेल्स बनून पुन्हा राजवैभव बघताहेत असं ऐकलं. मी हरिद्वारला किल्ल्यात नव्हे पण जुन्या हवेलीत उत्तम हॉटेल बनवलं आहे त्यात राहिलो. हवेली भग्न होण्या ऐवजी जिवंत आणि ताजीतवानी राहिली होती. यात मतमतांतरे आणि गैरसमज होऊ शकतात. राजगडच्या सफाईच्या आणि संरक्षणाच्या उत्कृष्ट प्रकल्पाला हा पर्याय म्हणून मांडत नसून नुकत्याच पाहिलेल्या अशा कात टाकलेल्या किल्ल्यांना पाहून एक मनात आलेला विचार लिहिला इतकंच. तेरेखोलच्या किल्ल्यात अगदी तटावर / बुरुजावर असलेल्या कॅफेत बसून अथांग समुद्र बघत लोक कॉफी पितात, दारुही.. पण जुन्या हॉटेल न बनलेल्या किल्ल्याच्या बुरुजावर नुसतेच बसून दारु पिऊन फोडलेल्या बाटल्यांच्या काचा फेकण्याच्या बेगुमान बेदरकारपणापेक्षा बरं.

धमाल मुलगा नवीन

In reply to by गवि

कदाचित कल्पना उत्तम आहे. पण महाराष्ट्रातले बहुतांश गड-किल्ले आहेत पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत. राजस्थानातल्याप्रमाणे संस्थानिकांच्या खाजगी मालकीचे नाहीत. (जाधवगडासारखे अपवाद आहेतही.पण नगण्यच) त्यामुळं हा उपाय कितपत शक्य होईल ह्याबद्दल जरा शंकाच आहे.

पैसा नवीन

In reply to by धमाल मुलगा

अशा किल्ल्यांचं संवर्धन होईल खरं, पण मग तिथे पैसे खर्च करू न शकणारे लोक जाऊ शकणार नाहीत. गेल्या वर्षी गोव्याच्या राज्यसरकारने पुराणवस्तू खाजगी व्यक्तींकडे (संवर्धनासाठी) हस्तांतरित करायचा कायदा केला. त्या कायद्याअंतर्गत "आवश्यकता असल्यास" पुराणवास्तूची पुनर्बांधंणी करता येईल अशी तरतूद आहे. या तरतुदीप्रमाणे खांडेपार इथलं अतिश्य जुनं बहुधा ८ व्या/९व्या शतकातलं सप्तकोटीश्वराचं देऊळ परत बांधलं. ते बांधताना दगडांवर क्रमांक घालून वगैरे परत बांधायचं पथ्य पाळलं नाहीच, शिवात मूळ देवळात नसलेल्या दारावरची खिडकी, उंबरठा वगैरे काही गोष्टी नव्याने घातल्या. जेव्हा कंत्राटदार गाभार्‍याला हात लावायला निघाला तेव्हा गावकर्‍यानी विरोध करून पुढचा अनर्थ टाळला. (गाभारा आणखीच जुना आहे.) हल्लीच आम्ही या देवळात गेलो होतो, तेव्हा काही जुन्या बांधकामापैकीचे दगड इतस्ततः पडलेले होते. पुढे काय तो सप्तकोटीश्वरच जाणे! सूचना कितीही चांगली असली तरी आपल्याकडे अंमलबजावणी अशा प्रकारची असते. त्यामुळे "भीक नको पण कुत्रं आवर" म्हणायची वेळ येते.

मराठे नवीन

In reply to by गवि

प्रथम, अतिशय स्तुत्य उपक्रम. आणि +१ टू गवि. माझ्याही मनात अगदी हाच विचार आला होता. गड-किल्ल्यांचं पुनर्वसन व्यावसायिक (खाजगी किंवा सरकारी) दृष्टीकोनातून केलं तर ते एक लाँगटर्म सोल्युशन होऊ शकेल.

गणेशा नवीन

In reply to by गवि

गवि .. वर वर जरी हे योग्य दिसत असले तरी खाजगी मालकी देवुन संवर्धन करणे हे सर्व लोकांच्या वर अन्याय करण्यासारखे आहे. सरकार ने संवर्धन करावे हवे तर, पर्यटकांपासुन तिकिट घ्यावे वाटल्यास (अल्प रुपये) पण खाजगी गिधाडे एकदा का ह्या किल्यात .. ठेव्यात घुसली की ती बाहेर येणे नाही .. किल्ले म्हणजे फक्त भकास .. दारु ची ठिकाणे नाहियेत आणि खचितच ती स्वताची जहागिरदारी समजुन ५ स्टार हॉटेलात फक्त स्त्रीमंतासाठी उपभोगाची वस्तु ... बाकी भावनेला महत्व आजकाल नसतेच.. जाधवगड प्रमाणे एका रुमचे भाडे ७००० करण्यापेक्षा सरकारने रायगडा प्रमाणे mtdc रुम्स उभाराव्यात्,आणि किल्ल्याच्या संवर्धनाचा खर्च पर्यटकांकदुन वसुल करुन किल्ले निट ठेवावेत.. राष्ट्रीय संपत्ती चे खाजगीकरण खुप धोकादायक आहे ..

गवि नवीन

In reply to by गणेशा

तुझ्या मताला विरोध नाही. फक्त ३ वाक्यं. १. खाजगी म्हणजेच गिधाडं असं नव्हे. उलट ब-याचदा बेपर्वा "ग़रीब" सामान्य पर्यटक तिथे जाऊन अशा ठेव्यांचे जे लचके तोडतात ते गिधाडांसारखे असतात. एमटीडीसीचे रिसॉर्टही अनेक ठिकाणी खाजगी केलेत तेवढे ठीक आहेत पण अन्यत्र सडके शेवाळलेले कचरापट्टी निवास भग्नावस्थेत जागोजागी आहेत. खाजगी "गिधाडे" यापेक्षा बरी. तेरेखोल किल्ला खाजगी हॉटेलात रुपांतरित होऊनही सामान्य पर्यटक तो फ़ुकट पाहू शकतात. निवासी भाग सोडून. २. रायगड रोपवे जोगांकडे खाजगी दिला आहे म्हणूनच झालंय जे आहे ते. ३. रायगड उदा. म्हणून दिलंच आहे मीही. Better example than Terecol.

गणेशा नवीन

In reply to by गवि

@ गवि :
रायगड रोपवे जोगांकडे खाजगी दिला आहे म्हणूनच झालंय जे आहे ते.
रायगडावर जे झालंय ते जोगांच्या रोप वे ने नाही झाले.. येव्हडे श्रेय नक्कीच द्यायला नकोय.. अजुनही जे उत्खनन चालु आहे, त्यात इतिहासिक पुरावे बाहेर येतायेत ते सगळे सरकार तर्फे चालु आहे.. राजांची राजधानी असल्याने रायगडाकडे जास्त लक्ष आहे आणि येव्हडेच लक्ष इतर ही दिले तर रायगडा प्रमाणे सगळीकडे छान होयील असेच म्हणने आहे. बाकी रोपवे ने सुधारणा झाली आहे असे म्हणण्याच्या मी विरोधात आहे, विरोध तुम्हाला नाहिये.. पण या रोप वे मुळे रायगडाचे आता बाजारीकरण होत आहे, कोणी ही ऊठावे आणि रायगडावर काही ही करुन यावे अश्या अर्थाने चालले आहे.. माझ्या या विधानावरुन बरेच जन काही ही म्हणतील मला.. पण या रोपवे मुळे जास्त प्रमाणात लोक ज्यांना गडांवर प्रेम नाहीच अशी लोक ही येत आहेत ... असो .. प्रगतीला विरोध नाही .. पण रोपवे ची गरज रायगडाला नव्हती आणि नसावी..

पैसा नवीन

अतिशय उत्तम, स्तुत्य उपक्रम. सगळ्यानी जमेल तसा हातभार लावायला हवा. आणि ही मोहीम राजगडापुरती मर्यादित न ठेवता हळूहळू तिची व्याप्ती वाढवायला हवी.

स्वच्छंदी_मनोज नवीन

अत्यंत चांगला उपक्रम... आम्ही ६ वर्षांपुर्वी राजगडा वर असा उपक्रम केला होता... तेव्हा राजगडावर असंख्य प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा खच पडला होता... मी स्वतः फक्त पद्मावती माचीवरून ४ गोणी भरून फक्त प्लॅस्टीकच्या बाटल्या गोळा केल्या आहेत....जेवणाच्या पेपर प्लेट्स, ग्लास, सिगरेची पाकीटे, रॅपर्स यांची तर काही मोजदादच नव्हती... सहभागी व्हायला आवडले असते पण यावेळेला शक्य आहे असे वाटत नाही... तुमच्या कार्याला शुभेच्छा....

धमाल मुलगा नवीन

आपल्या शुभेच्छांबद्दल हा धम्या आभारी आहे. कार्य फारा मोठं आहे. अजून बराच पल्ला बाकी आहे. गड बरेच आहेत, बळ हळुहळू वाढतं आहे. येऊन मिळणारा प्रत्येकजण म्हणजे ह्या कार्यासाठी मिळणारं एकेका हतीचं बळ आहे असं मी समजतो. हे आवाहन वाचून, शिवबाराजांच्या गडकार्याला मान देऊन ज्यांनी निरनिराळ्या प्रकारे मदतीची तयारी दर्शवली, मदत केलीही, त्यांचे सर्वांचे मनापासून आभार. मंडळी, गडावर येणार्‍यांनी अजून नोंदणी केली नसेल तर माझी अशी विनंती आहे, की आजच नोंदणी करुन घ्यावी. गडावर सर्व जिनसा बाहेरून आणून चढवाव्या लागतात. ऐनवेळी व्यवस्थापनाचे गणित कोलमडू नये ह्याची काळजी आपण घ्यायला हवी. शेवटी, काही म्हणालं, तरी सैन्य पोटावर चालतं हो म्हाराजा..त्या पोटाची व्यवस्था नीट व्हावी हेही महत्वाचेच :) चला तर, गडावर भेटूच. :)

जिप्सी नवीन

श्री इच्छेकरून व आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे मोहीम फत्ते झाली. ठरल्याप्रमाणे पद्मावती व संजीवनी माची वरील काम पुर्ण झाले. पण ही तर फक्त सुरुवात आहे अजून उदंड काम बाकी आहे. गणेशांच्या प्रत्यक्ष सहभागाबद्दल त्यांचे अनेक आभार. धमालरावांचे व मिपाच्या व्यवस्थापनाचेही आभार. पुढच्या मोहींमांबद्दल वेळोवेळी क़ळवत राहीनचं. असाच लोभ असू द्यावा ही विज्ञापना !