वडे म्हटलं की मराठी मनाला आठवतात ते वरती बेसनाचे पातळ कुरकुरीत आवरण, आत लसूण आलं घातलेली बटाट्याची भाजी, आकाराने लहान आणि चपटे, खरपूस तळलेले, खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाल्ले जाणारे, कायमच कमी पडण्याचा शाप असलेले, मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे बटाटेवडे. पण कोकणी माणसाला वडे म्हटलं की हे वडे न आठवता पुरी सारखे दिसणारे तांदुळ, उडीद डाळीचे वडे जे " मालवणी वडे " म्हणून ही प्रसिद्ध आहेत तेच वडे आठवतात.
कोकणात आमच्याकडे कोणत्याहि शुभ कार्याला, कुळाचाराला, तसेच श्रद्धपक्षादि विधींना हे वडे लागतातच. कोकणातला पदार्थ असल्याने नॅचरली ह्यात मुख्यत्वे तांदुळच असतात.