शाळा
शाळा हा विषयच असा आहे की कितीही लिहा कमीच पडेल. पेनातली शाई संपेल (किंवा कळफलक दाबु दाबुन बोटे दुखतील) पण शाळेच्या आठवणी संपणार नाहीत. प्रत्येकाच्या हृदयात शाळेच्या आठवणींसाठी एक वेगळ कप्पा राखुन ठेवलेला असतो. त्या १०-१२ वर्षांच्या आठवणी नेहेमीच सोनेरी रुपेरी असतात असे नाही पण अटळ, अचल, अविनाशी नक्की असतात. माझ्या आठवणीत एक नाही अनेक शाळा आहेत. पण शाळेशी खर्या अर्थाने बंध जुळण्याच्या काळात म्हणजे ५ वी नंतर मी ठाण्याच्या सरस्वती मध्ये होतो.
शाळेतली ती सोन्यासारखी वर्षे अनेक समाजकंटकांनी (यात काही शिक्षकवर्ग आणि शालेय अभ्यासक्रमात गणितासारखे अनाकलनीय विषय घुसडणारे काही अभद्र प्राणिमात्र येतात) अक्षरशः पोखरुन काढली होती. पण म्हणुन शाळा मला आवडायची नाही असे नाही. आवडायचीच आणि ती आवडण्यामागे असणार्या अनेक कारणांपैकी एक होते आमच्या शाळेचे ग्रंथालय आणिअ ग्रंथपाल (च्यायला नाव विसरलो बघा त्यांचं). अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचा तिथे फडशा पाडला. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत मी लायब्ररीत पडीक असायचो. आमचे लायब्ररीयन सगळी चांगली पुस्तके काढुन मला वाचायला द्यायचे आणि मी दिवसभर तिथेच बसुन ती चावायचो.
वाचली ती सगळीच पुस्तके आवडली असे नाही. पण बरीच आवडली. भावली. काही पुस्तकांची भाषा डोक्यावरुन गेली पण त्यातली भावना, त्यातली वातावरणनिर्मिती मस्त धमाल करुन जायची. पण खर्या अर्थाने भारावल्यासारखे झाले ते शिवाजी सावंतांचे मृत्युंजय वाचुन. कितीतरी दिवस मी त्यातल्या कर्णाची, कृष्णाची वाक्य येणार्याजाणार्यांच्या तोडावर फेकत होतो. डोळे बंद केले की १६व्या दिवशी रणांगणावर एकहाती झुंजणारा कर्ण दिसायचा (तेव्हा मी ६वी / ७वीत होतो. मोरपीस फिरवलं गेल्यासारख्या आठवणी निर्माण करणार्या वर्गप्रिया डोळ्यासमोर यायच्याएवढी बौद्धिक वाढ झालेली नव्हती माझी). आणि प्रत्येक वाक्यागणिक रडीचा डाव खेळलेल्या अर्जुनाची कीव यायची, चीड यायची. त्याचाच प्रभाव असेल कदाचित पण जेव्हा मिपावर सदस्यनाम घ्यायची वेळ आली तेव्हा झटकन मृत्युन्जयच सुचलं. त्यानंतर अनेक पुस्तके वाचली. सावंतांचेच युगंधरदेखील वाचले. तेही छान होते. पण छावा, पावनखिंड, पॅपिलोन अशी मोजकी पुस्तके वगळता कुठल्याही पुस्तकाने भारावुन गेलो नव्हतो. तो आनंद काल बर्याच दिवसांनंतर, किंबहुना बर्याच वर्षांनंतर मिलिंद बोकीलांचं शाळा वाचुन मिळाला.
शाळेची कथा आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या कुठल्याश्या काँक्रीटीकरण न झालेल्या उपनगरात फुलत जाते. ही कथा आहे ९वीत शिकणार्या काही मुलांची आणि मुलींची. खासकरुन जोशी, चित्रे, सुर्या (म्हात्रे) आणि फावड्याची (पांडुरंग) . त्यांच्या भावविश्वाची आणि त्यांच्या उनाडक्यांची आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे त्या वयात शाळेत गेलेल्या सगळ्या मुलांची. तुमची - माझी. शाळेचं तेच वैशिष्ट्य आहे की ती या ४ मुलांची कथा असली, जोश्याच्या तोंडुन आपल्याला कळत असली, १९७५-७६ सालात घडलेली असली तरी ती आपल्याला आपल्या स्वत:ची वाटते. त्यातली प्रत्येक गोष्ट नाही जरी, तरी बहुतांश घटना अगदी आपल्या आयुष्यात घडल्यासारख्या वाटतात. अगदी त्याच वयात नाहीत पण ३-४ वर्षांच्या फरकाने समजा.
वेगवेगळ्या सामाजिक स्तरातुन आलेल्या पण मैत्रीच्या एका निरपेक्ष, निरागस, निर्हेतुक , निस्वार्थ धाग्याने बांधल्या गेलेल्या शाळेतल्या या ४ मित्रांचा आवडता उद्योग म्हणजे म्हात्रेच्या अर्धवट बांधलेल्या घरात लपून बसून कुचाळक्या करायच्या. रस्त्यावरुन शाळेत जायला निघालेल्या मुलांची आणि कधीमधी शिक्षकांची सुद्धा लपून राहुन फिरकी घ्यायची. अर्थात या कुचाळक्या तारुण्यसुलभ असतात, वयाला साजेश्या असतात. कुठल्याही शाळेतली ८वी - ९ वीतली मुलं जे काही करतात तेच ही मुले पण करतात. शाळेतल्या मुला मुलींच्या जोड्या लावतात तशीच शिक्षकांच्या जोड्याही लावतात. शिक्षकांबद्दलचा राग लोभ त्या वयाला साजेश्या निरागसपणे / आगाउपणे व्यक्त पण करतात. वर्गातल्या मुला मुलींना सुकडी, केवडा, घासु, भावमारु, फावड्या असली इरसाल नावे पण पाडतात. आणि शालेय जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट पण करतात. ७वी / ८वी पर्यंत वर्गातल्या पोरींशी भांड भांड भांडुन नंतर त्यांच्याच प्रेमात पण पडतात. त्या वयातले, ते प्रेम ती भावना, ती हुरहुर, ती मोरपीस फिरवल्यासारखी सुखद जाणीव, तिच्या आठवणीत "भाड मे जाये दुनिया" टाइप आलेले फीलिंग हे सगळॅ बोकिलांनी अतिशय सुरेख माडले आहे. प्रेमात पडलेल्या जोश्याच्या भावना बोकिलांनी त्याच्याच शब्दांत अश्या मांडल्या आहेतः
"त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्या पांढर्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे."
शाळेतले ते पपी लव्ह १०० पैकी ९९ वेळा शाळेतच विरुन जाते. पण ती लवशिप, ती लाइन मिळवण्यासाठी केलेल्या त्या धडपडीची, त्या क्लृप्त्यांची आठवणी बोकिलांनी आपला कथानायक जोश्याच्या कथानकतुन अक्षरशः जिवंत उभी केली आहे. शिरोडकर नामक वर्गभगिनीचे (शी शी शी. किती बकवास शब्द आहे हा. या शब्दाने आयुष्यातल्या १५ बहुमोल वर्षांचं पार मातेरं केले) प्रेम संपादन करण्यासाठी जोशी जो काही आटापिटाअ करतो आणि शेवटी यशस्वी होतो त्याच्या वर्णनाला तोड नाही. एका वर्षात जमलेले ते प्रेम त्याच वर्षात छोट्याश्या गैरसमजातुन कोलमडुन सुद्धा पडतं. सरतेशेवटी शिरोडकर निघुन गेल्यामुळे जोश्याच्या जीवाची जी घालमेल होते ती तर केवळा अप्रतिम. वर्षभर बसलेले धक्के जोश्याने सहन केलेले असते. केटी, विजय वगैरे वयाने मोठे असलेल्या तरीही आवडत्या असलेल्या मित्रांचे दुरावणे, आवडत्या शेतावर इमारत बांढली जाणे, आवडत्या सरांना काढुन टाकले जाणे, कट्ट्याचे सुटणे हे सगळे सोसलेला जोशी शेवटी शिरोडकर निघुन गेली हे कळाते तेव्हा मात्र भयानक उदास होतो. त्यावेळेस एका १४-१५ वर्षाच्या मुलाचे मन बोक्किलांनी अचुक टिपले आहे:
"मी कितीतरी वेळ तसाच बसून राहिलो. मग हळुहळु मला सगळं नीट समजत गेलं. रिझल्ट लागला होता. सुर्या आणि फावड्या नापास झाले होते. सुर्या त्याच यत्तेत राहणार होता. फावड्याची शाळा सुटणार होती, चित्र्या कदाचित बांद्र्याला जाणार होता. आता आम्ही बिल्डींगवर पुन्हा कधीही जमणार नव्हतो. पुढच्या वर्षी शिकवायला बेंद्रेबाई होत्या. आप्पा, हळाबे, केंदाळकर होते. पण झेंडेसर नव्हते, मांजरेकर सर निघुन गेले होते. वर्ग त्या जाळीच्या पिंजर्याआड होता. तिथुन ग्राउंड दिसणार नव्हतं. सोनारपाड्याचे डोंगर दिसणार नव्हते. उद्यापासुन त्या कडुसकर सरांची शिकवणी लावायची होती. सगळीकडे ती आणिबाणीची परिस्थिती तशीच होती. पण केटी नव्हता, विजय नव्हता. नरुमामाचं लग्न झालं होतं. आमच्या अंगणात कोणी चेस खेळणार नव्हतं. आता शेताडीत इमारती बांधल्या जाणार होत्या. तिथे ती पाण्याने भरलेली भाताची शेतं आता कधीच दिसणार नव्हती. भोवताली हे अफाट भव्य जग तसंच होतं, पण त्यात शिरोडकर कुठं हरवलीय ते माहित नव्हतं. शाळा संपली होती. आता होतं फक्त दहावी नावाचं भयाण वर्ष."
या वाक्याबरोबर पुस्तक संपतं. आपल्या जाणावत राहतं की आपल्या आयुष्यातुन सुद्धा आपली शिरोडकर अशीच निघुन गेली आहे. भोवताली हे अफाट भव्य जग तसंच आहे. शाळा संपली आहे आणि आता फक्त भयाण आयुष्य उरलं आहे जे पोटापाण्याच्या चिंतेत जगायचं आहे. :) नाही शाळा एवढं गंभीर नाहं. किंबहुना ते अजिबात गंभीर नाही. तो एक शाळा नावाच्या उत्सवाचा सोहळा आहे. शाळेतुन बाहेर पडुन वर्षं / शतकं उलटल्यानंतर पुन्हा तोच अनुभव घेण्यासाठी शाळा एकदा वाचाच.
जोशी १०वीची तयारी करतो आहे. मी ११ची. तुमचं काय? तुम्ही शाळा वाचा :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त! त्या दिवशी मला कळलं की
काल रात्री मी शाळा वाचुन
त्यातली
शेवटी रिझल्टच्या वेळी
मस्त!
छान.
रुईया महाविद्यालयाने ह्यावर
देवळाचा जो प्रसंग आहे . .तो
अप्पा बहुदा स वा जोशी
ही कथा डोंबिवली येथे घडते असे
आयला खंग्री ओब्जर्वेशन आहे
संध्याकाळी माझे मित्र मंडळी
+१०
जियो मृत्युंजय ! मस्त लिहिले
किती दिवसांनी हा शब्द ऐकला
झकास
तुम्ही शाळा वाचा Smile >>>
नुकतीच 'शाळा' वाचून पूर्ण केली ...
नुकतीच 'शाळा' वाचून पूर्ण केली ...
शाळा
छान पुस्तक परिचय
वाचायलाच हवे आता
मी शाळा वाचलं ते धम्याचं
च्यायला!
>>गंमत सांगायची तर मी अजुन
बोंबला!
छान !
मिपावर आलेला 'शाळा' वरचा हा
आयला खरंच की. जरा सर्च
गप रे.
+१ दुसरा धागा टाकला या बद्दल
जानेवारीचा योगायोग....!
कादंबरीतील "लाईन मारणे" ही
भावले (ते)...!
माझ्या मनातल्या खुणा, करती मला वेडा खुळा !
ऐलदेशी शुष्करानी पंख मिटला
एक नंबर आहे हे कडवे. मी वाचली
चित्रपट
शाळा
झकास लेख !