मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपावाची धोरणे सांगण्याचा फायदा

धनंजय · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
झालेली एकूण चर्चा बघता कोणतेही नवीन मुद्दे उपस्थित होत नाहीयेत तेच ते गुर्‍हाळ चालू आहे. बहुतेक सर्व मुद्द्यांचा विचार संपादक मंडळाने आधीच केलेला आहे. आता येणारे प्रतिसाद हे वेगळेच वळण घेत आहेत त्यामुळे इथे लेखात दिलेल्या 'आधिकारिक धोरणांच्या' कलम ९ अनुसार हा धागा आता केवळ वाचनमात्र करण्यात आला आहे. कळावे. -संपादक मंडळ हल्लीच मिसळपावाची आधिकारिक धोरणे प्रसिद्ध झाली आहेत. त्या बाबतीत दोन प्रकारचे मूलभूत प्रश्न काही प्रतिसादकांच्या मनात उद्भवले आहेत. (१) एक मूलभूत प्रश्न कोणी असा आहे - दंड करण्याचा अधिकार हा जवळजवळ नेहमीच अतिरेकाने वापरला जातो. उदाहरणार्थ : आणिबाणीच्या पूर्वीच्या काळात न्यायालयाने सर्व महत्त्वाच्या बाबतीत इंदिरा गांधींना निर्दोष ठरवले, मात्र कुठल्याशा क्षुल्लक बाबतीवरून त्यांना पदच्युत केले. त्याच इंदिरा गांधींनी आणिबाणीची घटनात्मक तरतूद वापरूणिलोकांना स्थानबद्ध करण्याच्या अधिकाराच अतिरेकी वापर केला. हा मूलभूत प्रश्न कुठल्याही व्यवस्थेबद्दल आहे. अमुक एक व्यवस्था [मिसळपाव] या धोक्यापासून कशी वाचू शकेल, हे ठरवण्यासाठी व्यवस्थेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन प्रश्न मांडला पाहिजे. (१अ) या मुद्द्याचा नेमकेपणा वाढवत असे सांगण्यात येते, की निर्णय घेणार्‍यांची "चौकडी" - उदाहरणार्थ : मर्यादित संपादकमंडळ - असेल, तर "चौकडी"चा निर्णय बहुतेक सदस्यांना अमान्य होतील. यात पुन्हा इंदिरा-गांधी-आणिबाणीमधील उच्चाधिकारी "चौकडी"चा दृष्टांत दिला जातो. परंतु या मुद्द्याची व्याप्ती सुद्धा नको तितकी रुंद आहे. राज्य/लोकशासनाच्या संदर्भात बघता शासनातच "मंत्रीमंडळ" असते, "विधानसभा" असते, हे सर्व विशेष अधिकार असलेले मतदार-नागरिक असतात. म्हणजे "चौकडी"च होय. "चौकडी"च असू नये असे म्हणता येत नाही. मात्र लोकशाहीत ही "चौकडी" बहुमताने बदलण्यासाठी सर्व मतदार-नागरिकांना काहीतरी प्रक्रिया उपलब्ध असते. सर्व मतदार किंवा नागरिक मूलभूत दृष्ट्या समसमान असतात, ते मतदार-नागरिक कोण त्याची व्याख्या... या सर्व गोष्टी घटनेमध्ये बर्‍याच स्पष्ट सांगितलेल्या आहेत. समूहस्थळाच्या बाबतीत "सर्व सदस्य" म्हणजे कोण, हे तितके स्पष्ट माहित नसते. मिसळपाव संकेतस्थळासाठी "लोकशाही शासनव्यवस्था" हा सुयोग्य दृष्टांत नव्हे. "सेवाभावी संस्थेकडून सेवा मिळवणारे लोक" हा "सदस्य"करिता सुयोग्य दृष्टांत आहे. अशा रीतीने सेवा मिळवणार्‍यांना अधिकार वगैरे असतात, पण ते बहुमताचे अधिकार नसतात. याबद्दल अधिक विचार मिसळपावावर पूर्वी झाला आहे. (मिसळपावाची घटना : लोकशाही संस्था : "लोक" म्हणजे कोण?) सेवाभावी संस्थेतही कार्यकारी मंडळ, विश्वस्त, वगैरे "चौकडी" असते. सेवाग्राहक या चौकडीला काढू शकत नाहीत. अमुक सेवा पुरवावी की नाही, वगैरे निर्णय घेतले जातात. मात्र ही व्यवस्थाच मुळापासून अन्याय्य आहे, असे ऐकिवात नाही. - - - (२) आणखी एक वेगळाच मूलभूत मुद्दा काही लोक उपस्थित करतात : जर शेवटी असे म्हणायचे आहे "व्यवस्थापनापाशी सर्वाधिकार आहे" तर बाकी धोरणे सांगण्याची गरजच काय आहे? या बाबतीत आक्षेपक आपल्या रोजव्यवहारातल्या अनुभवांकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. एखाद्याकडे अंततोगत्वा सर्व अधिकार असले, तरी रोजव्यवहारासाठी काही धोरणे सांगण्यात काही सोय असते. अगदी वाईट उदाहरणसुद्धा घ्या : गल्लीत दमदाटी करून वर्गणी घेणारा गुंडही "(१) वर्गणी दिली तर पुढच्या सणापर्यंत पैसे मागणार नाही, (२) शेजारच्या गल्लीतला गुंड वर्गणी मागायला आला तर त्याला पळवून लावेन..." अशी काही तात्पुरती धोरणे सांगतोच. ही धोरणे बदलायचे सर्व अधिकार गुंडाकडे असले तरी तात्पुरती धोरणे कळण्यात काही सोय असते. वाईट गोष्ट सोडा - या ठिकाणी "मिसळपाव" स्थळ काही सेवा मोफत पुरवते आहे. या कुठल्या सेवा आहेत? ते सांगणारे धोरण कळले तर बरे असते. पुढे कधी "मिसळपाव" संकेतस्थळावर झुलू कविता लिहिण्याची मुभा देण्याचे सर्व अधिकार व्यवस्थापनाकडे आहेतच. तरी हल्लीच्या काळात मराठी संदेशनाचीच मुभा देत आहोत, हे धोरण सांगण्यात आणि वाचण्यात मला तरी खूपच सोय वाटते. आक्षेपकांचे खरा रोष "सर्वाधिकार असूनही धोरणे सांगतो" याविषयी नाही, असे वाटते. आपल्याला ठीक वाटतो तो मजकूर संपादित करण्याबाबत, आणि सदस्यत्व काढून टाकण्याबाबत आहेत. "अमुक प्रशस्त आहे" हा आपला विचार कधी कोणी अमान्य करेल, आणि अमान्य करणार्‍यास काही विशेष अधिकार असेल, याबद्दल अन्यायाची भावना आहे. या बाबतीतही त्यांचा रोष त्यांच्या रोजव्यवहारातल्या अनुभवांशी विसंगत असावा. कोणी चहापानासाठी, गावजेवणासाठी आवतन देते. घरातून किंवा मांडवातून कोणालाही घालवून टाकायचा अधिकार आयोजकांना असतोच. तरी "जेवायला, वधूवरांना आशीर्वाद द्यायला जरूर या" असे आवतन असते. त्यातही "आमच्या पाहुण्यांचा अपमान करू नका" अशी विनंती असते. ("आम्ही तुमच्या जावयबापूचा अपमान केलाच नाही" असे म्हणणार्‍याचे युक्तिवाद नामंजूर करण्याचा सर्वाधिकार लगीनघराला असतो.) "गाण्याच्या कार्यक्रमात मुलांना धिंगाणा घालू देऊ नका" असे कोणी सांगते. (कोणी आईबाप म्हणतात - "आमची बेबी रडतेदेखील सुरेल", त्यांच्या युक्तिवादाला नामंजूर करण्याचा सर्वाधिकार आयोजकांना असतो.) व्यवस्थापकांना सर्वाधिकार असले, तरी या काळीची धोरणे कळणे उपयोगी असते, आणि सोयीचे असते. दंडसंहिता बदलू शकत असली, तरी दंडसंहिता काय आहे, ते कळलेले बरे. सोयी पुढे बदलू शकल्या तरी हल्ली उपलब्ध सोयी काय ते कळलेले बरे. मिसळपावावर हीच धोरणे आता प्रसिद्ध होत आहे, ही उत्तम बाब आहे.

वाचने 4133 वाचनखूण प्रतिक्रिया 17

भडकमकर मास्तर Wed, 07/14/2010 - 03:08
ही सगळी धोरणं लिहून काढायला आणि त्यत सुधारणा वगैरे करायला जाम कष्ट होत असतील..... माझ्याकडून विधायक धागे काढण्याचा आणि प्रतिसाद लिहिण्याचा प्रयत्न करेन इतकेच या सार्‍या बराच काळ चालणार्‍या लांबचलांब चर्चेवर म्हणावेसे वाटते...

In reply to by भडकमकर मास्तर

घाटावरचे भट Wed, 07/14/2010 - 03:14
सहमत. शिवाय विंग्रजी फोरम्सवरील 'डूज अँड डोण्ट्स' ची मराठीत 'ध्येयधोरणे' झाली आणि 'मॉडरेटर्स'चे 'संपादक' झाल्यावरच प्रतिसादांचा खच का बरे पडावा? असो.

क्रेमर Wed, 07/14/2010 - 21:36
त्याच धाग्यावर (आधिकारिक धोरणे) हा प्रतिसाद ठरू शकला असता. वेगळा धागा काढण्याचे प्रयोजन कळले नाही. बाकी चालू द्या. चर्चा सुरूच आहे तर मी हात धूऊन घेत आहे. मिसळपावावर मोफत सेवा पुरवली जात आहे, हे मला तितकेसे पटत नाही. मिसळपावावर सेवा देतांना सदस्यांना व्यक्तिगतपणे पैशात मूल्य द्यावे लागत नाही हे ठीक. परंतु सदस्य विनामूल्य ही सेवा उपभोगतात असे वाटत नाही. उदा. वाचकासाठी न आवडणार्‍या सदस्यांचे प्रतिसाद, लेख सहन करणे हे मूल्य असू शकेल. तर लेखकांसाठी नको ते प्रतिसाद येणे हे मूल्य असू शकेल. मूल्य चुकवल्यानंतर लेखक व वाचक दोघांनाही काही एक मोबदला मिळतो, हे मान्य. पण हा मोबदला चुकवलेल्या किंमतीपेक्षा अधिक असतो किंवा नाही, हे सांगता येत नाही. मिसळपावाचे मालक/ चालक यांना काहीही मोबदला (पैशात नसला तरी) मिळत नसल्यास ते संस्थळ चालवतील असे वाटत नाही. औपचारिक करार झालेला नसला तरी सेवादाता (मिपा मालक) व सेवाभोक्ते (मिपा सदस्य) यांच्यात एक अनौपचारिक करार आहे. व त्या कराराचे तपशील मांडले जाणे उपयुक्त आहे. या अर्थाने धनंजय यांच्याशी मी सहमत आहे.

सहज Wed, 07/14/2010 - 07:01
मस्त समजावुन दिले आहे. आवडले. :-)

शिल्पा ब Wed, 07/14/2010 - 08:38
साधे एखादे वाक्य आक्षेपार्ह्य कसे हे विचारले तर ते उडवून लावले...सर्वाधिकार म्हणतात ते हे असावे... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

Dhananjay Borgaonkar Wed, 07/14/2010 - 13:59
मला तरी मिपाची धोरणे योग्य वाटली. अर्थात हे माझ व्यक्तिगत मत आहे. फक्त परत एकदा सांगवेसे वाटते की जेव्हा एखादं लेखन, प्रतिसाद संपादीत होईल तेव्हा संपादकाने कारण दिल्यास योग्य होईल व पारदर्शकता वाढेल.

In reply to by Dhananjay Borgaonkar

लंबूटांग Wed, 07/14/2010 - 21:22
इतकेच माझे सांगणे आहे. आणि हेच जर का त्या धाग्यावरच लिहीले तर सर्वच सभासदांना त्यातून बोध मिळेल.

चित्रा Wed, 07/14/2010 - 20:19
संपादक आणि गुंड यांची तुलना होऊ शकते हे दाखवून देण्याचा आणि मिसळपावावर लोकशाही नाही हे सूचित करण्याचा मोह धनंजय यांना आवरता आला नाही, एवढेच वाटते. असो. मुख्य म्हणजे मिसळपावावर लोकशाही नसताना या प्रश्नांचे काय स्थान असा एक विचार धनंजय यांनी मांडलेला दिसतो. चू. भू. द्या. घ्या. रूढार्थाने लोकशाही कधी येऊ शकते? जेव्हा समाज त्यातील तत्वे मान्य करेल तेव्हा. रूढार्थाने लोकशाहीत एका व्यक्तीला एकच आयडी असतो - जो मत देताना कामी येतो. मिसळपावावर हे आजतरी शक्य होईल असे वाटत नाही (अर्थात हा चालकांचा निर्णय असेल), कारण वेगवेगळे आयडी घेऊन लिहीणारे तेच अनेक लोक येथे आहेत - प्रत्येकाला एकच आयडी हे शक्य आहे, असे मला वाटते, पण या तांत्रिकी गोष्टी करण्यास काही वेळ लागू शकतो. पारदर्शकता आहे, मनमानी नाही हे गुंड/आयोजक म्हणत नाहीत, हे खरे आहे. पण मिपाचे संपादक आपली बाजू मांडताना असे दावे करतात कारण ते गुंड नाहीत! मिसळपावावर अनेक लोकांना मोकळेपणे लिहीता यावे यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. मध्यंतरी एक लेख नजरेत आला: सभा/समारंभ अशा प्रसंगी ध्वनिक्षेपक/कर्णे लावून केलेल्या गोंगाटाचा/अतिशय कर्णकर्कश आवाजांचा रात्रीच्या वेळी लोकांना त्रास होतो. यासाठी पोलिसांना सांगूनही काही फरक पडला नाही अशी काही तक्रार त्यात होती. तक्रार अतिशय वाजवी आहे. पण कोणी म्हणेल की असे आवाज करण्याचा अधिकारही जे वाजवत होते अशा लोकांना आहे. कोणी म्हणेल की तो नाही. तरी साधारणत: बर्‍याच लोकांना ज्याचा त्रास होईल अशी समजूत असते ती गोष्ट टाळण्याकडे आपला कल असतो. हे करण्याचे काही अधिकार हे पोलिसांना अर्थातच जास्त असतात, ते त्यांनी योग्य प्रकारे वापरावे ही अपेक्षाही रास्त असते. मिसळपावावरची धोरणे अशाच प्रकारची आहेत असे मला वाटते. त्यांची अंमलबजावणी जशी होईल तशी सर्वांना सारखी व्हावी असे कोणी सुचवत आहे असे म्हटल्यास काहीच आक्षेप नाही. (याच कारणासाठी संपादकांवर अधिक जबाबदारी आहे हे मला वाटते. शिवाय त्यावरही अधिक काही प्रश्न असल्यास ते चालकांना थेट विचारता येऊ शकतातच फक्त ती वेळ येऊ नये अशी अपेक्षा आणि इच्छा मला वाटते सर्वांचीच आहे). पण कोणालाही मॉडरेशनचे/संपादनाचे (सदस्यांपेक्षा वरचढ) अधिकारच नको असे म्हणणे म्हणजे रात्रीच्या वेळी वाटेल तो गोंधळ घालण्याची परवानगी देण्यासारखे आहे. तरी खरे तर संपादक नसले तरी मिपा चालू राहील असे वाटते. पण संपादक/चालक हे मिपाच्या सुविधांना मानवी चेहरा देतात. नाहीतर काही प्रणाली तयार करून पूर्ण यांत्रिकी स्थळ तयार करणे कठीण नसावे. दुसरा एक माझा व्यक्तिगत आक्षेप या गोष्टीबद्दल नक्की आहे, की आधीच संपादकांबद्दल ते (समर्थाघरचे) कुत्रे आहेत, किंवा आणिबाणीत इंदिराजींना कामी येणारी "चौकडी" आहेत, अशा प्रकारचे सूचित होत असताना त्याबद्दल येथील ज्या सदस्यांना असे लेख/प्रतिसाद उडाल्यामुळे आपला अपमान झाला/आपल्यावर अन्याय झाला असे काही वाटते, त्या सदस्यांचे काय म्हणणे आहे? असो.

In reply to by चित्रा

विसोबा खेचर Wed, 07/14/2010 - 20:47
प्रतिसाद चांगला आहे.. या विषयावर पुन्हा एकदा माझं मत - १) एखाद्या सभासदास संपादक म्हणून नेमताना सदर सभासद हा/ही मिपाचे भले चिंतणारी आहे याची पुरेपूर खात्री मालकाला असावी.. २) एकदा ही खात्री झाली आणि त्या सभासदाची संपादक म्हणून नेमणूक झाली की त्याच्या कामाबद्दल मालकाने निश्चिंत राहावे. त्याने/तिने आपल्या संपादकीय अधिकारात जे काही संपादनाचे निर्णय घेतले असतील त्या बाबत मालकाचा त्यास संपूर्ण पाठिंबा असायला हवा.. ३) त्याच्या/तिच्या कामात कुठलीही ढवळाढवळ करू नये.. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, "मिपाचे मालक/व्यवस्थापक/संपादक कुणालाही कुठलेही उत्तर देण्यास बांधिल नाहीत! - हे मान्य असणार्‍यांनीच कृपया सभासदत्व घेऊन या संस्थळावर वावरावे असे जाहीर करून टाकावे..! :) मिपाच्या धोरणांसंबंधी, संपादनाविषयी, व्यवस्थापनाविषयी, मिपावर लोकशाही आहे अथवा नाही.. यासारख्या चर्चाप्रस्तावांना शक्यतो येथे थाराच नसावा! ;) "जे आहे ते योग्यच आहे असा मिपाचा दावा मुळीच नाही. परंतु आहे हे असे आहे..!" असेही जाहीर करून टाकावे.. ;) "मिपा व्यवस्थापनाचा वरील पवित्रा सर्वांनाच पटेल असे नाही. ज्यांना तो पटत नाही त्यांच्याबद्दल नितांत आदर तर आहेच.. परंतु 'या जगात कुठलेच एक व्यवस्थापन/एक तत्वप्रणाली सगळ्यांना मान्य होईल असे नाही..' या तत्वावरही मिपा व्यवस्थापनाची श्रद्धा आहे!" असेही जाहीर करून टाकावे..;) मॅटर एन्डस् :) तात्या. --Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it

In reply to by चित्रा

धनंजय Wed, 07/14/2010 - 21:07
संपादक आणि गुंड यांची तुलना होऊ शकते हे दाखवून देण्याचा आणि मिसळपावावर लोकशाही नाही हे सूचित करण्याचा मोह धनंजय यांना आवरता आला नाही, एवढेच वाटते.
दिलगीर आहे. सार्वभौम शासन सोडले तर कुठेच लोकशाही नसते. हे सांगितल्याशिवाय सार्वभौम शासनाच्या अनाठायी उपमा कशा खंडित होणार? लोकशाही नसणे म्हणजे काही नैतिक स्खलन नाही. पुन्हा : सार्वभौम शासन सोडले तर कुठेच लोकशाही नसते. मग विषाद का वाटावा? माझ्याकडून गुंडांची तुलना संपदकांशी झाली आहे, असा चित्रांचा गैरसमज झाला याबद्दल मला विषाद वाटतो. मिसळपावावरील माझ्या अन्य लेखांची आठवण येऊन अन्य वाचक "बेनेफिट ऑफ द डाऊट" देतील अशी आशा करतो. (जवळजवळ बेबंदशाहीतही काही धोरणे असतात, आणि इथे तर सेवा पुरवली जात आहे, धोरणे असणारच, असा साधा अलंकार आहे. "इथे तर सेवा पुरवली जात आहे" असा विरोधही स्पष्ट शब्दात सांगितला आहे. मग काय बरे चूक झाली असावी? समाजात अशी काही वाक्ये ऐकलेली आहेत "हिंस्र श्वापदसुद्धा पिलांची काळजी घेते, आणि ही तर साक्षात मायाळू आई आहे..." असे म्हटल्यास आईला हिंस्र जनावर म्हटल्याचा दोष लागतो का???)
मिसळपावावरची धोरणे अशाच प्रकारची आहेत असे मला वाटते.
वगैरेंबद्दल सहमती.

पक्या Wed, 07/14/2010 - 21:30
धागा / प्रतिसाद उडवल्यास संपादकांनी कारण द्यावयास पाहिजे ह्यास मी पण सहमत आहे. आणी ते विशेष कष्टाचे काम नसावे. जिथे लाल अक्षरात संपादित असे संपादक लिहू शकतो तिथेच तो आणखी २-४ शब्द वाढवून कारण देऊ शकत नाही? उदा. असंसदिय भाषा वापरल्याने संपादित , सदस्यांवर वैयक्तिक कारणास्तव चिखलफेक केल्याने संपादित, अति अति अवांतर होत असल्याने संपादित वगैरे जय महाराष्ट्र , जय मराठी !

आटपाट नगरातल्या राजाला न्याय सभेत निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळ लागत असायचे. सुखी,समृद्ध,आनंदी प्रजेला न्यायसभेत यावे लागायचे अशा गोष्टी बर्‍याच वाचलेल्या आपण पाहतो. बर्‍याचदा न्याय होत असायचा आणि बर्‍याचदा अन्यायही सहन करावा लागत असायचा. पुढे प्रगती होत होत राजेशाही गेली आणि लोकशाही आली. लोकशाही असली तरी राजेशाही कधीतरी डोके वर काढायची. सुरुवातीला या लोकशाहीवरही चहूबाजूंनी विविध आक्रमणे किंवा नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू लागला. लोक म्हणू लागले ही सर्व लोकशाहीपुढील आव्हाने आहेत. लोकशाहीत समता,स्वातंत्र्य,न्याय ही तत्त्वे जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तो पर्यंत लोकशाही समाजाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. आणि मग या लोकशाहीचे आधार कोणते काही एक नियम सांगितल्या जाऊ लागले. आर्थिक,सामाजिक,राजकीय स्वातंत्र्य असले पाहिजे असा असा विचार असला पाहिजे. लोकशाही म्हणजे 'जनतेचे जनतेसाठी आणि जनतेकडून चालणारे राज्य' अशा व्याख्या सुरु झाल्या. पुढे जनतेचे प्रतिनिधी म्हणजे सरकार झाले. लोकशाही मुल्य स्वीकारणे कट्टरपंथीयांना जड जाऊ लागले. अशी मंडळी सरकारवर दडपण आणू लागली. लोकशाहीचा प्रवासात नियम बनत गेले. लोकशाहीवर विश्वास असलेले,नसलेले चळवळी काढून वळवळी करु लागले. कायदे बनत गेले, मोडणारे मोडत गेले. अधिकाधिक स्वातंत्र्य,समता,बंधुता, आणि न्याय हे मूल्य स्वीकारुनही लोकशाही व्यवस्थेला खूप काही सहन करावे लागले. मानवी हक्कांची पायमल्ली होते अशी ओरड लोकशाहीतच ऐकायला मिळते. लोकशाही प्रबळ होण्यासाठी अशी आरडा-ओरड गरजेचीच असते. अर्थात अशावेळी अभ्यासू लोकांनी तरी नागरिक आणि लोकशाही प्रक्रियेत समन्वयाचा धागा विनला पाहिजे तरच लोकशाही अधिक प्रबळ आणि जनतेची होईल असे वाटते. असो, चर्चाप्रस्तावातील उत्तरार्धातील दोन्ही उदाहरणे आवडली होती. "आमची बेबी रडतेदेखील सुरेल" यात बेबीचे आई वडीलांना रडणे जसे सुरेल वाटते तसे त्यांच्या आप्तस्वकीयांना ते रडणे विविध 'रागा' इतकेच लक्षणीय वाटायला लागते. त्यामुळे 'रडणेच' चालू द्या असा आग्रह धरला जातो. तेव्हा आयोजकांनी अशा वेळी खाणाखुणा करुन त्या सर्वांना शांत बसवले पाहिजे आणि नाहीच ऐकले तर 'बखोटे' धरुन त्यांना दारात उभे केले पाहिजे. अशा वेळी जाणकार रसिकांनी सुरेल मैफिलीचा आनंद घ्यावा. रडणार्‍या बाळाचे मुके घेत बसू नये असे वाटते. -दिलीप बिरुटे [मिपा सदस्य खाते क्रमांक अठ्ठावीस]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रेमर Wed, 07/14/2010 - 22:57
[मिपा सदस्य खाते क्रमांक अठ्ठावीस]
कशाला सिनियॉरिटी दाखवताय बुवा? -क्रेमर [मिपा सदस्य खाते क्रमांक दहा हजार सातशे सहा]

In reply to by क्रेमर

>>>कशाला सिनियॉरिटी दाखवताय बुवा? मिपा सदस्य आणि क्रमांक यासाठी लिहिला की, खरडवहीत किंवा व्य.नि. ने कोणी विचारु नये की, प्रतिसादातील मत सदस्याचे आहे की संपादकाचे. त्यासाठी सदस्य म्हणून अंगावर असलेले तीळ दाखवावे लागते. :) अजून काय आपण कुठे असता ? नोकरी शासकीय आहे की खाजगी ? का व्यापार वगैरे काही ? [खरडवहीत उत्तरे लिहावीत ही न्रम विनंती] :) -दिलीप बिरुटे