मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाशवी प्रतिशोधाची कहाणी

रामदास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(बसरा ते बावला या लेखात मी इंदूर पिअर्सची गोष्ट लिहीली होती. त्यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचा लेखसंग्रह वाचताना त्या काळचे नावाकाळ मधील लेख वाचायला मिळाले .फक्त अग्रलेखाची प्रतिमा संदर्भाशिवाय टाकणे योग्य वाटले नाही म्हणून बावलाची कथा पुन्हा एकदा लिहीली आहे.तेच ते पुन्हा लिहीण्याचा दोष माझ्या खात्यात टाकून लेख वाचावा.) Image removed. सोबतच्या फोटोत दिसणारे हे पेराच्या आकाराचे , जुळे असावेत असे वाटणारे हिरे इंदूर पिअर्स या नावानी प्रसिध्द आहेत .इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांनी ही हिर्‍यांची जोडी त्यांच्या नविन पत्नी अ‍ॅनी मिलरला विवाहात भेट दिली होती. १९२८ साली महाराज युरोपच्या दौर्‍यावर असताना त्यांची आणि नॅन्सी अ‍ॅनी मिलरची ओळख झाली. महाराज अ‍ॅनीच्या प्रेमात पडले. त्यांनी तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला.महाराज अ‍ॅनीच्या प्रेमात इतके बुडून गेले होते की वेळ पडल्यास धर्म बदलायची तयारी पण त्यांनी केली होती .पण तसे काही झाले नाही. अ‍ॅनीनी हिंदू धर्म स्विकारला .त्यांचे नविन नाव राणी शर्मीष्ठादेवी झाले. तजेलदार सुंदर स्वच्छ आणि जराही ऐब नसलेले हे हिरे साधारण सेहेचाळीस कॅरेट वजनाचे आहेत. आपल्या नूतन पत्नीला इतकी सुंदर भेट देणारे तुकोजीराव १९२६ साली युरोपात का आले याचे कारण कळल्यावर कदाचीत बघ या हिर्‍याकडे बघण्याचा आनंदच नाहीसा होण्याची शक्यता आहे.एका खूनाच्या प्रकरणातून चौकशीला सामोरे जायला नको म्हणून सोयीस्कररीत्या महाराज इंदूर सोडून युरोपात फिरत होते. ज्या खुनाच्या प्रकरणात त्यांना चौकशीला तोंड द्यावं लागलं असतं ते प्रकरण मुंबईच्या हाय कोर्टात आजही मुमताझ केस म्हणून प्रसिध्द आहे. सूडाच्या भावनेनी पछाडलेला माणूस कसा पशुत्वावर उतरतो ह्याची ही कथा आहे. ******************************************** बारा जानेवारी एकोणीसशे पंचवीसची मुंबईतली एक संध्याकाळ. साधारण सात साडे सात वाजता विलींग्डन क्लबातून खेळून बाहेर पडलेल्या तीन ब्रिटीश अधिकार्‍यांना कुलाब्यातल्या बराकीत वेळेत पोहचायचं होतं .बोलण्याच्या नादात पेडर रोडवरून खाली उतरल्यावर गाडी चालवणार्‍या लेफ्टनंट सेगर्टनी ह्युजीस रोड कडे न जाता चुकून गाडी गिब्ज रोडवर घेतली तोपर्यंतही त्यांना कल्पना नव्हती की एका खळबळजनक ऐतिहासीक घटनेचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होणार आहेत. एका बाईच्या किंकाळीने हे शिलेदार भानावर आले आणि पाठोपाठ बंदूकीच्या बाराचे आवाजही आले. दुसर्‍या क्षणी हातात गोल्फक्लब्ज घेऊन सेगर्ट-बेटली स्टीफन पुढे धावले . अंदाजे आठ दहा माणसांच्या टोळक्यानी एका मोटारीला वेढा घातला होता. त्यांच्या हातात तलवारीसारखी तीक्ष्ण हत्यारे होती .दोघांच्या हातात पिस्तूलं होती. तिघांचेही लष्करी प्रशिक्षण वेळीस कामाला आले. दुसर्‍या क्षणी त्या ब्रिटीश अधिकार्‍यांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला चढवला. हल्लेखोरांचे उद्दीष्ट मोटरमधल्या एका मुलीला जबरदस्तीने गाडीतून बाहेर काढण्याचा असावा पण पुढच्या काही क्षणात हल्लेखोरांनी तिच्या साथीदारावर गोळ्या चालवल्या आणि त्या बाईला वाचवणारा तिचा साथीदार पुरुष जखमी होऊन खाली पडला. आता हल्लेखोर आणि या शिलेदारांची हातघाईची मारामारी सुरु झाली. हल्लेखोरांपैकी ए कानी बाईच्या चेहेर्‍यावर वार केला. तोपर्यंत कर्नल व्हिकरी नावाचे आणखी एक लष्करी अधिकारी दुसर्‍या मोटारीतून खाली उतरले होते. लष्करी अधिकार्‍यांचे वाढते बळ पाहून हल्लेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. तिघांना नि:शस्त्र करण्यात त्यांना यशही आलं पण तोपर्यंत सेगर्टच्या खांद्यावर चाकूचा वार झाला. एक पिस्तूलाची गोळी पण चाटून गेली. दोन हल्लेखोरांना काबूत घेण्यात या अधिकार्‍यांना यश आलं .बाकीचे हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. झटापट संपेपर्यंत ज्या पुरुषाच्या अंगावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या तो मात्र जागीच गतप्राण झाला होता. ******************************************************** त्या बाईचं नाव होतं मुमताज आणि मृताचं नाव होतं अब्दुल कादेर बावला.ती एक नाचणारी आणि तो मुंबईचा एक श्रीमंत व्यापारी. पुढच्या काही दिवसात सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आलं. सगळे हल्लेखोर इंदूरहून मुंबईत आले होते आणि इंदूर संस्थानातचे आणि इंदूरच्या लष्कराचे नोकर होते. हल्ल्यात वापरलेली लाल मॅक्सवेल गाडी पण इंदूरचीच होती. मुंबई हायकोर्टात खटला सुरु झाला आणि प्रेमाच्या प्रतिशोधाची एक भयानक कहाणी जगासमोर आली. मुमताज इंदूरच्या महाराजांच्या जनान्यातली एक नाचणारी. महाराज तुकोजीरावांच्या खास आवडीची . काहीजण म्हणतात की महाराजांनी तिला मुंबईच्या कोठ्यावरून पळवून इंदूरला नजरकैदेत ठेवलं होतं. पण तिचं मन गुंतलं होतं मुंबईतल्या अब्दुल कादेर बावलामध्ये. इंदूरच्या त्या जबरदस्तीच्या वास्तव्यात महाराजांपासून तिला एक मुलगी पण झाली पण त्या मुलीला जन्मानंतर एका नर्स करवी मारून टाकण्यात आलं. महाराजांनी अत्याचाराची सिमा ओलांडल्यावर मुमताज धाडस करून इंदूरहून पळून जाण्यात यशस्वी झाली . दिल्ली-अमृतसर नागपूर मग मुंबई असा प्रवास करत अब्दुल कादेर बावलाकडे आली. मुंबई तेव्हा ब्रिटीश इंडीयाचा भाग होती आणि त्यामुळेच बावला गाफील राहीला. महाराज सूड घेतील अशी शंका पण कदाचीत त्याच्या मनाला शिवली नसावी पण एका नाचणारीच्या बंडानी महाराजांच्या मनात सूडाचा वणवा पेटला. *********************************************** मुंबईच्या हाय कोर्टात खटला सुरु झाला. हल्लेखोरांच्या बाजूने वकील होते बॅ. मोहमद अली जीना. एकेक साक्षीदार पुढे येत गेले आणि कहाणी उलगडत गेली. जीनांनी हल्लेखोरांचे उद्दीष्ट खून नसल्याचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला .पण मुमताजच्या चेहेर्‍यावर केलेला वार त्या मुद्द्याला खोडून काढत होता. बावलानी गोळ्या झाडल्याचा मुद्दा पण पुढे आला. बावलाचे पिस्तूल कोर्टापुढे आले.त्यातून एकही गोळी झाडली नसल्याचे स्पष्ट झाले. एक शेवटचा प्रयत्न म्हणून वकीलांनी असा मुद्दा मांडला की मुमताज इंदूरला यायला तयार होती पण बावला विरोध करत होता. इथे बॅ.तेव्हाचे सुप्रसिध्द वकील नरीमन यांनी साक्ष दिली की या हल्ल्याच्या काही दिवस अगोदर मुमताज त्यांच्या कडे कायदेशीर सल्ला घ्यायला आली होती तेव्हा तिने स्पष्ट केले होते की जीव गेला तरी चालेल पण इंदूरला जाणार नाही. सरकारी वकील आणि न्यायाधीशांनी शेवटपर्यंत कोणाच्या आदेशावरून हा खून करण्यात आला हे सत्य जगासमोर येऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न केलांयायाधिशांनी ज्युरीसमोर केलेल्या भाषणाच्या प्रत्येक विधानात इंदूरकडून एव्हढाच उल्लेख आला. तुकोजीरावांचे नाव प्रत्यक्ष घेण्यात सगळेच घाबरत होतेआणि महाराज आपल्या रंगीन रात्री इंदूरात सुखाने घालवत राहीले.सर्वसाधारण सरकारी नोकरांच्या बचावाला बॅ. जीनांसारखा वकील कसा उभा राहीला याची वाच्चता पण कोणीही केली नाही. सात गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात आली. तिघांना फाशी तर इतरांना जन्मठेप. जन्म ठेप झालेल्यापैकी एका कोर्टातच वेड लागले. फणसे नावाच्या एका हल्लेखोराला शिक्षेत सूट द्यावी असे न्यायाधिशांच्या मनात असूनही त्यांना तसे करता आले नाही. केस अपीलात प्रिव्ही कौन्सीलासमोर लंडनला चालवण्यात आली. दहा हजार पौंडांचा बयाणा घेऊन सर जॉन सायमन या ज्येष्ठ कायदे तज्ञाला उभे करण्यात आले पण काही उपयोग झाला नाही. महाराह तुकोजीराव इंदूरमध्ये मौजेत होते. त्यांच्या वैयक्तीक सूडाच्या प्रवासात अनेक माणसं जीवाला मुकली. ******************************************************* एकदा कायदेशीर तरतूदी संपल्यानंतर तुकोजीरावांना ब्रिटीशांनी कयद्याच्या कचाट्यात धरले . त्यांच्या समोर एकतर कायदेशीर चौकशीला सामोरे जा किंवा राज्यत्याग करा असा पर्याय ठेवण्यात आला. तुकोजीरावांवी दुसरा पर्याय स्विकारला.तुकोजीरावांनी सिंहासन सोडले आणि सतरा वर्षाच्या त्यांच्या अल्पवयीन मुलाला, यशवंतरावांना गादीवर बसवले. शक्य तो दूर रहा असा मैत्रीपूर्ण सल्ला ब्रिटीशांनी दिला असल्यामुळे ते युरोपात गेले आणि इथेच त्यांचीभेट नॅन्सी अ‍ॅनी मिलरसोबत झाली.महाराजांचे हे लग्न पण टिकले नाही .घटस्फोट झाला आणि इंदूर पिअर्सची जोडी बाजारात विकायला आली. हॅरी विन्स्टन नावाच्या सुप्रसिध्द जव्हेर्‍यानी ती जोडी विकत घेतली .या हिर्‍यांना परत एकदा पैलू पाडण्यात आले. त्यानंतर इंदूर पिअर्सची विक्री करण्यात आली. काही दिवसानी हॅरी विन्स्टननी ते परत विकत घेतले आणि पुनश्च विकले.सरतेशेवटी आता ही इंदूर पिअर्सची जोडी रॉबर्ट मोवाड ह्या आणखी एका सुप्रसिध्द जव्हेर्‍याच्या संग्रहात आहे. ********************************************************* इंदूर पिअर्स आहेत तिथे सुरक्षीत आहेत पण काही प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. मारणारे फाशी गेले ते त्यांच्या गुन्ह्यातील सहभागामुळे पण पंचवीस तीस वर्षाच्या या तरुणांना इरेस घालणारा कायद्याच्या बाहेर कसा राहीला आणि ते सुध्दा न्यायप्रिय म्हणून मिरवणार्‍या ब्रिटीशांच्या राज्यात ? अब्दुल कादेर बावलाला न्याय मिळाला पण मुमताझ आणि तिच्या मुलीला न्याय मिळाला का ? नॅन्सी मिलरची राणी शर्मीष्ठादेवी म्हणून इतिहासात नोंद झाली .पण प्रतिशोधाच्या पाशवी प्रवासात मुमताझ कुठे गेली हे कुणालाच माहीती नाही. तुकोजीराव सुध्दा ब्रिटीशांच्याच काय पण आकाशातल्या कायद्याच्या हातावर तुरी देऊन कसे उजळमाथ्यानी जगत राहीले . मुमताझचं बावलावरचं प्रेम आंधळं होतं. तुकोजीरावांचा प्रतिशोधही आंधळा होता. ब्रिटीशांचा कायदा पण आंधळा होता. Image removed. Image removed. Image removed. Image removed.

वाचन 37784 प्रतिक्रिया 0