एका तलवारबाजाची कहाणी
पांडवांच्या वनवासातले १२ वे वर्ष संपत आले तसे दुर्योधनाच्या चेहर्यावरचे चिंतेचे जाळे वाढतच चालले. पांडवांच्या मागावर सोडलेले गुप्तहेर जसे एकामागुन एक बेपत्ता होउ लागले तसे तसे तर त्याचे डोके काळजीने पोखरले जाउ लागले. कर्ण, द्रोण भीष्मादि दिग्गजांच्या बळावर त्याने पांडवांशी वैर तर घेतले होते परंतु एक कर्ण वगळता कोण किती एकनिष्ठ आहे याबद्दल त्याला शंकाच होती. भीष्म द्रोण तर ऐनवेळेस पाठिशी उभे राहतिल की नाही याची त्याला काळजी होतीच. पण सत्तेच्या लालसेने दु:शासन देखील विरोधात उभा ठाकणार नाही कशावरुन? पण ही शंका तो झटकन पुसुन टाकत असे. द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन तर होता. दुर्योधनाला सोडुन तो जाणार तरी कुठे? आणि गेलाच तर भीमाच्या तावडीतुन त्याला वाचवणार कोण?
भीम म्हटले की दुर्योधनाला राहुन राहुन त्याची १०० कौरवांना मारण्याची प्रतिज्ञा आठवायची. तो स्वतःशीच विचार करायचा "माथेफिरुच आहे म्हणा तो भीम तसा. जेवढा खातो त्याचा दहावा भाग जरी अक्कल वापरली तरी पांडवांचे बरेच प्रश्न सुटतील. पण हे ही खरे म्हणा की आज ना उद्या पांडव जर समोर उभे टाकले तर ते त्या मस्तवाल भीमाच्या बळावरच उभे टाकणार. अन्यथा अर्जुनाचा प्रतिकार करण्यासाठी एकटा कर्ण पुरेसा आहे. पण भीमाचे तसे नाही. खुनशी आहे आणी अविचारी आहे. प्रतिज्ञा केल्याप्रमाणे माझी मांडी फोडायला आणि दु:शासनाचे रक्त प्यायला कमी करणार नाही तो राक्षस" हे आठवुन दुर्योधन अजुन जोमाने गदेचा अभ्यास करायचा. त्याने भीमाचा पुतळाच बनवुन घेतला होता ना. त्याच्यावर तो रोज गदेचे घाव घालुन अंगातली रग जिरवायचा. पण प्रश्न जेव्हा युद्धाचा येइल तेव्हा प्रथमदर्शनी दुर्योधनाला अंगावर घ्यायला भीमदेखील वाटतो तितका मुर्ख नाही हे तो जाणुन होता. अश्यावेळेस त्याला त्याच्या ९९ भावांची काळजी वाटायची. दुर्योधन समोर नसताना भीम गदेने एकेकाचा चेंदामेंदा करेल हे दुर्योधन जाणुन होता आणि त्याच्या आणि भीमाच्या या वैरात भीम कदाचित त्याच्या पोरांचाही घास घ्यायला कमी करणार नाही हे ही तो जाणुन होता.
अज्ञातवासाचे वर्ष सुरु झाले तसे तर तो अजुनच काळजीत पडला. गुप्तहेरांवरचा त्याचा विश्वास जणु उडुन गेला. वेष बदलुन तो स्वतःच आडबाजुच्या गावात जाउ लागला. असाच एका उत्सवात जत्रा भरलेली असताना त्याला तलवारीचे आणि पट्ट्याचे खेळ करणारा चक्रधर दिसला. पट्ठ्या निष्णात तलवारबाज होता. हवेत उडवलेल्या फणसाचे चक्रधराने निमिषार्धात १६ तुकडे केलेले बघुन तर तो स्तिमित झाला. फणस हवेत उडाला आणि चक्रधराने अश्या काही कौशल्याने तलवार फिरवली की एरवी जो फणस कापण्यासाठी नितांत परिश्रम घ्यावे लागतात तो १६ तुकडे होउन जमिनीवर पडला. दुर्योधनाने ओळखले हाच तो वीर जो भीमरुपी चिंतेवरचा रामबाण उपाय आहे. त्याने मोठ्या मानाने चक्रधराला हस्तिनापुरच्या चतुरंगी सेनेत मानाचे स्थान दिले. अर्थात त्याच्या अंगचे गुण मात्र त्याने लपवुन ठेवले. चक्रधर एवढा पट्टीचा तलवार बाज आहे हे तो वगळता कोणालाही माहिती नव्हते अगदी शकुनीमामाला आणि कर्णाला देखील. हा त्याने हे गुपित लक्ष्मण आणि दौशासनीला मात्र सांगितले. त्या दोघांनी चक्रधराकडुन तलवारबाजी शिकुन घ्यावी असे मात्र त्याला मनापासुन वाटत होते.
यथावकाश दुर्योधनाच्या मनातली भिती खरी ठरली पांडवांनी कपट केलेच. त्याने मनात विचार केला "मागच्यावेळेस १२ वर्षे वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात त्यांना पाठवले तेव्हा त्यांचा सल्लागार तो कपटी कृष्ण दूर बसला होता यावेळेस मात्र त्याने डाव साधला. विराटनगरीत अर्जुनाला ओळखलेले असतानाही त्याने यावेळेस पांडवांना बरोबर पढवले होते. त्यांनी उलटा कावा केला की म्हणे अज्ञातवास खुप आधीच संपला होता. वा रे वा म्हणे आधी संपला होता. आधीच संपला असता तर हे लबाड लोक आधीच नसते का प्रकट झाले? आम्ही ओळखले म्हणुन आता अजुन एक वनवास आणि अज्ञातवासाचे चक्र चुकवण्यासाठी लबाडी करताहेत झाले. पांडवांच्या वतीने कृष्णाने ५ गावांचे दान मागितले. त्यातली ४ गावे तर अशी की व्युहात्मक दृष्ट्या कौरवांची कौंडीच करणार आणि वर हा मखलाशी करतो आहे की पाचवे गाव म्हणे तुम्ही द्याल ते आम्हाला मान्य आहे. आता ही ४ गावे मागितल्यावर काय मग पाचवे गाव म्हणुन हस्तिनापुरपण देउ काय? वा रे वा? सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीन नाही देणार हे ठणकावुन सांगितले हे बरेच झाले."
कृष्ण परतल्यावर मात्र दुर्योधनाची घाई सुरु झाली. युद्धाचा बार उडणारच होता. अर्जुनाची त्याला भिती नव्हतीच कर्ण सक्षम होता. इतर सैन्यासाठी भीष्म द्रोण पुरेसे होते. भीमाला स्वतःच सामोरे जायचे त्याने ठरवले. या सगळ्या धामधूमीत त्याने चक्रधराला मातर तलवारीचा कसून सराव करायला सांगितले. युद्धाचा पहिला दिवस उजाडला आणि मावळला देखील. युद्धात पांडवांच्या पहिल्या सेनापतीची स्वेताची आहुती पडली याव्यतिरिक्ता फारसे काही घडले नाही. भीष्मांनी आपले काम चोख बजावले. पहिल्याच दिवशी शत्रुचा सेनापती मारला. अपेक्षेप्रमाणे पांडवांनी दृष्ट्यद्युम्नाकडे कमान सोपवली. पण दुर्योधनाला आता चिंता नव्हती. त्याने चक्रधराला खुषाल हस्तिनापुरी धाडुन दिले. ३-४ दिवसात युद्ध असेही संपेलच. त्याचे गुप्त हत्यार गुप्तच राहिलेले बरे. परंतु नंतर मात्र फासे उलटे पडत गेले. रणांगण होते ते. तिथे शकुनीने फासे टाकले आणि दान आपल्या बाजुने पडले असे होणार नव्हते. इथे नियतीच फासे टाकत होती. १५ दिवस सरले आणि भीष्म द्रोण दोघेही धारातीर्थी पडले. कर्णाने अपरंपार पराक्रम गाजवला अगदी भीमालादेखील निरस्त्र करुन अगदी अपमानित करुन हरवले. पण त्या भीम - कर्ण युद्धात ३१ कौरवांची आहुती पडली त्याचे काय? आणि एवढे करुन भीमाला कर्णाने जीवदान दिले? अजुनच मोकाट सुटलेला तो भीम रणांगणावर वेचुन वेचुन कौरवांना मारत सुटला. तसा दुर्योधन खडबडुन जागा झाला. आता स्वतःहुन भीमाला सामोरे जाणे हे इष्ट हे त्याला जाणवले पण तो तरी काय करणार त्याचा प्रत्येक सेनापती सर्वप्रथम त्याच्या रक्षणावर भर द्यायचा आणि त्याला शक्यतो भीमापासून दूर ठेवायचा. दुर्योधनाने त्यामुळे तातडीने चक्रधराला पाचारण केले.
चक्रधर आला तसा त्याला हायसे वाटले. आपल्या उरल्यासुरल्या भावंडांच्या रक्षणार्थ प्रमुख म्हणुन त्याने चक्रधराची नेमणूक केली आणि तो निश्चिंत झाला. त्याने चक्रधराला आज्ञाच दिली होती की भर रणांगणात जसा भीम दिसेल तसे त्याच्या अंगावर धाउन जायचे आणि तलवारीने भीमाचे शीर कापून आणुन द्यायचे. दुर्योधन त्याला म्हणाला " चक्रधरा जत्रेत जसा फणस कापला होता तसेच आज भीमाचे शीर घेउन ये. तुला जन्मभर कुठल्याही गोष्टीची ददात भासणार नाही याचा काळजी मी घेइन हे माझे वचन. " दुर्योधनाला वंदन करुन चक्रधर कौरवांच्या रक्षणार्थ बाहेर पडला. भीम सहजी नजरेस पडावा म्हणुन त्याने एका हत्तीची निवड केली. थोड्याच वेळात भीमाच्या आक्रमणाची वर्दी मिळाली तसा तो हत्तीवरुन खाली उतरला आणि भीमाची प्रतिक्षा करु लागला. कौरव लढत असलेल्या बाजूला भीम येणारच हे त्याला माहिती होते. आणि थोड्याच वेळात कुरुसैन्यातल्या हत्तींचे चित्कार त्याच्या कानी येउ लागले. थोड्या अंतरावरील रण धुमाळीवरुन जाणवले की भीम चालुन येत आहे. हत्ती आणि घोड्यांची कलेवरे हवेत उडत होती, डोकी फुटलेल्या यौद्द्यांचे विव्हळणे कानी पडत होते आख्खेच्या आख्खे रथ इतस्तत: उसळत होते आणि तेवढ्यात त्याला दिसले की एक धिप्पाड यौद्धा मैरेयकाचे घडेच्या घडे पचवुन लाल झालेल्या डोळ्यांनी प्रचंड आरोळ्या ठोकत, युद्धाचा मद अंगात भिनवुन प्रचंड रणकंदन माजवत त्याच्याच दिशेने येतो आहे. तो भीमच होता. वाटेत येणार्या प्रत्येक यौद्ध्याला, मग तो पांडवांच्या बाजूने लढाणारा असो की कौरवांकडुन लढणारा, गदेच्या एका फटकार्यासरशी हवेत उसळवुन देउन प्रचंड वेगाने भीम पुढे सरकत होता. त्याचा तो आवेश बघुनच चक्रधर स्तब्ध झाला, थिजल्यागत जागीच उभा राहिला. तलवार उगारण्याचेही सामर्थ्य त्याच्यात उरले नाही आणि पापणी लवायच्या आत त्याचे कलेवर उधळुन देउन भीम पुढे निघुनही गेला होता.
त्या रणभूमीवर जत्रेतले कसब असुन चालत नाही तर रणातला आवेश महत्वाचा असतो, केवळ लालित्य असुन चालत नाही तर शौर्य असावे लागते आणि फणस कापण्याचे कौशल्य असुन चालत नाही तर डोकी उडवण्याचे धैर्य लागते, हातात शस्त्र असुन उपयोग नसतो तर डोक्यात रणाचा मद चढलेला असणे आणि डोळ्यात अंगार आणि अंगात जोश आणि विखार असणेच अखेर उपयोगी पडते हे त्याला कळण्यापुर्वीच बिचारा चक्रधर त्या युद्धभूमीपासुन फार दूर निघुन गेला होता. त्याच्यापाठोपाठ भीमाने दुर्योधनाचे दु:शासनादि १२ इतर भाऊदेखील पाठवुन दिले आणि दुर्योधन मात्र मोठ्या आशेने चक्रधर भीमाचे शीर घेउन येण्याची प्रतिक्षा करत राहिला. सुर्य अस्ताला गेला. भीम जिवंतच होता, दुर्योधन त्याच्या १२ भावांच्या कलेवरांवर अश्रु ढाळत होता आणि एक कसबी कलाकार रणावेश आणि कला यातील फरक न ओळखु शकल्याने कायमचा विस्मृतीत टाकला गेला होता.
प्रतिक्रिया
आवडली
अतिशय आवडली कथा. अन ती
कथा आवडली..छान आहे.
मस्त
'अंगणातला गुण परसात गुण असेलच
दृष्टद्युम्न कि स्वेता
बाबा रे मी महाभारतातले दाखले
पशैतां पांडूपुत्राणाम आचार्य
श्वेताचा उल्लेख फक्त पहिल्या
बरोबर. पण जिथे येतो तिथे दहा
तुझे महाभारताचे ज्ञान बघुन
ज्ञान कसले रे. दोन तीन वेळाच
अर्धांग सोनेरी झालेल्या
नक्कीच लिही. तशीही ही लेखमाला
ऊप्स
नाट्यमय अन अज्ञात कथा आवडली.
नीटसे आठवत नाही पण फार पुर्वी
अप्रतिम कथा आहे.... खूप खूप
सुंदर कथा !!
Pagination