मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'असल उत्तर'! भाग-१

मुशाफिर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वि. सू. : मी युद्धशास्त्रातला जाणकार नाही. पण भारतीय सैन्याने प्रतिकूल परिस्थीतीत मिळवलेल्या एका महत्वाच्या विजयाची आपल्या सगळ्याना आठवण असावी एव्हढाच ह्या लेखाचा उद्देश आहे. आज ८ सप्टेंबर! स्वतंत्र भारताच्या लष्करी इतिहासातील एका फार महत्वाच्या लढाईची सुरूवात आजच्याच दिवशी झाली होती. ही लढाई १९६५ च्या युद्धाला कलाटणी देणार्‍या महत्वाच्या लढायांपैकी सर्वात महत्वाची मानावी लागेल. पण त्याआधी १९६५ च्या युद्धाची थोडीशी पार्श्वभूमी समजावून घ्यावी लागेल. १९६२ च्या चीनकडून झालेल्या पराभवातून भारतीय सैन्यदलं अजून पूरती सावरली नव्हती. नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री नुकतेच पंतप्रधान म्हणून निवडून आले होते. पाकिस्तानी लष्कर अमेरिकेच्या मदतीने चिलखती दल आणि रणगाडा दलांच नुतनीकरण करत होतं आणि भारतीय लष्कराकडे मात्र अजूनही दुसर्‍या महायुद्धात वापरलेले रणगाडे आणि युद्धसामग्रीच होती. राजकिय आणि सामरिकदृष्टया भारताची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पाकिस्तानात तेव्हा ज. अयुब खान सत्तेवर होते आणि उघडपणे भारताला आव्हान देउन "धोतीवाले क्या लडेंगे?" असे उपहासत्मक उद्गार काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. ऑगस्ट १९६५ च्या सुमारास झुल्फीकार अली भुत्तोंच्या (तेव्हाचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री) पाठिंब्याने पाकिस्तानी सैन्याने काश्मिर सीमेवर आगळिक करायला सुरुवात केली. 'ऑपरेशन जिब्राल्टर' ह्या नावाने हे प्रकरण (कु)प्रसिद्ध आहे. पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षित केलेले 'मुजाहिदीन' काश्मिरमध्ये घुसखोरी करून घातपात करू लागले की ज्यामुळे भारतीय सैन्याला हालचाल करणं फार कठिण होउन बसल असतं. परंतु, स्थानिक जनतेचा अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने, तर काही ठिकाणी चक्क विरोध झाल्याने पाकिस्तानी सैन्याची चांगलीच अडचण झाली. त्यातच भारतीय सैन्याने चोख प्रत्युतर द्यायला सुरुवात केल्यामुळे पाकव्याप्त काश्मिरचा काही भागही भारताच्या ताब्यात आला. तरीही, काश्मिर आघाडी भारताला जड जात होती. अशा परिस्थितीत पंजाबमधून नवीन आघाडी उघडून पाकिस्तानवर दबाव आणावा, ह्या लष्कराच्या प्रस्तावाला शास्त्रीजींनी तत्काळ मान्यता दिली. ह्यामुळेच पुढे भारतीय सैन्याला काश्मिर आघाडीवर थोडी उसंत मिळू शकली. पण भारतीय सैन्य लाहोरच्या 'कंटॉंमेंन्ट' पर्यंत जाउन जरी धडकलं असलं, तरी पाकिस्तानी सैन्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र होती आणि तीही भारताकडे असलेल्या शस्त्रास्त्रांच्या प्रमाणात कितीतरी अधिक! त्यामुळे पंजाब आघाडी लढवणं हीसुद्धा फार सोपी गोष्ट नव्हती. त्यातच पाकिस्ताननेही आक्रमक धोरणं अवलंबलं आणि खेमकरण ताब्यात घेउन भारताच्या भूभागात प्रवेश केला. इथून पुढे सुरूवात झाली दुसर्‍या महायुध्दानंतरच्या (आणि १९६६ च्या अरब-ईस्त्रायल संघर्षाच्या आधीच्या) सगळ्यात मोठ्या रणगाड्यांच्या लढाईला! ती लढाई म्हणजेच भारताचं पाकिस्तानला दिलेलं 'असल उत्तर'! (क्रमशः)

वाचने 8537 वाचनखूण प्रतिक्रिया 28

नंदन 08/09/2010 - 05:18
सुरुवात. पुढील भागांची वाट पाहतो आहे.

In reply to by नंदन

छोटा डॉन 08/09/2010 - 14:04
नंदनशी सहमत. सुरवात छानच झाली आहे, पुढचा भाग लवकर येऊद्यात ! वाट बघतो आहे. :) - छोटा डॉन
छान! हीच ती लढाई का जिथे भारतीय लष्करी अभियंत्यांनी युद्धभूमीच्या आसपासच्या कालव्यांमधून पाणी सोडून सगळीकडे चिखल केला आणि पाकड्यांचे पॅटन रणगाडे त्यात फसून गेले ? (पॅटन रणगाड्यांची दफनभूमी )

गणेशा 08/09/2010 - 13:40
पुढे वाचण्यास उत्सुक आहे. एन्.डि.ए. च्या अभ्यास क्रमात शिवाजी महारांजांच्या ७ लढाया असलेले पुस्तक आहे. त्यामधील एका कथेचा आधार येथे कर्णल यांनी घेतला होता असे त्यांनी सांगितले होते. सर्व भारतीय सैनिकांना मनापासुन सलाम ! तुम्ही छान लिहित आहात .. वाचत आहे . - गणेशा

बिपिन कार्यकर्ते 08/09/2010 - 14:51
पूर्वपिठीका उत्तम जमली आहे... पुढे लिहा. आणि मोठा भाग लिहा. जालावर असल उत्तर बद्दल खूप काही उपलब्ध आहे. तुमचे स्वतःचे असे काही आकलन / विश्लेषण यावे अशी इच्छा आहे. :)

धमाल मुलगा 08/09/2010 - 15:02
मस्त विषयाला हात घातला आहे मुशाफीरसाहेब :) आतुरतेनं पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.

स्वतन्त्र 08/09/2010 - 15:45
मस्त विषय आणि सादरीकरण ! पुढच्या भागाची चातकासारखी वाट बघत आहे ! येऊ द्या !

टुकुल 08/09/2010 - 16:15
वेगळा आणी मस्त विषय, सुरुवात तर मस्त झाली आहे, आता पुढचे भाग पटापट येवुद्यात --टुकुल

In reply to by पुष्करिणी

स्वाती दिनेश 08/09/2010 - 19:51
मस्तच सुरूवात, पुढच्या भागांकरता जास्त वाट बघायला लावू नका . पुष्करिणी सारखेच म्हणते. स्वाती

बाबा योगीराज 08/09/2010 - 22:17
मस्तच्..............होऊन जाऊ देत................ पुढ्च्या भागा॑ची वाट बघत आहोत............. ______________________________