आठवणी आठव्याला गेलं की खरंच खूप आठवणी आठवतात
काही आठवणी गाण्यांमध्ये रमतात तर काही शब्दांमध्ये अडकतात
काही आठवणी चेहऱ्यावर उगाच हसू आणतात
तर काही आठवणी उगाच मनास छळू पाहतात
काही आठवणी पुन्हा आठवणी मध्ये गुंतवतात
तर काही आठवणी आठवणींचा गुंता सोडवू पाहतात
काही आठवणी आयुष्य सुंदर बनवतात
तर काही आठवणी आयुष्य जगायला शिकवतात.
ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल. ❤️
व्हिडिओला LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका!
Written By: Trupti S. Tilloo
प्रतिक्रिया
18 Jan 2026 - 6:52 pm | अभ्या..
अहाहा,
काही आठवणी शून्य प्रतिसादाच्या,
काही आठवणी व्हाटासपाच्या रोमँटिक शायरीच्या,
काही आठवणी प्राडॉच्या हळवेपणाच्या
तर काही त्यांच्या खिल्ली उडवायच्या......
.
वेल्कम अॅन्ड थॅन्क्स फॉर युट्युब चॅनेल इन्व्हिटेशन.
कवितेइतकेच थुकरट आणि निरागस आहे ते. (कसे जमते हे दोन्ही एकाचवेळी)
18 Jan 2026 - 6:57 pm | तृप्ति २३
धन्यवाद तुमच्या कमेंट बद्दल.
18 Jan 2026 - 8:00 pm | कंजूस
आठवणी खूप आहेत जुन्या
पण त्या सांगता येतात फक्त गप्पांचा अड्डा जमल्यावर.
तर गेल्या बारा वर्षांतील फोटोंच्या रूपात
छानपैकी बंदिस्त होऊन
मोबाईलात किंवा मेमरी कार्डात पडलेल्या.
कुणी भेटल्यास विचारतो दाखवू का त्यातल्या पन्नास?
तर उत्तर येते माझ्याच पाहा अगोदर शंभर.
19 Jan 2026 - 9:50 am | कांदा लिंबू
सदर काव्यात्म लिखाणातील आशयाच्या व्यामिश्रतेचा आवाका हा केवळ आठवणींच्या परिप्रेक्ष्यापुरताच मर्यादित नसून तो चेहरा ते हसू अश्या दीर्घ पटलावर दृग्गोचर झालेला आहे असे या लिखाणाचे व्यासंगीक दृष्टीने परिक्षण केले असता आढळून येते. मिपासारख्या "मिसळपाव" असे मसालेदार विशेषनाम धारण केलेल्या तरीही लेखनाशयाच्या दृष्टीने अगदीच यःकिंचित अशा संस्थळावर, एखाद्या खानावळीत आचाऱ्याने त्याच्या झारीतून अनिवार जिलब्या पाडत राहाव्यात तसे लेखरूपी धागे आणि प्रतिसाद पाडत राहणाऱ्या कःपदार्थ मिपाकरांच्या लेखनप्रसवाशी सदर उत्तुंग उंचीच्या काव्यशिखराशी तुलना केली असता भांगेत तुळस उगवल्याचा किंवा माळरानावर अंकुर फुटल्याचा आल्हाददायक अनुभव साक्षेपी रसिकाला आल्याशिवाय राहणार नाही.
ग्रीष्म-वैशाखाच्या काहिलीमुळे जशी धुक्यात गारठलेली शरद पहाट दुर्मिळ व्हावी तसेच आजकालच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तडाख्यात असे उच्च प्रतिभेचे अनवट लेखन दुर्मिळ झाले आहे. योग्य शब्दांची अचूक निवड, आवेशहीन निवेदनाचा तरल ओघ, आठवणविषयाचे तरल तरीही हृद्य असे शब्द-चित्रण आणि कृष्णार्जुनमैत्रीसम भावना-अभिव्यक्ती रूपकातून मांडलेले आशयघन विचार अशा या बांधीव काव्य-लिखाणाचे आज वाचन करण्याची आज मिपाच्या निमित्ताने सुसंधी प्राप्त झाली हा सुवर्णकांचन योगच म्हणावा लागेल.
- (कला साहित्य काव्य समीक्षक) कांदा लिंबू