मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजग नागरिक पुरस्कार

प्रकाश घाटपांडे · · जनातलं, मनातलं
७ फेब्रुवारी २०१० ला पुण्यात सजग नागरिक मंचा तर्फे सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजन नागरिक पुरस्कार देण्यात आला. संस्थापक विवेक वेलणकर यांनी पुरस्कारामागची भुमिका विशद केली. अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार होता परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येउ न शकल्याने त्याच क्षेत्रातील एक खरेखुरे आयडॊल सातारा जिल्ह्यातील शिवाजी राउत यांच्या हस्ते देण्यात आला. सतिश शेट्टी यांचे एक धाकटे बंधु संदीप शेट्टी व अमेरिकेतुन आलेले दुसरे बंधु संतोष शेट्टी यांनी तो स्वीकारला. माहिती अधिकार क्षेत्रात सामाजिक काम केलेले सतिश शेट्टी हे भारताच्या दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा ठरले. सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार या प्रसंगी उपस्थित होते. त्यांनी सतिश शेट्टी काम करीत असलेल्या माहिती अधिकाराच्या कागदपत्रांच्या पैकी काही भाग आपल्या संकेतस्थळावर टाकला आहे.भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती बरी असल्याचे आढळुन आल्याचे त्यांनी सांगितले. सतिश शेट्टी हा माहिती अधिकाराच्या चळवळीतला एकांडा शिलेदार होता. माहिती अधिकार चळवळीतील काम करणार्‍या संस्थांना फारसा माहित नव्हता. सतिश शेट्टीच्या हत्येनंतर कुटुंबावर झालेला आघातातुन देखील सावरुन संदीप शेट्टी यांनी त्यांना असंख्य लोकांच्या भेटीतुन आलेले अनुभवावरुन जे आकलन झाले त्याबद्दल उत्तम भाष्य केले. कुठेही अगतिकता नव्हती. आत्मविश्वास होता. मुंबईच्या एका पत्रकाराने तुम्ही ही सतिश शेट्टीची चळवळ पुढे चालवणार का? असा प्रश्न विचारला त्यावेळी ही एका व्यक्तीची चळ्वळ कशी झाली? असा प्रतिप्रश्न विचारुन त्यांनी ही समाजाची चळवळ आहे व यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च लीडर होउ शकते असे सांगितले, सतिश शेट्टी चळवळी मधे एकटा का पडला याचे उत्तर देताना त्यांनी सांगितले कि सतिश हा बरोबर किंवा चुक अशा दोन उत्तरात काम करीत होता. इंटरलेक्चुअल जो ग्रे एरिया शोधत असतात तो त्याला कधी जमला नाही. त्यामुळे तो कॊंग्रेसच्या सेवादलात टिकला नाही, अण्णा हजारेंच्या संघटनेत सुद्धा टिकला नाही. लोकशिक्षण हाच एक मार्ग असल्याचे मत मात्र संदिप शेट्टींनी आवर्जुन नोंदवले. शिवाजी राउत यांनी युवा व मध्य्मवर्ग या चळवळीपासुन दुर आहे. प्रसारमाध्यमांनी माहिती अधिकार चळ्वळीचे विश्लेषण जेवढे करायला पाहिजे त्या प्रमाणात केले नाही असे सांगुन अध्यात्माने इहवादी प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी संघर्ष व आत्मसन्मानाची जिगर आणि जिद्द लागते. ही चळ्वळ जीने का व जाननेका अधिकार आहे. त्यासाठी रक्त सांडावे लागणार आहे. सतिश शेट्टी जर जोशी,देशपांडे, पवार, देशमुख असता तर त्याच्या बलिदानाचा वेगळा अन्वयार्थ महाराष्ट्राने लावला असता. सतिश शेट्टीच्यात एक आत्मनिर्भरतेची चमक राउत यांना पुर्वीच दिसली होती. अण्णांच्या सोबत काम करताना यशदाच्या तत्कालीन महासंचालकांना [ माझ्या माहितीप्रमाणे रत्नाकर गायकवाड.] माहिती अधिकाराखाली काही माहिती सतिश शेट्टींनी विचारली होती. ही माहिती देणे त्यांच्या गैरसोयीचे होते. त्यांनी अण्णांना हे सांगितले व अण्णांनी सतिश शेट्टीला आपल्या संघट्नेतुन बाजुला केले.हे सांगाव कि नाही असा संभ्रम राउतांना पडला होता. पण त्यांनी ते नम्रपणे सांगितले.भविष्यात ही चळ्वळीला कार्पोरेट व राजकारणी यांच्या अभद्र युतीला तोंड द्यावे लागणार आहे. ही कोणा एका व्यक्ती विरुद्धची चळ्वळ नसुन व्यवस्थेला शुद्ध करीत जाणारी चळ्वळ असल्याचे प्रतिपादन करण्यावर राउतांचा भर होता.एकुणच शिवाजी राउतांनी चळ्वळीचा एक उत्तम आढावा या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतला. कार्यक्रम हा अत्यंत हृद्य झाला.अनेक क्षेत्रातील मान्यवर आले होते. नेहमी प्रमाणे आम्ही आपल्यासाठी या कार्यक्रमाचे जमेल तसे ध्वनीमुद्रण केले आहे. आपल्याला ते ऐकता येईल. पहिल्या ध्वनिफितीत संदीप शेट्टी आपले मनोगत व्यक्त करताहेत तर दुसर्‍या ध्वनीफितीत शिवाजी राउत आपले विश्लेषण सांगताहेत. ऐका.
Get this widget | Track details | eSnips Social DNA
Get this widget | Track details | eSnips Social DNA

वाचने 2155 वाचनखूण प्रतिक्रिया 10

युयुत्सु 10/02/2010 - 10:10
जिते पणी जोडे आणि समाधीवर फुले.... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

ऋषिकेश 10/02/2010 - 10:11
चांगली माहिती. कै. शेट्टींचा लढा पुढे चालु राहिलच.. तीच त्यांना श्रद्धांजली असेल बाकी फीत घरी गेलो की ऐकेन ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

अमृतांजन 10/02/2010 - 22:47
माहिती अधिकार क्षेत्रात सामाजिक काम केलेले सतिश शेट्टी हे भारताच्या दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा ठरले. अतिशय योग्य उपमा!

सुधीर काळे 12/02/2010 - 14:41
या अतीशय महत्वाच्या विषयावरील लेखाला आतापर्यंत फक्त तीन (मोजून) प्रतिसाद आलेले पाहून मला "जगाच्या पाठीवर" या चित्रपटातील "उद्धवा, अजब तुझे सरकार' या गाण्याच्या "इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीविता, बोरिबाभळी उगाच जगती, चंदन माथि कुठार" या कडव्याची आठवण झाली! वाईटही वाटले! ------------------------ सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

अनामिका 13/02/2010 - 00:33
अश्यांना सरकारी सन्मान मिळत नाही ,ते फक्त चटवाल,सैफ अली खान ,गुलाम महोम्मद मीर अश्या प्रकारच्या वरच्या श्रेणीतल्या लोकांनाच मिळतो .सचोटीने समाजासाठी झटणार्‍यांसाठी अश्या प्रकारचे सन्मान देण्याचा प्रघात आपल्याकडे नसावा बहुदा नव्हे तो नाहीच!यांचे खरे मारेकरी उजेडात आले तरी पुरेसे आहे.जे होणे अशक्य आहे... त्यासाठी उपर की कमाई ,एका दोघा मुलींशी प्रेमप्रकरण असणे पक्षी फसवणे ,काही आर्थिक घोटाळे,दोघा चौघांचे मुडदे पाडता येणे यासारख्या गोष्टिंचे शिक्षण असणे आपल्या सरकारी पद्धतीत सक्तीचे आहे. "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

चित्रा 13/02/2010 - 02:14
आत्ता ऐकता आले नाही. श्री. शेट्टी यांच्या हत्येबद्दल अतिशय वाईट वाटले. वर शेट्टींना एकांडे शिलेदार म्हटले आहे. पण ते तसे का होते? माहितीच्या अधिकाराबद्दलच्या चळवळीत नक्की कोण कोण आहे? त्यांना शेट्टी माहिती का नव्हते/नसावे? ही चळवळ अशा पातळीवर आली का आहे की ती एका व्यक्तीच्या मरण्याने थांबणार नाही, पुढेच जाईल?