मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पराभवाचे श्राद्ध ! ..भाग-२

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
भाग-२ भारताच्या परराष्ट्रीय धोरण, आणि सैन्याची जी खिल्ली उडवण्यात आली त्यामुळे देशभर संतापाची आणि निराशेची लाट उसळली आणि क्षणभर असे वाटले की आता भारताची प्रगती थांबते की काय. गेले अनेक वर्षे अर्धसत्ये सांगून, धाडसी,आवेशात्मक भाषणे व वचने देत चीन पासून देशाचे संरक्षण करण्यास आम्ही सक्षम आहोत हेच असत्य जनतेच्या माथी मारण्यात येत होते. ते सगळे पितळ उघडे पडले. या आक्रमणाच्या उच्चतम तिव्रतेच्या काळातसुद्धा आपले मंत्रीगण चिनी सैन्याला बाहेर फेकून द्यायची बढाई मारत होते. म्हणत होते “ अजून एकाच लढाईत आमचे सैन्य त्यांना बाहेर ढकलून देईल” दुर्दैवाने या पराभवाच्या कहाण्या जशा जनतेत पसरायला लागल्या तसा जनतेतला असंतोष वाढायला लागला. लोकांना हे स्पष्ट होत गेले की आम्ही, आमचे पुढारी झोपा काढत होते आणि जेव्हा याची सुरवात होत होती त्यावेळेस काही उपाययोजना करायच्या ऐवजी जाणीवपुर्वक आम्ही दुसरीकडे बघत होते. एखाद्या प्रश्नाला टाळण्यासाठी दुसरीकडे बघितले की तो आपल्याला जाणवत नाही, दिसत नाही, तात्पुरतेकाहीच करावे लागत नाही पण जेव्हा तो उग्र स्वरूप घेतो तेव्हा पळता भूई थोडी होते. असेच यावेळेसही घडले. संरक्षणदलावर बर्‍यापैकी खर्च करूनसुद्धा आम्ही त्याविभागात लष्कराच्या जलद हालचालींसाठी चांगले रस्ते बांधले नव्हते ना आम्ही त्या वातावरणातील युद्धासाठी लागणारी युद्धसामूग्री तयार केली किंवा जमा केली. चिनशी युद्ध होणार नाही या ठाम मतापायी या सिमेकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. पायदळावरही कडवट टिका करण्यात आली. ज्या सैनिकाला जगात मान होता, ज्यांनी दुसर्‍या महायुद्धात मोठा मान मिळवला होता ते सर्व एका क्षणात नष्ट झाले. म्हणून हे का झाले याचा शोध घेणे अपरिहार्य आहे. देशभर संतापाची आणि नैराश्याची जी लाट उसळली त्याबरोबर आसाममधील गोंधळाचेही अहवाल येऊ लागले. आसामलाही चिनपासून का धोका नाही असे विचारू जाऊ लागले. श्री. कुलदीप नायर, जे त्याकाळी श्री. लाल बहादूर शास्त्रींचे प्रेस ऑफिसर होते त्यांनी आसामला भेट दिली. त्यांनी असा अहवाल दिला की आसाम मधे अत्यंत गोंधळाचे वातावरण आहे. लोक घाबरलेले आहेत आणि तेजपूर या शहरातून पलायन करणार्‍या नागरिकांची संख्या वाढते आहे. चिन्यांच्या हातात तेजपूरचे विमानतळ सुस्थितीत पडू नये म्हणून ते उडवायची योजनाही तयार करण्यात आली होती. तसेच दिग्बोईचा तेल शुद्धीकरणाचा कारखानाही उडवून लावायचे ठरले. त्यांनी असेही सांगितले की सरकारी अधिकारी आपले चंबुगबाळे आवरून या पलायनात सगळ्यांच्या पुढे होते. त्यांनी अजून एक चमत्कारीक हकिकत सांगितली ती अचाटच होती. एक दिवस तेजपूरमधे लाऊडस्पिकरवरून घोषणा करण्यात आल्या की सरकार आता नागरिकांच्या मालमत्तेची आणि जिवीताची कुठलिही हमी देऊ शकत नाही.” शहराचा कमिशनर याने तुरूंगातील सर्व कैदी सोडून देऊन तेथून पळ काढला होता. हे सर्व अफवांवर विश्वास ठेवून चालले होते. जर चिनी खरेच तेजपूरला पोहोचले असते तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही. या पराभवानंतर बर्‍याच जणांना परिणामांना सामोरे जावे लागले. ७ नोव्हेंबरला वादग्रस्त संरक्षणमंत्री श्री. कृष्णमेनन यांना राजिनामा द्यावा लागला. यासाठी त्यांच्यावर लोकसभेमधे सर्वच पक्षांकडून दबाव आणण्यात आला. अर्थात एक व्यक्ती शेवटपर्यंत त्यांच्या बाजूने उभी राहिली पण शेवटी त्यांचेही काही चालले नाही. नेहरूंनी त्यांची बाजू घेवून त्यांना मंत्रीमंडळात ठेवायचा प्रयत्न केला ( संरक्षण उत्पादनमंत्री म्हणून) पण त्याविरोधात लोकसभेत प्रचंड गदारोळ झाल्यावर त्यांना हाकलण्यात आले. पं. नेहरुंना पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदाच जनतेच्या व इतर मंत्र्यांच्या दबावाखाली झुकावे लागले. नाहीतर त्यांच्या पक्षात त्यांच्या विरोधात बोलायची कोणाचिही टाप नव्हती. असेही होऊ शकते हे ही जनतेला कळाले. नेहरूंच्या चीनच्या बाबतीतले अर्धवट, बिनबुडाचे धोरणाने त्यांच्या या देशाच्या जनतेच्या मनावरच्या अधिसत्तेला घरघर लागली. त्यांची खुर्ची सुरक्षीत ठेवण्यासाठी श्री. कृष्णमेनन यांचा बळी देण्यात आला. भूदलाचे प्रमूख जनरल प्राणनाथ थापर यांनी प्रकृतीस्वास्थ्यामुळे राजिनामा दिला. त्यांनाही अफगाणीस्तानमधे राजदूत म्हणून पाठविण्यात आले. ले. जनरल कौल यांना निवृत्तीपूर्व पण कायमच्या रजेवर पाठवण्यात आले. हे पचवायला पं. नेहरूना फार जड गेले कारण हे गृहस्थ त्यांचे वैयक्तिक मित्र आणि काश्मिरी होते. बर्‍याच सरकारी अधिकार्‍यांना काढण्यात आले तर काहिंना नाही. पण त्यांच्या निवृत्तीनंतरच्या फायद्यावर परिणाम झाला. ३० दिवसात विजेसारख्या हालचाली करू जे काही चिन्यांनी मिळवले होते ते त्यांनी सोडून द्यायचे ठरवले. त्यामुळे आपल्याला परिस्थितीचा आढावा घ्यायला उसंत मिळाली. हे निश्चित होते की चिन्यांनी त्यांना पाहिजे होते त्या भागातून आपल्याला पूर्णपणे उखडून टाकले होते आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले भयंकर हसे झाले. इतके की आपली त्या व्यासपीठावर काही पतच राहिली नाही. जे काही मिळवले होते ते एका क्षणात धूळीस मिळाले होते. जयंत कुलकर्णी. या सगळ्या घडामोडींनी हडबडुन गेल्यावर पं नेहरूंनी गुपचूप आपल्या कुठल्याही सहमंत्र्याला विश्वासात न घेता, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला मदतीची याचना करणारी पत्रे लिहीली त्यात त्यांनी आधूनिक विमांनांची १६ स्क्वाड्रन्स मागितली होती. अर्थातच त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. ही विमाने अमेरीकन वैमानिकांनीच उडवायची होती म्हणे............. क्रमश:.... यानंतर ज्या “हिमालयन ब्लंडरमधील अजून एक प्रकरण... त्या नंतर जी कागदपत्र बाहेरच्या देशात खूली झाली त्यावर आधारीत एक/दोन प्रकरणे. आपल्या देशाने अजूनही या संदर्भात कागद्पत्रे खूली केलेली नाहीत म्हणून हा उद्योग करावा लागणार.

वाचने 14413 वाचनखूण प्रतिक्रिया 27

मृत्युन्जय 07/10/2011 - 16:38
भाग थोडा छोटा झाला काका. पण छानच माहिती. वाचुन चिडचिड झाली. काहीच करु शकत नाही म्हणुन अजुनच जास्त. मागच्या लेखावरील प्रतिक्रिया वाचता नेहरुंची देखील चूक होती की नाही असे एक क्षण वाटुन गेले. पण नीट विचार करता त्यांची चूक होतीच असे अजुन ठाम मत बनले.

कुलकर्णी काका. चालू राहू द्या. नवनविन माहिती मिळत आहे. करड्या ठशातली माहिती तर अत्यंत धक्कादायक. हिमालयन ब्लंडर चा उल्लेख वालाँग पुस्तकात वाचला होता. इतके चांगले असेल अशी कल्पनाही नव्हती.

कुलकर्णी काका. चालू राहू द्या. नवनविन माहिती मिळत आहे. करड्या ठशातली माहिती तर अत्यंत धक्कादायक. हिमालयन ब्लंडर चा उल्लेख वालाँग पुस्तकात वाचला होता. इतके चांगले असेल अशी कल्पनाही नव्हती.

कुलकर्णी काका. चालू राहू द्या. नवनविन माहिती मिळत आहे. करड्या ठशातली माहिती तर अत्यंत धक्कादायक. हिमालयन ब्लंडर चा उल्लेख वालाँग पुस्तकात वाचला होता. इतके चांगले असेल अशी कल्पनाही नव्हती.

तिमा 07/10/2011 - 19:24
सत्य हे नेहमीच कडवट असते त्यामुळे एकीकडे वाचायला आवडते आहे आणि दुसरीकडे मन अस्वस्थ होत आहे. दुर्दैवाने इतिहासापासून आपण काहीच शिकलो नसल्याने, आताचा अतिबलाढ्य चीन आपल्या संपूर्ण 'नॉर्थ ईस्ट' चा घास घेण्याची दाट शक्यता वाटते.

नितिन थत्ते 07/10/2011 - 20:04
*राजकारणी वैट्ट आणि लष्कर वगैरे चान चान असल्या धाग्यांच्या मालिकेसारखी अजून एक मालिका दिसते आहे. मागे मिपावर इन्द्रराज पवार यांनी लिहिलेली सॅम माणेकशॉ यांच्याविषयीची लेखमालिका आली होती. त्या लेखमालिकेच्या सुरुवातीस राजकारणी लोकांकडून झालेली माणेकशॉ यांची अवहेलना आणि इत्यादि वाचण्याची मिपाकरांची इच्छा होती. त्या मालिकेचे चार भाग वाचूनही राजकारण्यांकडून कुठली अवहेलना झाली असे दिसून आले नव्हते. * सदर लेखमाला ले ज थोरात यांच्या पुस्तकावर आधारित आहे असे दिसते. सॅम माणेकशॉ यांच्यावरील लेखात इंद्रराज पवार यांनी थोरात यांना डावलून थापर यांना लष्करप्रमुख केले गेल्याचा उल्लेख केला होता. म्हणून थापर यांचे लेखन 'पिन्च ऑफ सॉल्ट' सह ग्रहण करायला हवे असे वाटते. बाकी चालू द्या. :)

In reply to by नितिन थत्ते

सदर लेखमाला त्या पुस्तकावर आधारीत नाही. सदर लेखमाला ही कुठल्याच पुस्तकावर आधारीत नाही. यात जे दिलेले आहे ते एका सैनिकाचे म्हणणे आहे. पुढच्या लेखातही त्याचेच म्हणणे मांडले जाईल. त्यानंतर ज्या देशात या बद्दल माहीती उघड करण्यात आली आहे त्या वर आधारीत लिहिले जाईल. म्हणजे सगळ्या बाजूने हे लिहिले जाईल. पण दुर्दैवाने कुठल्याही बाजूने विचार केला आणि पडताळणी केली (जी मी अनेक पुस्तके वाचून व काही लोकांशी बोलून केली आहे) तर एकाच माणसापाशी आपण येऊन थांबतो हेही खरे आहे. आपल्या प्रतिक्रियेतील शेवटच्या वाक्याचा मी निषेध करतो. :-) "बाकी चालू द्या" म्हणजे आम्हाला व बाकिच्यांना उद्योग नाही म्हणून आम्ही हे लिहितो आणि ते वाचतात असे वाटते. हे लिहिण्याचा माझा उद्देश मी पहिल्यांदाच स्पष्ट केला आहे. त्यामुळे हे सगळे चालू देण्यासाठी खचितच नव्हे हे मला वाटते आपल्याला समजून घ्यायचे असेल तर सहज शक्य आहे. :-) अर्थात समजा मी वर म्हटल्याप्रमाणे लिहिले नाही, इतर कारणाने, तर मला आपण क्षमा कराल असे वाटते कारण वेळ मिळेल तसे लिहावे लागते.

In reply to by जयंत कुलकर्णी

नितिन थत्ते 07/10/2011 - 22:09
>>पण दुर्दैवाने कुठल्याही बाजूने विचार केला आणि पडताळणी केली (जी मी अनेक पुस्तके वाचून व काही लोकांशी बोलून केली आहे) तर एकाच माणसापाशी आपण येऊन थांबतो हेही खरे आहे. काश्मीर प्रकरणी सुद्धा नेहरूंनी प्रश्न युनोत नेला आणि युद्धबंदी केली (आणि जिंकत असलेले काश्मीर हातचे घालवले) अश्या प्रकारच्या पॉप्युलर समजांवर आधारित धागे मिपावर पूर्वी आले आहेत. ती पॉप्युलर समजूत चुकीची असल्याचे मी व अन्य सदस्यांनी दाखवून दिले आहे. नेहरूंचे मूल्यमापन करताना केवळ 'हिंदी चीनी भाई भाई' या घोषणेवरून त्यांच्या धोरणाचा अंदाज बांधू नये. १९४९ मध्ये चिनी क्रांती झाल्यावर तिचे स्वागत करताना त्यांनी "इतिहासात प्रथमच भारताला अडीच हजार मैलांची लष्करी सरहद्द प्राप्त झाली आहे. याचे परिणाम आपण नीट समजून घेतले पाहिजेत, कारण ते टाळता येण्याजोगे नाहीत" असे म्हटले होते. *१९५३-५४ पासून नेहरूंनी सतत शस्त्रास्त्र निर्मितीचे कारखाने वाढवले. ब्रिटन आणि अमेरिकेच्या इच्छा गुंडाळून अणुभट्ट्या उभारल्या. विमाने आणि रणगाडे निर्माण करण्यावर भर दिला या गोष्टी नजरेआड करता येणार नाहीत. नेहरूंच्याच शब्दात "आम्ही मिळालेल्या वेळात पुरेशी तयारी करू शकलो नसू पण संकटाविषयी जागरूक नव्हतो असे नक्कीच नव्हे". आधी दिलेल्या दुव्यात नेहरूंनी लष्करी अधिकार्‍यांना सरकारचे घोषित धोरण काय आहे त्यावर विसंबण्याची गरज नाही असा स्पष्ट निर्देश दिल्याचा उल्लेख आहे. If Mullik is to be believed - no one in authority in India has yet repudiated him - Nehru was stressing China�s Smperialistic tendencies� as early as 1950.[41] In fact, he asked Mullik not to be misled by the open professions of his own government vis-a-vis China. In 1952 Nehru told Mullik that China had �always been an aggressive country�. He had added that the �war between the two cultures was not over� and would go on for a long time�.[42] Friendship with China was an expedient until India was strong enough to take on China. Chinese economic power combined with its large population, Nehru said in a briefing to the IB, was an �explosive� missile; it would become a danger to the whole world in the next couple of decades.[43] By 1960, he was saying all this publicly. China now became a �danger to the whole world�. It was an �aggressive, arrogant and expansionist neighbour� नेहरू गाफील नव्हते हे यावरून अगदी स्पष्ट होते. सध्या इतकेच. >>आपल्या प्रतिक्रियेतील शेवटच्या वाक्याचा मी निषेध करतो. Smile "बाकी चालू द्या" म्हणजे आम्हाला व बाकिच्यांना उद्योग नाही म्हणून आम्ही हे लिहितो आणि ते वाचतात असे वाटते. नाही. बाकी चालू द्या म्हणजे नेहमीचे आवडते "नेहरू/राजकारणी मठ्ठ/मूर्ख/वगैरे होते म्हणून नाहीतर भारत आज कुठच्या कुठे" वगैरे. *हे तपशील नरहर कुरुंदकरांनी दिलेले आहेत. माझ्यापाशी ते तपासण्यासाठी संदर्भ नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

आपण इथेच मोठी चूक केली आहे. नेहरूंचे सर्वसाधारण मुल्यमापन हा या लेखाचा विषय नाही. हा लेख फक्त चिनी आक्रमणाच्या संधर्भात लिहीलेला आहे. नेहरूंचे इतर बाबतील मुल्यमापन करायचे झाल्यास त्यात Bench Marking करावे लागेल. तेही आपण करावे मग खरे मुल्यपान होईल. ते एक माणुस होते आणि त्यांच्या हातून चूक होणारच नाही हे assumption अत्यंत चुकीचे आहे हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे त्यांनी अणू भट्ट्या उभारल्या, विमाने आणि रणगाडे करण्यावर भर दिला ( हे विधान तर चुकिचेच आहे आपण अजूनही विमाने तयार करत नाही. चांगला रणगाडा तर अजून आपल्या स्वप्नात आहे. १९६५ सालच्या पाकिस्तानच्या युद्धात जेव्हा यशवंतराव चव्हाण स्वत: अमेरिकेला विमानांची मदत मागायला गेले तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तुमचे हवाईदल हे वस्तू संग्रहालय आहे त्यात माझी आधुनिक विमाने घेऊन आपण काय करणात असे हेटाळणीचे उत्तर देऊन ती मदत नाकारली होती. ही १९६५ सालची गोष्ट आहे. मला तर इतिहासात नेहरूंनी तयार केलेली विमाने दिसली नाहीत.) बाकीच्या ज्या सुधारणा त्यांनी केल्या त्यात विशेष ते काय ? त्यासाठीच त्यांची नेमणूक होती. He was the CEO of newly formed Govt. मुख्य म्हणजे एखाद्या घटनेचे आणि त्याच्या संबधित माणसांचे मुल्यमापन करताना त्याच्या इतर कामची दखल घ्यायचे कारण काय ? दुसर्‍या महायुद्धानंतर चर्चील यांना निवडणूकीत मतदारांनी खाली खेचले आणि त्यांना परत निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली हे सत्य आहे. इजिप्तच्या पंतप्रधानांनी इस्राएल बरोबर युद्ध हारल्यावर जनतेची माफी मागून ताबडतोब राजिनामा दिला आणि परत जनतेचा कौल घेऊन ते सत्तेवर आले. यांनी ना देशाची माफी मागितली ना राजिनामा दिला ना जनतेचा कौल मागितला. आता याला काय म्हणावे आणि कसे मुल्यमापन करावे हे काही माझ्या लक्षात येत नाही..... आपण जो इंग्रजीमधे लिहिले आहे, त्याच्या पार्श्वभुमीवर तर हा निष्काळजीपणा फारच उठून दिसतो...दुर्दैवाने.... //नाही. बाकी चालू द्या म्हणजे नेहमीचे आवडते "नेहरू/राजकारणी मठ्ठ/मूर्ख/वगैरे होते म्हणून नाहीतर भारत आज कुठच्या कुठे" वगैर//// नाही माझे असे काहीही म्हणणे नाही. कारण आपण कुठे आहोत आणि कुठे जाणार आहोत याच्या माझ्या कल्पना विचारांती पक्क्या झाल्या आहेत... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

नितिन थत्ते 08/10/2011 - 08:42
विमाने आणि रणगाड्यांचा उल्लेख करण्याचे कारण 'शांततेच्या अतिरेकी प्रेमापोटी नेहरूंनी सैन्यबळ वाढवण्यासारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले' असाही एक समज पसरवला गेलेला आहे. आणि त्यामुळेच चीनविरुद्ध पराभव झाला अशीही समजूत आहे. माझ्या प्रतिसादाचा आणखी उद्देश म्हणजे सरकार अधिकृत पातळीवर जे बोलते तसेच ते वागत असते असे नाही. हे दुसर्‍या एका संदर्भात (सीमेपलिकडे कारवाया) धनंजय यांनीही सांगितले आहे. बाकी पुचाट नेहरूंनंतर अनेक कणखर पंतप्रधान होऊन गेले परंतु पर्वतीय लढाई कारगिलच्या वेळीही लष्कराला अवघड गेली होती. आणि कणखर पंतप्रधानांच्या काळात ज्या लढायांत यश मिळाले त्या मैदानी भागातल्या लढाया होत्या. आणखी एका दुव्यात तेव्हा गृहमंत्री असलेल्या आपल्या लाडक्या शास्त्रीजींनी चीनला "बर्‍या बोलाने निघून जा नाहीतर आम्हाला गोव्यासारखी कारवाई करावी लागेल" अशी धमकी दिल्याचे वाचले. ;) (सत्यान्वेषी) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

माझे काम, काय झाले हे समोर ठेवणे आहे. म्हणून तर पुढच्या भागात तुम्ही जे म्हणत आहात तेही येईल. पण आपण जे काही लिहिले आहे ते या लेखाच्या संधर्भाच्या बाबतीत संधर्भहीन आहे असे मला वाटते. असो. मी आता या विषयावर चर्चा करण्यात वेळ घालवत नाही कारण आपल्याला प्रतिक्रिया लिहायला दोन मिनीटे लागत असतील तर मला लेख लिहायला दोन तास तरी लागतात. माझे प्राधान्य हे माहिती समोर ठेवणे असल्यामुळे मी याच्यावर आता तरी चर्चा न करणे बरे ! :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

नितिन थत्ते 08/10/2011 - 13:53
>>कारण आपल्याला प्रतिक्रिया लिहायला दोन मिनीटे लागत असतील तर मला लेख लिहायला दोन तास तरी लागतात. मला वरच्या प्रतिक्रिया दुवे शोधून, पुन्हा वाचून, आपण लिहीत असलेले बरोबर असल्याची खात्री करून घेऊन वगैरे लिहायला प्रत्येकी पाऊण तास तरी लागला असावा. आपले हे लेख दोन दोन तासात लिहून झाले असतील तर आपले अभिनंदन !! >>माझे प्राधान्य हे माहिती समोर ठेवणे असल्यामुळे मी याच्यावर आता तरी चर्चा न करणे बरे ! ओके. मीही सध्या काही दिवसांचा संन्यास घेत आहे.

In reply to by नितिन थत्ते

मैत्र 10/10/2011 - 10:19
अगदी अपेक्षित चाचा मोड प्रतिसाद... त्यामुळे आधी आभार. बाकी पुचाट नेहरूंनंतर अनेक कणखर पंतप्रधान होऊन गेले परंतु पर्वतीय लढाई कारगिलच्या वेळीही लष्कराला अवघड गेली होती. आणि कणखर पंतप्रधानांच्या काळात ज्या लढायांत यश मिळाले त्या मैदानी भागातल्या लढाया होत्या. आणखी एका दुव्यात तेव्हा गृहमंत्री असलेल्या आपल्या लाडक्या शास्त्रीजींनी चीनला "बर्‍या बोलाने निघून जा नाहीतर आम्हाला गोव्यासारखी कारवाई करावी लागेल" अशी धमकी दिल्याचे वाचले. मुद्दा ६२ च्या युद्धाचा असताना हे अगदी मुद्दामून उकरून आणि अत्यंत तिरकसपणे लिहिण्याचं प्रयोजन अनाकलनीय आहे. पण तरीही चाचा मोड मध्ये हे अपेक्षितच आहे असं वाचल्यावर वाटणं हेच या प्रतिउत्तराचं मोठ्ठं यश आहे :) कणखर पंतप्रधान सुद्धा गाफील राहिले मैत्रीच्या नाटकात हे सर्वश्रुत आहे पण कारगिल आपण इतकं वाईट हरलो पण नाही. आणि त्या कणखर पंतप्रधानांच्या जागी सध्याचे बाहुले असते तरीही जिंकलो असतो कदाचित तसेच झगडून. त्यामुळे त्याचा संदर्भ देण्याचं काही एक कारण नाही. शास्त्रींनी असं विधान केलं हे विशेष.. पण लेखकाच्या लाडक्या शास्त्रीजींनी हे मात्र ईंटरेस्टिंग वाटलं... फॉरवर्ड पॉलिसी http://en.wikipedia.org/wiki/Sino-Indian_War#The_Forward_Policy हा विकी दुवा आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे तो वादग्रस्त असू शकतो पण चाचांना फॉरवर्ड पॉलिसी अशी काही गोष्ट नव्हतीच आणि तो फक्त एक "पॉप्युलर आरोप" आहे असं सिद्ध करण्याचा अर्थातच पूर्ण अधिकार किंवा व्यक्तिस्वातंत्र्य आहेच... बाकी चालू द्या :)

In reply to by नितिन थत्ते

फारएन्ड 07/10/2011 - 21:02
"थोरात यांचे... पिन्च ऑफ सॉल्ट.." म्हणायचे आहे ना? बाकी या विषयावर आपली मते आवडतील वाचायला. या पराभवाची जबाबदारी कोणाचीतरी नक्कीच होती आणि दोष शेवटी संरक्षणमंत्री व पंतप्रधान यांना दिला जाणार. नेहरू-मेनन यांनी जे करायला हवे होते ते - युद्धाच्या तयारीबाबत- ६५ मधे शास्त्री-य.चव्हाण यांनी केले असे बर्‍याच ठिकाणी वाचले आहे. या पराभवानंतर राजीनामा दिल्यावर दोन वेळा मेनन लोकसभेवर कसे निवडून गेले हे आश्चर्यच आहे.

अजितजी 07/10/2011 - 20:32
या युद्धाने आपल्याला काय दिले ------??????-----------" जिंकू किवा मारू --मारू नाही मारू ---बघा google transliteration सुद्धा मरू म्हणत नाहीये --हे गाणे --जे आपण शाळेत असताना घसा खरवडून म्हणत होतो --म्हणजे आपल्या आवाजाने तरी चीनी पळून जातील अशी आमची भाबडी कल्पना होती त्या काळात ----अजित जी

पैसा 07/10/2011 - 21:04
आणखी वाचायला हवंच आहे. अर्धवटरावांचे शब्द उसने घेते. रेडी टु थिंक...

शाहिर 08/10/2011 - 11:05
खर तर युद्धानंतर अह्वाल प्रसिद्ध केले पाहिजे .. अवांतर : माहिती अधिकार वापरुन या विषयी महिती मिळवता येइल का ? कि ति गोपनिय म्हणुन देणार नाहित ?..या घटनेला बरीच वर्षे झाली ..त्यामुळे ती उपलब्ध असेल तर उत्तम होइल.

नक्की खरे काय आणि खोटे काय ते समजत नाही. विमाने आणि रणगाडे बनवण्याच्या बाबत पंडित नेहरुंनी पुढाकार घेतला होता हे मीदेखील 'जागर' या पुस्तकात वाचले होते. नरहर कुरुंदकर यांनीदेखील प्रचारकी थाटाच्या पुड्या सोडल्या असे म्हणावे काय ? तसे म्हणण्याचे धाडस होत नाही. कुलकर्णी आणि थत्ते यांचे प्रतिसाद आणि दिलेली माहिती वाचून काहीच कळेनासे झाले आहे. - गोंधळलेला

राही 08/10/2011 - 16:27
समजा आज पुन्हा एकदा चीनने भारतावर आक्रमण केले तर त्याचा निकाल किंवा परिणाम काय असेल? सत्य हे आहे की कोणत्याही बाहेरच्या देशाने(अमेरिका वगैरे )हस्तक्षेप केला नाही तर आणि युद्ध शेवटपर्यंत लढले गेले तर आपली हार होईल. चीनचा आकार,प्रकृती,धोरण, शासनपद्धती हे सर्व आपल्यापेक्षा खूपच वेगळे आहे. चीन विस्तारवादी आणि लढाईखोर आहे. एखाद्या क्रांतीत किंवा लढाईत हजारो लोकांचे बळी गेले तरी तिथे कोणतीही प्रतिक्रिया उमटू शकत नाही. कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम तिथे अत्यंत क्रूरपणे राबवण्यात आला. आपल्याइथे असे करता येईल? शहाणपण यातच आहे की युक्तीप्रयुक्तीने चीनला थोपवून ठेवावे आणि त्याचबरोबर शांतपणे.गाजावाजा न करता आपली धोरणे राबवीत राहावीत. आज चीनबरोबरच्या युद्धात भारत जिंकेल असे नाही आणि तेव्हाही तसे नव्हते.

समीरसूर 10/10/2011 - 10:53
कालच्या, म्हणजे ०९-ऑक्टोबर-२०११ (रविवार) च्या दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीच्या सप्तरंग पुरवणीमध्ये १९६२ च्या भारत-चीन युद्धावर काही जाणकारांचे आणि प्रत्यक्ष त्या युद्धात भाग घेतलेल्या योद्ध्यांचे लेख आलेले आहेत. पहिला लेख या युद्धात कैदी झालेल्या लेफ्टनंट कर्नल श्रीकांत हसबनीस यांचा आहे. चीनच्या आक्रमणाला भारताचे प्रत्युत्तर किती भिकार होते याचे त्यांनी वर्णन केले आहे. निव्वळ थंड केबिन्समध्ये आरामात बसून आपल्या राज्यकर्त्यांनी नकाशावर बोट ठेवून इथे पोस्ट उभारा, तिथे पोस्ट उभारा असे सांगीतले होते असे हसबनिस सांगतात. प्रत्यक्ष युद्धभूमीवरची परिस्थिती किती अवघड होती आणि भारताची तयारी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे किती तोकडी होती याचे यथार्थ आणि वैषम्यपूर्ण वर्णन हसबनिस या लेखात करतात. याच सुराचे लेख कॅप्टन भूषण गोखले आणि अनंत बागाईतकर यांचे आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यावर १५ वर्षे उलटून गेल्यावरही भारतावर राज्य करणारे पं. नेहरूंसारखे भंपक नेते किती स्वप्नाळू, भित्रे, पुचाट आणि निर्बुद्ध होते हे या लेखांमधून स्पष्टपणे समोर येते. हे लेख प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्या किंवा त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या आणि तज्ञ मंडळींनी लिहिले असल्याने त्या लेखांच्या सत्यतेविषयी शंका घेण्याचा प्रश्नच उरत नाही. शांततेचा पुरस्कर्ता असणं म्हणजे निर्बुद्धसारखं युद्धाची तयारी न ठेवणं नव्हे! पाकिस्तानसारखा विषारी आणि कृतघ्न साप शेजारी असतांना आणि त्याच्या विषाचा प्रत्यय आलेला असतांना आपण शांत राहण्याच्या नादात सुसज्ज संरक्षणव्यवस्था न ठेवणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे. पं. नेहरूंनी चीनची लाचारी पत्करून आपल्या भित्र्या आणि कमअसल मनोवृत्तीचे दर्शन घडवले. शांतता, सलोखा, भाईचारा, अहिंसा, शेजार्‍यांशी सौहार्दाचे संबंध इत्यादी गुण तुम्ही तेव्हाच सर्व ताकदीनिशी दाखवू शकता जेव्हा तुमची संरक्षणव्यवस्था अत्यंत मजबूत आणि कुठल्याही आगळीकीला सडेतोड उत्तर देण्याच्या क्षमतेची असते; अन्यथा त्या निव्वळ वल्गना ठरतात. इतकी सोपी गोष्ट पं. नेहरूंसारख्या तथाकथित महान नेत्याला कळली नाही यातच त्यांचे बुळेपण दिसून येते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १५ वर्षे आपली संरक्षणव्यवस्था इतकी ढिसाळ होती की त्याकाळी भारतात पं. नेहरूंसारखा तथाकथित दूरदृष्टी असलेला, कणखर, प्रखर देशप्रेमी वगैरे वगैरे नेता आपला पंतप्रधान होता हे खरेच वाटत नाही. तिथे पाहिजे होते सरदार वल्लभभाई पटेल! पं. नेहरूंचे नशीब जोरदार म्हणून त्यांना पंतप्रधानपद मिळाले. जसे आज कुठल्याही कर्तुत्वाविना प्रतिभा पाटलांना राष्ट्रपतिपद मिळते, आवाज नसणार्‍या मनमोहन सिंगांना चक्क दोन-दोन टर्म्स पंतप्रधानपद मिळते, देवेगौडासारख्या झोपाळू माणसाला पंतप्रधानपद मिळते, अगदी तसेच पं. नेहरूंना पंतप्रधानपद मिळाले. भारतातले हे घाणेरडे आणि स्वार्थी राजकारण पं. नेहरूंच्या काळापासून सुरु आहे. त्याच बळावर नेहरूंनी पंतप्रधानपद आपल्या पदरात पाडून घेतले; बाकी त्यांना भारताने (मुख्यत्वेकरून काँग्रेसच्या ब्रँड बनवण्याच्या राजकारणाने) अकारण डोक्यावर चढवले आहे (होते) हे नक्की. असाच सूर (त्यांचे नाव न घेता) सप्तरंगच्या लेखांमधून व्यक्त होतो. आताही अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या कारवायांवर स्वतःचे निरर्थक समाधान व्हावे म्हणून "काही विशेष नाही; सगळं आल्बेल आहे; चीन काहीच करत नाहीये..." असं नेहरूंसारखं पुचाट आणि वेळकाढूपणाचं धोरण चालू आहे. युद्ध होणार नाही असं वाटतंय पण खात्री नाही (युद्ध ही कुणालाच न परवडणारी घटना आहे हे सगळ्यांना कळतंय बहुधा). आणि देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सगळ्या शक्यता धरून पाऊले टाकावी लागतात हे सरकारला कळेल तो सुदिन; नाहीतर पुन्हा नेहरूंच्या भंपक कर्तुत्वाची पुनरावृत्ती होणार हे नक्की!!

मराठी_माणूस 10/10/2011 - 11:06
तिथे पाहिजे होते सरदार वल्लभभाई पटेल बरोबर. असे म्हणतात की , हैदराबाद्चे पोलिस अ‍ॅक्शन हे सरदार वल्लभभाई पटेलांनी नेहरुंच्या विरोध असताना चालु केले आणि ते संस्थान भारतात सामिल केले . ते झाले नसते तर तो प्रश्न अजुन किति काळ रेंगाळला असता ते सांगत येत नाही. नशीब जोरदार म्हणून त्यांना पंतप्रधानपद मिळाले. नशीब का हट्टीपणा ?

येथे स्पष्ट उल्लेख आहे की आपण आजही आपल्या गरजेच्या ७० % शस्त्र परदेशातून विकत घेतो . नेहरू काळापासून ही उज्जल परंपरा चालू आहे .आज भारत स्वताला लागणारे धान्य व बहुतांशी गोष्टी देशात बनवतो पण शस्त्रे नाही . कारण बाहेरून शस्त्रे विकत घेतली की भरपूर मलई खायला मिळते मग कशाला आपण तोफा देशात बनवू . ज्यू राष्ट्रे ( आपल्या तुलनेत लहान सदैव युद्ध व दहशतवादात गुंतलेले व प्रतिकूल निसर्गात त्यांनी कृषी व शस्त्रे ह्यात नुसता स्वयंपूर्ण झाला नाही तर आज जगाला शत्रे विकतो ) आपण त्यांचे महत्वाचे खरेदीदार आहोत . त्यांना जमू शकते ....