पाशवी प्रतिशोधाची कहाणी

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
9 Nov 2010 - 9:54 pm

(बसरा ते बावला या लेखात मी इंदूर पिअर्सची गोष्ट लिहीली होती. त्यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचा लेखसंग्रह वाचताना त्या काळचे नावाकाळ मधील लेख वाचायला मिळाले .फक्त अग्रलेखाची प्रतिमा संदर्भाशिवाय टाकणे योग्य वाटले नाही म्हणून बावलाची कथा पुन्हा एकदा लिहीली आहे.तेच ते पुन्हा लिहीण्याचा दोष माझ्या खात्यात टाकून लेख वाचावा.)

सोबतच्या फोटोत दिसणारे हे पेराच्या आकाराचे , जुळे असावेत असे वाटणारे हिरे इंदूर पिअर्स या नावानी प्रसिध्द आहेत .इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांनी ही हिर्‍यांची जोडी त्यांच्या नविन पत्नी अ‍ॅनी मिलरला विवाहात भेट दिली होती. १९२८ साली महाराज युरोपच्या दौर्‍यावर असताना त्यांची आणि नॅन्सी अ‍ॅनी मिलरची ओळख झाली. महाराज अ‍ॅनीच्या प्रेमात पडले. त्यांनी तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला.महाराज अ‍ॅनीच्या प्रेमात इतके बुडून गेले होते की वेळ पडल्यास धर्म बदलायची तयारी पण त्यांनी केली होती .पण तसे काही झाले नाही. अ‍ॅनीनी हिंदू धर्म स्विकारला .त्यांचे नविन नाव राणी शर्मीष्ठादेवी झाले.
तजेलदार सुंदर स्वच्छ आणि जराही ऐब नसलेले हे हिरे साधारण सेहेचाळीस कॅरेट वजनाचे आहेत.
आपल्या नूतन पत्नीला इतकी सुंदर भेट देणारे तुकोजीराव १९२६ साली युरोपात का आले याचे कारण कळल्यावर कदाचीत बघ या हिर्‍याकडे बघण्याचा आनंदच नाहीसा होण्याची शक्यता आहे.एका खूनाच्या प्रकरणातून चौकशीला सामोरे जायला नको म्हणून सोयीस्कररीत्या महाराज इंदूर सोडून युरोपात फिरत होते. ज्या खुनाच्या प्रकरणात त्यांना चौकशीला तोंड द्यावं लागलं असतं ते प्रकरण मुंबईच्या हाय कोर्टात आजही मुमताझ केस म्हणून प्रसिध्द आहे. सूडाच्या भावनेनी पछाडलेला माणूस कसा पशुत्वावर उतरतो ह्याची ही कथा आहे.
********************************************
बारा जानेवारी एकोणीसशे पंचवीसची मुंबईतली एक संध्याकाळ. साधारण सात साडे सात वाजता विलींग्डन क्लबातून खेळून बाहेर पडलेल्या तीन ब्रिटीश अधिकार्‍यांना कुलाब्यातल्या बराकीत वेळेत पोहचायचं होतं .बोलण्याच्या नादात पेडर रोडवरून खाली उतरल्यावर गाडी चालवणार्‍या लेफ्टनंट सेगर्टनी ह्युजीस रोड कडे न जाता चुकून गाडी गिब्ज रोडवर घेतली तोपर्यंतही त्यांना कल्पना नव्हती की एका खळबळजनक ऐतिहासीक घटनेचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होणार आहेत.
एका बाईच्या किंकाळीने हे शिलेदार भानावर आले आणि पाठोपाठ बंदूकीच्या बाराचे आवाजही आले. दुसर्‍या क्षणी हातात गोल्फक्लब्ज घेऊन सेगर्ट-बेटली स्टीफन पुढे धावले .
अंदाजे आठ दहा माणसांच्या टोळक्यानी एका मोटारीला वेढा घातला होता. त्यांच्या हातात तलवारीसारखी तीक्ष्ण हत्यारे होती .दोघांच्या हातात पिस्तूलं होती. तिघांचेही लष्करी प्रशिक्षण वेळीस कामाला आले. दुसर्‍या क्षणी त्या ब्रिटीश अधिकार्‍यांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला चढवला. हल्लेखोरांचे उद्दीष्ट मोटरमधल्या एका मुलीला जबरदस्तीने गाडीतून बाहेर काढण्याचा असावा पण पुढच्या काही क्षणात हल्लेखोरांनी तिच्या साथीदारावर गोळ्या चालवल्या आणि त्या बाईला वाचवणारा तिचा साथीदार पुरुष जखमी होऊन खाली पडला.
आता हल्लेखोर आणि या शिलेदारांची हातघाईची मारामारी सुरु झाली. हल्लेखोरांपैकी ए कानी बाईच्या चेहेर्‍यावर वार केला. तोपर्यंत कर्नल व्हिकरी नावाचे आणखी एक लष्करी अधिकारी दुसर्‍या मोटारीतून खाली उतरले होते.
लष्करी अधिकार्‍यांचे वाढते बळ पाहून हल्लेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
तिघांना नि:शस्त्र करण्यात त्यांना यशही आलं पण तोपर्यंत सेगर्टच्या खांद्यावर चाकूचा वार झाला. एक पिस्तूलाची गोळी पण चाटून गेली.
दोन हल्लेखोरांना काबूत घेण्यात या अधिकार्‍यांना यश आलं .बाकीचे हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
झटापट संपेपर्यंत ज्या पुरुषाच्या अंगावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या तो मात्र जागीच गतप्राण झाला होता.
********************************************************
त्या बाईचं नाव होतं मुमताज आणि मृताचं नाव होतं अब्दुल कादेर बावला.ती एक नाचणारी आणि तो मुंबईचा एक श्रीमंत व्यापारी. पुढच्या काही दिवसात सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आलं. सगळे हल्लेखोर इंदूरहून मुंबईत आले होते आणि इंदूर संस्थानातचे आणि इंदूरच्या लष्कराचे नोकर होते. हल्ल्यात वापरलेली लाल मॅक्सवेल गाडी पण इंदूरचीच होती.
मुंबई हायकोर्टात खटला सुरु झाला आणि प्रेमाच्या प्रतिशोधाची एक भयानक कहाणी जगासमोर आली.
मुमताज इंदूरच्या महाराजांच्या जनान्यातली एक नाचणारी. महाराज तुकोजीरावांच्या खास आवडीची . काहीजण म्हणतात की महाराजांनी तिला मुंबईच्या कोठ्यावरून पळवून इंदूरला नजरकैदेत ठेवलं होतं. पण तिचं मन गुंतलं होतं मुंबईतल्या अब्दुल कादेर बावलामध्ये. इंदूरच्या त्या जबरदस्तीच्या वास्तव्यात महाराजांपासून तिला एक मुलगी पण झाली पण त्या मुलीला जन्मानंतर एका नर्स करवी मारून टाकण्यात आलं.
महाराजांनी अत्याचाराची सिमा ओलांडल्यावर मुमताज धाडस करून इंदूरहून पळून जाण्यात यशस्वी झाली . दिल्ली-अमृतसर नागपूर मग मुंबई असा प्रवास करत अब्दुल कादेर बावलाकडे आली.
मुंबई तेव्हा ब्रिटीश इंडीयाचा भाग होती आणि त्यामुळेच बावला गाफील राहीला. महाराज सूड घेतील अशी शंका पण कदाचीत त्याच्या मनाला शिवली नसावी पण एका नाचणारीच्या बंडानी महाराजांच्या मनात सूडाचा वणवा पेटला.
***********************************************
मुंबईच्या हाय कोर्टात खटला सुरु झाला. हल्लेखोरांच्या बाजूने वकील होते बॅ. मोहमद अली जीना. एकेक साक्षीदार पुढे येत गेले आणि कहाणी उलगडत गेली.
जीनांनी हल्लेखोरांचे उद्दीष्ट खून नसल्याचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला .पण मुमताजच्या चेहेर्‍यावर केलेला वार त्या मुद्द्याला खोडून काढत होता.
बावलानी गोळ्या झाडल्याचा मुद्दा पण पुढे आला. बावलाचे पिस्तूल कोर्टापुढे आले.त्यातून एकही गोळी झाडली नसल्याचे स्पष्ट झाले.
एक शेवटचा प्रयत्न म्हणून वकीलांनी असा मुद्दा मांडला की मुमताज इंदूरला यायला तयार होती पण बावला विरोध करत होता. इथे बॅ.तेव्हाचे सुप्रसिध्द वकील नरीमन यांनी साक्ष दिली की या हल्ल्याच्या काही दिवस अगोदर मुमताज त्यांच्या कडे कायदेशीर सल्ला घ्यायला आली होती तेव्हा तिने स्पष्ट केले होते की जीव गेला तरी चालेल पण इंदूरला जाणार नाही.
सरकारी वकील आणि न्यायाधीशांनी शेवटपर्यंत कोणाच्या आदेशावरून हा खून करण्यात आला हे सत्य जगासमोर येऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न केलांयायाधिशांनी ज्युरीसमोर केलेल्या भाषणाच्या प्रत्येक विधानात इंदूरकडून एव्हढाच उल्लेख आला. तुकोजीरावांचे नाव प्रत्यक्ष घेण्यात सगळेच घाबरत होतेआणि महाराज आपल्या रंगीन रात्री इंदूरात सुखाने घालवत राहीले.सर्वसाधारण सरकारी नोकरांच्या बचावाला बॅ. जीनांसारखा वकील कसा उभा राहीला याची वाच्चता पण कोणीही केली नाही.
सात गुन्हेगारांना शिक्षा ठोठावण्यात आली. तिघांना फाशी तर इतरांना जन्मठेप.
जन्म ठेप झालेल्यापैकी एका कोर्टातच वेड लागले.
फणसे नावाच्या एका हल्लेखोराला शिक्षेत सूट द्यावी असे न्यायाधिशांच्या मनात असूनही त्यांना तसे करता आले नाही.
केस अपीलात प्रिव्ही कौन्सीलासमोर लंडनला चालवण्यात आली. दहा हजार पौंडांचा बयाणा घेऊन सर जॉन सायमन या ज्येष्ठ कायदे तज्ञाला उभे करण्यात आले पण काही उपयोग झाला नाही.
महाराह तुकोजीराव इंदूरमध्ये मौजेत होते.
त्यांच्या वैयक्तीक सूडाच्या प्रवासात अनेक माणसं जीवाला मुकली.
*******************************************************
एकदा कायदेशीर तरतूदी संपल्यानंतर तुकोजीरावांना ब्रिटीशांनी कयद्याच्या कचाट्यात धरले . त्यांच्या समोर एकतर कायदेशीर चौकशीला सामोरे जा किंवा राज्यत्याग करा असा पर्याय ठेवण्यात आला.
तुकोजीरावांवी दुसरा पर्याय स्विकारला.तुकोजीरावांनी सिंहासन सोडले आणि सतरा वर्षाच्या त्यांच्या अल्पवयीन मुलाला, यशवंतरावांना गादीवर बसवले.
शक्य तो दूर रहा असा मैत्रीपूर्ण सल्ला ब्रिटीशांनी दिला असल्यामुळे ते युरोपात गेले आणि इथेच त्यांचीभेट नॅन्सी अ‍ॅनी मिलरसोबत झाली.महाराजांचे हे लग्न पण टिकले नाही .घटस्फोट झाला आणि इंदूर पिअर्सची जोडी बाजारात विकायला आली.
हॅरी विन्स्टन नावाच्या सुप्रसिध्द जव्हेर्‍यानी ती जोडी विकत घेतली .या हिर्‍यांना परत एकदा पैलू पाडण्यात आले. त्यानंतर इंदूर पिअर्सची विक्री करण्यात आली. काही दिवसानी हॅरी विन्स्टननी ते परत विकत घेतले आणि पुनश्च विकले.सरतेशेवटी आता ही इंदूर पिअर्सची जोडी रॉबर्ट मोवाड ह्या आणखी एका सुप्रसिध्द जव्हेर्‍याच्या संग्रहात आहे.
*********************************************************
इंदूर पिअर्स आहेत तिथे सुरक्षीत आहेत पण काही प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.
मारणारे फाशी गेले ते त्यांच्या गुन्ह्यातील सहभागामुळे पण पंचवीस तीस वर्षाच्या या तरुणांना इरेस घालणारा कायद्याच्या बाहेर कसा राहीला आणि ते सुध्दा न्यायप्रिय म्हणून मिरवणार्‍या ब्रिटीशांच्या राज्यात ?
अब्दुल कादेर बावलाला न्याय मिळाला पण मुमताझ आणि तिच्या मुलीला न्याय मिळाला का ?
नॅन्सी मिलरची राणी शर्मीष्ठादेवी म्हणून इतिहासात नोंद झाली .पण प्रतिशोधाच्या पाशवी प्रवासात मुमताझ कुठे गेली हे कुणालाच माहीती नाही.
तुकोजीराव सुध्दा ब्रिटीशांच्याच काय पण आकाशातल्या कायद्याच्या हातावर तुरी देऊन कसे उजळमाथ्यानी जगत राहीले .
मुमताझचं बावलावरचं प्रेम आंधळं होतं.
तुकोजीरावांचा प्रतिशोधही आंधळा होता.
ब्रिटीशांचा कायदा पण आंधळा होता.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

9 Nov 2010 - 10:05 pm | रन्गराव

कथा म्हणून मनोरंजक आहे. पण ह्यामागे ईंग्राजांच कुटील कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. होळ्करांना गादीवरून काढण्यासाठी रचलेला सापळा असण्याची शक्यता आहे.

प्रियाली's picture

9 Nov 2010 - 11:05 pm | प्रियाली

ह्यामागे ईंग्राजांच कुटील कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. होळ्करांना गादीवरून काढण्यासाठी रचलेला सापळा असण्याची शक्यता आहे.

हो ना. कदाचित मुमताझचाच प्लॅन असावा. ती इंग्रजांना सामिल असावी आणि होळकरांना कचाट्यात टाकत असावी. मग आपण त्यात नाही हे दाखवण्यासाठी थोडंफार जखमी व्हायचं. वेनस डे मध्ये नाही का जिम्मी शेरगील होतो तसाच. मुमताझचंच कारस्थान असणार. नाहीतरी, स्त्रिया पाशवी असतात हे सिद्ध झालेले आहेच. ;) मी शीर्षक वाचलं तेव्हाच कथानकात घोळ आहे हे लक्षात आलं. पाशवी असा शब्द वापरला आणि तो ही पुरुषाला? हे बरे नव्हे. :(

असो.

बाकी कथा मनोरंजक आहे. अरुंधती, भुलभुलैय्या, चंद्रमुखी वगैरे सारखे कथानक आहे. ;)

लॉरी टांगटूंगकर's picture

9 Nov 2010 - 10:57 pm | लॉरी टांगटूंगकर

लेखन आवडले !!!

या होळकर आणि शिंदेनी स्वराज्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत म्हणूनच त्यांची संस्थाने वाचली .त्यांना दूर-दृष्टीसाठी बरे म्हण्यचे कि देशाशी गद्दारीसाठी दोषी म्हनायचे ?
पहिले यशवंतराव होळकर (१८०९ च्या काळातले)यांचे बरेच प्रयत्न होते पण महादजी शिंदे यांचे पुत्र (दत्तक)दौलतराव यांनी तर हातात न घेतलेलेच शस्त्र टाकून दिले.आमचे लोक मात्र राज्य घालवण्यासाठी पेशवा जवाबदार असे म्हणून मोकळे झाले.

सहमत. आणि राज्य अटकेपार पोहोचवणारे पेशवेच हे सोयीस्करपणे दुर्लक्षित केले जाते.

आजही यांचे वंशज अफाट जहागिरीवर ऐष करत आले आहेत आणि पुण्यात पेशव्यांची वंशज मात्र लुनावर फिरताना दिसत असे.
शिंदे, होळकर, दक्षिणेतले निजाम किंवा म्हैसूरचे चामराजेन्द्र वडियार, सगळे एकाच माळेचे मणी.

हिरे किंवा तत्सम कुठल्याही वस्तू आवडत नाहीत पण लेख आवडला.

एक गोष्ट खटकली ती अशी: ज्याच्यावर अन्याय होतो तो सूड घेतो, अन्याय करणारा नव्हे. त्यामुळे त्या इसमाने सूडापोटी... असे जे जे उल्लेख लेखात केले आहेत ते अयोग्य वाटतात.
त्या बाईने काही प्रत्युत्तर (उघड किंवा कट आखून) द्यायचा प्रयत्न केला असता तर त्याला सूड म्हणता येईल.

मालोजीराव's picture

10 Feb 2013 - 11:25 am | मालोजीराव

आजही यांचे वंशज अफाट जहागिरीवर ऐष करत आले आहेत आणि पुण्यात पेशव्यांची वंशज मात्र लुनावर फिरताना दिसत असे.

:)) मग इनो घ्या !

dadadarekar's picture

1 Oct 2015 - 10:29 am | dadadarekar

मोघल्व इंग्रज याविरुद्ध कोकलत फिरणारे सगळे राजे / संस्थानिक हे मोहरा सिनेमातील नस्रुद्दीन शहाचे अवतार होते.

पुष्करिणी's picture

10 Nov 2010 - 12:01 am | पुष्करिणी

होळकरांच्या मनमानीची कथा रोचक ....त्या काळीही न्याय पैशानं विकत घेता येतच होता म्हण्जे

Pain's picture

10 Nov 2010 - 10:21 am | Pain

मग कधी घेता येत नव्हता ?

शिल्पा ब's picture

10 Nov 2010 - 12:02 am | शिल्पा ब

छान लिहिलंय..
पण हे एक बरं आहे...पैसा असेल तर काय वाट्टेल ते करून मोकळं राहता येतं. बाकी सगळं गेलं चुलीत..
मी अशीच एक मायकल मूर ची फिल्म पहिली तुनळीवर ..क्लिंटन दांपत्याबद्दलची...त्यांनी म्हणे कमीतकमी ४० खून करावलेले आहेत आत्तापर्यंत...त्या फिल्ममध्ये कारण वगैरे सगळं दाखवलं आहे...बातम्यांचे संकलन आहे..असो. चालायचेच.

मराठी कथालेखक's picture

28 Apr 2016 - 6:01 pm | मराठी कथालेखक

आपले बिल आणि हिलरी क्लिंटन ?
काय म्हणता ? विश्वास नाही बसत...

गामा पैलवान's picture

28 Apr 2016 - 8:06 pm | गामा पैलवान

मक, मी ऐकलेला आकडा १०० आहे. सर्वात प्रसिद्ध हत्या अर्थात व्हिन्स फोस्टर. ही आत्महत्या म्हणून दडपण्यात आली.
आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

29 Apr 2016 - 11:26 am | मराठी कथालेखक

बापरे !!
अजून काही दुवे असतील तर द्या, मुळातूनच वाचले पाहिजेत.
इतके खतर्नाक लोक तिथे राष्ट्राध्यक्ष होतात...अवघड आहे.

गामा पैलवान's picture

29 Apr 2016 - 11:58 am | गामा पैलवान

मक,

'क्लिंटन बॉडी काउंट' वर गुगलून पाहिलं तर हे सापडलं : http://whatreallyhappened.com/RANCHO/POLITICS/BODIES.php

आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

29 Apr 2016 - 11:27 am | मराठी कथालेखक

कोणती फिल्म
दुवा देता येईल का ?

सेक्स-व्हायलेन्स थ्रिलर!

("म्हाराजांच्या टायमाला हे असं नव्हतं!" ही हळहळ फक्त विस्मृरिरंजनात होऊ शकते.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Nov 2010 - 9:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

रामदास काका, तुमची गोष्ट सांगण्याची पद्धत आवडते.

कवितानागेश's picture

10 Nov 2010 - 12:33 am | कवितानागेश

इथे बिच्चार्‍या इंदूर पिअर्स चा काय संबंध?
उगीच हिर्‍याना का बदनाम करायचे?
( मला तर बाबा आवडतात रत्न!)

मी-सौरभ's picture

10 Nov 2010 - 12:50 am | मी-सौरभ

आवडतात = ओके
परवडतात = ????

शिल्पा ब's picture

10 Nov 2010 - 5:11 am | शिल्पा ब

आवडत असले अन परवडत नसले तरी नक्कल मिळतेच कि..

बाब्बौ!
आधीच हिर्‍यांचं फारसं वेड नव्हतं.
आता तर नावच नको!;)
एकंदरीत वेगवेगळ्या संस्थानिकांचे असेही किस्से आहेत तर.
जीव तोडून काम करणार्‍यांपेक्षा मज्जा करणारेच जास्त प्रकाशात असतात.
निष्ठूरपणा हा कि लोकांना मारतातच पण आपल्याच मुलांना मारणे जमू शकते.
हे असे पैसे उधळायला जमते कारण पुरेशी कामं नसतील करायला.;)

शिल्पा ब's picture

10 Nov 2010 - 5:09 am | शिल्पा ब

<<<हे असे पैसे उधळायला जमते कारण पुरेशी कामं नसतील करायला.Wink

कामं मस एत...करायची इच्छा नको का?

सहज's picture

10 Nov 2010 - 6:55 am | सहज

इस्ट इंडीया कंपनी सरकार (प्रायव्हेट मल्टीनॅशनल) व नंतर ब्रिटीश पार्लमेंटला उत्तरदायी असलेले प्रशासन (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनशीप) यांनी केलेले गैरव्यवहार व असा वारसा मिळालेली भारतीय नोकरशाही यावरही प्रकाश पाडावा ही विनंती.

जे ब्रिटिश अधिकारी हळुहळू सर्व संस्थानांना अंकीत करुन घ्यायला लागले त्यांना 'नबॉब' (Nabob) ही उपरोधीक पदवी मिळाली. अल्पावधीत अश्या सगळ्या अधिकार्‍यांकडे अमाप संपत्ती गोळा झाली. जेव्हा प्लासीची लढाई ब्रिटिशांनी जिंकली इस्ट इंडीया कंपनीचे शेयर्स एका रात्रीत १२% टक्क्यांनी वाढले. गव्हर्नर ऑफ मद्रास, थॉमस पीटने गोळा केलेली संपत्ती त्याला पुढे त्याच्या नातवाला व पणतूला ब्रिटनचा पंतप्रधान करण्याच्या कामी आली. १७८० पर्यंत ब्रिटीश पार्लमेंटच्या १०% जागा ह्या नबॉब मंडळींच्या ताब्यात होत्या.

एक दुवा

आता एकामागे एक लेख येउ द्याच.

रामदास's picture

10 Nov 2010 - 10:41 am | रामदास

पिट डायमंड म्हणून प्रसिध्द आहे.त्याचे नाव नंतर (बहुतेक ) बदलले. हा हिरा पिटनी चोरला होता असेही म्हटले जाते.

ज्ञानेश...'s picture

10 Nov 2010 - 9:51 am | ज्ञानेश...

रंजक कथा आहे. इतिहासाच्या पोटात काय काय दडलेले असेल, सांगता येत नाही.

रामदास यांचे अशा लिखाणातले प्रभुत्व पाहता, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 'बूटासिंग आणि जैनुब' यांच्या सत्यकथेवरही लिहावे. तेसुद्धा इतिहासातले असेच एक अनवट प्रकरण आहे.

स्वानन्द's picture

10 Nov 2010 - 10:08 am | स्वानन्द

रंजक कहाणी!!
तुमची कथनाची पद्धत पण मस्तच.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Nov 2010 - 11:14 am | llपुण्याचे पेशवेll

छान कहाणी. नवाकाळातील प्रत्यक्ष उतारेही मस्तंच कृ.प्र. खाडीलकरांचा नवाकाळ अजूनही अग्रलेखांचा बादशहा म्हणून मिरवून घेतो. अर्थात तो हल्ली कोण वाचत नाही हा भाग वेगळा.

मराठमोळा's picture

10 Nov 2010 - 11:23 am | मराठमोळा

मस्त कथा. :)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2010 - 11:44 am | परिकथेतील राजकुमार

नेहमीप्रमाणेच सुंदर आणि खिळवुन ठेवणारे लेखन.

अविनाशकुलकर्णी's picture

10 Nov 2010 - 11:59 am | अविनाशकुलकर्णी

कथा खिळवुन ठेवते..खुप प्रवाहि वर्णन..व रसाळ हातोटी..
मजा आली वाचताना..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Dec 2010 - 8:16 am | निनाद मुक्काम प...

लेखन शैली आवडली राव तुमची

विजुभाऊ's picture

8 Dec 2010 - 10:07 am | विजुभाऊ

डायमंड " होप" याबद्दल लिहावे.
" http://history1900s.about.com/od/1950s/a/hopediamond.htm "
अशी रामदासकाकाना इननती.

वेताळ's picture

8 Dec 2010 - 11:04 am | वेताळ

होळकरानी जर त्याच्या शौकासाठी ७ जणाना फासावर लटकवले असेल तर त्याचा धिक्कार...

मालोजीराव's picture

7 Feb 2013 - 2:16 pm | मालोजीराव

हिरा है 'सदा' के लिये :P

बर्‍याच दिवसांनी हा धागा परत पाहिला... :)
तसेच वरच्या प्रतिसानी मला माझाच हिरा है सदा के लिये... हा धागा सुद्धा आठवला. :)

मृदुला सूर्यवंशी's picture

8 Feb 2013 - 2:23 am | मृदुला सूर्यवंशी

मनोरंजक आहे पण या सुंदर हिर्यांचा असा ईतिहास असेल असं वाटलं नव्हतं. तुमचे बाकिचे लिखाण कुठे वाचायला मिळेल? कृपया लिंक्स द्याल का?

शुचि's picture

9 Feb 2013 - 1:58 am | शुचि
प्रसाद गोडबोले's picture

9 Feb 2013 - 1:57 am | प्रसाद गोडबोले

द्रव्येण सर्वे वशः ||

कथा रंजक वाटली. लेखनशैली खूप आवडली.

गामा पैलवान's picture

1 Oct 2015 - 1:16 am | गामा पैलवान

रामदास,

तुमची लेखनप्रतिभा विलक्षण आहे. तुमची माहिती आणि ज्ञान चतुरस्त्र आहे यात शंकाच नाही. प्रस्तुत प्रकरण यापूर्वी माझ्या वाचनात आलं होतं. तुमच्या लेखातून त्याची दुसरी बाजू कळली. त्याबद्दल धन्यवाद. :-)

माझ्या वाचण्यात आलेलं लेखन इथे आहे : http://prabodhankar.org/node/249

वरील दुव्यानुसार मुमताज ही तुकोजीरावांची विश्वासू स्त्री होती. ती बावलासोबत पळून गेली याचा अर्थ तिने महाराजांचा विश्वासघात केला असा लावला जातो. सोबत तिने थोडीफार संपत्तीही पळवली होती. म्हणून महाराजांनी वा त्यांच्या निकटवर्तीयांनी तिला शिक्षा केली असावी असं स्पष्टीकरण आहे (समर्थन नव्हे).

फासावर जाणाऱ्यांनी जिवाची भीती असूनही महाराजांचं नाव घेतलं नाही. यामागे मुमताजने आपल्या राजाची फसवणूक केल्याची भावना असू शकते. महाराजांची दहशत असेलंच असं ठामपणे म्हणता येत नाही, कारण जीव तर जाणारच होता.

या प्रकरणाची वेगळी बाजू अगोदरपासून उजेडात आलीये. तिचा उल्लेख व्हावा म्हणून हा संदेशप्रपंच. :-)

आ.न.,
-गा.पै.

dadadarekar's picture

1 Oct 2015 - 5:45 am | dadadarekar

इंग्रज मोघल यापेक्षा संस्थानिकच लबाड व भंपक होते , असे माझे मत आहे.

गामा पैलवान's picture

1 Oct 2015 - 12:22 pm | गामा पैलवान

दादा दरेकर,

जर संस्थानिक एव्हढे भंपक होते, तर इंग्रजांनी त्यांची राज्ये सरसकट खालसा का केली नाहीत? कोणी अडवलं होतं?

आ.न.,
-गा.पै.

खटपट्या's picture

1 Oct 2015 - 12:34 pm | खटपट्या

बरं मग ?

महाराज अ‍ॅनीच्या प्रेमात इतके बुडून गेले होते की वेळ पडल्यास धर्म बदलायची तयारी पण त्यांनी केली होती .

कामातुरणं न भयं न लज्जा .
थोडसं अवांतर . मध्ये वाचण्यात आलं . जगातला सगळ्यात मोठा नादिरशहाने हिंदुस्थानातून पळवलेला 'दर्या -इ -नूर ' ३१०६.७५ क्यारेटस (६२१.३५ ग्रामस ) तेहरानच्या ज्वेलरी museum आहे म्हणे . ह्याच्यातला ६० क्यारेटस चा भाग तिथल्या राणीच्या मुकुटासाठी कापण्यात आला होता . 'कोह-इ-नूर' ७९३ क्यारेटस चा हिरा तुकडे तुकडे करून आता २१ grams चा छोटासा झालाय . दुसरी एक दु:खद बातमी म्हणजे भारतातून पळवून लेलेलं
मयूर सिंहासन कधी तेहरान ला पोच्लंच नाही म्हणे . ज्वेलरी museum मध्ये असलेल्या सिंहासनाला काही लोक ज्याला मयूर सिंहासन समजतात ते खरं तर सूर्य सिंहासन आहे . मयूर सिंहासन इराण ला नेत असताना नादिर्शाहाच्या सैन्यामध्ये बंडाळी माजली आणि त्यांनी कुऱ्हाडीच्या घावांनी मयूर सिंहासनाचे तुकडे केले आणि आपापसात वाटून घेतले . :-(

dadadarekar's picture

1 Oct 2015 - 7:04 pm | dadadarekar

इथल्या राजानी देश फाडून खाल्ला त्याचे सुतक नाही.आणि मुसलमानानी काय खाल्ले याच्याबद्दल का किंकाळ्या फोडायच्या ?

गामा पैलवान's picture

2 Oct 2015 - 2:54 am | गामा पैलवान

बरं मग?
(सौजन्य : खटपट्या)
-गा.पै.

विवेकपटाईत's picture

28 Apr 2016 - 8:52 pm | विवेकपटाईत

कथा आवडली. बाकी जिसकी लाठी उसकी भैंस हि कहावत आहेच.

आरोह's picture

28 Apr 2016 - 9:40 pm | आरोह

बोलीवूडवले ह्या कथेवर एक चित्रपट काढू शकतात... बाय द वे शिंद्याचे नाव सिंदीया कसे झाले.कोणाला माहित आहे का?

बबन ताम्बे's picture

29 Apr 2016 - 12:45 pm | बबन ताम्बे

धर्मेंद्रचे धरमिंदर, जितेन्द्रचे जितेंदर, स्टेशनचे इस्टेसन, इलेक्ट्रीकचे इलैकट्रीक झाले तसे शिंदे चे सिंदीया झाले असावे.
य ला ज , लक्ष्मणला लखन , काय च्या काही उच्चार करतात उत्तर साइडला.